Archive for सप्टेंबर, 2010

मंगला सामंत, सौजन्य – लोकसत्ता

अनेक भाषा, असंख्य जाती, त्यामुळे हिंदूंची एकजूट ही मोठी अडचण असावी. त्यामुळे गोहत्या, मंदिर-मस्जिद वाद, हिंदूंचे धर्मांतर हे तकलादू मुद्दे समस्त हिंदूंच्या भावना भडकविण्याची सामायिक शस्त्रे म्हणून वापरले जातात. धर्मांतरामागोमाग लगेच जोडून येणारा विषय म्हणजे ‘हिंदूंचे जागरण!

‘ ‘जागरण‘ म्हणजे काय, ते नेमके कोणी करायचे, या जागरणाचे विषय कोणते असावेत, हे मात्र इतक्या वर्षात हिंदू नेत्यांना स्पष्ट करता आलेले नाही.

——————————————————————————————————————

हिंदूंच्या अनेक भाषा, असंख्य जाती, त्यामुळे त्यांची एकजूट ही हिंदू-धर्मांधाच्या समोरील मोठी अडचण असावी. त्यामुळे एक गोहत्या, दुसरा मंदिर-मस्जिद वाद, तिसरे हिंदूंचे धर्मांतर हे तकलादू मुद्दे समस्त हिंदूंच्या सामायिक भावना भडकविण्याची सामायिक शस्त्रे म्हणून हिंदू नेते वापरताना दिसतात.

प्रत्येक धर्मीयाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो. तसा तो हिंदूंनाही वाटतो, पण मग इतक्या श्रेष्ठ धर्मात जातीय तुच्छता ठासून भरलेली कशी?हा प्रश्नदेखील वरील तीन दुरुपयोगी शस्त्रांना धार काढीत राहिल्यामुळे टाळता येतो. शिवाय संधी निर्माण होईल, तसतसा तो तो मुद्दा विकोपास न्यायचा असतो. काही वर्षांपूर्वी एकदम ‘गोहत्या‘ प्रश्न ऐरणीवर आणला गेला होता, पण त्याभोवती फार संख्येने हिंदू गोळा होत नाहीत, हे लक्षात आल्याने, तो मुद्दा सध्या तिसर्‍या क्रमांकावर टाकण्यात आलाय. भाजपाने दिल्लीचे तख्त मिळवले, पण ‘हिंदूंवर या देशात भयानक अन्याय, अपमान होताहेत‘ हे तुणतुणे वाजत तर ठेवायला पाहिजे. मंदिर-मस्जिद वाद आता जुना झाला. त्यामुळे ‘हिंदूंचे धर्मांतर‘ हा सध्याचा मुख्य मुद्दा केला गेला आहे.सध्याचे हिंदुत्वाचे चलन म्हणजे ‘हिंदूंचे धर्मांतर!‘ धर्मांतरामागोमाग लगेच जोडून येणारा विषय म्हणजे ‘हिंदूंचे जागरण!‘

गेली काही वर्षे, हिंदुत्ववादी नेते ‘धर्मांतराबाबत हिंदूंचे जागरण व्हायला पाहिजे‘ असे म्हणतात, पण मग हे ‘जागरण‘ म्हणजे काय? ते नेमके कोणी काय करायचे? किमान हेसुद्धा इतक्या वर्षात हिंदू नेत्यांना स्पष्ट करता आलेले नाही. अत्यंत संदिग्ध, विचारशून्य, द्वयर्थी, कधी विसंगत तर कधी दुटप्पी आणि बहुधा घूमजाव विधाने करण्यात हिंदू नेत्यांचा हात (म्हणजे तोंड) कुणीच धरू शकणार नाही.त्यामुळे ‘जागरण‘ हा शब्दही तसा संदिग्धपणे वापरला गेलेला! त्याचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक हिंदू जाती, व्यक्ती, विचार, स्वभाव, वृत्ती यानुसार अन्य हिंदूंनी यथेच्छ व्यक्त करावेत आणि गोंधळ शक्य तो वाढवावा, असाही उद्देश असावा. म्हणून हिंदूंना मिळालेल्या या अनाहूत अधिकाराचा फायदा घेऊन हिंदूंच्या जागरणाचे विषय कोणते असावेत, ते आपण इथे पाहू या.

‘जागरणा‘चा मुख्य विषय आहे की, हिंदूंचे धर्मांतर यापुढे होता कामा नये. मात्र या विषयाला जोडून,आपल्या देशात फक्त हिंदूंचेच धर्मांतर कसे काय होते? हा उपविषय त्या जागरणाच्या अजेंड्यावर हवा, असे आम्हाला वाटते. म्हणजे असे की, ख्रिश्चन, बौद्ध, जैन वा शिखांचे धर्मांतर या देशात होत नाही. शीख मुस्लिम झाले, मुस्लिम ख्रिश्चन होताहेत, जैन बौद्ध होताहेत (सर्वजण सक्तीने बरं का!) असे कुठे काही आढळत नाही. अगदी ७०० वर्षांपूर्वी या देशात येऊन गुजराती भाषा व वेष घेणारे पारशीसुद्धा हिंदू झालेले नाहीत. मग ज्या देशात ८० टक्के हिंदू आहेत आणि संसदेत तेवढ्याच टक्क्यांनी हिंदू राज्यकर्ते असताना, इथल्या हिंदूंचेच तेवढे धर्मांतर का होते आहे? हे पहिले जागरण सर्व हिंदूंचे व्हावे, असे आम्हाला वाटते.

हिंदू धर्म सहिष्णू, उदार आहे म्हणून हिंदू कधी कुणाचे धर्मांतर करीत नाहीत, असा एक समज आहे. समजा एखाद्या परधर्मीयाने हिंदू व्हायचे ठरवले तर त्याला कोणत्या जातीत आपण ढकलायचा? कारण हिंदू हा कधीच जातविरहित नसतो. जात ही हिंदूंना जन्माने प्राप्त होते. बाहेरून कोणीही हिंदूंच्या कुठल्या जातीत येत नाही. अशी हिंदू धर्मातील जखडलेली अवस्था असताना उगीच उदारकीचे श्रेय खिशात घालून हिंदू धर्माने ‘आम्ही कोणाचे धर्मांतर करीत नाही,‘ असे म्हणत फिरण्याचे काही कारण नाही.हिंदूंना एक वेळ मशिदी पाडता येतील, पण एकगठ्ठा मुस्लिमांना वा ख्रिश्चनांना ते हिंदू धर्मात सामावून घेऊ शकणार नाहीत, हे सत्य समजण्यासाठी हिंदूंचे दुसरे जागरण व्हायला हरकत नाही.

धर्मांतर हे दोन प्रकारांनी होत असते. एक जबरदस्तीने आणि दुसरे म्हणजे स्वेच्छेने! स्वेच्छेने केलेले धर्मांतर हा घटनात्मक अधिकार असल्याने त्याच्या विरोधात आपल्याला बोलता येणार नाही. तेव्हा फक्त सक्तीच्या धर्मांतराचा मुद्दा आपण पाहू. अशा सक्तीच्या धर्मांतराचे दोन प्रकार आढळतात.

१. जादा कर लादून वा छळ करून केलेले धर्मांतर

२. आमिषे दाखवून केलेले धर्मांतर.

यापैकी पहिल्या प्रकारातील ‘जादा कर लावून‘ धर्मांतर करण्याचे सुलतानी युग संपलेलेच आहे. शिवाय छळ करून धर्मांतर होणे ही फार काळ लपून राहणारी बाब नव्हे आणि त्याकरिता शिक्षा करणारे कायदे अस्तित्वात आहेतच. छळ करून सक्तीचे धर्मांतर हे स्वतंत्र भारतात शिक्षापात्र कृत्य असल्याने आजच्या काळात असे धर्मांतर अशक्य आहे.

थोडक्यात, छळाने, जबरदस्तीने हिंदूंची धर्मांतरे होत नाहीत. आता आमिषे दाखवून धर्मांतर होते आहे का, हे तपासणे एवढा भाग हिंदूंच्या जागरणाचा बाकी आहे, तो आपण पाहू.

एखादी गोष्ट सोडून देण्याच्या बदल्यात, जर काही मोठे घबाड मिळणार असेल, जसे पूर्वी जहागिरी, सुभेदारी, मनसबदारी, राजदरबारात नेमणूक असे फायदे मिळवले जात असत, त्याला प्रलोभने वा आमिषे म्हणतात. रियासतकार, सरदेसाई यांनी आपल्या ‘मुसलमानी रियासत‘च्या दोन खंडांमधून अशा आमिषाच्या लोभाने धर्मांतरे केलेल्यांची माहिती दिली आहे, ती खालीलप्रमाणे.

१. इमादशाही स्थापन करणारा फत्तेऊल्ला इमादशहा, हा मूळचा तेलंगी ब्राह्मण होता. त्याने ‘इमाद उल्मुक‘ किताब घेऊन इस्लाम धर्म स्वीकारून मुस्लिम राज्यकर्त्यांकडून वर्‍हाडची सुभेदारी मिळवली. (पृष्ठ २२७)

२. निजाम-उल्मुक-बहिरी हा दक्षिणेकडील वजीर, मूळ हिंदू होता. (पृष्ठ २२१)

३. तुघलक घराण्यातील एका सुलतानाने गुजरातच्या सुभेदाराचा बंदोबस्त एका शूर हिंदू पुरुषाकरवी करवला. त्याला मुज्जफरखान हा किताब देऊन गुजरातची सुभेदारी दिली. त्याच्याच मदतीने तुघलक सुलतानाने हिंदू देवालयांचा विध्वंस केला. पुढे या हिंदू सुभेदाराने ‘मुज्फरशहा‘ नावाने १३९६ मध्ये स्वतंत्र नाणे पाडून, मशिदीत ‘खुत्बा‘ वाचून घेतला. (पृष्ठ १९१)

४. १३९६मध्ये काश्मीर येथे सिकंदर नामक तुर्कवंशीय मुस्लिम राज्यावर होता. त्याच्या पदरी जो मुसलमान प्रधान होता, तो मूळचा हिंदू ब्राह्मण होता. याच्या मदतीने सिकंदराने काश्मीरमधील, अनेक देवळे पाडून स्वतःला ‘मूर्तिनाशक‘ असे पद जोडले. त्याच्या कारकीर्दीत बहुतेक काश्मिरी हिंदू मुसलमान झाले. (पृष्ठ २९७)

५. दिल्लीवर राज्य करणारा सुलतान फिरोजशहा तुघलक याच्या पदरी असणारा वजीर मकबूलखान हा तेलंगणातील उच्च कुळातील हिंदू! मुस्लिम धर्म स्वीकारल्यावर, या वजिराच्या प्रत्येक मुलामुलीस एक हजाराचे वेतन फिरोजशहाने करून दिले. (पृष्ठ १५४)

६. उदेपूरचा राणा प्रतापसिंह याचा भाऊ संगराजित हा मोगलांना मिळाला होता. त्याचा मुलगा हा पुढे जहांगीराचा सर्वात मोठा सरदार महाबतखान म्हणून नावारूपास आला.

७. बंगालचे राज्य शमसुद्दीन या सुलतानाकडून कंस नामक हिंदू जमीनदाराने बळकावले. त्याचा मुलगा जितमल याकडे हे राज्य आल्यावर त्याने जलालुद्दीन हे नाव व मुसलमान धर्म स्वीकारला. (पृष्ठ ३०१)

८. सिंध प्रांतात जाम या सुमेरवंशीय राजपूत घराण्याने १३३६ मध्ये राज्य स्थापन केले. राणा जाम तिमाजी मरण पावल्यावर त्याच्या पुढील रजपूत राजाने मुसलमानी धर्म स्वीकारला, त्यांची नावे जाम सलातीन, जाम निजामुद्दीन, जाम फत्तेखान. तेव्हापासून जाम म्हणजे मुसलमानी राजे समजले जाऊ लागले. (पृष्ठ ३११)

९. बर्‍हाण म्हणजे हल्लींचे बुलंद शहर. त्यावर १०९८ मध्ये गझनीच्या महंमदाने स्वारी केली. तेथील हरदत्त राजा महंमदाला शरण आला आणि त्याने दहा हजार अनुयायांसह मुसलमानी धर्म स्वीकारला. (पृष्ठ ३५१)

१०. केरळचा राजा, मलबारचा पेरुमाळ राजा, तर कालिकतचा सामुरी राजा ही मुस्लिम धर्म स्वीकारल्याची आणखी काही राजेशाही उदाहरणे. हे सर्व उच्चवर्णीय राज्यकर्ते होते. ब्राह्मण म्हणजे हिंदू धर्माचे शिरोमणी होते. तरी त्यांनी लालसेने हिंदू धर्म सोडला. कधी सत्तेचा स्वार्थ तर कधी मुस्लिम सुलतानाची खुशामत करण्याचा पुरुषार्थ, यामुळे ही धर्मांतरे झाली. निव्वळ स्वतःचाच धर्म या हिंदू उच्चवर्णीयांनी बदलला नाही तर राज्यातील हजारो नागरिकांना मुस्लिम करून टाकले. देवालये फोडण्यास परकीय मुसलमानांना सहाय्य केले. आज राममंदिराबाबत गळे काढणार्‍या हिंदू धर्माभिमान्यांनी इथल्या आजच्या गरीब मुसलमानास वेठीला धरण्यापूर्वी आपल्या पूर्वज हिंदूंच्या इतिहासाची पाने उलटून, स्वतःचे पहिल्या प्रथम एक ‘ऐतिहासिक जागरण‘ घडवून आणावे.

आता सामाजिक इतिहासाकडे पाहू. हिंदू धर्म वैचारिक पातळीवर पटला नाही म्हणून अनेक उच्चवर्णीय हिंदूंनी १९व्या शतकात आपला धर्म बदलून ख्रिश्चन धर्म पत्करला. त्यात कवी ना. वा. टिळक आणि पंडिता रमाबाई अग्रणी आहे. आता हिंदू धर्मात विचारांना न पटणारे काय आहे? त्याकरिता आणखी एक जागरण गरजेचे आहे.

हिंदू धर्मातील असंख्य स्त्रियांचीही धर्मांतरे झाली. ती कशी? अनेक हिंदू राजांनीराजकीयघबाडे मिळविण्यासाठी आपल्या मुली मुसलमान सुलतानांना व बादशहांना दिल्या. त्या सर्व स्त्रियांची अपत्ये मुसलमान झाली. अकबराची राणी जोधाबाईचा मुलगा जहांगीर होता, हे सर्वांना माहीत आहेच.

