डॉ. सुहास पळशीकर, सौजन्य – मटा

गेल्या काही महिन्यांत आपल्या प्रातिनिधिक संसदीय पद्धतीत काही सुधारणा करण्याची चर्चा सुरू झालेली दिसते. भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनाने ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या स्वरूपाच्या आहेत की काय, हे तपासून पाहण्याची गरज आहे.

————————————-

ऑगस्ट महिन्यात भ्रष्टाचार-विरोधी आंदोलन झाले. त्या वेळी भ्रष्टाचार न करण्याच्या आणाभाका बऱ्याच लोकांनी घेतल्या. त्यानंतर भ्रष्टाचार किती कमी झाला, याची कोणालाच काही कल्पना नाही; पण भ्रष्टाचारविरोधी जनमताचा सूर पाहून चेव चढलेल्या आंदोलक नेत्यांनी देशातले सगळे राजकारण सुधारून टाकण्याचा विडा उचलला आहे. त्यातूनच आपल्या प्रातिनिधिक संसदीय पद्धतीत सुधारणा करण्याची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या राजकीय पक्षांच्या कार्य-पद्धतीत सुधारणा व्हायला हवी, जनता- प्रतिनिधी यांचा संवाद वाढायला हवा, प्रतिनिधींनी सत्तेचा दुरुपयोग केल्यास त्याचे प्रभावीपणे नियमन व्हायला हवे, याबद्दल दुमत नाही. पण भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या स्वरूपाच्या आहेत की काय, हे तपासून पाहण्याची गरज आहे.

‘ जनता’ ही खरी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, या आकर्षक आणि गोंडस भूमिकेतून मुख्यत: तीन सुधारणा सध्या सुचवल्या जाताना दिसतात.

१) ‘सर्व उमेदवार नाकारण्याचा’ मतदारांना अधिकार असायला हवा. सगळेच पक्ष वाईट उमेदवारांना स्पधेर्त उतरवतात आणि त्यामुळे मतदारांपुढे चांगले पर्यायच उरत नाहीत अशी ही तक्रार आहे. अशा वेळी आपली नाराजी नोंदवण्यासाठी मतदारांना ‘उमेदवार नाकारण्याचा अधिकार’ असायला हवा, असा युक्तिवाद केला जातो. २) उमेदवार निवडून आला तरी त्यानंतर त्याच्यावर मतदारांचा अंकुश राहावा म्हणून प्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांकडे असायला हवा. या दोन्ही अधिकारांद्वारे पक्ष आणि लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्यावर मतदारांचे नियमित स्वरूपात नियंत्रण राहील व लोकशाही व्यवहार जास्त जनताभिमुख होईल, अशी अपेक्षा असते. ३) आताच्या व्यवस्थेनुसार कायदेमंडळात (बहुतेक वेळा सरकारतफेर्) विधेयके मांडली जातात आणि त्यावर चर्चा होऊन निर्णय होतो. यात काही वेळा जनतेच्या चचेर्साठी प्रस्ताव लोकांपुढे ठेवले जातात; पण एकूण ही प्रक्रिया घडते ती फक्त कायदेमंडळात. कायदेमंडळावर एवढा भरवसा ठेवण्यामुळे जनतेचे अधिकार कमी होतात आणि कायदेमंडळे व लोकप्रतिनिधी हे डोईजड होतात, अशी तक्रार केली जाते. त्यावर उपाय म्हणून लोकांनी कायदे सुचवण्याची तरतूद असावी असा प्रस्ताव पुढे येतो. त्यानुसार, लोकांनी एखाद्या विधेयकाची मागणी केली तर कायदेमंडळाने ते विधेयक चचेर्ला घेणे बंधनकारक असेल. अशा विधेयकांच्या तरतुदीला जनोपक्रम असे म्हटले जाते.

भारतात बऱ्याच लोकांना लोकशाहीच्या ‘स्विस मॉडेल’चे फार आकर्षण आहे. तिथे ‘प्रत्यक्ष लोकशाही’ला पूरक अशा तरतुदी आहेत; त्यामुळे तिथली लोकशाही जास्त अस्सल आहेे असे त्यांना वाटते. या उपक्रमांच्या आकर्षणामागे मुख्य भूमिका अशी असते की थेट जनता सहभाग घेते तीच खरी लोकशाही. पण दुदैर्वाने आधुनिक व्यवहारात अशी थेट सहभागाची लोकशाही अस्तित्वात न येता मर्यादित स्वरूपाची, प्रतिनिधीं-मार्फत राज्यकारभार करण्याची, म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही आहे. तीत थोडा जनसहभाग वाढवण्याचे काही उपाय करायला हवेत, असे म्हटले जाते. लोकशाही सत्व कमी असलेल्या आपल्या सार्वजनिक व्यवहारांना प्रत्यक्ष लोकशाहीचे बूस्टर डोस द्यावेत म्हणजे आपल्या लोकशाहीची तब्येत सुधारेल, असा या प्रस्तावांमागचा विचार दिसतो. या उपायांची व्यावहारिकता आधी तपासून पाहायला हवी.

उमेदवार नाकारणे, प्रतिनिधी परत बोलावणे आणि जनप्रस्तावित विधेयके चचेर्ला घेणे या तीनांपैकी पहिला प्रस्ताव व्यावहारिकदृष्ट्या सर्वात कमी गुंतागुंतीचा आहे. तांत्रिकदृष्ट्या आजही हा अधिकार आहेच; पण थेट मतदान यंत्रावर सर्व उमेदवार नाकारण्याची तरतूद नाही. तशी केली तर मतदार सहजगत्या, एक बटन दाबून सर्व उमेदवार आपल्याला अमान्य असल्याचे नोंदवू शकेल- तेही आपली अनामिकता कायम ठेवून. मात्र किती (टक्के) मतदारांनी सर्व उमेदवार नाकारले तर निवडणूक रद्दबातल ठरवायची, नंतर पुन्हा निवडणूक घेताना आधीचे उमेदवार बाद समजायचे का, निवडणूक लांबली तर त्या मतदारसंघाच्या प्रतिनिधीविनाच कायदेमंडळाचे काम पुढे चालणार का, यासारखे प्रश्न शिल्लक राहतातच.

प्रतिनिधी परत बोलावण्यात जास्त गुंता आहे. ज्यांनी मतदानच केले नाही ते प्रतिनिधी परत बोलावण्यात सामील होणार का, किती मतदारांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया सुरू करायची आणि किती मतदारांच्या संमतीने प्रतिनिधी परत बोलावला जाईल, या व्यावहारिक प्रश्नांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही. जिथे कुठे ही तरतूद आहे तिथे तिचा प्रत्यक्ष अनुभवही फारसा उत्साहवर्धक नाही.

