Archive for डिसेंबर, 2009

एक नवा संघर्ष

अब्दुल कादर मुकादम, सौजन्य – लोकसत्ता

शरीयत कोर्ट नावाचा कसलाही प्रकार अस्तित्वात नसताना शरीयत अपरिवर्तनीय आहे असा भ्रामक युक्तिवाद करणारे एकप्रकारे भ्रामक भूमिका घेऊन समाजाची दिशाभूलच करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी घाटकोपर, चिराग नगर येथे एका चौदा वर्षीय मुस्लिम मुलीचा लग्न सोहळा चालू होता. थोडय़ा वेळाने पोलीस आले आणि त्यांनी तो सोहळा थांबवला व दोन्ही पक्षांना घाटकोपर पोलीस स्टेशनात यावयास सांगितले. मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे हे लग्न बेकायदेशीर ठरते अशी तक्रार मुलीच्या एका नातेवाईकाने केल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून ते लग्न थांबवावे लागले. मुलीचे पालक आणि स्थानिक धार्मिक नेते यांनी मुस्लिम व्यक्तिगत कायद्याचा आधार घेऊन मुलगी वयात आली (Puberty) असेल तर तिच्या पालकांच्या अनुमतीने तिचे लग्न होऊ शकते. त्यामुळे हे लग्न कायदेशीर आहे, असा युक्तिवाद केला. मुस्लिम व्यक्तिगत कायद्याप्रमाणे मुलीचे चौदा वर्षांचे वय हे संमती- वय मानले जाते. त्यामुळे हे लग्न एका अर्थाने कायदेशीर ठरते. पण दुसरीकडे Child Marriage Restraint Act हा कायदा सर्व भारतीयांना लागू असल्यामुळे व त्यातील तरतुदींप्रमाणे मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असल्याशिवाय तिचे लग्न कायदेशीर ठरत नाही, असा सल्ला कायदेतज्ज्ञांनी पोलिसांना दिला. यातून काहीच निष्पन्न होत नाही असे पाहून पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे (Child welfare committee) विचारणा केली. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, Child Marriage Restraint Act आणि Juvenile Justice Act या कायद्यांचा संबंध बालकांच्या मूलभूत अधिकारांशी व त्यांच्या कल्याणाशी येत असल्यामुळे हे कायदे मुस्लिम व्यक्तिगत कायदा आणि इतर समाजांचे तत्सम कायदे यांना अधिक्रमित करतात किंवा त्याहून ते वरचढ ठरतात (Supersede). म्हणून या प्रकरणाचा विचार Child marriage Restraint Act व Juvenile Justice Act या कायद्यांतील तरतुदींप्रमाणे झाला पाहिजे, असा सल्ला बाल कल्याण समितीने पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांनी या मुलीस तूर्त मानखुर्दच्या बाल कल्याण केंद्रात ठेवले आहे.

चाईल्ड मॅरेज रिस्ट्रेंट कायद्याला एक आंतरराष्ट्रीय परिमाणही आहे. Child Rights Convention  या आंतरराष्ट्रीय परिषदेत बालकांचे अधिकार व हितसंबंधांचे रक्षण होईल असे कायदे या परिषदेत सहभागी झालेल्या राष्ट्रांनी आपापल्या देशात करावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या निर्णयाला मंजुरी देण्यात भारत हे एक राष्ट्र होते. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास भारत सरकार बांधील आहे. धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली भारत सरकारला ही जबाबदारी टाळता येणार नाही.

हा पेच इथेच संपलेला नाही. पोलिसांनी कार्यवाही केल्यानंतर दोनच दिवसांनी चिराग नगर, घाटकोपर (प.) येथील दारूल इस्ता-सफा या संस्थेशी संबंधित असलेल्या मुफ्ती हिदायतुल्ला शौकत कासमी या धर्मगुरूने ‘‘शरियतवर श्रद्धा हा आमच्या धर्मश्रद्धेचा अविभाज्य घटक आहे आणि धर्मश्रद्धेचा मूलभूत अधिकार संविधानाने दिलेला असल्यामुळे शासनाने त्यात हस्तक्षेप करू नये’’ असा फतवा जाहीर केला आहे. ही प्रतिक्रिया नव्यानेच व्यक्त झाली आहे, असे नव्हे. शरियत दैवी, परिपूर्ण व म्हणून अपरिवर्तनीय आहे, ही भूमिका, उलेमा, त्यांची दारूल उलुम (देवबंद)सारखी धर्मपीठे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, गेली चार दशके घेत आली आहेत. राजकीय पक्ष, नेते आणि सरकारही मुसलमानांच्या मतांचे गणित मांडून या भूमिकेस सतत पाठिंबा देत आले आहेत. पाव शतकापूर्वीचे शहाबानू प्रकरण हे या संदर्भातील अतिशय बोलके उदाहरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने १९८५ साली शहाबानू या घटस्फोटित महिलेला पोटगी देणारा निकाल दिला. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता. त्यामुळे तो Case-Law  ठरतो व भारतातील सर्व राज्यांतील तत्सम प्रकरणांत त्याच्या आधारे असाच निर्णय सर्व न्यायालयांना देता येऊ शकतो. म्हणूनच या निकालाच्या विरोधात विविध धर्मपीठे, उलेमा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी आंदोलन सुरू केले. दुर्दैवाने तत्कालीन राजीव गांधी सरकारने त्यांच्यापुढे शरणागती पत्करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करणारा कायदा केला. परिणामत: मुस्लिम महिलांना मिळणारा पोटगीचा अधिकार आधुनिक मूल्यांची आणि सामाजिक प्रगतीची बांधिलकी मानणाऱ्या सरकारनेच काढून घेतला. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये अशी रास्त अपेक्षा आहे. प्रस्तुत प्रकरणी पोलिसांनी Child marriage Restraint Act  या कायद्यानुसार कारवाई सुरू केली तर हा आमच्या व्यक्तिगत कायद्यातील हस्तक्षेप आहे व त्यामुळे संविधानाने दिलेल्या धर्मश्रद्धेच्या मूलभूत अधिकाराचा संकोच होतो या भूमिकेतून मुस्लिम समाजाचे सनातनी नेतृत्व शहाबानू प्रकरणासारखे आंदोलन सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच शरीयतचा इतिहास व वर्तमानकालीन वास्तव या निकषांवर शरीयतच्या अपरिवर्तनीयतेचा दावा तपासून पाहणे आवश्यक आहे.