शिवाय विधवा स्त्रियांचा हिंदू धर्माने २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जो छळ मांडला होता, त्यातून काहीजणींनी जीव दिले. ज्यांना हे करता येणं शक्य नव्हतं त्या असंख्य हिंदू विधवांनी घरातून पळून जाऊन मुसलमान पुरुषांच्या बायका होऊन बुरख्याआड तोंड लपविले. मीनाकुमारी आणि नर्गीस यांच्या मातृ कुलातील स्त्रिया हिंदू होत्या. जागतिक पुरुषप्रधान कायद्यानुसार स्त्रीच्या मुलांनी बापाचाच धर्म लावणे सक्तीचे असल्याने अशा हिंदू मातांपासून निपजलेल्या पिढ्या परधर्मात ढकलल्या गेल्या.आईचा धर्म लावण्याची मुभा असती, तर काही संख्या तरी हिंदू राहिली असती. या मुद्द्यावर हिंदूंचे एक सणसणीत ‘पुरुषप्रधान जागरण‘ होऊन जाऊ देत.

त्याशिवाय हिंदू धर्मातील स्वतःला ‘उच्च‘ समजणार्‍या जातींनी अनेक कारागीर व कष्टकरी जमातींना त्याचप्रमाणे स्वच्छतेशी संबंधित काम करणार्‍या असंख्य जातींना कित्येक शतके अपमानाची, तुच्छतेची, वेळप्रसंगी जनावरांच्याही खालची वागणूक दिली. अशा असंख्य जातींनी हिंदू धर्मच सोडून देऊन अपमान, अवहेलनेपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. आजही भारतातील अनेक भागांत अशा प्रकारचा जातीय छळ चालू आहे. हिंदू धर्माचा अभिमान सर्व जातींना वाटण्याबाबत कोणते वास्तव आज शेकडो शतके नुकसान करीत आहे, त्याबाबत समस्त हिंदूंचे एक उपजागरण व्हावे.

हिंदू जागरणाचे इतके विविध विषय जर अभ्यासले गेले, तर आजमितीला भारतात सुमारे ३० कोटी लोक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत, इतके किमान हिंदुत्ववाद्यांना समजेल, अशी अपेक्षा करू या. या गरजा पुरविण्यासाठी कोणत्याही धर्माचे समाजसेवक पुढे आल्यास हा वंचित वर्ग त्यांना परमेश्वरस्वरूप मानतो. त्यांनी सांगितल्यानुसार तो आचरण करतो. आज कित्येक वर्षे या देशात टाकून दिलेली मुले, बेघर, भटकती मुले ख्रिश्चन मिशनरीजनी गोळा करून त्यांना जगवले, माणूस केले, भले ती मुले ख्रिश्चन झाली असतील, पण ‘माणूस‘ झाली हे महत्त्वाचे नाही का? नाहीतर त्यांच्यातून हिंदू गुंड निपजले असते, त्यांचा काय उपयोग होता?

देशात हिंदू धनिकांची संख्या कमी नाही. पण रोमारोमात परजातींबद्दल तुच्छता भरलेली ही मंडळी, आपले पैसे संगमरवरी देवळे बांधणे, देवाला सोन्याचा मुकूट, हिरे, चांदीच्या पालख्या वाहण्यात घालवतात. ते लाखो, कोट्यवधी रुपये असंख्य हिंदू गरिबांना मूलभूत गरजा देण्यासाठी वळवावेत म्हणून हिंदूंचे आणखी एक जागरण गरजेचे आहे.

पूर्वज हिंदू उच्चवर्णीय राज्यकर्त्यांनी सत्ता, जहागिर्‍या, वतने अशा आमिषांना बळी पडून केलेल्या धर्मांतराबाबतच झापडे लावायची आणि आजच्या हिंदू गरिबांच्या आत्यंतिक तातडीच्या गरजांना आमिषे, प्रलोभने अशा संज्ञा देत हिंदूंनी आकांत करायचा, हा निव्वळ त्यांचा स्वार्थच नाही तर प्रच्छन्न दुष्टपणाही आहे, विकृती आहे.असले रिकामटेकडे हिंदुत्व सोडून दिले जावे, म्हणून हृदयसम्राटांपासून ते माथेफिरू हिंदू-अभिमान्यांपर्यंत सार्‍यांचेच जागरण अपेक्षित आहे आणि ते व्हावे हेच ‘जागरण‘ या शब्दाचे फलित वाटते.

महेश सरलष्कर, सौजन्य – मटा

‘ नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च’ या नामांकित संस्थेने २००४-०५मध्ये ग्रामीण-शहरी भागांतील कुटुंबांचा सर्व्हे करून भारत पैसे कसे-किती कमावतो, ते कसे-किती खर्च करतो आणि ते कसे-किती वाचवतो, याची माहिती गोळा केली आहे. त्याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. या सर्व्हेतून अनेक आर्थिक अंतर्विरोध समोर येतात.

….

कुठल्याही विकसित देशाप्रमाणे भारताचीही अर्थव्यवस्था गुंतागुंतीची आहे. ग्रामीणपेक्षा शहरी उत्पन्न ८५ टक्क्यांनी अधिक आहे. शहरी कुटुंब ३/४ अधिक खर्च करते. त्यांची बचतही ग्रामीण कुटुंबापेक्षा दुप्पट असते… पण, देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के खेड्यात राहते. राष्ट्रीय उत्पन्नात खेड्यांचा वाटा ५६ टक्के आहे. खर्चातील वाटा ६४ टक्के आणि बचतीत वाटा १/३ आहे… ग्रामीण भागात अजूनही शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी, त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वाटा कमी होतो आहे. १९७०मध्ये हा वाटा ७४ टक्के होता, तो २००७-०८मध्ये ४० टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच बिगर शेती व्यवसायाचा वाटा वाढू लागलेला आहे… देशाच्या एकूण पगारदार कुटुंबांपैकी ३८.७ टक्के कुटुंबे आणि बिगरशेती व्यवसायात स्वयंरोजगार असलेली ४६.१ टक्के कुटुंबे ग्रामीण भागांत राहतात. खेड्यात सर्वात मोठा ‘होतकरू’ ग्राहक आहे.

भारतात ग्राहक नेमके कोण? त्यांचे आर्थिक स्तर काय? कुठल्या स्तर विस्तारतोय? ग्रामीण-शहरी भागांत त्यांचे स्वरूप काय?… हे पाहून मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवली जाते. त्यासाठी ग्रामीण-शहरी आथिर्क अंतविर्रोध उपयोगी पडतात. पण, फक्त खासगी क्षेत्रानेच त्याचा वापर करावा असे नव्हे; सरकारदरबारीही विकास योजनांची आखणी करताना हे अंतविर्रोध उपयोगी असतात.

‘ नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च’ (एनसीएईआर) या नामांकित संस्थेने २००४-०५मध्ये २४ राज्यांतील ग्रामीण-शहरी भागांतील ४ लाख ४० हजार कुटुंबांचा सर्व्हे करून भारत पैसे कसे-किती कमावतो, ते कसे-किती खर्च करतो आणि ते कसे-किती वाचवतो, याची माहिती गोळा केली. या माहितीचे विश्लेषण करणारा अहवाल अलीकडेच प्रकाशित झाला. या सर्व्हेतून आर्थिक अंतर्विरोध समोर आले आहेत.

देशातील बड्या २० शहरांत देखील ५० टक्के कुटुंबेच पगारदार आहेत. छोट्या शहरांत-ग्रामीण भागांत हे प्रमाण कमी कमी होत जाते. त्यामुळे नियमित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी होते. एक वर्ष जरी नियमित उत्पन्नावर कुऱ्हाड पडली तर बचत इतकी नसतेच की त्यावर तरून जाता येईल… भारतात ८ कोटी ६७ लाख कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे ४८,०९७ रुपये. दरडोई उत्पन्न ९,५१८ रुपये. म्हणजे दरमहा उत्पन्न सुमारे ८०० रुपये. या तुलनेत सेवा क्षेत्रासारख्या आधुनिक क्षेत्रातील कुटंुबे २ कोटी ९३ लाख. वार्षिक सरासरी उत्पन्न १,१२,२२२ रुपये. दरडोई २२,७९७ रुपये. दरमहा उत्पन्न १,९०० रुपये. दोन्ही कुटुंबातील उत्पन्नातील फरक दुपटीपेक्षाही अधिक. ही परिस्थिती बदलू शकते का?

समजा औद्योगिक क्षेत्रातील कुटुंबाने पारंपरिक व्यवसायात जायचे ठरवले तर या कुटुंबाचे उत्पन्न १० टक्क्यांनी कमी होईल. शेती क्षेत्रात गेले तर ते ३३ टक्क्यांनी खाली येईल. पण, आधुनिक क्षेत्रात गेले तर उत्पन्न ५७ टक्क्यांनी वाढेल. ग्रामीण भागांत वाढीचे प्रमाण तब्बल १२० टक्के असेल. शहरात ते ३२ टक्के असेल. याचा अर्थ, व्यवसाय क्षेत्र बदलले तर कुटुंबाचा जीवनस्तर उंचावू शकतो. सध्या शेतीतील उत्पन्न सर्वात कमी आहे आणि त्यावर अवलंबून असणारी कुटुंबे तुलनेत जास्त. शेतकरी कुटुंबांचा जीवनस्तर बदलायचा तर शेतीवरचा भार कमी करून अन्य क्षेत्रांत जाण्याशिवाय पर्याय नाही. पण, त्यासाठी कुशलता निर्माण व्हायला हवी!

भारतात मध्यमवर्ग नेमका किती? कोणी म्हणते २० कोटी, कोणी ६० कोटी! र्वल्ड बँकेनुसार, दरडोई प्रतिदिन १० ते २० डॉलर क्रयशक्ती असलेले कुटुंब हे मध्यमवर्गात मोडते. म्हणजे पाच जणांच्या कुटुंबाचे उत्पन्न दरमहा क्षमता सुमारे ७५ हजार ते १.५ लाख रुपये असले पाहिजे. वाषिर्क उत्पन्न ९ ते १८ लाख रुपये. पण, ‘एनसीएईआर’नुसार २ ते १० लाख दरम्यान वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे (२००१-०२च्या किमतींनुसार) मध्यमवगीर्य ठरतात. २००१-०२ मध्ये ही कुटुंबे १ कोटी ७ लाख होती ती, २००९-१० मध्ये २ कोटी ८४ लाख इतकी असतील. म्हणजे १४ कोटी २० लाख जनता! २००७-०८मध्ये भारतातील कुटुंबांपैकी केवळ ११.४ टक्के कुटुंबे मध्यमवगीर्य होती. देशाच्या उत्पन्नात त्यांचा वाटा तब्बल २५ टक्के होता आणि ५५ टक्के बचत. ४९ टक्के कार, ५३ टक्के एसी, ४६ टक्के क्रेडिट कार्डे याच वर्गाकडे आहेत. ‘मार्केट’च्या अंगाने या मध्यमवर्गाचीही रचना आता व्यापक तीन गटांत केली गेली आहे. मध्यमवर्ग-वार्षिक उत्पन्न २ लाख ते १ कोटी रुपये; प्रबळ ग्राहक वर्ग (कन्झ्युमिंग क्लास)- ९० हजार ते ४ लाख रुपये; मध्यम आर्थिक मिळकतीतील कुटुंबे- ४५ हजार ते १ लाख ८० हजार रुपये वार्षिक उत्पन्न. हा मध्यमवर्ग गेल्या १० वर्षांत ५० लाख कुटुंबांवरून २ कोटी ८० लाख कुटुंबांपर्यंत वाढत गेला आहे. दशकातील वाढ दुपटीपेक्षाही अधिक!

शहर हा विकासातील महत्त्वाचा घटक आहे. २०५० सालापर्यंत देशातील ४५ टक्के जनता शहरात राहत असेल. सध्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के जनता २० मोठ्या शहरांत राहते. देशाच्या उत्पन्नात त्यांचा वाटा ३१ टक्के., खर्चात वाटा २१ टक्के आणि बचतीतील वाटा ६० टक्के.. उर्वरित शहरांत २० टक्के जनता राहते. त्यांचा उत्पन्नात वाटा केवळ १३ टक्के तर, बचतीत फक्त ८ टक्के.. ग्रामीण भागांत ७० टक्के जनता राहते. खर्चाचा वाटा ६४ टक्के तर, बचतीत जेमतेम ३० टक्के.. हे पाहता, शहरीकरण झाले तरच भारतातील बचतीचे प्रमाण वाढू शकते व विकासाला अधिक चालना मिळू शकते. अधिकाधिक शहरांच्या निमिर्तीतूनच ग्रामीण भागाचा विकास साधता येईल.

शहरी लोकसंख्येपैकी मोठ्या शहरांत (५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येची शहरे) २२ टक्के शहरी जनता राहते. शहरी उत्पन्नातील वाटा ३१ तर, बचत ३९ टक्के.. त्यातुलनेत मध्यम शहरांतील (१०-५० लाख) जनतेचा उत्पन्नात आणि बचतीत वाटा १९ टक्के. आहे. लहान शहरांत (५-१० लाख) हेच प्रमाण १२.९ आणि १०.४ टक्के. आहे. याचा अर्थ, जेवढे शहर मोठे तेवढी रोजगाराची, उत्पन्नवाढीची आणि बचतीची संधी अधिक असते. त्यातूनच मोठ्या शहरांत संपूर्ण भारतातून लोक स्थलांतरित होतात. मोठ्या शहरांत येणारा लोंढा थांबवणे कठीण का आहे, याचे उत्तर या वास्तवातून मिळते.

‘ एनसीएईआर’चा सर्व्हे २००४-०५मधील असला तरी त्यातील विश्लेषणातीन दिसलेला आर्थिक बदलांचा आणि त्याचा परिणामांचा ट्रेंड बदललेला दिसत नाही. ग्रामीण-शहरी भागांतील विकासाच्या गतीत तफावत असल्याने शहरीकरणाचा वेग अधिक आहे आणि त्याचा फायदाही शहरी लोकांना अधिक मिळतो. ग्रामीण भागांतही लोकांचे उत्पन्न वाढू लागले असले तरी सर्वंकष आथिर्क विकासासाठी सक्षम प्रशासन हातच कळीचा मुद्दा ठरतो.

