Archive for सप्टेंबर, 2009

रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता

ग्रामीण महिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. विधायक कामांद्वारे तसेच भूमिगतांना मदत करून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ज्ञात-अज्ञात महिला स्वातंत्र्यसैनिकांचे हे स्मरण..

———————————————————————————————————————————–

१९२१ साली पुणे जिल्ह्यातील मुळशी गावात नीरा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा वीज कंपनी धरण बांधून विजेचा प्रकल्प सुरू करणार होती. या धरणामुळे ५०० चौरस मैलांचे क्षेत्र पाण्याखाली बुडणार होते. त्यात शेतकऱ्यांची उपजाऊ शेतंही पाण्याखाली जाणार होती. १६ एप्रिल १९२१ रोजी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रहाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातला हा पहिलाच मोठा सत्याग्रह. या सत्याग्रहात पहिल्यांदाच स्त्रिया सहभागी झाल्या. या सत्याग्रहात ग्रामीण स्त्री प्रथमच रस्त्यावर उतरली.

मुळशीच्या सत्याग्रहाला महात्मा गांधींनी पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्यांना हुरूप आला. हा सत्याग्रह १९२४ पर्यंत चालू होता. ग्रामीण स्त्रिया सत्याग्रहाच्या कल्पनेने भारावून गेल्या होत्या. जाईबाई भोई ही एक निरक्षर बाई. बहुसते हे तिचे गाव. तिने ग्रामीण महिलांना सत्याग्रहासाठी संघटित करून धरणविरोधी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. कंपनीच्या संरक्षकांनी जाईबाईला जबरदस्त मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिची अब्रू लुटण्याचाही प्रयत्न केला. एवढे होऊनही जाईबाईने महिलांचा मोर्चा काढला. तिला व तिच्या सहकारी स्त्रियांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सरस्वतीबाई भुस्कुटे हिने तर तान्हे बाळ व म्हातारी सासू यांना घेऊन सत्याग्रह केला. जिथे सुरुंग पेरले होते, त्यावर बसूनच हा सत्याग्रह केला. सर्व सत्याग्रहींना तीन महिन्यांची सक्तमजुरी व पन्नास रुपये दंड व दंड न दिल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा झाली. येरवडा तुरुंगात या सत्याग्रहींचा खूप छळ झाला. पण कुणीही शरणागती पत्करली नाही. भारतात स्त्री-सत्याग्रहींनी अहिंसात्मक मार्गाने दिलेला विसाव्या शतकातील हा पहिलाच लढा. तोही महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांनी दिला, ही विशेष अभिमानाची गोष्ट.

१९३० मध्ये जंगलचा सत्याग्रह बागलाण- बिळाशी येथे झाले. जेव्हा जेव्हा पोलीस सत्याग्रहींना पकडून नेत, त्या- त्या वेळी स्त्रिया पोलिसांना घेराव घालत. स्त्रियांचा घेराव मोडून काढण्यासाठी पोलीस त्यांच्यावर लाठी चालवीत. चंद्राबाई व तानूबाई बाबर या दोन स्त्रियांनी कराडजवळच्या तांबवे सत्याग्रहाच्या वेळी तर अधिकाऱ्यांची हत्यारेही हिसकावून घेतली. एका रेंजरची बंदूकही त्यांनी काढून घेतली. वनसंरक्षकाच्या लाठय़ाकाठय़ा आपल्या ताब्यात घेतल्या. या त्यांच्या कृत्याबद्दल दोघींनाही सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.

चरण बिळाशी जंगल सत्याग्रहात सागवान तोडून आणून त्यावर स्त्रियांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. या झेंडय़ाभोवती मैनाबाई धनगर, धोंडूबाई मस्कर, राजूताई कदम यांनी कडे करून हा झेंडा पोलिसांना उतरवू दिला नाही. ५ सप्टेंबर १९३० रोजी दस्तुरखुद्द सातारचे कलेक्टर तिथे पोहोचले. राजूताई कदमने ध्वज लावलेल्या सागवानाला घट्ट मिठी मारली. पोलिसांनी तिला प्रचंड मारहाण केली. या सत्याग्रहात ५० स्त्रियांना अटक झाली. त्यात सुलोचना जोशी, धोंडीबाई मटकर, बयना रामगर, मुक्ताबाई साठे यांचा समावेश होता. पैकी सुलोचना जोशी या येरवडय़ाच्या तुरुंगात रक्ताचे जुलाब होऊन मरण पावल्या. कमलाबाई शेडगे या तुरुंगातच बाळंत झाल्या. पण तुरुंगातील हालअपेष्टांमुळे त्यांचे बाळ दगावले. विदर्भातही व्यापक प्रमाणावर जंगल सत्याग्रह झाले. त्यात ओक कुटुंबातील तीन स्त्रियांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

१९४० साली पुणे जिल्ह्यात सासवड, इंदापूर, नीरा या गावी स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे सभा घेऊन युद्धविरोधी भाषणे व घोषणा दिल्या. गांधीजींनी जो वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता, त्यात सत्याग्रहींची निवड गांधीजींनीच केली होती. वैयक्तिक सत्याग्रह सर्वाना खुला करावा, अशी मागणी पुणे जिल्ह्यातून व इतरही ठिकाणाहून होऊ लागली. गांधीजींच्या आदेशाची वाटही न बघता ठिकठिकाणी स्त्रिया युद्धविरोधी भाषणे देऊन घोषणा देऊ लागल्या. अनेक ठिकाणी असे उत्स्फूर्त सत्याग्रह झाले. त्यात दुर्गाबाई जोग, तानूबाई मोगी, अंबूबाई भोसले, लक्ष्मी वैद्य यांना शिक्षाही झाल्या.  अहमदनगर व सातारा जिल्हा, ठाणे, पूर्व तसेच पश्चिम खानदेशमधील ग्रामीण स्त्रियांनी उत्स्फूर्त सत्याग्रह केले. त्यातील बहुतेक सर्वानाच ३ ते ६ महिन्यांची शिक्षा झाली.

१९४२ च्या चले जाव आंदोलनापर्यंत निरनिराळ्या आंदोलनांतील सहभागामुळे ग्रामीण महिलांनाही राजकीय जाणीव झालेली दिसते. मुळशी सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह व उत्स्फूर्तपणे केलेले वैयक्तिक सत्याग्रह या सर्वात दलित स्त्रियाही होत्या. दलितांच्या उद्धाराकरिता अथक प्रयत्न करणाऱ्या मालवणच्या म्हाळसाबाई भांडारकर, नगरच्या जानकीबाई आपटे यांनी दलित स्त्रियांनाही गांधीजींच्या चळवळीच्या मार्गावर आणून सोडले. ग्रामविकास, सूतकताई, हरिजन वस्तीतील कार्य, खादीची विक्री इत्यादी कार्यातही ग्रामीण स्त्रीचा मोठाच हातभार होता. फैजपूर काँग्रेस अधिवेशनात ग्रामीण स्त्रिया स्वयंसेविका होत्या. या अधिवेशनातली प्रदर्शने स्त्रियांनीच मांडली होती. त्यात त्यांनी खादी व कुटीरोद्योगातील वस्तूंची विक्री केली. डॉ. उत्तमराव पाटील यांची आई (अभिनेत्री कै. स्मिता पाटीलची आजी) या अधिवेशनापासून काँग्रेसच्या कामात सक्रिय झाली. त्यांना मार्शल लॉ तोडल्याबद्दल १९४१ मध्ये नऊ महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे १९४२ सालीही तुरुंगवास घडला. परंतु बऱ्याच आजारी पडल्याने त्यांना सोडण्यात आले. भूमिगत मुले व सून यांच्याशी त्यांची अखेर दृष्टिभेटही झाली नाही.