इ.स. ६३२ मध्ये पैगंबरांचे निधन झाले. (अल्लाह् त्यांना चिरशांती देवो) तेव्हापासूनच यासंबंधीच्या मतभेदांना सुरुवात झाली. पैगंबर हे शेवटचे प्रेषित आहेत या इस्लामच्या सिद्धांताप्रमाणे त्यांच्यानंतर कोणीही प्रेषित होणे शक्य नव्हते. पण तोपर्यंत निर्माण झालेल्या मुस्लिम समाजाचे धार्मिक, सामाजिक, राजकीय नेतृत्व करण्यासाठी काही तरी यंत्रणा असणे आवश्यक होते. या गरजेतूनच ‘खलिफा’ या संस्थेचा जन्म झाला. त्या वेळेस खलिफा कोणी व्हायचे याबाबत दोन विचारप्रवाह होते. पैगंबरांच्या कुरेैश टोळीतील कुणीही ज्ञानी, अनुभवी व नेतृत्वाचे गुण असलेली व्यक्ती खलिफा होऊ शकते, असा एक प्रवाह होता. तर पैगंबरांचा पुतण्या आणि जावई हजरत अली याच्या चाहत्यांचा खलिफ होणारी व्यक्ती पैगंबरांच्या कुटुंबातील असली पाहिजे असा आग्रह होता. पण सुरुवातीला त्यांना यश आले नाही आणि इ.स. ६३२ ते ६५६ या काळात अबुबकर, उमर, उस्मान असे तीन खलिफा झाले. पण उस्मानच्या निधनानंतर मात्र हजरत अली खलिफा झाले. इस्लाममधील शिया आणि सुनी पंथाचे बीज या  घटनेत आहे. चारही खलिफांवर श्रद्धा ठेवणारे ते सुनी आणि फक्त हजरत अलीना खलिफा मानणारे ते शिया झाले. या पंथभेदामुळे शरीयतचीही विभागणी झाली. त्याचे मूळ एकच असले तरी तपशिलामध्ये खूप फरक पडला. त्याचप्रमाणे शरीयतच्या अंमलबजावणीची यंत्रणाही वेगवेगळी झाली. शिया पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू व त्यांनी नेमणूक केलेले इमाम यांनाच शरीयतचा अन्वय अर्थ लावण्याचा व अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. तर सुनी पंथीयात उलेमा आणि त्यांनी निर्माण केलेली विविध धर्मपीठे यांनी हा अधिकार स्वत:कडे घेतला.  उलेमा व धर्मपीठे एकाच समान पातळीवर व स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात आपसात अनेक मत-मतांतरे आढळतात.

प्रश्न इथेच संपत नाही. काळाच्या ओघात शरीयतच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे आली. कुराण हा शरीयतचा सर्वात महत्त्वाचा स्रोत मानला जातो. पण त्यातही काही न्यूनता आढळल्यामुळे मग पैगंबरांच्या जीवनातील घटना, त्यांनी वेळ ोवेळी केलेला उपदेश वा मार्गदर्शन हेही शरीयतचे साधन (Source) मानले गेले. यालाच हदीस वाङमय म्हणतात. इमाम अल्-बुखारी यांनी प्रथम हदीसचे चिकित्सक संकलन केले. आजही हे संकलन महत्त्वाचे व अधिकृत मानले जाते. पण हेही अपुरे पडू लागल्यामुळे मग इज्मा (विद्वान व धर्मशास्त्रज्ञ यांचे एकमत) आणि कयास म्हणजे विवेकबुद्धी या आणखी दोन साधनांची निर्मिती झाली. त्यात आणखी एक प्रकार म्हणजे हान्नफी, शाफई, मालिकी, हंबाली असे शरीयतचे चार संप्रदायही (Schools of Thought) निर्माण झाले.

या सर्व घटना पैगंबरोत्तर काळातील आहेत आणि पैगंबर हे शेवटचे प्रेषित होते या सिद्धांताप्रमाणे वरील सर्व घटनांशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती सामान्यजन होते. ते विद्वान होते पण त्यांच्यात साक्षात्कारी व दैवी अंश होता असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सामान्य जनांच्या मर्यादा त्याना लागू होतात. असाच निष्कर्ष काढावा लागतो.

पैगंबर हे द्रष्टे साक्षात्कारी होते. भविष्य काळात आपल्या समाजापुढे अनेक समस्या निर्माण होतील, त्यातून मार्ग काढण्यासाठी शरीयतमध्ये आधार न सापडल्यास शरीयत लवचिक व्हावी या उद्देशाने त्यांनी इजतेहादचा सिद्धांत सांगून ठेवला आहे. इजतेहाद म्हणजे विविध क्षेत्रांतील विद्वानांनी व विचारवंतांनी इस्लामी धर्मशास्त्र व विद्यमान परिस्थितीतील समस्या यांचा सारासार विवेकबुद्धीने विचार करून मार्ग काढणे असा याचा थोडक्यात अर्थ सांगता येईल.
वरील सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला तर ही इस्लामी न्यायशास्त्राच्या विकासाची प्रक्रिया होती असे म्हणता येईल. हा विकास जवळ जवळ तीन शतके होत होता. इमाम हनीफ, इमाम शफी, इमाम मलिक, इमाम हंबाल, अल गझाली, अल-बुखारी यासारख्या अनेक विद्वानांनी व विचारवंतांनी शरीयत हे एक समाजशास्त्र असे मानले व तिचा विकास केला. त्यानंतर मात्र उलेमा ही संस्था प्रबल होत गेली व धर्माच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले व ही विकास प्रक्रिया थांबवली. इजतिहादचा सिद्धांतही त्यांनी बासनात बांधून ठेवला. परिणामत: शरीयत कुंठित झाली.

