Archive for जुलै, 2011

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – मटा

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील एक मध्यवतीर् विषय आहे. पण तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून मिथकाच्या भाषेत व्यक्त झालेला, मानवी इतिहासातील सत्तासंघर्षाचा मूलभूत प्रश्न आहे. पशूपालन अवस्थेतील आर्यांना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. पृथ्वी, आकाश व अंतरिक्ष येथील दृश्य व अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होत. देवांचा राजा इंद. त्याला वश करून घेणे हा हेतू. यज्ञ संस्थेला अफाट महत्त्व असलेल्या अशा काळात सुरासुर संग्रामाची कथा जन्मास आली. इंद व त्याला भारी पडणारा त्याचा शत्रू वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून या कथेची सुरुवात होते. पुढे तिला वेळोवेळी सोयीस्कर वळणे दिली आहेत. असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जात असल्यामुळे कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे व न मानणारे यांतील तो संघर्ष बनतो. तत्कालीन इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते पण ते वैदिक देवतांना मानीत नसत. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलट्या अर्थाने रुढ झाले. पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला मारून इंदाने त्यांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची कथा होय. इति- लो. टिळक. डोंगरांना पंख असल्यामुळे ते एका जागेवर राहत नव्हते; इंदाने त्यांचे पंख तोडले या मिथ्यकथेत उपखंड उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत होती, या भूवैज्ञानिक तथ्याची पुसट जाण व्यक्त होते.

वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र ते आदित्य. त्वष्ट्रा (म्हणजे विश्वकर्मा) त्यापैकी एक. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्माण. त्याच्या वधामुळे इंदाला ब्रह्माहत्येचे पाप लागते. पापक्षालनासाठी त्याला यज्ञ करावे लागतात. याखेरीज कश्यपाला दितीपासून झालेले पुत्र दैत्य, दनूपासून झालेले दानव व अनायूपासून झालेले असुर असेही म्हटले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप. यापेक्षा बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनियस (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सार्मथ्यावर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा डागाळण्याचा सतत प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (ह्वठ्ठष्द्ब१द्बद्यद्ब५द्गस्त्र) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशराज्ञ सूक्त लक्षात घेण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकच सूक्त होय. पुरु, अनु, दुह्यू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्यांच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदासाच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठ्या संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता. पण पंचजनांशी भरतांचे युद्ध जुंपले तेव्हा विश्वामित्राच्या जागी वसिष्ठाची नेमणूक झाली. म्हणून चिडलेल्या विश्वामित्राने भरतांच्या विरुद्ध दहा राजांचा संघ उभारला. तरी भरताचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. म्हणजे संघर्ष बहुसंख्य प्राचीन व अल्पसंख्य अर्वाचीन यातला आहे. दोन्ही आर्यच. पुढे पर्यावरण बदलले, सरस्वती नदी आटली, अवर्षणे सुरू झाली तेव्हा ऋषींच्या अन्नासाठी आपसातही मारामाऱ्या होत. आता पूवेर्कडे स्थलांतर करणे भाग पडले.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू अधिक भावला. पहाडी भागात अवैदिक शिवाला महत्त्व होते. त्यामुळे भटक्या लोकांचा आडदांड इंद कालबाह्य झाला. आता भारतवर्ष एका छत्राखाली आणणे आवश्यक होते. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत व महाभारतात कृष्णप्रधान वैष्णवांनी पश्चिमेकडून पूवेर्पर्यंत भारतखंड एकछत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जसे शिवाला महादेव म्हणून मान्यता देणे वगैरे. इहलोकातील राजकारणाचे परलोकात पडलेले हे प्रतिबिंब. देव-दानव संघर्षाला त्यातून आणखी एक परिमाण प्राप्त होते. धर्मप्रसार जगात सर्वत्र राजाश्रयांच्या आधारे बळाचा वापर करून झालेला आहे. भारतातील हा प्रयोग तडजोडीच्या राजकारणाचा असल्यामुळे वेगळ्या चिवट पण कमकुवत जातकुळीचा आहे.

मग देव म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी, अल्पसंख्य वर्ग, ज्यांची नीती (१ड्डद्यह्वद्ग ह्य४ह्यह्लद्गद्व) इतरांवर लादली जाते. अर्थात स्त्रश्ाद्वद्बठ्ठद्गठ्ठह्ल द्वद्बठ्ठश्ाह्मद्बह्ल४. देवांशी जो जमवून घेऊ शकत नाही तो दैत्य. जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम हा करुणरम्य विषय असून नॉर्स मिथ्यकथांमध्ये तो विशेष रंगविलेला आहे, असे दुर्गाबाई भागवत सांगतात. माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांमुळे संघर्ष निर्माण होतो व त्याचा अंत कुणीतरी चांगला म्हणून विजयी प्रस्थापित होण्यात किंवा प्रस्थापित झाल्यामुळे चांगला ठरण्यात होतो, हेच सूत्र त्यामागे कार्य करताना दिसते.

जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम येतो. दुर्गाबाई भागवत काही उदाहरणे देतात परंतु त्यांनी त्याचा अर्थ फोड करून सांगितलेला नाही. आयर्लंड, स्कॉटलँड येथील कहाण्यांमध्ये ओडिन देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार करतात. कहाण्यांमध्ये सुद्धा ओडिन देवांचा राजा व त्याचा धाकटा भाऊ दुष्ट असतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा देव प्रथम त्या दैत्याचा चलाखीने वापर करतात आणि नंतर घनघोर युद्ध होते, हिम दैत्य मारला जातो व सर्व दैत्य नरकात जातात. वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा संघर्ष निर्माण होतो व त्यात जो विजयी होतो तो देव सुष्ट ठरतो, हाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून विषय वैश्विक आहे.

-प्रतिक पुरी, सौजन्य – युनिक फीचर्स

मुक्काम पोस्ट मढी. अहमदनगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. नाथ परंपरेतल्या कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं स्थान. फाल्गुन महिन्यातल्या होळी पौर्णिमेपासून चैत्रातल्या गुढी पाडव्यापर्यंत इथे कानिफनाथांची यात्रा भरते. तशा फाल्गुन महिन्यापासून वैशाखापर्यंत महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी देव-देवतांच्या अनेक यात्रा-जत्रा भरत असतात. महाराष्ट्रातल्या प्रथा-परंपरांचं, धार्मिक-सामाजिक चालीरीतींचं इष्ट-अनिष्ट दर्शन त्यातून घडत असतं. मढीची यात्रा यापैकीच एक- मात्र पारंपरिक समाजजीवनाचे अनेकविध कंगोरे असलेली. या कंगोर्यां विषयी बरंच काही ऐकण्यात येत होतं, वाचण्यात येत होतं. त्यातून या यात्रेविषयी कुतूहल वाढत होतं.

एक म्हणजे होळीपासून पाडव्यापर्यंत सलग पंधरा दिवस ही यात्रा चालते. इतक्या दीर्घकाळ चालणार्यान किती यात्रा महाराष्ट्रात भरत असतील? या पंधरा दिवसांच्या काळात महाराष्ट्रभरातून लक्षावधी माणसं इथे यात्रेसाठी येत असतात, असं ऐकलं होतं. दुसरं म्हणजे या यात्रेतला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांचा सहभाग. दोन्ही समुदायांचं हे श्रद्धास्थान. महाराष्ट्रात अशी ठिकाणं किती आहेत? इथे हिंदूंसाठी असलेले ‘कानिफनाथ’ मुस्लिमांसाठी ‘जानपीर’ आहेत. दोन्ही समुदायांचे लोक इथे मानाच्या काठ्या घेऊन येतात. आणि याहूनही विशेष म्हणजे कानिफनाथांचा जयजयकार करत इथे एकवटणा-या जाती-जमाती. मढी हे ‘भटक्या-विमुक्तांची पंढरी’ म्हणून ओळखलं जातं ते या यात्रेतल्या त्यांच्या लक्षणीय सहभागामुळे. महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या बेचाळीस जमाती आहेत. यापैकी बहुतांश जमातींचे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपर्याओतून इथे येत असतात. नवस बोलणं, नवस फेडणं, कोंबड्या-बक-यांचे बळी देणं वगैरे परंपरा इथे दिसतातच, पण मुख्यत्वे इथे विविध भटक्या समाजांच्या जात पंचायती भरतात. त्यांच्यातले सामुदायिक-कौटुंबिक वादविवाद या पंचायतींद्वारे मिटवले जातात. मढी हे भटक्या-विमुक्तांचं ‘सर्वोच्च न्यायालय’ मानलं जातं, असंही ऐकण्यात येतं. यात्रेनिमित्त भरणा-या बाजारात अठरापगड व्यवहारांची झलक दिसते, आणि त्यातही लक्ष वेधून घेणारा असतो तो इथे भरणारा गाढवबाजार. देशभरातून लोक इथे गाढवांच्या खरेदीसाठी येत असतात.