१९४२ च्या लढय़ात उल्लेखनीय कामगिरी बजावली सातारा जिल्ह्य़ातील ग्रामीण महिलांनी. साताऱ्यात पत्री सरकारचे दोन गट होते. वाळवे गट व कुंडल गट. ही नावे त्या- त्या गावांवरून पडली होती. दोन्ही गटांचे काम एकच होते. वाळवे गटात राजमती बिरनाळे ऊर्फ जैनाची ताई हिने वाळवे तालुक्यातील दरोडेखोरांनाही धडा शिकवला होता. जैनाची ताई बंदूक चालवे. धुळे खजिना लुटीशीही तिचा प्रत्यक्ष संबंध होता. कुंडल गटाने तुफान सेना नावाची सेना तयार केली होती, तर वाळवे गटाने आझाद हिंद फौजेतील दोन जवान प्रशिक्षक म्हणून नेमून आझाद हिंद सेना तयार केली होती. लीला पाटील (डॉ. उत्तमराव पाटील यांची पत्नी) यांना घातपाती कृत्याबद्दल साडेसात वर्षांची शिक्षा झाली होती. पण येरवडय़ाच्या तुरुंगातून त्यांनी पलायन केले. गर्भवतीचा वेश घेऊन त्या खऱ्या बाळंतिणीसोबत पत्री सरकारच्या हद्दीत पोहोचल्या. लीला पाटील या तुफान सेनेत कॅप्टनच्या हुद्दय़ावर होत्या. त्यांनी ग्रामीण महिलांना संघटित केले. या महिलांनी बंदुका चालविण्याचे शिक्षण घेतले. भूमिगतांना अन्न व स्फोटक साहित्य पोहोचविणे, प्रसंगी त्यांना आश्रय देऊन लपविणे, ही कामे त्या करीत. भूमिगतांना मदत केल्याबद्दल अनेकींना सहा महिन्यांपर्यंत शिक्षाही झाली. याच आरोपावरून सांगलीजवळच्या गावातील सीताबाई माळी व कोल्हापूरची काशीबाई हणबर आणि नागनाथ नायकवडींची आई यांचा पोलिसांनी अमानुष छळ केला. नाना पाटील यांच्या एका भाषणात ते म्हणाले होते की, ‘आमच्या आया-बहिणींनी प्राणांची बाजी लावून आम्हाला लपविले, जो भाकरतुकडा दिला, ती आमच्या चळवळीला मोठी देन होय. त्यांचे हे ऋण फार मोठे आहे.’ नानांचे हे विधान पत्री सरकारमधील स्त्रियांच्या कामाचे मोल कळायला पुरेसे आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण गोवा व मराठवाडा स्वतंत्र झाले नव्हते. हैदराबादच्या निजामाने दमनाचा कहर चालवला होता. हैदराबाद संस्थान स्वतंत्र करून भारतीय संघराज्यात सामील झाले पाहिजे, या मागणीसाठी जी चळवळ झाली, तोच हैदराबाद मुक्तीसंग्राम होय. मराठवाडा मुक्तीसंग्रामात ग्रामीण महिलांनी मोठे कार्य केले. मराठवाडा हा तसा मागासच भाग. तिथल्या समाजजीवनावर निजामी राज्यकर्त्यांची भाषा, राहणी व संस्कृतीचा थोडाफार परिणाम होताच. बायका तर घराचा उंबरठा ओलांडणेही कठीण. अशा परिस्थितीत तिथल्या स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्याकडून दारूगोळ्यांची ने-आण करणे, मुक्तीसंग्रामातील त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून देणे यासाठी श्री. रं. देशपांडे तथा एस. आर. गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या त्यांच्या कार्याबद्दल मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर त्यांना ‘मराठवाडय़ाचे कर्वे’ हा बहुमानाचा किताब मिळाला. मुक्तीसंग्रामात स्त्रियांच्या गटसभा घेणे, मिरवणुका काढणे, सत्याग्रहींची व्यवस्था करणे, बॉम्ब ठेवण्याच्या जागी टेहळणी करणे इत्यादी कामे त्यांनी केली. सेलूच्या गीताबाई चारठाणकर या सीमेवरून शस्त्रास्त्रे आणण्यात पटाईत होत्या. आशाताई वाघमारे याही भिंगरीसारख्या खेडय़ापाडय़ांत हिंडत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील कार्याबद्दल दगडाबाई देवराव पाटील धोपटेश्वरकर हिला ‘वीर महिला’ हा किताब मिळाला. ती होमगार्डच्या वेशात फिरे. ती जवळ जंबिया बाळगत असे. तिने खेडुत स्त्रियांचे संघटन केले. १५ ऑगस्ट १९४७ ला गावातल्या प्रत्येक घरावर तिने तिरंगा फडकवला होता. तिचे हे काम मराठवाडा स्वतंत्र होईतो सुरूच होते. त्यामुळे सरकारी अधिकारी हात धुऊन तिच्या मागे लागले. तिने सीमेवरच्या एका खेडय़ात स्थलांतर केले व तिथून तिने निजाम हद्दीत शिरून पोलीस चौक्या जाळणे, सरकारी जंगले जाळणे असे उद्योग करून निजाम सरकारला जेरीस आणले. लाडसवंगी येथे लोक व रझाकार यांच्यात लढाई जुंपली. रझाकारांनी  ६०-७० जणांना एका खोलीत अन्नपाण्याविना कोंडून ठेवले. दगडाबाईने गौळणीच्या वेशात रात्रीच्या वेळी लाडसवंगी ते औरंगाबाद हे २५ मैलांचे अंतर पायी चालून औरंगाबादच्या ठाण्यावर तक्रार नोंदविली. त्यानंतर सरकारी चक्रे फिरली व दोन-तीन तासांतच कैदी सुटले. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यात संसाराची अडचण होते म्हणून या स्त्रीने स्वत:च आपल्या नवऱ्याला दुसरा संसार थाटून दिला. या लढय़ात पुंजाबाई बुजरी, पोसनाबाई राजलिंग, गंगाबाई लक्ष्मण, बाळूबाई पानसरे, लक्ष्मीबाई मयेकर व गोदावरी रेळे या स्त्रिया हुतात्मा झाल्या.

अशा प्रकारे स्वातंत्र्यलढय़ात महाराष्ट्राप्रमाणेच देशभरातील ग्रामीण स्त्रियांनी सक्रिय सहभाग घेतला होता. इतिहासतज्ज्ञ आर. सी. मुजुमदार यांनी स्वातंत्र्यलढय़ातील स्त्रियांच्या सहभागावर फारसा प्रकाशझोत टाकलेला नाही. परंतु कुणी कौतुक केले नाही तरी इतिहास हा इतिहासच राहणार आहे. आज ना उद्या या स्त्रियांच्या कार्यावरही अभ्यासक संशोधन करतील अशी आशा आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या ज्ञात-अज्ञात स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांना प्रणाम!

ए पी जे अब्दुल कलाम, सौजन्य – लोकसत्ता

आज शिक्षकदिन! डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या या जन्मदिनी निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या शिक्षकांबद्दल लिहावे, यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. आश्चर्याचा पहिला धक्का दिला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी! त्यांनी चक्क दीड दिवसांत आपले उत्स्फूर्त व सविस्तर मनोगत पाठविले. युवापिढीला समर्थ राष्ट्राचे स्वप्न बघायला शिकविणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाने या पत्रातून त्यांच्या शिक्षकांच्या स्मृती तर जागवल्याच; त्याचबरोबर आजच्या शिक्षकांसाठी एक खास प्रतिज्ञाही लिहून पाठविली. आजच्या पुरवणीत विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांनी त्यांच्या शिक्षकांच्या सांगितलेल्या हृद्य आठवणी प्रसिद्ध करीत आहोत. देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना वंदन करण्याचा आमचा हा प्रयत्न शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरेल, यात शंकाच नाही.

—————————————————————————————————————-

माझे औपचारिक शिक्षण सुरू झाले १९३६ साली. मी तेव्हा पाच वर्षांचा होतो. रामेश्वरम पंचायत प्राथमिक शाळेत मुथू अय्यर यांनी मला पहिले पाठ दिले- साक्षरतेचे आणि सदाचाराचेही. त्या पहिल्या इयत्तेत मी चांगला अभ्यास केला म्हणून अय्यर सर चक्क माझ्या घरी आले होते आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना माझे कौतुक सांगितले. त्यामुळे माझ्या आईने माझ्यावर खूश होऊन चक्क माझ्या आवडीचा गोड पदार्थ बनवला आणि  मला खाऊ घातला होता! ते प्रोत्साहन तेव्हा मला किती मोलाचे वाटले होते! एके दिवशी मला ताप आला म्हणून मी शाळेत गेलो नव्हतो, तर अय्यर सर काळजीपोटी घरी विचारपूस करायला हजर. सर म्हणजे फक्त वर्गात शिकवत नाहीत, तर ते आपली काळजी घेतात, ही व्याख्या मनात ठसली. तेव्हा माझे हस्ताक्षर फारसे चांगले नव्हते. अय्यर सरांनी माझ्याकडून प्रयत्नपूर्वक ते सुधारून घेतले. ते सर स्वत: अतिशय सदाचारी होते आणि आमच्यात चांगल्या सवयी भिनाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असे, असे माझ्या वडिलांनी मला मोठेपणी आवर्जून सांगितल्याचे आठवते.

आठवीत मला इयादुराई सोलोमन नावाचे शिक्षक होते. त्यांनी फार महत्त्वाची शिकवण दिली- जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक ठरतात- ‘इच्छाशक्ती, श्रद्धा आणि आकांक्षा.’ जबर इच्छाशक्ती बाळगून, प्रयत्नांवर विश्वास ठेवून स्वप्नांचा पाठलाग केला, तर यश नक्की मिळतं हे रेव्हरंड सोलोमन सरांचे तत्त्वज्ञान. वर्गात अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांकडे ते विशेष लक्ष देत आणि त्यांची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी त्यांना प्रेरित करीत. मूल्याधारित शिक्षणाची कास धरणे आणि मुलांमध्ये प्रेरणा व आकांक्षा निर्माण करणे हे शिक्षकांचे महत्त्कार्य आहे. आजच्या शिक्षकांनी जर हे लक्षात ठेवले तर ते नक्कीच उत्तम पिढी घडवू शकतील.

मी त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हाला रेव्ह. फादर टी. एन. सिक्वेरा शेक्सपिअर शिकवत असत. आम्हाला वाटायचे जर खुद्द शेक्सपीअर त्यांच्या लेक्चरला बसला असता, तर त्यांचे ते रंगून जाऊन शिकवणे बघून सद्गदित झाला असता. सिक्वेरा सर आमच्या हॉस्टेलचे वॉर्डनही होते. रोज रात्री ते हॉस्टेलला फेरी मारायचे. एकदा माझा रूममेट सच्चिदानंदन आजारी होता. फादर सिक्वेरांनी त्याची आस्थेने विचारपूस केली. त्याला औषध दिले. डॉक्टरांकडे पाठवले आणि आमच्या एका मित्राच्या हातात कोरे आंतरदेशीय पत्र देत ते म्हणाले, ‘आधी त्याच्या वडिलांना पत्र पाठवून कळव बरं?’ कारण सच्चिदानंद त्याच्या वडिलांना अजिबात ख्यालीखुशाली कळवत नसे हे फादर सिक्वेरांना माहीत होते. फादर सिक्वेरा या पितृतुल्य व्यक्तीने आम्हाला जे प्रेम दिले, त्यातून आम्ही परोपकार शिकलो. हेच ‘फादर’ आम्हा मातृभाषेतून शालेय शिक्षण घेऊन कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळी खास इंग्रजी भाषेचा वर्ग घेत असत. त्यांनी आम्हाला इंग्रजी वाचनाची गोडी लावली.

न्युक्लिअर फिजिक्सचे प्रा. चिन्नादुराई यांचाही माझ्या जडणघडणीवर मोठा प्रभाव आहे. त्यांनी फक्त तो विषय शिकवला नाही, तर त्या विषयावरचे संदर्भग्रंथ व अभ्यासपूर्ण लेख वाचायला दिले. या विषयात मूलभूत संशोधन करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. आजही मी त्यांना भेटतो आणि पुन्हा पुन्हा नव्याने भारावला जातो.

प्रो. थोथात्री अय्यंगार हेही मला लाभलेले एक विलक्षण शिक्षक. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये ते आमचे गणिताचे प्राध्यापक म्हणजे चालताबोलता ज्ञानकोष होता. मला आठवते, त्यांनी एकदा आम्हाला भारतातील ‘प्राचीन गणिती आणि खगोलतज्ज्ञ’ या विषयावर लेक्चर दिले होते. आर्यभट्ट हे थोर गणिती होते तसेच खगोलतज्ज्ञही, हे त्यांनी आम्हाला सोदाहरण पटवून दिले होते. ते लेक्चर आजही माझ्या कानात घुमते आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचे गणित-विज्ञानातील योगदान किती मोठे होते, हा नवा दृष्टिकोन तेव्हा आम्हाला अय्यंगार सरांमुळे मिळाला होता.