ही परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न विसाव्या शतकातील दोन महापुरुष मौलाना अबुल कलाम आझाद आणि डॉ. महंमद इकबाल यांनी केले. मौ. आझाद यांनी दीन आणि मामलात अशी संकल्पना कुराणाच्या आधारे मांडून दीन म्हणजे अंतिम चिरंतन सत्य व म्हणून ते अपरिवर्तनीय व मामलात म्हणजे भौतिक जीवनाशी संबंधित परिस्थितीजन्य बाबी व म्हणून त्या परिवर्तनीय अशी मांडणी, त्यांनी तर्जुमन अल कुराण या त्यांच्या कुराण भाष्यात केली आहे. डॉ. इकबाल यांनी शरीयत वर्तमानकाळाशी सुसंगत व्हावी म्हणून इज्तिहादच्या सिद्धांताचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. या विषयावर त्यांनी सखोल संशोधन व चिंतन करून १९३० साली Reconstruction of Religious Thought of Islam हा ग्रंथ लिहिला. (प्रत्यक्षात या वर्षी त्यांनी दिलेल्या सहा व्याख्यानांचे ते संकलन आहे.) या ग्रंथात त्यांनी मांडलेला सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे आधुनिक काळातील गुंतागुंतीचे जीवन पाहता इज्तेहादच्या अंमलबजावणीची जबाबदारी केवळ पारंपरिक उलेमांवर सोपवून चालणार नाही. त्यांच्याबरोबर समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील तज्ञही असले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. या दोन्ही महापुरुषांचे विचार मुस्लिम समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. परंतु पारंपरिक उलेमांनी त्यांना अनुल्लेखाने मारले आहे.

शरीयत अपरिवर्तनीय असल्याच्या दाव्याला सर्वात मोठा धक्का ब्रिटिशांनी दिला. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ब्रिटिश सत्ता स्थिर झाल्यानंतर त्यांनी शिक्षण, प्रशासन, न्यायप्रणाली अशा अनेक क्षेत्रांत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. न्याय प्रणालीच्या क्षेत्रातील क्रांतिकारी परिवर्तन हे त्यांचे आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. म्हणून स्वतंत्र भारतातही तीच न्यायिक व्यवस्था पुढे चालू ठेवण्यात आली. ब्रिटिशांच्या न्यायिक प्रणालीमध्ये आधुनिक कायदे, न्यायालये, न्यायालयात दोन्ही पक्षांची बाजू मांडण्यासाठी वकील वर्गाची निर्मिती हे महत्त्वाचे घटक होते. भारतात आधुनिक कायदे लागू करताना त्यांनी भारतातील सर्व समाजाचे पारंपरिक कायदे रद्द केले. अपवाद फक्त व्यक्तिगत कायद्यांचा. यात शरीयतही समाविष्ट होती. चोरी, खून, दरोडे, व्यभिचार यासारख्या गुन्ह्य़ांना शरीयतमध्ये कठोर शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. ब्रिटिशांनी शरीयतचा भाग रद्द करून मुसलमानांना भारतीय दंड विधान (Indian Penal Code) हा कायदा लागू केला. त्याबरोबरच शरीयतचा पुराव्यासंबंधीचा कायदा (Law at evidence) कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्ट असे अनेक कायदे रद्द करून त्यांच्या जागी आधुनिक कायदे लागू केले. यामुळे शरीयतचा जवळजवळ ८०% भाग ब्रिटिशांनीच रद्द केला. आज ज्याला मुस्लिम व्यक्तिगत कायदा किंवा मोहामेडन लॉ म्हणतात तो विवाह, घटस्फोट, पोटगी आणि वारसा हक्क या चार बाबींपुरताच मर्यादित आहे. हा कायदा शरीयतच्या तत्त्वांवर आधारित असला तरी त्यासंबंधी उद्भवणारे वाद न्यायालयातच दाखल करावे लागतात. शरीयत कोर्ट नावाचा कसलाही प्रकार अस्तित्वात नाही. असे असताना शरीयत अपरिवर्तनीय आहे असा दावा कशाच्या आधारे करायचा? यातील आणखी विरोधाभास असा की हा दावा करणारे सनातनी नेते शरीयतचे यापूर्वीच रद्द झालेले कायदे पुनरुज्जीवित करा अशी मागणी करत नाहीत किंवा चोरीच्या गुन्ह्य़ाला शरीयतच्या तरतुदींप्रमाणे हात तोडण्याची शिक्षा द्या, अशीही मागणी करत नाहीत. तरीही शरीयत अपरिवर्तनीय आहे असा दावा ते करतात. हा भ्रामक युक्तिवाद नाही तर काय आहे? अशी भ्रामक भूमिका घेऊन ते समाजाची दिशाभूल करत आहेत.

मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील बदलाचा विषय जेव्हा जेव्हा चर्चेत येतो तेव्हा तेव्हा मुस्लिम समाजाचे नेतृत्व संविधानाच्या २५०व्या अनुच्छेदानुसार (Article) मिळालेल्या धर्मश्रद्धेच्या मूलभूत अधिकाराचा आधार घेऊन त्याला विरोध करीत आले आहे. शरीयत हा आमच्या धर्मश्रद्धेचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्यामध्ये परिवर्तन करण्यामुळे आमच्या या मूलभूत अधिकाराचा संकोच होतो, असा या नेतृत्वाचा युक्तिवाद असतो. हा युक्तिवाद किती भ्रामक आहे, याचे विश्लेषण वर आले आहे. पण भारताच्या संविधानातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व समता या आधारभूत मूल्यांची बांधिलकी स्वीकारून त्याप्रमाणे अनुशासन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारच जेव्हा मुस्लिम समाजाच्या सनातनी नेतृत्वाचा हा युक्तिवाद मान्य करून त्यांच्यापुढे शरणागती पत्करते तेव्हा ते आपली सांविधानिक जबाबदारी यथार्थपणे पार पाडण्यात कुचराई करत आहे, असेच म्हणावे लागते. संविधानाने २५व्या अनुच्छेदानुसार किंवा कलमानुसार सर्व भारतीय नागरिकांना धर्मश्रद्धेच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला असला तरी हा अधिकार अमर्याद व अबाधित नाही. त्याला याच अनुच्छेदाच्या दोन उपकलमांद्वारे मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या मर्यादा इतक्या स्पष्ट व नि:संदिग्ध आहेत की त्याविषयी मतभेदाला वावच नाही. तरीही संविधानाच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशी भूमिका न घेता शासन सनातन्यांच्या मागण्या मान्य करते ही आपल्या एकूण राजकीय व्यवस्थेतील भ्रामक भूमिका आहे. ती कशी आहे, हे स्पष्ट व्हावे म्हणून संविधानातील २५वा अनुच्छेद जशाच्या तसा खाली देत आहे. भारत सरकारने प्रमाणित केलेल्या संविधानाच्या मराठी आवृत्तीतून तो घेण्यात आला आहे.

२५ (१) सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य उपबंधांच्या अधीनतेने, सदसद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रतिज्ञापित करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत.
(२) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे-
(क) धर्माचरणाशी निगडित असेल अशा कोणत्याही आर्थिक, वित्तीय वा अन्य धार्मिकतेवर कार्याचे विनियमन करणाऱ्या किंवा त्यावर र्निबध घालणाऱ्या.
(ख) सामाजिक कल्याण व सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिदू धार्मिक संस्था हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुल्या करण्याबाबत उपबंध करणाऱ्या,कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही, अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.

मुस्लिम मुलीच्या संमती वयाचा विचार कोणत्या कायद्यानुसार व्हावा, ही चर्चा येत्या काही दिवसात वाढत जाणार आहे. शहाबानू प्रकरणाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पुरोगामी मूल्यांवर ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत आणि विशेष म्हणजे पंचविसाव्या कलमाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचे नेमके स्वरूप काय हे जनतेसमोर व शासनासमोरही स्पष्टपणे मांडले पाहिजे.

सौजन्य – लोकसत्ता, अनुवाद – राजेंद्र येवलेकर

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शांततेचे नोबेल पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणाचा गोषवारा.

युवर मॅजेस्टी, नोबेल निवड समितीचे पदाधिकारी, अमेरिका व जगाचे मान्यवर नागरिक..

अतिशय विनम्रतेच्या भावनेतून मी हा सन्मान स्वीकारतो आहे. आपल्या आशाआकांक्षांचे प्रतीक असलेला हा पुरस्कार आहे. जगातील क्रौर्य व इतर अनेक कठीण आव्हाने या परिस्थितीत आपण केवळ दैववादात अडकून चालणार नाही. आपली कृती दिसली पाहिजे. या कृतीतूनच आपण इतिहासाला न्यायाच्या दिशेने वळण देऊ शकू.

मला शांततेचे नोबेल जाहीर करण्याच्या तुमच्या औदार्याच्या निर्णयावर बराच वाद झाला आहे, त्याचा प्रथम उल्लेख करणे गरजेचे आहे. जगाच्या रंगमंचावर मी सुरुवातीच्या टप्प्यात काम करीत आहे, शेवटच्या नाही. श्वाइट्झर, मार्टिन ल्यूथर किंग व नेल्सन मंडेला यांनाही हा सन्मान मिळालेला आहे. मला माहीत आहे की, माझी कामगिरी त्यांच्या तोडीची नाही, पण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना केवळ न्यायाच्या नावाखाली तुरुंगात डांबण्यात आले. त्यांनी अनेक हालअपेष्टा भोगल्या. त्यांचा हा त्याग मोठा आहे यात शंकाच नाही, त्यामुळे त्याबाबत वादविवाद करण्याचा माझा इरादा नाही.

माझ्या निवडीत एक महत्त्वाचा मुद्दा असा की, दोन युद्धांच्या मध्यावधीच्या काळात मी देशाचा प्रमुख आहे. त्यातील एक युद्ध (इराक) संपण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरे (अफगाणिस्तान-पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी कारवाई) नॉर्वेसह ४३ देशांच्या पाठिंब्याने सुरू आहे. त्याचा हेतू आमचे रक्षण व जगातील देशांचे हल्ल्यांपासून रक्षण करणे हा आहे. अजूनही हे युद्ध सुरू आहे. अनेक तरुण अमेरिकी सैनिकांना दूरच्या युद्धभूमीवर पाठवण्यास मी जबाबदार आहे. त्यातील काही मारतील, काही मरतील. त्यामुळे या सशस्त्र संघर्षांची काय किंमत मोजावी लागते याची अचूक जाणीव असताना अनेक अवघड प्रश्न घेऊन मी येथे आलो आहे. युद्ध आणि शांतता यांचे नाते काय असते त्याबाबतचे हे प्रश्न आहेत. युद्धाच्या जागी शांतीची प्रस्थापना आपल्याला करायची आहे. मला पडलेले प्रश्न नवीन नाहीत. एक ना दुसऱ्या रूपात युद्ध अगदी अदिम काळापासून होते. इतिहासात डोकावले तर त्या काळात त्याच्या नैतिकतेला आव्हान दिले गेले नव्हते. त्या काळातही अशाच प्रकारे आदिम जमाती व संस्कृती सत्ता हस्तगत करीत असत. मतभेद मिटवित असत. काळाच्या ओघात कायद्याने काही गटांमधील हिंसेला वेसण घालण्याचे प्रयत्न झाले. तत्त्वज्ञ, धर्मगुरू, राजकारणी यांनी युद्धाच्या विनाशक ताकदीचे नियंत्रण करण्याचा मुद्दा मांडला. न्याय्य युद्ध ही संकल्पनाही नंतर आली. त्यात काही पूर्वअटी होत्या. एकतर ते स्वसंरक्षणाचा शेवटचा मार्ग म्हणून असावे, प्रमाणात असावे, हिंसाचारापासून नागरिकांना दूर ठेवावे. इतिहासात विनाश न घडवता युद्ध झाल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे न्याय्य युद्ध प्रत्यक्षात दिसत नाही. माणसाने एकमेकाला मारण्याच्या नवीन युक्त्या शोधून काढल्या. गेल्या तीस वर्षांत या खंडात दोनदा मोठे संघर्ष झाले. दुसऱ्या महायुद्धात तर सैनिकांपेक्षा नागरिक जास्त संख्येने मारले गेले. आजच्या अण्वस्त्रांच्या जगात सर्वानाच हे कळून चुकले आहे की, तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठीच दूरदृष्टी असलेल्या व्रुडो विल्सन यांनी खूप अगोदरच संयुक्त राष्ट्रांची संकल्पना मांडली. ती अमेरिकेच्या सिनेटने फेटाळली, पण नंतर व्रुडो विल्सन यांना नोबेल सन्मान मिळाला. आज ही संस्था संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करते आहे. मानवी हक्कांसाठी लढते आहे. वंशहत्या रोखते आहे.