इतकी सारी वैविध्यं या एकाच यात्रेत एकवटलेली. साहजिकच या यात्रेबद्दल मनात मोठं कुतूहल होतं. महाराष्ट्रात खोलवर पसरलेला समाज पाहण्याची, जाणून घेण्याची ही एक संधी होती. बदलत्या काळाचे पडसाद या यात्रेत, इथे येणा-या अठरापगड लोकांमध्ये कसे उमटले आहेत हे जाणून घेण्याचीही इच्छा होती. म्हणूनच ठरवलं, चलो मढी!

होळीच्या दुस-याच दिवशी मढीला जाण्यासाठी नगरला पोहोचलो. ‘मानाची होळी पेटवून मढीयात्रेस प्रारंभ’ अशा बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांत दिसत होत्या. होळी पेटवण्याचा हा मान असलेल्या गोपाळ समाजातल्या मानपानाचा वाद मिटल्याच्याही बातम्या वर्तमानपत्रांत होत्या. पण असं असलं, तरी नगरच्या बसस्थानकावर यात्रेचा कोणताच माहोल दिसत नव्हता. यात्रेकरूंची लगबग नव्हती, गर्दी नव्हती. नगरच्या बसस्थानकावरून खास यात्रेसाठी सोडण्यात येणा-या बसगाड्याही दिसत नव्हत्या. चौकशी केली तेव्हा समजलं, अशा खास बसगाड्या अजून सुरूच झाल्या नव्हत्या. त्या बहुधा रंगपंचमीच्या दिवशीच सुरू होतील. अहो, पण यात्रा कालपासूनच सुरू झालीय ना? ती सलग पंधरा दिवस चालते ना?

‘यात्रा स्पेशल’ बसगाड्या नसल्याने नगरहून मढीला जाण्यासाठी पाथर्डीच्या बसमध्ये चढणं भाग होतं. नगर-पाथर्डी हे अंतर साधारण ४५ कि.मी.चं आहे. नगरपासून जवळपास ३५ कि.मी.वर तिसगाव इथे मढीचा फाटा आहे. या फाट्यापासून मढी ६ कि.मी. दूर आहे. ‘काळी-पिवळी’तून तिथे जाता येतं. फाट्यावर उतरलो. इथेही यात्रेकरूंची फारशी वर्दळ दिसत नव्हती. काही यात्रेकरू काळी-पिवळीतून किंवा खासगी वाहनांतून जाताना-येताना दिसत होते, मात्र यात्रेकरूंचे जथ्थे कुठेच दिसत नव्हते. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड. रंग खेळलेले काही चेहरे दिसत होते, पण रस्त्यावर बाकी शुकशुकाटच.

मढीमध्ये कानिफनाथांच्या गडावर कानिफनाथांचं संजीवन समाधी मंदिर आहे. मढी गाव या गडाच्या पायथ्याशी वसलं आहे. गावाच्या सुरुवातीला एक ख्रिस्ती कब्रस्तान आहे. तिथे दहा-बारा कबरी आहेत. पुढे दलित वस्ती. इथून पुढे दोन्ही बाजूंना घरं असलेला लहानसा रस्ता आपल्याला गडापर्यंत नेतो. रस्त्यावरून जाताना गडावरच्या मंदिराचा उंचच उंच कळस दिसतो. गडाचा पसारा नजरेत भरू लागतो. नव्यानेच रंगवलेला प्रशस्त दगडी परकोट- त्यातून डोकावणारी आतल्या मंदिरांची शिखरं. गडाच्या पाय-या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वार लागतं. इथून आत प्रवेश केल्यावर कानिफनाथांचं समाधी मंदिर दृष्टीस पडतं.

कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक. साधारणपणे इसवी सनाच्या आठव्या शतकात नाथ संप्रदायाचा उगम झाला असावा, असं मानलं जातं. हा संप्रदाय शिवाला आदिनाथ मानतो. त्यावर शैव परंपरेचा प्रभाव आहे. तथापि, सर्वच जाती-पंथ आणि धर्मांना या संप्रदायाने आपलंसं केलं होतं असं म्हणतात. त्यामुळेच शैव, वैष्णव, शाक्त, सूफी अशा पंथांमध्ये आणि बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख अशा धर्मांमध्ये या संप्रदायाला मानणारे लोक आढळतात. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ अशी ही परंपरा. अहमदनगर जिल्ह्यातल्या गर्भगिरी पर्वतामध्ये यापैकी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्या समाध्या आहेत. त्यामुळेच हा जिल्हा नाथ संप्रदायाचा पाया मानला जातो. नवनाथांपैकी कानिफनाथ हे भटक्या आणि निमभटक्या जाती-जमातींचं आराध्य दैवत मानले जातात. मढीच्या गडावरील त्यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भटक्या समाजांनी हजेरी लावण्याची परंपरा फार पूर्वीपासूनच पडली असावी.