( हा सर्व्हे ‘सेज पब्लिकेशन्स, नवी दिल्ली’ने पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला आहे.)

सुहास पळशीकर, सौजन्य – मटा

(लेखक पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

धर्मांतर हा तसा हिंदू समाजाच्या दृष्टीने नाजूक मुद्दा असतो. ‘बाहेरून’ आलेल्यांनी धर्मांतरं घडवून आणली, असं दु:ख कुरवाळीत बसणाऱ्या संघटनांची काही कमी नाही. पण धर्मांतरं का होतात, याबद्दल हिंदू समाजाने कधी फारशा गंभीरपणाने विचार केलेला नाही. ज्या हिंदुत्ववादी संघटनांना धर्मांतरामागच्या कळीच्या मुद्याची जाणीव झाली, त्यांनीही तो मुद्दा दूर करण्यापेक्षा धर्मांतराच्या कारस्थानाबद्दल टाहो फोडण्याचं राजकारण करणंच जास्त पसंत केलेलं दिसतं.

धर्मांतराविरोधीचं हे राजकारण मुख्यत: ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांच्या संदर्भात झालेलं दिसतं. तलवारीच्या धाकाने किंवा पैशाचा लोभ दाखवून धर्मांतरं झाली, एवढ्यावरच धर्मांतराचं आकलन थांबल्यामुळे हिंदू समाजाला या मुद्यावर कधी फारशा आत्मपरीक्षणाची गरज भासली नाही. बहुसंख्य धर्मांतरित हे कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींमधून परधर्मात गेले, हे कसं काय? असा प्रश्ान् फारसा कोणाला विचारावासा वाटला नाही. किंबहुना कनिष्ठ समजलेल्या जातींमधूनच धर्मांतरं मोठ्या प्रमाणावर होतात, या मुद्यावर पांघरूण घालण्यासाठी ‘बाहेरच्या’ आक्रमक धर्मप्रसारकांचीच चर्चा सोयीस्करपणे केली गेली की काय, अशी शंका घेण्यासारखी स्थिती आहे.दलितांचा हिंदूधर्मत्यागधर्मांतरांबद्दलचे हे पूर्वग्रह आणि त्याविषयीची शहामृगी वृत्ती यांना दलितांच्या धर्मांतरांनी धक्का दिला. लक्षावधी दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा त्यात धाक किंवा लालूच असल्याचा आरोप करणं शक्य नव्हतं.

शिवाय, ‘तुमच्या धर्माने आम्हाला कमी लेखून आमची अवहेलना केली, म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडत आहोत,’ असं सांगून अस्पृश्य समाजाने शहामृगी हिंदूंची मोठीच पंचाईत करून ठेवली.दि. १४ आणि १५ ऑक्टोबर १९५६ या दिवशी हजारो दलितांनी नागपूर इथे डॉ. आंबेडकरांकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या आणखी कितीतरी बांधवांनी त्यापाठोपाठ हिंदू धर्म सोडला. या धर्मांतरात आंबेडकरांच्या आग्रहावरून काही खास प्रतिज्ञांचा समावेश केला गेला होता- हिंदू दैवतांची पूजा-प्रार्थना न करणं आणि कर्मकांडांच्या पातळीवर हिंदू कर्मकांडांचा त्याग करणं या प्रतिज्ञा त्यात समाविष्ट होत्या. एका नव्या धर्मश्रद्धेत प्रवेश करताना पूवीर्च्या श्रद्धांशी येणारा संघर्ष हाताळण्यासाठी अशा मनोनिश्चयाची गरज होतीच.आंबेडकरांच्या हजारो अनुयायांनी हे धर्मांतर आंबेडकरांवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या मागे जात केलं. पण आंबेडकरांनी मात्र धर्मांतराची ही चळवळ प्रदीर्घ चिंतनानंतरच प्रत्यक्षात उभी केली. हिंदू धर्माला नकार, एका नव्या श्रद्धेला शरण जाणं आणि श्रद्धेचा व्यवहार राजकीय हिशेबांपासून अलिप्त राखणं, या तिन्ही गोष्टी धर्मांतराच्या चळवळीत आपल्याला दिसतात.आंबेडकरांचा धम्मनिर्णयबौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय आणि सामूहिक धर्मांतराचा निर्णय कसा झाला, हे समजून घेण्यासारखं आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात अस्पृश्य समजलेल्या समाजात जागृती होऊ लागली होती. १९२०पासून या समाजाचं नेतृत्व आंबेडकरांकडे आलं. आंबेडकरांनी स्वत: १९३५-३६मध्ये धर्मांतराचा निर्णय जाहीर केला. प्रत्यक्षात धर्मांतर घडलं, ते १९५६मध्ये.बाबासाहेबांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकाचे अंक पाहिले तर असं दिसतं की १९२९-३०च्या सुमारास महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या दलितांनी अस्पृश्यतेपासून सुटका करून घेण्यासाठी धर्मांतर करण्याचा मुद्दा मांडला होता आणि ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारण्याविषयी त्रोटक चर्चा होत होती. पण या अगदी प्रासंगिक टप्प्यावरच बहुधा, आंबेडकरांनी एक तत्त्व मनाशी ठरवून टाकलं असावं. ते असं की राजकीय फायद्यासाठी, संख्याबळाच्या हिशेबासाठी आणि देवाणघेवाणीचा मुद्दा म्हणून धर्मांतर करायचं नाही. धर्म या बाबीचं गांभीर्य लक्षात घेता ‘मुक्ती’ आणि ‘मांगल्य’ हेच मुद्दे धर्मांतराच्या संदर्भात मध्यवतीर् असायला हवेत.दुसरा मुद्दा असा की जातिप्रथा आणि तिच्या अत्यंत टोकाच्या आविष्कारात अस्पृश्यता यांचा मुकाबला करणं हा मुक्तीच्या शोधातला सर्वात महत्त्वाचा मुक्काम होता. त्यामुळे जातिव्यवस्था मोडण्याचं ध्येय आंबेडकर स्वत:पुढे (आणि सर्व समाजापुढे) ठेवतात. त्यांच्या धर्मविषयक चिंतनाची सुरुवात जातिव्यवस्था आणि तिचे तात्त्विक आधार यांच्या तपासणीपासून होते. जातिसंस्थेचा उच्छेद कसा करायचा, असा प्रश्ान् उभा राहिल्यावर आंबेडकरांनी जे चिंतन केलं, त्याची फलश्रुती म्हणजे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानातून (ब्राह्माणी धर्म विचारातून) जातीला तात्त्विकसमर्थन लाभतं या निष्कर्षाला ते येऊन पोचतात. त्याचप्रमाणे विवेक व अविवेक यातून निर्णय करण्याचं स्वातंत्र्य हिंदू तत्त्वज्ञान हिंदूंना देत नाही, असा निष्कर्ष आंबेडकर काढतात. म्हणूनच हिंदू धर्माच्या नव्या तात्त्विक अधिष्ठानाचा शोध घेण्याचं आवाहन ते हिंदूंना करतात. मात्र हे होईपर्यंत अस्पृश्यांनी गुलामगिरीत राहणं त्यांना अमान्य होतं; आणि हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान इतक्या सहजासहजी बदलेल, अशी त्यांना आशा नव्हती. म्हणून आपल्या गुलामगिरीचं तात्त्विक समर्थन देणारी हिंदू धर्माची चौकट अस्पृश्यांनी ओलांडायला हवी, या निष्कर्षाला आंबेडकर येऊन पोचतात.हा निर्णय ते एकट्याने करू शकले असते. पण आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो, त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याला या बौद्धिक गुलामगिरीमधून बाहेर पडण्यास उद्युक्त करणं त्यांना महत्त्वाचं वाटलं. आपल्या वैयक्तिक मुक्तीपेक्षा सामूहिक पातळीवरचा मुक्तीचा शोध आंबेडकरांना महत्त्वाचा वाटला. त्याचं एक कारण म्हणजे सामूहिक कृतीमधूनच हिंदू समाजाला व जातिव्यवस्थेला आव्हान दिलं जाऊ शकणार होतं. त्यामुळे व्यक्तिश: धर्मांतराचा निर्णय झाल्यानंतर आपल्या देवभोळ्या अनुयायांमध्ये जागृती निर्माण करण्यावर आंबेडकर भर देतात. अस्पृश्यांचे मेळावे भरवून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करतात; वेळप्रसंगी भिन्न अस्पृश्य जातींचे स्वतंत्र मेळावे भरवून संवाद साधतात. यामुळेच धर्मांतराला सार्वजनिक कृतीचं परिमाण लाभलं आणि हिंदू समाजावर चारदोन ओरखडे तरी उठले.

मुक्ती कोण पथे?

धर्मांतर करायचं ठरल्यावर प्रश्ान् आला तो कोणता धर्म स्वीकारावा, याबद्दलचा. हिंदूमहासभेच्या नेत्यांनी शीख धर्म स्वीकारण्याची शिफारस केली होती. काही अनुयायांना आंबेडकरांनी शीख धर्माचा अभ्यास करायला पाठवलंही होतं. या प्रश्ानचा निर्णय करताना चार मुद्दे किंवा निकष आंबेडकरांनी विचारात घेतलेले दिसतात. एक म्हणजे ज्या धर्मविचाराचा स्वीकार करायचा, त्याने जातिव्यवस्थाप्रधान ब्राह्माणी धर्माशी टक्कर घेतलेली असावी. कारण अशा धर्मात ब्राह्माणी तत्त्वज्ञानाशी दोन हात करण्याचं सार्मथ्य असू शकेल, ही शक्यता होती. त्यांच्या स्वत:च्या आकलनानुसार बौद्ध विचाराने ही ऐतिहासिक कामगिरी पूवीर् पार पाडलेली होती. दुसरा निकष म्हणजे ज्या धर्माचा स्वीकार करायचा, त्याचं तत्त्वज्ञान विवेकावर आधारित असावं. कर्मकांड, जादू, चमत्कार यांना तिथे कमीत कमी अवकाश असावा. तिसरा निकष म्हणजे त्या धर्माच्या विचारात ऐहिकतेला आणि ऐहिक जगातील दु:खनिवारण करण्याला मध्यवतीर् स्थान असलं पाहिजे. आणि चौथा निकष म्हणजे धामिर्क तत्त्वज्ञानाच्या अन्वयार्थाचा अधिकार प्रत्येक अनुयायाकडे असला पाहिजे. धामिर्क तत्त्वज्ञान बंदिस्त किंवा धर्मगुरूंच्या कडीकुलुपात कोंडलेलं असू नये.बौद्ध धर्म या साऱ्या निकषांची पूर्तता करतो, हे आंबेडकरांच्या निर्णयामागील सर्वात महत्त्वाचं कारण होतं. भारतात बुद्धधमीर्यांचं अस्तित्व त्या काळात अगदीच किरकोळ असल्यामुळे भिख्खु आणि त्यांचे आग्रही अन्वयार्थ यांचं प्रस्थ इथे नव्हतं. ही गोष्ट आंबेडकरांना नक्कीच फायद्याची ठरली. त्यांना आपल्या अनुयायांना बुद्ध विचाराचा अन्वयार्थ सांगण्यात प्रस्थापित धर्ममार्तंडांचा अडसर झाला नाही. अर्थात त्यांचा बुद्ध-विचाराचा अन्वयार्थ पारंपरिक आणि पारलौकीकवादी बुद्ध भिख्खुंना पचनी पडला नाही आणि त्यांनी आंबेडकरांचा ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ बुद्ध विचारांपासून फारकत घेणारा ग्रंथ ठरवला! पण या बौद्धमताचा पुरस्कार करणारी मंडळी भारतातली नसल्यामुळे आंबेडकरांच्या अनुयायांवर निदान आरंभीच्या काळात तरी पारलौकीकवादी मताचा फारसा प्रभाव पडला नाही.धर्मांतरचळवळीच्या मर्यादाधर्मांतराच्या घटनेला अर्धशतक लोटल्यानंतर आज या सगळ्या घडामोडीचं मूल्यमापन कसं करायचं हा खरा प्रश्ान् आहे. धर्मविचारात आणि बुद्धधम्माविषयीच्या चिंतनात आंबेडकरांनी घातलेली भर ही धर्मांतर चळवळीची एक महत्त्वाची निष्पत्ती आहे.

पण गेल्या ५० वर्षांत एकूण समाजाचं या तत्त्वचिंतनाकडे फारसं लक्ष गेलं नाही. त्यातल्या त्यात गेल्या १५-२० वर्षांत काही अभ्यासक, कार्यकतेर् आणि तत्त्वचिंतक धम्मविचाराच्या अभ्यासाकडे वळले. पण त्यांची संख्या मर्यादित राहिली आहे.ऐहिक जीवनाचा तात्त्विक पाया रचणारं तत्त्वज्ञान असं जर आंबेडकरांच्या धम्मविचाराचं केंद मानलं, तर खुद्द आंबेडकरांच्या अनुयायांनीही हा विचार फारसा पुढे नेला नाही किंवा प्रचलितही केला नाही. ऐहिक आणि मानसिक गुलामगिरीपासून मुक्तता मिळवणं हा आंबेडकरांनी मुक्तीचा अर्थ सांगितला. पण आंबेडकरोत्तर बौद्ध धम्म उत्तरोत्तर जास्तच कर्मकांड, पारलौकिकाचा विचार आणि बौद्ध विहारांचं नियंत्रण करण्याची चढाओढ यात अडकून पडत गेला. परकीय भिख्खुंचा वावर आणि प्रभाव वाढला आणि आंबेडकरप्रणीत मुक्तीचा प्रवास दुर्लक्षित करण्यात आला.धर्मांतर चळवळीच्या मूल्यमापनाचा दुसरा मुद्दा संख्यात्मक असू शकतो. महाराष्ट्रातील एकूण दलितांपैकी निम्मे बौद्धधमीर्य बनले. (२००१च्या जनगणनेनुसार ५९ टक्के) पण महाराष्ट्राबाहेर मात्र हे प्रमाण फार मर्यादित राहिलं. भारतात आजमितीला एकूण लोकसंख्येत बौद्धधमीर्यांचं प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. त्यापैकी ज्या राज्यांमध्ये पूर्वापार बौद्धधमीर्य आहेत, त्यांची संख्या एकूण बौद्धांच्या ढोबळ मानाने आठ टक्क्यांच्या आसपास भरते. उरलेले सर्व बौद्ध हे धर्मांतरित आहेत असं मानलं, तरी महाराष्ट्रातील बौद्धधमीर्य भारतातल्या एकूण बौद्धांच्या ७३ टक्के भरतात! जातिव्यवस्थेचा दुदैैर्वी प्रभाव असा की, खुद्द महाराष्ट्रातही सर्व पूर्वास्पृश्य जातींनी धर्मांतराचा निर्णय स्वीकारला नाही आणि दलितेतरांना तर या धर्मांतराच्या चळवळीचा स्पर्शही झाला नाही. आता अलीकडे भटक्या-विमुक्तांमध्ये धर्मांतराचा विचार बिंबविण्याचे प्रयत्न होत आहेत हा अपवाद वगळला, तर दलितेतर हिंदूंनी धर्मांतराच्या किंवा बौद्ध धम्मविचाराच्या पर्यायाकडे गंभीरपणे पाहिलेलंच नाही असं दिसतं.महाराष्ट्रातील चळवळया मर्यादेमुळेच धर्मांतराच्या परिणामांची चर्चा सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या संदर्भातच होते. आंबेडकरांचे विचार आणि मुख्यत: त्यांची धर्मविषयक भूमिका महाराष्ट्राबाहेरच्या दलित समुदायापर्यंत पोचवण्याचं काम वास्तविक आंबेडकरवाद्यांनी करायला हवं होतं. पण त्यात त्यांनी फारसं स्वारस्य दाखवलं नाही. त्यातच आंबेडकरांच्या अनुयायांमधल्या फाटाफुटींमुळे त्यांची सर्व शक्ती गटबाजीमध्ये खचीर् पडली. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरच्या दलितांमध्ये धम्मविचाराचा फारसा प्रसार झाला नाही.