त्याचबरोबर अनेक विनाशी शस्त्रांना नियंत्रण घालते आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. युद्धे झाली, अत्याचार झाले; पण तिसरे महायुद्ध झाले नाही. जर्मनीची भिंत संपली तेव्हा शीतयुद्ध संपल्याचा जल्लोष झाला. व्यापाराने जगाला बांधून ठेवले. अनेकांना गरिबीच्या शापातून मुक्तता मिळाली. स्वातंत्र्य, स्वयंनिर्णय, कायद्याचे राज्य या तत्त्वांना उत्तेजन मिळाले. मागच्या पिढय़ांनी जी दूरदृष्टी दाखवली त्याचेच हे सुपरिणाम आहेत. या संस्कारांचा वारसा माझ्या देशाला आहे याचा अभिमान वाटतो. नवीन शतकात या जुन्या व्यवस्था पुरेशा आहेत असे म्हणता येत नाही. जगात दोन अण्वस्त्रधारी महासत्ता आहेत. अण्वस्त्रांच्या प्रसारामुळे कुठलीही शोकांतिका घडू शकते. पूर्वी दहशतवादाचे स्वरूप मर्यादित होते, आता मूठभर लोक आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक निरपराध लोकांना ठार करू शकतात. देशांमधील युद्धांची जागा आता देशांतर्गत युद्धांनी घेतली आहे. वांशिक, वर्गीय संघर्ष उफाळून आले. फुटीरतावादी चळवळी फोफावल्या. काही देशांत निरपराध नागरिक त्यात बळी पडू लागले. आजच्या युद्धांमध्येही सैनिकांपेक्षा नागरिक जास्त मारले गेले आहेत. त्यातच पुढील संघर्षांची बीजे आहेत. अर्थव्यवस्थांना हादरे बसले आहेत, नागरी समाज भेदरला आहे, शरणार्थी वाढतच आहेत. हे मी सगळे सांगतो आहे, पण यावरचे उत्तर घेऊन मी आलेलो नाही. ही आव्हाने पेलण्यासाठी दूरदृष्टी हवी, कठोर परिश्रम हवेत. दशकभरापूर्वी ज्यांनी अशी आव्हाने पेलली त्यांच्यासारखी चिकाटी हवी. त्यासाठी युद्ध व शांतता यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. आपल्या आयुष्यभरात आपण हिंसक संघर्ष नाहीसे करू शकत नाही. काही वेळा काही देशांना बळाचा वापर करावा लागला, पण तो आवश्यक होता व नैतिकदृष्टय़ा समर्थनीय होता. मार्टिन ल्यूथर किंग यांनी अशाच समारंभात सांगितले होते की, हिंसाचार कधीच स्थायी शांतता निर्माण करीत नाही. सामाजिक प्रश्न सोडवू शकत नाही. केवळ आणखी गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करतो. गांधीजी व मार्टिन ल्यूथर यांनी सांगितलेल्या अिहसेच्या शस्त्राची ताकद मी मानतो. त्याचा साक्षीदारही आहे. अहिंसा ही कमजोरी नाही, भाबडेपणा नाही याची मला कल्पना आहे. पण एका देशाचा प्रमुख म्हणून मी केवळ काही उदाहरणांकडे बोट दाखवून काम करू शकत नाही. मला जग आहे तसे स्वीकारावे लागते. त्यामुळे अमेरिकी लोकांना धोका असताना मी गप्प बसू शकत नाही. मी चुकत नसेन तर जगात अजूनही हिंसक संघर्षांचा धोका आहे. हिटलरच्या लष्कराला अहिंसा चळवळ रोखू शकली नसती, अल काईदाच्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत यासाठी वाटाघाटी करून काही उपयोग नाही. त्यामुळे काही वेळा बळाचा वापर करावा लागतो. ही गोष्ट काहींना निराशावादाची निदर्शक वाटेल, पण इतिहासाने त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. अमेरिका ही जगातील लष्करी महासत्ता आहे व आम्ही काही ठिकाणी केलेल्या लष्करी कारवाईकडे संशयाने बघितले जाते; परंतु केवळ करार व जाहीरनामे करून दुसऱ्या महायुद्धानंतर स्थिरता आलेली नाही, हे ध्यानात घ्यावे. आमच्या सैनिकांनी रक्त सांडले म्हणून जर्मनीपासून कोरियापर्यंत आज शांतता व भरभराट दिसते आहे. त्यामुळेच बाल्कनसह अनेक देशांत लोकशाही नांदते आहे. आमची इच्छा लादायची म्हणून आम्ही हे केलेले नाही. आमची मुले, नातवंडे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही ते केले. हा स्वहिताचा भाग असला तरी त्यात व्यापक हितच होते. जर इतरांची मुले, नातवंडे शांततेत व स्वातंत्र्यात राहिली, त्यांची भरभराट झाली तरच आमची मुले, नातवंडे सुखात राहणार आहेत. म्हणूनच युद्धातील ही गुंतवणूक महत्त्वाची आहे ती शांतता टिकवण्यासाठी! युद्ध कितीही न्याय्य म्हटले तरी त्यात मानवी हानी होतेच, हे तितकेच कटु सत्य आहे. काही वेळा युद्ध आवश्यक असते व काही वेळा ती मानवी चूक असते. अध्यक्ष केनेडी यांनी सांगितले होते की, अतिशय व्यवहार्य, साध्य असलेल्या शांततेवर लक्ष केंद्रित करा, पण ते साध्य करताना मानवी स्वरूपावर भर देऊ नका, तर मानवी संस्थांच्या कालागणिक झालेल्या उत्क्रांतीवर भर द्या. या व्यवहार्य उपाययोजना काय आहेत? एका देशाचा प्रमुख म्हणून मला माझ्या देशाचे संरक्षण करण्यासाठी योग्य असलेली कृती करण्याचा अधिकार आहे. बलवान व कमजोर देशांनाही हेच तत्त्व लागू आहे. काही दंडक पाळले तर त्यातून अनेक समस्यांवर तोडगा निघेल. ११ सप्टेंबरला अमेरिकेत हल्ला झाला तेव्हा जग आमच्या बाजूने उभे राहिले. अफगाणिस्तानातील कारवाईलाही जगाने पाठिंबा दिला. कारण त्यांना संवेदनाहीन अशा दहशतवादी हल्ल्यांची दाहकता जाणवली आहे. स्वसंरक्षणाचे तत्त्व पटले आहे. सद्दाम हुसेनने जेव्हा कुवेतवर आक्रमण केले तेव्हा जगाने त्याच्याविरोधात लढण्यास मान्यता दिली होती. काही वेळा लष्करी कारवाईत स्वसंरक्षणापेक्षा व्यापक हित असते. नागरी युद्धापासून लोकांना वाचवणे हा त्याचाच एक भाग आहे. मानवतावादी तत्त्वावर बळाच्या वापराचे समर्थन करता येते असे मी मानतो. बाल्कन किंवा इतर देशांत हे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्ण स्पष्ट जनमत असेल तर शांतता राखण्यासाठी लष्कराचा वापर करण्यास हरकत नाही. जागतिक सुरक्षेला अमेरिका वचनबद्ध आहे, पण त्यात आमचा एकटय़ाचा वाटा नाही. अफगाणिस्तानात अनेक देशांचे सैनिक लढत आहेत. सोमालियात तर कुणाचेच नियंत्रण नसल्याने तिथे दहशतवादाच्या जोडीला चाचेगिरी आहे, दुष्काळ आहे व मानवी यातना तर प्रचंड आहेत. अनेक वर्षे हे चालले आहे व चालत राहील. जिथे बळाचा वापर आवश्यक आहे तिथे आम्ही तो केला, पण त्याचबरोबर नैतिकताही पाळली. हेच अमेरिकेचे वेगळेपण आहे. तेच बलस्थान आहे. म्हणूनच आम्ही कैद्यांच्या छळवणुकीला तिलांजली दिली. ग्वातेनामो बेचे यातनाघर बंद केले. जीनिव्हा जाहीरनाम्यांशी वचनबद्धता दर्शवली. कठीण परिस्थितीतही आम्ही आदर्श नीतितत्त्वे सोडली नाहीत.

