Archive for सप्टेंबर, 2011

डॉ.  यशवंत रायकर, सौजन्य – लोकसत्ता

देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो.

—————————————————————

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील मध्यवर्ती पौराणिक विषय आहे. तसा तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून जगात अन्य समाजातही वेगवेगळ्या रूपात आढळून येतो, पण भारतात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या संघर्षांतील एक अद्भुत घटना म्हणजे समुद्रमंथन. दोन कट्टर शत्रूंच्या सहकार्याचा तो प्रसंग असल्यामुळे नवलाईचा होय. लोकमानसावर आजही असलेला त्याचा प्रभाव पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा myth व legend यांचा अभ्यास आहे. ती ऐतिहासिक सत्ये नव्हेत, पण वास्तवाच्या कणाभोवती जमा झालेल्या कल्पिताच्या जलबिंदूसारखे त्यांचे स्वरूप असते. विशिष्ट समाजाची ती सामुदायिक स्वप्ने असतात. मिथ ही देवादिकांबद्दलची पवित्र प्राचीन कथा तर लीजण्ड म्हणजे दंतकथा प्रामुख्याने माणसासंबंधी असते असे धरून चालू. एरवी हे शब्द विविध अर्थाने येतात त्यांचा विचार येथे नको. हा अभ्यास म्हणजे कल्पितातून वास्तव वेगळे करण्याचा प्रयास होय. यामुळे मिथकांचे विलयन होते व श्रद्धेच्या नैतिक अधिष्ठानाला धक्का पोहोचतो. म्हणून धार्मिकांना ते कधीच रुचत नाही.

येथे भारतीय परंपरेतील देव आणि दैत्य यांचे बदलत गेलेले अर्थ प्रथम समजून घेतले पाहिजेत. पशुपालन अवस्थेतील आर्याना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. दृश्य-अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. देवांचा राजा इंद्र. त्याला वश करून घेण्यासाठी यज्ञ होत असत. यज्ञसंस्थेला अफाट महत्त्व असलेल्या काळात सुरासुर संग्रामाची कल्पना जन्मास आली. इंद्र व त्याला पुरून उरणारा वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून कथेची सुरुवात होते, पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला ठार करून इंद्राने त्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची दिव्यकथा होय, असे लोकमान्य टिळक म्हणतात. पण असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जातात तेव्हा कथेला वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे ते देव व न मानणारे ते असुर यातील तो संघर्ष बनतो. वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र दैत्य, दनूचे दानव व अनायूचे असुर, असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप, पण वैदिक देवतांना मानणारे देव हे सुजन व न मानणारे दैत्य हे दुर्जन असा अर्थ रूढ केला गेला व तोच लोकमानसात घट्ट रुजला. इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते, पण ते वैदिक देवतांना मानीत नव्हते. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलटय़ा अर्थाने रूढ झाले. यात आणखी एक गुंतागुंत आहे. अदितीचे पुत्र जे आदित्य त्यापैकी एक त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्मण. वृत्राचा वध केल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागते. म्हणून त्याला यज्ञ करावे लागतात.

या प्रश्नावर बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनिटास (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सामर्थ्यांवर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा दानव, राक्षस शब्दांनी सतत डागाळण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (uncivilized) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशरज्ञ सुक्त उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकमेव सुक्त होय. पुरु, अनु, द्रुह्य़ू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्याच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदास याच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठय़ा संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता, पण पंचजनांशी भरताचे युद्ध जुंपले तेव्हा भरतांनी विश्वामित्राला काढून त्याच्या जागी वसिष्ठाची नेमणूक केली. त्यामुळे खवळलेल्या विश्वामित्राने भरतांविरुद्ध १० राजांचा संघ उभारला. तरी युद्धात भरतांचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. पुढे शेतीची सुरुवात झाल्यावर भटक्या लोकांचा आडदांड इंद्र कालबाह्य़ झाला. अशा काळात मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू भावला. पहाडी भागांत अवैदिक शिवाला महत्त्व आले. भारतवर्ष एका छत्राखाली आणणे गरजेचे होते. त्यासाठी वैष्णवांनी पुढाकार घेतला. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाभारतात कृष्णप्रधानांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे देव-दैत्य संघर्षांला वैष्णव-शैव असे नवे परिमाण प्राप्त झाले. दोहोंमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या पौराणिक कथा निर्माण होऊ लागल्या.

मग देव आणि दैत्य म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो. दुर्गाबाई भागवतांनी काही उदाहरणे दिली आहेत. आर्यलड, स्कॉटलंड येथील मिथ्यकथांत ओडिन हा देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार मारतात. नॉर्वे येथील कहाण्यांत ओडिन देवांचा राजा व लोक हा त्याचा धाकटा भाऊ दुष्ट आहे. तो शत्रूला मिळतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा ते चलाखीने हिमदैत्याचा वापर करून नंतर झालेल्या युद्धात त्याला मारतात. सर्व दैत्य नरकात जातात, लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या मनात नरकाची भीती घालायची व मग त्यातून वाचण्याचे मार्ग सांगायचे ही सर्वच धर्माची रणनीती असते.

या पाश्र्वपटलावर समुद्रमंथन पाहू. ही कथा अतिप्राचीन वाटली तरी ती स्मृतिपुराणांच्या काळातली निर्मिती आहे. रामायण, महाभारत, भागवत वगैरेत त्याचे उल्लेख असले तरी विष्णुपुराण हा त्यांचा प्रमुख आधार होय. ते इसवी सनाच्या ३, ४ शतकापूर्वीचे नाही. त्यात मेरु पर्वत, दशावतार यांची माहिती असून गुप्त साम्राज्याचाही उल्लेख येतो. महाभारतात इ. स. ४०० पर्यंत ४ शतकात जी भर पडली त्यातच समुद्रमंथन येऊ शकते. भागवत ६ व्या शतकापूर्वीचे नाही. श्रीकृष्णचरित्राचा तो मुख्य आधार. माणसाला वैराग्य कठीण असल्यामुळे पुराणे भक्तिमार्ग आवर्जून शिकवितात. मत्स्य, कूर्म, वराह, वामन ही उत्तरकालीन पुराणे एकेका अवतारांची महती सांगतात. त्यात अतिशयोक्तीचा अतिरेक असतो, पण तो केवळ पुराणाकडूनच होतो असे नाही. तत्कालीन धर्मपंथांची आपसात चाललेली चढाओढ लक्षात घेतली तर सर्व धर्म त्या बाबतीत एकाच माळेचे मणी असतात हे कळून येते. काही उदाहरणे पाहा. भरताच्या नाटय़शास्त्रात कलांची संख्या ६४, जैन वाङ्मयात ७२ तर बौद्धांच्या ललित विस्तारात ९६. जैनांचे र्तीथकर २४, महायानांचे बुद्ध २४ तर भागवतात विष्णूचे अवतार १० वरून २४ वर येतात. लिंगपुराण शंकराचे २८ अवतार सांगून त्यावर कडी करते. आता बौद्ध त्यापुढचे पाऊल टाकतात. लंकावतार सूत्रात बुद्ध ३६, ललित विस्तारात ५४ तर महावस्तूमध्ये १०० च्या वर बुद्ध आहेत. आपल्या हीरोंना तोंडे किती किती असावीत यातही दुसऱ्याला मागे टाकण्याची धडपड दिसते. रावण दशानन तर बौद्धांचा अवलोकितेश्वर ११ तोंडांचा (कन्हेरी येथील शिल्प पाहा.) आणि शाक्तांची सीता कालीचे रूप धारण करून ज्या रावणाचा वध करते तो रावण सहस्रमुखी असतो. तसेच जैन पुराणांनुसार महावीर १२ फूट उंच, पाश्र्वनाथ १६ फूट, तर वृषभनाथ ३००० फूट उंच होते. आपला भूतकाळ जास्तीत जास्त प्राचीन करण्याचीही वृत्ती असते. पहिला मत्स्यावतार कृतयुगाच्या सुरुवातीस झाला. म्हणजे ४३ लक्ष २० हजार वर्षांपूर्वी, तर वृषभनाथाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षाही अधिक आहे. असे होण्याचे कारण मानवी मनाला गूढ, अलौकिक, अघटित, असंभवनीय अशा गोष्टींचे आकर्षण असते. लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो व तो आजही आहे. समुद्रमंथन ही घटना त्याचाच परिपाक होय. ती एक Monumental Fantasy आहे.