राहिला प्रश्न ‘जनते’ने कायदे सुचवण्याचा. जनलोकपाल विधेयक हे त्याचेच एक उदाहरण होते. या प्रकारात, ‘जनते’ने म्हणजे ‘कोणी’ सुचवलेले विधेयक विचारात घेणे कायदेमंडळाला बंधनकारक असेल हे स्पष्ट नाही. शिवाय, असे प्रस्ताव कायदेमंडळाच्या सभासदांमार्फत का मांडले जाऊ शकत नाहीत हाही प्रश्न आहेच. मुख्य म्हणजे जनप्रस्तावित विधेयक मंजूर करण्याचे बंधन कायदेमंडळावर असणार की फक्त त्याचा विचार करण्याचे बंधन असणार? जर ते मंजूरच करावे लागणार असेल (‘जनलोकपाल’बद्दल असा आग्रह धरला गेला) तर कायदेमंडळाला स्वतंत्र अधिकारच उरत नाही आणि मंजूर करण्याचे बंधन नसेल, तर जन-प्रस्तावाला काही महत्त्व उरत नाही असे हे त्रांगडे आहे. नागरी समाजाचा मक्ता स्वत:कडे घेतलेले लोकशाहीचे हितचिंतक या सर्वांवर काही उपाय काढतीलच; पण वरवर आकर्षक दिसणाऱ्या उपाययोजनांची अंमल-बजावणी कशी जिकीरीची असते त्याची वानगी म्हणून या व्यावहारिक अडचणींचा निदेर्श केला. खरा मुद्दा आहे तो त्यामागच्या तात्त्विक भूमिकेचा आणि तिच्याविषयीच्या गंभीर आक्षेपांचा.

मेजर जनरल(निवृत्त) शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

 

भारत आणि चीन यांच्यातील कुरापती सुरू होत्या, त्या चीनच्या बाजूकडूनच. सातत्याने सीमेवर कुरबुरी करून भारताला डिवचण्याचे चीनचे उद्देश सुरूच होते. चीनने आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी आपल्याला हवे तेव्हा युद्ध पुकारले आणि हवे तेव्हा थांबवले. 1962 च्या कटू आठवणींचा व तो सारा इतिहास या वेळी. मागील अंकात भारत-चीन यांच्यातील सीमांची माहिती घेतली; आता युद्ध आणि त्या वेळच्या राजकीय आणि युद्धभूमीवरील घडामोडीबद्दल….

 

सप्टेंबर ते डिसेंबर हा भारतीय उपखंडातील युद्धमोहिमांचा कालखंड. स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर आपल्याला पाच युद्धांना सामोरं जावं लागलं. कारगिल वगळता बाकी याच मोसमात झाली. त्यातील चारांत भारतीय सेनेनं दिग्विजयी यशःश्री खेचून आणली; पण त्यांच्यात एक जीवघेणा अपवाद- 1962 सालचे चीनबरोबरील युद्ध. त्यात भारतीय स्थळसेनेचा लांच्छनास्पद पराभव झाला. 1971 च्या भारत-पाक युद्धासारख्या निर्णायक विजयाच्या लखलखाटात या पराजयाचा विसर पडता कामा नये. त्यातून शिकलेल्या धड्यांची पुनःपुन्हा उजळणी होत राहिली पाहिजे.

चीनची दगलबाजी
भारत-चीनमधील सीमावादाचे सविस्तर स्वरूप गेल्या आठवड्याच्या” सप्तरंग’मध्ये विशद केले होते. भारताच्या 1,25,000 चौरस किलोमीटर प्रदेशावर हक्क असल्याचा चीन दावा करतो. त्याचे प्राधान्य म्हणजे उत्तरेतील अक्‍साई चीनचा वैराण प्रदेश, तिबेट आणि झिंगिआंग या दोन विभागांना जोडणाऱ्या काराकोरम महामार्गाच्या सर्वेक्षणाची कारवाई 1953-54 मध्ये चीनने पुरी केली. आणि 1955 मध्ये त्याची बांधणी युद्ध स्तरावर चालू झाली. हा भाग कोणत्याही किमतीवर गिळंकृत करण्याचा चीनचा ठाम निश्‍चय होता. त्यासाठी 1954 मधील नेहरू-चाऊ एन लायदरम्यान गाजावाजात झालेल्या पंचशील कराराच्या “हिंदी-चिनी भाईभाई’ जिव्हाळ्याला न जुमानता काही दिवसांत चिन्यांनी उत्तर प्रदेश-तिबेट सीमेवरील बाराहोती या भारतीय प्रदेशात तैनात असलेल्या सेनेच्या उपस्थितीला हरकत घेऊन, तो भाग चीनच्या मालकीचा असल्याचा प्रथमच दावा केला. त्यानंतर जून 1955 मध्ये बाराहोती, सप्टेंबर 56 मध्ये शिप्कीला, ऑगस्ट 1956 मध्ये लडाखमधील लनकला, ऑक्‍टोबर 1957 मध्ये नेफामधील लोहित अशा हेतूपूर्वक घुसखोरीचे सत्र सुरू झाले. दुसऱ्या बाजूस मात्र आपल्या 1957 च्या भारतभेटीदरम्यान चाऊ-एन-लाय यांनी चीनने ब्रह्मदेशामध्ये मॅकमोहन सीमारेषेला मान्यता दिली असल्याने, भारताच्या बाबतही त्याबद्दल कोणताही प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची नेहरूंना शाश्‍वती दिली होती.

6 ऑक्‍टोबर 1957 ला काराकोरम महामार्ग वाहतुकीला खुला झाल्याची चीनने गाजावाजासहित घोषणा केली. भारत-चीन संबंधात हे महत्त्वाचे वळण आणि लक्षणीय पाणलोट म्हटले पाहिजे. जुलै 1958 मध्ये “चायना पिक्‍टोरियल’ या चीन सरकारच्या अधिकृत प्रकाशनातील एका नकाशात भारताचा नेफा विभाग (तिराप डिव्हिजन वगळून) लडाखचा प्रमुख भाग चीनमध्ये समाविष्ट केले गेले होते.