न्याय्य व चिरस्थायी शांततेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे नियम तोडणाऱ्यांना जबाबदार ठरवून हिंसेला पर्याय असलेल्या अधिक प्रभावी मार्गाचा वापर केला पाहिजे. सर्व देशांनी त्यांच्यावर र्निबध लादणे हा एक मार्ग आहे. माझ्या कारकीर्दीत मी अण्वस्त्र प्रसारबंदीला महत्त्व देणार आहे. रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्याबरोबर अण्वस्त्रे कमी करण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्याचबरोबर इराण व उत्तर कोरिया यासारख्या देशांना नियमांचे उल्लंघन करू देता कामा नये. मध्य पूर्व व पूर्व आशियात शस्त्रस्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ज्यांना शांतता प्रस्थापित करायची आहे त्यांना गप्प बसून चालणार नाही. अण्वस्त्रांचा प्रसार थांबवावा लागेल. डारफरमधील वांशिक हत्याकांड, कांगोतील अत्याचार, बर्मातील दडपशाही याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्याचेही वाईट परिणाम होत आहेत. हे रोखण्यासाठी जगातील देशांची एकजूट असली पाहिजे. दृश्य संघर्ष थांबले म्हणजे शांतता नांदली असे समजून चालता येणार नाही. मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवणे हा या शांततेचा भाग असला पाहिजे. माणसांना स्वातंत्र्य नसेल तर शांतता टिकणार नाही. मानवी हक्कांना खुल्या चर्चेची जोड असली पाहिजे. केवळ र्निबध लादून सर्व काही साध्य होणार नाही. चीनमधील खुल्या समाजामुळे तेथे अनेक लोक दारिद्रय़ातून बाहेर पडले हे ताजे उदाहरण आहे. पेरेस्त्रोयकामुळे रशियात जे बदल झाले ते सर्वापुढे आहेत. शांततेसाठी नागरी व राजकीय हक्क पुरेसे नाहीत, तर त्यात आर्थिक सुरक्षितता व संधी यांची जोडही हवी आहे. केवळ भीतीपासून मुक्ती म्हणजे खरी शांतता नव्हे, तर गरजांपासून मुक्ती म्हणजे सर्व गरजा भागणे आवश्यक आहे असे मला वाटते. अर्थात सुरक्षेशिवाय विकासही शक्य नसतो ही तितकीच खरी बाब आहे. सर्वाना स्वच्छ पाणी, अन्न, निवारा मिळाला पाहिजे, तर बरेच काही साध्य होईल. त्यामुळे शांततेसाठी केवळ एक गोष्ट करून चालणार नाही, तर इतर अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागेल. जगात युद्ध ही वस्तुस्थिती असली तरी शांततेसाठीचे प्रयत्न सोडून चालणार नाहीत. मानवाच्या उन्नतीसाठी ते गरजेचे आहे. तीच जगाची आशा आहे. अशा या आव्हानात्मक क्षणी आपण सर्वानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