देव आणि दैत्य यांची पहिल्यापासून एकच महत्त्वाकांक्षा असते, ती म्हणजे तीनही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. यामुळे सुरासुर संग्राम चालू राहतो. पण त्यात दोन्ही पक्षांपुढे एक अघटित समस्या उभी राहते, जी समुद्रमंथन केल्याशिवाय सुटणारी नसते. हे मंथन दोहोंनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. या महानाटय़ात तिसरा एक घटक असतो तो तपस्वी ऋषींचा. या ऋषींचे स्थान इंद्र, विष्णू व शिव यांच्या खालचे असले तरी त्यांच्या तपसामर्थ्यांला व शापाला देवसुद्धा भिऊन असतात. हे तपस्वी अत्यंत तापट, महत्त्वाकांक्षी व सूडबुद्धीचे असतात. एका पक्षात आपल्याला सर्वोच्च स्थान लाभले नाही तर विरोधी पक्षात जाऊन ते मिळवितात. विश्वामित्राचे उदाहरण मागे येऊन गेलेले आहे. समुद्रमंथनाच्या महानाटय़ात शुक्राचार्य व दुर्वास महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पौराणिक कथांच्या तपशिलात न शिरता आपण समुद्रमंथनाचा घटनाक्रम पाहू. या कथा परस्परविरोधी व विसंगत असतात. येथे मेळ न घालता फक्त मर्म शोधणे आहे.

शुक्राचार्याला देवांचा गुरू व्हायचे असते, पण ती संधी हुकल्यामुळे तो दैत्यांचा गुरू बनतो. दैत्यांचा पराभव होऊ नये म्हणून मृतांना जिवंत करणारा संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी शिवाची कठोर तपस्या करतो. त्याचा तपस्याभंग करण्यासाठी इंद्र कपट रचतो, पण शंकराच्या ते लक्षात येताच स्वत: प्रकट होऊन तो शुक्राचार्याला संजीवनी मंत्र देऊ करतो. त्यामुळे युद्धात मेलेले दैत्य जिवंत होतात. देवांचा पराभव होत राहतो. दुसऱ्या एका कथेनुसार इंद्राच्या हातून दुर्वास ऋषींचा अपमान होतो. त्यामुळे संतापलेला मुनीवर इंद्राचे सर्व सामथ्र्य व वैभव नष्ट होईल असा शाप देतो. यामुळे लज्जित व हताश झालेला इंद्र सर्व देवांना घेऊन विष्णूला शरण जातो.

शांत चित्ताचा प्रॅग्मॅटिक विष्णू देवांच्या कूटनीतीचा मास्टरमाइंड आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची योजना त्याच्याकडे तयार असते. तो युक्ती सुचवितो. त्यानुसार देव शुक्राचार्याला विश्वासात घेऊन म्हणतात, ‘‘तुझ्याकडे संजीवनी मंत्र आहे म्हणून तू दैत्यांना जिवंत करतोस. पण उद्या तूच नसलास तर कोण कुणाला जिवंत करील?’’ शुक्राचार्य बुचकळ्यात पडतो. मग त्यावरचा उपाय सांगतात. अमरत्व देणारे अमृत मिळविणे. पण ते समुद्राच्या पोटात असते. त्यासाठी समुद्रमंथन करायला हवे. जे देव व दैत्य यांनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. शुक्राचार्याला पटते. मग मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून देव व दैत्य समुद्र घुसळायला निघतात. पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. तेव्हा विष्णू कूर्मावतार धारण करून पर्वताला पाठीवर उचलतो. मंथन यशस्वी होते. त्यातून १४ रत्ने बाहेर येतात. या रत्नांची यादी व संख्या वेगवेगळी असली तरी आपल्याकडे लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांत म्हटले जाणारे कडवे प्रमाण मानू. (चौकट पाहा) या रत्नांमधील हलाहल गंभीर समस्या उभी करते. तेव्हा शिव जगाच्या कल्याणासाठी ते आपणहून प्राशन करतो. पण अंगात भिनू देत नाही. यात पार्वती विधायक भूमिका बजावते. त्यामुळे शिव नीलकण्ठ बनतो. हे मिथक अत्यंत उद्बोधक आहे. प्रत्येकाला जीवनातील कटू अनुभवांचे विष प्यावेच लागते. (जीवन ही अमर जहर है तो पीना ही पडेगा।) त्यामुळे मनात त्रासिक कडवटपणा भरतो, जो स्वत:ला व इतरांनासुद्धा सुख लागू देत नाही. पण मोठय़ा मनाची माणसे नीलकण्ठ बनतात.

मंथनातून अखेर देवांचा डॉक्टर धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर येतो तेव्हा तो पळविण्यासाठी देव व दैत्य यांच्यात युद्ध जुंपते. पण विष्णूचा गरुड कलश घेऊन वरच्या वर उडतो. त्यातले चार थेंब प्रयाग, हरिद्वार, उज्जयिनी व नाशिक येथे पडतात. म्हणून ती पवित्र तीर्थक्षेत्रे बनून दर बारा वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो. ही प्रथा आजही चालू आहे. पण दैत्य पुन्हा कुंभावर झडप घालतात. तेव्हा त्यांचे मन विचलित करण्यासाठी विष्णू मोहिनीचे रूप धारण करतो. त्यामुळे कलश देवांना प्राप्त होतो. अमृत पिऊन देव अमर बनतात. त्यातही गुंतागुंत आहे. एक दैत्य राहूचे रूप धारण करून देवांच्यात घुसतो व अमृत पिऊ लागतो. सूर्य व चंद्र यांच्या ते लक्षात येते. ते मोहिनीला सावध करतात. लगेच सुदर्शन चक्र त्या दैत्याचा शिरच्छेद करते. पण थोडे अमृत घशापर्यंत गेल्यामुळे मुंडके (म्हणजे राहू) अमर बनते व धड (म्हणजे केतू) वेगळे पडते. चंद्र सूर्यानी चुगली केल्यामुळे राहू व केतू त्यांना आळीपाळीने ग्रहण लावून कायमचा बदला घेत राहतात.

समुद्रमंथनाच्या कथेत विष्णूचा महिमा, त्याच्या अवतारांचे माहात्म्य, शिवाचा परोपकारी, सरळसोट, निष्कपट स्वभाव, त्याला लाभलेली पत्नीची साथ, तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रांचे पावित्र्य, ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना या सर्वाचे मिश्रण करून, मानवी मनावर राज्य करणारी मॉन्युमेंटल फॅन्टसी उभी करण्यात आली. थायलँड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलायसिया येथील लोकांचे पूर्वज भारतातून आलेले असल्यामुळे या फॅन्टसीच्या माध्यमातून ते त्यांची आठवण जपतात. बँकॉक (थायलँड) येथील सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनाचे भव्यदिव्य शिल्प पाहून प्रवाशांची मने थक्क होतात.

रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता

एकदा कस्तुरबांचे व गांधीजींचे संडास सफाईवरून मतभेद झाले. गांधीजींनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले. पुढे गांधीजी हे स्त्री-पुरुष समानतेचे कट्टर समर्थक बनले. समाजाला त्यांनी समानतेचे धडे दिले. गांधीजींच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांमुळे त्यांचा दृष्टिकोन तसा घडला होता.

समाजातील या दोन प्रमुख घटकांना राजकीय चळवळीत सामील करून घ्यायचे असेल, तर त्यांच्यावरील सामाजिक अन्याय दूर करणे अगत्याचे आहे, हे गांधीजींनी ओळखले होते. त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याची सांगड घालण्याचे महत्त्वाचे काम केले.

स्त्रियांवरील सामाजिक अन्याय दूर करून, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळवून देण्यासाठी आपल्या अनुनयांना सतत मार्गदर्शन केले. स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या लढय़ात भाग घेण्यास त्यांनी प्रेरणा दिली. कार्यकर्त्यांनाही त्या दृष्टीनेच मार्गदर्शन केले. स्त्रिया ही देशाची अर्धी शक्ती आहे व ती निष्प्रभ व सामाजिक व राजकीयदृष्टय़ा निष्क्रिय राहाणे, नव्हे तिला तसे मुद्दाम ठेवणे; हे योग्य नाही असे त्यांना वाटे. स्त्रियांमधील सहनशक्ती, सेवाधर्म व जबाबदाऱ्या, हे गुण कुटुंबाकडून वापरून घेतले जातात, ते कुटुंबाचा तो एक हक्क आहे या गैरसमजापोटी. कुटुंबासाठी स्त्रियांनी झटले पाहिजे, स्वार्थत्याग केला पाहिजे; ही गोष्ट गांधीजींना मान्य असली, तरी पुरुषांनीही याच गोष्टी केल्या पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. स्त्रीवर या गोष्टी करण्याबद्दल जो अतिरेक होतो, तो त्यांना मान्य नव्हता. स्त्री कौटुंबिक जबाबदाऱ्यांखाली इतकी भरडली जाते, की तिला स्वत:बद्दल विचार करायला किंवा स्वत:चा विकास करण्याच्या दृष्टीने थोडा वेळ घराबाहेर जायलाही जमत नाही. इतकेच काय तशी तिला परवानगीही नाही. ही परिस्थती बदलली पाहिजे. स्त्री देशकार्याच्या मध्यम प्रवाहात पुरुषांच्या बरोबरीने आलीच पाहिजे, हे सूत्र त्यांनी आपल्या अनेक भाषणांतून व लेखांतून मांडले आहे. स्त्रिया समाजाच्या सांस्कृतिक कणा (बॅकबोन) आहेत. उदात्तता, सहनशीलता, दुसऱ्याबरोबर सामावून घेणे, एकात्मता व आध्यात्मिक शक्ती, हे सद्गुण त्यांच्यामध्ये आहेत. म्हणूनच त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा आहे. स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होणं, हे त्यांच्या व समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच गांधीजींनी कुटिरोद्योग व सूतकताई याला प्रोत्साहन देणं, त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं महत्त्वाचं मानलं. निरनिराळे विधायक कार्यक्रम आखताना, त्यांनी स्त्रिया व दलित या समाजातील वंचित मानलेल्या घटकांना केंद्रस्थानी मानले ते त्याच करता. या सर्वच उपेक्षित समाजाला शिक्षणापासून समाजाने हेतूत: वंचित ठेवले आहे. त्यांच्यासाठी खास त्यांनी मूलोद्योग शिक्षण पद्धती सुरू केली. गांधी आश्रमातून व त्या धर्तीवर चालणाऱ्या आश्रमातून याच पद्धतीने शिक्षण दिले जाण्याची व्यवस्था केली.

स्त्रियांना पाळाव्या लागणाऱ्या पडदा प्रथेपासून त्या मुक्त झाल्या पाहिजेत, त्यासाठी स्त्री-पुरुष दोघांचीही मानसिकता बदलली पाहिजे, कार्यकर्त्यांनी त्यासाठी झटले पाहिजे. मुसलमान कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून त्याची सुरुवात करावी, असा त्यांचा आग्रह होता. जनाब हसरत मोहानी यांची पत्नी त्यांच्याबरोबरच काँग्रेस कार्यात झटली होती. सुरुवाती सुरुवातीला ती बुरखा घालूनच भाषणे करी. पण लवकरच तिने बुरखा  घालणे बंद केले. बेगम अली, शौकत अली महमद अलींची आई ‘बी अमन’ या सर्व खानदानी मुसलमान स्त्रियांनी स्वत: बुरख्याचा त्याग केला व इतरही मुसलमान स्त्रियांमध्ये बुरखाविरोधी वातावरण निर्माण केले, ते केवळ महात्माजींच्या प्रयत्नामुळेच.

गांधीजी भारतात आल्यावरच त्यांचे लक्ष सामाजिक क्षेत्राकडे- विशेषत: स्त्रियांच्या परिस्थितीकडे- गेले, हे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही. त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांमुळे हे घडत गेले. कस्तुरबांचे व त्यांचे संडास सफाईवरून झालेल्या मतभेदानंतर त्यांनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले.

भारतीय स्त्री ही काय चीज आहे, हे जसे त्यांना कळले तसेच भारतीय नवरा व त्याची मानसिकताही त्यांच्या लक्षात आली; तेही स्वत:च्या वागण्यावरून. स्त्रीचा निर्धार व तिची सहनशक्ती याची पारख झाली. आफ्रिकेतील सत्याग्रहानंतर गांधीजींना अटक झाल्यावर पुढील सत्याग्रहाची सर्व सूत्रे त्यांची स्टेनोटायपिस्ट ‘सोनी’ हिने हातात घेतली होती. सत्याग्रहाचे सत्र पुढे चालूच ठेवले. फोईनेक्स आश्रमातील स्त्रिया व द. आफ्रिकेच्या सत्याग्रहातील स्त्रियांचा सहभाग हा फारच प्रेरणादायक होता. वेलूआम्मा नावाच्या १६ वर्षीय सत्याग्रही मुलीने तुरुंगात उपोषण केले. प्रत्यक्ष गांधीजींनी तिला उपोषण मागे घ्यायला सांगितले. ‘आपण सत्याग्रहींना जी शिकवण दिलीत त्याच्याविरुद्ध सांगूच कसे शकता?’ असा उलटा सवाल तिने गांधीजींना केला.

गांधीजींनी सुरू केलेल्या लढय़ात पहिली हुतात्मा एक षोडशवर्षीय तरुणी झाली. त्याचाही परिणाम गांधीवर झाला. त्याशिवाय त्यांची आई पुतळाबाई व दाई रंभाबेन यांच्या वागणुकीतूनही त्यांना निर्भयता म्हणजे काय असते, हे कळले होते. द. आफ्रिका व चंपारण्यातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्दलच्या अनुभवावरून आपल्या सर्व कार्यक्रमात स्त्रियांच्या सामाजिक परिस्थितीचे भान आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आणले पाहिजे, हे त्यांनी जाणले.