मूल्यशिक्षणाला फाटा दिल्यास शिक्षण ही संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही. खरे तर शिक्षकांकडून मुलांपर्यंत स्वाभाविकपणे मूल्ये  झिरपली पाहिजेत. आमचे तर भाग्य की आम्हाला रेव्ह. फादर रेक्टर कलाथिल नावाचे खास शिक्षक होते. जे दर सोमवारी एक तास चक्क गोष्टी सांगायचे. गौतम बुद्ध, कॅल्क्युलस, सेंट ऑगस्टिन, म. गांधी, आईनस्टाईन, अब्राहम लिंकन अशा थोरांच्या गोष्टी ते सांगत. या व्यक्तींचे मोठेपण सांगताना माणसाने मोठे व्हायचे म्हणजे नेमके कोणते गुण अंगी बाणायचे, याची व्याख्या मनात ठसून गेली.

मी चेन्नईला एम.आय.टी. कॉलेजमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिकत असताना आम्हाला प्रो. श्रीनिवासन प्रोजेक्ट डिझायनिंग शिकवत. अख्ख्या टीमने मिळून विशिष्ट वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे कौशल्य आम्ही शिकावे हा त्यांचा कटाक्ष असे. हा गुण आम्हाला प्रत्येकाला आयुष्यभर उपयोगी ठरला.
या सर्व शिक्षकांकडून मला मोठे संचित मिळाले. त्यांच्यामुळे जीवनाला मूल्याधार मिळाला. कल्पनाशक्ती फुलवण्याची स्फूर्ती दिली. आत्मविश्वासाचे पंख दिले आणि स्वाभिमानाने स्वतंत्र विहार करण्याची ताकद दिली.

मनोहर साळवी, सौजन्य – लोकसत्ता

जागतिक महासत्ता म्हणून चीनचा उदय होण्यास आरंभ झाला १८ डिसेंबर १९७८ रोजी. चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांनी आणि विशेषत: डेंग जिआँग पिंग यांनी आर्थिक सुधारणा राबविण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत कणखरपणे अंमलातही आणला. गेल्या ३० वर्षांत चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ६८ पटींनी वाढ झाली असून परकीय व्यापारात १०५ पटींची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने वाढली आहे. तेव्हा चीनची लोकसंख्या ९६ कोटी ओलांडून गेली होती. आज ती जवळपास १३२ कोटी आहे. परंतु भारतातील लोकसंख्यावाढीचा वेग लक्षात घेता काही दशकातच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक झालेली असेल. दरम्यान चीनच्या लोकसंख्यावाढाची वार्षिक वेग १९७८ मधील १.२ टक्क्यांवरून आता अध्र्या टक्क्याच्या खाली गेला आहे.

आर्थिक सुधारणांचा अवलंब केल्यापासून गेल्या ३० वर्षांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी बीजिंग येथील ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते जमा झाले होते. त्यावेळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सर्वच आर्थिक आघाडय़ांवर चीनने नेत्रदीपक प्रगती केली आहे. (मानवी हक्क आणि प्रदूषण या मुद्दय़ांवर चीनचा कामगिरी आजही निराशाजनक आहे.)

गेल्या ३० वर्षांत चीनचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (सध्याच्या किंमतीनुसार) ३६४ अब्ज युऑनवरून जवळपास २५,००० अब्ज युऑनपर्यंत वाढले आहे. ही वाढ ६८ पट आहे. त्याचप्रमाणे परकीय व्यापार २१७० अब्ज युऑनवर गेला आहे. हा व्यापार १९७८ साली २०.६ अब्ज युऑन एवढाच होता. तेव्हा चीनमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण रोजगार दीड लाखांच्या आसपास होते. कारण त्या काळात देशात खासगी उद्योगांना परवानगी नव्हती. या घडीला चीनमधील रोजगार जवळपास १३० दशलक्ष झाले असून, त्यात खासगी उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे.

चीनमधील सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. नागरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दरडोई उत्पन्नात भर पडली आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार १९७८ साली सर्वसाधारणपणे चिनी परिवाराकडे सरासरी ३४३ युऑन मौजमजेसाठी शिल्लक राहत असत. आता ही रक्कम सुमारे १४ हजार युऑनच्या घरात गेली आहे. ही वाढ अंदाजे ४० टक्के आहे. तथापि ग्रामीण भागात मात्र ती ३१ टक्केच आहे. तेव्हाची १३४ युऑनची वार्षिक शिल्लक ग्रामीण चीनमध्ये आता चार हजार १४० युऑनपर्यंत वाढली आहे.

गृहनिर्माण क्षेत्रातही चीनने अशीच आघाडी घेतली आहे. चीनमध्ये त्या काळात अत्यंत चिमुकले गाळे असत आणि त्यात लोक दाटीवाटीने राहत असत. मात्र आजकाल मोठय़ा चीनमधील शहरांत मध्यम वर्गातील लोकही काहीसे ऐषारामात राहताना दिसतात. साधारण शहरी परिवारांकडे १९७८ मध्ये ७२ चौरस फूट (६.७ चौरस मीटर) जागा असे. नुकत्याच २००६ च्या आकडेवारीनुसार हे क्षेत्रफळ २९१ चौरस फूट (२७.१ चौरस मीटर) झाले आहे.
बौद्धिक प्रगतीबरोबरच चीनमधील लोकांचे आयुर्मान वाढत आहे. सर्वसाधारणपणे चिनी स्त्री ३० वर्षांपूर्वी ७३.३ वर्ष जगत असे. हे आयुर्मान २००० साली ७९.३ वर्षांपर्यंत वाढले आहे. पुरुषांच्या बाबतीत ते ६६.३ वरून ६९.३ वर्षांपर्यंत वाढले आहे. मात्र ही वाढ नेत्रदीपक मानण्यात येत नाही. याचे एक कारण म्हणजे आर्थिक सुधारणा अमलात येण्यापूर्वीही चीनमधील सार्वजनिक आरोग्यसेवा बऱ्यापैकी कार्यक्षम होती.

गेल्या ५० वर्षांत चीनच्या आर्थिक इतिहासातील काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेण्यासारखे आहेत. माओ त्से तुंग यांनी सुरू केलेल्या सांस्कृतिक क्रांतीमुळे १९६६-७६ या काळात चीनमध्ये गोंधळच गोंधळ होता. संमिश्र अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते डेंग जिआँग पिंग या काळात राजकीय अस्पृश्य होते. मात्र माओच्या निधनानंतरची चीनची सर्व सत्ता डेंग यांच्याकडे आली आणि देशाची प्रगती वेगाने सुरू झाली. त्याचा आरंभ १८ डिसेंबर १९७८ रोजी डेंग यांनी आर्थिक सुधारणा जाहीर करून केला. याचे दृश्य परिणाम म्हणजे १९८० साली चीनने सेझेंन हे पहिले वहिले विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन केले. डेंग यांच्या सुधारणांचा परिणाम काय होतो याचा अभ्यास करण्यासाठी आणि परकीय गुंतवणूकदार चीनच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी सेंझेनची स्थापना करण्यात आली होती. त्याचा लाभ पुढील दोन-तीन वर्षांतच दिसू लागला. चीनच्या प्रगतीचा वारू चौफेर धावू लागला आणि जगातील अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चीनचा बोलबाला सुरू झाला. चलन फुगवटा, भ्रष्टाचार आणि इतर आर्थिक व्याधींनी चीनला याच काळात घेरले.

मात्र या सुधारणांना राजकीय चेहरा नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी १९८९ साली तिआनमेन चौकात उठाव केला. हा उठाव निर्दयपणे चिरडून टाकण्यात आला. याबाबत जगभरातून झालेल्या टीकेचा चीनने बिलकुल प्रतिवाद केला नाही. कम्युनिस्टांनी १९६१ साली सत्ताग्रहण केल्यानंतर शांघायमधील स्टॉक एक्स्चेंज बंद करण्यात आले होते. त्याचे पुनरुज्जीवन १९९० च्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले आणि चीनच्या आर्थिक निर्धाराचे दर्शन जगाला घडले. त्या पाठोपाठ महिन्याभरात सेंझेन येथे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करण्यात आली. मात्र डेंग यांनी होणारा देशांतर्गत विरोध वाढतच चालला होता. तथापि त्यास धूप न घालता डेंग यांना १९९२ च्या वसंत ऋतूत सेंझेनचा दौरा केला. आर्थिक सुधारणांची आणि सेंझेनच्या कामगिरीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामध्ये या सुधारणांचा वेग आणि विस्तार यांच्यातही वाढ झाली.

चीनच्या अर्थव्यवस्थेची व्यापक फेररचना डेंग यांनी १९९० च्या मध्यावधीस सुरू केली. त्यामुळेच चीन आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित होऊ शकला. यातील एक महत्त्वाचे कलम म्हणजे तोटय़ात असणारे किंवा निष्क्रिय असणारे सरकारी उपक्रम बंद करणे. याचा परिणाम असा झाला की, चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीत हमखास मिळणारा रोजगार अनेकांच्या तोंडून हिरावून घेण्यात आला. मात्र त्याचवेळी स्पर्धेला उत्तेजन मिळाल्यामुळे रोजगारातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. डेंग यांचे निधन सप्टेंबर १९९७ मध्ये झाले. मात्र त्यांच्या अनुयायांनी सुधारणांचा हा कार्यक्रम आणखी जोरात राबविण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँग सुमारे १५० वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन जुलै १९९७ मध्ये चीनचा एक भाग झाले. मात्र त्याचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवून चीनने इतर क्षेत्रांत प्रगती चालूच ठेवली. त्याची परिणती म्हणजे २००८ सालचा ऑलिम्पिक सोहळा चीनमध्ये भरविण्यात आला. या वेळी चीनला भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे डोळे अक्षरश: दिपले.

