जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘नजरेतले’ गांधी…विकृत तर्क

Posted: एप्रिल 7, 2011 in इतिहास, पुस्तक समीक्षा/परिचय
टॅगस्, , ,

मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेते महात्मा गांधींना आदर्श मानतात. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले, उखडले गेले तर ‘ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात’, असे जगभर म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा मान मिळतो; याची पोटदुखीच ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, त्यातून त्यांचाच वंशवाद प्रकट होतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही. जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘ग्रेट सोल-महात्मा गांधी अॅण्ड हीज स्ट्रगल विथ इंडिया’ या पुस्तकाने सध्या सर्वत्र (विशेषत: भारतात) वादळ उठवले आहे. महात्मा गांधी यांना समलिगी आणि वंशवादी संबोधणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याचा (नेहमीचा) उपाय भारतात अवलंबला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपित्याविषयी अशी खळबळजनक विधाने करण्याच्या पश्चिमी प्रवृत्तीबद्दल आपल्याला काय वाटते? – अशी पृच्छा करणारे पत्र ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्यास असणारे ज्येष्ठ संपादक गोविद तळवलकर यांना इ-मेलद्वारे पाठवले होते. त्या पृच्छेला गोविदरावांनी पाठवलेले हे उत्तर अशा प्रासंगिक विवादांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कसा असावा; याचा जणू वस्तुपाठच ठरावे.

————————————————————————–

३० मार्च २०११

स.न.वि.वि.,

तुमची त्रोटक इ-मेल मिळाली. जोसेफ ललीव्हेल्ड हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे एक काळ संपादक होते. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात त्याच पत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. दक्षिण आफ्रिकेसंबंधी त्यांनी या अगोदर पुस्तक लिहिले आहे. त्यांचे महात्माजींच्या संबंधीचे पुस्तक मी अजून वाचले नाही. परंतु ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या दैनिकात दर शनिवारी पुस्तक परीक्षणे येतात. परवाच्या शनिवारी या पुस्तकावर पानभर परीक्षण आलेले वाचले. तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’ या दोन दैनिकांतील परीक्षणे वाचली.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर दोन परीक्षणे दोन वेगळ्या दिवशी छापली आहेत. त्यापैकी एक हरी कुंझरू यांचे आहे. ते बहुधा अमेरिकेतच राहत असावेत. कुंझरू हे कादंबरीकार आहेत. त्यांनी तर ललीव्हेल्ड यांचे पुस्तक न्याय्य व विचारपूर्ण असल्याची शिफारस केलेली दिसेल !

आपल्याकडे वृत्तसंस्थेचे वृत्त प्रसारित झालेले दिसते. ‘वॉलस्ट्रीट जर्नल’मध्ये परीक्षण लिहिणारे अॅण्ड्र्यू रॉबर्ट्स हे इतिहासविषयक लिखाण करीत असतात. ते ललीव्हेल्ड यांच्याच मताचे दिसतात.

मराठी वृत्तपत्रांत जो मथळा वाचला तो समलिगी संभोगाबद्दल. त्याचा प्रत्यक्ष उल्लेख परीक्षणात आढळला नाही; पण अप्रत्यक्ष एक उल्लेख आहे तो जर्मन ज्यू गृहस्थ हर्मन कॅलेनबाख याचा. तो स्थापत्यशास्त्रज्ञ व शारीरिक व्यायामाचे धडे देणारा होता. नंतर त्याने गांधींना अकराशे एकर जमीन दिली व तिथेच गांधींनी टॉल्स्टॉय आश्रम स्थापन केला. कॅलेनबाख याचे शरीर अर्थातच कमावलेले होते. तो गांधींना व्यायामाचे धडे देत होता की नाही, हे परीक्षणावरून समजत नाही. पण त्याच्यासारख्या माणसाचे शरीर कमावलेले असणारच. त्याची प्रशंसा गांधींच्या पत्रात आहे.

त्याचा फोटो गांधींच्या झोपण्याच्या खोलीत होता. गांधींनी आपल्या पत्नीला दूर ठेवले होते, असा निष्कर्ष लेखक काढतो; पण खुद्द गांधींच्या पत्राचा वगैरे हवाला देत नाही. तो सर्व परिच्छेद हा लेखकाने अगोदर निष्कर्ष काढून मग दिल्याचा संशय येतो. ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’मध्ये परीक्षण लिहिणाऱ्याने ललीव्हेल्ड हे याच बाबतीत नव्हे तर अनेक वेळा कोणत्या आधारावर विधाने करीत आहेत याची नोंद करण्याचे टाळतात, असे म्हटलेच आहे.

या संबंधात एक-दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. लेखकाने जो मजकूर अवतरणचिन्हांत दिला आहे तो गांधींच्या समग्र वाङ्मयाच्या एखाद्या खंडात असेल. लेखकाच्या पुस्तकात त्या खंडाचा क्रमांक व पान नंबर असू शकेल. तेव्हा हे चरित्र व गांधींचे खंड यांचे वाचन सत्य शोधण्यासाठी करून मगच निष्कर्ष काढणे योग्य होईल.