जीवनात एक शिस्तबद्ध भागिदारी घेण्याचा पवित्र संस्कार म्हणून गांधीजी विवाहाकडे पाहात. केवळ शारीरिक संबंधाकरता सामाजिक परवाना म्हणून विवाहाकडे पाहाणे त्यांना चुकीचे वाटे. आदर्श विवाह म्हणजे शारीरिक संबंधातून आध्यात्मिक संबंध प्रस्थापित होणे. आध्यात्मिक विकास, सेवा, सामाजिक न्यायामध्ये मनाची गुंतवणूक व प्रेम या चार गोष्टी विवाहाकरिता अटी असाव्यात. स्त्री ही पुरुषाची दासी नाही. पुरुषांना जर आपली पत्नी सीतेसारखी असावी असे वाटत असेल, तर पुरुषानेही रामाप्रमाणे एकपत्नीव्रत व सदाचार यांचे पालन केले पाहिजे. स्त्रीला आपली बाजू न्यायाची वाटत असेल, तर तिच्याआड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार तिला आहे. विवाह समारंभ साधेपणाने व श्रीमंतीचे प्रदर्शन न करता करावे, अशी विनंती गांधीजींनी समाजाला केली. कारण मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गीय त्यांचेच अनुकरण करतात- अगदी आपली आर्थिक परिस्थिती नसताही. ही परिस्थिती बदलण्यासाठीही गांधीजींनी आपल्या घरापासून सुरुवात केली. आपला धाकटा मुलगा रामदास याचा विवाह रूढ पद्धतीप्रमाणे मुलीच्या घरी न करता साबरमती आश्रमात अगदी साध्या पद्धतीने केले. वराचे स्वागत मुलीच्या घरी ज्या पद्धतीने होते, त्याच पद्धतीने त्यांनी वधूचे स्वागत लग्नघरी केले. साध्या पद्धतीने केलेला हा विवाह त्यावेळी खूप गाजला. अनेक कार्यकर्त्यांची लग्ने पुढे या पद्धतीने झाली. लोक या पद्धतीने केलेल्या विवाहाला ‘गांधीविवाह’ म्हणू लागले. आपल्या मुलाच्या लग्नात गांधीजींनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. वधूवरांपैकी एक कोणीतरी हरिजन असल्याशिवाय ते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजर राहाणार नाहीत. आणि हे तत्त्व त्यांनी आजन्म पाळले. समाजाच्या ऐक्यासाठी सवर्ण व हरिजन यामध्ये विवाह होणे ते आवश्यक मानीत.
समाजातील कुप्रथांचे उच्चाटण करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना चार नियम सांगितले.

१) आपल्या मुलीचे वय १५ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करू नकाच, पण आजूबाजूच्या पालकांनाही अशा विचारापासून परावृत्त करा.
२) १५ वर्षांपेक्षा लहान वयात लग्न होऊन मुलगी विधवा झाली असेल, तर तिच्या बापाने स्वत: पुढाकार घेऊन तिचा पुनर्विवाह लावून द्यावा.
३) लग्नानंतर पहिल्याच वर्षांत तरुण मुलीचा नवरा गेला, तर कुटुंबियांनी तिचा पुनर्विवाह लावून द्यावा.
४) प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील विधवेला सन्मानाने वागवावे व तिला ज्ञानोपासना करण्याची संधी मिळवून द्यावी.

विधूर व विधवा यांना एकच नियम लावला पाहिजे. पुनर्विवाहाच्या बाजूने ते शास्त्रातील दाखलेही देतात. विधुरांनी लहान वयातील कुमारिकांबरोबर लग्न करू नये. करायचेच असले तर आपल्याला शोभेल अशा वयाच्या मुलीशी करावे, असे ते सांगत. स्त्री, पुरुषाच्या शुद्धतेबद्दल आग्रह धरू शकत नाही; पण पुरुष ते धरतो. कुणी दिला व का मिळाला पुरुषांना हा अधिकार?  ज्याप्रमाणे स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला पाहिजे; त्याप्रमाणेच तिला घटस्फोटाचा व संतती नियमनाचाही अधिकार असला पाहिजे, असे ते आग्रहाने प्रतिपादन करीत.

स्त्री-पुरुष समानता, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी, अस्पृश्यांचे प्रश्न हे राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गातील मोठेच अडसर आहेत, देशभर या सामाजिक परिस्थितीच्या विरुद्ध आवाज उठत राहिला, तरच राजकीय स्वातंत्र्य मिळवणे  सुलभ होईल, असे गांधीजी मानत. सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजींनी स्त्रिया, हरिजन, गरीबांसाठी आर्थिक कार्यक्रम दिले; म्हणूनच गांधीजींना ‘समाजपरिवर्तक गांधीजी’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

लहान मुलाने जेवढया उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावी तेवढयाच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्त्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्तांएवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.

कर्तृत्त्व आणि गुणवत्ता या लपणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांची दखल समाज घेतही असतो. मात्र समाजाची नजर त्याबाबत जरा जडच राहत आली आहे. त्यातून अलिकडच्या काळात या नजरेवर जातीधर्मांचे आणि पक्षविचारांचे रंगीबेरंगी चष्मे आले आहेत. त्यामुळे खूपशी गुणवत्ता बेदखल राहण्याचीच शक्यता वाढली आहे. त्यातून समाजाचे नेतृत्त्व करतो म्हणणाऱ्यांच्याही अहंता निबर असतात. आपल्याहून पुढे जाऊ शकणाऱ्यांना अनुल्लेखाने, बेदखलीने मारण्याची, पडद्याआड ठेवण्याची पराकाष्ठा या वर्गाकडून चालते. आपण एखाद्याला मोठे म्हटल्यानेच तो मोठा होतो असा कुरुप आत्मविश्वास काहींच्या ठिकाणी असतो. मग ते तसे म्हणणे शक्यतो टाळत असतात.

नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचेच वर्तमानपत्र विदर्भात चालायचे. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्त्वसंपन्न पत्रकार. असे संपादकीय नमुने महाराष्ट्रभूने काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हा या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्त्वसंपन्न लेखक होता. ‘तुमची आजवर किती पुस्तके प्रकाशीत झाली?’ या माझ्या प्रश्नावर अत्यंत सहजगत्या यदुनाथ म्हणाले, ‘दिडेकशे असावीत.’ त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लीम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अध्ययनसिध्द पुस्तकेही त्यात होती. मात्र या माणसाचा मोठा विशेष, माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्त्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही तो होता.

महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली याची यादी करायची ठरविली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेये ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणाऱ्या यदुनाथांना ती मान्य होणारीही ती नसेल. थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई तीत येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेडयापाडयात ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहानमोठया कार्यकर्त्यांची नावेही तीत येतात. या यादीतल्या साऱ्यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असे काही केले आहे याचे यदुनाथांनाच स्मरण नव्हते.

अध्यात्माच्या सगळया साधनेचे लक्ष्य आपल्यातला ‘मी’ पुसून टाकणे हे आहे आणि अध्यात्माची कोणतीही साधना न करता आपल्यातला मी पुसून टाकणे यदुनाथांना जमले होते. कुणातही मिसळून जाऊन त्यांचे होणे ही सिध्दी त्यांना साधली होती. विचारवंतांसोबतची बैठक असो नाहीतर तरुण शिबिरार्थ्यांचे एखादे चर्चासत्र असो, ते तिथे सर्वांचे आपले असत. चर्चा किंवा वाद करणाऱ्यांची एक नित्य अनुभवाला येणारी गंमत अशी की चर्चा वा वादाचा विषय तीत खूपदा गौण होतो आणि त्यात भाग घेणाऱ्यांची व्यक्तिमत्त्वेच महत्त्वाची होतात. विषयाबाबतची आपली बाजू लढविण्यापेक्षा माणसांचा कल आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावीपण दुसऱ्यावर ठसविण्याकडे असतो. परिणामी चर्चेचा विषय हरवतो आणि व्यक्तिमत्त्वांचीच दंगल उभी होते. यदुनाथांशी वाद करावा असे ठरवून आलेल्या वा त्यांना वादात ओढू पाहणाऱ्या माणसांची याबाबत नेहमीच एक फसगत व्हायची. आपला वैचारिक आग्रह न सोडता यदुनाथ संथपणे बोलत असत. व्यक्तीगत खुमारी घेऊन येणाऱ्यांना मग वाद सुचत नसे. खूपदा येणारा अनुभव असा की वादाला म्हणून आलेला माणूस यदुनाथांचाच विचार वेगळया भाषेत त्यांना पटवून देताना दिसे आणि यदुनाथ तो शांतपणे ऐकून घेत असल्याचे पाहून आपण जिंकल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. अशावेळी आपल्या विचाराच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष ही यदुनाथांची जमेची बाजू असे. काही काळापूर्वी पुण्यातल्या समाजवादी सुधारकांवर टीका करणारा माझा एक लेख प्रकाशीत झाला. त्यात या मंडळीने महाराष्ट्रात एक फुकटची वैचारिक दहशत उभी केली असल्याचे मी म्हटले होते. यदुनाथ त्याच संप्रदायात वावरणारे. त्यांना त्या लेखाचा राग येईलसे वाटले होते. पण यदुनाथ भेटले तेव्हा शांतपणे म्हणाले, ‘जे थोडे असतात त्यांना दहशतीचाच मार्ग अनुसरावा लागतो.’