गेल्या १० वर्षांत चीनने घेतलेले महत्त्वाचे निर्णय म्हणजे जागतिक व्यापारी संघटनेत सहभागी होणे, युऑन आणि अमेरिकी डॉलर यांचा संबंध समाप्त करणे आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये महाप्रचंड गुंतवणूक करणे. जागतिक व्यापार संघटनेत २००१ च्या अखेरीस चीनचा प्रवेश झाल्यानंतर चीनवर मुक्त जगातून होणारी टीका अतिशय सौम्य झाली. युऑन आणि डॉलर यांच्यातील नातेसंबंध संपल्यानंतर हळूहळू युऑन मजबूत होत गेला. आर्थिक कामगिरीच्या या सत्रातील कडी म्हणजे फेब्रुवारी २००६ मधील चीनची परकीय गंगाजळी जगात सर्वाधिक झाली. पहिल्या स्थानावर असलेल्या जपानला चीनने दुसऱ्या स्थानावर फेकले. जगातील ८३ टक्के बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले भावी प्रकल्प आशिया खंडात स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविल्यामुळे येणाऱ्या काळात भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. लोकसंख्येतील वाढ आणि बेरोजगारी या समस्यांचा विचार करता भारताने या स्पर्धेसाठी सक्षम होण्याकरिता आतापासूनच पावले उचलणे आवश्यक आहे.

भाई वैद्य, सौजन्य – सकाळ

शब्दांकन – प्रदीप कुलकर्णी

महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सुरू केलेल्या “सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र’ या मालिकेतील हा दुसरा भाग, महाराष्ट्राच्या राजकीय वळणांचा! मराठी माणसाने अनेक राजकीय लढाया पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत; पण सध्या मात्र तो राजकारणाबाबत उदासीन झाला आहे. राजकारणात सक्रियतेने काही करणे सोडा, तो मतदानही करेनासा झालाय. काय कारण असावे याचे, महाराष्ट्राच्या राजकारणाने आतापर्यंत कोणती वळणे पाहिली आहेत, त्यावर हा दृष्टिक्षेप.

—————————————————————————————————————–

रणभेरी आणि तुताऱ्यांच्या निनादात १ मे १९६० रोजी पहाटे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती राजभवनामध्ये जाहीर करण्यात आली. या महाराष्ट्रनिर्मितीचे स्वरूप आणि त्यातील नावाचा गोंधळ विलक्षण होता. आधी त्रिराज्य योजना; नंतर विशाल द्वैभाषिकाचा कारभार, पुढे मुंबई राज्य आणि अखेरीस महाराष्ट्र राज्य अशा तऱ्हेचे नामकरण निश्‍चित झाले. नाव मुंबई राज्य असावे, असा आग्रह पं. नेहरूंनी अखेरपर्यंत धरला होता; परंतु तो फार काळ टिकला नाही. मात्र, संयुक्त महाराष्ट्र हे नाव येणार नाही, याची मात्र पक्की खबरदारी घेण्यात आली. सकाळचा समारंभ आणि सायंकाळची शिवाजी पार्कवरील सभा ही बहुतांश सरकारी व काही प्रमाणात कॉंग्रेसपक्षीय झाली.

वास्तविक, ज्या नेत्यांनी गेली चार वर्षे संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीसाठी जिवाचे रान केले, त्यांच्यासहित हा कार्यक्रम झाला असता तर ते औचित्यपूर्ण ठरले असते. सकाळ व सायंकाळच्या सभेमध्ये हुतात्म्यांचे स्मरण करण्याचेही भान कोणाला राहिले नव्हते, ही गोष्ट मात्र खटकण्यासारखी होती. महाराष्ट्र राज्य झाले; परंतु सीमा भागाचा प्रश्‍न लटकतच राहिला, तो आजपावेतो. 

निर्मितीची उद्दिष्टे काय होती ?
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची उद्दिष्टे काय होती, हे या निमित्ताने समजावून घेणे उचित ठरेल. जुलै १९५७ मध्ये “संयुक्त महाराष्ट्र’चे सरचिटणीस एस. एम. जोशी यांनी समितीची घटना जाहीर केली. तीत जी उद्दिष्टे ग्रथित केली होती ती पुढीलप्रमाणे ः
१) मराठी भाषकांचे एकात्म सलग राज्य
२) लोकसत्ताक समाजवादी महाराष्ट्र
३) सामाजिक जीवनाची सहकारी तत्त्वावर फेररचना
मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी जी उद्दिष्टे सांगितली, ती काहीशी वेगळी होती. 
अ) मराठी बांधव एका राज्यात आणणे
ब) ग्रामीण विकासावर भर देणे
क) कृषी, वीज व छोटे उद्योग यांचा विकास करणे
ड) महाराष्ट्राचे औद्योगीकरण करणे 
समिती व सत्ताधारी कॉंग्रेस या दोहोंनी मिळून जी उद्दिष्टे मांडली, त्यांना विकासाचा मापदंड म्हणून मानता येईल. आपण कितपत यशस्वी झालो आहोत, हे त्याच्या निकषावरच ठरविता येईल, असे मला वाटते. 

सत्तेचे राजकारण दोन विभागांत
या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचा मागोवा घेताना महाराष्ट्रातील सरकार, विरोधी पक्ष व जनआंदोलने यांचा विचार करणे आवश्‍यक आहे. गेल्या ५० वर्षांत पुलोदची दोन वर्षे व युतीची पाच वर्षे सोडता, कॉंग्रेस पक्ष हाच सत्ताधारी होता; तेव्हा त्या पक्षाच्या अनुषंगाने अधिक सविस्तर विचार करणे योग्यच होईल. 

माझ्या मताने गेल्या ५० वर्षांतील सत्तेच्या राजकारणाची विभागणी दोन खंडांत करता येईल. १९८० पर्यंतचा वीस वर्षांचा एक विभाग आणि त्यानंतरचा दुसरा विभाग. पहिल्या वीस वर्षांत यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व शरद पवार हे दिग्गज नेते अधिकारावर होते. सहकाराच्या दृष्टीने हे तर सुवर्णयुगच मानले जाते. महाराष्ट्रनिर्मितीबरोबर यशवंतराव चव्हाणांनी कृषी-औद्योगिक विकासाची मांडणी केली. ही गोष्ट या अर्थाने विशेष मानली पाहिजे, की तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या डोळ्यांपुढे केवळ औद्योगिक विकासाची परिकल्पना प्रामुख्याने होती. वास्तविक या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. यशवंतरावांनी आपल्या संकल्पनेनुसार सहकारी साखर कारखाने आणि पंचायत राजनिर्मितीला विशेष प्राधान्य दिले. त्यामुळे ग्रामीण भागाचे रूप पालटले आणि ग्रामीण नेतृत्व धडाडीने पुढे आले. मात्र, भाटघर येथे आचारसंहितानिर्मितीसाठी जी बैठक झाली होती, तिचे निष्कर्ष मात्र त्यांनी मान्य केले नाहीत. हा राजकीय स्थित्यंतराचा काळ आहे, अशी सबब त्यांनी पुढे केली होती. 

कृषिविकासावर लक्ष केंद्रित
वसंतराव नाइकांनी, “महाराष्ट्र अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी जायला तयार आहे,’ अशी धडाडीची घोषणा करून कृषिविकासावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी संकरित बी-बियाण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या काळात १९७२ चा दुष्काळ गुदरला आणि पुढे त्यांनी पागेपुरस्कृत रोजगार हमी योजनेला चांगल्या तऱ्हेने चालना दिली. त्याआधारे शेतकरी वर्ग दुष्काळाचा मुकाबला करू शकला. त्यानंतर आलेल्या शंकरराव चव्हाणांनी सिंचन प्रकल्पावर विशेष भर दिला. १८ वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीनंतर दोन वर्षांची पुलोदची राजवट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १९७८ मध्ये स्थापन झाली. त्या काळात निहाल अहमद या रोजगार हमी मंत्र्याने सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांना रोजगार मिळवून दिला. पुलोद सरकारने सवलतीत शेतीपंपांची वीज, कापूस एकाधिकार योजना आणि सहकारी संस्थांना विशेष चालना यावर भर दिला. या २० वर्षांच्या कालखंडानंतर कृषी-औद्योगिक विकासाची कल्पना मागे पडू लागली. सिंचनावर कितीही भर दिला तरी महाराष्ट्राची सिंचन व्यवस्था १३-१४ टक्‍क्‍यांच्या आसपासच रेंगाळत आहे. सुमारे एक कोटी शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकरी कोरडवाहूच आहेत आणि कोरडवाहू असून, त्यांची विशेष दखल घेतली गेली, असे मात्र म्हणता येणार नाही. शंकरराव चव्हाण १९७५ ते १९७८ या काळात मुख्यमंत्री होते; परंतु त्यांचा काळ संजय गांधींची मनधरणी करण्यात आणि मिसाबंदी म्हणून कोणाला तुरुंगात टाकायचे, या विचारातच अधिक गेला. त्यानंतर दोन वर्षे पुलोदचे सरकार आले; परंतु १९८० च्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होताच त्यांनी ते सरकार बरखास्त केले आणि पहिल्या वीस वर्षांचा कालखंड संपला.

१९८० नंतर सहकारक्षेत्राची घसरण 
१९८० नंतर जी सरकारे दुसऱ्या कालखंडात आली, ती दुबळी, दिशाहीन, उद्योगपतींना साथ देणारी किंवा खाबू सरकारे ठरली. या काळात काही दिग्गज नेतेही मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले; परंतु केंद्र सरकारच्या बदलत्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर ते काही विशेष कामे करू शकले नाहीत. 
त्यातील वसंतदादा पाटलांनी विनाअनुदान तत्त्वाचा शिक्षणात पुरस्कार करून शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा केला. माजी शिक्षणमंत्री मधुकररराव चौधरी यांनी त्यांना भेटून परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शिक्षणासाठी कर्नाटकाकडे जाणारा खासगी पैसा आपल्याकडे का ओढायचा नाही, असाच प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. त्या काळात सहकार क्षेत्राची जी घसरण सुरू झाली, ती काही वसंतदादांना थोपविता आली नाही. परिणामी, त्यांनीच सुरू केलेला सांगलीचा कारखाना बंद पडलेला आज आपण पाहत आहोत. 

“महर्षीं’चा अस्त; “सम्राटां’चा उदय
१९९३ ते ९५ या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी उद्योगपतींना अधिकाधिक सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र, कृषी क्षेत्रात फलोद्यान प्रकल्पाला त्यांनी विशेष चालना दिली. या मोठ्या नेत्यांशिवाय जे अन्य नेते मुख्यमंत्रिपदी आले, त्यांची खुर्ची केंद्र सरकारच्या धोरणामुळे नेहमीच अस्थिर राहिली.