ग्रंथलेखक हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा संपादक होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा एक विशेष हा की, तो समलिगी संभोगाचा भक्कम पाठिराखा आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेमध्ये या प्रकारच्या संबंधाचा पंथ वाढत असून, अध्यक्षीय निवडणुकीतही हा प्रश्न चर्चेचा व महत्त्वाचा मानला जातो. वस्तुत: इंग्लंड व युरोपमध्ये या प्रकारचे संबंध हे गेल्याच शतकात नव्हे तर त्याही अगोदर प्रचलित होते. तिथे याची चर्चा वा प्रदर्शन होत नाही. अमेरिकेत मात्र या प्रकारच्या संबंधाच्या लोकांनी कामगार संघटना चालवावी तशी संघटना चालवली आहे. ती मोर्चे काढते आणि ‘टाइम्स’ प्रसिद्धी देतो. टिबकटुमध्ये कोणी समलिगी संभोगाचे दोघेजण असले तरी ‘टाइम्स’ त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करील. तेव्हा गांधींच्या काही वाक्यांचा विकृत बुद्धीने उपयोग करून आपल्या आवडत्या पंथाला मोठा आधार मिळत असेल तर हा ‘टाइम्स’वाला ग्रंथलेखक तो देण्यास चटकन तयार होईल यात शंका नाही.

गांधींनी त्यांच्या कामवासनेसंबंधी व कामजीवनासंबंधी बरेच लिहिले आहे. गांधींच्या बरोबर नौखालीतील शांतीयात्रेत फिरणाऱ्या एका गांधीवादी बंगाली गृहस्थांनी ५५ सालात लिहिलेल्या पुस्तकात हे सर्व लिहिले होते. आचार्य अत्रे व मी ५५-५६ मध्ये एकदा अचानक डेक्कन क्विनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या हातात तो ग्रंथ होता आणि अत्र्यांनी त्या ग्रंथात काय आहे ते प्रवासात रंगवून सांगितल्याचे आठवते. पण त्या पुस्तकात समलिगी संभोगाचा विषय असल्याचे अत्र्यांनी सांगितले नाही. हा विषय संपल्यावर स्टिफन झ्वाइग याने लिहिलेल्या बाल्झॅकच्या चरित्राच्या विषयावर आमच्या गप्पा झाल्या आणि त्या काळात आचार्य हे तुकोबांवर कीर्तने करत असल्यामुळे त्यांचे याच विषयावर अतिशय रसाळ विवेचन ऐकले. गांधी कामवासनेसंबंधी स्वत:चीच परीक्षा घेत असत, ते त्यांना कामवासनेतून पूर्णत: मुक्त होण्याची आस होती म्हणून. आपण जर इतरांना ब्रह्यचर्याचा उपदेश करतो, तर आपली वासनासुद्धा संपुष्टात आली आहे की नाही, याचा तपास ते घेत होते.

ग्रंथलेखक हा कमालीचा गांधीद्वेषाने पछाडलेला असावा. तो लिहितो की, हरिजन, मुसलमान व आफ्रिकन यांच्याबद्दल गांधींना तिरस्कार होता. त्याने काही उतारे दिले आहेत. ते तपासल्याशिवाय त्याबद्दल लिहिणे बरोबर नाही. पण लेखक विकृत निष्कर्ष काढण्यात आणि भलतेच तर्क करण्यात तरबेज आहे.

एक उदाहरण आहे ते म्हणजे हरिजनांना राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांच्या निवाड्यात होती; पण गांधींनी त्याच्या निषेधार्थ उपोषण केले. त्यांचे म्हणणे असे होते की, हरिजन हे हिदूच आहेत आणि म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नयेत. या मतदारसंघाची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली होती. पण गांधींचे प्राण उपोषणात धोक्यामध्ये येतात हे पाहून बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघाची मागणी सोडून दिली. पण दलितांना काही न्याय हवा ही त्यांची मागणी होती. म्हणून मग निवडणूक कायद्यात तेव्हा बदल करण्यासाठी एक समिती नेमण्यास गांधी तयार झाले. तीत पंडित मालवीय यांच्यासारखे परंपरावादी होते. त्यांनी असे काही बदल कायद्यात केले की, दलितांना न्याय न मिळता अन्यायच होईल. त्यात सुधारणा न करून गांधींनी चूक केली. पण गांधी दलितविरोधी होते आणि मंदिरप्रवेशालाही त्यांचा विरोध होता हे ग्रंथलेखकाचे विधान निराधार आहे. त्याने गांधींच्या उपोषणाचा विषय ऐतिहासिक संदर्भ वगळून हाताळला आहे.

नौखालीत गांधींची नात मनू तेथील पेटलेल्या वातावरणास घाबरली आणि आपण मरू, असे वाटून घरी परत आली. तेव्हा तू मेली असतीस तरी चालले असते. इतकेच नव्हे तर आपल्याबरोबरचे सर्व मेले असते तरी चालले असते, असे गांधी म्हणाले, त्या अर्थी ते किती भावनाशून्य होते, असे लेखक विचारतो. पण अहिसा आणि नौखालीत पेटलेली आग शमवणे ही गांधींची उद्दिष्टे होती; आणि त्यासाठी मृत्यू आला तरी ते मोठे समाधानाचे आहे, अशी त्यांची ध्येयवादी वृत्ती होती.