14 डिसेंबर 1958 च्या पत्रातच नेहरूंनी याबद्दल विचारणा केल्यावर चाऊंनी 23 जानेवारी 1959 ला दिलेल्या उत्तरात भारत-चीनमधील पारंपरिक सीमा कालबाह्य असून, त्यांच्यावर पुनर्विचार आणि सर्वेक्षण होण्याची आवश्‍यकता प्रतिपादन केली. 1959 मध्ये तिबेटमधील खापा जमातीच्या बंडाला चीन सरकारच्या क्रूर प्रतिसादानंतर दलाई लामा तवांगमार्गे भारतात दाखल झाले. त्यांना राजाश्रय मिळाल्यानंतर बिथरलेल्या चीनने काश्‍मीरच्या मुद्‌द्‌यावर पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आणि नागा व मिझो बंडखोरांना मदत देऊ केली.

त्यानंतर भारताला डिवचण्याचे सत्र चीनने मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. जून 1959 मध्ये लडाखमधील चुशुल, जुलैमध्ये तेथील पॅंगॉंग सरोवर, ऑगस्टमध्ये नेफातील किझेमाने घुसखोरीचे प्रयत्न झाले. त्याच महिन्यात लडाखमधील रोझांग येथे चिनी सैन्याची एक पलटण दाखल झाली. पण या सर्वांवर कळस झाला तो प्रसिद्ध लोंगजू घटनेने. 25 ऑगस्ट 1959 ला 200 ते 300 चिन्यांनी नेफाच्या सुबान्सिरीमधील लोंगजू येथे भारताच्या आसाम रायफल्सच्या सीमेवरील मोर्चाला वेढा घालून अंदाधुंद गोळीबार केला. अशा प्रकारे संपूर्ण भारत-चीन सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडवून भारताच्या सहनशीलतेला डिवचण्यामागील चीनचा हेतू दिवसेंदिवस स्पष्ट होत चालला होता.

7 नोव्हेंबर 59 ला चाऊंनी मॅकमोहन रेषेच्या 20 किलोमीटर मागे चीन जाईल; परंतु लडाखमध्ये “जैसे थे’ परिस्थिती ठेवावी, असा प्रस्ताव नेहरूंसमोर ठेवला. नेहरूंनी 16 नोव्हेंबरच्या उत्तरात पारंपरिक सीमांवर भर दिला. ही पत्रापत्री होत राहिली. 19 एप्रिल 60 मध्ये दिल्लीत दोन्ही पंतप्रधानांमध्ये झालेल्या प्रदीर्घ बैठकीत चीनने आपली “क्‍लेमलाईन’ सादर केली. 1960 मध्ये लाडाख प्रदेशात लानला, कोंगकाला, चांगचेन्मो नदी वगैरे भागात एक चिनी पायदळ रेजिमेंट (भारतीय ब्रिगेड इतके म्हणजे दहा ते बारा हजारांच्या घरात) दाखल झाली. ऑक्‍टोबर 1961 पर्यंत चिन्यांनी लडाख ते नेफापर्यंत 61 नवीन चौक्‍या स्थापल्या होत्या. मे 1962 मधील एका अंदाजानुसार स्थळ सेनेच्या सात डिव्हिजन (सुमारे 61 पालटणी) चिन्यांनी त्यांच्या 1960 मधील “क्‍लेमलाइन’वर तैनात केल्या होत्या.

भारताचा प्रतिसाद –
चीन केवळ सीमाप्रसंग घडवून आणेल; परंतु मोठ्या प्रमाणात हल्ला करणार नाही, असे या काळात भारतीय राज्यकर्त्यांचे अनुमान होते. खेदाची गोष्ट म्हणजे 1959 पर्यंत भारत-चीन सीमा ही संरक्षण खात्याच्या हाताखाली नव्हे, तर परराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रात होती. चीनचा मनोदय लक्षात आल्यावर नोव्हेंबर 1959 मध्ये प्रथमच ती सीमा संरक्षण खात्याच्या अखत्यारीत दिली गेली. आणि सिक्कीम ते ब्रह्मदेश जंक्‍शनचा 1075 किलोमीटर लांबीच्या प्रदीर्घ सीमेवर केवळ एक इंफट्री डिव्हिजन हलवण्यात आली. या 4 इंफट्री डिव्हिजनमध्ये फक्त दोनच ब्रिगेड होत्या. त्यातील एक ब्रिगेड नेफामधील कामेंग विभागासाठी आणि दुसरी ब्रिगेड बाकी तीन विभागांसाठी (सुबान्सिरी, सियांग व लोहित) तैनात करण्यात आली. एप्रिल 1960 मध्ये लडाखमध्ये 114 इंफट्री ब्रिगेड हलवण्यात आली. हे संख्याबळ अत्यंत नाममात्र (आणि काहीसे हास्यास्पद) होते; पण तरीही भारत सरकार जागे झाले होते.

सीमाप्रदेशात रस्तेबांधणीचे काम हाती घेण्यासाठी जानेवारी 1960 मध्ये “सीमा सडक संघटने’ची स्थापना करण्यात आली. त्याबरोबरच “ऑपरेशन ओंकार’ या नावाच्या प्रकल्पाखाली आसाम रायफल्स या निमलष्करी दलाच्या मोठ्या प्रमाणात विस्तार करून त्यांच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्याचे आदेश देण्यात आले.

2 नोव्हेंबर 1961 रोजी घेतलेल्या एका अत्युच्च बैठकीत नेहरूंनी सैन्याला संपूर्ण सीमांचे नियंत्रण साधण्याचे आणि केवळ स्वसरंक्षणासाठी हत्यारांचा उपयोग करण्याचे आदेश दिले. 5 डिसेंबर 1961 ला सेना मुख्यालयाने लडाखमध्ये जास्तीत जास्त पुढे जाऊन गस्त (पेट्रोलिंग) घालण्याचे, तर नेफामध्ये सीमेच्या जितके निकट जाता येईल तेवढे जाऊन मोर्चे बांधण्याचे निर्देश जारी केले. नेफामधील हे धोरण “फॉरवर्ड पॉलिसी’ या नावाने प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने आपले इतर शरीर आणि दंडाचे स्नायू बळकट नसतानाही आपला हात पुढे खुपसण्यासारखा हा अविचार होता. चीन हल्ला करणार नाही या “अंधश्रद्धे’वर आधारलेले हे धोरणच भारताच्या पराजयाचे मूळ ठरले. चीनप्रमाणे पद्धतशीरपणे मोठ्या प्रमाणात सैन्य पुढे हलवून, त्यांना कपडे-लत्ते, अन्नधान्य, दारूगोळा आणि तोफांचा पाठिंबा पुरवून, वातावरणाशी एक-दोन हिवाळे संगमनत साधून मगच आपण सीमेला भिडलो असतो तर ते परिपक्व, विचारपूर्ण आणि चाणाक्ष ठरले असते.