महाराष्ट्रापुरता विचार केला, तर आंबेडकरांचे समकालीन व त्यानंतरची पिढी यांना धम्मविचारात आणि सांस्कृतिक परिवर्तनात जेवढा रस होता, तेवढा त्यानंतरच्या आंबेडकरी चळवळीला राहिलेला दिसत नाही. १९८०नंतर तर धम्माचा मुद्दा पार मागे पडून राजकीय सत्तेचा मुद्दाच शिल्लक राहिला आहे. पण त्याआधी दलित चळवळ, दलित पँथर्स आणि दलित साहित्य यांनी सतत एका पर्यायी जीवनपद्धतीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. थेट पर्याय मांडता आले नाहीत, तेव्हाही हिंदू धर्मविचाराच्या कठोर चिकित्सेची परंपरा कायम ठेवली. अन्याय आणि शोषणाच्या सर्व आधारांना प्रतिकार करण्याची जी व्यापक भूमिका दलित चळवळीत निर्माण झाली, तिची प्रेरणा धर्मांतरच्या चळवळीत आढळते. स्वातंत्र्य-समानता आणि बंधुभाव यांच्या वैचारिक आधारावर नवी समाजव्यवस्था साकारण्याची ही महात्त्वाकांक्षा धर्मांतराच्या चळवळीतून साकारली होती. याचं मुख्य कारण आत्मसन्मान आणि त्यासाठी लढण्याची उभारी या दोहोंमागे धम्मविषयक विचारांची ताकद होती. तेव्हा, सांस्कृतिक व सामाजिक जागृृतीच्या संदर्भात धर्मांतराच्या चळवळीने केलेली कामगिरी नक्कीच महत्त्वाची आहे.धम्मविचाराचा अप्रत्यक्ष प्रभाव मग धर्मांतराचे परिणाम ठळकपणे दिसत का नाहीत? धर्मांतराने भरीव परिवर्तन का घडून आले नाही?या प्रश्ानंचं उत्तर देण्यासाठी आपल्याला धर्मांतर-चळवळीच्या राजकीय व सांस्कृतिक परिसराचं भान ठेवावं लागेल. आंबेडकरांच्या पश्चात दलित चळवळीला अपरिहार्यपणे बहुपक्षीय संसदीय राजकारणात उतरावं लागलं. त्यामुळे व्यापक परिवर्तनवादी विचारांच्या विकासापेक्षा राजकीय व्यूहरचनेच्या आधारे दलित समाजाला सत्तेत वाटा मिळवण्यावर सगळं लक्ष केंदित झालं. पंजाब, उत्तर प्रदेश, प. बंगाल या राज्यांमध्ये दलितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांना राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणे शक्य होते. पण तेथील दलित समूहांमध्ये जागृृतीचं प्रमाण कमी होतं आणि ते धर्मांतराच्या मार्गाकडे वळले नव्हते. महाराष्ट्रातील दलित चळवळ धर्मांतराच्या मार्गाने गेली; पण महाराष्ट्राच्या राजकीय चौकटीत दलितांकडे व्यूहरचनात्मक पुढाकार येणं शक्य नव्हतं. पुढे नव्वदीच्या दशकात हा पुढाकार मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी दलित-ओबीसी ऐक्याचं राजकारण केलं. त्यासाठी धम्मविषयक मुद्दा मागे ठेवणं भाग होतं. त्यामुळे बहुजन महासंघाने धम्माऐवजी हिंदू धर्मपरंपरेतील मुक्तिदायी प्रवाहांवर भर दिला. अशा प्रकारे राजकीय चौकटीमुळे धम्म-चळवळीच्या विकासावर मर्यादा पडल्या.बहुजन महासंघ काय किंवा बहुजनसमाज पक्ष काय, दोहोंच्या वाटचालीतून एक राजकीय वास्तव पुढे येतं. ते म्हणजे राजकीय वाटचालीत दलित समूहांना स्वतंत्र अस्तित्व आणि अन्य समूहांशी देवाणघेवाण या दोन्हींत समतोल साधावा लागतो. पण हा प्रश्ान् केवळ राजकीय अपरिहार्यतेचा नाही. इथला दलित समाज जातिप्रथा व हिंदू सांस्कृतिक परिसराचंच अपत्य आहे. त्यामुळे त्या परिसरापासून स्वत:ला वैचारिकदृष्ट्या तोडलं तरी व्यवहारात त्या परिसराशी कसं नातं ठेवायचं, हा प्रश्ान् शिल्लक राहतोच.

आंबेडकरोत्तर पहिल्या धम्मवादी पिढीने (पँथरच्या पिढीने असं म्हणूयात) या सांस्कृतिक परिसराला आक्रमपणे सामोरं जाण्याचा मार्ग पत्करला. सर्व ‘हिंदू’ प्रतीके, समारंभ, यांचा नुसता त्यागच नव्हे तर त्यांची नकारात्मक बाजू मांडणारी चिकित्सा त्यांनी केली. हे केल्याशिवाय दलित बांधवांचा धम्मविषयक विश्वास पक्का राहिला नसता. सर्व ‘हिंदू’ सांस्कृतिक विश्वाला अशा प्रकारे पूर्णपणे नकार दिल्यावर धम्मप्रणीत मूल्यविधान आणि सांस्कृतिक व्यवस्था उभारण्याची जबाबदारी आली. त्या पिढीने त्या दिशेने प्रयत्नही केले. पण हे आव्हान फार जिकिरीचं होतं.सामान्य दलित समूहांना एकतर ‘हिंदू’ सांस्कृतिक परिसरातून पूर्णपणे बाजूला काढणं शक्य नव्हतं. आणि प्रत्येक ‘हिंदू’ रिवाजाला पर्यायी रिवाज उभा करायचं म्हटलं, तर धम्माचं रूपांतर कर्मकांडात होऊन त्याचं हिंदूकरण होण्याची जोखीम राहतेच. त्यामुळे मूल्य आणि श्ाद्धा यांच्या पातळीवर हिंदू धर्माचा त्याग करायचा; पण ढोबळ सामाजिक संदर्भात मात्र हिंदू बहुसंख्याक परिसरात वावरायचं, असा पेच निर्माण झाला. सामान्य जनजीवनाच्या पातळीवर यातून अनेक तडजोडी घडून आल्या; कारण जनजीवन काही सैद्धान्तिक दृष्टीचा विकास होण्यासाठी थांबून राहात नाही. उदाहरणार्थ, आंबेडकर जयंती आणि शिवजयंती दोन्ही एकत्र साजरी करणाऱ्या काही संघटना आहेत आणि दलितांची गणेश मंडळंही आहेत! पण या प्रक्रियेत धम्मावर आधारित स्वतंत्र अस्तित्वभान निर्माण झालं नाही.सन १९८०नंतरच्या काळात दलित चळवळ थंडावली, आक्रमकपणे होणारी हिंदूधर्म चिकित्सा मंदावली आणि दोन अगदी भिन्न प्रवाह उदयाला आले. एक म्हणजे ब्राह्माणी संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचा प्रतिवाद करणाऱ्या अब्राह्माणी परंपरेचा पुनशोर्ध करून तिची प्रतिष्ठापना करणे. या मार्गाने धम्मविचाराची ज्योत तेवत ठेवली. मात्र यात औपचारिक धर्मांतराला फारसं महत्त्व नाही. त्याऐवजी पर्यायी (आणि बहुसंख्याक) सांस्कृतिक विश्व घडवण्याचा प्रयत्न यात अनुस्यूत आहे. अब्राह्माणी वारसा हा बहुसंख्याकांचा असल्यामुळे त्याची जर पुर्नस्थापना झाली, तर पर्यायी सांस्कृतिक परिसर हा मोठ्या समाजातला एक कोपरा न राहता स्वत:च सामाजिक व्यवहारांची मध्यभूमी ठरेल, अशी ही भूमिका आहे.ब्राह्माणी-अब्राह्माणी या द्वैतावर आधारित अशी दुसरी एक भूमिका आहे. ती ‘बहुजनवादी’ म्हणून ओळखली जाते. नव्याने पर्यायी सांस्कृतिक परिसर घडवण्यापेक्षा उपलब्ध ‘हिंदू’ परिसरातील प्रतीकं, मूल्यं, यांचाच आधार घेत धामिर्क परिवर्तन साधण्यावर या प्रवाहाचा भर आहे. इथेही ‘बौद्ध’ होण्यापेक्षा ‘अब्राह्माणी’ हिंदू होण्यावर जास्त भर आहे. हिंदू परंपरा ही मुख्यत: अब्राह्माणी आहे; तिचं ब्राह्माणी परंपरेने अपहरण केलं अशी ही मांडणी आहे. एका अर्थाने ही भूमिका गांधींच्या विचाराकडे वळते. हिंदू असण्याचा अर्थ पुरोहित-शास्त्री, धर्मशास्त्रं, यांनी न ठरवता समतावादी व्यवहार करणाऱ्या, श्ाद्धावान अशा व्यक्तींेनी ठरवायचा, यावर गांधींचा भर होता. बहुजन महासंघाच्या आरंभीच्या मांडणीत हाच दावा केलेला दिसतो.धर्मांतरांची संख्या न वाढताही धम्मविचार कसा विकसित झाला, हे पाहिलं म्हणजे धर्मांतराच्या यशापयशाचा हिशेब करणं सोपं नाही, हे लक्षात येतं. विशेषत: वर उल्लेख केलेले दोन्ही प्रवाह परिवर्तनवादी विचारविश्वातून उदयाला आलेले आहेत. जे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतात, त्यांनी ना हिंदू विचाराचा विकास केला; ना धम्मविचारांची चिकित्सा केली. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर बाबासाहेबांच्या धर्मांतर चळवळीने केलेल्या वैचारिक क्रांतीचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित होतं.सारा भारत बुद्धमय करण्याची बाबासाहेबांची आकांक्षा होती. ती पूर्ण झालेली नाही. पण समतावादी राजकारणाचा भारतातला एक मोठा हिस्सा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘बुद्धमय’ झाला आहे; ही वाटचाल दृष्टिआड करण्यासारखी नक्कीच नाही.

नरहर कुरुंदकर, व्यक्तिवेध या पुस्तकातुन साभार

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक आश्चर्यकारक योगायोग होता. ज्यांची विवेकबुद्धी त्यांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय.पहिले राष्ट्रपती राजेंद्रबाबू हे सात्त्विक, सज्जन, चारित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. राजकारणी व संघटनेवर बळकट पकड असणारे नेते होते. स्वातंत्र्य युद्धातून तावून सुलाखून निघालेले देशभक्त होते. तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे थोर शिक्षण शास्त्रज्ञ, चारित्र्यवान आणि आदरणीय असे गृहस्थ होते. जुने कॉंग्रेसमन व देशभक्त होते.

डॉ. राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून निराळी होती. ते कोणत्याही राजकीय़ पक्षांशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या. म. गांधींशी त्यांचे संबंध होते. पण तेही देशावर प्रेम करणार्‍या नागरिकांचे राष्ट्रनेत्याशी आदराचे संबंध असावेत असे होते. कोणाशीही त्यांचे घनिष्ठ व व्यक्तिगत संबंध नव्हते. राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्धी होती. कॉंग्रेसमधील शेकडो, हजारो लोक त्यांच्या ग्रंथांचे चाहते होते. स्वत: जवाहरलाल नेहरु त्यांच्या लेखनाचे चाहते होते. पण त्यांचा कॉंग्रेस राजकारणाशी काही संबंध नव्हता. राजकीय नेते मधून मधून त्यांना भेटत; पण त्यांच्याशी ते राजकारणावर कधी बोलत नसत.

त्यांच्या जीवनात प्रमुख तीन प्रश्न होते. आणि कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?