अहिसेवरील उत्कट निष्ठेमुळे गांधींनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटलरला पत्र लिहिले व ‘प्रिय मित्र’ असा त्या पत्राचा मायना होता. हे पत्र गांधींनी व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्याकडे धाडले होते. परंतु लिनलिथगो यांनी ते न धाडता स्वत:कडेच ठेवले. गांधींनी त्या पत्रात हिटलरला गोंजारले होते आणि हिसाचाराचा त्याग करण्यास सांगितले होते. युद्धपूर्व काळात गांधी इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी गेले असता वाटेत रोममध्ये मुसोलिनीची त्यांनी भेट घेतली होती. पण याचा अर्थ त्यांना हिटलर व मुसोलिनी यांचे राजकारण पसंत होते असे नव्हे. कोणालाही असा पुरावा देता येणार नाही.

ललीव्हेल्ड यांनी न्याय्य लिखाण केल्याचे शिफारसपत्र हरी कुंझरू देतात. त्यांनी हिटलरसंबंधात गांधींचे पत्र देऊन न थांबता टॉयनबी या इतिहासकाराचे व खुद्द अमेरिकन लोकप्रतिनिधींचे वर्तन काय होते, हेही सांगायला हवे होते. गांधींनी हिटलरला हिसाचाराचा त्याग करण्याचे आवाहन पत्रात केले होते.

युद्धपूर्व भेटीमुळे टॉयनबी हिटलरवर खूश झाला व तो शांततावादी असल्याचा निर्वाळा त्याने जाहीरपणे दिला. मग युद्ध सुरू झाल्यावर आपल्या वृत्तपत्रीय मुलाखतीस विकृत स्वरूपात प्रसिद्धी मिळाली, अशी तक्रार करून त्याने कांगावखोर-पणा केला. ट्रेव्हर-रोपर हे नाणावलेले इतिहासकार होते. त्यांनी टॉयनबीचा हा दुटप्पीपणा तेव्हा व नंतर जगापुढे मांडला होता.

हिटलर व मुसोलिनी यांनी युरोपपुढेच नव्हे तर जगापुढे मोठे संकट उभे केल्याची जाणीव तेव्हांचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना झालेली होती. परंतु अमेरिकेच्या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सभासद पहिल्या युद्धानंतर केलेल्या तटस्थतेच्या ठरावाचा आग्रह धरूनच होते. हिटलरने ब्रिटनवर हल्ला केला तेव्हा रुझवेल्ट मदत पाठवू पहात होते; पण अमेरिकन काँग्रेसचा विरोध होता. तेव्हा ब्रिटनमध्ये अमेरिकेचे राजदूत होते केनेडी यांचे वडील जोसेफ. त्यांनी कळवले की, ब्रिटन टिकाव धरणार नाही; आपण हिटलरबरोबर व्यापारासंबंधी करार करावा, तो कमालीचा फायदेशीर होईल. रुझवेल्ट यांनी बदसल्ला न ऐकता जोसेफ केनेडींना परत बोलावले.

गांधी व टॉयनबी तसेच केनेडी यांच्या वर्तनांची तुलना करणे ललीव्हेल्ड यांनी टाळले हे न्याय्य मानायचे असेल तर गोष्ट वेगळी.

गांधींना मुसलमान विरोधी ठरवणाऱ्या या लेखकाने गांधींनी कलकत्ता व दिल्लीत मुसलमानांना वाचवण्यासाठी उपोषण केले आणि अखेरीस ते एका हिदू खुन्याच्या गोळीला बळी पडले हे लक्षात घेतले नाही. इतकेच नव्हे तर गांधी वंशवादी असल्याचा अत्यंत बेशरमपणाचा आरोप लेखकाने केला आहे. वस्तुस्थिती उलटी आहे.

अमेरिकेत आफ्रो-अमेरिकनांना दीर्घ काळ गुलाम म्हणून वागवले जात होते. तसेच रोझेन्थॉल व इतर न्यूयॉर्क टाइम्सचे भारतात काम करण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे कमालीची भारतविरोधी वार्तापत्रे धाडत होते. अशा या लोकांना गांधींसारख्या हिदी नेत्याचा जगभर अनेकदा गौरव होतो, मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेतेही गांधींना आदर्श मानतात, हे सहन होत नाही. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले वा उखडले गेले तर ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात असे जगभर म्हटले जाते. अमेरिका ही महासत्ता म्हणून मिरवत असता त्यातल्या वा युरोपांतल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा सार्वत्तिक मान मिळतो याची पोटदुखी ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, यातून त्यांचाच वंशवाद प्रगट होत आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

आपला,

– गोविद तळवलकर

( govindtalwalkar@hotmail.com)

प्रतिक्रिया
  1. prajesh म्हणतो आहे:

    काही पाश्चिमात्य लोक भारतद्वेषी आहेत, हे खरं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s