इंदिरा गांधी व त्यानंतरच्या सर्व कॉंग्रेसी नेत्यांची भूमिका अशी राहिली, की राज्यामध्ये कोणीही प्रबळ नेता बनता कामा नये. बॅ. अ. र. अंतुले यांच्या काळापासून राजरोस भ्रष्टाचाराला चालना मिळाली. त्यांच्या आधी मोरारजीभाई देसाई पंतप्रधानपदी असताना साखरेचे भाव दोन रुपयांपर्यंत खाली आणून त्यांनी शहरी नागरिकांना खूष केले. परिणामी, उसाचे क्षेत्र कमी झाले. साखर उत्पादन घटले आणि साखरधंद्यात “ऑन मनी’ घुसला. त्यातून सहकारमहर्षी संपुष्टात आले आणि साखरसम्राट उदयास आले. सहकार क्षेत्राला ग्रहण लागण्यास तेव्हापासून सुरवात झाली. वसंतदादांच्या विनाअनुदान तत्त्वामुळेही शिक्षणमहर्षी पडद्याआड गेले आणि तेथेही शिक्षणसम्राटांचे साम्राज्य निर्माण होऊ लागले. आज शिक्षण इतके महाग बनले आहे, की शिक्षण व्यवस्थेतून बहुजन समाजाचीच हकालपट्टी होऊ घातलेली आहे. अकरावीच्या प्रवेशाला दहा ते वीस हजारांपर्यंत आज सरसहा मागणी होऊ लागलेली आहे. 
६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडली गेली आणि सबंध देश जातिवादाच्या वावटळीत अडकला. रथयात्रेच्या सुमारास देशभर झालेल्या दंग्यांमधून हजारभर निरपराध व्यक्ती प्राणास मुकल्या. त्याचा सूड म्हणून दाऊद इब्राहिमने मार्च १९९३ मध्ये मुंबईत अनेक स्फोट घडविले आणि त्यात २५७ निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. त्याच्या आधीच मुंबईत झालेल्या जातीय दंग्यात ९५० नागरिकांची हत्या झाली. परिणामी, सुधाकरराव नाईक यांना जावे लागले आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले; परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर आली. 

मुंबईवर हल्ला – चौकशी समितीचे ताशेरे
विलासराव देशमुख हे दोनदा मुख्यमंत्री होते; परंतु त्यांना एकदा टंचाईग्रस्त राज्याला तोंड द्यावे लागले होते; तर दुसऱ्या वेळेला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करून १८१ लोकांचे बळी घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा मुकाबला पोलिसांनी मोठ्या शर्थीने केला व हौतात्म्यही पत्करले; मात्र दहशतवाद्यांच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांपुढे त्यांच्या जुनाट शस्त्रांचा टिकाव लागू शकला नाही. चौकशी समितीने याबद्दल सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. 

पायाभूत क्षेत्रातील स्थिती चिंताजनक
गेल्या ५० वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये काय घडले आणि त्या क्षेत्रात आज काय स्थिती आहे, हे पाहणे उद्‌बोधकच ठरेल. शेतीचा विचार करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्‍न अक्राळविक्राळ बनून आपल्यापुढे उभा राहतो. गेल्या १५ वर्षांत देशात एक लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 
त्यात ज्यांच्या नावावर सात-बारा नाही, अशी कुळे आणि स्त्रिया यांचा समावेश या यादीत नाहीच. कारण सात-बारात नाव नसेल तर तो शेतकरी कसला? भले तो पिढ्या न्‌ पिढ्या शेती करीत असेल तरीही सरकार त्याची दखल घेऊ शकत नाही. या आत्महत्यांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या थोडीथोडकी नाही. खुद्द पंतप्रधानांनाच धावत येऊन विदर्भासाठी “पॅकेज’ जाहीर करावे लागले. परंतु मृत्यूनंतरची आर्थिक मदत शेती सावरण्यासाठी कशी उपयोगी पडणार? महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रमाण, विजेचा तुटवडा, ग्रामीण भागातील दिवसेंदिवस चालणारे भारनियमन आणि कृष्णा खोऱ्यातील पाणी अडविण्याबाबत झालेली चालढकल या सर्व गोष्टी चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. 

सहकाराला भ्रष्टाचाराची कीड
भारतातील ४१५ एसईझेडपैकी जास्तीत जास्त एसईझेड महाराष्ट्रात असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. उद्योगधंद्यांसाठी शेतीची जमीन घेऊन मोबदल्यात पैसे देऊन भागणार आहे का? शेतमालकाशिवाय शेतीवर अवलंबून असलेल्या अन्य लोकांच्या पुनर्वसनाचा विचार सरकारने डोळ्यांआड केला आहे, हे विसरून चालणार नाही. सहकार क्षेत्रात एके काळी महाराष्ट्र आघाडीवर होता. शेतकऱ्यांची पहिली सहकारी संस्था १९ व्या शतकात महात्मा फुले यांनी पुरंदर तालुक्‍यात उभारली होती. आजही सहकारी संस्थांचे जाळे फार मोठे आहे. ती तर सत्ताकेंद्रे बनली आहेत; परंतु भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांची कीड या क्षेत्राला लागली आहे. सहकार क्षेत्रात आता सुरवातीच्या अध्यक्षांचा नातू सत्तेवर आलेला आहे. पंडित नेहरूंचा पणतू घराण्यामुळे सत्तेवर येतो, तर सहकार क्षेत्रात त्याचे अनुकरण करायला काय हरकत आहे, असा साळसूद विचार नेतेमंडळी करत असावीत. 

शिक्षण क्षेत्रातील स्थिती अशोभनीय
शिक्षणात “पीपीपी’ म्हणजे “सार्वजनिक-खासगी सहभाग’ हे तत्त्व धुमाकूळ घालत आहे. वास्तविक 
बहुसंख्य शिक्षण संस्था या खासगीच असतात; मात्र शासकीय अनुदानामुळे त्या सरकारी मानल्या जात असत; परंतु आता विनाअनुदान तत्त्वामुळे स्वच्छंदी व नफा कमावण्यास मुक्त अशा शिक्षण संस्थांचा अमाप बुजबुजाट सर्वत्र माजलेला आढळतो. महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महाराष्ट्रातही हे घडावे, यापरते दुर्दैव ते कोठले? केंद्र व राज्य सरकारे मिळून २००७-२००८ मध्ये शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.८४ टक्के केवळ खर्च करण्यात आला; परंतु त्याही पुढचा मुद्दा असा, की महाराष्ट्राने मात्र त्यांच्या राज्य उत्पन्नाच्या फक्त दोन टक्के खर्च शिक्षणावर केला आहे, ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच शोभणारी नाही. सुधाकरराव नाईक शिक्षणमंत्री असताना त्यांनी मुलींचे शिक्षण मोफत करण्याचे ठरविले, या विशेष गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करणे योग्य होईल. 

“कोवळी पानगळ’ची स्थिती आहे तशीच
आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकार राज्याच्या “सकल घरेलू उत्पन्ना’च्या केवळ एक टक्काच खर्च करीत आहे. राज्यात ४३ हजार ७११ गावे असून, प्राथमिक आरोग्यकेंद्रे मात्र १ हजार ८०९ आहेत, हे चित्र विचित्र आहे. आदिवासींच्या लाखो मुलांच्या कुपोषणाची आकडेवारी डॉ. अभय बंग यांनी “कोवळी पानगळ’ या अहवालात दिलेलीच आहे. त्यात अजून विशेष फरक झालेला नाही. डॉ. अभिजित वैद्य यांनी नुकतेच “अर्धपोटी कष्टकऱ्यांचा आवाज’ या नावाने आरोग्य सेनेचे सर्वेक्षण-अध्ययन प्रसिद्ध केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रोजगारावर असलेल्या व कुटुंबाचे सरासरी उत्पन्न ५ हजार ७८१ रुपये असलेल्या कुटुंबांना सुमारे ५० टक्के खर्च खाण्यावरच करावा लागतो. त्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की अशा रोजगार असलेल्या कुटुंबांपैकी २४ टक्के कष्टकरी हे कुपोषित आहेत. आश्‍चर्य याचे वाटते, की ही कुटुंबे सरकारच्या दारिद्य्ररेषेच्या व्याख्येत बसत नाहीत. 

रोजगाराची स्थिती दिवसेंदिवस बिकट
रोजगाराच्या क्षेत्रात ही गोष्ट उघड आहे, की बेरोजगारी वाढत आहे. फार मोठ्या प्रमाणावर मंदीच्या आधीपासूनच कामगारकपात सुरू आहे. मुंबईतील तीन लाख गिरणी कामगारांपैकी आता तेथे कोणी उरलेले नाही. ऍम्युनिशन फॅक्‍टरीमध्येही कामगारकपात सुरू आहे. औद्योगीकरण व कामगारकपात या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जोर धरीत आहेत. रोजगारापैकी ५६ टक्के रोजगार शेतीत आहे; परंतु तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. 

बचत गट –  अंतःप्रवाहातील मूक क्रांतीच
या काळ्या बाजूबरोबरच काही चांगल्या बाबींचाही आवर्जून उल्लेख करायला हवा.
महाराष्ट्रातील २८ हजार ९३५ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ४३ टक्के म्हणजे ७९ हजार ६१९ स्त्री-सदस्य आहेत आणि अल्पबचत गटांची महाराष्ट्रातील संख्या २ लाख २५ हजार ८५६ आहे. त्यांनी १ कोटी ७० लाख व्यक्तींना अल्प कर्जपुरवठा केलेला आहे. ही एक प्रकारची अंतःप्रवाहात चाललेली मूक क्रांतीच आहे. तिचे भविष्यात मोठे परिणाम होतील. मात्र, महाराष्ट्रातही एक हजार पुरुषांमागे केवळ ९०० स्त्रिया आहेत, ही विसंगती नजरेआड करता येणार नाही. 
विरोधी पक्ष काय करीत आहेत?