लडाखमध्ये उत्तरेत दौलतबेग ओल्डी ते डेमचोकपर्यंत 480 किलोमीटरमध्ये तैनात केलेले सैन्य पूर्णतया अपुरे होते. दोन चौक्‍यांमध्ये 10 ते 20 किलोमीटरचे अंतर होते. नेफामध्ये 20 जुलै 1962 पर्यंत एकूण चौतीस ठाणी (पोस्ट) उभारण्यात आली होती. 7 इन्फट्री ब्रिगेडचे मुख्यालय तवांगमध्ये होते. 1 सिख या पलटणीच्या कॅप्टन महाबीरसिंग यांनी थागला कडेपठारावरील यातील एक चौकी धोला येथे उभारली होती. हाच टापू ऑक्‍टोबरमध्ये भारताचा “पानिपत’ ठरणार होता.

6 जुलै 1962 ला लडाखमधील गलवान येथील तीस गुरख्यांच्या ठाण्याला तीनशे चिन्यांनी वेढा घातला; परंतु गुरखे जागेवरून हलले नाहीत. 21 जुलैला दौलतबेग ओल्डीजवर 14 जम्मू अँड कश्‍मीर मिलिशियाच्या एका तुकडीबरोबर चिन्यांची चकमक झाली. 8 सप्टेंबरला थांगला कडेपठारावरील धोलामधील 9 पंजाबच्या पोस्टला चिन्यांनी वेढा घातला. 20 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत चकमक चालू राहिली. मग मात्र सारं काही शांत झालं. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. या घटनांवरून चीन हल्ला करणार नाही अशी भारतीय राज्यकर्त्यांची भोळी समजूत झाली.

गंडांतराला आमंत्रण
9 सप्टेंबर 1962 रोजी संरक्षणमंत्री मेनन, स्थलसेनाप्रमुख थापर, कॅबिनेट सेक्रेटरी खेरा, इंटेलिजन्स ब्यूरो (आय बी) प्रमुख मलिक आणि ईस्टर्न आर्मी कमांडर सेन यांच्या बैठकीत चिन्यांना थागला कडेपठाराच्या दक्षिणेकडे हाकलून लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईला “ऑपरेशन लेगहॉर्न’ असे नाव देण्यात आले. त्याचबरोबर सर्व भारतीय ठाण्यांना चिन्यांवर आपणहून गोळीबार करण्याची प्रथमच मुभा देण्यात आली. कार्पोला आणि युमत्सोला या संवेदनाशील जागी ठाणी उभारण्याचेही आदेश देण्यात आले. 18 सप्टेंबरला धोला भागातूीन चिन्यांना हाकून लावण्याची आज्ञा भारतीय स्थलसेनेला दिली गेल्याबद्दलचे विधान भारत सरकारच्या प्रवक्‍त्याने ठळकपणे केले. 9 पंजाब या पलटणीला यासाठी धोलामध्ये हलवण्यात आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार चालत राहिला. धोला भागातून नामकाचू ही नदी वाहते. काम कठीण होते. 22 सप्टेंबरला जनरल थापर यांनी एका अच्युच्च बैठकीत “लेगहॉर्न’बद्दलच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली; परंतु त्या दिवशी प्रधानमंत्री आणि संरक्षणमंत्री दोघेही दिल्लीबाहेर होते. थापरांना पूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. हा घोर दैवदुर्विलास ठरला.

सेना अधिकाऱ्यांचा चढता क्रम होता – 7 इन्फ्रंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडिअर दळवी, 4 इन्फ्रंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल प्रसाद, 33 कोअरचे लेफ्टनंट जनरल उमरावसिंग, ईस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल सेन. जेव्हा उमरावसिंग यांनी “लेग हॉर्न’ ऑक्‍टोबरमध्ये पुरे होण्याबद्दल शंका प्रकट केली, ते राजकीय श्रेष्ठींना आवडले नाही. उमरावसिंगना दूर करण्यासाठी मग एका नवीन कोअर मुख्यालयाची – 4 कोअर उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली आणि लेफ्टनंट जनरल बी. एन. कौल यांची प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. कौल हे एक अत्यंत बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी परंतु युद्धात अननुभवी अधिकारी होते. ते नेहरू आणि मेनन यांच्या खासगी विश्‍वासातील होते. कौल यांची या अत्यंत मोक्‍याच्या जागेवर आणीबाणीच्या वेळी नेमणूक, ही घोडचूक होती.

लागलीच कौल तवांगमध्ये दाखल झाले. वास्तविक त्यांनी तेजपूरमध्ये आपल्या मुख्यालयात असायला हवे होते; परंतु आघाडीवर येऊन ते स्वतः हुकूम सोडू लागले आणि पलटणींना जलदगतीने आघाडीवर हलवण्याचे निर्देश देऊ लागले. 1/9 गुरखा रायफल्स आणि 2 राजपूत या दोन पलटणींना सीमा आघाडीवर घाईत हलवण्यात आले. 9 पंजाब पलटणीने याआधीच धोला- त्सांगलेमध्ये ठाणी उभारली होती. 10 ऑक्‍टोबरला चिन्यांनी मोठ्या संख्येने हल्ला चढवला. भारतीय जवानांकडे तुटपुंजी काडतुसे, अपुरा शिधा आणि नाममात्र तोफांचा मारा, तरीही ते हिरीरीने लढले. एक हल्ला त्यांनी परतवून लावला; परंतु नंतर मात्र 9 पंजाबला धोला-त्सांगलेमधून माघार घ्यावी लागली. 9 पंजाबचे सहा जवान शहीद, तर अकरा जखमी झाले. (पेकिंग रेडिओने दुसऱ्या दिवशी या पलटणीचे 77 मृत्युमुखी आणि 100 घायाळ असा दावा केला!) या चकमकीत मेजर चौधरींसहित तिघांना महावीर चक्र आणि दोघांना वीर चक्र देण्यात आले.
कौलसाहेब त्या दिवशी दिल्लीत परतले आणि “लेग हॉर्न’बद्दल पुनर्विचार करण्याची त्यांनी विनंती केली. नेहरूंनी त्यांचा सल्ला मानून चिन्यांना हाकलून देण्याचा विचार रद्द करून सीमेवरील चौक्‍यावरून तटून राहण्याचे निर्देश दिले. 11 ऑक्‍टोबरच्या या बैठकीत संरक्षण मंत्र्यांसहित सर्व उच्चपदस्थ हजर होते. पण परतल्यावर ब्रिगेड आणि डिव्हिजन कमांडरनी कौलना सैन्य धोलामधून मागे आणण्याची विनंती केली. 17 ऑक्‍टोबरला तेजपूरमध्ये संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नामकाचू क्षेत्रातून माघार घेण्याचा पुनश्‍च निर्णय घेण्यात आला. दुसऱ्याच दिवशी कौल आजारी पडल्याने दिल्लीला परतले.