स्वातंत्र्याच्या उदयकाळी कॉंग्रेसचे श्रेष्ठ नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी संविधान सभेचे सदस्य होण्यास पाचारण केले. आम्हांला तत्त्वज्ञ मार्गदर्शकाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापूर्वी काही वर्षे ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापीठाचे ते कुलगुरु होते. प्रशासन त्यांनी सांभाळलेले होते. कौशल्याने सांभाळलेले होते. पण त्यांना त्यात रस नव्हता. क्षमता नसणे ही जीवनाची उणीव असते. पण क्षमता असूनही रस नसणे हा ऋषीचा स्वभाव असतो. राधाकृष्णनच्या रुपाने तत्त्वज्ञ राजा आपल्यापुढे उभा आहे हे नेहरुंनी जाणले म्हणून त्यांना रशियाचे वकील म्हणून पाठवण्यात आले. पुढे १० वर्षे ते उपराष्ट्रपती होते. इ.स. १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे राष्ट्रपती होते; ज्या माणसाचे राजकीय सामर्थ्य शून्य होते. संघटना, मुत्सद्देगिरी, डावपेच यांत जो रस घेत नव्हता; पण त्यांचे नैतिक वजनच एवढे मोठे होते की, त्या सामर्थ्यावर नतमस्तक होण्यात सत्तेलाही आपला गौरव झाला आहे असे वाटे. दु:ख-निराशेच्या क्षणी ज्याचा सहवास हेच एक मोठे सांत्वन होते, असा हा आमचा राष्ट्रपती होता. राधाकृष्णन हे ऋजू स्वभावाचे म्हणूनच प्रसिद्ध होते. फटकळपणा, तुसडेपणा हा त्यांचा गुण नव्हता. पण त्यांचा सरळ, साधा प्रश्नच कित्येक वेळा समोरच्या माणसाला सपाट करत असे. एका मंत्र्याशी ते सॉक्रेटीसवर बोलत होते. सॉक्रेटीसचे असे एक मत आहे की, आपल्याला कोणकोणत्या विषयांत काहीही कळत नाही हे नक्की माहित असणे शहाणपणाचे लक्षण आहे. राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्यांनी मंत्र्याला विचारले, “आपल्याला ज्या विषयात काही कळत नाही त्यांची यादी तुम्ही केली आहे का?” मंत्री म्हणाले, “यादी आहे पण अपूर्ण आहे.” राधाकृष्णन म्हणाले, “काही हरकत नाही. आपण दोघं बसून ती यादी पूर्ण करुन टाकू”.

संकेत त्यांच्याकडून पाळले जातीलच याची खात्री नसे. सर्व संकेतांच्या पलीकडे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. संकेत मोडले जात; तेव्हा बहुधा सत्यच त्यांच्या तोंडून बाहेर पडे. हा गृहस्थ निर्भयपणे सत्य बोलण्याचा संभव आहे, याचीच अनेकांना जरब बसे.

डॉ. राधाकृष्णन सोव्हिएत रशियाला भारताचे वकील होते. स्टॅलीनने एकदा त्यांना भेटीसाठी बोलवले. स्टॅलीन सामान्यपणे लोकांना भेट देत नसे. पण हा जगतविख्यात तत्त्वज्ञ. त्यामुळे स्टॅलीनने त्यांना बोलावले. इकडच्या तिकडच्या औपचारिक बाबी बोलून झाल्यावर स्टॅलीन म्हणाले, “डॉक्टर, आपण रशियात आहातच तर रशियन जनतेने जी महान संस्कृती उभारलेली आहे, तीही पाहून घ्या. नव्या भारताच्या उभारणीला आमच्या अनुभवाचा उपयोग होईल.”

राधाकृष्णन म्हणाले, “महाराज, आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता व समुद्रात माशाप्रमाणे खोल वावरु शकता हे तर मलाही माहीत आहे. पण पृथ्वीवर माणसाप्रमाणे वागायला शिकलात का?” तत्त्वज्ञाने हुकुमशहाच्या तोंडावर त्याच्या हुकुमशाहीचा निषेध नोंदवण्याचाच हा प्रकार होता. पण स्टॅलीनने हा फटका शांतपणे सहन केला. वकिलाने काय बोलावे या संकेताचा हा भंगच होता. पण तत्त्वज्ञाने काय बोलावे याच्याशी हा मुद्दा सुसंगत होता. इतर कुणी असे बोलले असते तर चोवीस तासांत रशियातून त्याची हकालपट्टीच झाली असती.

त्यांची व स्टॅलिनची अजून एक भेट प्रसिद्ध आहे. स्टॅलीन आजारी होता. म्हणून तो अंथरुणावर निजलेला होता. राधाकृष्णन शेजारच्या कोचावर बसले होते. थोडीफार चर्चा झाल्यावर ते म्हणाले, “आज तुमची प्रकृती बरी नाही. मी नंतर भेटेन”, आणि ते स्टॅलीनच्या जवळ गेले. त्यांच्या चेहर्‍यावरुन हात फिरवत म्हणाले, “भल्या माणसा, थोडा विसावा घे. शरीराचे आजार हे असणारच, ते धैर्याने भोगावे, मनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.” स्टॅलीन म्हणाला, “त्यांचा हात किती वात्सल्य व मायेने भरलेला आहे.” आता हाही संकेतभंग होय! पण आजारी माणसाला तत्त्वज्ञ काय सांगणार?

राधाकृष्णनांच्या वत्सलतेला राष्ट्र सीमेची बंधने थोडीच होती? ते राष्ट्रपती असताना झेकोस्लोव्हाकियाला गेले. तेथील संसदेसमोर त्यांचे व्याख्यान होते. व्याख्यानात ते म्हणाले,”जगभर शांतता नांदावी आणि मानव जातीचा उत्कर्ष व्हावा, यावर तुमच्या आणि माझ्या राष्ट्राचे व जनतेचे एकमत आहे. पण प्रत्येक राष्ट्राचे काही निराळेपण असते. आम्ही असे मानतो की, संसदेचे काम शासनाची तपासणी करुन शासनावर वचक ठेवण्याचे आहे, तुमच्याप्रमाणे संसदेचे काम शासनाच्या सर्व कृतींवर शिक्कामोर्तब करणे एवढेच आहे असे आम्ही मानत नाही.” हा पुन्हा एक हुकूमशाहीला फटका होता. पाहुण्या राष्ट्रपतीने यजमानाचा असा अपमान करायचा नसतो. पण तो राधाकृष्णननी निर्भयपणे केला. प्रसिद्ध पत्रकार लुई फिशर या व्याख्यानाला हजर होते. त्यांनी म्हटले आहे, “त्यांचा आवाज स्पष्टपणाने व गंभीरपणाने निनादत होता. विजेच्या प्रचंड कडकडाटाने सुन्न व्हावे, तसा त्यांचा आवाज होता.” झेकोस्लोव्हाकियाने वृत्तांत देताना ही वाक्ये गाळली. पण ते राष्ट्र गप्प बसले. निषेध वगैरे काही केला नाही. कदाचित राधाकृष्णननी निषेधाच्या पत्राला असे उत्तर पाठवले असते; “बाळांनो, तुमचे पत्र मिळाले. तुमचे कल्याण असो. असे खरे बोलल्यावर असे रागावू नये. अंतर्मुख होऊन चिंतन करावे, असो. सर्वांना आशीर्वाद.” हीच त्यांची पद्धत होती.

इ.स. १९६५ साली भारत-पाक युद्धाच्या संदर्भात ते अमेरिकेला गेले. पाकिस्तान आक्रमक असूनसुद्धा अमेरिकेची सहानुभूती पाकिस्तानलाच होती. या वातावरणात हा दौरा झाला. राधाकृष्णन विमानतळावर पोहचले त्यावेळी पाऊस पडत होता. अमेरिकेचे अध्यक्ष विमानतळावर छत्री घेऊन आले होते. त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे स्वागत केले. डोक्यावर छत्री धरली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “महोदय, निसर्गावर आमचा ताबा नाही, आपले स्वागत असो!” राधाकृष्णन म्हणाले, “अध्यक्ष महाराज, निसर्गावर आपला ताबा नाही हे खरेच आहे. पण आपल्या भावना व बोलणे यावर तर आपण ताबा ठेऊ शकतो, तेवढे केलेत तरी पुरे!”

राधाकृष्णन यांच्या अशा अनेक आठवणी सांगता येतील. त्या आपल्या देशातील आहेत तशा परदेशातीलही आहेत. ह्या सर्वच कथांमधून त्यांचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व आणि सरळ व प्रांजळ मनच प्रकट होते. खरे म्हणजे भारतीय संस्कृतीत जे जे काही मधुर व मंगल आहे; त्या सर्वांचा वारसा लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते.

डॉ. राधाकृष्णन यांचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर नितांत विश्वास होता. जे बलवान आहेत त्यांनीच सत्ता गाजवावी , हे तर जनावरातही घडते. मग तसेच जर माणसांमध्ये घडले, तर मग माणसांत व जनावरात फरक काय? स्वतंत्रपणे विचार करण्याचा माझा हक्क गेला तर मी माणूस आहे याला काय अर्थ उरला? माणसाच्या माणूसपणाशी सुसंगत अशी रचना फक्त लोकशाहीच करु शकते, असा त्यांचा विश्वास होता. पण या विश्वासाला धरुनच त्यांचा एक इशाराही होता. आपण माणूस तयार न करताच लोकशाही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तोही अशा रीतीने की; जे अर्धे मुर्धे माणूस आहेत त्यांनी माणसाप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करत आहोत. यामुळे स्वातंत्र्याचा आविष्कार बेजबाबदार व स्वार्थी वागणुकीत, अनिर्बंध वागणुकीत दिसू लागतो. यालाच सर्वांगीण भ्रष्टाचार असे म्हणतात. मग आपण लोकशाही रुजवणार कशी, हा त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केलेला खरा प्रश्न आहे.

राष्ट्रपतीचे पद हे पाच वर्षांचे होते. नियमाप्रमाणे ते आले आणि गेलेही. पण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्त्व हे तत्त्वचिंतक म्हणून मात्र आहे तसेच स्थिर राहिले. त्यांचे विचार, चिंतन व त्यातून मिळणारे मार्गदर्शन आहे तसेच स्थिर आहे. काही काही शिक्षक हे केवळ वर्गातल्याच विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात. समाजात त्यांचीच संख्या अधिक असते. यापुढे जाऊन काही काही शिक्षक मात्र आपल्या बरोबरच्या आणि अनेक भावी पिढ्यांचेही शिक्षक असतात. हे शिक्षकपण किंवा गुरुपद त्यांच्या खोल व तत्त्वनिष्ठ, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होत असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे दुसर्‍य़ा गटातील थोर आचार्य होते. त्यांच्या ऋषितुल्य तत्त्वचिंतक तपस्वी व्यक्तिमत्त्वामुळे शिक्षक हे पद भूषणावह ठरले आहे.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

मोक्ष, निर्वाण, अपवर्ग किंवा स्वर्ग यांच्या मागे सारी ज्ञानपरंपरा लागल्यामुळे आणि तिने ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याकडील विज्ञान संशोधनाच्या परंपरा तर थांबल्याच शिवाय (या परंपरांवर हक्क सांगणाऱ्यांखेरीज इतरांना विचार करण्याचा अधिकारच नसल्यामुळे) विज्ञानाला पोषक असणाऱ्या आरंभीच्या विचारसरणींचाही येथे शेवट झाला. कणाद, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट किंवा तेव्हाची गणितज्ञांची व खगोलशास्त्रज्ञांची परंपरा थांबली आणि ऐहिक जीवनाच्या विचारावर भर देणाऱ्या जडवादाच्या परंपराही लोप पावल्या. जीवन मिथ्या आहे, ते दुःखमय आणि क्षणभंगुर आहे व त्याकडे पाठ फिरवून संन्यास किंवा निर्वाण साधणे हेच जीवनाचे परमोच्च ध्येय आहे ही शिकवण ऐहिकतेच्या व जडवादाच्या जीवावर उठणारीही होती. ज्या समाजात जडवादाच्या व ऐहिकतेच्या विचारपरंपरा शाबूत राहिल्या त्या समाजात विज्ञान अंकुरले आणि शोधपरंपराही टिकल्या.

विचार करणाऱ्यांचा वर्ग वेगळा आणि श्रम करणाऱ्यांचे समूह वेगळे असे विभाजन जेव्हा समाजात घडून येते तेव्हाच समाजात अध्यात्मवादी आणि जडवादी परंपरा अशा वेगळया होत असतात. कष्टकऱ्यांच्या वाटयाला आलेले कष्ट त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून आले आहेत. हे प्रायश्चित्त पूर्ण केल्याखेरीज त्यांना पुढचा चांगला जन्म चांगला मिळणार नाही हे जोवर त्यांच्या मनावर बिंबविले जात नाही तोवर विचारांवर ताबा ठेवणाऱ्यांचे जीवन व्यवहार सुरक्षीत होत नाहीत. धनवंतांच्या वाटयाला येणारे सुख त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना मिळाले आहे हेही त्याचसाठी श्रम करणाऱ्यांच्या मनावर ठसवावे लागत असते. हा संस्कार समाजमनावर उमटविण्याचे काम धर्माने केले. (याचसाठी मार्क्सने त्याला अफूची गोळी म्हटले आहे) तेवढयावरच या धर्मपरंपरा थांबल्या नाहीत. ऐहिक जीवनाचा विचार करणाऱ्या आणि ते सुखी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या जडवादाच्या परंपराही त्यांनी नाहिशा करून संपविण्याचे काम केले.

वास्तविक जडवादाच्या (बार्हस्पत्य, लोकायत किंवा चार्वाकमताच्या) मांडणीची देशातील परंपरा वेदांहून जुनी आहे. वेदोपनिषदात त्या परंपरेवर आलेली टीका आणि विरोध लक्षात घेतला की तिचे चेतन परंपरेएवढेच किंबहुना तिच्याहूनही प्राचीन असलेले अस्तित्व लक्षात येते. ही परंपरा एकेकाळी अतिशय प्रतिष्ठित व सन्माननीयच राहिली असावी असे मानण्याएवढा पुरावा आपल्या आदरणीय धर्मग्रंथात उपलब्ध आहे. महाभारताच्या वनपर्वात द्रौपदी म्हणते,’माझ्या वडिलांनी मला लोकायतमताची शिकवण देण्यासाठी अधिकारी माणसांची नियुक्ती केली होती.’ एखादा राजपुरुष आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी ज्या संप्रदायाच्या गुरूंची नियुक्ती करतो तो संप्रदाय प्रतिष्ठित व सन्माननीय असणेच भाग आहे. पुढच्या काळात झालेल्या पाणिनीने चार्वाक किंवा लोकायत हा अन्विक्षकीचा विचार असल्याचे मत नोंदविले आहे. कृषी, उत्पादन आणि ऐहिक उपलब्धींची चर्चा करणारी शास्त्रे अन्विक्षकीत येणारी आहेत हे लक्षात घेतले की लोकायत मताचे पाणिनीच्या काळात मान्य असलेले श्रेष्ठत्वही ध्यानात येते. चार्वाकांच्या परंपरेला पहिला ज्ञात विरोध बौध्द परंपरेकडून झाला. बुध्द भिक्षुंनी चार्वाकांचे ग्रंथ वाचू नयेत अशी या परंपरेची आरंभीची शिकवण आहे.