पू. साने गुरूजी हे सगळया समाजवादी मंडळीचे श्रध्देचे ठिकाण आहे. यदुनाथ तर गुरूजींच्या अतिशय निकट वावरलेले. गुरूजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथसोबत केलेले. ‘इस्लामी संस्कृती’ या आपल्या पुस्तकात त्या संस्कृतीच्या सहिष्णुतेची आणि संपन्नतेची महती गुरूजींनी गायिली आहे. मुस्लीम इतिहासाचा अत्यंत चिकित्सक अभ्यास नरहर कुरूंदकरांनी केलेला. या इतिहासात वा संस्कृतीत सहिष्णुता कशी अभावाने आढळते याविषयीची त्यांची मते स्पष्ट होती. बहुदा या पुस्तकावरून यदुनाथांशी आपला वाद होणार ही अटकळ त्यांनी मनात बांधली होती. त्यांनी विषयाला तोंड फोडले. ‘इस्लामी संस्कृतीचे जे स्वरुप गुरूजी सांगतात ते इतिहास म्हणून खरे नाही’
कुरुंदकरांना शांत करीत यदुनाथ म्हणाले, ‘ते स्वाभाविकच नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणे हा गुरूजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे यापेक्षा गुरूजींना ती कशी जाणवली याचेच चित्र त्या पुस्तकात उमटले असणार.’ आपला सगळा आवेग अनाठायीच होता हे कुरूंदकरांना जाणवले. साने गुरूजींविषयीची केवढीही गाढ श्रध्दा मनात असली तरी त्यांच्या संतमनाचे भाबडेपण आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या मर्यादा यदुनाथांना अगोदरच ज्ञात होत्या. आपल्या श्रध्दास्थानाचे सामर्थ्य आणि दुबळेपण यांची डोळस जाणीव असणारे मन त्यांना लाभले होते. आपल्या मनात ज्यांच्याविषयी श्रध्दा आहे त्या थोरांच्या मर्यादा लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र त्याबाबत त्यांना कठोरही होता आले नाही. त्या मर्यादांच्या मागे असणाऱ्या भावनात्मक अडचणींची चिकित्सा करण्यावरच त्यांचा भर अधिक राहिला. अशा मर्यादांचे समर्थन करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधी केला नाही.

यदुनाथांचा आणि आनंदवनाचा स्नेह अतिशय पुराना होता. बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर म्हणत. त्यांच्या सगळया योजना, प्रकल्पात यदुनाथ आरंभापासून अखेरपर्यंत बरोबरीने भाग घेत. पण तिथेही आपले अस्तित्त्व पुसून टाकत ते सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेने वावरत. आनंदवनाच्या एका मित्र मेळाव्याच्यावेळी प्राचार्य राम शेवाळकर आणि मी रात्रीचे गप्पा मारीत एका खोलीत बसलो होतो. बाजूलाच एक पाहुणे तोंडावर पांघरूण घेऊन गाढ झोपी गेलेले दिसत होते. मी जरा चेष्टेच्या सुरात शेवाळकरांना म्हणालो, ‘नानासाहेब, तो स्वप्नांचा सहोदर येऊन दाखल झाला बरं का.’
त्यावर त्या बाजूला झोपी गेलेल्या पाहुण्याने तोंडावरचे पांघरूण दूर करीत म्हटले, ‘हो, आणि तो जागाही आहे बरं कां.’ आणि उडालेल्या हशांत तेथले सगळे दिलखुलासपणे सामील झाले.

बाबा आमटयांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि इम्फाल ते द्वारका अशा काढलेल्या भारत जोडो यात्रेत यदुनाथ तिच्या आखणीपासून सांगतेपर्यंत अग्रभागी होते. मात्र बाबांनी सरदार सरोवर प्रकरणात घेतलेली भूमिका त्यांना अमान्य होती. त्या भूमिकेला यदुनाथांनी जाहीरपणे विरोध करणे त्या दोघांच्याही जवळ असणाऱ्या कोणालाही आवडणारे नव्हते. या प्रकरणात धरणविरोधकांची केवळ एकच बाजू लोकांपुढे ठेवली जात आहे हे जाणवताच यदुनाथांनी सरोवर व्हावे असे गुजराती लोकांना कां वाटते हे सांगणारी एक प्रदीर्घ मुलाखतच मला दिली आणि तीत धरणविरोधकांचे सगळे युक्तीवाद उखडून टाकले. पण त्यांचा हा विरोध धरणाबाबतच्या भूमिकेएवढाच मर्यादित राहिला. पुढे एका कविश्रेष्ठाने जेव्हा बाबा आमटयांनी सरदार सरोवराचा पिच्छा सोडून गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला जाहीररित्या दिला तेव्हा त्याला उत्तर देताना यदुनाथांनी लिहिले, ‘सगळी कामे एकटया बाबांनीच कां करावी?. त्यातली काही तुम्हीही कां करू नयेत?’ वैचारिक भूमिकांबाबतचा हा संयम सांभाळणे अनेकांना अवघड होते. त्यासाठी आयुष्यभराच्या व्रतस्थतेचा रियाज लागतो. यदुनाथांनी आपल्या जन्मभराच्या भटकंतीत तो सांभाळला होता. नाहीतर माणसांना नशेसारख्याच भूमिकाही चढत असतात. यदुनाथांना लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला दिसले नाही. आक्रमक होणे ही त्यांची प्रकृती नव्हती. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती आणि त्या प्रसन्न ठामपणाचा संबंध विचारांशी होता, अहंतेशी नव्हता.

गाडीत भेटावे आणि एखाद्याशी ओळख व्हावी , पुढे तिचे ममत्वात रुपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे यदुनाथ नकळत आयुष्यात येत आणि कायम मुक्कामाला राहत. त्या राहण्यात पाहूणपणाचा उपचार नसे. घरच्या माणसाचे आपलेपण असे. ‘तू खूप दिवसांत काही लिहिलं नाहीस’ असा मला तगादा करतानाच, ते माझ्या पत्नीला म्हणत,’काय करतो आताशा हा रिकाम्या वेळात? जरा त्याच्याकडून लिहून घे.’ नेमाने पत्र पाठवीत. मी उत्तराचा कंटाळा केला तरी त्यांची पत्रे येतच राहत. त्यातून सोबतीचा, पाठिंब्याचा दिलासा मिळत राही.