चीनची लढाई
15 ऑक्‍टोबरपासून चिनी नामकाचू क्षेत्रात संकेत देत होते. 19 ऑक्‍टोबरला 1100 चिनी गोळा झाल्याचे दिसले. 20 ऑक्‍टोबरला सकाळी चीनने नामकाचू ओलांडून तुटपुंज्या भारतीय सेनेवर प्रखर हल्ला चढवला. त्याचबरोबर नेफाच्या लोहित व इतर भागांत आणि लडाखमध्ये चीनने जोरदार आणि संयुक्त चढाई केली. नामकाचूच्या लढाईत 282 भारतीय सैनिकांनी प्राणार्पण केले.

चिनी हल्ले कामेंग डिव्हिजनमध्ये प्रामुख्याने दोन कडेपठारामार्गे झाले. पहिला, थागला – तवांग – सेला – बोमडिला मार्गे, दुसरा त्याच्याच पूर्वेच्या आणखी एका कडेपठारामार्गे ः टुलुंगला – पोशिंगला – बोमडिला हे दोन्ही एकमेकास पूरक होते. डोंगराळी पायवाटांमार्गे वेगाने ते 24 ऑक्‍टोबरपर्यंत तवांगला पोचले.

24 ऑक्‍टोबरला चिन्यांनी आपले युद्ध थांबवले. तिबेट ते तवांगपर्यंत रस्ता करणे त्यांना आवश्‍यक होते. इतर अन्नधान्य आणि दारूगोळ्याची तजवीज करणे ही निकडीचे होते. 24 ऑक्‍टोबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत युद्धात स्वल्पविराम घेण्यात आला. या काळात भारतीय सेनेने ही सेला या पहाडी भागात आपले मोर्चे बांधले. परंतु त्यात वेळेच्या अपुरेपणामुळे अनेक त्रुटी राहिल्या.

17 नोव्हेंबरला चिन्यांनी जंगजवळील तवांगचूवरील पूल बांधल्यानंतर आपले आक्रमण पुनःश्‍च चालू केले. प्रथम नूरनांग या पहिल्याच मोर्चावर 4 गढवाल रायफल्स या पलटणीने त्यांना प्रखर सामना दिला. त्या पलटणीचे प्रमुख कर्नल भट्टाचार्य यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले; परंतु त्यानंतर मात्र चिन्यांचे आक्रमण सातत्याने यशस्वी होत राहिले आणि म्हणावे असे कोणतेही आव्हान त्यांना मिळाले नाही. सेला, बोमडिला हे बालेकिल्ले फारसा संघर्ष न करता ढासळत गेले.

20 नोव्हेंबरपर्यंत चिनी सैन्य पार सखल भागातील फुटहिल्सपर्यंत पोचले. भारतीय सेनेच्या तुकड्यांना माघार घ्यावी लागली. नेफाच्या लोहित विभागातही चिनी सैन्याने आणखी एक आघाडी उघडली. वलॉंग भागातील भारतीय सेनेच्या तुकड्यांना मागे रेटत ते पार वलॉंगपर्यंत पोचले. दुसऱ्या बाजूस लडाखमध्ये त्यांची आगेकूच चालूच होती. 24 ऑक्‍टोबरपर्यंत संपूर्ण उत्तर लडाख चिन्यांच्या हाती पडले. 18 नोव्हेंबरला त्यांनी लडाखमध्ये आपले दुसरे सत्र चालू केले आणि त्यांच्या “क्‍लेमलाइन’पर्यंत पुढील 48 तासांत ते पोचले. लडाखमध्येही भारतीय सैनिकांनी अनेक शूरगाथा आपल्या रक्ताने लिहिल्या. रेझांगला येथे मेजर शैतानसिंग यांच्या कुमाऊं पलटणीच्या बलिदानाची गाथा अमर आहे. शैतानसिंग यांना परमवीर चक्राने गौरवण्यात आले.

या युद्धासाठी भारतीय सेनेची मानसिक तयारी होण्याला वेळच मिळाला नाही. चिनी सैन्य संख्याबळ आणि इतर युद्धसाहित्यात भारतीय सैन्यापेक्षा अनेक पटींनी सरस होते. भारतीय स्थलसेनेत शिधा, हिवाळ्याचे कपडे, दारूगोळा, काडतुसे, हत्यारे आणि दळणवळणाची साधने या प्रत्येक बाबतीत अक्षम्य कमतरता होती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वायुसेनेचा उपयोग न करणे, ही घोडचूक होती. 1962 मध्ये तिबेटमध्ये विमानपट्ट्या उपलब्ध नव्हत्या. भारतीय वायुसेनेला सक्षम प्रतिसाद देणे त्यांना अवघड झाले असते. उलट थव्याथव्यांनी येणाऱ्या चिनी दस्त्यांना टिपणे भारतीय वायुसेनेला सुलभ होते. 16 नोव्हेंबरनंतर तवांगपुढे आगेकूच करणाऱ्या चिनी तुकड्यांवर विमानी हल्ले झाले असते तर त्यांच्या आक्रमणाला खीळ पडली असती आणि सेलाची संरक्षणफळी पुढील हल्ले परतवू शकली असती. युद्धाचा इतिहास बदलून गेला असता. परंतु हा निर्णय घेण्यात राज्यकर्ते कचरले.

भारतीय इंटेलिजन्स संस्थांचे संपूर्ण अपयश हे पराभवाचे एक कारण होते. स्थलसेनेच्या आघाडीवरील तुकड्यांचे लढण्याचे मनोबल काही कालांतराने खच्ची होत गेले. पर्वतीय युद्धपद्धतीत प्रशिक्षणाचा अभाव, हे त्यामागचे प्रमुख कारण होते. उंचीवरच्या प्रदेशातील युद्धात अनेक विशेष पैलूंचा विचार झाला पाहिजे. “अक्‍लमटायझेन’ किंवा “उंचीवरील वातावरणाची सवय’ हा त्यातला एक. वातावरणाची सवय नसता या बारा-चौदा हजार फुटांवरील कमी दाबाच्या प्रदेशात कोणत्याही तयारीविना केवळ सुती कपडे आणि कॅनव्हास बुटात लढाईची कल्पनाच करवत नाही; पण जवानांनी ते साधले.

