श्रीकांत परांजपे, सौजन्य – लोकसत्ता

 

पश्चिम आशियात गेल्या वर्षभरात होत असलेल्या लष्करी-राजकीय तसेच धार्मिक मंथनाबाबत टिपणी करताना अबदेल बारी अटवन विचारवंतांनी अशी टिपणी केली : ‘आता एक खरंखुरं युद्ध सुरू होईल, नवीन गट पुढे येतील आणि सतत एका मध्य पूर्वेचा उदय होईल.’ पश्चिम आशियातील आयसिसचा (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅन्ड सीरिया / आयएसआयएस) उदय, इराकमधील शिया-सुन्नी वाद, सीरियात सुरू असलेली यादवी आणि यात तुर्कस्तान तसेच इराणने घेतलेल्या भूमिका त्या पाश्र्वभूमीवर अटवन वक्तव्य करीत होते, त्या पश्चिम आशियाई घडामोडींमध्ये या प्रादेशिक सत्तांव्यतिरिक्त रशिया व अमेरिकेचेदेखील हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याचादेखील संदर्भ त्या टिपणीत दिसतो.

आयसिसची चळवळीची सुरुवात सद्दाम हुसेननंतरच्या इराकमधील राजकीय व्यवस्थेतून तसेच असाद यांच्या सीरियातील समस्यांमधून होताना दिसते. अमेरिकेने इराकमधून बाहेर पडताना इराकमधील ‘बाथ’ या सद्दाम हुसेननी मांडलेल्या इराकी विचारप्रणालीविरुद्ध मोहीम सुरू केली. इराकचे नवीन सरकार हे शिया पंथाचे सरकार होते. ज्यांनी सद्दाम हुसेनच्या लष्करातील बाथ साम्यवादी पक्षाच्या घटनांवर सत्तेपासून दूर ठेवले. इराकमध्ये सुन्नी जनतेवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी सद्दाम हुसेनच्या लष्करातील अधिकारी तसेच तिक्रित प्रांतातील सुन्नी गट एकत्र येऊन त्यांनी नवीन सरकारविरुद्ध लढा पुकारला. हा लढा म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक(आयएसआय)ची सुरुवात होती. तो अल कायदाशी संबंध ठेवून होता. मार्च २०११ मध्ये सीरियात डेट्टा येथे स्थानिक पातळीवर झालेल्या उद्रेकाविरुद्ध सीरियात असाद सरकारने लष्कराचा वापर करून ते बंड मोडून काढले. त्या बंडाला पाठिंबा हा त्या प्रदेशातील तुर्कस्तान, सौदी अरेबिया तसेच कतार या सुन्नी सत्तांकडून होता. सीरियातील पसरत चाललेली यादवी ही असाद विरुद्ध सुन्नी गट यांच्यात होती. पुढे सीरियातील हे सुन्नी गट आणि इराकमधील आयएसआय हे एकत्र आले. त्यातून निर्माण झालेला आजचा आयसिस लढा हा सुन्नी इस्लामिक राजवट निर्माण करण्यासाठीचा लढा मानला जातो. त्याला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हांट’ असेही संबोधले जाते. लेव्हांट हे सीरिया व इराक प्रदेशाला असलेले फ्रेंच नाव आहे. पुढे अल कायदा आणि आयसिस यांची फारकत झाली आणि अबु बक्र अल बगदादी याने आयसिसचे नेतृत्व घेतले.
पाश्र्वभूमी
पश्चिम आशियातील या घडामोडींची पाळेमुळे ही वसाहतवादानंतरच्या घटनाक्रमात बघता येतात. इराक व सीरियातील ब्रिटिश सत्ता संपल्यानंतर तसेच सीरिया व लेबनॉनमधील फ्रेंच सत्ता संपल्यानंतर सुरुवातीला या राज्यात लोकशाही सत्ता स्थापन झाल्या. परंतु, अंतर्गत कलहामुळे या सर्व ठिकाणी लष्करी राजवटी आल्या. त्यात इजिप्तचादेखील समावेश होतो. पुढे इस्रायलला सामोरे जाताना या राष्ट्रांनी अरब ऐक्य, अरब राष्ट्रवाद आणि साम्यवादाचा पुरस्कार केला. बाथ (अर्थ : पुनरुज्जीवन) समाजवादी विचार त्याचाच भाग होता. सीरियात असाद यांनी आणि इराकमध्ये सद्दाम हुसेन यांनी याच संकल्पनांचा वापर केला. त्यात या राज्यांनी स्वत:ला ‘सेक्युलर’, समाजवादी व आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. इथे राजकीय स्वातंत्र्य नव्हते. परंतु, अल्पसंख्याक तसेच स्त्रियांच्या हक्कांबाबत जागरूकता होती. लष्करी राजवटीचा वापर करून एक प्रगत राष्ट्र म्हणून सद्दाम हुसेन यांनी अल्पसंख्याक सुन्नी गटाचे नेतृत्व करून बाथ पक्षाच्या आधारे सत्ता राखली. सीरियात असाद यांनी त्याच धोरणांचा वापर करीत अलविट्झ या शिया पंथीय गटाचे नेतृत्व करीत बहुसंख्य सुन्नी प्रजेवर राजवट केली.
या दोन्ही ‘स्थिर’ राजवटींना पहिला धक्का बसला, तो २००३ च्या इराक युद्धामुळे. या युद्धानंतर अमेरिकेने सद्दाम हुसेन यांना बाजूस करून इराकच्या राज्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न केला. त्यात सद्दाम हुसेन किंवा बाथ पक्षाशी संबंधित असलेल्या लष्करी किंवा नागरी कर्मचारी तसेच अधिकारी यांना काढून टाकले गेले आणि लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याच्या अट्टहासाने शिया गटाकडे सत्ता दिली गेली. या व्यवस्थेत सुन्नी गटाला संपूर्णत: बाहेर ठेवल्यामुळे असंतोष निर्माण झाला. तसेच शिया सरकारच्या दडपशाही कारभारामुळे उद्रेक निर्माण झाला. त्या उद्रेकाचे नेतृत्व सुरुवातीला अफगाणिस्तानमध्ये लढा करून आलेले अबु मुसान झरकावी यांनी केले. त्यांच्या संघटनेला ‘अल कायदा इन इराक’ असे संबोधले गेले होते. पुढे २००६ साली झरकावी यांच्या मृत्यूनंतर त्या गटाला इस्लामिक स्टेट ऑफ इराक (आयएसआय) या नावाने ओळखले जाऊ लागले. सीरियात हफीझ असाद यांच्यावर १९८२ मध्ये हल्ला झाला, तेव्हा त्याचा बदला सीरियन फौजेने दामा या शहराविरोधात घेतला. दामा शहर हे मुस्लीम ब्रदरहूडचे एक महत्त्वाचे केंद्र होते. त्या घटनेनंतर ही संघटना काही काळ शांत राहिली. परंतु, आपल्या विचारांचा प्रसार मात्र चालू ठेवला. पुढे २००३ च्या इराक युद्धानंतर मुस्लीम ब्रदरहूड पुन्हा सक्रिय झालेली दिसते. २०१०नंतर ‘अरब स्प्रिंग’चे वारे वाहू लागले. त्याचा प्रभाव सीरियन राजकारणावरदेखील दिसतो. असादविरुद्धच्या लढय़ात सुन्नी इस्लामिक गट एकत्र येत गेले आणि तेथे यादवी सुरू झाली. असाद यांनी राजकीय डावपेचाचा भाग म्हणून काही धर्मगुरूंना जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो असफल राहिला.
आयसिस
अनधिकृत सूत्रांचा दाखला घेतला, तर आज आयसिसकडे इराक व सीरियाच्या ४० टक्के प्रदेशाचा ताबा आहे. त्यात इराकमधील दियाला, निनेव्ह आणि मोसूल तसेच सीरियाला लागून असलेल्या दीरेझ झोर व राक्का यांचा समावेश आहे आणि सीरियातील अलेप्पो आणि हस्साकेह यांच्यावर काहीसा ताबा आहे. कोबानी हे कुर्द जनता असलेले शहर हे हस्साकेहमध्ये येते. आयसिसने स्वत:ला ‘इस्लामिक स्टेट’ किंवा कलिफेट म्हणून जाहीर करून स्वत:कडे इस्लामिक धार्मिक नेतृत्व घेण्याचा प्रयत्न केला आहे. आयसिसचा लढा हा अल कायद्याच्या लढय़ापेक्षा वेगळा आहे. अल कायदाने पाश्चिमात्य राष्ट्रांना लक्ष्य केले होते. त्यात विचारसरणीविरोधात तो लढा होता. आयसिसचा प्रयत्न हा सर्व इस्लामिक गटांना त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणणे हा आहे. त्यांनी कुर्द तसेच यहुदींचा केलेला छळ आणि त्यांच्यावरील अत्याचार हा त्या आयसिसचा लढय़ाचा भाग आहे.
विरोध
आयसिसची खरी झळ कुर्द जनतेला जाणवते. कुर्द वांशिक गट हा इराक, सीरिया तसेच तुर्कस्तानमध्ये आहे. इराकमध्ये त्यांना मर्यादित प्रमाणात स्वायत्तता आहे. आयसिसविरुद्धच्या लढय़ात कुर्द पेशमर्गा लढवय्ये आहेत. त्यांना थोडाफार पाठिंबा अमेरिकेकडून मिळतो. कुर्द लढवय्यांना तुर्कस्तानकडून फारसा पाठिंबा मिळत नाही किंवा तुर्कस्तान अमेरिकेला पण पाठिंबा देत नाही. सौदी अरेबियाच्या धोरणात मात्र फरक झालेला दिसून येतो. इराकी सरकारने सुन्नी घटकांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे, असा सल्ला सौदी अरेबिया द्यायला लागला आहे. तसेच सीरियातील युद्ध हे प्रदीर्घ असेल म्हणूनच असादविरोधी गटातील मवाळ नेतृत्व पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. आयसिसच्या लढय़ाची झळ सौदी अरेबियात केव्हा तरी होईल याची जाणीव तेथील नेतृत्वाला झालेली दिसते. पुतिनने असादला पाठिंबा दिला असला, तरी सीरियात जरा काही मार्ग काढता आला तर त्याला रशियाचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे. त्या मार्गाचा एक भाग हा असाद यांना इतरत्र हलविण्याचा आहे. मात्र हे रशियाचे धोरण अमेरिकेच्या युक्रेन तसेच क्रीमियाबाबतच्या धोरणावर अवलंबून असेल असे वाटते. अमेरिकेला त्या क्षेत्रात नक्की काय साध्य करायचे आहे हे सांगता येत नाही, असे बोलले जाते. ड्रोन विमानांचा हल्ला हा एक अत्यल्प भाग आहे. खरा लढा हा जमिनीवरचा असणार आहे आणि या क्षेत्राबाहेरील सत्तांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती  चिघळेल याचीदेखील जाणीव सर्वाना आहे.
काश्मीरमध्ये आयसिसचे झेंडे तसेच भारतातून अनेक तरुणांनी आयसिसच्या लढय़ात सामील होण्यासाठी जाणे ही भारताच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. भारतासमोरील खरा धोका हा इस्लामिक स्टेटच्या विचारप्रणालीतून निर्माण होतो. त्या विचारप्रणालीमध्ये मने पेटविण्याची जी प्रचंड क्षमता आहे, ते भारतासारख्या बहुत्वतावादी राष्ट्राला आव्हान आहे. आयसिसने निर्माण केलेल्या समस्येला लष्करी बळाच्या आधारे सामोरे जाण्याच्या मर्यादा सर्वच राष्ट्र जाणून आहेत. आयसिसची खरी मूलभूत समस्या काय आहे, यावर यूएईच्या पंतप्रधानांनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे. त्यांनी या समस्येचे मूळ पश्चिम आशियाई राष्ट्रांच्या अंतर्गत व्यवस्थेत असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या मते पश्चिम आशियात शांततेसाठी तीन गोष्टी करण्याची गरज आहे. आयसिसच्या लढय़ाला मुख्यत: बौद्धिक पातळीवर सामोरे जाण्याची गरज आहे. या राष्ट्रांमधील शासन व्यवस्था सुधारावी लागेल आणि तळागाळापर्यंत मानवी विकास साध्य करावा लागेल. इथल्या शासन व्यवस्थेला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत सुविधा पोहोचवाव्या लागतील. अमेरिकी ड्रोन विमानांचा वापर ही तात्कालिक प्रक्रिया आहे. आयसिसचा सामना हा दीर्घकाळ राजकीय विचारप्रणालींच्या पातळीवर करावा लागेल आणि या लढय़ाची सुरुवात पश्चिम आशियाई सुन्नी राष्ट्रांनाच करावी लागणार आहे.

*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – मटा

 

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील एक मध्यवतीर् विषय आहे. पण तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून मिथकाच्या भाषेत व्यक्त झालेला, मानवी इतिहासातील सत्तासंघर्षाचा मूलभूत प्रश्न आहे. पशूपालन अवस्थेतील आर्यांना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. पृथ्वी, आकाश व अंतरिक्ष येथील दृश्य व अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होत. देवांचा राजा इंद. त्याला वश करून घेणे हा हेतू. यज्ञ संस्थेला अफाट महत्त्व असलेल्या अशा काळात सुरासुर संग्रामाची कथा जन्मास आली. इंद व त्याला भारी पडणारा त्याचा शत्रू वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून या कथेची सुरुवात होते. पुढे तिला वेळोवेळी सोयीस्कर वळणे दिली आहेत. असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जात असल्यामुळे कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे व न मानणारे यांतील तो संघर्ष बनतो. तत्कालीन इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते पण ते वैदिक देवतांना मानीत नसत. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलट्या अर्थाने रुढ झाले. पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला मारून इंदाने त्यांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची कथा होय. इति- लो. टिळक. डोंगरांना पंख असल्यामुळे ते एका जागेवर राहत नव्हते; इंदाने त्यांचे पंख तोडले या मिथ्यकथेत उपखंड उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत होती, या भूवैज्ञानिक तथ्याची पुसट जाण व्यक्त होते.

वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र ते आदित्य. त्वष्ट्रा (म्हणजे विश्वकर्मा) त्यापैकी एक. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्माण. त्याच्या वधामुळे इंदाला ब्रह्माहत्येचे पाप लागते. पापक्षालनासाठी त्याला यज्ञ करावे लागतात. याखेरीज कश्यपाला दितीपासून झालेले पुत्र दैत्य, दनूपासून झालेले दानव व अनायूपासून झालेले असुर असेही म्हटले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप. यापेक्षा बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनियस (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सार्मथ्यावर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा डागाळण्याचा सतत प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (ह्वठ्ठष्द्ब१द्बद्यद्ब५द्गस्त्र) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशराज्ञ सूक्त लक्षात घेण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकच सूक्त होय. पुरु, अनु, दुह्यू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्यांच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदासाच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठ्या संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता. पण पंचजनांशी भरतांचे युद्ध जुंपले तेव्हा विश्वामित्राच्या जागी वसिष्ठाची नेमणूक झाली. म्हणून चिडलेल्या विश्वामित्राने भरतांच्या विरुद्ध दहा राजांचा संघ उभारला. तरी भरताचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. म्हणजे संघर्ष बहुसंख्य प्राचीन व अल्पसंख्य अर्वाचीन यातला आहे. दोन्ही आर्यच. पुढे पर्यावरण बदलले, सरस्वती नदी आटली, अवर्षणे सुरू झाली तेव्हा ऋषींच्या अन्नासाठी आपसातही मारामाऱ्या होत. आता पूवेर्कडे स्थलांतर करणे भाग पडले.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू अधिक भावला. पहाडी भागात अवैदिक शिवाला महत्त्व होते. त्यामुळे भटक्या लोकांचा आडदांड इंद कालबाह्य झाला. आता भारतवर्ष एका छत्राखाली आणणे आवश्यक होते. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत व महाभारतात कृष्णप्रधान वैष्णवांनी पश्चिमेकडून पूवेर्पर्यंत भारतखंड एकछत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जसे शिवाला महादेव म्हणून मान्यता देणे वगैरे. इहलोकातील राजकारणाचे परलोकात पडलेले हे प्रतिबिंब. देव-दानव संघर्षाला त्यातून आणखी एक परिमाण प्राप्त होते. धर्मप्रसार जगात सर्वत्र राजाश्रयांच्या आधारे बळाचा वापर करून झालेला आहे. भारतातील हा प्रयोग तडजोडीच्या राजकारणाचा असल्यामुळे वेगळ्या चिवट पण कमकुवत जातकुळीचा आहे.

मग देव म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी, अल्पसंख्य वर्ग, ज्यांची नीती (१ड्डद्यह्वद्ग ह्य४ह्यह्लद्गद्व) इतरांवर लादली जाते. अर्थात स्त्रश्ाद्वद्बठ्ठद्गठ्ठह्ल द्वद्बठ्ठश्ाह्मद्बह्ल४. देवांशी जो जमवून घेऊ शकत नाही तो दैत्य. जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम हा करुणरम्य विषय असून नॉर्स मिथ्यकथांमध्ये तो विशेष रंगविलेला आहे, असे दुर्गाबाई भागवत सांगतात. माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांमुळे संघर्ष निर्माण होतो व त्याचा अंत कुणीतरी चांगला म्हणून विजयी प्रस्थापित होण्यात किंवा प्रस्थापित झाल्यामुळे चांगला ठरण्यात होतो, हेच सूत्र त्यामागे कार्य करताना दिसते.

जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम येतो. दुर्गाबाई भागवत काही उदाहरणे देतात परंतु त्यांनी त्याचा अर्थ फोड करून सांगितलेला नाही. आयर्लंड, स्कॉटलँड येथील कहाण्यांमध्ये ओडिन देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार करतात. कहाण्यांमध्ये सुद्धा ओडिन देवांचा राजा व त्याचा धाकटा भाऊ दुष्ट असतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा देव प्रथम त्या दैत्याचा चलाखीने वापर करतात आणि नंतर घनघोर युद्ध होते, हिम दैत्य मारला जातो व सर्व दैत्य नरकात जातात. वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा संघर्ष निर्माण होतो व त्यात जो विजयी होतो तो देव सुष्ट ठरतो, हाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून विषय वैश्विक आहे.

मिलिंद मुरुगकर, सौजन्य – मटा

सन २०१४ मधील निवडणुका लक्षात घेता, यापुढील काळात अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. पण सैन्यातील भ्रष्टाचाराच्या बातम्यांमुळे या आंदोलनापुढे मोठे वैचारिक आव्हान उभे केले आहे.

सैन्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सर्वांनाच धक्कादायक वाटल्या तरी या बातम्यांचा सर्वात जबर धक्का वेगळ्या अर्थाने अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला बसणार आहे; कारण या बातम्या या आंदोलनाच्या गृहीत तत्त्वालाच छेद देतात.

अण्णा हजारंेच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद मध्यम आणि उच्चमध्यम वर्गाला राजकीय नेत्यांबद्दल वाटत असलेल्या संतापातून, नफरतीतून आलेला आहे. ही नफरत अर्थातच अनाठायी नाही. वरचेवर उघडकीला येणारे आथिर्क घोटाळे या भावनेला आधार पुरवतात. हे आंदोलन जनलोकपालाच्या स्वरूपातील नवीन प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी निर्माण झाले असले तरी आंदोलनाच्या प्रेरणा जास्त खोलवरच्या आहेत. त्यातील एक प्रमुख प्रेरणा संकुचित राष्ट्रवादाची आहे. राष्ट्रवाद हा बहुतेकदा शत्रुकंेदी असतो आणि अशा राष्ट्रवादाला देशाच्या शत्रूशी लढण्यास सज्ज असलेल्या सैन्याबद्दल अतीव (दुदैर्वाने) आंधळे प्रेम असते. ‘भ्रष्ट’ राज-कारण्यांपेक्षा सैन्यातील शिस्तबद्ध अधिकाऱ्याची प्रतिमा या राष्ट्रवादी भूमिकेला जास्त आकर्षक वाटते. अण्णांच्या दिल्लीतील अनेक कार्यक्रमांत हे आकर्षण वारंवार दिसून आले आहे.

पण संरक्षणमंत्री अँटनी आणि लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्यातील वाद मात्र भ्रष्टाचार-विरोधाची सांगड राष्ट्रवादाशी घालणाऱ्या सर्वांपुढेच एक मोठे आव्हान निर्माण करतो; कारण यातील राजकारणी हा कमालीच्या स्वच्छ प्रतिमेचा आहे. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्नंतरही कायम असलेली त्यांची ही प्रतिमा व साधी राहणी ही संरक्षणमंत्र्यांची लक्षणीय ओळख आहे. लष्करप्रमुखांची प्रतिमाही स्वच्छ आहे. पण त्यांनी आपल्याच खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे शत्रूशी लढणाऱ्या सैन्य-दलातही अगदी उच्च पातळीवर भ्रष्टाचार असतो हे उघड झाले आहे. भ्रष्टाचारविरोधाची राष्ट्रवादाशी सांगड घालू इच्छीणाऱ्यांसाठी ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे; कारण आता आंदोलनाला आपला शत्रू केवळ राजकारण्यांमध्ये शोधता येणार नाही.

ज्यांची भ्रष्टाचाराबद्दलची समज बाळबोध नाही त्यांनादेखील सैन्यातील भ्रष्टाचार अर्थातच गंभीर वाटेल. पण सैन्यामध्येसुद्धा अगदी वरच्या पातळीवर भ्रष्टाचार असतो या गोष्टीने धक्का बसायचे कारण नाही. एक तर सैन्याच्या कारभारात अपरिहार्यपणे तुलनेने जास्त अपारदर्शकता असल्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कदाचित जास्त असते. दुसरे म्हणजे ज्या समाजात भ्रष्टाचारविरोधाचे मूल्य खोलवर रुजलेलेच नाही त्या समाजातील एखादेच क्षेत्र केवळ ते देशाच्या शत्रूशी लढण्यासाठी असल्यामुळे भ्रष्टाचारापासून दूर असेल अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे. अशी अपेक्षा केली जाते; कारण आपण भ्रष्टाचाराचा विचार राष्ट्रवादी चष्म्यातून करतो. हा अर्थातच बाळबोधपणा आहे. भ्रष्टाचारविरोधाची सांगड राष्ट्रवादाशी घालणाऱ्यांसाठी हा बाळबोधपणा आवश्यक असते. ती त्यांची रणनीतीही असते.

पण यातील मोठी गफलत अशी की असा राष्ट्रवाद बहुतेकदा शत्रुकंेदी असल्यामुळे तो आत्मपरीक्षणाच्या आड येतो. त्यामुळे समाजात भ्रष्टाचारविरोधाचे मूल्य रुजलेले आहे की नाही या प्रश्नाला तो भिडूच शकत नाही. सरकारी नोकरीत वरकमाईची संधी असते म्हणून त्या घरात मुलगी देणे, ही मानसिकता आपल्या समाजात आहे की नाही? भ्रष्ट मार्गाने पैसा कमाविलेल्या माणसाला तो श्रीमंत असल्यामुळे आपला समाज प्रतिष्ठा देतो की नाही?

राष्ट्रवाद मात्र ‘चारित्र्यसंपन्न’ लोकांना सत्ता दिली की भ्रष्टाचार कमी होईल, असा बाळबोध समज रुजवतो. लोकशाहीसुद्धा नैतिक असण्यावर भर देते; पण माणूस स्खलनशील असतो, हे गृहीत धरते आणि ही स्खलनशीलता कमी करणाऱ्या व्यवस्था कशा निर्माण होतील, हे बघण्याचे निरंतर करावे लागणारे आव्हान ती जागरूक नागरिकांवर टाकते. मुळात भ्रष्टाचाराचा संबंध राष्ट्राभिमानाशी नसतो, तो आपण केलेला करार पाळणे या मूल्याशी असतो. आपल्याला ज्या कामाचा मोबदला, पगार मिळतो ते काम आपण चोखपणे केले पाहिजे, हे मूल्य करार पाळण्याचेच मूल्य आहे. त्यामुळे हा करार न पाळणे हे देखील भ्रष्टाचाराचेच स्वरूप आहे.

सबंध युरोपात राष्ट्रप्रेमाचे, राष्ट्रवादाचे ‘अपील’ आज खूपच दुबळे आहे. पण करार पाळण्याचे मूल्य खोलवर रुजलेले आहे. या मूल्याचा संबंध लोकशाहीतील नागरिक घडवण्याशीही आहे. पण भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक मोठा विचारप्रवाह पश्चिमद्वेष्टा आहे. बाबा रामदेव यांची सर्व मांडणी आपल्या परंपरांचे उदात्तीकरण करणारी आणि पश्चिमद्वेष्टी आहे. ही भूमिका पश्चिमेतील लोकशाही व्यवस्थांकडून आपल्याला बरेच शिकायचे आहे हेच नाकारते. उलट सर्व काही आपल्या परंपरेतच होते; त्याचे फक्त पुनरुज्जीवन करायचे आहे, अशी फसवी भूमिका घेते. शत्रुकंेदी राष्ट्रवाद आणि परंपरावाद ह्या गोष्टी लोकशाहीतील नागरिक घडवण्याच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या लढाईतील मोठे अडथळे आहेत.

इतर यशस्वी लोकशाहींमध्ये आणि भारतीय लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचा फरक असा की, लोकशाही व्यवस्था आणण्यासाठीचे, समाज ढवळून टाकणारे जे मन्वंतर या देशांमध्ये घडले, तसे भारतात घडले नाही. त्यामुळे जबाबदार नागरिक घडण्याची लोकशिक्षणाची प्रक्रियाही आपल्याकडे घडली नाही. एका अर्थाने भारतीय लोकशाही वरून आली. लोकशाहीसाठी जनतेला संघर्ष करावा लागला नाही. परकीय सत्तेशी जो संघर्ष झाला, तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी. त्यामुळे आपल्यामध्ये राष्ट्रवादाबद्दल जितके प्रेम आहे, तितके लोकशाहीबद्दल नाही. १५ ऑॅगस्टला जे स्थान आपल्या भावविश्वात आहे, तितके महत्त्वाचे स्थान २६ जानेवारीला नाही.

सैन्यातील भ्रष्टाचाराच्या बातम्यांमुळे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापुढे निर्माण झालेले वैचारिक आव्हान या आंदोलनातील नेते स्वीकारतील की नाही, हे काळच ठरवेल. त्यांची आजवरची भूमिका पाहता या प्रश्नाचे उत्तर कदाचित नकाराथीर्च असेल. पण भ्रष्टाचाराचे आव्हान हे लोकशाहीतील नागरिक घडवण्याच्या व्यापक प्रक्रियेचे आव्हान आहे आणि शत्रुकंेदी राष्ट्रवादामध्ये विधायकतेपेक्षा विघातक क्षमताच जास्त आहेत, हे आजच्या परिस्थितीत वारंवार मांडण्याची गरज आहे.

सौजन्य – लोकसत्ता

साधना प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘तारांगण’ या सुरेश द्वादशीवार लिखित व्यक्तिचित्र-संग्रहाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी दिलीप माजगावकर  यांनी केलेले भाषण..

————————————————————————
समारंभाचे अध्यक्ष रा. ग. जाधव, ‘तारांगण’ पुस्तकाचे लेखक सुरेश द्वादशीवार, ‘साधना’चे संपादक नरेंद्र दाभोलकर आणि मित्रहो.. सुरुवातीलाच एक गोष्ट मोकळेपणाने सांगतो की, या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी यावं, म्हणून मला डॉ. दाभोलकरांचा फोन आला तेव्हा, इतर काही अडचणींमुळे मी येऊ शकणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी माझ्याकडे विनोद शिरसाठ आले आणि त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या नकाराचा ‘होकार’ करून घेतला. आता मी न येण्यामागचं खरं कारण काय होतं, ते सांगतो. एखादी मुलगी आपल्याला आवडावी, नजरेत भरावी, तिच्याविषयी आपण काही विचार करावा आणि तिचं कोणाशीतरी लग्न व्हावं, इथपर्यंत ठीक आहे. कारण असे अनुभव अनेकांना येतातच. पण त्याच मुलीच्या लग्नाला मंगलाष्टकं म्हणण्यासाठी जाण्याची आपल्यावर वेळ यावी, हा खरोखरच कठीण प्रसंग असतो. या पुस्तकाच्या बाबतीत असंच काहीसं झालं. म्हणजे ‘तारांगण’ ही लेखमाला गेल्या वर्षी ‘साधना’ साप्ताहिकातून क्रमश येत होती तेव्हा मी ती वाचत होतो आणि दोन-चार व्यक्तिचित्रं वाचून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, इथे व्यक्तिचित्रणातला काहीसा वेगळा बाज, काहीसा वेगळा ऐवज आहे आणि हा दागिना आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून मग माझ्या ओळखीच्या मृणाल नानिवडेकर यांच्या माध्यमातून द्वादशीवारांना फोन केला आणि म्हणालो, ‘मला ही लेखमाला आवडतेय. इतर कोणाशी तुमचं बोलणं झालेलं नसेल तर मला हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’कडून करायला आवडेल.’ पण द्वादशीवार म्हणाले, ‘अलीकडेच माझं ‘मन्वंतर’ हे पुस्तक ‘साधना’ने प्रकाशित केलंय. आणि याही पुस्तकात त्यांनी रस दाखवलाय. त्यामुळे साहजिकच हे पुस्तक त्यांच्याकडून येईल.’ तर अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दाभोलकरांनी मला बोलावलं, हे माझ्या नकारामागचं कारण होतं. पण ते काहीही असो, ‘साधना’ने हे पुस्तक चांगलं केलंय. मुलगी खऱ्या अर्थाने सुस्थळी पडली, असं मी मनापासून म्हणतो. आणि द्वादशीवारांना आनंद वाटावा अशी गोष्ट सांगतो की, आजकाल बहुसंख्य प्रकाशकांना प्रकाशनासाठी आलेली हस्तलिखितं परत कशी करावी, ही विवंचना असताना त्यांचं पुस्तक दोन-तीन प्रकाशन संस्थांना प्रकाशित करावंसं वाटणं, ही ‘तारांगण’च्या वाङ्मयीन गुणवत्तेची पावती आहे असं त्यांनी समजावं.