चार्वाक मताचे खंडन करणारी वैदिकांची परंपराही जुनी आहे. ती बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांपासून (इ.स.पूर्वी दिडशे वर्ष) सुरू होत असली तरी या सूत्रांनी या मताला निंद्य ठरविल्याचे दिसत नाही. वेदांत विचारांचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी ज्या परंपरांचे खंडन नंतरच्या काळात वैदिकांनी केले त्यात चार्वाक मत पहिल्या क्रमांकावर आहे. ते सर्वप्रथम खोडून काढण्यावर साऱ्या वैदिकांनी भर दिला आहे. मात्र शंकराचार्यांपर्यंतच्या या परंपरेनेही चार्वाकांना अनैतिक वा चंगळवादी ठरविल्याचे दिसत नाही. या काळापर्यंत बौध्द व जैनांच्या परंपरांनीही चार्वाकांवर टीका केली आहे. मात्र त्यांनी त्यांना अनैतिक वा अमंगल मानल्याचे दिसत नाही.

या मताची टवाळी करण्याचा व ते अनीतीमान ठरविण्याचा प्रयत्न दहाव्या शतकानंतर सुरू होतो. ते अनैतिक ठरवत असतानाच त्यावर पोरकटपणाचा शिक्का उमटविला जातो. त्यासाठी त्यांची विचार परंपरा तोडून मोडून मांडणे, त्यांच्या तोंडी त्यांनी न उच्चारलेले श्लोक पेरणे आणि त्यांच्या संप्रदायाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या गोष्टींना त्यांच्या परंपरेत मांडून दाखविणे यासारखे अशास्त्रीयच नव्हे तर कमालीचे हास्यास्पद प्रकार या टीकाकारांनी केले. ऋण काढून तूप प्या, हे बदनाम वचन चार्वाकांचे असल्याची मांडणी आपल्या सर्वदर्शन संग्रहात माधवाचार्यांनी (चौदावे शतक) केली. वास्तविक हा श्लोकार्ध चार्वाकांचा नाही. तो वेदांत्यांनी तयार करून त्यांच्या तोंडी घातला आहे. मुळात हा श्लोक जयंत भट्ट या नैय्यायिकाच्या नवव्या शतकातील ग्रंथात आला आहे. तो असा,

यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः

यात माधवाचार्यांनी ‘दुरुस्ती’ करून ‘नास्ति मृत्युः अगोचरः’ हा चरण गाळला आणि त्याऐवजी ‘ऋण,,, कृत्वा…’ हा आता साऱ्यांना तोंडपाठ असलेला श्लोकार्ध बसवला. चार्वाक केवळ प्रत्यक्ष प्रमाणवादी होते हे वेदांत्यांचे सांगणेही खरे नाही. त्यांना प्रत्यक्षावर आधारलेले अनुमानही मान्य होते.

अनुमानप्रामाण्याखेरीज विचारच जेथे अशक्य होतो तेथे त्यावाचून एखादी विचारसरणी उभी राहणे शक्यही नसते. मात्र टीकाकारांनी प्रत्यक्षाधारच तेवढा पुढे केला आणि त्यावर आधारलेले अनुमान बाजूला सारले. मग ‘चार्वाक समोर दिसतो तोपर्यंत त्याची पत्नी सधवा आणि तो बाहेर गावी गेला वा दृष्टीआड झाला की ती विधवा’ असे युक्तीवाद करून चार्वाकांना खोडून काढण्याचे सोपे मार्ग निवडले. वास्तव हे की, प्रत्यक्ष शंकराचार्यांनी चार्वाकमत हे जनसामान्यांचे मत आहे असा अभिप्राय नोंदविला आहे. त्या मताचा त्यांनी गौरव केला नसला तरी त्याला अनैतिक वा खोटे म्हणण्याचा प्रकारही केला नाही. जनसामान्यांचे मत चंगळवादी वा अनैतिक असणारही नाही. ज्यांना चंगळ परवडणारी आहे त्याच वर्गात तशी मते जन्माला येऊ शकतात. शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो,’ इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत.’ हा विचार चार्वाकमताचा ऐहिक जीवनाशी असलेला संबंध सांगणारा आहे. पाचव्या शतकात झालेल्या बुध्दघोषाने ‘लोक म्हणजे ईहलोक व तो ज्यांच्या विचारसरणीचा आधार आहे ते लोकायित’ असे म्हटले आहे. दुसऱ्या शतकातील दिव्यावदान सुत्तात जनतेत रुढ असलेले मत ते लोकायत असे म्हटले आहे. त्याआधी विनयपिटकात, कात्यायनाच्या ग्रंथात आणि पातंजलीतही लोकायतमताचा असाच उल्लेख आहे. कौटिल्याने त्याला तर्कशास्त्रातच स्थान दिले आहे. तात्पर्य, शंकराचार्यांपूर्वीच्या विचारवंतांना चार्वाकांचे ईहलोकाश्रयी असणे आणि त्यांना प्रत्यक्षाएवढेच अनुमानप्रमाण मान्य असणे या गोष्टी मान्य आहेत. त्यानंतरच्या काळात वैदिक, बौध्द व जैनांच्या परंपरांनी या विचाराकडे तुच्छ व त्याज्य म्हणून पहायला सुरूवात केली आहे.

प्रत्यक्ष आणि अनुमान ही दोन्ही विज्ञानाची प्रमाणे आहेत. चार्वाकांना ती मान्य होती हे लक्षात घेतले की चार्वाकच भारतातील पहिले वैज्ञानिक विचारवंत ठरतात. त्यांच्या या वैज्ञानिक साधनांचा परिणाम असा की त्यांच्यासमोर कोणतेही कल्पित उभे राहू शकत नाही. मग ईश्वर जातो, धर्म जातात, स्वर्ग-नरक नाहिसे होतात आणि पूर्वजन्म व पुनर्जन्मासारख्या गोष्टी भाकड ठरू लागतात… अडचण ही की जगातला कोणताही धर्म या कल्पितांच्या कुबडयांखेरीज उभा राहू शकत नाही. ज्या धर्मांच्या संस्थापकांना ही कल्पिते आरंभी मान्य नव्हती त्यांच्या उत्तरकालीन अनुयायांनी नीतीअनितीचे नियम लोकांमध्ये ठसविण्यासाठी ती त्यांच्याही धर्मात आणली. वैदिक धर्मात पूर्वजन्म-पुनर्जन्म होते. ईश्वर ही कल्पना त्यातल्या पूर्वमिमांसकांना, सांख्यांना आणि वैशेषिकांना मान्य नसली तरी वेदांताला, नैय्यायिकांना आणि योगाला मान्य होती. त्यांना स्वर्ग-नरक मान्य होता. अवतार कल्पना त्यांनी उशीरा (म्हणजे बुध्दधर्मात बोधीसत्व आल्यानंतर) स्वीकारली. जैनांना मृत्यूनंतरचे जग मान्य होते. बौध्दांनी आत्मा नाकारला. तरी एका वेगळया स्वरुपात पुनर्जन्म स्वीकारला. तिकडे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांना होली घोस्ट, गॉड आणि अल्ला यांच्याखेरीज उभे राहता येणे शक्य नव्हते. सगळेच धर्म प्रत्यक्ष व अनुमान यापैकी कशानेही सिध्द न होणाऱ्या या गोष्टी मान्य करणारे असल्यामुळे त्यांचा चार्वाकांवर व साऱ्या जडवादावर राग असणे स्वाभाविक होते. त्यातून धर्मांना असलेला राजाश्रय चार्वाकांना नव्हता. त्यामुळे धर्मसत्ता, राजसत्ता आणि त्या दोहोंचीही मांडलिक असणारी तेव्हाची अर्थसत्ता या साऱ्यांनी मिळून चार्वाक मत निंद्य ठरविण्याचाच नव्हे तर संपविण्याचाही प्रयत्न केला…

चार्वाकमताचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नसणे या दुर्दैवाची संगती याखेरीज लागत नाही. चार्वाक सगळी कल्पितेच उध्वस्त करीत नाहीत, त्यावर आधारलेल्या धर्मकल्पनांचाही ते विध्वंस करतात. धर्म आणि त्यांचे अनुयायी, सत्ता आणि तिचे सैनिक, धनवंत आणि त्यांचे आश्रित या साऱ्यांनी मिळून चार्वाकांचे मत आणि नाव मिटविण्याचा प्रयत्न या काळात केला असेल तर त्याचे नवल वाटण्याचेही त्याचमुळे कारण नाही. द्रौपदीला आदरणीय असलेले चार्वाकमत धर्मांच्या दावेदारांनी पुढल्या काळात अनीतीमान आणि चंगळवादी कसे ठरविले याचा ऐतिहासिक शोध घेणे या संदर्भात महत्वाचे ठरावे.
तेराव्या शतकात ‘तत्वोपप्लव सिंह’ या नावाचा एक ग्रंथ उपलब्ध झाला आणि अनेकांना तो चार्वाक मताचा वाटला. मात्र त्याचा कर्ता जयराशी भट्ट स्वतःच ‘मी जगातील कोणतेही मत, अगदी चार्वाकांचेदेखील बाधित करून दाखवू शकतो’ असे त्यात म्हणाल्याने तो शोध निरर्थक ठरला. शंकर, रामानुज, मध्व आणि निंबार्कानंतर आलेली सगळी संत परंपरा वेदांतमताचा पाठपुरावा करणारी होती. तिला चार्वाक आपला वाटणे शक्य नव्हते. पंत परंपरेतील सारेच ग्रंथकार पुन्हा वेदांतमताचे होते. नंतरच्या काळात आलेल्या सुधारकांच्या परंपराही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ईश्वर व धर्म मान्य करणाऱ्या होत्या. राजा राममोहन रॉयांना ब्रह्म मान्य तर ज्योतिबांना निर्मिक मान्य होता. टिळक आणि गांधी हे धर्म आणि ईश्वर मानणारे होते. डॉ. आंबेडकरही धर्मशरण झालेले काळाने पाहिले. डॉ. राधाकृष्णन् आणि दासगुप्ता हे तत्वचिंतक वेदांतमताचे असल्याने चार्वाकाला त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही. यापैकी अनेक थोरामोठयांची बुध्दीनिष्ठा मान्य केली तरी त्यांची धर्मशरणता दृष्टीआड करता येत नाही आणि ही धर्मशरणता त्यांना चार्वाकांजवळ जाऊ देत नाही हेही अमान्य करता येत नाही. चार्वाकांना फक्त वैदिकांनी विरोध केला हे म्हणणे खरे नाही. त्यांना बौध्द-जैनांचाही तेवढाच कठोर विरोध होता. आपल्याकडचे जे जोरकस वक्ते एकाच दमात ‘बौध्द-जैन-चार्वाक’ ही नावे ओळीने उच्चारतात त्या ‘बंधूभगिनी’वाल्यांपैकी अनेकांनी त्या तिन्हींतले अंतर आणि विरोध लक्षात घेतला नसतो किंवा समोरच्या श्रोत्यांना तो ठाऊक नाही हे त्यांनी गृहित धरले असते.

धर्म आणि श्रध्देच्या परंपरांनी जडवाद आणि त्याला जवळचा असणारा किंवा त्याचाच अविष्कार असणारा विज्ञानवाद यांची जी कोंडी भारतात केली ती पाश्चात्यांत चर्च आणि इस्लामच्या धर्मश्रध्दांनी कशी केली याचा इतिहास सर्वज्ञात आहे. वैज्ञानिकांचा छळ, ज्ञानाचे नवे अंकूर मुळातून करपून टाकण्याची वृत्ती आणि चिकित्सेला नकार हे सारे तिकडेही घडले. त्यामुळे केवळ तो एकटया भारतीय मनोवृत्तीचा दोष ठरत नाही. श्रध्देच्या आहारी जाऊन विचारांचे श्रम न घेणाऱ्या जगभरच्या एकूणच मानसिकतेचा तो परिणाम आहे. पाश्चात्यांबाबत एक गोष्ट मात्र नोंदविली पाहिजे. त्यांच्या परंपरेत जडवादाचे आग्रही उपासक कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात टिकून राहिले आणि त्यांनी आपल्या कलेतून आणि सांस्कृतिक अविष्कारातून जडवादाच्या नोंदी कायम ठेवल्या. बर्नी, लिओनार्दो यासारख्या ख्यातनाम कलावंतांच्या कलानिर्मितीत या नोंदी आल्या आहेत.

मात्र धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि विद्वत्सत्ता या साऱ्यांच्या शतकानुशतकांच्या विरोधानंतरही भारतात चार्वाक मत कायम राहिले याचे मुख्य कारण प्रत्यक्ष व अनुमान या त्याच्या विचार कसोटया हे आहे. या विज्ञानाच्याच कसोटया असल्यामुळे उत्तरकाळात झालेल्या विज्ञानाच्या विकासाबरोबर त्यांचे महत्व वाढले आणि चार्वाक पुन्हा जिवंत व सबळ झाले. भारतात चार्वाकमत नाकारले गेल्याने प्रत्यक्ष व अनुमानाधारित विचारप्रणाली विचारांच्या कक्षेबाहेर गेली आणि कणाद, ब्रह्मगुप्त, चरक आदींपासून सुरू झालेली शोधपरंपरा थांबली. चार्वाक नाकारल्यामुळे केवळ वैज्ञानिक विचारच भारतात थांबला नाही तर त्याने मांडलेली ऐहिकाच्या व्यवस्थेची व जवळिकीची बाजूच येथे नाकारली गेली. त्यामुळे वर्तमान जीवनाहून त्या पलिकडचे (म्हणजे मृत्यूनंतरचे) जीवन महत्त्वाचे ठरले आणि जीवनमुक्ती त्या दोहोंहून महत्त्वाची ठरली. याचा परिणाम विकासावर झाल्यावाचून राहिला नाही. पारलौकिकाकडे लक्ष लावणे आणि जीवनाकडे पाठ फिरवणे हेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ निधान होणे याचा ऐहिकावर जो परिणाम झाला तो आपण अजून अनुभवत आहोत. पराजय, गुलामगिरी, परक्यांच्या सत्ता आणि देशीत्वाचा क्रमाने होत गेलेला संकोच हे सारे त्यातून आले. जपावे, टिकवावे आणि वाढवावे असे काही नाहीच हे एकदा मनाने घेतले की करायचे काही उरतही नाही. या मानसिकतेतून बाहेर पडायला देशाला 19 आणि 20 या शतकांपर्यंत रखडावे लागले. अजूनही ती पुरती गेली नाही. आपल्या तुलनेत पाश्चात्यांमध्ये सुधारणावादाचा उदय लवकर झाला. मात्र आपण असू वा ते, साऱ्यांनीच तशा उदयाआधीची किती शतके गमावली? 21 वे शतक उजाडले तरी चार्वाकाचे मत उच्चारायला माणसे धजावत नसतील तर त्याचे कारणही परंपरेने त्या मतावर लादलेल्या पापाचरणाच्या व चंगळवादाच्या शिक्क्यातच शोधावे लागते.