या सर्व परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष काय करीत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित करणे अत्यंत सयुक्तिक आहे. माझ्या मते, काही विरोधी पक्ष पुरोगामी आहेत, तर काही जातीयवादी आहेत. पुरोगामी विरोधी पक्षांमध्ये शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनता दल यांचा उल्लेख करावा लागेल. हे सर्व विरोधी पक्ष आज तरी संकटग्रस्त आहेत. फाटाफुटीने जराजर्जर झालेले आहेत. धनसत्ता, बाहुसत्ता व जाती-जमातवाद यांच्या प्राबल्यामुळे विचारधाराअधिष्ठित पक्षांचे महत्त्व कमी कमी होत आहे. जागतिकीकरणाचा हा एक राजकीय दुष्परिणाम आहे. १९७४ मध्ये पुणे विद्यापीठाने एक परिसंवाद घेतला होता. त्याचे संकलन “बदलत्या महाराष्ट्राचे स्वरूप’ या शीर्षकाखाली प्रा. मा. प. मंगुडकरांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात तत्कालीन कुलगुरू प्रा. राम जोशींनी, सध्या एकप्रभावी पक्षपद्धती आहे, असा निबंध मांडलेला आहे. सर्वच वक्‍त्यांनी विरोधी पक्षांच्या दुर्बलतेवर भाष्य केलेले आहे. प्रजा समाजवादी पक्ष तर जनता पक्षात विलीन झाला. शेतकरी कामगार पक्ष मार्क्‍सवाद व जातीयवादाच्या घेऱ्यात अडकला. कम्युनिस्टांमध्ये विभागणी होऊन मार्क्‍सवादी अलग झाले. डावा साहसवाद व उजवा सुधारणावाद या चर्चेतच कम्युनिस्ट अडकून पडले. जनता पक्षातून लोकदल व भाजप बाहेर पडल्यावर समाजवाद्यांनी बाहेर पडून फेरसंघटन करण्याऐवजी जनता पक्षाला समाजवादी रंग देण्याचा भ्रम बाळगला आणि अखेरीस हा पक्ष कॉंग्रेसी संस्कृतीतील देवेगौडांच्या हाती जाऊन क्षीण बनला. रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. जातिआधारित पक्ष वाढविण्याची कल्पना त्यांना मर्यादित करीत आहे. 

वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डॉ. राममनोहर लोहिया, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांना घेऊन व्यापक पक्ष स्थापन करायचा होता. त्यांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेत पक्ष बौद्ध धम्माधिष्ठित नव्हता; परंतु हे भान त्यांच्या वारसदारांना राहिले नाही. आता हे पक्ष आपापसांत आघाड्या करतात आणि नंतर त्या बिघडूनही जातात. भांडवलशाही व जातीयवाद यांच्या विरोधात तिसरी शक्ती उभी करण्यास हे पक्ष आज तरी अपयशी झालेले आहेत. 

जागतिकीकरण व जमातवाद या दोन अक्राळविक्राळ शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी पॅंथर ते नक्षलवादी अशी व्यापक आघाडी करण्याशिवाय काही पर्याय आहे, असे मला तरी दिसत नाही. 

पक्षांबरोबर जनसंघटनाही महत्त्वाच्या 
जातिवादी पक्षांमध्ये पूर्वीचा जनसंघ व आताचा भारतीय जनता पक्ष, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा उल्लेख करावा लागेल. जातिवादी पक्षांच्या राजकारणाला पाच वर्षांतच लोक कंटाळले. द्वेषाधारित राजकारण हा त्यांच्या आचारातील-विचारांतील गाभा आहे.

“बुद्ध व गांधी यांनी भारत स्त्रैण (बायकी) केला,’ असे म्हणणारे विरोधी पक्ष तद्दन हिंसावादी आहेत. त्याची मांडणी संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी आणि त्यापूर्व गोळवलकर गुरुजींनी करून ठेवलेलीच आहे; परंतु पुरोगामी विरोधी पक्षांत फाटाफूट झाल्यामुळे जे क्षेत्र रिकामे झाले, त्यात शिरकाव करणे, या पक्षांना सहज शक्‍य झाले. मात्र, भारतीय जनता त्यांचे स्वरूप आता समजू लागली आहे, असे दिसते. 

सत्ताधारी, विरोधी पक्ष यांच्या बरोबरच जनसंघटनांचे महत्त्व फार मोठे आहे. त्यातील कामगार संघटनांचे क्षेत्र विशाल आहे. परंतु विविध राजकीय पक्षांनी आपापल्या कामगार संघटनांच्या राहुट्या स्वतंत्र ठेवल्यामुळे कामगारशक्ती एकवटली जात नाही. कामगारांना संरक्षण देणारे बहुतेक सर्व कायदे विविध सरकारांनी पातळ केल्यामुळे कामगारांची शक्ती क्षीण झाली आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची त्यांची शक्तीही कमकुवत झाली आहे. सध्याचे वातावरण पाहून न्यायालयेही संपाला विरोध करीत आहेत. संघटित कामगारांची ही स्थिती; तर त्यांच्यापेक्षाही बारा पटींनी अधिक असलेल्या ३७ कोटी असंघटित कष्टकऱ्यांची काय अवस्था असेल? पेन्शन, विमा व वेतनसंरक्षण यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली असंघटित कष्टकरी आवाज उठवीत आहेत; परंतु सरकार तिकडे दुर्लक्ष करीत आहे. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली देशातील शंभर जनसंघटनांनी राष्ट्रीय जनसंघटनांचा (छअझच )समन्वय निर्माण केला. या समन्वयाने विकासाच्या संकल्पनेपुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले. मोठे कारखाने, मोठी धरणे, आर्थिक विकास दरवाढ म्हणजेच विकास का, हा प्रश्‍न त्यांनी समाजापुढे ठेवला; परंतु देशातील विचारवंत, सार्वजनिक माध्यमे आणि प्रमुख नेते त्या विषयाला पुरेशी चालना देत नाहीत. सरकार तर “उद्योगधंदे हेच विकासाचे इंजिन’ असे मानून आपली पाश्‍चात्त्य विकास संकल्पना भारतीय समाजावर लादत आहे. देशात हजारो जनसंघटना आहेत; परंतु त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यांच्यामध्ये राजकारणाची जी घृणा निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीची संकल्पनाही अधांतरी ठरत आहे. त्यांनी आपापसात समन्वय साधून पर्यायी राजकीय शक्ती उभी केली, तर ते खचितच परिणामकारक ठरतील.

स्वप्नांचा ताळेबंद मांडण्याची वेळ

या सर्व राजकीय आढाव्यानंतर प्रश्‍न उरतो, तो म्हणजे महाराष्ट्राचे स्वप्न काय होते आणि आज वास्तव काय आहे, हा.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू एस. एम. जोशी सर्वत्र सांगत असत, की “”समाजवादाचा पाळणा देशात प्रथम महाराष्ट्रात हलणार.” जाती-धर्म-भाषा यांना छेद देऊन जनतेची ही चळवळ उभी राहिली. एकात्म राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान केले. आंध्रप्रमाणे हिंसाचाराचे थैमान न मांडता अत्यंत शांततेच्या मार्गाने, व भाषिक द्वेषभावनेला थारा न देता अभूतपूर्व रीतीने जनतेने लढा दिला. त्या वेळी जनतेच्या डोळ्यांपुढे जी स्वप्ने होती, ती वास्तवात आलीत की नाही, किती आलीत आणि किती राहिलीत, याचा ताळेबंद मांडण्याची वेळ आता आलेली आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी हा ताळेबंद पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला भरवसा आहे. 
– भाई वैद्य 

पांडुरंगशास्त्री आठवले, सौजन्य – म टा

।। श्रीयोगेश्वरोविजयतेतराम्।।

आज धर्म शब्द उच्चारला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर हिंदु , ख्रिश्चन ,पारशी , मुस्लिम अशी नावे येतात. त्यानंतरविचार येतो तो प्रत्येक धर्मानी सांगितलेल्या धामिर्क कर्मकाडांचा. प्रत्येक धर्म एक धामिर्क शिस्त सांगतो. या कर्मकांडांचे स्वरूप आज रुक्ष , अर्थहीन होत आहे. त्यामुळे सुशिक्षित लोक या कर्मकांडांना कंटाळले आहेत. त्यांना ही कर्मकांडे नको आहेत.

दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने अनंत भेद उभे राहिले आहेत. ते अगदी विकोपाला गेले आहेत. ज्या धर्माने विषमता काढायची तोच धर्म विषमता उभी करताना दिसतो आहे.

तसेच धर्म फक्त विविध चमत्कार , भीती आणि रुढीग्रस्ततेत अडकून पडला आहे. असा धर्म आमच्या दैनंदिन जीवनात काहीच परिणाम करताना दिसत नाही. या उलट समाज जीवन धर्मामुळे उध्वस्त होताना दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून धर्म शब्दाचाच आज ऊबग आला आहे.

धर्मामधून बुद्धिप्रामाण्य निघून गेलं. अर्थहीन गोष्टी करणे म्हणजे धर्माने वागणे असं स्वरूप आलं. राणा प्रतापने प्रतिज्ञा केली होती की , जोपर्यंत मायभूमीला स्वतंत्र करीत नाही तोपर्यंत गवतावर झोपेन आणि पानाच्या पत्रावळीवर भोजन होईल. त्यानंतर आजचे राजपूतही तो धर्म पाळतात. ते काय करतात ? कापसाच्या मऊ गादीवर झोपतात पण गादीखाली गवत ठेवतात. चांदीच्या ताटात जेवतात पण त्या ताटाखाली पत्रावळ ठेवतात. हे केलं की ते स्वत:ला धामिर्क समजतात एरवी जीवनभर लाचारी करतील पण हे केलं की धर्म पाळला. अशी ही कृति अर्थहीन झाली. शिवाजी महाराज जेव्हा आग््याहून निसटले तेव्हा औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगांवर ठपका ठेवला होता. तुम्ही आणि शिवाजी एकाच जातीचे असल्यामुळे निसटून जायला तुम्हीच त्यांना मदत केली असा आरोप ठेवला. त्यावेळी भर दरबारात मिर्झाराजांनी सांगितले की मी माझे कुलदैवत एकलिंगजीची शपथ घेऊन सांगतो की , हे मी केलेलं नाही. तुम्ही फर्मावित असाल तर अजूनही त्याला पकडून आणतो. माझ्या मुलासाठी शिवाजीच्या मुलीची मागणी करतो. लग्नासाठी त्याला घरी बोलावतो व दगा देऊन त्याला पकडतो. 