‘तारांगण’ हा १६ व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. (अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, सुरेश भट, बाबा आमटे, राम शेवाळकर, मारोतराव कन्नमवार, प्रमोद महाजन, जन्रेलसिंग िभद्रनवाले, तारकेश्वरी सिन्हा, सविता डेका, राजे विश्वोश्वर राव, चौधरी चरणसिंह, विष्णुदत्त शर्मा, एम. एफ. हुसेन, जनार्दन पांडुरंग) सुंदर व्यक्तिचित्र कसं असतं, तर ती त्या व्यक्तीची लेखकाने वाचकांशी घडवून दिलेली ‘थेट भेट’ असते. त्या भेटीत लेखक उपस्थित असतो, ते केवळ त्या दोघांची ओळख करून देण्यापुरता, किंवा गरज पडली तर ती ओळख पुढे सरकवण्यापुरता! माझ्या कल्पनेप्रमाणे, चांगल्या व्यक्तिचित्रणात लेखक एका मर्यादेपेक्षा जास्त स्वतला वाचकांवर लादत नाही, किंवा त्या व्यक्तीच्या बुरख्याआडून स्वत: वारंवार डोकावूनही बघत नाही. या दोनही निकषांवर द्वादशीवारांची व्यक्तिचित्रं फार सरस उतरली आहेत.

आपल्याला माहीत आहे की, मराठीत व्यक्तिचित्रांची मोठी परंपरा आहे. अगदी चार-सहा नावं सांगायची म्हटली तर श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, विजय तेंडुलकर, ह. मो. मराठे अशी सांगता येतील. अलीकडच्या काळात विनय हर्डीकर, रामदास भटकळ यांनीही चांगली व्यक्तिचित्रं लिहिली आहेत. या सर्व लेखकांनी सातत्याने लेखन करून व्यक्तिचित्रांची ही परंपरा सकस, समृद्ध आणि वाहती ठेवली आहे. या प्रत्येकाचं त्या व्यक्तीकडे बघणं वेगळं आहे. लेखन वेगळं आहे. त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. या पाहण्यात व दृष्टिकोनात कसा फरक पडतो, हे चटकन समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो. माधव आचवल यांच्यावर जवळपास एकाच काळात पु. ल. देशपांडे, सुनीताबाई व विजय तेंडुलकर या तिघांनी लिहिलं आहे. ही तीनही व्यक्तिचित्रं एकाच वेळी व सलग वाचा, म्हणजे मग मला काय म्हणायचंय, ते नेमकेपणाने समजून येईल. ही तीनही व्यक्तिचित्रं उत्तमच आहेत. व्यक्ती एकच आहे, बघणारे तिघे आहेत. तिघेही साहित्यातील मातब्बर आहेत. पण तिघांच्या बघण्यात, दृष्टिकोनात व लिहिण्यात फरक आहे. पु.लं. ना माधव आचवल त्यांच्या अंतर्बाह्य़ गुणदोषांसकट नक्कीच समजलेले असणार. पण तरीही का कोण जाणे, लेखनापुरती पु.लं.नी ‘गुण गाईन आवडी’ अशी भूमिका ठेवलेली असल्याने त्यांच्या लेखनात एक सरळ साधेपणा आणि आज तर काही प्रसंगी भाबडेपणा वाटावा असा भाग वाटतो. तर ‘माधव मला असा दिसला, तो असा होता आणि तो असाच होता,’ असा काहीसा आग्रही व थोडासा उंच स्वर सुनीताबाईंच्या लेखात दिसतो. आणि माधव असा असावा, निदान मला तो असा दिसला, आणि मला दिसला त्यापलीकडे तो बरंच काही होता, पण मला तो समजला नाही, मी जे काही मांडलंय ते तुम्हाला पटतंय का बघा, अशी तेंडुलकरांची भूमिका दिसते. मला व्यक्तिश: तेंडुलकरांची भूमिका आवडते. आणि द्वादशीवारांची भूमिका तेंडुलकरांच्या भूमिकेसारखी आहे, म्हणूनही कदाचित ‘तारांगण’मधील व्यक्तिचित्रे मला अधिक आवडली असतील.

आपल्या भूमिकेबाबत द्वादशीवारांनी प्रस्तावनेतच एक वाक्य असं लिहिलंय की, ‘मला माणूस समजून घ्यायला आवडतो आणि त्यासाठी मी त्याच्या भूमिकेत जाऊन त्या माणसाच्या आनंदाच्या, दुखाच्या, अडचणीच्या, तडजोडीच्या, महत्त्वाकांक्षेच्या ज्या काही जागा असतील, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो..’ माणसं समजून घेण्याची द्वादशीवारांची ही समज फार प्रगल्भ आहे. ते माणसाकडे एकाच खिडकीतून, एकाच कोनातून बघत नाहीत. ते अनेक कोनांतून बघतात. इतकेच नाही तर वाचकालाही ते व्यक्तिचित्र वाचून झाल्यावर त्या व्यक्तीविषयी विचार करण्यासाठी अनेक दिशा मोकळ्या ठेवतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणात त्या व्यक्तीच्या बाह्य़ जीवनाचा तपशील तर वाचकाला मिळतोच, महत्त्वाच्या घडामोडीही मिळतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध द्वादशीवार घेताना दिसतात. आपल्या सगळ्यांनाच दुसऱ्या व्यक्तीविषयी एक प्रकारचं कुतूहल असतं. त्यात ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, बोलते कशी, त्याही पलीकडे ती व्यक्ती एखाद्या प्रसंगात, एखाद्या घटनेच्या वेळी विचार कसा करते, त्यावेळी त्या व्यक्तीचं मानसिक चलनवलन कसं चालतं, हे जाणून घेण्याविषयी अधिक कुतूहल असतं. याच कुतूहलातून द्वादशीवारांसारखा लेखक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते व्यक्तिचित्रण आपल्याला अधिक भावतं, मनावर अधिक परिणाम करून जातं.

चांगलं व्यक्तिचित्रण कसं असतं, याविषयीची या पुस्तकाबाहेरची दोन उदाहरणं सांगतो. नेपोलियनचं चरित्र आपण सर्वानीच त्या- त्या काळात वाचलेलं असतं. नेपोलियन, त्याच्या लढाया, त्याचं सहकाऱ्यांबरोबरचं वागणं याची ढोबळमानाने माहिती आपल्याला असतेच. पण हा नेपोलियन त्याच्या जनरल्सची निवड कशी करायचा, यासंदर्भातील एक मार्मिक आठवण त्याच्या एका चरित्रकाराने सांगितली आहे. तो त्याच्या जनरलची निवड करताना उमेदवाराचा बायोडाटा मागवून घ्यायचा. त्याने केलेल्या लढाया, त्याची घरची परिस्थिती, त्याचं जगणं, वागणं याचा बारकाईने अभ्यास करायचा. पण अंतिम निर्णय घेताना मात्र तो त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारायचा, Tell me, is he lucky? तो नशीबवान आहे का, हे मला सांग; बाकी मला सर्व कळलं. आता ही साधी आठवण नेपोलियनच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन जाते.

दुसरा एक प्रसंग पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या चरित्रातील आहे. इंदिरा गांधींची इंग्रजीत अनेक चरित्रं आहेत. पण पुपुल जयकरांनी लिहिलेलं चरित्र विशेष उजवं समजलं जातं. याची दोन कारणं आहेत. एक तर त्या इंदिरा गांधींच्या निकट होत्या आणि दुसरं म्हणजे त्या जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात असल्याने त्यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाची भक्कम बठक होती. या वैचारिक बठकीतूनच त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघत असत. त्यामुळे ते चरित्र दर्जाच्या दृष्टीने इतर चरित्रांपेक्षा उजवं वाटतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग आहे. संजय गांधींचं विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांच्या शवाशेजारी इंदिराजी उभ्या आहेत. मोठमोठे लोक शोकसमाचाराला येत आहेत. नमस्कार करताहेत. इंदिराजी त्यांच्याशी उपचाराची एक-दोन वाक्ये बोलताहेत आणि मग ते लोक निघून जाताहेत. अटलबिहारी वाजपेयी येतात आणि कसं कोण जाणे, वाजपेयींच्या बोलण्यातून इंदिराजींना असं जाणवलं असावं की, आपल्यावर कोसळलेल्या या प्रसंगामुळे वाजपेयींना आपली कींव येतेय की काय, दया वाटतेय की काय! तेव्हा त्याही प्रसंगात आपली कोणी कींव करावी, दया करावी, हे मानी स्वभावाच्या इंदिरा गांधींना आवडलं नाही. त्यामुळे त्यांना आलेला राग त्यांच्या गॉगलमधल्या डोळ्यांतून जवळच उभ्या असलेल्या पुपुल जयकरांनी बरोबर टिपला. इतकंच नाही, तर आपण किती नॉर्मल आहोत, हे वाजपेयींना कळावं म्हणून इंदिराजींनी वाजपेयींकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या चंद्रशेखर यांच्याशी त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या एका मीटिंगबद्दल जुजबी बोलणं केलं. आता क्षणार्धात घडून गेलेली ही घटना; पण पुपुल जयकर ज्या पद्धतीने बघतात व लिहितात, त्यातून इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वातला संपूर्ण पीळ त्या वाचकांसमोर उभा करतात. ही व्यक्तिचित्रणाची खरी ताकद असते.

द्वादशीवारांच्या लेखनातही अशा अनेक जागा त्या ताकदीने पकडलेल्या आहेत. त्यादृष्टीने नरहर कुरुंदकर, सुरेश भट, अनंतराव भालेराव, बाबा आमटे यांच्यावरचे लेख वाचण्यासारखे आहेत. या पुस्तकातील बहुतेक व्यक्ती तुमच्या-आमच्या माहितीतील आहेत.  व्यक्तीचित्रण केलेली व्यक्ती जेव्हा वाचकांना अनोळखी असते किंवा पूर्णत: काल्पनिक असते तेव्हा त्याचा एक फायदा असा असतो की, वाचकांच्या मनाचा कॅनव्हास त्या व्यक्तीबाबत पूर्ण कोरा असतो. पण ती व्यक्ती माहितीची असेल किंवा प्रसिद्ध असेल तर वाचकांच्या मनावर त्या व्यक्तीविषयीचं काही ना काही रेखाटन झालेलं असतं. त्यातून ती व्यक्ती कौतुकाची, प्रेमाची, अतीव आदराची असेल, तर त्या व्यक्तीबद्दलचा एखादाही विपरीत सूर वाचकांच्या मनावर ओरखडा उमटवून जाऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीच्या राजकीय विचारांमुळे, सामाजिक पाश्र्वभूमीमुळे, कौटुंबिक परिस्थितीमुळे वाचकांच्या मनात राग असेल तर त्या व्यक्तीविषयी लिहिताना लेखकाची कसोटी असते. या पुस्तकातील बहुसंख्य व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत या कसोटीला द्वादशीवार उत्तम पद्धतीने उतरले आहेत. उदाहरणार्थ, या पुस्तकातील जन्रेलसिंग िभद्रनवाले हे व्यक्तिचित्रण वाचा. िभद्रनवाल्याचा तो २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळातील पंजाबमधील दहशतीचं वातावरण आठवा. त्या वातावरणात घडत गेलेली िभद्रनवाल्याची मतं आणि त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या बोलण्यातला प्रेमळपणा तसाच खुनशीपणा या सर्वाचे तपशील तर द्वादशीवार देतातच; पण मध्येच विचारांचा रूळ झटकन बदलतात आणि लिहून जातात- ‘आतापर्यंत खोमेनीच्या शीख अवताराची जागा एका सामान्य शीख गृहस्थानं घेतल्याचं लक्षात येतं. त्याच्या शस्त्रांची आता वाद्यं झालेली असतात. आईच्या हाताला असलेल्या चवीची आठवण मनात ठेवणारा तो सामान्य मुलगा झालेला असतो. िभद्रनवाल्यांचा हा हळवा क्षण पकडायला एखादा गांधी असता तर..’
द्वादशीवारांच्या व्यक्तिचित्रणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची शैली. कोणीतरी जाणकार समीक्षकाने द्वादशीवारांच्या लेखनशैलीचा अभ्यास करायला हवा. एकच वैशिष्टय़ त्या शैलीचं सांगतो. एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सांगताना ही लेखणी जशी तालेवार भाषा वापरते, तीच लेखणी त्या व्यक्तीचा हळुवारपणा, खेळकरपणा सांगताना त्याच्या चांगल्या खोडय़ाही काढू शकते. त्यांच्या शैलीचं सामथ्र्य दाखवणारं या पुस्तकातील सर्वात चांगलं व्यक्तिचित्र जनार्दन पांडुरंग यांचं आहे (त्यांच्या वडिलांचं). या पुस्तकात हे व्यक्तिचित्र सर्वात शेवटी आहे. हे जाणीवपूर्वक शेवटी टाकलंय काय, हे मला माहीत नाही. पण ते शेवटी टाकलंय, हे फार चांगलं केलं आहे. कारण ते व्यक्तिचित्र वाचल्यावर खरोखरच पुस्तक बंद करून आपण थांबावं असं वाटतं. ‘जनार्दन पांडुरंग’ हे औपचारिक नाव द्वादशीवारांनी घेतलंय, यातून त्यांचे वडिलांबरोबरचे संबंध लक्षात येतात. या व्यक्तिचित्रणातील अनेक जागा सांगता येतील. या व्यक्तिचित्रणाची सुरुवातच त्यांनी किती मनात घुसणारी केली आहे, ते पहा.. ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे..’ या वाक्याने या व्यक्तिचित्रणाची त्यांनी सुरुवात केली आहे. मी तुम्हाला सांगतो, भल्या भल्या लेखकांना हे वाक्य लिहिता येणार नाही. ते पुढे लिहितात, ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला लीलया पेलून धरणारा दांडगा उत्साह आपल्या लहानखुऱ्या देहयष्टीत धारण करणाऱ्या या माणसात वाहून जाण्याचा दोष होता.’ या दोन वाक्यांत पुढे काहीतरी वेगळं वाचायला मिळणार, याच्या खुणा मिळून जातात आणि खरोखरच पुढे हे व्यक्तिचित्रं अनेक वाटा-वळणाने वाहत राहतं आणि शेवटी एका जागी तर अंतर्मुख करून जातं. द्वादशीवार लिहितात, ‘तुरुंगात शिक्षेत सूट मिळाल्यावर जनार्दन पांडुरंग एका मध्यरात्री अचानक घरी आले. येताना त्यांनी तुरुंगात स्वत विणलेल्या जाडजूड सतरंज्या बरोबर आणल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीवर माझं नाव कोरलेलं होतं.’ या व्यक्तिचित्रात द्वादशीवारांचा प्रत्येक शब्द तर आपल्याशी बोलतोच बोलतो, पण त्या वाक्यातील विरामसुद्धा एक प्रकारचा संवाद साधतात, इतकं ते प्रभावी झालं आहे. हे व्यक्तिचित्र वाचताना मनाला खूप उदासी वाटते. कारण जनार्दन पांडुरंगाच्या आयुष्यात अनेक उलटसुलट घटना घडत गेल्या. पण त्या घटना वाचतानाही असं वाटतं की, द्वादशीवार आपल्या वडिलांचं चित्रण करतानाही विनाकारण हळवेपणाचं ओझं आपल्या लेखणीवर ठेवत नाहीत, वा नाटकी वाटावं, खोटं वाटावं, बेगडी वाटावं असा दूरस्थपणाही त्यांची लेखणी धारण करत नाही. त्यांची लेखणी त्यांच्या स्वभावातला हळुवारपणा, समजूतदारपणा फार चांगल्या पद्धतीने टिपत पुढे जाते आणि आपल्याला अंतर्मुख करून टाकणारं काहीतरी त्यातून मिळतं.