या प्राक्तनाला चार्वाकपंथाचे लोकही काहीसे जबाबदार आहेत. चारू + वाक् म्हणजे चतुर बोलणारे असा त्यांच्या नावाचा अर्थ होत असला तरी त्यातले अनेकजण फार उदंड आणि उध्दटही असावे. चार्वाकांना प्रश्न विचारण्याची सवय होती. ते व्यवस्थेला प्रश्न विचारायचे. त्यातून ते ‘काय’ किंवा ‘कसे’ यासारखे नम्र प्रश्न विचारीत नसत. श्रध्दावानांच्या परंपरेला न मानवणारा प्रश्न ‘कां’ आणि ‘कशावरून’ हा आहे. चार्वाक तोच नेमका विचारीत असत. वेदवाक्यम् प्रमाणम् किंवा बुध्दं शरणम् असे मनोमन म्हणणाऱ्या काळात ‘पण ते कशासाठी’ असा प्रश्न विचारणारे लोक इतर शरणागतांना उध्दट वाटले असतील तर ते नवलाचेही नव्हते. वेद ही धूर्त, भंड आणि निशाचरांची निर्मिती आहे हे त्यांचे प्रसिध्द वचन त्यातले आहे. कौरवांना पराजीत करून रणांगणावरून परतणाऱ्या पांडवांना उद्देशून ‘आलात भाऊबंदांना मारून, आता खुशाल राज्य भोगा’ असे ते तोंडावर ऐकवणार असतील तर त्याचा परिणामही त्यांना भोगावाच लागणार. यज्ञाच्या मंडपात शिरून प्रत्यक्ष यजमानाला ‘यज्ञवेदीवर मारलेला बोकड सरळ स्वर्गात जात असेल तर बोकडाऐवजी आपल्या बापाचाच बळी कां देत नाही’ असे ते विचारणार असतील तर त्यांना मंडपात मारच खावा लागणार. चार्वाकांवर सगळे धर्म आणि सत्ता कां उलटल्या असाव्या याची कारणे युरोपातील वैज्ञानिकांचा तिकडच्या चर्चने जो छळ केला त्यावरूनही लक्षात येण्याजोगी आहेत.

चार्वाकांचा जडवाद जगला असता तर जीवनाविषयीची आस्था वाढली असती आणि ते सुखी करण्यासाठी जास्तीचे काही करण्याच्या प्रवृत्ती वाढीला लागल्या असत्या. जीवन मिथ्या नाही. ते दुःखमयही नाही. ते आपले आहे, शिवाय ते एकच आहे, यानंतर पुनर्जन्म नाही, दुसरे आयुष्य नाही, मृत्यूनंतर स्वर्ग-नरक असे काही नाही. सबब आहे ते जीवन नीट, सुंदर आणि सुखकर करू ही शिकवण प्रभावी झाली असती तर ज्ञानविज्ञानाच्या परंपरा आपल्याकडेही वाढीला लागल्या असत्या… प्रत्यक्षात असे काही झाले नाही हे मात्र खरे आहे.

जडवादाची मांडणी थांबल्यामुळे चर्चा आणि वादविवाद संपले. आपल्या विचारांची आणि श्रध्दांची चिकित्सा करणाऱ्या प्रश्नार्थक प्रवृत्ती नाकारल्यामुळे धर्मविचारात आत्मसंतुष्टता आली. परिणामी तेही फारसे पुढे गेले नाहीत. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींच्या ऱ्हासाला जडवादाची समाप्ती कारणीभूत झाली तशी ती एकूण बुध्दीच्या वाढीलाही मारक ठरली असा या साऱ्या अनुभवाचा अर्थ होतो. ग्रीकांच्या परंपरांत जडवाद आहे. त्यांची आरंभीची परंपराच विज्ञानवाद्यांची आहे. त्या परंपरेचे जे अंग अरबांनी जपले त्यात जडवादाचा भाग शिल्लक राहिला. युरोपात झालेल्या रेनेसॉमध्ये जे वैचारिक मंथन उभे राहिले त्यातही जडवाद आहे. तर्क, ज्ञान आणि विज्ञानाच्या शोध आणि चिकित्सेच्या सगळया प्रवाहांशीच या वादाचे नाते आहे. वैज्ञानिक प्रगती कल्पिताच्या आधारे होत नाही, ती जडवादातील इंद्रियगोचर सत्याची कास धरूनच होत असते.

हा विचार एवढा दडपला गेल्याने आपले माघारलेपण वाढले. विचारांऐवजी श्रध्दा, प्रयोगांऐवजी निष्ठा आणि बुध्दीऐवजी मन यांना प्राधान्य आल्याने आपली परंपरा विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिली. भारतीय धर्मांमध्ये वाद होते, धर्मचर्चा आणि संगिष्ठीसारख्या परंपरा होत्या. नंतरचे भाष्यकार अगोदरच्या भाष्यकारांचे खंडन करताना दिसले. काही जागी नंतरच्या ग्रंथांनी जुन्या ग्रंथांना आणि त्यांच्या प्रतिपादनांना छेद दिल्याचेही आढळले. मात्र एका परंपरेने वा धर्माने दुसऱ्या परंपरेचे वा धर्माचे ग्रंथ जाळून नाहिसे केल्याचा पुरावा आपल्या इतिहासात नाही. भिन्न धर्म आणि परंपरा येथे एकाच वेळी राहिल्या आणि आपल्या बळावर विकसीत झाल्या वा खुरटल्या. सर्व धर्मांचे ग्रंथ आहेत, त्यातल्या पंथोपपंथांचेही ग्रंथ उपलब्ध आहेत… एवढया उदार परंपरेत चार्वाकांचेच ग्रंथ तेवढे कां नसावेत? जो तत्वविचार महाभारतात प्रतिष्ठित होता, ज्याचे अस्तित्व प्रमाणांनी सिध्द होत होते आणि ज्याचे खंडन प्रथम करणे नंतरच्या सर्व धर्मग्रंथांना गरजेचे वाटले त्या विचाराचा एकही ग्रंथ देशाला शोधता येऊ नये याचा अर्थ कसा लावायचा? काही विचारवंतांच्या मते हे ग्रंथ सापडण्याची शक्यता अजून संपली नाही. भरताच्या नाटयशास्त्रासारखा निरुपद्रवी ग्रंथ, अर्ध्यामर्ुध्या स्वरुपात का होईना सापडायला विसावे शतक यावे लागले तर उद्या चार्वाकांचे ग्रंथही हाती येतील असे या वर्गाचे म्हणणे आहे. ते जेव्हा सापडायचे तेव्हा सापडतील. मात्र तोवर त्या ग्रंथांची अनुपलब्धी आपल्या धर्मपरंपरांच्या औदार्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरते हे नाकारून कसे चालेल?

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

भारताला ‘कुणामुळे’ आणि ‘कशामुळे’ स्वातंत्र्य मिळाले? जे मिळाले ते खरोखरच ‘स्वातंत्र्य’ होते का?  स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय? गेल्या ६३ वर्षांकडे पाहता भारताने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर काय व किती प्रमाणात साध्य केले आहे?

वरवर पाहता हे प्रश्न सोपे वाटतात. परंतु या प्रश्नांच्या ऊहापोहावरून देशात व परदेशात प्रचंड खडाजंगी वाद झाले आहेत. (काही वाद आजही चालू आहेत.) काहींना असे प्रश्न विचारणे हेही देशद्रोहीपणाचे वाटते. पण असे अनेक इतिहासकार, राजकीय नेते वा संघटना आहेत की ज्यांच्या मते ‘खरा’ इतिहास समजून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवीत आणि त्यात देशद्रोह वगैरे काही नाही, असे त्यांना मनापासून वाटते.

भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत   उपनगरीय मराठी साहित्य संमेलनात खुद्द कविवर्य वसंत बापट यांनी प्रश्न विचारला होता- स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कसले स्वातंत्र्य?.. वगैरे.

त्याच वर्षी दलित पॅन्थर्सच्या काही कवींनीही ‘तिरंगा गेला खड्डय़ात!’ अशा आशयाचे विधान केले होते. प्रत्यक्षात त्यांनी वापरलेला शब्द ‘खड्डय़ात’ असा नव्हता, तर तो पॅन्थर शैलीतील अधिक उग्र शब्द होता. विशेष म्हणजे तोच काळ म्हणजे १९७२ ते १९७५ हा देशातील कमालीचा अस्वस्थतेचा काळ होता. सर्व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, साठेबाजी, काळाबाजार, महागाई, सामाजिक असंतोष, प्रक्षोभक वातावरण आणि प्रखर राजकीय आंदोलने- यामुळे स्वातंत्र्याबद्दलची पवित्र भावनाही अवकळाग्रस्त झाली होती. इंदिरा गांधींच्या पाकिस्तानविरोधी युद्धातील अपूर्व विजय आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले १९७१-७२ चे वातावरण लयाला जाऊ लागले होते. आणि त्या परिस्थितीत, अतिशय हिंस्र अशा नक्षलवादाच्या पाश्र्वभूमीवर, इंटलेक्च्युअल वर्तुळातील काही लोकही ‘कुणा स्वातंत्र्य, कुठे स्वातंत्र्य?’ असे प्रश्न विचारू लागले होते. त्या सिनिसिझमच्या वातावरणातच गुजरातचे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशांची संपूर्ण क्रांती, रेल्वे संप आणि त्या अराजकाला उत्तर म्हणून आणीबाणी- असा तो तीन वर्षांचा राजकीय प्रवास होता. आणीबाणीमध्ये तर सर्वच लोकशाही स्वातंत्र्याच्या हक्कांचे आकुंचन झाले होते.

१९४७ नंतर प्रथमच वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आली. मोर्चे, आंदोलने, संप, हरताळ यावर बंदी आली. ‘विनाकारण’ लोकांना अटकेत टाकायचा परवाना पोलिसांना प्राप्त झाला. वरवरच्या शांत व शिस्तबद्ध परिस्थितीला भीती व शासकीय दहशतीने आतून ग्रासलेले होते. साहजिक स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत, १९७२ साली, उपस्थित झालेल्या प्रश्नांना आणीबाणीने अधोरेखित केले. आणीबाणी म्हणजे ‘दुसरे पारतंत्र्य’ आणि १९७७ चा इंदिरा-काँग्रेसचा पराभव आणि जनता पक्षाचा विजय हे ‘दुसरे स्वातंत्र्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यातूनच ‘पहिल्या स्वातंत्र्या’विषयीसुद्धा पुन्हा ऐतिहासिक प्रश्न नव्याने मांडले जाऊ लागले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काही तत्सम हिंदू संघटनांनी १५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्यदिन म्हणून स्वीकारलाच नव्हता. फाळणी होऊन मिळालेले स्वातंत्र्य त्यांना मान्यच नव्हते. त्यांच्यापैकी काहींच्या दृष्टिकोनातून तर तो ‘काळा दिवस’ होता. पुढे जवळजवळ ५० वर्षे संघकार्यालयांवर १५ ऑगस्टला तिरंगा फडकाविणे निषिद्ध होते! (अजूनही काही संघ कार्यालयांवर तिरंगा फडकत नाही.) स्वातंत्र्यानंतर पाचच महिन्यांनी गांधीजींची हत्या झाली. नथुराम हा संघाचा कार्यकर्ता होता की, सावरकरांचा अनुयायी होता, वगैरे चर्चा फिजूूल आहे. कारण तो कट्टर हिंदुत्ववादी होता आणि गांधीजींचे नेतृत्व व स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी त्याला मान्य नव्हत्या. पुढे कित्येक वर्षे, म्हणजे संघाने गांधीजींना ‘प्रात:स्मरणीय’ दर्जा देईपर्यंत हिंदुत्ववादी वर्तुळात गांधीजी (आणि नेहरू) हे मुख्य राजकीय/ वैचारिक शत्रू होते.

अशा हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून फक्त तेच स्वातंत्र्य ‘खरे’ ठरले असते, जर अफगाणिस्तानपर्यंतचा भारतीय उपखंड एकवटलेला व स्वतंत्र झाला असता तर! गेल्या ६३ वर्षांतील हिंदुत्ववाद्यांच्या विविध छटांमधून हा ‘स्वातंत्र्यविरोध’ व्यक्त झाला आहे. नरेंद्र मोदींपासून प्रज्ञा ठाकूपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंपासून ते बजरंग दलापर्यंत. आता उघडपणे १५ ऑगस्ट हा त्यांच्यापैकी कुणीही ‘काळा दिवस’ म्हणून मानत नसले, तरी ती मानसिकता गेल्या सहा दशकात पुसली गेलेली नाही.

फक्त अशा हिंदू परिवारामध्येच १५ ऑगस्ट हा ‘काळा दिवस’ नव्हता, तर काही कम्युनिस्ट संघटना व पक्षांनाही तो स्वातंत्र्यदिन म्हणून मान्य नव्हता. त्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत सर्व कामगार, कष्टकरी, शेतकरी वर्ग, भांडवलशाही, सरंजामशाही, जमीनदारी, सावकारी यांच्या पाशातून मुक्त झालेला नाही, तोपर्यंत हे स्वातंत्र्य खोटे आणि फसवे आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीशी ‘तडजोड’ करून हे स्वातंत्र्य ‘शोषक’ वर्गाने म्हणजे भांडवलदार- सरंजामदारांनी प्राप्त केले आहे. इंग्रजांचा युनियन जॅक जाऊन ‘तिरंगा’ फडकला असला तरी कामगार- शेतकऱ्यांना आता ‘खऱ्या’ स्वातंत्र्यासाठी पुन्हा सज्ज व्हावे लागणार आहे. पुढे गाजलेला तेलंगणचा सशस्त्र मुक्ती लढा हा त्याच खऱ्या स्वातंत्र्यासाठी कम्युनिस्टांनी (मुख्यत: कॉम्रेड बी. टी. रणदिवेंच्या प्रबंधानुसार) केलेला संघर्ष होता. आजही तेलंगणमध्ये काही वृद्ध क्रांतीकारकांच्या त्यावेळच्या आठवणी ताज्या आहेत. कम्युनिस्टांमधील दोन मुख्य मतप्रवाह तेव्हाच पक्षात प्रकट होऊ लागले होते. कॉम्रेड रणदिवेंच्या मते १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन नव्हता. कॉम्रेड डांगे यांच्या मते हे स्वातंत्र्य म्हणजे कामगार- शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या मार्गावरील महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या पराभवामुळे भारतीय जनतेला सर्व लोकशाही हक्क प्राप्त झाले असून त्यांच्या आधारे पुढील संघर्षांसाठी व्यापक संघटना उभारणे आता शक्य होते.