समाधी मंदिराच्या एका बाजूला कानिफनाथ ट्रस्टचं कार्यालय आहे. तिथे ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, विश्वस्त किशोर व सचिन मरकड यांच्याशी बोलत असताना ही माहिती मिळत होती. इथे आज कानिफनाथांच्या समाधीवर जे मंदिर दिसत आहे ते महाराणी येसूबाईंनी बांधलंय. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना सुटकेसाठी त्यांनी कानिफनाथांना नवस बोलला होता. या मंदिराच्या बांधकामामध्ये भटक्या समाजांचा मोठा सहभाग होता. गोपाळ समाजाने मंदिरासाठी मोठमोठे दगड वाहून आणले, घिसाडी समाजाने लोखंडी काम केलं, बेलदार समाजाने नक्षीकाम केलं, कोल्हाटी समाजाने उंच बुरूज बांधण्यास मदत केली, कैकाडी समाजाने बांबूच्या टोपल्या तयार केल्या. अशाच प्रकारे वैदू, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, वडारी अशा अठरापगड जमातींनी आपापला सहभाग देऊन या मंदिराचं बांधकाम केलं. मंदिराच्या बांधकामानंतर इथे यात्रा भरण्यास सुरुवात झाली. या यात्रेत भटक्या समाजांना त्यांनी मंदिर बांधण्यास केलेल्या मदतीनुसार मानपान लाभले. यात गोपाळ समाजाला होळी पेटवण्याचा मान मिळाला, तर कैकाडी समाजाला मानाच्या काठ्या मिरवण्याचा व सर्वांत आधी समाधी मंदिराच्या कळसाला काठी टेकवण्याचा मान मिळाला. म्हणूनच बहुधा या स्थानाची ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख झाली असावी.

भटके समाज आणि कानिफनाथ मंदिराचं नातं असं असलं, तरी मंदिराच्या ट्रस्टवर प्रामुख्याने मराठा समाजाचे लोक आहेत. मढी गावात मराठा समाजाचं वास्तव्य जास्त असल्याने असं घडलं असावं. अर्थात, सर्वच समाज कानिफनाथांना मानत असल्यामुळे इथे समाजा-समाजांमध्ये भेदभाव नाही, असं अनेकजणांनी आवर्जून सांगितलं. भटका समाज हा फिरस्ता समाज असल्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात प्रामु‘याने स्थानिक स्थायी समाजाची मंडळी असणंही स्वाभाविक आहे. असो.
यात्रेची नुकतीच सुरुवात झालेली असल्याने आणि गडावर फारशी गर्दी नसल्याने गडाचा परिसर मोकळेपणाने पाहता आला. गडाचा परिसर साधारण १० हजार चौ.मी.चा आहे. गडावर येण्यासाठी पूर्व, पश्चि्म व उत्तर अशा तीन दिशांनी प्रवेशद्वारं आहेत. समाधी मंदिरात कानिफनाथांची समाधी आणि त्यापुढे त्यांची चांदीच्या सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या बाजूला कानिफनाथांच्या दोन शिष्यांची समाधी मंदिरं आहेत. मागे विठ्ठल मंदिर आहे. तिथेच तळघरातील ध्यानमंदिरात जाण्यासाठी एक अरुंद मार्ग आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ नवनाथांचं मंदिर आहे.

या जुन्या मंदिरांचं बरंचसं नूतनीकरण झालं आहे. मंदिरांच्या शिखरांना नवी रंगरंगोटी करण्यात आलीय. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आणि शनिशिंगणापूरप्रमाणे मढीचाही तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा, ही इच्छा इथल्या विश्वस्तांनी बोलून दाखवली. तीर्थक्षेत्र म्हणून होणा-या, विकासाचा लाभ मढी गावाला व परिसराला मिळेल असं त्यांना वाटतं. इथे भाविकांचा ओघ वाढावा यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी गडावर नवी बांधकामं होत आहेत. शंभरेक लोकांची व्यवस्था होऊ शकेल असा भक्त निवास इथे उभारला जातोय. स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहं बांधण्यात आली आहेत. गडावर जाण्यासाठी गडाला वेढणारा सिमेंट कॉंक्रीटचा प्रशस्त रस्ता बांधण्यात आलाय. पाण्याची टाकीही बांधण्यात आलीय. गडावरचं वातावरण प्रसन्न करण्यासाठी लँडस्केपिंग करण्यात आलंय. गडाभोवतीची अडीचशे एकर इनाम जमीन शासनाकडून ट्रस्टला मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. एकंदरीत, महाराष्ट्रातल्या इतर प्रसिद्ध तीर्थस्थानांप्रमाणे मढीचाही बोलबाला व्हावा, धार्मिक-आर्थिक उलाढाल वाढावी असे प्रयत्न होताना दिसत आहेत.