या पुस्तकातील कुरुंदकरांचं व्यक्तिचित्र वाचताना माझ्या मनात अशी शंका होती की, यात आता द्वादशीवार वेगळं असं काय लिहिणार आहेत? कारण कुरुंदकरांबद्दल इतकं लिहून, सांगून झालेलं आहे. कुरुंदकर गेल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्यावर एक स्मृतिग्रंथ काढला होता. स्मृतिग्रंथ अथपासून इतिपर्यंत वाचनीय कसा असू शकतो, याचा आदर्श वाटावा असा अडीचशे-तीनशे पानांचा ग्रंथ होता. त्यामुळे यापलीकडे कुरुंदकर या लेखातून काही दिसतील का, असे वाटले होते. पण त्यातही दोन-चार जागा अशा आहेत की, द्वादशीवारांनी माझा अंदाज खोटा ठरवला. विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला उभे राहिल्यावर कुरुंदकर पहिलं वाक्य काय बोलले, तो प्रसंग किंवा कॉलेजमध्ये एक मोठय़ा विदुषी आल्या असताना छायाचित्राच्या निमित्ताने एक विनोदी घटना घडली, त्यावेळचं कुरुंदकरांचं बोलणं आणि वागणं. हे प्रसंग कुरुंदकरांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा व बौद्धिक शार्पनेस दाखवणारे आहेत.

द्वादशीवारांच्या इतर व्यक्तिचित्रणातील अशा अनेक प्रसंगांबद्दल बोलता येईल. पण त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना संयम फार चांगला कळतो. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना असं वाटत राहतं की, द्वादशीवारांना या व्यक्तीची यापलीकडे माहिती आहे, पण ती ते सांगत नाहीत. कोणाविषयी, काय, किती आणि केवढं लिहावं, याचं भान त्यांना पक्कं राहिलेलं आहे. त्यामुळे कोणतंही व्यक्तिचित्र पाल्हाळिक झालेलं नाही आणि आता हे संपावं, असं न वाटता ‘अरे, आता एकच पान राहिलं का?’ असं वाटून व्यक्तिचित्र संपतं. ही त्यांच्या लेखणीची जागरूकता लक्षात घेता त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना मी तो संयम पाळायला हवा, नाहीतर त्यांच्या पुस्तकाने मला काहीच दिलं नाही, असं म्हणावं लागेल.

डॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा

खलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा व्यापार बंद पडला.

पारंपरिक धंदे बुडाले. बहुसंख्य लोकांना उपजीविकेचे साधन राहिले नाही. शिवाय तुर्की अधिकारी छळ करीत, म्हणून अनेकांनी देशत्याग केला. त्यातच खलिल, आई व भावंडांबरोबर अमेरिकेला गेला. तरी तो एकटा परत आला. त्याचा बाप लेबनॉनमध्येच होता. बैरुत येथे ग्रॅज्युएट झाला. अनेक विषय त्याने आत्मसात केले. भ्रमणही खूप केले. पॅरीसला चित्रकलेचे शिक्षण घेतले. १९११ पासून तो न्यूयॉर्कला स्थायिक झाला. जिब्रानचे कुटुंब सावत्र आई-बाप, भावंडांचे होते. पण मनाचे पुरोगामी औदार्य हा त्यांचा सामायिक गुण. एकमेकांना त्यांनी नेहमीच साथ दिली. जिब्रानने आपले चिंतन प्रेषितांच्या तोंडून मोजक्या शब्दात काव्यमय शैलीत मांडले ते त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी. त्याने ते आईला दाखविले. त्या असामान्य स्त्रीने त्याला उत्तेजन देऊन प्रसिद्ध करण्याची घाई करू नये असा सुज्ञ सल्ला दिला. नंतर अनेक वेळा सुधारणा करून त्याने २५ वर्षे धीर धरला. ‘प्रॉफेट’ हे पुस्तक १९२३ साली प्रथम इंग्रजीत व नंतर अरबी भाषेत प्रसिद्ध झाले. आपल्या अध्यात्मिक विकासाचे चित्रण त्याने ‘गार्डन ऑफ दि प्रॉफेट’मध्ये केले. ते त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. यांत्रिक जीवनशैलीला उबगलेल्या अमेरिकनांना या दोन पुस्तकांनी वेड लावले. गद्यकाव्ये, रूपककथा असे लिखाणही त्याने विपुल केले. जीवनातील विसंगतींवर तो खेळकर टीका करतो तर स्त्रीवरील अन्यायाचे हृदयदावक चित्रणही करतो. पॅरीस येथे त्याने ‘बंडखोर आत्मे’ हा छोटासा कथासंग्रह लिहिला. त्यातून तुर्की राज्यकर्ते व पादी यांनी लेबनॉनच्या जनतेचे चालविले शोषण जगापुढे मांडले. त्यामुळे तरुणांची मने पेटली पण पाद्यांनी पुस्तकाची जाहीर होळी केली. त्याला धर्मबाह्य ठरविले. तुर्कांनी त्याला हद्दपार केले पण अमेरिकेत तो सुखरूप होता. मानवाचा पुत्र येशू. हेसुद्धा कल्पनाशक्तीचा अजब आविष्कार आहे.

जिब्रान अत्यंत धार्मिक आहे. तो देव मानतो मात्र माणसाला पापी ठरवून त्याचे नियंत्रण व शोषण करणारी चर्चची सत्ता त्याला मान्य नाही. ख्रिश्चन असून तो पुनर्जन्म मानतो. जे बुद्धीला व भावनेला पटले ते व्यक्त करताना त्याला कुणाचे भय नसते. परिणामांची पर्वा नसते. धर्मश्रद्धा व देशप्रेम यात संकुचितपणाचा लवलेश नाही. त्याच्यात अनेक विसंगती आहेत पण कोणतीही गोष्ट तो सोयिस्करपणे स्वीकारत नाही. तो महामानव असला तरी एक साधासुधा माणूसही आहे. सततच्या आत्मपरीक्षणामुळे स्वत:ला तो पूर्णपणे ओळखतो. मागे वळून पाहिल्यावर त्याला स्वत:चा क्षुदपणा, रुक्षपणा व बडबड्या स्वभाव यांची लाज वाटते. मन भूतकाळात रमत नाही. त्याला गावाची तीव्र ओढ आहे, आई व बहिणीवर त्याचे नितांत प्रेम आहे. पण मन रोमँटिक परंपरेतले नाही. जिब्रानने लग्न केले नाही. कोणत्याही प्रेमळ स्त्रीची अपेक्षा आपण पुरी करू शकणार नाही हे तो ओळखून होता. तरी तो प्रेमी होता. पण त्याचे प्रेम वैषयिक नव्हते. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया येऊन गेल्या. बारबारा यंग ही त्याची शिष्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ होती. तिनेच त्याचे चरित्र लिहिले. पण दोघे एका खोलीत कधी राहिले नाहीत. ‘मी जियादा’ ( May Ziadeh ) ही त्याची खास प्रेयसी. इजिप्तला स्थायिक झालेली. १९ वर्षे दोघांचे प्रेम व पत्रव्यवहार टिकून होते. जिब्रानच्या मृत्यूनंतर तो प्रसिद्ध झाला, तेव्हा जगाला या स्त्रीबद्दल कळले. दोघे एकमेकांना कधी भेटले नाहीत. त्याने तिचा फोटोसुद्धा कधी मागविला नाही. विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्।

त्याला मृत्यूचे भय नव्हते तरी मरायची इच्छा नव्हती, कारण आणखी काही काम बाकी होते. तो स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नसे. डॉक्टर मंडळी त्याला वाचविण्याची शिकस्त करीत होती. पण त्यांच्या प्रयत्नांवर जिब्रानचा विश्वास नव्हता. विश्रांती त्याला शिक्षा वाटे. ती भोगायला तो तयार नव्हता. त्याला शांत एकांताची ओढ होती. तरी न्यूयॉर्कच्या कोलाहलातच त्याच्या प्रतिमेला धार येई. सत्याला अखंड ओळखा पण शब्दबद्ध क्वचितच करा, असे तो म्हणतो पण सत्य सांगतच राहतो. तो स्वत:ला एक ढग मानतो, वस्तूंशी मिसळणारा पण एकरूप न होणारा. तरी कुणाकडून तरी ‘तू एकटा नाहीस’ हे ऐकू इच्छितो. त्याचे मन मोठे, करुणा विशाल म्हणून दु:खही मोठे. त्यापासून त्याला पलायन नकोय. साऱ्या जगाचे सुख मिळत असेल तरी त्या बदल्यात तो आपले दु:ख द्यायला तयार नव्हता. ‘दु:ख माझे माझियापाशी असू दे, ते बिचारे जाईल कुठे? मी असोनी का अनायासारिके त्याने फिरावे?’ अशीच वृत्ती. आपली सारी धडपड व्यर्थ जाणार की काय, या विचाराने त्याचे मन विषण्ण होई. काही सांगायचे होते ते सर्जनशील शब्दात सांगता येत नव्हते याचे त्याला दु:ख होते. ते दु:ख बरोबर घेऊनच त्याने इहलोक सोडला. त्याचे हे दु:ख म्हणजे मानवजातीबद्दल वाटणारे स्थायी दु:ख, गमे-जीवादा होते. एक शायर म्हणतो, ‘खुदा की देन है जिसको नसीब हो जाए। हर एक दिल को गमे-जावीदा नही मिलता.’

जिब्रान, टागोर व इक्बाल हे तीन महाकवी समकालीन. अनेकांच्या मते जिब्रान त्यात सर्वश्रेष्ठ. टागोरांना ‘नोबेल’ मिळाले, इक्बालला वगळले गेले म्हणून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली. या सन्मानासाठी जिब्रानचा विचार कधी झालाच नाही, पण याचा विचार जिब्रानला कधी शिवलाच नाही. खरोखरीच ग्रेट!

श्री. ज. जोशी, सौजन्य – मटा

(पूर्वप्रसिध्दी ९ एप्रिल १९७२)

पुण्याचं सोज्ज्वळ-सात्त्विक रुपडं अनुभवलेले प्रसिद्ध लेखक श्री. ज. जोशी यांनी या बदलत्या शहराचा चाळीस वर्षांपूर्वी घेतलेला खास ‘पुणेरी’ वेध…
…….

डेक्कन जिमखान्यावर ‘पूना कॉफी हाऊस’च्या जवळ एक पेट्रोल पंप आहे. रस्त्याच्या कडेला तिथे एक छोटीशी भिंत आहे. एखाद्या दिवशी मी उगाच त्या भिंतीवर टेकतो. वेळ संध्याकाळची असते. समोरचा रस्ता तुडुंब भरून चाललेला असतो. सुसाट वाहणाऱ्या नदीकडे पहावं त्याप्रमाणे पुण्यातल्या त्या गदीर्कडे मी गमतीने पहात बसतो. माझं मलाच आश्चर्य वाटतं. माझा मलाच मी एखाद्या पुराणपुरुषासारखा वाटतो. तीस-चाळीस वर्षांपूवीर् पुण्यातला हाच परिसर किती शांत होता-किती निराळा होता, याचं चित्र डोळ्यापुढे उभं रहातं.

भिंतीच्या डाव्या बाजूला किंचित दूर, ताज्या अंड्यांचा स्टॉल आहे. पांढरी शुभ्र टपोरी अंडी तिथं हारीने मांडून ठेवलेली असतात. हिंडून परत जाणारी तरुण जोडपी तिथं थांबतात आणि अंडी विकत घेतात. कोपऱ्यावर इराण्याचं हॉटेल आहे. पुण्याच्या जीवनात उडुपी हॉटेलवाल्यांनी इराण्यांचा संपूर्ण पराभव केलेला आहे. ठिकठिकाणच्या मोक्याच्या जागा उडुप्यांनी काबीज केल्या आहेत. परंतु जिमखान्यावरच्या कोपऱ्यावरच्या हा इराणी किल्ला अजूनही तग धरून आहे. तिथल्या गदीर्ला खळ नाही. समोरच्या बाजूला पी.एम.टी.चं मोठं स्टेशन आहे. लाल रंगाच्या अजस बसेस तिथे सारख्या येत-जात असतात. मला उगाचच पुण्यातील बसच्या पहिल्या वहिल्या दिवसांची आठवण होते. पुण्यात बस चालणार नाही- मंडईत जायला किंवा तुळशीबाग-बेलबाग करायला बसची चैन करण्याइतका पैसा पुणेकरांजवळ नाही, असं तेव्हा बोललं जात होतं. बाईजवळ बसमध्ये बसणे तेव्हा महासंकट वाटे.

बस-स्टेशनच्या पलीकडे पूनम रेस्टॉरंट आहे. तिथले बाहेरचे प्रांगण खाजगी मोटारगाड्यांनी भरलेले असते. आत जेवणाचा मोठा हॉल आहे. तिथं सारख्या पाटर््या झडत असतात. स्त्री-पुरुषांचे समुदाय हसत-खेळत भोजनाचा आनंद लुटत असतात. ते स्त्री-पुरुष पती-पत्नीच असतात, असं नव्हे.

पूनमच्या बाहेर विलायती दारूचं दुकान आहे. वरच्या मजल्यावरच्या स्पेशल खोल्यांत राहणाऱ्या उच्चभ्रू स्त्री-पुरुषांची त्या दुकानामुळे सोय होते. थोडं पुढे गेल्यावर कोपऱ्यावर फ्रूट स्टॉल आहे. त्याचा मालक अर्थातच पंजाबी आहे. तिथल्या कट्ट्यावर अनेक स्त्री-पुरुष फळांचे रस चाखत बसलेले असतात. मुसुंब्याच्या रसाचा एक ग्लास तिथे सव्वा रुपयाला मिळतो, पैशाअभावी पुण्यातली बस चालणार नाही, असं समजणाऱ्या माझ्या पूर्वजांनी सव्वा रुपयाला एक ग्लास सहज पिणाऱ्या आजच्या पिढीकडे जर पाहिलं तर स्वर्गातदेखील त्यांचं हार्टफेल झाल्याशिवाय राहणार नाही.

जसजशी संध्याकाळ गडद होत जाते तसतसं डेक्कन जिमखान्याच्या परिसरातलं ते वातावरण जास्त मदिर होत जातं. पूनमच्या बाजूकडील नटराज थिएटरचे दिवे मनात भरतात. तिथलं कारंजं थुई थुई नाचायला लागतं. त्या फूटपाथवर माणसांची नुसती खेचाखेच होते. साधं चालणंही कठीण होऊन जातं. नऊवारी लुगडे किंवा झिरमिळ्याची पगडी आजच्या पुण्यात दिसत नाही. रँग्लर परांजप्यांचा देहान्त होऊन दहा वषेर्देखील झालेली नाहीत. परंतु आज जर ते पगडी घालून जिमखान्याच्या गदीर्तून चालले असते तर लोक त्यांच्याकडे टकामका बघत राहिले असते. स्त्रियांच्या पोशाखांनी विविधतेच्या बाबतीत आज उच्चांक गाठलेला आहे. पाचवारीतल्या स्त्रियाही आता ‘काकूबाई’ झाल्या आहेत. पूवीर् चोळीऐवजी पोलके आले किंवा पोलक्याचा ब्लाऊज झाला तेव्हा पुण्यात किती गदारोळ उडाला होता, हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आज बहुतेकींच्या कमरा, पाठी उघड्या असतात. त्याबद्दल वादंग माजवण्याचीच काय, पण साधी चर्चा करण्याचीही आवश्यकता कुणाला वाटत नाही!