पण सर्वांत अधिक दोष जातो तो भारतीय नेतृत्वाला- राजकीय आणि सैनिकी. नेहरूंची पर्वतप्राय कुशाग्र आणि प्रगल्भ राजनीती मात्र या हिमालयीन आव्हानात तोकडी पडली. चीनवर ठेवलेला भाबडा विश्‍वास प्रामुख्याने अपयशाचे कारण ठरला. कृष्णमेनन हे अत्यंत बुद्धिमान आणि तल्लख व्यक्तिमत्त्व; परंतु त्यांची अहंमन्यता, आढ्यता आणि आत्मविश्‍वासाचा अतिरेक विवेकबुद्धीला घातक ठरली. विरोधी पक्षांनीही नेहरूंवर अवेळी दबाव आणून त्यांना चक्रव्यूहात लोटण्याचे काम केले. पण त्याबरोबरच स्थलसेनेचे नेतृत्व आव्हान पेलण्यात असमर्थ ठरले. दुबळी पडली ती “जनरलशिप’. “युद्ध हे सेनापतीच्या मनात लढले जाते. तिथेच जय-पराजयाचा निर्णय होतो’! जनर्रल थापर, कौल, पठानिया, प्रसाद वगैरे सगळेच त्यांच्या पदाचे अप्रूप पेलण्यात कमी पडले. जिगरीने लढला तो मात्र भारताचा जवान. जिथे जिथे चिन्यांशी दोन हात झाले, तिथे तिथे त्याने शौर्याची पातळी उंचावली, तो थोडाही कमी पडला नाही.

चीनने 21 नोव्हेंबरला बिनशर्त “सीजफायर’ जाहीर केला. नेफामधील सर्व विभागांतून चिनी सैन्य मॅकमोहन रेषेच्या 20 किलोमीटर मागे हटले. लडाखमध्ये मात्र ते 1960 च्या त्यांच्या “क्‍लेम लाईन’वर डटून राहिले. त्यांनी आपले उद्दिष्ट पूर्णतया साधले होते.

गिरीश कुबेर, सौजन्य – लोकसत्ता

कोणाच्या तरी मरणाचा कोणाला तरी आनंद व्हावा, हे तसं वाईटच. तसा तो होत असेल तर त्यातून काही गंभीर दोष दिसतो. जो गेला त्याचाही आणि जे त्यानंतर आनंद व्यक्त करतात, त्यांचाही. अल जमाहिरिया अल अरेबिया अल लिबिया अल शाबिया अल इश्तिराकिया अल उझ्मा या देशातला असा दोष दिसून आला. हा देश म्हणजे लिबिया आणि वर लिहिलं ते त्याचं खरं नाव.

कर्नल मुअम्मर गडाफी याच्या निधनानं लिबियाच्या रखरखीत प्रदेशात जो काही आनंद साजरा केला जातोय, तो अंगावर येतो. हातात स्टेनगन, एके ४७ घेतलेली कोवळी पोरं लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या रस्त्यांवरनं फिरतायत..आणि फटाके उडवावेत तशा बंदुकांच्या फेऱ्या झाडतायत.. हा उन्माद कोणाही सुसंस्कृताची काळजी वाढवेल, असाच. एके काळी. म्हणजे बाराव्या/तेराव्या शतकात या त्रिपोलीतली वाचनालयं त्यांच्या ग्रंथसंग्रहासाठी ओळखली जात होती. त्यावेळच्या राजानं जेव्हा ख्रिस्ती फौजांचा पराभव केला, तेव्हा विजयाची किंमत त्यानं पुस्तकाच्या रूपानं वसूल केली होती. म्हणजे त्यानं पराभूताकडून रोख खंडणी घ्यायचं सोडून पुस्तकं घेतल्याची नोंद आहे. खरं तर आताचा राजासुद्धा असं काही करणार नाही. मुळात हल्ली राजा पुस्तकं वाचत नाही ते सोडा. म्हणजे एके काळच्या इतक्या समृद्ध संस्कृतीच्या पोटी हा असा गडाफी निपजला आणि त्याला मारलं गेल्यावर हषरेल्हास साजरा करणारी प्रजाही निपजली.

हा देश खरं तर होता ऑटोमान साम्राज्याचा भाग. पण पुढे त्रिपोलीच्या अहमद करमनली यानं इस्तंबूलच्या पाशाला हरवलं आणि काही काळ का होईना, या साम्राज्यातून आपली सुटका करून घेतली. नंतर या करमनली घराण्याला ऑटोमन साम्राज्याचा भाग बनावं लागलं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीची या प्रदेशावर नजर गेली. कारण फ्रान्स ही दुसरी युरोपीय महासत्ता हा प्रदेश गिळंकृत करू पाहात होती. त्यावेळच्या महासत्तांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी १८८७ पासून आपापल्यांतच करार केले आणि हा सगळा आफ्रिकी, आशियाई प्रदेश आपापसांत वाटून टाकला. त्या परिसरात राहणारे नागरिक हे जणू मातीचे गोळे आहेत, त्यांना काही भावभावना नाही, अशा पद्धतीनं त्यांची वाटणी करण्यात आली. त्यानुसार इटलीच्या वाटय़ाला पूर्वीच्या ऑटोमन साम्राज्यातला त्रिपोली आणि सायरेनिकाचा भाग आला. इतर भाग ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांच्यात विभागले गेले. १९११च्या सुमारास यातल्या वाटय़ावरनं इटली आणि टर्की यांच्यात युद्ध झालं. महासत्तांच्या युद्धात विनाकारण चिल्लर मरतात, तसं इथंही झालं. ती टर्की राहिली बाजूला. नंतर त्रिपोलीयन आणि इटलीचे सैनिक हेच एकमेकांत लढू लागले. नंतर तर पहिलं महायुद्धच सुरू झालं. तेव्हाही हे सगळेच प्रदेश मग एकमेकांच्या विरोधात लढू लागले. कारण त्यांचे मालक एकमेकांच्या विरोधात लढत होते.