एव्हाना गडाच्या पाय-या वर तुरळक गर्दी दिसत होती. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘भक्तांनी नारळ इथेच फोडावेत’ या फलकाकडे दुर्लक्ष करत भाविक पाय-या चढता चढता प्रत्येक पायरीवर नारळ फोडत होते. त्यामुळे पाय-या निसरड्या बनत होत्या. ध्यानमंदिराच्या अरुंद मार्गावर भाविकांची गर्दी दिसत होती. मंदिराचे विश्वस्त सांगत होते, ‘‘यात्रा होळीला सुरू होते आणि पाडव्यापर्यंत चालते. पण अलीकडे या काळात रोज गर्दी होत नाही. रंगपंचमी, फुलवर बाग आणि गुढी पाडव्याच्या कावडयात्रेला लोक विशेषकरून येतात. मात्र यात्रेची खरी मजा अनुभवायची असेल तर ती रंगपंचमीच्या दिवशीच.’’

गडावरून खाली आलो. रस्त्याच्या दुतर्फा दुकानं होती. पूजासाहित्याची, नवनाथांच्या फोटो-पुस्तकांची आणि आरत्या-गाण्यांच्या सीडीज व कॅसेट्‌सची, समाधीवर चढवायची महावस्त्रं, रुद्राक्षांच्या माळा, रेवड्यांच्या प्रसादाची पाकिटं आणि नारळ यांनी दुकानं खच्चून भरलेली होती. मात्र ग्राहकांची वानवा होती. भोवतीच्या माळरानात मोठे पाळणे, ‘मौत का कुँवा’ उभारले जात होते, सर्कशीचा तंबू लागत होता, तमाशाचे फड उभे राहत होते. एका ठिकाणी पाच-सहा गाढवं दिसली, पण ती बहुधा गावातलीच असावीत. गाढवांचा बाजार अद्याप भरायचा होता. पंधरा दिवसांची यात्रा हे बहुधा ‘मिथ’ बनलं असावं.

‘रंगपंचमीला पुन्हा मढी’ असं ठरवून मुक्काम हलवला.

रंगपंचमीच्या दिवशी मात्र चित्र पालटलेलं होतं. नगरपासूनच यात्रेचा फील जाणवत होता. बसस्थानकावर यात्रेकरूंची गर्दी उसळलेली होती. बसस्थानकावरून भाविकांनी खच्चून भरलेल्या ‘यात्रा स्पेशल’ बसगाड्या धावत होत्या. त्यात शहरी-ग्रामीण अशा सर्वच लोकांची सरमिसळ. तरणे, म्हातारे, स्त्री-पुरुष सारेच होते. कोणी यात्रेची मजा लुटायला निघालेले होते तर कोणी नवस फेडायला. त्यांच्या बोलण्यात अस्थाना, मानाच्या काठ्या असे शब्द वारंवार येत होते. एक वयस्कर बाई कैकाडी समाजाच्या जात पंचायतीविषयी उत्साहानं सांगत होती. या पंचायतीत त्यांची लग्नं ठरवली जातात, घटस्फोट-काडीमोडांवर शिक्कामोर्तब होतं, कानिफनाथांच्या साक्षीनं आपापसातले तंटे सोडवले जातात, वगैरे वगैरे.

मढीला जाण्यासाठी तिसगाव व निवडुंगे गावापासून फाटे आहेत. यात्राकाळात निवडुंगे फाट्यातून मढीत शिरायचं आणि तिसगावच्या रस्त्यानं बाहेर पडायचं अशी सोय असते. या दोन्ही रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाला होता. शेकडो भाविक खासगी वाहनांतून मढीला निघाले होते. काही वाहनांच्या टपांवर मानाच्या काठ्या होत्या. काही ट्रक्समध्ये ढोल-ताशेही वाजत होते. वाहनांतून उतरून मानाच्या काठ्या उंचावत भाविक ढोल-ताशे बडवत, गुलाल उधळत मंदिराकडे जात होते. गडाच्या प्रवेशद्वारावर जाऊन ही सारी गर्दी आदळत होती. मानाच्या काठ्या वाहणारे अनेक अस्थाने गडावर चढत होते. २०-३० फूट लांबीचे बांबू, त्यावर भगवी वस्त्रं गुंडाळलेली, बांबूच्या टोकाला लोखंडी त्रिशूळ लावलेले. या मानाच्या काठ्या. ढोल-ताशाच्या तालावर या काठ्या हवेत उंच पेलत, नाचवत, कानिफनाथांचा जयजयकार करत सारे तल्लीन झाले होते. त्यांच्या सोबतीला अंगात संचार झालेले काही भक्तही होते. केस मोकळे सोडून बाया घुमत होत्या आणि पुरुष उघड्या अंगावर आसूड ओढत होते. दुसरीकडे गडाच्या पायथ्याशी नवसाचे नारळ फोडण्यासाठी झुंबड उडाली होती. नारळांनी भरलेलं पोतं घेऊनच काही लोक पायर्याफ चढत होते आणि प्रत्येक पायरीवर नारळ फोडत होते. आत पोचलेल्या अस्थानांची समाधी मंदिराच्या कळसाला काठ्या टेकवण्याची धडपड सुरू होती. ती टेकली की कानिफनाथांचा जयजयकार होऊन रेवड्यांचा प्रसाद उधळला जात होता.