पण जर कोणी या मिर्झाराजेंना त्यावेळी सांगितले असते की , असे केल्याने तुमच्या हातून फार मोठा अधर्म होत आहे. तुम्ही अधामिर्क आहांत , तर त्यंानी तात्काळ सांगितले असते की मी आणि अधर्म ? हे शक्यच नाही. ही माझी शेंडी पहा. शास्त्रात जेवढी लांब ठेवायला सांगितली आहे तेवढी मी ठेवली आहे. मी दर सोमवारी शंकराला अभिषेक करतो मग मी अधामिर्क कसा ?

खऱ्या अर्थानी जो अधर्म आहे तोच धर्माच्या नावानी प्रतिष्ठा पावला. बुद्धिप्रामाण्य निघून गेले. त्यामुळे धर्मात वहीम घुसला. काही चतुर लोक त्याचा उपयोग करून धर्माच्या नावाने भीती उभी करू लागले आणि त्यावर आपली उपजीविकाही चालवू लागले. तुम्ही एकादशी केली , उपास केला की धामिर्क व एखादा उपास करत नसेल तर त्याला अधामिर्क समजू लागले.

एकादशी करणारा काय करतो ? तर रोजच्या पोळी-भाजी ऐवजी साबुदाणा खातो. साबुदाण्यात पोळीपेक्षा कोणते जास्त आध्यात्मिक मूल्य आहे ? असा उपवास , एकादशी का करायची ? हे मूळ मुद्देच माणूस विसरला. तथाकथित धामिर्क लोकही हे असे का हे समजावून देत नाहीत. बुद्धिमान लोकांना तर याबाबतीत विचार करायलाच वेळ नाही. त्यांना धर्म च नकोसा झाला आहे. कोणाला राष्ट्राभिमानी म्हटले तर आनंद होतो. समाजवादी म्हटले तर , गौरव वाटतो पण धामिर्क म्हटले की तोंड वाकडं करतो. आज दुजाभाव-परकेपणा म्हणजेच धर्म. धर्माच्या बाबतीत बुद्धी चालवायचीच नाही असं जणूं ठरवूनच टाकलं आहे. आजच्या तरुणांचे प्रश्न आहेत मूतीर्ची पूजा का करायची ? देवाची स्तुति का करायची ? भक्ती कशाला ? एकादशी कशासाठी ?साबुदाण्याला आध्यात्मिक मूल्य असेल तर तांदळाला का नाही ? याची उत्तरे कोणी देईल काय ?कोणीच ती उत्तरे देत नाही. यामुळे धर्म रुढीग्रस्त झाला आहे. फक्त शेंडी , जानवं , टिळे , टोपी ,गंध आणि माळा म्हणजेच धर्म , एवढाच धर्म राहिला. मग प्रश्न येतो असा धर्म काय कामाचा ?असा धर्म का टाकून देऊ नये ?

परंतु त्यापुढे एक प्रश्न आहे. की , धर्म टिकला कसा ? धर्मामध्ये एक जबरदस्त शक्ती आहे. ती अतुलनीय आहे. युरोपमध्ये बघितले तर ज्युलियस सीझर , ऑगस्टस् सीझर असे कित्येक प्रभावीराजे होऊन गेले. त्यांची नावे पुसली गेली. त्यांचे कायदे पण राहिले नाहीत. पण मोडका-तोडका रोमन कॅथलिक धर्म अजून टिकला आहे.

आपल्या देशातही हर्ष-चंदगुप्तासारखे पुष्कळ राजे होऊन गेले. त्यांना लोक विसरले पण श्रावणी सोमवार अजून शिल्लक आहे. मोडका तुटका असेल पण आहे. धर्मसत्ता अजून टिकून आहे आणि ती मानवी मनावर अधिराज्य करत आहे. विश्वावर राज्य करणारी ही शक्ती एवढी प्रभावी असेल तर त्या शक्तीचा विचार करावा लागले. ऋषिंनी धर्म का सांगितला हे मागे जाऊन पहावे लागेल.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

इतिहास म्हणजे अर्थातच भूतकाळ! स्मृतीशिवाय भूतकाळ आठवणे अशक्य. म्हणजेच स्मृती नसेल तर इतिहास उरणार नाही. इतिहासाचे भान नसेल तर भविष्यकाळाचेही भान येणार नाही. इतिहासाचा अभ्यास म्हणजे भूतकाळात रममाण होणे नव्हे; परंतु हेही खरे की इतिहासातील काळाशी आणि व्यक्तींशी एकरूप झाल्याशिवाय घटनांचा अर्थ आणि अन्वयार्थ लागणार नाही. कधी कधी भूत मानगुटीवर बसते, तसा कधी कधी इतिहासही समाजाच्या मानगुटीवर बसतो. फरक इतकाच, की ‘भूत’ ही कल्पना आहे. भुताचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही. इतिहासाचे मात्र सज्जड पुरावे असतात. तरीही इतिहासाचा अर्थ लावतानाच त्यातून अनर्थ तयार होतात आणि त्या अनर्थाचेच रूपकात्मक भूत समाजाला झपाटून टाकते.

सध्या जगातील बऱ्याच समाजांना अशा ऐतिहासिक अनर्थाच्या भुतांनी झपाटलेले आहे. इतके, की त्या भुतांनी भविष्यालाही आपल्या तावडीतून सोडलेले नाही. श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी तामिळ वाघांचा सर्वेसर्वा प्रभाकरन ठार मारला गेला. प्रभाकरनने श्रीलंकेतील तामिळ लोकांना संघटित करताना फक्त त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभे केले नव्हते. त्याला हवा होता स्वतंत्र तामिळ इलम- स्वतंत्र तामिळ राज्य! तेही श्रीलंकेची फाळणी करून! त्यासाठी त्याला आधार होता तामिळ भाषा, तामिळ संस्कृती, तामिळ जीवनशैली आणि तामिळ इतिहास यांचा! तो गौरवशाली तामिळ इतिहास त्याला पुन्हा साकारायचा होता. प्रभाकरनने पुकारलेल्या यादवीत एक लाखांहून अधिक लोक मारले गेले. माणसांना ठार मारण्यासाठी त्याने वापरलेली साधने कमालीची निर्घृण होती. आपली दहशत पसरविण्यासाठी ‘मानवी बॉम्ब’ करण्याची हिंस्र कल्पना त्याचीच! तामिळ इतिहास व भाषा-संस्कृतीने प्रेरित झालेली तरुण व तरुणींची एक फौजच त्याने बांधली होती. ते सर्वजण कमरेभोवती स्फोटके बांधून स्वत:सकट कुणालाही ठार मारायला तयार होते. त्यांची समर्पणाची आणि प्रभाकरनवरील निष्ठेची परिसीमा इतकी, की आता कोण मानवी बॉम्ब होऊन आत्मसमर्पण करणार, याबद्दल त्यांच्यात चुरस असे. अखेर चिठ्ठय़ा टाकून मानवी बॉम्ब निवडला जाई. राजीव गांधींची हत्या करायला तयार झालेल्या तरुण-तरुणींमध्ये अशी चुरस लागली होती.

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांतही मुख्यत: तेथील समाजांच्या मानगुटीवर बसला आहे तो इतिहासच! किंबहुना इस्रायल या राष्ट्राची स्थापनाच काही हजार वर्षांपूर्वीचे दाखले देऊन केली गेली. मात्र ती स्थापना झाली ती हिटलरशाहीच्या विध्वंसक पाश्र्वभूमीवर! खुद्द अ‍ॅडॉल्फ हिटलरलाही इतिहासानेच झपाटलेले होते. आर्य वंश- जर्मन समाज हेच जगातील सर्वश्रेष्ठ असून त्यांच्या त्या अबाधित स्थानाला ज्यू आव्हान देतात आणि ज्यू समाज, त्यांचा धर्म, त्यांची जीवनशैली, त्यांचा वंश समूळ नष्ट केल्याशिवाय जगाचे शुद्धीकरण होणार नाही, या नाझी विचारावर लक्षावधी जर्मनांचे सैन्य उभे केले गेले. त्या ‘ऐतिहासिक’ अभिमानाच्या व अस्मितेच्या पुनस्र्थापनेसाठी जे युद्ध झाले, त्यात सुमारे सहा कोटी लोक ठार झाले. रशिया, जर्मनी बेचिराख झाले आणि अवघे जग विनाशाच्या छायेत आले. हिटलरला अण्वस्त्रे बनवायची होती. नाझी शास्त्रज्ञांचे एक पथक त्यावर काम करीत होते. जर अमेरिकेच्या अगोदर हिटलरच्या हातात अणुबॉम्ब आला असता तर बहुतांश जग अणुसंहारात नष्ट झाले असते.

हिटलरने ६० लाख ज्यू मारले- जाळून, गॅस चेंबरमध्ये गुदमरवून, उपासमार घडवून, थेट कत्तल करून आणि अनन्वित छळ करून! या हत्याकांडासाठी त्याने जी माणसे तयार केली, म्हणजे प्रथम ज्या माणसांची मनेच त्याने बधिर केली, त्याचा आधार ‘इतिहास’ हाच होता. जर्मनी त्याला पुन्हा ‘सन्माना’ने उभा करायचा होता आणि तो सन्मान प्राप्त करण्याचा मार्ग तशा संहारातून येतो असे त्याचे मत होते.

खरे तर ज्या ज्यूंनी- म्हणजे ज्यू समाजाने- तो छळ सहन केला त्यांनी तशा अमानुषतेच्या विरोधात एक विश्वव्यापी मानवतावादी चळवळ उभी करायला हवी होती. प्रत्यक्षात ‘झायोनिस्ट’ ज्यूंनी त्या नाझी सूत्रालाच अनुसरून पॅलेस्टिनी लोकांच्या विरोधात, त्यांच्याच भूमीतून त्यांना हुसकावून लावून, पुन्हा जग विध्वंसाच्या उंबरठय़ावर आणले. आता त्या इस्रायलला नष्ट करण्यासाठी बिन लादेन, अल काईदा, तालिबान, इराण हे सिद्ध झाले आहेत. इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत. इराककडे नाहीत. परंतु इराणचा अणुऊर्जा प्रकल्प हा बॉम्ब बनविण्यासाठीच आहे, हे गृहीत धरून इराणवर हल्ला करायची तयारी इस्रायल करतो आहे. पुन्हा इराण आवाहन करीत आहे ते इतिहासालाच! तालिबानी टोळय़ाही त्यांच्या ‘धर्मा’ला म्हणजे इतिहासालाच जुंपत आहेत. जगातील बहुसंख्य मुस्लिम तालिबानांच्या विरोधात आहेत, पण आता तेच त्यांच्या दहशतीखाली आहेत.