टिळक रोडवर एस. पी. कॉलेजपाशी प्रथम इराण्याचे हॉटेल सुरू झाले, ते पस्तीस-छत्तीस साल असावे. त्यावेळी माटेमास्तरांनी केवढे आकांडतांडव केले होते! टिळक रस्त्याचे ‘ब्राह्माणी’-तपोवनासारखे शुद्ध आणि पवित्र वातावरण इराण्याच्या हॉटेलने दूषित होईल, अशी त्यांना भीती वाटली होती. आज त्या टिळक रोडची अवस्था काय आहे? गरीब बिचाऱ्या इराणी हॉटेलचे तर राहोच, पण सणसांच्या ‘हॉटेल जवाहर’ या विलायती दारू गुत्त्याचेदेखील आता कुणाला काही वाटत नाही. तो दारूगुत्ता मोठ्या समारंभाने सुरू झाला, तेव्हा काकासाहेब गाडगीळांनी निषेध दर्शविला होता. एका काँग्रेस पुढाऱ्याने नेहरूंच्या नावानं दारूचं दुकान काढावं याविषयी त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. त्या गुत्त्यातील तळघरात टिळक रोडवरील तरुण-तरुणींची किती गदीर् असते, हे प्रत्यक्ष जाऊनच बघायला हवे! कॅबरे डान्स हा विषय पूवीर्च्या पुण्यात असणं शक्यच नव्हतं. सोन्या मारुतीपलीकडे इब्राहीम थिएटर आहे. तिथे तमाशा चालत. परंतु तिथे जाण्याची आमची छाती नव्हती. आता तर खुद्द टिळक रोडवर कॅबरे बघण्याची सोय आहे. हातात मद्याचे प्याले घेऊन चांगल्या घराण्यातले स्त्री-पुरुषदेखील कॅबरेचा आनंद उपभोगताना मी बघितले आहेत.

आजच्या पुण्याला कसलाच रंग नाही, रूप नाही. शनवारवाड्यापुढे अजूनही राजकीय पक्षांची भाषणे होतात, पण त्यांत ती मजा नसते. सारसबागेतील गणपतीला दर्शनासाठी झुंबड उडते, पण कसबा गणपतीच्या किंवा जोगेश्वरीच्या देवळात पूवीर् जो भाविकपणा दिसत असे तो नाही. पन्नास वर्षांपूवीर्च्या बहुतेक सर्व सार्वजनिक संस्था अजूनही काम करीत आहेत. इतिहास, संशोधक मंडळात पाक्षिक सभा होतात. वेद शास्त्रोत्तेजक सभेचे अहवाल प्रसिद्ध होतात. वसंत व्याख्यानमालेत दररोज व्याख्याने असतात. टिळक रोडवरच्या साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये पंचवीस-तीस लोकांसमोर साहित्यविषयक व्याख्याने झडतात. सर्व काही आहे. पण पोटतिडिक कुठेच नाही. आजचं पुणं त्या दृष्टीनं चैतन्यहीन आहे.

सुहास पळशीकर,  सौजन्य – मटा

(लोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी? या लेखाचा पुढचा भाग)
लोकशाहीचे ‘बूस्टर डोस’ द्यायला निघालेल्यांना त्यातील व्यावहारिक अडचणींची पर्वा नाही; कारण आपल्या प्रचलित प्रातिनिधिक लोकशाहीविषयी त्यांच्या मनात शंका आणि दुरावा आहे. थेट सहभागाच्या स्वप्नाळू लोकशाहीच्या आकर्षणा-बरोबरच प्रातिनिधिक पद्धतीविषयीच्या या दुराव्यातून मग ‘लोकशाहीवादी’ प्रयोगांचा आग्रह जन्माला येतो.

……………..

सर्व उमेदवार नाकारण्याच्या योजनेत उदाहरणार्थ जी गल्लत होते, ती मतदाराने उमेदवार नाकारायचे की पक्ष नाकारायचे याविषयी आहे. पक्ष हेच वाईट आणि ते फक्त वाईटच उमेदवार देतात, अशा सर्व राजकारण्यांच्या विरोधातल्या भूमिकेतून ही कल्पना आकर्षक ठरते. आणि खरोखरच मनापासून सर्व उमेदवार नाकारू इच्छिणारे मतदार किती हे तर गुलदस्त्यातच आहे. मुळात निवडणूक म्हणजे उपलब्ध पर्यायांमधील निवड असते. जहाल लोकशाहीवाद्यांना राजकारणाचे हे वैशिष्ट्यच मान्यही नसते आणि लक्षातही येत नाही. नवे पर्याय घडवण्याचे एक स्वतंत्र राजकारण असू शकते; पण तरीही राजकारण म्हणजे उपलब्ध पर्यायांमधून सार्वजनिक निर्णयांकडे वाटचाल करणे, हे लक्षात घेतले नाही, तर सर्वतुच्छतावादी आणि भ्रामक स्वप्नाळू भूमिका घेतली जाते.

प्रतिनिधी परत बोलावण्याच्या कल्पनेत तर याहून जास्त तात्त्विक गोंधळ आहेत. सर्वसामान्यपणे नागरिक म्हणून आपण प्रतिनिधींकडून किती तरी अपेक्षा करीत असतो. कोणीही प्रतिनिधी क्वचितच सगळ्या समूहांच्या बहुसंख्य अपेक्षा पूर्ण करू शकतो. त्यामुळे या असमाधानाचा फायदा घेऊन कोणाही विरुद्ध परत बोलावण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. या प्रस्तावामुळे प्रतिनिधींचा सगळा भर आपल्या मतदारसंघाच्या भावना व पूर्वग्रह जपण्यावर राहील. मतदारसंघापलीकडचा सार्वजनिक हिताचा विचार करणे बंद होईल. वेगळ्या भाषेत सांगायचे, तर परत बोलावण्याच्या अधिकारात आपण ज्यांना निवडून देतो ते प्रतिनिधी आहेत असे न मानता, त्यांना ‘दूत’ मानले जाते. दूताने काय करायचे ते ठरवून दिलेले असते. त्यात कुचराई केली किंवा त्याचे अतिक्रमण केले की दूत परत बोलावला जाऊ शकतो. दूताने व्यापक धोरणाचा विचार करणे अपेक्षित नसते. प्रतिनिधींना असे दूताच्या पातळीवर नेल्यामुळे सार्वजनिक निर्णय-प्रक्रिया जास्त शहाणपणाची किंवा हितप्रद होईल की उलट त्यामुळे सार्वजनिक हिताचा संकोच होईल?

नागरिकांनी धोरणे / कायद्याचे प्रस्ताव सुचवावेत या कल्पनेत तत्त्वत: चुकीचे काही नाही. पण त्यातून प्रत्यक्षात जो व्यवहार घडेल त्याचा विचार करणे आवश्यक आहे. हजारेंच्या आंदोलनात काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घरा-पाशी जाऊन त्यांच्याकडून जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा वदवून घेतला होता. म्हणजे चर्चा/ चिकित्सा न करता एक सद्हेतूप्रेरित झुंडीपुढे प्रतिनिधी नमले; पण उद्या दुसरा कोणी गट अशीच गदीर् करून प्रतिनिधींकडून जनलोकपाल-विरोधी भूमिकेची अपेक्षा करू लागला तर काय करायचे? जनक्षोभावर स्वार होऊन कायदे करायचे म्हटले तर बाबरी-अयोध्या प्रकरण रथयात्रेच्या किंवा रामशिलापूजेच्या काळात कसे सुटले असते याचा अंदाज करता येईल! अशा प्रकारे भावनिकतेवर आधारित कायदे होऊ नयेत अशी अपेक्षा करणे लोकशाहीत बसत नाही का? लोकभावना महत्त्वाच्या असल्या तरीही लोकशाही आणि झुंडशाही या गोष्टी वेगळ्या नाहीत का? कितीतरी सार्वजनिक निर्णय हे तीव्र मतभेदांच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाचे असतात. अशा वेळी काही सज्जन लोकांनी एखादे धोरण सुचवले, एवढ्याचसाठी ते स्वीकारणे संसदेला बंधनकारक करणे लोकशाही-विरोधी होईल. लोकशाही व संतशाही याच्यातही फरक करायलाच हवा.

‘ थेट लोकशाही’च्या प्रस्तावावरील या आक्षेपांमागे आणखीही एक कारण आहे. असे प्रस्ताव लोकसहभागाला महत्त्व देतात; पण समाजातील प्रचलित विषमतांच्या राजकीय परिणामाचा विचार ते करीत नाहीत. हा मुद्दा सर्वच लोकशाही समाजांना लागू होतो. जास्त सहभाग घेण्यासाठीची फुरसत, कौशल्ये इत्यादी बाबी केवळ नागरिक म्हणून समानपणे सर्वांना उपलब्ध नसतात. शिक्षण, आथिर्क स्तर, यासारख्या घटकांमुळे काही गटांना जास्त सहभाग घेण्याच्या संधी जास्त सहजपणे उपलब्ध असतात. त्यामुळे लोकसहभागाचे नवे मार्ग आणले की ठराविक समूहांचा सहभाग आणि राजकीय ‘आवाज’ वाढेल. सहभाग तर हवा; पण त्यासाठी राजकीय दर्जाचे समतलीकरणही (लेव्हलिंग) व्हायला हवे. म्हणूनच प्रातिनिधिक लोकशाहीत किमान सहभागाच्या बाबतीत सर्व नागरिकांचा ‘आवाज’ सारख्याच ताकदीचा असेल (एक व्यक्ती = एक मत) अशी काळजी घेतली जाते. एकदा का परत बोलावण्याचा किंवा कायदे सुचविण्याचा अधिकार दिला की समाजातील जास्त प्रभावी व्यक्तींना संस्थात्मक फायदा मिळून त्यांचा राजकीय आवाज अधिकृतपणे वाढण्याची सोय होईल. म्हणजेच ती व्यवस्था जास्त लोकसहभागप्रधान; पण राजकीयदृष्ट्या जास्त विषमताधिष्ठित बनेल. ही अडचण सोडवल्याशिवाय, भावनिकतेपायी सहभागाचे प्रस्ताव पुढे रेटणे लोकशाहीच्या दृष्टीने फायद्याचे नाही.

सरतेशेवटी, नवनव्या संस्था निर्माण करणे आणि संस्था प्रभावीपणे चालवणे यांचा समतोल राखण्याचे आव्हानही लोकशाहीपुढे असतेच. जनलोकपाल विधेयकाच्या निमित्ताने या मुद्द्याला नव्याने उजाळा द्यायला हवा. लोकशाही पद्धतीने सार्वजनिक व्यवहार चालवायचे म्हणजे शासनाच्या संस्थांना लोकशाही स्वरूप द्यायला हवे. शासनव्यवहाराचा नवा मुद्दा पुढे आला की, आपण एक नवी संस्था निर्माण करतो. परस्पर नियंत्रणातून या संस्था नीट काम करतील अशी त्यामागची अपेक्षा असते. पण संस्था निमिर्तीमधील हा सार्वजनिक उत्साह त्या-त्या संस्थेच्या व्यवहारात उतरत नाही. बहुतेक संस्थांना स्व-नियंत्रणात अपयश येते. संसद किंवा सवोर्च्च न्यायालयही याला अपवाद नाही. स्वनियंत्रणात अपयशी ठरणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून लोकशाही कशी साकारायची असा पेच मग तयार होतो. स्वनियंत्रण यशस्वी होणार नसेल तर नवनव्या संस्था स्थापन झाल्या तरी त्यातून लोकशाही आशयघन होण्याची शाश्वती नाही. हा मुद्दा जहाल लोकशाहीवाद्यांनीच नव्हे, तर प्रचलित प्रातिनिधिक पद्धतीची बाजू घेणाऱ्यांनीही लक्षात घ्यायला हवा. फक्त संस्था निर्माण करण्याची कल्पनाशक्ती असेल; पण संस्थात्मक व्यवहार स्वनियंत्रितपणे चालविण्याची चिकाटी नसेल, तर लोकशाही यशस्वी कशी होणार?

प्रशांत दीक्षित, सौजन्य – लोकसत्ता

 

‘शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’ हा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळेलिखित ग्रंथ परममित्र प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. हजार पानांच्या या ग्रंथात तत्कालीन अनेक नकाशे आणि दुर्मीळ चित्रेही समाविष्ट आहेत. ‘खुतूत ए शिवाजी’ या पर्शियन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही त्यामध्ये आहेत. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्याशी शिवराय आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधात केलेल्या या मनमुक्त गप्पा..

———————————

 

सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जातिवंत इतिहासकार हे फक्त अस्सल कागदपत्रांतूनच बोलतात. तत्कालीन मूळ नकाशे, आकडेवारी यांची साथ घेतात. अभ्यासातील अपुऱ्या जागा वास्तववादी तर्क चालवून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर्क चालविण्यासाठी ते बखरींचा आधारही घेतात, परंतु स्वत: मात्र बखर रचित नाहीत. असे इतिहासकार भूतकाळाचे आकर्षक, भावनोत्कट चित्र रंगवीत नाहीत. मात्र, त्यांच्या अभ्यासातून भूतकाळाबद्दलची माणसाची जाण आपोआपच वाढते. बखरकारांप्रमाणे इतिहासकार भूतकाळ साक्षात् जिवंत करू शकत नसले तरी त्यांच्यामुळे भूतकाळाची आजच्या काळाशी सांगड घालता येते आणि त्यातूनच भविष्याचा वेधही घेता येतो. असे इतिहासकार लोकप्रिय होत नाहीत, परंतु मैफिली गाजविणाऱ्या बखरकारांहून त्यांची कामगिरी खूपच मोलाची असते.

गजाजन मेहेंदळे यांची जातकुळी ही अशा सच्चा इतिहासकारांची आहे. गेली ४० वर्षे या माणसाने एकच ध्यास घेतला.. शिवाजीमहाराज समजून घेण्याचा! या ४० वर्षांत दिवसातील कित्येक तास शिवकाळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यात त्यांनी घालविले. हजारो कागदपत्रे नजरेखालून घातली. ग्रंथालये धुंडाळली. पायपीट केली. व्यक्तिगत उन्नतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून झपाटल्यासारखे ते या शिवकाळाचा शोध घेत राहिले. त्याबद्दलच्या नवनव्या गोष्टी ते उजेडात आणत राहिले. त्यांनी व्यासपीठे गाजविली नाहीत की इतिहासविषयक परिषदांनाही ते उपस्थित राहिले नाहीत. फुटकळ लिखाण करून लोकप्रिय होण्याच्या फंदातही ते पडले नाहीत. मात्र, अखंड मेहनत घेऊन शिवकाळाबद्दलचा मजबूत दस्तावेज त्यांनी दोन खंडांत दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केला. अर्थातच अन्य शिवचरित्रांप्रमाणे तो रसाळ नाही, चटकदार नाही. राजकारण्यांना उपयोगी पडेल असे त्यात काही नाही. मात्र, त्यातील तळटीपा, संदर्भ नुसते चाळले तरी इतिहास संशोधन ही काय चीज असते याची कल्पना येते. महाराजांनी राज्य कसे उभे केले, याचा बारीकसारीक तपशील या दोन खंडांत मिळतो. हा तपशील जरी रूक्ष वाटला तरी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजीमहाराज ही व्यक्ती इतिहासावर खोल ठसा उमटवून जाण्यासारखी कामगिरी कशी करते याची माहिती यातून मिळते. अशावेळी शिवाजीमहाराजांची थोरवी एखाद्या दैवतापेक्षाही मोठी भासते आणि महाराज हा गप्पांचा, मते मिळविण्याचा विषय नसून कार्यक्षमतेने कारभार कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकण्याचा विषय आहे हे कळते.

गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेले महाराजांचे द्विखंडात्मक चरित्र प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली. आता इंग्रजी भाषेत लिहिलेले त्यांनी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध होत आहे. सुमारे हजार पानांच्या या ग्रंथात महाराजांचा काळ व महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल मेहेंदळे यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि महाराजांचे असामान्य व्यक्तित्व समजून घेण्यात दोन-अडीच तास कसे गेले हे कळले नाही.
‘१९७२ सालापासून मी शिवाजीमहाराजांचा अभ्यास करतो आहे..’ मेहेंदळे सांगू लागले.. ‘७२ साली मार्च महिन्यात मी महाराजांविषयी गंभीरपणे वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत असा एकही दिवस उगवलेला नाही, की ज्या दिवशी मी शिवाजीबद्दल अभ्यास केला नाही. असा एकही दिवस नाही. तरीही अजून बराच अभ्यास बाकी आहे असे वाटते..’

‘लष्करी इतिहास’ हा खरा तर मेहेंदळे यांच्या अभ्यासाचा विषय. शाळेत असल्यापासूनच त्यांना लष्करी इतिहासाचे वेड होते. याबाबत कुलकर्णी या आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांचे ते आभार मानतात. त्यांनी लहान वयातच इंग्रजी इतके घटवून घेतले, की इंग्रजी ग्रंथ वाचणे मेहेंदळे यांना कधीच जड गेले नाही. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. लष्करी इतिहास या विषयात एम.ए.ला ते पहिले आले. ‘वर्गात तीसच विद्यार्थी होते. पण ३०० असते तरी मीच पहिला आलो असतो!,’ असे ते आत्मविश्वासाने म्हणतात.

त्यांना पदवी हाती पडत असतानाच बांगलादेशातील युद्ध-घडामोडी सुरू झाल्या होत्या. त्या पाहण्यासाठी युद्धपूर्वकाळात आणि नंतर प्रत्यक्ष युद्धकाळात पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवर मेहेंदळे पोहोचले. पाकिस्तानच्या अंतर्भागातही ते जाऊन आले. मूळ विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याला प्रत्यक्ष पाहणीची जोड यातून या युद्धावर त्यांचे एक पुस्तक तयार झाले. परंतु नियमानुसार परवानगीसाठी ते लष्कराकडे पाठविण्यात आले. तेव्हा लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले. मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला आणि ते पुस्तक निघालेच नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवर एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता. अशा फुटकळ कारणासाठी त्यांनी शिवकाळात डुबी मारली, पण त्यातून अद्यापि ते बाहेर आलेले नाहीत.

‘या विषयाने मला अक्षरश: झपाटून टाकले. इतिहास संशोधक मंडळात मी अनेक कागदपत्रे तपासू लागलो. लष्करी इतिहासाचा मी एम. ए. असलो तरीही  इतिहास संशोधनाची मला माहिती नव्हती. मार्गदर्शन करण्यासाठी कोणी गुरूही नव्हता. दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे असे दिग्गज आजूबाजूला असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण येत असे. मग स्वतच अभ्यास सुरू केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी, फार्सी, उर्दू शिकलो. काही प्रमाणात पोर्तुगीज भाषाही शिकलो. विषयाची आवडच अशी लागली, की कोणतीही भाषा शिकणे जड गेले नाही. शिवाजी समजून घेण्यासाठी स्वाहिली शिकणे आवश्यक आहे असे जर मला वाटले तर मी उद्यापासून स्वाहिली भाषेचाही अभ्यास सुरू करीन..’ अभ्यासाबाबत अशी इच्छाशक्ती केवळ जातिवंत इतिहासकाराकडेच असते.

या अभ्यासातून मेहेंदळेंना महाराज कसे दिसले? महाराजांच्या कोणत्या गुणांनी त्यांना भारून टाकले?

‘महाराजांचे सतत उद्योगी, दीघरेद्योगी व्यक्तिमत्त्व..’ मेहेंदळे सांगू लागतात.. ‘पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वराज निर्माण करावे याची ‘खरी’ इच्छा त्यांच्याकडे होती. इच्छा प्रत्येकालाच असतात. आपण बरेच काही करावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण या इच्छा खोटय़ा असतात. खरी इच्छा बाळगली तर जगात बरेच काही शक्य आहे. स्वराज मिळते का हे जमले तर पाहू, असे शिवाजी म्हणत नव्हता. लहान वयातच त्याच्या मनात ही इच्छा आली आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्ज्वलित होत गेली..’

‘मात्र तेवढय़ानेच भागत नाही. महाराजांमध्ये अनेक गुणांचे सुंदर मिश्रण झाले होते. असा गुणसंयोग सहस्रकात एखाद्याच्याच वाटय़ाला येतो. म्हणूनच शिवाजीच्या जवळपास जाणारा अजून जन्माला आलेला नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. शिवाजीकडे असलेल्या अनेक गुणांपैकी तीन गुण अत्यंत महत्त्वाचे. क्षमता, चारित्र्य आणि संवेदनशीलता. नीतिमत्तेचे, सदाचाराचे सतत वाढत गेलेले प्राबल्य हा महाराजांच्या आयुष्याचा एक विशेष होता. या प्राबल्यामुळे धैर्य, हिंमत या गुणांची ताकद कित्येक पट वाढली. त्यांच्या गुणांचे नैतिक दडपण शत्रूवरही पडलेले दिसते. मग स्वकीय त्यांच्यासाठी जीव देण्यास तयार झाले यात आश्चर्य ते काय! आग्रा येथील महासंकटातून महाराज बाहेर पडले ते या नैतिक गुणांमुळेच. स्वकीय व परकीय अशा दोघांवरही महाराजांनी अधिकार निर्माण केला तो या गुणांमुळेच!’

‘या गुणांना जोड होती ती संवेदनशीलतेची. दुसऱ्याच्या मनात आत्मीयता निर्माण करणे महाराजांना सहज जमत असे. हा माणूस आपली कदर करतो, आपली काळजी घेतो, असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक युद्धात कमीत कमी मनुष्यहानी होईल, याकडे ते लक्ष देत. त्यानुसारच लढाईची आखणी करीत. त्यामुळे सैन्यातही राजांबद्दल विश्वास होता. हा आपल्याला अनाठायी बळी चढवणार नाही, ही खात्री सैन्याला होती. याउलट, मोगलांच्या मोहिमांमध्ये रक्तामासांचा चिखल होई. बेदरकारपणे युद्धात सैन्याला लोटले जाई. महाराजांनी असे कधीही केले नाही.’

दुसऱ्याबद्दल संवेदनशील असल्यामुळे महाराजांचा- आजच्या भाषेत बोलायचे तर ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ बराच मोठा होता. त्यांच्या आयुष्यात वारंवार याची प्रचीती येते. आग्रा येथे औरंगजेबाचे निकटवर्तीयही महाराजांच्या बाजूने बोलताना आढळतात. हे घडण्याचे दुसरे कारण संभवत नाही. खुद्द औरंगजेबही महाराजांबाबत तितकासा दुष्टपणे वागलेला आढळत नाही. पुढे महाराज निसटले व राजगडावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी उत्तरेत औरंगजेबाला सापडले. मुगल हेरखाते प्रमुखाच्या नातेवाईकाकडे ते लपून बसले होते. महाराजांचा ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ यावरून लक्षात येईल. मामुली शिक्षा करून औरंगजेबाने त्यांना सोडून दिले.’

यातून विषय निघाला तो आग्रा येथून झालेल्या महाराजांच्या सुटकेचा! आग्य््रााहून कोणत्या मार्गाने महाराज स्वराज्यात आले, याचा कोणताही ठोस पुरावा वा तपशील उपलब्ध नाही, असे मेहेंदळे सांगतात. तसा तो मिळणे आता शक्यही नाही. मात्र, साधारणपणे २५ ते ३० दिवसांत महाराज इथे आले, याबाबत इतिहासकारांत बऱ्यापैकी एकमत आहे. रोज जवळपास ६० कि. मी. दौड महाराजांनी केली असावी. असे करणे शक्य आहे. याबाबत रशियन सेनानी झुकॉव्ह याचा संदर्भ मेहेंदळे देतात. दुसऱ्या महायुद्धात नाव कमावलेला हा सेनानी पहिल्या महायुद्धात घोडदळात अधिकारी होता. त्याने सतत महिनाभर रोज ८० कि. मी. दौड मारली होती. तीही एका घोडय़ावर! यासाठी असामान्य शरीरशक्ती लागते. महाराजांनी अशीच दौड मारली असावी. कदाचित त्यांनी घोडे बदलले असतील. काही माणसे त्यांनी आग्य््रााहून पुढे पाठविली होती. त्यांनी घोडय़ांची सोय केली असेल. आग्य््रााहून परतल्यावर महाराज खूप आजारी पडले. प्रवासात झालेले अतोनात श्रम याला कारणीभूत असावेत.

सेनापती व मुत्सद्दी अशी दोन्ही अंगे महाराजांमध्ये एकवटली होती. मेहेंदळे त्याबाबत भरभरून बोलतात. महाराजांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यापैकी पहिल्या टप्प्यात त्यांनी सामथ्र्य जमा करीत नेले. सामथ्र्य व साहस याच्या जोडीने दुसऱ्या टप्प्यात त्यांनी अनेक संधी साधल्या आणि आपले राज्य विस्तारत नेले. हा खूप दगदगीचा काळ होता. यात काही वेळा त्यांना अपयशही आले. मात्र, याच काळात महाराजांच्या अंगचे गुण अधिकाधिक उंचावत गेलेले आढळतात. त्या बळावर तिसऱ्या टप्प्यात महाराजांनी त्यांना हव्या तशा संधी स्वतच निर्माण केल्या. परिस्थितीला आपल्याला हवे तसे वळण लावले आणि दक्षिणेपर्यंत स्वराज्य वाढवीत नेले. आलेली संधी साधणे हे सेनापतीचे काम, तर संधी निर्माण करणे हे मुत्सद्दय़ाचे काम. आपल्याला हव्या तशा संधी मुत्सद्दी कशा निर्माण करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांची दक्षिणेची मोहीम! महाराजांचे त्यावेळचे डावपेच मेहेंदळे यांच्याकडून ऐकताना मन थक्क होऊन जाते. त्या एका वर्षांत महाराजांनी ४० किल्ले घेतले, तर मोगलांना फक्त दोन किल्ले घेता आले.

विस्मयकारक वाटाव्यात अशा हालचाली करणे आणि सैन्याला गतिक्षम ठेवणे हे सेनापती म्हणून महाराजांचे वैशिष्टय़ होते. ‘शत्रूला ते थक्क करीत..’ मेहेंदळे सांगतात.. ‘याला जोड होती ती गुप्ततेची. ही गुप्तता केवळ हालचालींची नव्हे, तर हेतूंची गुप्तता. शिवाजी काय करीत असावा, ही विवंचना करण्यातच शत्रूचा बराच वेळ जाई. महाराज आपल्या हेतूंचा थांग शत्रूला लागू देत नसत.’

जदुनाथ सरकार यांच्यासारख्या इतिहासकारांनी शिवाजीमहाराजांबद्दल अनेकांचे मत कलुषित करून ठेवले आहे. मराठी कागदपत्रांचा अभ्यास न करता सरकार यांनी बरेच निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे मराठय़ांची ‘लुटारू’ अशी प्रतिमा उत्तर भारतात तयार झाली. याबाबत विचारता मेहेंदळे म्हणाले की, ‘महाराजांनी सुरत लुटली. अन्य काही लुटीही केल्या. मात्र, त्याची खोलवर कारणमीमांसा कोणी केली नाही. त्यामागे आर्थिक कारणे होती. त्यावेळी मुघलांचा वार्षिक महसूल २२ कोटी रुपयांचा होता, तर महाराजांचा जेमतेम एक वा सव्वा कोटीचा होता. मुघलांकडे दोन लाख खडे सैन्य होते. त्या हिशेबाने महाराजांकडे १० हजारांचे सैन्य असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ४० हजार होते. आता या ४० हजार इतक्या सैन्यासाठी पैसा उभा करणे आवश्यकच होते. स्वातंत्र्याकरता मोठय़ा सत्तेविरुद्धात युद्ध करायचे ठरविले तर लहान सत्तेला लूट करावीच लागते. तेव्हा नैतिक प्रश्नांची ऐतिहासिक प्रश्नांशी गल्लत करता कामा नये.’

..मेहेंदळेंशी गप्पांचा हा ओघ सुरूच राहतो. त्यातून अनेक अंगांनी महाराजांचे चरित्र उलगडत जाते. हा ओघ थांबणारा नसतो. शिवाजीमहाराजाचे गुण सांगावे तेवढे थोडेच. मग सर्वाधिक गुणवैशिष्टय़ कोणते, असे विचारले असता मेहेंदळे चटकन् म्हणाले की, ‘आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्टय़ आगळेवेगळे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतची मुद्रा घडविली. ती पुन्हा कधीही बदलावी लागली नाही. त्यामध्ये भर घालावी लागली नाही. फेरफार करावा लागला नाही. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याबद्दलची इतकी स्पष्ट कल्पना अन्य कुणा ऐतिहासिक व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो..’

इतिहासकारांची उदार दृष्टी
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये बसून गजाननराव मेहेंदळे यांचे सर्व संशोधन सुरू असते. सदाशिव पेठेतील या दगडी वास्तुबद्दल मेहेंदळ्यांना खूप आत्मीयता आहे. या वास्तुने थोर इतिहास संशोधक पाहिले. त्यांच्याबद्दल मेहेंदळे अतीव आदराने बोलतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे तर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मेहेंदळेंना त्यांचा सहवास लाभला नाही, परंतु दत्तो वामन पोतदार यांची भाषणे त्यांनी ऐकली. ग. ह. खरे यांचे काम त्यांनी जवळून पाहिले. मोडी लिपीतील तज्ज्ञ माधवराव ओंकार यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘मोडीच्या अभ्यासामुळे देवनागरी वाचायला वेळ मिळत नाही,’ असे सांगणारे ओंकार किंवा ‘आयुष्यातील एकही क्षण मी फुकट घालवला नाही,’ असे ठामपणे सांगणारे खरे यांच्या व्यक्तिमत्त्वांचा मेहेंदळेंवर खूप परिणाम झाला. दत्तो वामन पोतदार यांनी शिवचरित्र लिहिले नाही याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. पण इतिहास संशोधन मंडळ उभे करण्यासाठी पोतदारांनी भरीव काम केले याचा मात्र टीकाकारांना विसर पडतो. या कामाचे अनेक दाखले मेहेंदळे देतात. पण त्यांना सर्वात महत्त्वाचा वाटतो तो पोतदारांचा उदार दृष्टिकोन. यासंबंधातील एक आठवण मेहेंदळेंनी सांगितली.