गडाखाली दुकानांमध्ये लोकांची गर्दी होती. खेळणी, जोडे-चपला, बॅग्ज, कपडे, बांगड्या, भांडीकुंडी, पुस्तकं, कॅसेट वगैरेंची ही दुकानं होती. याशिवाय शाकाहारी-मांसाहारी खानावळी, पान टप-या, कोल्ड्रिंक्सचे ठिय्ये होते. सर्वसाधारणपणे कोणत्याही ग्रामीण यात्रेत आढळतात अशी दुकानं-पालं इथेही होती. मढीच्या यात्रेत भटक्या समाजांचे लोक पालं ठोकून आपापले पारंपरिक व्यवसाय करतात असं ऐकलं होतं. यात्रेत फिरताना नजर त्याचाच शोध घेती होती, पण काही अपवाद वगळता असे व्यवसाय आढळले नाहीत. वैदूंच्या काही पथा-या दिसल्या. त्यावर काही जडी-बूटी मांडलेल्या होत्या, पण त्यांच्या खरेदीसाठी फारशी गर्दी नव्हती. घिसाडी समाजाच्या एक-दोन पथा-या होत्या. त्यात शेतकामाची लोखंडी औजारं, कानिफनाथांचे चिमटे, त्रिशूळ वगैरे होते. तिथेही लोकांची गर्दी अशी नव्हती. माकडवाले, डोंबारी, दरवेशी, ससे-तितर विकणारे पारधी, गारुडी वगैरे शोधूनही सापडत नव्हते. अधूनमधून शहरात दिसणारे वासुदेव व पोतराजही इथे दिसत नव्हते. गर्दीचा ओघ कपड्यांच्या, चपलांच्या, बांगड्या-ब्रेसलेट वगैरेंच्या दुकानांकडे वळत होता. कानिफनाथांच्या पारंपरिक यात्रेतील बाजारात सारा आधुनिकतेचाच पसारा दिसत होता. कोणत्याही यात्रेत आढळणारी टूरिंग टॉकीज आणि सर्कस ही मनोरंजनाची साधनं इथेही होती, मात्र त्यांच्याविषयीचं अप्रूप हरवल्याचं दिसत होतं. तमाशाच्या फडावर मात्र दुपारपासूनच लोकांची गर्दी दिसत होती.

या सा-या माहोलात मानाच्या काठ्या घेऊन आलेले गावोगावच्या लोकांचे अस्थाने मैदानात जिथे जागा मिळेल तिथे विसावलेले दिसत होते. इथे बशीर अली भेटले. ते मढीचेच. मंदिराला मानाच्या काठ्या टेकवून त्यांचा अस्थाना परतला होता. मागील पिढ्यांपासून चालत आलेली मानाची काठी वाहण्याची परंपरा ते पुढे चालवत होते. कानिफनाथ म्हणजेच त्यांच्या जानपिरावरची श्रद्धा त्यांनी बोलून दाखवली. हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही इथे येतात, कोणतेही वादविवाद होत नाहीत, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याप्रमाणेच मुस्लिम समाजाचे काही अस्थाने इथे विसावले होते. मानाच्या काठ्या घेऊन येणा-यांममध्ये सर्वच समाजांचे लोक दिसत होते. त्यात जसे भटके समाज होते तसेच मराठा व इतर समाजही होते. बीड जिल्ह्यातून आलेल्या विधाते महाराजांच्या अस्थान्यात गवसे बंधू भेटले. ते मराठा. गेल्या २० वर्षांपासून ते इथे येत आहेत. ते सांगत होते, अस्थाना म्हणजे गुरुपरंपरा. कानिफनाथांच्या शिष्यांमध्ये सर्व समाजांचे लोक होते. समाधीच्या दर्शनासाठी हे शिष्य मढीला येऊ लागले. त्यातून अस्थान्याची परंपरा पडली.