कॉम्रेड मोहित सेन यांनी तर पुढे भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे वर्णन ‘अनोखी व ऐतिहासिक भारतीय क्रांती’ असेच केले होते. परंतु १५ ऑगस्ट १९४७ आणि पुढेही बरीच वर्षे कम्युनिस्ट संघटना स्वातंत्र्यदिन मानत नसत, साजरा करणे दूरच राहो. उग्रवादी कॉम्रेड्स् तर तो ‘काळा दिवस’च मानत. (आजच्या नक्षलवाद्यांची मानसिकताही त्याच तत्कालीन प्रवृत्तीत आहे.)

म्हणजेच वसंत बापटांनी १९७२ साली व्यक्त केलेली ‘कुणा स्वातंत्र्य- कुठे स्वातंत्र्य?’ ही भावना समाजात होतीच. असे असूनही बहुसंख्य भारतीयांनी १५ ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन मानला होता. २६ जानेवारी १५५० रोजी भारत देश अधिकृतपणे लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ साली होऊन भारतीय जनतेने ते स्वातंत्र्य स्वीकारले आणि १५ ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व  जगाच्या इतिहासात यथार्थपणे नोंदवले गेले.

आज आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असलो तरी हे स्वातंत्र्य कुणामुळे व कसे आणि कोणत्या परिस्थितीत मिळाले, यासंबंधी इतिहासकारांमध्ये वाद आहेतच. म्हणूनच १९४७ ते १९५० (स्वातंत्र्य ते प्रजासत्ताक) या तीन वर्षांतील जागतिक संदर्भ महत्त्वाचे ठरतात.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दोन वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्या नाझी जर्मनीने हिटलरच्या पाशवी नेतृत्वाखाली युरोप पादाक्रांत करून नंतर जगावर आपली अधिसत्ता प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती, तो जर्मनी बऱ्याच अंशी बेचिराख झाला होता आणि हिटलरला स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करावी लागली होती. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपियन साम्राज्यशाही खिळखिळी झाली होती. युरोपातील सर्वात प्रभावी व विस्तृत साम्राज्य अर्थातच इंग्रजांचे. त्यामुळे काही स्वयंभू इतिहास अभ्यासक असे मानतात की, भारतीय स्वातंत्र्याचा (अप्रत्यक्ष) जनक हिटलर आहे. जर हिटलरने (जर्मनी बेचिराख होईपर्यंत) युद्ध चालविले नसते, तर इंग्रज साम्राज्याला असा जबरदस्त तडाखा बसला नसता. क्षीण आणि खिळखिळ्या झालेल्या इंग्रज राज्यकर्त्यांना भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. ज्या विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने जर्मनीचा पराभव केला, त्याच चर्चिल यांचा इंग्लंडच्या मजूर पक्षाने दारुण पराभव केला. तेथे मजूर पक्षाचे राज्य आल्यावर पंतप्रधान अ‍ॅटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया सुरू केली. (परंतु फाळणीचे कारस्थानही १९४० नंतर इंग्लंडच्या बारभाईंमध्ये शिजू लागले होते. महमद अली जिनांनी पाकिस्तानची घोषणा १९४० नंतर आक्रमकपणे प्रचारायला सुरुवात केली, हा योगायोग नाही.)

भारताला स्वातंत्र्य ‘दिल्यानंतरही’ दक्षिण आशियात कारवाया करण्यासाठी एक तळ इंग्रज साम्राज्यवाद्यांना (आणि नंतर अमेरिकेला) हवा होता. तो पाकिस्तानच्या रुपाने त्यांनी निर्माण केला. गेली ६३ वर्षे भारताचे स्वातंत्र्य फाळणीच्या त्या जोखडात अडकून पडले आहे. भारताचे सुमारे दीड लाख कोटी रुपये दरवर्षी केवळ संरक्षणावर खर्च होतात- म्हणजे पाकिस्तानापासून (आणि दहशतवादी, काश्मिरी फुटीरवादी यांच्यापासून) आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी. या युद्धखर्चाचा मोठा फायदा अमेरिकन व युरोपीय शस्त्रास्त्रनिर्मात्यांना होतो. शिवाय भारताचे अमेरिका-इंग्लंडवरचे अवलंबित्त्वही वाढते. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेच मुळी दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर. अमेरिका-ब्रिटन पाकिस्तानच्या बाजूने आणि सोविएत रशिया भारताच्या बाजूने अशी ती शीतयुद्धकालीन सत्तेची नेपथ्यरचना होती.

किंबहुना असेही म्हणता येईल की, शीतयुद्धाच्या कॅनव्हासमुळेच भारतीय स्वातंत्र्याचे (आणि फाळणीचे) परिमाणच बदलून गेले. वस्तुत: भारताची लोकसंख्या या घडीला १२० कोटी आणि पाकिस्तानची १७ कोटी. म्हणजे पाकिस्तानपेक्षा लोकसंख्येने भारत सातपट मोठा आहे. भारतात ६३ वर्षे लोकशाही प्रजासत्ताक व सेक्युलॅरिझमचा ढाचा टिकून आहे. याच काळात पाकिस्तानात सुमारे ४० वर्षे लष्करी हुकूमशाही आहे. तरीही ‘लोकशाहीवादी’ पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा (व मदत) पाकिस्तानला आहे. कारण अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे शीतयुद्धाचे परिणाम.

सोविएत युनियनचे विघटन झाल्यानंतर पारंपरिक अर्थाने शीतयुद्ध संपले तरी त्या शीतयुद्धाचे ढग अजूनही जागतिक राजकारणाच्या आकाशात आहेतच. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, दहशतवाद हासुद्धा त्या शीतयुद्धाचाच ‘उपसंहार’ आहे. भारताच्या स्वातंत्र्याला आज त्याच उपसंहाराने घेरलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला जसे दुसऱ्या महायुद्धाचे व नंतर शीतयुद्धाचे संदर्भ आहेत, तसेच चीनमधील क्रांतीचेही आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि चीनचा क्रांतीसंघर्ष हे पूर्णपणे समकालीन आहेत. (डॉ. कोटणीस की अमर कहानी!) भारतीय स्वातंत्र्यलढय़ाला चीनची आणि चीनच्या क्रांतीला भारताची पूर्ण सहानुभूती होती. भारतीय राज्यघटना तयार होत होती, तेव्हाच चीनची क्रांती यशस्वी झाली- १ ऑक्टोबर १९४९ (म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी पण भारतीय प्रजासत्ताक स्थापनेच्या चार महिने अगोदर). चीनने केलेल्या जमीन सुधारणा कायद्यापासून ते सामाजिक विषमता निर्मूलनापर्यंत, शेतकरी क्रांतीपासून ते गतिमान आर्थिक परिवर्तनाच्या कार्यक्रमापर्यंत भारत व चीन यांचा समांतर प्रवास झाला आहे. चीनची प्रगती कम्युनिस्ट एकाधिकारशाहीच्या पद्धतीतून आणि भारताची प्रगती लोकशाही पद्धतीतून झाली आहे. त्याचे संस्कार दोन्ही देशांवर झालेले आपण पाहात आहोत.
माओंच्या नेतृत्वाचा चीनमधील उदय, विकास आणि विस्तार आणि भारतातील गांधीजींचे नेतृत्व थोडय़ाफार वर्षांच्या फरकांनी समांतरच वाढलेले आहे. मुख्य फरक हा की क्रांती यशस्वी झाल्यानंतर पुढे २७ वर्षे माओंचेच नेतृत्व चीनमध्ये प्रभावी राहिले. गांधीजींची हत्या स्वातंत्र्यानंतर पाच महिन्यांनी झाली.
गांधीजींची हत्या झाली नसती तर भारतात स्वातंत्र्योत्तर काळात काय झाले असते? हा प्रश्न इतिहासातील ‘जर-तर’मधला आहे. गांधीजी माओंपेक्षा वयाने मोठे होते, पण दोघांमधील समान धागा म्हणजे त्यांचे र्सवकष व्यवधान. माओंना फक्त राजकीय-आर्थिक-सामाजिक परिवर्तन अभिप्रेत नव्हते, तर ‘सांस्कृतिक’ क्रांतीही अभिप्रेत होती. गांधीजींचा ‘स्वातंत्र्य’ संकल्पनेचा अर्थही फक्त राजकीय वा आर्थिक नव्हता, तर सामाजिक- सांस्कृतिक पण होता. पण हे समान घटक झाले.

त्यांच्यातील मुख्य फरक होता तो साध्य आणि साधन यातील विवेकाचा. माओंना वर्गयुद्ध अभिप्रेत होते आणि भांडवलदार- जमीनदार वर्गाचे निर्दालन हे त्यांचे उद्दिष्ट होते. हिंसेशिवाय ते निर्दालन म्हणजेच क्रांती संभवतच नाही. माओंचा अर्थातच ‘अहिंसा’ तत्त्वज्ञानावर विश्वास नव्हता. (जो आजही कोणत्याच माओवाद्यांचा नाही. भारतातील कम्युनिस्टांनी लोकशाही परंपरा स्वीकारली असली, तरी अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाहीच.) गांधीजींनाही भांडवलशाही, जमीनदारशाही मान्य नव्हती. परंतु भांडवलदार वर्गाचे निर्दालन करण्याऐवजी त्या वर्गाचे हृदयपरिवर्तन करून सामाजिक-आर्थिक विषमता दूर करता येईल, असे त्यांचे मत होते. त्यांना ‘भूदान’ प्रक्रिया स्वेच्छेने घडवून आणायची होती आणि विनोबांनी नेमका तोच प्रयत्न केला. गांधीजींच्या दृष्टिकोनातून भांडवलदार हे उद्योगांचे व संपत्तीचे ‘ट्रस्टी’ म्हणजे विश्वस्त होते. लोभ आणि संपत्तीचा संचय वा आर्थिक मक्तेदारी गांधीजींना मान्य नव्हती. पण सर्जनशीलता, उद्यमशीलता आणि व्यापारशीलता समाजात ठेवायची असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे, असे त्यांचे मत होते. माओंना व्यक्तिस्वातंत्र्य हे तत्त्वज्ञान म्हणूनच अमान्य होते. व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना ही ‘भांडवली फसवणूक’ आहे, असे माओंचे मत होते. गांधीजींच्या दृष्टिकोनातून ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा पाया मूलत: ‘आध्यात्मिक’ होता. कम्युनिस्टांच्या दृष्टीकोनातून अध्यात्म हे थोतांड होते.

गंमत म्हणजे येथील हिंदुत्ववादी हे भारताच्या आध्यात्मिक वारशाचा गाजावाजा करीत असले तरी त्यांचा गांधीजींना विरोध होता आणि अहिंसेच्या संकल्पनेलाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हवा होता,  पण गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक/सामाजिक परिवर्तनाला त्यांचा विरोध होता. कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर कम्युनिस्ट दोघेही गांधीजींच्या विरोधात होते आणि हिंसेचे समर्थक होते.

भारतीय स्वातंत्र्य हे गांधीजींमुळे नव्हे तर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग वा सावरकर यांच्या प्रयत्नामुळे मिळाले, असे मानणारेही कमी नाहीत. विरोधाभास हा की अहिंसेचा तत्त्वज्ञ हिंसेने मारला गेला आणि तोही हिंदू तत्त्वज्ञानाच्या थोरवीने प्रेरित होऊन! परंतु खुद्द सुभाषचंद्र बोस गांधीजींना सर्वोच्च आदराचे स्थान देत. कॉम्रेड रणदिवेंनाही पुढे बऱ्याच वर्षांनी साक्षात्कार झाला की, गांधीजी हे जगातील एक सर्वश्रेष्ठ ‘मॉरल रिव्होल्यूशनरी’ म्हणजे नैतिक क्रांती घडवू पाहणारे महान क्रांतीकारक होते. ज्या कम्युनिस्टांनी १५ ऑगस्ट हा काळा दिवस मानला होता, त्यांनीच गांधीजींना हे क्रांतीकारकाचे प्रशस्तिपत्र द्यावे, हे कॉम्रेड्स्चे हृदयपरिवर्तन म्हणायचे की विचारपरिवर्तन?

त्याचप्रमाणे संघपरिवाराला गांधीजी प्रात:स्मरणीय वाटावे. हे त्यांचे सांस्कृतिक- आध्यात्मिक परिवर्तन की त्यांच्यातील राजकीय परिवर्तन? भारतीय स्वातंत्र्यलढय़ाने, गांधीजींनी आणि पंडित नेहरूंनी जगाच्या इतिहासाला नवीन मापदंड दिले. खुद्द चीनमध्ये आज भांडवलशाही पद्धतीने विकास होत आहे आणि तेथील कम्युनिस्ट पक्ष त्या लाल भांडवलशाहीचा ‘ट्रस्टी’ म्हणजे विश्वस्त होऊ पाहात आहे. नेल्सन मंडेलांपासून ते बराक ओबामांपर्यंत सर्वाना गांधीजी हेच आदर्श वाटावेत, हे भारतीय स्वातंत्र्याचे व स्वातंत्र्यलढय़ाचे मोठे यश मानावे लागेल. लेनिन, माओ, चर्चिल, रुझवेल्ट यांच्यापेक्षा कितीतरी वरचे स्थान आज गांधीजींना जगभर दिले जाते. भारताचे भविष्य केवळ आर्थिक विकासावर नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक विकासावर मोजले जाणार आहे!