या प्रदेशाला असा काही चेहरा मिळाला नव्हता तोपर्यंत. युद्धानंतर इटली आणि ब्रिटन वगैरेंत काही करारमदार झाले आणि सय्यद इद्रिस याच्याकडे या प्रदेशाची सूत्रं दिली गेली. नंतर दुसऱ्या महायुद्धात हा सगळा प्रदेश तर युद्धभूमीच होता. जनरल रोमेलची आफ्रिकी बटालियन आणि ब्रिटिशांचं आठवं दळ यांच्यात या प्रदेशात तुंबळ युद्ध झालं. या युद्धानंतर जगाची वाटणीच झाली. पण या प्रदेशाचं काय करायचं हे नक्की होईना. त्यामुळे ब्रिटनकडे सायरेनिका आणि त्रिपोली गेलं आणि फ्रेंचांनी फेझ्झन भागात ठाण मांडलं. या वाटणीवर युनोची नजर होती. अखेर बरंच चर्वितचर्वण झाल्यानंतर या प्रदेशाचा स्वतंत्र देश करायचा निर्णय झाला.
लिबियाचा जन्म १९५१चा. एका बाजूला इजिप्त, सुदान, दुसरीकडे चाड आणि नायजेर, तर तिसरीकडे अल्जिरिया आणि टय़ुनिशिया तर चौथ्या बाजूने भूमध्य समुद्र. या सगळय़ाच्या बरोबर मध्ये हा लिबिया. त्यामुळे तो आफ्रिकीही आहे आणि अरबस्थानाशी असलेल्या भौगोलिक सख्ख्यामुळे आशियाईही वाटतो.

राजे इद्रिस यांच्याकडे या नव्या देशाची सूत्रं होती. तसे सुखातच होते म्हणायचे ते. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर आठच वर्षांनी लिबियाच्या भूमीत तेल सापडलं होतं. १९५९ सालच्या या घटनेनं या देशाला अचानक महत्त्व मिळालं आणि अमेरिकेला या प्रदेशात पहिल्यांदा मोठा रस निर्माण झाला. त्याआधी १९४४ साली, म्हणजे पहिलं महायुद्ध संपलंही नव्हतं तेव्हा, अमेरिकेनं सौदी राजा महंमद बिन इब्न सौद याला तेलासाठी तब्बल ६० वर्षांच्या करारात बांधून घेतलं होतं. त्यासाठी रुझवेल्ट खास सुवेझ कालव्यात अमेरिकी युद्धनौका घेऊन आले होते. त्यामुळे तेलाचं महत्त्व या देशाला सगळय़ात आधी कळलं होतं आणि अमेरिकी कंपन्या तेलाच्या वासावरच होत्या. १९५९ साली लिबियात तेल सापडलं आणि सगळय़ांची पावलं त्या देशाकडे वळली. या कंपन्यांची कामाची पद्धत सोपी होती. एक तर तेल ज्या ज्या प्रदेशांत सापडलं, ते सगळेच्या सगळे देशप्रमुख मागास होते. त्यामुळे त्यांना पटवणं सोपं होतं. राजे इद्रिस यांचंही तसंच होतं. चार पैसे त्यांच्या तोंडावर फेकले, ऐषारामाच्या रसदीची सोय झाली आणि राजे इद्रिस यांनी आपला भूप्रदेश तेल कंपन्यांसाठी खुला केला.

हा काळ होता अरब राष्ट्रवादाच्या जन्माचा. शेजारच्या इजिप्तमध्ये गमाल नासर हे या प्रदेशाची संघटना बांधण्याच्या प्रयत्नात होते. अमेरिकेच्या विरोधातली त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्या प्रदेशातले देशोदेशींचे तरुण त्यांच्या नासरप्रेमाने भारले गेले होते. त्यातलाच एक होता कर्नल मुअम्मर गडाफी. आपला देश लुटला जातोय आणि राजे इद्रिस यांना त्याचं काहीच वाटत नाहीये, हे त्याला दिसत होतं. आपल्या देशाला लुटणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याला सत्ता हवी होती. ती सरळ मिळणार नाही, हे दिसतच होतं. ती त्यानं वेगळय़ा मार्गानं मिळवली. १ सप्टेंबर १९६९ या दिवशी लिबियात रक्तहीन उठाव झाला आणि राजे इद्रिस यांना पदच्युत करून गडाफी सत्तेवर आला.
लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची भाषा करणारा गडाफी स्वत:च मोठा लुटारू बनला. काल अखेर तो मारला गेला. म्हणजे आपल्या मरणानेच मेला तो.

पण या सगळय़ामागचा महत्त्वाचा घटक आहे तो तेल.  जगाचा डोळा आहे तो या तेलावर. कारण लिबियातलं तेल हे सौदी तेलाइतकं चांगलं असतं. त्याच्या शुद्धीकरणासाठी जास्त खर्च करावा लागत नाही आणि ते मिळवण्यासाठी जास्त खोल खणावंही लागत नाही. त्याचमुळे एकापाठोपाठ एक बडय़ा तेल कंपन्यांनी लिबियात आपलं घर केलं होतं आणि गडाफी त्यांना डोळय़ात खुपायला लागला. कारण या तेल कंपन्यांना तो शांतपणे जगू देत नव्हता. एकटा लिबिया दिवसाला सध्या एक कोटी ६० लाख बॅरल्स तेल जगाच्या बाजारात ओतत असतो. सध्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास आहे. यावरून यात किती पैसा गुंतला आहे, ते कळू शकेल. सिर्ते, मुर्झुक आणि पेलजिया आदी परिसरात हे तेलसाठे आहेत. यातही सगळय़ात मोठा साठा आहे तो सिर्तेमध्ये. यातला योगायोग. म्हणजे त्याला योगायोग म्हणायचं असेल तर. हा की हेच नेमकं गडाफी याचंही गाव आहे. तो मारला गेलाही त्याच गावात.

गडाफी क्रूरकर्मा होता यात काही शंका नाही. मानवी हक्कांची पायमल्ली तो सर्रास करत होता, त्याबाबतही कोणाचं दुमत असणार नाही. पण तेल कंपन्यांना जोपर्यंत तो फायदेशीर ठरत होता तोपर्यंत त्याचं अमानुषत्व कधी कोणाच्या डोळय़ावर आलं नाही. म्हणजे हे इराकच्या सद्दाम हुसेन याच्यासारखंच झालं. जोपर्यंत त्यानं अमेरिकेच्या इराकमधल्या तेल कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं नव्हतं, तोपर्यंत सद्दाम अमेरिकेचं लाडकं बाळ होतं. इतकं की १९८१ साली खुद्द डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी त्याला जैविक अस्त्रांची खेळणी पुरवली होती. या अस्त्रांनी पुढे त्यानं लक्षावधींचे प्राण घेतले. अमानुष अत्याचार केले. पण कोणी काहीही म्हणालं नाही. पुढे अमेरिकी तेल कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण त्यानं केलं नसतं, तर त्याच्या या मानवी हक्क उल्लंघनांचा वगैरे गाजावाजा झालाही नसता. त्याही आधी इराणचे महंमद मोसादेघ यांचंही असंच झालं. त्यांना मारलं नाही. पण सत्तेवरनं उलथवून जन्मभरासाठी तुरुंगात डांबलं गेलं. तिथेच ते गेले. ज्यांनी ज्यांनी तेल कंपन्यांना आव्हान दिलं, ते असे बेमौत गेले.