या सा-यांपासून काही अंतरावर गाढवांचा बाजार भरलेला होता. महाराष्ट्रात जुन्नर, जेजुरी, मढी व सोनारी अशा ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. त्यात मढीचा गाढवांचा बाजार भारतात प्रसिद्ध. इथे तो ५-६ दिवस भरतो, गाढवांची किंमत ५० हजारांपर्यंत जाते आणि एक-दीड कोटींची उलाढाल होते असं ऐकलं होतं. मात्र आता इथे जेमतेम अडीचशे गाढवं विक्रीला उभी होती. त्यात जास्त प्रमाण गावरान गाढवांचंच होतं. राजस्थानकडची काही पांढरीशुभ्र खेचरंही दिसत होती. शेजारीच त्यांचे मालक आणि ग्राहकही उभे होते. इथे खेड राजगुरुनगरचे धोत्रे भेटले. हे वडार समाजाचे. त्यांच्याशी बोलताना आता पूर्वीचे दिवस राहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इथून ते आता पैठणच्या यात्रेला जाणार होते व तिथून सोनारीला. गाढवं विकण्यासोबतच गाढवांची पिल्लं विकत घेऊन, ती वाढवून पुन्हा विकण्याचाही त्यांचा व्यवसाय होता. गावरान गाढवाला ५-८ हजारांपर्यंत तर काठेवाडी गाढवांना २०-२५ हजारांपर्यंत भाव मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. मढीत या वर्षी पंचवीसेक लाखांचा धंदा होईल सर्वांचा मिळून, असा अंदाज त्यांनी सांगितला. यात्रा आटोपली की पुन्हा गावी परतायचं. तिथे मिळाली तर मजुरी, नाही तर बिगारी करत जगायचं, असं ते सांगत होते. बुलढाण्याच्या दिलीपने त्याला दुजोरा दिला. पूर्वी वैदू, कैकाडी, वडार, घिसाडी, मदारी, डोंबारी, कुंभार वगैरे मंडळी गाढवं खरेदी करत असत, पण आता त्यांचं प्रमाण कमी झालंय. आता ३-४ हजारांनाही गाढव विकत घ्यायला काचकूच करतात लोक. यात्रेचे दिवसही कमी झालेत. गाढवं विकली गेली नाही तर होणार्या नुकसानीचीच चिंता त्यांना छळत होती.

एव्हाना रात्र झाली. मानाच्या काठ्या समाधी मंदिराला टेकवून आलेले अस्थाने आता जेवणाच्या पंगती आटपून परतीच्या प्रवासाला लागले होते. तमाशाच्या फडांना जाग आली होती. खणखणीत अस्सल मराठी लावण्यांचा रंग भरण्यास सुरुवात झाली होती आणि या रंगात दंग होण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

रंगपंचमीच्या दुस-या दिवशी मढीचं चित्र पुन्हा पालटलं होतं. तमाशाचे फड निघून गेले होते. गाढवांचा बाजारही उठलेला होता. अर्ध्यापेक्षा जास्त दुकानं उठली होती. यात्रेकरूंची संख्याही कमी झाली होती. यात्रेकरू, व्यावसायिक या सार्यां नी पैठणकडे मुक्काम हलवला होता. आता पुन्हा फुलवर बाग यात्रेलाच मढी भाविकांनी फुलून येणार होती.

खरं तर यात्रेच्या या धामधुमीत या यात्रेची एक ओळख बनलेल्या जात पंचायती अजून दिसल्याच नव्हत्या. शेवटी रंगपंचमीच्या तिस-या दिवशी दोन जातपंचायती भरल्या. एक कोल्हाटी समाजाची व दुसरी वैदूंची. कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीत ‘कोल्हाट्याचं पोर’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक, दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मालमत्तेबाबतच्या खटल्याची चर्चा होती. त्यांच्या आईने हा खटला दाखल केला होता; पण विरुद्ध बाजूचे कोणीही लोक न आल्याने हा न्यायनिवाडा सोनारी येथील जात पंचायतीत केला जाईल, असं जाहीर करण्यात आलं. या खटल्याव्यतिरिक्त घटस्फोटाचा एक खटलाही निवाड्याला आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा वैदू समाजाच्या जात पंचायतीला प्रारंभ झाला. यात एका खून प्रकरणाचा निवाडा होणार होता; पण त्यावर काही निर्णय लागला नाही. मढीला भटक्यांच्या जातपंचायतीचं सर्वोच्च न्यायालय मानलं जातं. इथे दिल्या गेलेल्या निर्णयावर अपील करता येत नाही. निकाल मान्य केला नाही तर आर्थिक दंड भरावा लागतो, किंवा त्याहीपेक्षा भयंकर अशा वाळपत्राला सामोरं जावं लागतं. वाळपत्र देणं म्हणजे त्या माणसाला समाजातून बहिष्कृत करणं. समाज पुढे अशा माणसासोबत कसलेही व्यवहार ठेवत नसल्याने भटक्या समाजातील लोक या वाळपत्राची धास्ती बाळगतात. वाळपत्राच्या या हत्यारामुळेच या जातपंचायतींनी आपापल्या समाजावर जबरदस्त पकड ठेवलेली आहे.