यदुनाथ थत्त्यांचे व्यक्तिमत्त्व गर्दीत हरवणारे होते. खादीच्या जाडयाभरडया कपडयातील हा साधा माणूस आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही करीत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कोणते तेजोवलय वा दिप्तीमान आभा नव्हती. आणीबाणीच्या परिक्षापर्वात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने जो एकाकी लढा दिला त्यामुळे त्यांच्याभोवती काही काळ असे वलय उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आणीबाणीच्या दमन चक्रापुढे अनेक गर्जणाऱ्या तोफा थंड पडल्या. स्वातंत्र्य, समतेच्या नावाने एरव्ही भीमदेवी थाटात बोलणारे व लिहिणारे आणीबाणीचे आणि त्या काळातील दमनाचे स्तुतीपाठक बनलेले महाराष्ट्राने पाहिले. विरोधक म्हणविणाऱ्यांनी तडजोडीच्या शहाण्या जागा शोधल्या आणि भल्याभल्यांनी शरणागतीची पांढरी निशाणे हलविली. या काळात तुरूंगाबाहेरच्या मुक्या निषेधाला वाचा देण्याचे काम साऱ्या मराठी मुलूखात ज्या थोडया माणसांनी केले त्यात यदुनाथ थत्ते साऱ्यांत पुढे होते.

हे करायला त्यांना कोणी सांगितले नाही. ते करणे हा त्यांचा प्रकृतीधर्म होता. आयुष्यभर जी ध्येये प्राणपणाने जपली त्यांच्यावरच्या संकटाचेवेळी उभारावयाचा संघर्षही प्राणपणानेच लढवावा लागतो. त्यासाठी व्यक्तीजीवनच नव्हे तर प्रसंगी संस्थांचे जीवनही धोक्यात घालावे लागते. ज्या संस्था ध्येयांसाठी जन्माला येतात त्या आपल्या मूळ प्रेरणांपायी खर्ची पडल्या तरी चालतील. मूळ ध्येयवाद वाऱ्यावर सोडून संस्था सांभाळणाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची टिमकी मिरवायची असते, पराक्रमावर हक्क सांगायचा नसतो. ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकावर त्याकाळात बंदी यायची. सरकार जमानत म्हणून मोठी रक्कम मागायचे. स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे ही रक्कम दर हप्त्याला यदुनाथांच्या स्वाधीन करीत. साधना बंद पडले तेव्हा ‘जनता’ सुरू झाले आणि जनतेवर बंदी आली तेव्हा आणखी नवे नाव घेऊन ते पत्र पुन्हा प्रकाशीत झाले. यदुनाथांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जो लढा आणीबाणीत दिला त्याचा गौरव करताना पु.ल. म्हणाले, ‘संपादक म्हणून जे दिव्य लोकमान्यांनी केले तेच नंतरच्या काळात यदुनाथने पत्करले.’

यदुनाथांनी नंतरच्या अल्पावधीत हे वलय मिटवून टाकले आणि सामान्य कार्यकर्त्यांत व आपल्यात येऊ पाहणारे अंतर प्रयत्नपूर्वक नाहिसे केले. असामान्यांच्या मोठेपणाचे आकर्षण त्यांनाही होतेच. असामान्य व्यक्तीविषयीचा श्रध्दाभावही त्यांच्या मनात होता. मात्र अनेक मोठया माणसांना एक विशेष असा की त्यांचे मोठेपण इतरांना ओझ्यासारखे सतत वहावे लागत असते. त्यातल्या अनेकांना हे असे दुसऱ्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवणे मानवतही असते. आपल्या मोठेपणाचे ओझे कोणालाही जाणवायला नको असेल तर ते अगोदर स्वतःच्या अंगावरून उतरून ठेवावे लागते. ते तसे उतरवून ठेवण्याची असामान्य कलाच यदुनाथांना अवगत होती. उपचाराचे अंतर एकदा संपले की यदुनाथ दूरचे राहत नसत आणि मग त्यांचे मोठेपणही उरत नसे. ते प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलत आणि तसेच वागत. मग यदुनाथ सगळयांचे मित्र होत. साधना नावाच्या भारदस्त पत्राचा इतिहास घडविणारा संपादक, आंतरभारतीचा महत्त्वाचा आधार, महाराष्ट्रापासून मणीपूरपर्यंत पसरलेल्या शेकडो युवक चळवळींचा मार्गदर्शक प्रणेता आणि शेकडो पुस्तकांचा लेखक इ…इ.. सगळे विस्मृतीत जाई. फक्त यदुनाथच तेवढे मागे उरत.

यदुनाथ जेवढे साधे दिसत तेवढयाच साधेपणी ते बोलत अन् लिहीतही. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला अलंकारांचा सोडा, साध्या तेल-पावडरीचाही सोस नव्हता. तरीही त्यांचे बोलणे प्रभावी होते. त्यांचा सहजसाधा शब्द थेट काळजापर्यंत जायचा. हा माणूस हातचे राखून बोलत वा लिहीत नव्हता. साधे पत्र लिहावे तेवढया साधेपणी आणि पुस्तकाचा मजकूर ते लिहीत अन् तेवढयाच सहजपणे तो हातावेगळा करीत. पण साधेपणाच दुर्मिळ होत असलेल्या या काळात त्यांच्या या अलंकारशून्य सहजतेत निखळ माणुसकीचा साक्षात्कार व्हायचा आणि श्रोते त्यांच्या व्याख्यानात तल्लीन व्हायचे. त्यांनी सांगितलेले सारे ऐकायचे अन् त्यांनी गायला सांगितले तर ते गायचेदेखील. प्राथमिक शिक्षकांच्या एका राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्धाटन त्यांनी केले. अधिवेशनाच्या मंडपात पंधरा हजारांवर शिक्षक जमले होते. व्यासपीठावर मंत्री, अधिकारी, विचारवंत, समाजसेवक अशी गर्दी. यदुनाथांनी व्याख्यानाच्या मध्येच एक कोरस म्हणायला सुरूवात केली आणि सगळया अधिवेशनाला आपल्या मागून ते म्हणायला सांगितले. मला क्षणभर भीती वाटली. यदुनाथांचा आवाज गायकाचा नव्हता. त्याला गोडव्याचा फारसा स्पर्शही नव्हता. आपल्या सहजसाध्या आवाजात श्लोक म्हणावा तसे त्यांनी कोरस म्हटले आणि तिथल्या प्रत्येकाने ते त्यांच्या मागून म्हणत सारा मंडप दणाणून टाकला. एका शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलांना उद्देशून ते म्हणाले, ‘भारत हा माझा देश आहे असं रोज म्हणता ना? मग तो असा दरिद्री, अर्धपोटी आणि बेकार कां, हे आपण स्वतःला विचारणार की नाही? सगळे भारतीय माझे बांधव म्हणता तर मग हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा उच्चवर्णीय असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही?…’ ती सगळी चिमुकली प्रजा यदुनाथांच्या प्रश्नांनी अंतर्मुख आणि हतबल होऊन गेली. या कमावलेल्या, जोपासलेल्या विनम्र साधेपणामागे साधूगिरीचा सोस नव्हता. साऱ्यांना जवळचे वाटावे हाही हव्यास नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली एक व्यापक बैठक होती. मानवी जीवनाचे अत्युच्च विकसन म्हणजे विचारांचे शासन होय अशी यदुनाथांची धारणा होती. जेव्हा दंडशासनाची जागा विचारांचे शासन घेईल तेव्हा मानवी संस्कृती ही विकासाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहचलेली असेल. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची चिंता वाहणाऱ्यांना हे आवाहन सतत डोळयासमोर ठेवावे लागेल. शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे.
यदुनाथांची श्रध्दा अशी की शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिध्द व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुध्दा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचे भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दाचे भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे किडाकिटुकदेखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर हे हृदयपरिवर्तनाचे आवाहन आहे. हृदय परिवर्तनासाठी त्याला भावेल अशाच शब्दात विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळया आतषबाजीतून येणारे दीप्तीमान झोत आणि शब्दांच्या समईतून प्रगटणारा मंद प्रकाश या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी, मंगलमय.