सौजन्य – लोकसत्ता

मर्ढेकरांच्या ‘पिपांत मेले’ या कवितेने आजवर चर्चेचा एवढा प्रचंड धुरळा उडविलेला आहे, की अजूनही तो खाली बसलेला नाही. या कवितेवरील मत-मतांतरे..

म. वा. धोंड :
प्रत्येक कविता आपल्याला कळलीच पाहिजे, असा हट्ट धरण्यात अर्थ नाही. संतांच्या काव्यात अशा कित्येक कूट रचना आहेत, त्या कुठे आपल्याला उलगडतात? एवढे मागेही जायला नको. ग्रेसच्या कविता मला आवडल्या तरी अजिबात कळत नाहीत. नाही कळली तर सोडून द्यावी, हे उत्तम! पण ही कविता तशी सहजपणे झटकून टाकता येत नाही. या कवितेने मर्ढेकरांच्याच नव्हे, तर मराठी कवितेनेही नवे क्रांतिकारी वळण घेतले. यामुळे हिला मराठी कवितेच्या जडणघडणीत मानाचे स्थान आहे.

विजया राजाध्यक्ष :
‘पिपांत मेले’ या कवितेच्या पूर्वार्धात उंदरांचे मरण ही घटना आहे. ‘गरीब बिचारे’ बिळात जगलेले उंदीर. ते ‘पिपांत’ शिरले व तेथेच उचकी देऊन मेले. त्यांचे जगणे बिळापुरते मर्यादित आणि मरणही निरुपद्रवी. हे मरण कुणीही मान न मुरगळता आपोआप आलेले. (माना पडल्या, मुरगळल्याविण.) उंदरांच्या जीवनात आसक्ती नव्हती. (कारण ओठांवरती ओठ नुसते मिळालेले.) ती आसक्ती मरतानाही लाभली नाही. ही संज्ञेच्या जन्मजात व संपूर्ण अभावाची साक्ष. संज्ञेवाचून शृंगार जसा हलका (‘संज्ञेवाचून संभोगाची/ अशीच कसरत असते हलक्या’. कां. क. क्र. ४१) तसे संज्ञेवाचून जगणेही. सगळा सक्तीचा मामला. स्वेच्छेला अवसरच नाही. उंदीर रात्री मेले. त्यानंतर दिवस उजाडला. मरताना उघडय़ाच राहिलेल्या उंदरांच्या डोळ्यांत हा ‘दिवस सांडला’ (उजेड शिरला)- आणि उंदरांच्या शरीरातले (गात्रलिंगांचे) उरलेसुरले सत्त्वही या नव्या दिवसाने निपटून (धुऊन) घेतले. अत्यंत केविलवाणे असे हे मरण आहे.

प्रभा गणोरकर :
या कवितेचा अर्थ सांगताना एकतर तो गोळाबेरीज सांगितला आहे- ती ‘दुबरेध’ कविता, हे गृहीत धरून. ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ ही लिंगसूचक प्रतिमा म्हणून कविता ‘अश्लील’- पण मर्ढेकरांना अश्लील कसे म्हणायचे, म्हणून मग गोळाबेरीज अर्थ चाचरत मांडण्याचाही एक प्रकार वर्गा-वर्गात चालतो. बेकलाइटी म्हणजे कृत्रिम असे म्हटले जाते. कधी उंदरांचे जहरी डोळे (का? तर विष पोटात गेल्याने उंदीर मेले ना, म्हणून?), तर ‘मधाळ पोळे’ म्हणजे त्या उंदरांच्या अंगावर घोंगावणाऱ्या माश्या इथपर्यंतदेखील अर्थ सांगण्याची मजल गेली. हे सारे मर्ढेकरांच्या कवितेत अनावश्यक अर्थ कोंबणे आहे. असा प्रकार मर्ढेकरांच्या अनेक कवितांच्या बाबतीत झालेला आहे. ‘पिपांत मेले’ ही खास मर्ढेकरी शैलीतली, अत्यंत सूचक, पण स्पष्ट अर्थ सांगणारी एक सरळ कविता आहे. ती आजच्या अनैसर्गिक जीवनरीतीचे वर्णन करू इच्छिते. ‘पिपांत मेले’ हा आधुनिक माणसांच्या विपरीत स्थिती-दशेचाच आणखी एक निराळा पैलू. जरा वेगळ्या शैलीतला. प्रतिमांनी कूट बनवलेला, एवढेच.