मात्र, ‘अलीकडच्या काळात जातपंचायतींचं प्रस्थ हळूहळू कमी होत चाललंय, पूर्वी ज्या प्रमाणात जातपंचायती भरत होत्या, ज्या प्रमाणात लोक त्यात सामील होत होते ते प्रमाण आता दिसत नाही’, असं पाथर्डीचे एक पत्रकार उमेश मोरगावकर यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांतलं त्यांचं हे निरीक्षण आहे. साक्षरतेचं वाढतं प्रमाण, जातपंचायतींच्या निवाड्यांचं कालबाह्य स्वरुप आणि पंचायत चालविणा-या पंचांवरच झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे काही समाजांत जातपंचायतींना उतरती कळा लागली असावी, असं त्यांना वाटतं. मढी व्यतिरिक्त जेजुरी, सोनारी, माळेगाव, नरडाना वगैरे ठिकाणीही जातपंचायती भरतात असं समजलं. मात्र आता त्याचं स्वरूप बदलत चाललंय. जातपंचायतीत आता लग्न जमविणं, सामूहिक विवाह सोहळे, समाजातील शैक्षणिक, आरोग्य या विषयांवरही चर्चा होते. जातपंचायतींना आता सामाजिक संघटनांचा आकार येत चाललाय, असं मोरगावकर सांगत होते.

वरिष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी १९८६ साली गोपाळ समाजाच्या जातपंचायतीवर एक लघुप्रबंध सादर केला होता. त्यांनी पाहिलेल्या-नोंदवलेल्या जातपंचायतीत व आताच्या जातपंचायतीत खूपच फरक पडल्याचं जाणवलं. त्या वेळी गोपाळांच्या सांकेतिक पारुषी भाषेत जातपंचायतीचा कारभार चालायचा. साक्षीचा खरे-खोटेपणा करण्यासाठी साक्षीदाराला प्रसंगी उकळत्या तेलात हात घालण्याचं किंवा तापलेली लोखंडी सळई हाती धरण्याचं दिव्य करावं लागायचं. नवसासाठी कोंबडे-बकरे सर्रास कापले जायचे, तर काही लोक पाठीत लोखंडी गळ खुपसून घ्यायचे. आता असे प्रकार या यात्रेत कुठेही दिसले नाहीत. गोपाळ समाजाच्या जातपंचायती आता इथे भरत नाहीत, त्याऐवजी त्यांचे समाज मेळावे भरतात, असंही समजलं.

मढीला पहिल्या दिवशी आलो तेव्हा या यात्रेविषयीचं एक चित्र मनात होतं. मढीहून परत निघालो तेव्हा त्या चित्रात बदल घडत असल्याचं जाणवलं. ज्या ज्या कारणांसाठी ही यात्रा प्रसिद्ध असल्याचं मानलं जातं त्या सार्यांेतच बदल घडले आहेत. यात्रेची परंपरा टिकून आहे, गावागावांतून अस्थाने येत आहेत, अठरापगड समाज आपलं अस्तित्व अजूनही दाखवत आहे, हे खरं आहे; पण यात्रेतल्या बाजाराने आधुनिक रूप धारण केलंय. इथे अठरापगड लोकांची गर्दी दिसतेय, पण पारंपरिक पेहरावातली त्यांची ओळख पुसली गेलीय. गाढवांचा बाजार इथे आजही भरतोय, पण त्याला लागलेली उतरती कळाही स्पष्ट दिसतेय. हीच गोष्ट जात पंचायतींची. हे निरीक्षण जर बरोबर असेल तर या बदलांकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. परंपरेचं जोखड काही प्रमाणात तरी उतरतंय असं म्हणता येईल.

अर्थात मढीत दिसलेल्या या चित्रावरून लगेचच काही निष्कर्ष काढता येणार नाहीत. त्यासाठी या यात्रेचं आणखी काही वर्षं निरीक्षण करावं लागेल, आणखी काही यात्रा तपासाव्या लागतील.