जदुनाथ सरकारांची मराठय़ांच्या इतिहासाबद्दल स्वल्पदृष्टी होती. त्याबद्दल त्यांचा मराठी इतिहासकारांनी जोरदार प्रतिवादही केला. मात्र, इतिहासकार म्हणून सरकारांबद्दल सर्वाना आदरच होता. गो. स. सरदेसाई हे सरकारांच्या प्रभावाखाली असल्याने त्यांचेही मराठी इतिहास संशोधकांबद्दल फारसे चांगले मत नव्हते. तरीही भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकल्यावर सरदेसाई अस्वस्थ झाले. आपल्याशी मतभेद असूनही ही संस्था आपला सत्कार कसा काय करते, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा दत्तो वामन पोतदार त्यांना म्हणाले, ‘मतभेद असले म्हणून काय झाले? अहो, पैलवानाचा फोटो हा तालमीतच पाहिजे.’
भारत इतिहास संशोधन संस्था ही अभ्यासाची तालीम असून इतिहास संशोधनाचे सरदेसाई हे पैलवान आहेत, असे पोतदार यांनी मोठय़ा मनाने मान्य केले होते.

शिवराज्याचा कारभार
शिवाजीमहाराज कारभार कसा करीत, याचे अनेक तपशील मेहेंदळे सांगतात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ असले तरी त्यांचे काम सल्ला देण्यापुरतेच होते. निर्णय महाराज स्वतच घेत, असे मेहेंदळे यांचे ठाम म्हणणे आहे. हे मंडळ वास्तविक मंत्र्यांचे नसून सचिवांचे होते. आजचे सचिव जसे काम करतात तसे हे अष्टप्रधान मंडळ काम करी. ते महाराजांना माहिती पुरवीत, परंतु निर्णय हा शिवाजीचा स्वतचा असे.
बारीकसारीक तपशिलावर महाराजांची नजर असे. अनेक पत्रांमधून ही गोष्ट लक्षात येते. आपली मर्यादा सोडून काम केलेले महाराजांना खपत नसे. अगदी पाटीलकीच्या व्यवहारातही महाराज लक्ष घालीत. करंजा वाडीच्या पाटलांना महाराजांनी एक सणसणीत पत्र लिहिले होते. पाटलाने मागचा-पुढचा विचार न करता स्वतंत्रपणे निर्णय घेणे महाराजांना पसंत पडले नाही. ‘साहेब माणसाचे माणूस ओळखतो,’ असा इशारा त्यांनी पाटलांना दिला व सांगितल्याप्रमाणेच काम करण्याचा आदेश दिला.

व्यवस्थापनशास्त्राचा विचार करता नेत्याने इतक्या तपशिलात जाणे योग्य नाही. ‘कनिष्टांवर काम सोपवून द्या, त्यात लुडबूड करू नका,’ असे आजचे व्यवस्थापनशास्त्र शिकवते. मेहेंदळे याबाबत दुसरा विचार मांडतात. संस्था उभी राहिली की असे करणे योग्य ठरत असेल; पण पायाभरणीचे काम करणारे सर्वच नेते तपशिलाबाबत फार दक्ष असतात. आपल्या कार्याची वीट न् वीट ते स्वत रचत असतात. त्यामुळे ही लुडबूड ठरत नाही. उलट, उत्तम मार्गदर्शन होते. महाराजांसारख्यांना हे शक्य होते याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी अफाट कार्यशक्ती महाराजांजवळ भरपूर होती. अशी कार्यशक्ती हीसुद्धा थोर नेतृत्वाची खूण असते.

जवळचे आणि लांबचे उद्दिष्ट
स्वराज्यप्राप्तीसारखे दूरचे उद्दिष्ट मनात घट्ट धरून ठेवायचे आणि त्याचवेळी जवळच्या उद्दिष्टांवरील नजरही हलू द्यायची नाही, हे महाराजांना सहज साधत असे. लांबच्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून त्यांची आजची लढाई होत असे. याबाबतची फ्रेंच प्रवाशाने लिहिलेली आठवण मेहेंदळे सांगतात..

कारे नावाचा फ्रेंच प्रवासी मुंबईहून कोकण, हैदराबाद मार्गे दक्षिणेकडे गेला. तो राजापूरला पोहोचला तेव्हा महाराज हैदराबादला होते. राजापुरात त्याची गाठ अण्णाजी दत्तो या महाराजांच्या एका कारभाऱ्याशी पडली. महाराजांच्या या मोहिमेविषयी अण्णाजी दत्तो त्याला म्हणाले की, ‘कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावर चालून येणार याची महाराजांना खात्री आहे. त्याचा मुकाबला करताना हाताशी असावा म्हणून दक्षिणेतील मुलुख आम्ही काबीज करीत आहोत.’
महाराजांनी जिंजीपर्यंत मजल मारली आणि तो किल्ला हस्तगत केला. पुढे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी रामचंद्र अमात्य यांनी याच किल्ल्यात राजाराम महाराजांना नेऊन ठेवले. महाराजांनी काबीज केलेल्या या मुलखामुळेच औरंगजेबाला प्रत्युत्तर देणे पुढच्या काळात मराठय़ांना शक्य झाले.

मुकुंद कुळे , सौजन्य – मटा

प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेला ‘शिवाजी: हिज लाइफ अॅण्ड पिरयड’ हा हजार पानांचा ग्रंथराज डिसेंबर अखेर ‘परममित्र प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने इतिहास पुरुषांविषयीची समाजाची मानसिकता, इतिहासलेखनाची परंपरा, वादग्रस्त दादोजी कोंडदेवप्रकरण… अशा विविध मुद्यांवर मेहेंदळे यांच्याशी साधलेला संवाद.

———————————

मराठी-इंग्रजीत शिवचरित्र लिहिण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केलाय. कुणी ऐतिहासिक दस्तावेजांचा आधार घेऊन शिवचरित्र लिहिलं, कुणी शिवरायांच्या आयुष्यातील घटना घेऊन त्यावर आपल्या कल्पनांचं कलम करुन शिवचरित्र लिहिलं. तर काही शिवचरित्र पूर्णत्वालाच गेली नाहीत. अन तरीही या सर्वच शिवचरित्रांची वाचकांना कायमच उत्सुकता होती आणि आहे. कारण शिवाजी नावाच्या महापुरुषाचं कर्तृत्वच एवढं जबरदस्त आहे की, त्यांचं नाव घेताच अंगावर रोमांच उभे राहतात. शिवाजीराजांबद्दल कुणी काय लिहिलंय, हे वाचण्यासाठी तो अनावर होतो. परंतु कधीकधी हा भावनोदेकच शिवचरित्राच्या आस्वादाच्या आड येतो. शिवराय ही मराठी मनाची-मराठी मातीची अस्मिता असल्यामुळे, जर एखाद्या चरित्रात काही चुकीचा वा गैर निष्कर्ष काढला गेला असेल, तर मग माथी भडकतात. काही वेळा तडकतातही… पण तरीही शिवचरित्रं येतच राहतात आणि येतच राहणार. कारण अवतीभवती चार मुसलमान शाह्या असताना शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या अस्तित्वापर्यंत ते अकलंकितपणे चालवलं.

ज्येष्ठ इतिहास संशोधक-लेखक गजानन भास्कर मेहंेदळे यांचं ‘शिवाजी: हिज लाइफ अॅण्ड पिरयड’ हे पुस्तकही याच ऊमीर्तून लिहिलं गेलंय. मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ कल्पनेचा पिसारा नाहीय. यातल्या प्रत्येक विधानाला दस्तावेजाचा आधार आहे. शिवरायांवर मराठीत अनेक पुस्तकं लिहिली गेली असली, तरी इंग्रजीत त्यांच्यावर किंवा एकूणच मराठ्यांच्या इतिहासावर फार पुस्तकं नाहीत. सगळ्यात आधी ग्रॅण्ट डफने इंग्रजीत मराठ्यांचा इतिहास लिहिला, त्यानंतर प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी शिवकालावर लिहिलं. त्यानंतर शिवरायांवर अनेक छोटी-मोठी पुस्तकं इंग्रजीत लिहिली गेली. परंतु मोठा ग्रंथराज नव्हता. इतिहासकार गजानन मेहंेदळे यांच्याशी संवाद साधताना हा सारा संदर्भ पाठीशी होता…

शिवरायांवर बऱ्याच वर्षांनी इंग्रजीत एवढा मोठा ग्रंथ लिहिला जात आहे, काय आहे या पुस्तकाचं वेगळेपण?

‘ ग्रॅण्ट डफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास एकप्रकारे चुकीचा होता. त्याला मराठी येतच नव्हतं. त्याने इंग्रजी दस्तावेजाच्या मदतीने आणि साहजिकच ब्रिटिशांना सोयीचा असा मराठ्यांचा इतिहास लिहिला. जदुनाथ सरकारांनी केलेलं लेखन महत्त्वाचं आहे. परंतु त्यांनी शिवाजीराजांच्या संदर्भात केलेलं काही लेखन विपर्यास करणारं आहे. जदुनाथांना फासीर् येत असल्यामुळे त्यांनी मुख्यत: इंग्रजी आणि फासीर् साधनांचा आधार घेतला. मात्र त्यांना मोडी बिलकूल येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही साधनं अभ्यासलीच नाहीत. सेतुमाधवराव पगडी यांनीही इंग्रजीत शिवचरित्र लिहिलं आहे. परंतु ते छोटेखानी आहे. शिवकाल आणि शिवराय याविषयी जबाबदारीने भाष्य करणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता, ती उणीव माझ्या या पुस्तकाने भरुन निघेल, असं वाटतं. मूळात मला स्वत:ला इंग्रजी, फासीर्, मोडी या भाषा उत्तम अवगत असल्यामुळे या सर्व भाषांतील दस्तावेजांचा मला वापर करता आला. शिवाजीमहाराज आणि त्यांच्या काळाविषयी लिहिण्यासाठी ज्या-ज्या शिवकालीन अस्सल साधनांचा वापर करायला हवा, तो मी केलेला आहे. आजवरच्या लेखनातून जे मुद्दे फार उपस्थित झालेले नव्हते, ते मी या पुस्तकात घेतलेले आहेत. उदाहरणार्थ- शिवरायांनी मोगलांशी भांडण काढलं. पण आदिलशाही संपूर्णपणे नष्ट झालेली नसताना त्यांनी मोगलांना अंगावर का घेतलं? मी संरक्षणशास्त्राचा विद्याथीर् असल्यामुळे युद्धासबंंधीची आजवर दुर्लक्षित राहिलेली माहिती मी पुुस्तकात आणली आहे. एकावेळी दोन आघाड्यांवर लढू नये, हा युद्धतंत्राचा पहिला धडा. परंतु शिवाजीराजांनी हिकमतीने एकावेळी अनेकांशी युध्द मांडलं. त्यामागची त्यांची नीती काय होती, हे पुस्तकात आहे. हे केवळ शिवचरित्र नाही, तर शिवाजीमहाराज आणि त्यांचा काळ, त्या काळातील सामाजिक-धामिर्क गोष्टी यांविषयीचं ते भाष्य आहे.

शिवाजी महाराजांचं किंवा कुणाही ऐतिहासिक व्यक्तीचं एकचएक अंतिम वा अधिकृत चरित्र लिहिलं जाऊ शकतं?

शिवाजीमहाराजांचंच नाही, तर कुठल्याही ऐतिहासिक-पौराणिक महापुुरुषाचं अंतिम आणि अधिकृत चरित्र लिहिलं जाऊ शकत नाही. कारण इतिहासात अंतिम सत्य असत नाही. व्यक्ती होऊन गेली, हे सत्य असतं. पण तिच्यासंबंधीचे इतिहासकालीन पुरावे-कागदपत्रं सापडत राहतात आणि कालचं सत्य आज असत्य ठरतं, ठरू शकतं. तेव्हा जोपर्यंत नवीन पुरावा सापडत नाही तोपर्यंत आधीचं खरं, असंच इतिहासाच्या संदर्भात मानून वाटचाल करावी लागते. दुदैर्वाने आपल्याकडे तसं होत नाही. आणि एखाद्याला देवत्व दिलं की कोणीही त्याच्याविषयी तटस्थपणे चर्चा करायला, लिहायला, बोलायला मागत नाही. लगेच आपल्या भावना दुखावल्या जातात.

याचा अर्थ आपण भावनिकदृष्ट्या नाजुक, कमकुवत आहेत, असा घ्यायचा का?

मराठी माणूसच नाही, तर एकूणच भारतीय समाज अतिसंवेदनशील आहे. तो कुठल्याही गोष्टींनी दुखावू शकतो. ही भावव्याकुळता दिडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून आलेली आहे. पारतंत्र्यात माणसाला आपला भूतकाळ प्रत्यक्षात कसाही असला, तरी चांगलाच वाटतो. त्यात रमण्याचा तो प्रयत्न करतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी ५० वर्षंच झालेली असल्याने आपला समाज अजूनही पूर्वदिव्यात रमतोय. अजून किमान शंभरेक वर्षं तरी ही स्थिती कायम राहील. त्यानंतर पूर्वदिव्याकडेही तो तटस्थपणे पाहील. आज नपोलियनविषयी काहीही उलटसुलट लिहून आलं, तरी फ्रेंच माणूस टोकाची प्रतिक्रिया देत नाही. कारण त्यांच्यात तेवढा तटस्थपणा आलेला आहे. किंवा एकूणच जगभरात आपल्याला दिसून येईल की, तिथे कुठल्याही व्यक्तीच्या वा वास्तूविषयीच्या नव्या संशोधनाला नाही म्हटलं जात नाही. आपल्याकडे ज्ञानदेवांच्या समाधीबद्दल किंवा शिवाजीमहाराजांबद्दल काही संशोधन करायचं म्हटलंं, तरी लगेच भावना दुखवतात. कुठलीही व्यक्ती काळाच्या कितीही पुढे असली, तरी तिला काळाच्या म्हणून काही मर्यादा असतातच. या मर्यादांना तुम्ही त्यांच्या उणिवा मानणार का? मग एखाद्या व्यक्तीवषयी-वास्तूविषयी संशोधनातून काही नवी माहिती उघड होणार असेल, तर त्याला नाही का म्हणावं?

दादोजी कांेडदेव हेच शिवरायांचे गुरू होते, असंच आजवर शालेय इतिहासात शिकवलं गेलंय. परिणामी आज तेच समाजाच्या मनात घट्ट बसलंय. अशावेळी इतिहासकारांनी कोणती भूमिका घ्यायला हवी?