प्रभाकर पाध्ये :
या कवितेत काव्यानंद आणि नेहमीचा व्यावहारिक आनंद यांत तडाख्याचा फरक आढळतो. व्यवहारात आनंद देणारा विषय तर नाहीच, पण व्यवहारात किळस आणणारा विषय म्हणजे पाण्यात बुडून मेलेले उंदीर हा विषय येथे निवडलेला आहे. (हा प्लेगचा उंदीर नाही, याबद्दल आपण कवीचे आभार मानू या!) नुसता विषय नव्हे, तर मेलेल्या उंदराचे काही किळसवाणे वर्णनही केलेले आहे. ‘माना पडल्या’, ‘पिपांत मेले उचकी देऊन’, ‘गात्रलिंग अन् धुऊन घेउन’, ‘ओठांवरती ओठ मिळाले’ हे शब्दप्रयोग किळसवाणी दृश्येच निर्माण करतात. मग प्रश्न असा, की अशा किळसवाण्या विषयाने आणि वर्णनांनी काव्यानंद कसा निर्माण होईल?
यमके, अनुप्रास, अर्थाचे खटके यामुळे आनंद होईलच असे नाही. कारण या सर्व गोष्टींमुळे त्या किळसवाण्या वर्णनांकडे लक्ष वेधले जाते. माझ्या मते, या कवितेमुळे जो काव्यानंद निर्माण होण्याची शक्यता आहे, तो तिच्यात आलेल्या तात्त्विक विचारांमुळे. या कवितेच्या मधोमध आलेली ही काव्यपंक्तीच पाहा :
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
या दोन ओळींवरून हे स्पष्ट आहे की, या कवितेत जीवनाचे काही तत्त्वज्ञान ग्रथित झालेले आहे.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन
त्याचप्रमाणे-
उदासतेला जहरी डोळे;
पुन्हा
मधाळ पोळे;
ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
या सर्व ओळींतून जीवनाचे विफल, उदासवाणे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. मनुष्य साधारणपणे आपल्या संकुचित जीवनात (बिळांत) जगत असतो. कधीतरी तो जीवनाच्या चावडीवर फेकला जातो. त्याला इच्छा असो वा नसो, जगावेच लागते. उदासवाणे जीवन जगावे लागते. जगताना काही माया, काही श्रेय जमा झाले तरी ते तकलादूच असते. दुर्दैव असे की, जगता जगताच जगण्याची गोडी लागते. पण जगणे सक्तीचे, तसेच मरणेही सक्तीचे. असे पराभूत, निष्फळ, तगमगणाऱ्या जीवनाचे तत्त्वज्ञान या कवितेत सांगितलेले आहे. हे नुसत्या उंदराच्या जीवनाचे तत्त्वज्ञान नव्हे. हे तुम्हा-आम्हा मानवाच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. येथे उंदीर हे नुसते प्रतीक आहे. मानवाचे प्रतीक!

सुधीर रसाळ :
मर्ढेकरांच्या काव्याने नवे वळण घेतल्यानंतर लिहिलेल्या सुरुवातीच्या कवितांपैकी ही एक कविता आहे. या सुरुवातीच्या काळात मर्ढेकर आपली कविता तीव्र उपहासाने संपविताना दिसतात. या कवितेची ‘पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!!’ ही शेवटची ओळ अशीच तीव्र उपहासपर आहे. या ओळीत समाधानाचा व्याजस्वर असून तो असमाधानाचे सूचन करीत आहे. ‘न्हाणे’ या शब्दातून हवी असलेली गोष्ट विपुल प्रमाणात मिळणे हा लक्ष्यार्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ- एखाद्याचे ‘प्रेमाने न्हाऊन निघणे’. वाईट व नको असलेल्या गोष्टी जर विपुल प्रमाणात मिळाल्या, तर त्यासाठी न्हाऊन निघणे हा शब्द आपण सामान्यत: वापरत नाही. या उंदरांना ‘ओल्या’ पिंपाकडून जगण्यासाठी सामग्री हवी होती. ओठांवर पोळे जमावे आणि सहजपणे मध मिळावा, असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांना मिळाले मरण. त्यांचे मध चाखायला आसुसलेले ओठ फक्त एकमेकांना लागले. पोळे बेकलाइटी नसते आणि त्यातून मध खरोखरच टपकला असता तर ते मधाने न्हाऊन निघाले असते. पण याउलट, त्यांच्या गात्रलिंगावर दिवस सांडला. कोरडय़ा, प्रकाशमान दिवसानेच त्यांना न्हाऊ घातले. संपन्नता, समृद्धी आणि जीवन यांचे वैपुल्य त्यांना हवे होते. त्याऐवजी त्यांना उदासता, वैफल्य आणि शेवटी मृत्यू प्राप्त झाला.

निशिकांत ठकार :
‘पिपांत मेले..’पासून ‘पिपांत न्हाले’पर्यंतच्या काव्यजाणिवेत उचकी देण्याचा एक अंतिम क्षण आहे. बिळात जगलेले उंदीर पिपांत मरताना ‘उचकी’ देऊन मरतात. वस्तुत: उंदीर आचके देऊन मरतात. पण आचक्याची उचकी करून मर्ढेकरांनी मरणक्षणी पूर्वस्मृतींची मानवी जाणीव सूचित केली आहे. या उंदरांना बिळातले जगणेच आठवत असणार, म्हणूनही ते ‘गरीब बिचारे’.
आधी मेले, मग शेवटी न्हाले (कारण िपप ओले.) अशा अंत्यविधीचे हे मूषक महानिर्वाण आहे! ‘न्हालेल्या’ गर्भवतीची सुंदर उत्प्रेक्षा मांडणाऱ्या कवीला पिपांत न्हालेल्या उंदरांचे बीभत्स वास्तव आपल्या कवितेत मांडावेसे वाटते, हा त्या कवीच्या व्यापक मानवी संवेदशीलतेचाच प्रत्यय होय.

(पद्मगंधा प्रकाशनाच्या ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ या प्रा. एस. एस. नाडकर्णी संपादित ग्रंथातून साभार)

प्रथम प्रसिद्धी : ‘अभिरुचि’ ऑक्टो.-नोव्हें. १९४६, पृ. ८९.
समाविष्ट : ‘मर्ढेकरांची कविता’ (मौज प्रकाशन,  मुंबई),
प्रथमावृत्ती :  फेब्रुवारी- १९५९.

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण;

मधाळ पोळे;
ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

बाळ सीताराम मर्ढेकर