तालिबानांच्या नसानसांत आता तोच ‘हिटलर’ आहे, जो प्रभाकरनच्या संघटनेत होता आणि ‘झायोनिस्ट’ सैन्यात आहे. बुरुंडी आणि रवांडा येथे झालेल्या दोन जमातींच्या यादवीत सुमारे १२ लाख लोक ठार मारले गेले- लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यासहित! ही कत्तल कुऱ्हाडी-तलवारी-भाल्यांनी झाली. जेव्हा जेव्हा या कत्तलकांडाचा ‘स्मृति’दिन येतो, तेव्हा तेव्हा त्या देशात वातावरण तंग होते! त्या स्मृती पुन्हा जाग्या होऊन आणखी एकदा तशा यादवीला सुरुवात होईल अशी धास्ती तेथे असते. म्हणूनच एका इतिहासकाराने काही वर्षांपूर्वी असे सुचविले की, ‘असे सर्व स्मृतिदिन कायमचे बंदच का करू नयेत? काय साधतो आपण त्या स्मृतिदिनांच्या सोहळय़ातून? विस्मृतीत जात असलेली सुडाची भावना आपण त्यातून चेतवत तर नाही? जिवंत राहण्यातला, सहजीवनातला आनंद उपभोगण्याऐवजी आपण अस्मितेच्या नावाखाली सामूहिक मृत्यूला का कवटाळतो? ज्याला आपण राष्ट्राची, संस्कृतीची, धर्माची अस्मिता म्हणतो आणि अभिमानाने तिचे ‘रक्षण’ करायला जातो, त्या अभिमानातच असते अवास्तव श्रेष्ठत्वाची भावना. इतर सर्व संस्कृतींबद्दल तुच्छता. इतर सर्व माणसांबद्दल शत्रुत्व. म्हणजेच आपल्याला ‘संस्कृती’ या संकल्पनेचाच अर्थ कळत नाही. अवघ्या मानवी जीवनाचाच नव्हे तर अवघ्या सृष्टीचा, प्रज्ञेच्या माध्यमातून झालेला आविष्कार म्हणजे संस्कृती- मग त्यात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना असेलच कशी?’ हे विचार प्रसृत झाल्यानंतर त्या इतिहासकारावरच टीका सुरू झाली. ‘इतिहासच पुसून टाकायला निघाला इतिहासकार’ अशा शब्दांनी त्यांची संभावना केली गेली.

जोपर्यंत इतिहासाची ही प्रचलित संकल्पना आणि ‘अस्मिता’ नव्हती, तोपर्यंत ‘इतिहास’ होता, पण त्याचा हा हिंस्र आविष्कार नव्हता. मग ही इतिहासपद्धती कधी रूढ झाली? आपल्या परंपरांबद्दलचा अनाठायी गर्व आणि इतर सर्व परंपरांबद्दल तुच्छता व विद्वेष कशातून आला? आणि कधीपासून? रामायण-महाभारत असो वा ख्रिस्तपूर्व काळातील रोमन साम्राज्य असो, सत्यातला असो वा महाकाव्यातला असो- पण अभिमानाचा मुद्दा वा अस्मितेचा संस्कार हा हिंसेतूनच व्यक्त होताना दिसतो. म्हणूनच गांधीजी म्हणत असत, की आपण जर त्या इतिहासातून खरंच काही शिकत असू तर तो अहिंसेचाच मुद्दा शिकायला हवा. नाही तर आपल्यात मानसिक प्रगती काहीच झालेली नाही, असे म्हणावे लागेल. उत्क्रांती प्रक्रियेत ‘माणूस’ हा (जवळजवळ) शेवटचा टप्पा मानला तर यापुढची प्रगल्भावस्था ही मानसिकच असणार आणि ती मानसिक उत्क्रांती निसर्गक्रमात होणार नाही; तर आपल्याला जाणीवपूर्वक साध्य करावी लागणार, अशा अर्थाचे निरूपण श्री अरविंदो यांनी दिले.

जर पृथ्वी हा आपल्या परिचयातला एकमेव ग्रह असा असेल, की जेथे जीवसृष्टी आणि प्रज्ञासंपन्न माणूस आहे, तर आपल्याला वेगवेगळे देश असूच शकत नाहीत. पृथ्वी हाच ‘देश’ आणि सर्व मानवी संस्कृती, त्यातील असंख्य वैविध्यांसहित, हा एकच धर्म या अर्थाचे प्रतिपादन बकमिन्स्टर फुलर यांनी दिले. विनोबांची ‘जय जगत’ ही घोषणाही त्याच विचाराची! आता विज्ञान अशा निष्कर्षांला येत आहे, की माणसाची स्मृती ही साधारणपणे ५० हजार वर्षांची आहे. गर्भाशयात असतानाच तो जीव आपल्याबरोबर त्यापूर्वीच्या इतक्या वर्षांचा ‘इतिहास’ बरोबर घेऊन येत असतो. पण त्याच्या ‘कॉन्शियसनेस’मध्ये येणारा हा इतिहास आणि तो जीव माणूसरूपाने जन्माला आल्यावर कुटुंब, समाज, परिसर, भाषा इ.मार्फत प्राप्त करणारा इतिहास यात फरक आहे. त्या मानवी जिवाच्या ‘कॉन्शियसनेस’मध्ये म्हणजे, र्सवकष जाणिवा- संवेदनांमध्ये, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, भाषाप्रेम, अभिमान, अस्मिता, विद्वेष, विखार या गोष्टी असत नाहीत, कारण त्या ‘अ‍ॅक्वायर्ड मेमरी’चा म्हणजे जन्मोत्तर संपादन केलेल्या स्मृतींचा भाग आहेत. म्हणून जे. कृष्णमूर्तीनी आणखीनच मूलभूत प्रश्न उपस्थित केला. जाणिवा व संवेदना तरल आणि तत्पर ठेवूनही आपल्याला ‘अ‍ॅक्वायर्ड मेमरी’तून मुक्त होता येईल का? त्या मुक्तीचा प्रयत्न करताना ५० हजार वर्षांचा ‘कॉन्शियसनेस’ तितक्याच जाणिवेने जपता येईल का? म्हणजेच त्याच ‘कॉन्शियसनेस स्ट्रीम्स’मधून पोहत पोहत, मागे जात जात, तो सर्व स्मृतिपट, त्यात गुंतून न पडता, आपल्यासमोर साकार करता येईल का?

थोडक्यात, इतिहास तसाच ठेवून त्याने निर्माण केलेल्या अस्मिता- अभिमानापासून स्वत:ला मुक्त कसे करायचे? नेमक्या या टप्प्यापर्यंत आता मानवी सिव्हिलायझेशन आले आहे. म्हणूनच १९८९ साली फ्रॅन्सिस फुकुयामाने ‘द एन्ड ऑफ हिस्टरी’ हा प्रबंध सादर केला. त्याच्यावर प्रचंड वादळ उठले. ‘इतिहास संपेल कसा?’ असा प्रश्न इतर इतिहासकारांनी विचारला. फुकुयामा यांच्या मते आता यापुढचा इतिहास हा फक्त विचारांचा राहील. देश-राष्ट्रवाद, धर्मवाद, विचारसरणी, भौगोलिकता, संस्कृती हे मुद्दे कालबाहय़ ठरतील. म्हणजेच ज्याला आपण ‘हिस्टरी’ म्हणून संबोधत होतो तो इतिहास संपेल. फुकुयामा यांनी तो सिद्धान्त मांडला तेव्हा इस्रायल-पॅलेस्टिनपासून काश्मीपर्यंत आणि क्यूबापासून चीन-जपानपर्यंत सगळीकडे उदारमतवादी लोकशाही प्रस्थापित होत होती. बर्लिनची भिंत पडून समाजवादाचे चिरेबंदी राजवाडे बाजारपेठांमुळे पोखरले जात होते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचाराने व आदर्शाने भारलेले समाज हे समूहवादाच्या, हुकूमशाहीच्या, एकाधिकारशाहीच्या विरोधात उभे राहिले होते. हिटलरचे नाझीपर्व १९४५ साली संपले. चीनचे माओपर्व १९८९च्या मे मध्ये तिआनमेन चौकात अस्तंगत झाले. पूर्व युरोपातील रशियाप्रणीत राजवटी कोसळू लागल्या. दोन वर्षांनी, १९९१ साली सोव्हिएत युनियनच विलयाला गेला. आता निर्माण होणार ती उदारमतवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, मुक्त अर्थव्यवस्था मानणारी जागतिक समाजव्यवस्था!

फुकुयामा यांचा तो ‘युटोपिया’ ऊर्फ स्वप्नवत समाज होता. परंतु १९८९-९१ ते २००९ या सुमारे २० वर्षांच्या काळातील ‘इतिहासा’नेच फुकुयामा यांना उत्तर दिले. या काळातच अल काईदा व तालिबानने जगभर थैमान घातले. एका पाठोपाठ एक देश अण्वस्त्रे संपादन करण्याची स्वप्ने पाहू लागला. अण्वस्त्र हे अस्मितेचे प्रतीक बनले. आता तर तालिबानांना पाकिस्तानमधील अण्वस्त्रांवर कब्जा हवा आहे. तसा तो होऊ नये म्हणून अमेरिका त्या अण्वस्त्रांना नामशेष करण्यासाठी सिद्ध होत आहे. प्रत्येक देश आपल्या संस्कृतीचे व इतिहासाचे रक्षण करण्यासाठी आता अण्वस्त्रे निर्माण करू पाहात आहे. म्हणजेच इतिहासाला जपण्यासाठी आता भविष्याचा विध्वंस करण्याची तयारी सुरू आहे!

आचार्य अत्रे

बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.

आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय.

महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते.

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते.

यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता.

अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.

आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता.

शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता. भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते.

आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते.

महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वता त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनांत निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटि मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रानीं आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.