इतिहासकारांनी पुुराव्यांच्या आधारे सत्य काय ते समाजाला सांगितलं पाहिजे. शिवकालाविषयीचे जे अस्सल पुरावे आहेत, त्यात कुठेही दादोजी कांेडदेव हे शिवाजीमहाराजांचे गुरू होते, असं म्हटलेलं नाही. तसा उल्लेखही कुठे सापडत नाही. हे मी तीस वर्षांपूवीर्च लिहूून ठेवलेलं आहे. परंतु त्याचबरोबर माझं असंही म्हणणं आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयीची शिफारस करणारी शिवाजीमहाराजांची स्वत:ची चार पत्रं उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली होती, ती त्यांनी सुविहीतपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीवषयी आज एवढा गहजब का? त्यांचा पुतळा उखडून काढण्याचं कारण काय? शिवाजीराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे आजही शाबूत आहेत ना, मग दादोजींनाच नाकारण्याचं कारण काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजीमहाराजांचे दादोजीच नव्हे, तर कुणीच गुरू नव्हता. तसेही उल्लेख उपलब्ध कागदपत्रांत सापडत नाहीत.

आपला समाज गतकाळाविषयी अतिसंवेदनशील असण्यामागचं कारण काय?

भारतीय समाज अजून प्रगल्भ झालेला नाहीय. कुठल्याही प्रश्नाकडे तटस्थपणे पाहण्याची त्याची दृष्टी अजून तयार झालेली नाही. परिणामी त्याला एकतर काही कळत तरी नाही. किंवा अर्धवट माहीतीच्या बळावर उतावीळपणे प्रतिक्रिया देऊन तरी तो मोकळा होतो. यात नको त्या प्रश्नांचं राजकारण करणारी मंडळीही असतातच. ती स्वत: किती इतिहासाचं वाचन करतात? त्यांनी किती साधनं वाचलीत? त्यांना मोडी, फासीर् येतं का?

महाराष्ट्रात जशी इतिहासलेखनाची मोठी परंपरा आहे, तशी भारतात अन्यत्र आहे?

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच इतिहासलेखन आणि अभ्यासाला सुरुवात झाली. तशी भारतात इतरत्र फार कुठे झालेली दिसत नाही. कोलकाता-राजस्थान या ठिकाणी तसे प्रयत्न झाले. अनेक ठिकाणी तर तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच इतिहास लिहिलेला आढळतो. परंतु महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विविध संस्था आणि व्यक्तींनी इतिहाससंशोधनाचं आणि लेखनाचं कार्य मोठ्या प्रमाणावर केलं, तसं अन्यत्र क्वचितच आढळतं. महाराष्ट्रात न्या. महादेव गोविंद रानड्यांपासून कीतीर्कर, का.ना.साने, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वि.का. राजवाडे, पाररसनीस, गोव्यातील पिसुलेर्कर , बी.जी. परांजपे अशी अनेक नावं घेता येतील. आतापर्यंत हे काम अव्याहतपणे सुरू आहे. तसंच संस्थांचंही. पुण्यातल्या भारतीय इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या माध्यमातूनच आजवर मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक संशोधन आणि प्रकाशन झालेलं आहे. या संस्थेएवढं शिवकालीन साहित्य कुणीच प्रकाशित केलेलं नाही. या तिने प्रकाशित केलेल्या शिवकालीन कागदपत्रांचा आधार घेतल्याशिवाय शिवचरित्र व त्या काळासंबंधी काहीच भरीव लिहिता येणार नाही. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली इतिहासलेखनाची-संशोधनाची ही परंपरा आजही सुरू आहे. म्हणूनच मी म्हणतो की, ही परंपरा खंडित होईल असं वागू नका. त्यात भर घाला.

रामचंद्र गुहा, सौजन्य – लोकसत्ता

 

सुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले तरी भारतीय मुस्लिमांमधील एक निर्भीड आणि परखड विचारवंत म्हणून जुन्या पिढीला ते माहिती आहेत. कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या हमीद दलवाई यांनी डाव्या विचारसरणीच्या राजकारणात स्वत:ला झोकून दिले. काही सुंदर लघुकथा आणि विचारप्रवर्तक राजकीय लेख त्यांनी लिहिले. त्यांचे स्नेही आणि सहकारी दिलीप चित्रे यांनी हमीद दलवाई यांचे लेखन अनुवादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले तेच हे पुस्तक होय. या पुस्तकात मुस्लिम समाजातील प्रतिगामी आणि हिंदू रूढीप्रिय, कर्मठ या दोघांचीही झाडाझडती घेण्यात आली आहे.  धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आधुनिक भारताच्या उभारणीसाठी सर्व जाती-पंथ-धर्मातील सुधारणावाद्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. भारतीय राजकीय विचारधारेवरील एका संकलन ग्रंथात मी हमीद दलवाई यांच्या लेखनाचा समावेश केला; तेव्हा काही समीक्षक कमालीचे गोंधळले. त्याचे एक कारण म्हणजे या समीक्षकांनी दलवाई यांचे नाव पूर्वी कधी ऐकले नव्हते. दुसरे कारण म्हणजे या संकलन ग्रंथात मी मौलाना अबुल कलम आझाद यांना वगळले होते. दलवाई यांचे अगदी चाळीशीतच निधन झाल्याने आजच्या पिढीतील बहुतांश लोकांना ते माहिती नाहीत, हे खरे आहे. तथापि मौलाना आझाद यांच्याऐवजी मी दलवाई यांची निवड करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे मौलाना आझाद हे थोर विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या लेखनात त्यावेळच्या समस्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. याउलट हमीद दलवाई यांनी त्यावेळच्या ज्वलंत समस्या, प्रश्न यावरच आपल्या लेखनात भर दिलेला आढळतो.

हमीद दलवाई यांचा दिलीप चित्रे यांनी अनुवादित केलेला एक लेख अलिकडेच मी वाचला आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. महंमद अली जिना यांचे जीवन आणि वारसा यांचे पुनर्विलोकन या निबंधात आहे. हा अनुवाद १९७३ मध्ये ‘क्वेस्ट’ या साहित्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. हे नियतकालिक आज अस्तित्वात नाही. तथापि ‘द बेस्ट ऑफ क्वेस्ट’ (क्वेस्टमधील सवरेत्कृष्ट, निवडक लेख) या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका संकलन ग्रंथात दलवाई यांच्या लेखाचा समावेश आहे. या लेखाची सुरुवातच दलवाई यांनी अशी केली आहे- ‘‘बांगलादेशची निर्मिती हा महंमद अली जिना यांच्या मोठय़ा राजकीय स्वप्नांवरील अखेरचा प्रहार आहे.’’
जिना हे सर्वधर्मसमभाव मानणारे, आधुनिक विचारसरणीचे होते; परंतु राजकारण, तसेच समाजकारण यांच्यात तडजोडीला सतत विरोध करणाऱ्या काही हिंदू नेत्यांच्या वागण्यामुळे आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे (त्यांचे विचार न पटल्याने) नाईलाजाने जिना यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी आग्रह धरणे भाग पडले, असा जो समज होता तो चुकीचा, अनाठायी असल्याचे हमीद दलवाई यांनी या लेखात उघड केले आहे. १९१६ चा लखनौ करार आणि १९४६ चा ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ या दोन गोष्टींवर दलवाई यांनी चांगले विश्लेषण केले आहे. वसाहतवाद्यांविरुद्धच्या लढय़ात हिंदूंना साथ द्यायची, असा जिना यांचा उद्देश होता, असे जिना यांचे समर्थक ठामपणे सांगतात. खरोखरच तसे असेल तर मग लखनौ करारानंतर ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात जिना हे केंद्रस्थानी असायला हवे होते; परंतु तसे घडले नाही. उलट मध्यंतरीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या कोणत्या गोष्टी, मागण्या मान्य करतात याचीच चाचपणी जिना हे करीत होते, अंदाज घेत होते. मुस्लिमांसाठी कोणत्या सवलतींच्या मागण्या पुढे करायच्या, त्या कशा रेटायच्या याचाच जिना हे सातत्याने विचार करीत होते; ही बाब हमीद दलवाई यांनी उघड केली आहे.

त्यानंतर ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’संबंधांतही दलवाई यांनी विश्लेषण केले आहे. ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार मुस्लिमबहुल प्रांतांत मुस्लिमांना राजकीय सत्ता-अधिकार तर मिळणारच होते; त्याशिवाय केंद्रातही त्यांना ५० टक्के आरक्षण मिळणार होते; म्हणूनच  जिना यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ ताबडतोब स्वीकारला, मान्य केला. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील जी राजेशाही राज्ये होती ती या ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार तशीच राहणार होती. त्यांचा दर्जा बदलणार नव्हता. त्यामुळे जिना यांनी या योजनेचे स्वागत केले. ‘मुस्लिम इंडिया’  आणि ‘प्रिन्सली इंडिया’  या दोघांचा ‘हिंदू इंडिया’  विरुद्ध आपल्याला वापर करता येईल, अशी अटकळ जिना यांनी बांधली होती. भारतात त्यावेळी असलेले नवाब आणि महाराजे यांचे हक्क अबाधित राहावे, अशी भूमिका जिना यांनी घेतली होती, हे दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.

जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅनह्ण मान्य केला नाही म्हणून इतिहासकारांनी त्या दोघांना दोष दिला, टीका केली. हे इतिहासकार गतस्मृतींमध्ये रमण्यात धन्यता मानणारे, आहे तेच पुढे चालू द्यावे, बदल-सुधारणा नको अशा मताचे होते. गांधी आणि नेहरू यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ मान्य केला असता तर देश आज अखंड राहिला असता (फाळणी झाली नसती; पाकिस्तानची निर्मिती झाली नसती) असे त्यांचे म्हणणे!
जिना यांच्या मागण्या गांधी आणि नेहरू यांनी मान्य केल्या असत्या तर फाळणी निश्चितपणे टळली असती हे दलवाईही मान्य करतात. तथापि ते   पुढे जे म्हणतात ते अधिक महत्त्वाचे आहे. हमीद दलवाई लिहितात- ‘‘कोणत्याही स्थितीत, पडेल ती किंमत मोजून देशाची फाळणी टाळायची हे गांधी आणि नेहरू यांचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. फाळणी टाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवली असती तर त्याचा किती विपरीत परिणाम झाला असता ते पाहा- फाळणी टळली असती, पण देशाचे धार्मिक तत्त्वावर आतल्या आतच विभाजन झाले असते. प्रत्येक भारतीय हा एकतर हिंदू नाहीतर मुस्लिम झाला असता. भारतीयत्वाची भावना राहिलीच नसती. हा मोठा धोका होता. मग देशाच्या त्या अखंडतेला काय महत्त्व  राहिले असते?

सुधारणावादी विद्वज्जन हे महात्मा गांधींकडे नवचेतनावादी म्हणून तर जिना यांच्याकडे आधुनिक विचारसरणीचा माणूस म्हणून पाहात होते. म्हणजेच दोघांबद्दलही विद्वज्जनांमध्ये आदरभावना होती. असे असले तरी प्रत्यक्षात गांधीजींच्या ‘नवचेतनावादी’ भारतात अल्पसंख्याकांना समाधानाने राहता येत होते. देशाला धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे. आधुनिक राष्ट्रउभारणीचा मोठा प्रयोग सुरू झाला आहे. १६ प्रमुख भाषा आणि आठशेवर बोली भाषा असलेला हा बहुधर्मीय, बहुवंशीय देश आजही अखंड आहे, एकात्म आहे. या देशातील महिलांना मतदानाचा हक्क न झगडता मिळाला आहे. मतदानाच्या हक्कासाठी महिलांना संघर्ष करण्याची वेळ आली नाही, तो हक्क त्यांना आपसूक मिळाला. याउलट दुसरीकडे जिना यांच्या पाकिस्तानात काय आहे? पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात  अशी स्थिती का ? पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे? असा सवाल हमीद दलवाई यांनी उपस्थित केला आहे. जाता जाता शेवटी त्यांनी जिना यांच्या दुर्बलतेबद्दलही लिहिले आहे. फाळणीच्या वेळी दोन्ही ठिकाणी जो प्रचंड हिंसाचार झाला तेव्हा जिना यांच्या मनात प्रचंड भीती घर करून होती. गांधीजींनी मात्र हिंसाचार थोपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे सर्वाना माहिती आहे.

अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल असे एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्याची योजना गांधीजींनी पुढे केली; परंतु त्यावर स्वाक्षरी करण्यास जिना यांनी स्पष्ट नकार दिला. १९४७-४८ च्या हिवाळ्यात भारतात आणि पाकिस्तानातही हिंसाचाराने कळस गाठला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. दंगली थांबविण्यासाठी गांधीजींेनी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कलकत्त्यात यशही आले. याउलट त्यावेळी जिना हे गव्हर्नर जनरलच्या निवासस्थानातून बाहेरही पडले नाहीत. एवढेच नव्हे तर ३० जानेवारीला गांधीजींची दिल्लीत हत्या झाल्याचे समजल्यावर आपलेही असेच होईल की काय, या भीतीने जिना यांनी आपल्या निवासस्थानाच्या परसदाराभोवती भक्कम भिंत उभारण्याचे आदेश दिले.  यावरून जिना यांचा भित्रेपणा आणि राजकीय दांभिकपणा दिसून येतो तसेच मानवी मूल्यांबाबतच्या त्यांच्या भावनाही दुर्बल असल्याचे स्पष्ट होते, असे दलवाई म्हणतात.
१९४७-४८ च्या हिवाळ्यामध्ये जिना यांना वयोमानाने शारीरिक दौर्बल्य आले होते. १९७३ नंतर भारतातही परिस्थिती बदलत गेली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, हिंदुत्वाचा उदय अशा अनेक गोष्टी होऊनसुद्धा भारतातील मुस्लिम बांधव हे पाकिस्तानातील हिंदूंपेक्षा सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आणि सुखात आहेत. बंगाली भाषा आणि बंगाली माणसे यांच्या दमन-दडपशाहीमुळे पाकिस्तानात फूट पडली. याउलट भारतात बहुभाषिकतेला कधी विरोध झाला नाही. बहुभाषिकता  समृध्द होऊ दिली गेली. पाकिस्तानच्या तुलनेत भारतात महिलांचे सक्षमीकरण अधिक झाले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात प्रथमपासून आणि आजही राजकारणात लष्कराचा हस्तक्षेप, किंबहुना वरचष्मा कायम आहे; तर भारताच्या राजकारणात लष्कराचा अजिबात हस्तक्षेप नाही, भूमिका नाही.

स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध, अखंड राहावा की त्याचे विभाजन व्हावे या मुद्दय़ावर गांधीजींचा पराभव झाला हे मान्य! इच्छा नसतानासुद्धा फाळणी झालीच; परंतु तरीही इतिहास मात्र आजही गांधीजींचे विचार, भूमिका आणि कार्य यांचे समर्थन करतो. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांमध्ये जे पाहायला मिळाले; त्यावरून नवचेतनावादी गांधीजींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जिना यांचा दिखाऊ, बेगडी तथाकथित आधुनिकतावाद त्यापुढे खुजा वाटतो. आता उपखंडाबाबत विचार करणे सोडून जरा बाहेरच्या जगाचा विचार करू या. उत्तर अमेरिका, पूर्व युरोप, पश्चिम युरोप, दक्षिण आफ्रिका, तिबेट आणि ब्रह्मदेश (म्यानमार) आदी ठिकाणी जिना यांचे नावही कोणाला माहिती नाही. याउलट लोकशाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, तत्सम मानवी मूल्ये आणि हक्कांसाठी प्रभावी लढा देणारा म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आजही जगभर घेतले जाते. त्यांना ‘जाऊन’ ६३ वर्षे झाल्यानंतरही..!

अनुवाद: अनिल पं. कुळकर्णी