रुसो म्हणाला, तुमच्या एकाही शब्दाशी मी सहमत नसलो तरी तुमचे म्हणणे मांडण्याचा तुमचा अधिकार कायम रहावा म्हणून मी लढायला मागेपुढे पाहणार नाही. ही भूमिका वैज्ञानिक आहे आणि कोणताही वैज्ञानिक आपल्याला अंतिम सत्य गवसले असल्याचा दावा करीत नाही. आजची कल्पना हे उद्याचे सत्य ठरू शकते आणि आजचे सत्य हा सत्यशोधनाच्या मार्गावरील फक्त एक टप्पाच ठरू शकतो. सापेक्ष सत्याच्या आधारे प्रयोग करीत राहणे आणि प्रयोगांती नवे सत्य समोर आले तर त्याचा उमदेपणाने स्वीकार करणे ही वैज्ञानिक भूमिका आहे.

यदुनाथ विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि विज्ञाननिष्ठा हे त्यांचे जीवनव्रत होते. ज्ञान हा अनंतकाळापर्यंत वाहणारा सनातन प्रवाह आहे. तो कोणत्याही ग्रंथापाशी थांबत नाही व गुरू केवढाही मोठा असला तरी तो ज्ञानाचा पूर्णविराम ठरत नाही ही विज्ञाननिष्ठ मनाची भूमिका आहे. म्हणूनच ‘जगातील सगळी ग्रंथालये जाळून टाका. कारण सगळे ज्ञान कुराणात आले आहे’ ही मागणी या मनाला जशी मान्य होणार नाही तसे ‘सगळे ज्ञान वेदात आले असल्याने त्यावरच्या निष्ठाच तेवढया अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या आहेत’ ही श्रध्दाही त्याला भावणारी नाही. व्यास आणि बुध्द हे ज्ञानाचे पूर्णविराम नाहीत आणि मार्क्स आणि गांधीजवळही ज्ञानाचा प्रवाह थांबणारा नाही. आपल्या श्रध्दास्थानांना ज्ञानाचे अंतिम निकष मानून थांबणारे लोक ज्ञान वाढवीत नाहीत. आपापल्या श्रध्दास्थानांचे ते फक्त देव्हारे माजवीत असतात. त्यात ज्ञानोपासनेपेक्षा महंतगिरीच बलवत्तर असते. कोणताही विज्ञाननिष्ठ माणूस अशा महंतगिरीचा उपासक असणार नाही. गुलाल उधळला काय आणि नीळ उधळली काय अखेर दोन्हीतल्या अंधश्रध्देचे कूळ एकच असणार.

यदुनाथ थत्त्यांची विज्ञानोपासना अशी खणखणीत बुध्दीवादाच्या अधिष्ठानावर उभी होती. आठव्या शतकातल्या क्युरेश जमातीतले काही प्रश्न निकालात काढण्यासाठी सलिवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर काही सुधारणा सुचवितात. तो काळ धर्माच्या भाषेत बोलणारा असल्यामुळे आपला विचार तो धर्माच्या परिभाषेत सांगतो आणि हाडामासाच्या माणसाचे म्हणणे कुणी ऐकत नाही म्हणून हा विचार अल्लाने आपल्या दूतांकरवी माझ्यापर्यंत पोहचविला असे म्हणतो व त्यातून इस्लामचा जन्म होतो. सन पूर्व सहाव्या शतकातल्या वैदिक धर्मातील हिंसाचाराला विरोध करण्यासाठी त्या हिंसेमागच्या प्रेरणांनाच सिध्दार्थ आव्हान देतो. हे आव्हान तेव्हाच्या धर्माच्या परिभाषेत येते. ते बुध्दमुखातून येते आणि नव्या धर्माचे प्रवर्तन सुरू होते.

तत्कालीन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा तत्कालीन भाषेतून झालेला प्रयत्न हे सर्व धर्मांचे जन्मकारण आहे आणि तसेच ते समजून घेतले पाहिजे. विसाव्या शतकाचे निकष जसे पैगंबराच्या किंवा बुध्दाच्या काळाला लावता येत नाहीत तसे कुराण व स्मृतींच्या कायद्याच्या आधारे विसाव्या शतकातले प्रश्नही सोडविता येणार नाहीत. हा विज्ञाननिष्ठ बुध्दीवादातून साकारणारा सेक्युरॅलिझम आहे. यदुनाथ अशा सेक्युलर विचाराचे कृतीशील कार्यकर्ते होते. एक गाव एक पाणवठा ही बाबा आढावांची चळवळ असेल किंवा मुस्लीम सुधारणावादाचा हमीद दलवाईचा भव्य प्रयत्न असेल, यदुनाथ अशा कामांचे दायित्व स्वतःहून शिरावर घेत आणि आपले काम म्हणून त्यासाठी झिजत. मात्र करडया बुध्दीवादाने वा चिकित्सक सेक्युलॅरिझमने यदुनाथांना रुक्ष किंवा कोरडे बनविले नाही. जीवनातील ऋजुता आणि गोडवा यांच्याशी आपले नाते त्यांनी तेवढयाच हळूवारपणे जपले. म्हणून लहान मुलांसाठी त्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेत पुस्तके लिहिणे त्यांना जमले. साहित्य संमेलनांमधून उद्याच्या या वाचकांचा म्हणजे बाल वाचकांचा विचार होत नाही याचा त्यांना राग यायचा आणि तरुण मुलामुलींच्या मनाची जपणूकही त्यांना साधायची.

बुध्दीवादाने त्यांना अश्रध्द बनविले नाही उलट त्यांच्या जीवनातील सगळया श्रध्दा बुध्दीवादाने डोळस केल्या. व्यक्तीपूजेचे स्तोम न माजविणारे ममत्व त्यांना साधले आणि त्या ममत्वाला आपल्या चिकित्सा बुध्दीवर मात करू न देणारा आत्मसंयमही त्यांना जमला. मराठी बुध्दीवादाला अलिकडच्या काही दशकात अहंतेचा विकार जडला आहे. इथला प्रत्येक बुध्दीवादी हा एक स्वतंत्र तिरसिंगराव आहे आणि इतरांकडे पुरेशा तुच्छतेने पाहणारा तुच्छतावादीही आहे. आपला बुध्दीवाद सतत गर्जून सांगणाऱ्या अनेकांची एक आणखीही गंमत असते. त्यांच्या बुध्दीवादात त्यांच्या स्वतःच्या बुध्दीखेरीज इतरांच्या बुध्दीला मान नसतो. अशी तापदायक माणसे आपल्या बुध्दीच्या बेटांवर एकेकटीच आरामात राहतात आणि इतर कोणी आपल्याजवळ येणार नाही अशी स्वतःच व्यवस्थाही करतात. यदुनाथांचा बुध्दीवाद असा स्वयंकेद्री नव्हता. मुळात त्यांचा प्रयासच स्वतःचे असे केंद्र मोडीत काढण्याचा होता. म्हणून त्यांचा बुध्दवाद खुपणारा नव्हता, तो माणसे जोडणारा होता. यदुनाथांच्या पायात अखंड घुमणारे एक चक्रीवादळ होते. ते त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून सतत घुमवीत होते. माणसे, प्रेरणा, संस्था आणि स्वप्ने दाखवीत होते. या देशाच्या भविष्याचे अंकुर जपत, फुलवत आणि वाढवत यदुनाथ देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत अखंडपणे फिरत. त्यासाठी त्यांना बोलवावे लागत नसे. त्या अंकुरांचा सुवास थेट त्यांच्यापर्यंत निमंत्रणासारखा पोहचत असे.

कोणत्याही आदरणीय शब्दाच्या वाटयाला अवमूल्यनाखेरीज काही येऊ नये असा हा दुर्दैवी काळ आहे. या काळात मूल्यनिष्ठा हा खरेतर जाणकारांच्या कुचाळीचा आणि उपहासाचा विषय. अशावेळी मूल्यांवरची ज्याची निष्ठा प्रामाणिक असेल त्याला दरक्षणी आपल्या सच्चाईची किंमत चुकवावी लागते आणि चुकवता आली नाही तर तिच्या कर्जाचे ओझे आयुष्यभर अंगावर वागवावे लागते. यदुनाथ थत्ते हा माणूस हे मोल चुकवीत होता आणि ते चुकविल्यानंतर त्याचा भार अभिमानाने ओढतही होता. अशा माणसाला कसलीही जाहिरात न करता अपरिग्रहाचे व्रत घ्यावे लागते आणि त्याची उपासनाही आयुष्यभर करावी लागते. यदुनाथांना आयुष्याच्या उत्तरार्धात घर मिळाले तेही पत्रकारांसाठी कॉलनी झाली त्यात. त्यातले श्रीमंतीचे एकमेव लक्षण त्यांच्याजवळच्या ग्रंथांच्या संग्रहाचे.

फिरत जगणे ही यदुनाथांची साधना. या साधनेचेच त्यांना वेड राहिले. त्यापुढे साध्याचा मोहदेखील त्यांना कधी थांबवू शकला नाही. ते ज्यांना श्रध्दास्थानी मानत त्या गांधींनीही म्हटले, साधनांची काळजी करणेच तेवढे आपल्या हाती असते. माणसे जोडत हिंडणाऱ्या यदुनाथांची माणसे हीच मिळकत आणि श्रीमंती होती. त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची माहिती ज्यांना आहे त्यांनाच तिचे मोल कळणारे आहे. मतभेद मान्य, पण मतभेद करणाऱ्या माणसाचा दुरावा अमान्य असा हा ध्यास आहे. एखादे माणूस तुटले आणि दूर गेले की त्यातून येणारे रितेपण अशा माणसांना सतत छळत असते. शिवाय ही गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादितही नसते. आपण आपल्या मानलेल्या माणसांनी एकमेकांपासून दूर झालेलेही त्यांना चालत नसते.

यदुनाथांना जीवनाची चांगली बाजूच तेवढी पाहता आली. माणसांचे विकार माणूस म्हणून क्षम्य असल्याचे मत त्यांनी अभ्यासपूर्वक बनवले होते. म्हणून महात्म्यांनाही क्षुद्र होताना पाहून त्यांना त्याचा धक्का बसत नसे. ‘अरे, शेवटी मोठा झाला तरी तो माणूसच’ असा त्यांचा अभिप्राय असे आणि ‘त्याचे विकार त्याच्यापाशी, तुला आणि मला त्याची चांगली बाजूच महत्त्वाची वाटली पाहिजे’ हा वर उपदेश. जीवनाकडे पाहण्याचा विधायक वगैरे म्हणतात तो हाच दृष्टीकोन असावा. गांधी ज्याला सत्याग्रहाची साधना म्हणायचे तीही हीच असावी. त्यांच्यासोबत पंजाबच्या दहशतग्रस्त ग्रामीण भागातून फिरत असतानाची गोष्ट. अमृतसरजवळच्या तरणतारण या शिखांच्या पवित्र क्षेत्री त्यांचा मुक्काम होता. तेथे मी त्यांना भेटलो आणि मग फतेहाबाद, अमृतसर, वाघा, बियास, फिरोजपूर, होशियारपूर अशी आमची फिरस्ती सुरू झाली. प्रत्येक गावात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराधांच्या कुटूंबात आम्ही जात होतो. त्यांचे सांत्वन करणे आमच्या ताकदीबाहेरचे होते. पण त्यांना मिळणारी सरकारी मदत वेळच्यावेळी आणि पुरेशी मिळते की नाही, त्यातल्या अडचणी कोणत्या याची माहिती आम्ही घेत होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगत होतो.

मला हा तात्पुरत्या मलमपट्टीचा आणि आमच्याच मानसिक समाधानाचा उपक्रम वाटत होता. त्यातून कोणताही मूळ प्रश्न निकाली निघत नाही असे वाटत होते. एकदा मी हे यदुनाथांना सांगितले तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ‘जे प्रश्न सरकारांना सोडवता येत नाहीत ते आपल्या हाती निकालात निघावे ही आकांक्षा बाळगणे हेच मुळात चुकीचे.’

मी म्हणालो, ‘मग आपल्या पायपिटीला अर्थ कोणता?’ यदुनाथ म्हणाले, ‘यातून आपण काही शिकलो की नाही? जे शिकलो ती उपलब्धी. आपल्या प्रयत्नांनी इतरांची जाण किती वाढते याहूनही आपली जाणीव विस्तारते की नाही हे पाहणे महत्त्वाचे.’

गांधी म्हणाले, सत्याग्रह कोणाही विरुध्द नसतो, कशाही विरुध्द नसतो आणि काही मिळवायचे म्हणूनही नसतो. तो आत्मसामर्थ्य वाढविण्याचा मार्ग आहे. यदुनाथजींची आयुष्यभराची पायपीट ही गांधीजींचा असा सत्याग्रही होण्याची होती.

याच दौऱ्यात एकदा मी त्यांना चेष्टेने विचारले, ‘पंजाबच्या भूमीवर शहिद-बिहीद होण्याचे तर तुमच्या मनात नाही?’ त्यावर प्रसन्न हंसत ते म्हणाले, ‘खुळा की काय, अरे आपल्यावर गोळी झाडायला अतिरेक्यांना वेडबिड लागलं कां? आपली गोळी कोणावरही वाया दवडू नये एवढं त्यांना चांगलं समजतं.’
यदुनाथ फिरत राहिले. तरुणांना भेटत अन् बोलत राहिले. मित्र जमवण्याचे व्यसन त्यांनी अखेरपर्यंत जोपासले. कोणतीही ठोकळेबाज विचारसरणी न सांगता ते स्वतंत्र विचारांचे मार्ग सांगत राहिले. माझ्या स्वभावापायी यदुनाथांसारखी माणसे नुसतीच जोडणे मला जमले नाही. पण मला अंतरलेली माणसे पुन्हा माझ्याजवळ आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल मी पाहिली आहे. आपल्या विस्तारालेल्या परिवारातली माणसे नेहमी भेटावीत, त्यांचे परस्पर सौहार्द कायम असावे आणि आपण जसे एखाद्याला प्रोत्साहनाने फुलवतो तसे त्यांनीही करावे ही त्यांची इच्छा असे.

एखाद्या लहानशा स्टेशनावर अंधाऱ्या रात्री गाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती रॉकेलचा उंच दिवा घेऊन एक कामगार गाडीच्या चाकांवर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हाती तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. यदुनाथ थत्त्यांची आठवण झाली की मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकांत तेल ओतणारा तो माणूस आठवतो. सगळया भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी असते आणि अशी माणसे आपल्याजवळची असणे हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. केव्हाही येणारा असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवणारा, त्यात प्रकाशकणांची पेरणी करणारा आणि आला तसाच नकळत निघून जाणारा असतो.