जे हात आपल्याला भरवतात त्या हाताचा चावा. अगदी हुकूमशहा झाला तरीही.घ्यायचा नसतो, हे साधं जगण्याचं तत्त्व सद्दाम हुसेन विसरला. गडाफीही. हे तेल नसतं तर लिबियात कोण कोणावर किती अत्याचार करतोय, याची उठाठेव करायला कोणी गेलंही नसतं.

तेलाचा शाप हा असा असतो.

शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न भारताकडून नेहमीच केला जातो; पण विस्तारवादी वृत्तीच्या चीनकडून त्यामध्ये अडथळे आणले जातात. चीनचा हा पवित्रा आजचा नाही. अरुणाचल प्रदेशाबाबत चीन अनेक वर्षापासून कुरापती काढत आहे. माओ- त्से- तुंग यांच्या काळापासून भारताशी वैरभाव बाळगणाऱ्या चीनबरोबर 1962 ला झालेल्या युद्धात भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारत-चीन संबंधांचा विचार करताना मुळात या दोन्ही देशांच्या सीमांचा विचार केला पाहिजे. भारत-चीन यांच्यातील सीमा जिथे जुळतात त्या सर्व सीमांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. प्राचीन काळापासून या दोन देशांतील सीमा कशा आखल्या गेल्या याचा उलगडा या अभ्यासपूर्ण लेखातून होईल….

————————————-

भारत हा एक महाकाय देश आहे. आकारमानाने जगात सातवा आणि आशिया खंडात दुसरा. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील “ब्रिटिश इंडिया’ यापेक्षाही विराट. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत सामावणारा. ब्रिटिश साम्राज्याचा सीमा प्रदेशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतया रणनैतिक होता. विस्तृत भारताच्या संरक्षणासाठी चौफेर “बफर’ राज्ये निर्माण करून रशिया आणि चीनसारख्या साम्राज्यांना परभारे शह देण्याच्या चाणाक्ष धोरणाचा त्यांनी सदैव पाठपुरावा केला. ही “बफर’ राज्ये कमकुवत आणि आज्ञापालक असावीत, याची त्यांनी काळजी घेतली. म्हणूनच रशियाच्या झार साम्राज्याच्या विस्तारवादी हालचालींना प्रतिबंध घालण्यासाठी महाराजा गुलाबसिंगसारख्या महत्त्वाकांक्षी संस्थानिकाला त्यांनी उचलून धरले, तर चीनमधील मंचू घराणेशाहीला आटोक्‍यात ठेवण्यासाठी तिबेटच्या लामा राजांना त्यांनी पाठिंबा दिला.

महाराजा गुलाबसिंग हा काश्‍मीरच्या डोग्रा राजघराण्याचा संस्थापक. वास्तविक महाराजा रणजितसिंहांचा तो सरदार. परंतु तिसऱ्या ब्रिटिश-शीख युद्धात इंग्रजांना त्याने अमूल्य साहाय्य दिले. त्यानंतर 1946 मध्ये अमृतसर तहानुसार ब्रिटिशांनी जम्मू-काश्‍मीरच्या राजाचा किताब त्यांनी गुलाबसिंगला बहाल केला. गुलाबसिंग हा कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी सम्राट होता. 1841 मध्ये त्याचा सेनापती जनरल झोरावरसिंगने मानसरोवरापर्यंत मजल मारली. 1842 मध्ये गुलाबसिंग, चीनचा राजा आणि तिबेटी लामा यांच्यात तहानुसार लडाख काश्‍मीरचा भाग झाला. 1853 मध्ये गुलाबसिंगच्या नोकरीत असलेल्या जॉन्सन नावाच्या एका भूसर्वेक्षकाला उत्तरेतील झिंगिआंग प्रदेशामधील होटानच्या मुस्लिम राजाने निमंत्रण पाठवले होते. लडाखमधील लेहपासून होटानचा मार्ग श्‍योक नदीच्या काठाकाठाने होता. परंतु भूसर्वेक्षणात तरबेज असलेले जॉन्सनमहाराज अशा वहिवाटीच्या मार्गाने थोडेच जातील? त्यांनी होटानकडे सरळ ईशान्य दिशेने आगेकूच केली आणि त्यांना वाटेत एक निर्जन प्रदेश आढळला अक्‍साईचीन. परत आल्यावर गुलाबसिंगांना त्यांनी हा प्रदेश जम्मू-काश्‍मीरच्या अधिपत्याखाली आणण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे अक्‍साईचीन जम्मू-काश्‍मीर राज्यात आणि तेणेकरून “ब्रिटिश इंडिया’मध्ये समाविष्ट झाला. गुलाबसिंगने आपले राज्य अशा प्रकारे चौफेर वाढवले.

चीनची मंचू राजसत्ता 1911 मध्ये कोसळली, तर रशियाची झार घराणेशाही 1917 मध्ये नामशेष झाली. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांना उत्तर आणि पूर्व दिशांकडून भारतावर वाटणाऱ्या धोक्‍याचे स्वरूप काहीसे मवाळ झाले. या व इतर अनेक कारणांमुळे ब्रिटिश इंडिया आणि चीनमधील सीमारेषा नि-संदिग्धरीत्या आखल्या गेल्या नाहीत. याबाबतीत दोन प्रमुख प्रयत्न झाले. पहिला, लडाख आणि झिंगयांग प्रांतामधील सीमारेषा निश्‍चित करण्यासाठी 1898 मध्ये व्हाइसरॉय एल्गिन यांचा प्रस्ताव आणि दुसरा, नेफा (सध्याचा अरुणाचल) आणि तिबेटमधील सीमा आखण्यासाठी 1913 मध्ये ब्रिटनचे भारतीय परराष्ट्र सचिव सर हेन्‍री मॅकमोहन यांच्या अध्यक्षतेखाली भारत, तिबेट आणि चीन यांच्या प्रतिनिधींदरम्यान झालेली सिमला परिषद. या दोन्हींमधील संदिग्धतेमुळे आणि चीन व भारत या दोन्ही देशांत विसाव्या शतकाच्या मध्यंतरी घडून आलेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे चीन आणि भारत यांच्यादरम्यान सीमावाद निर्माण झाला. त्याची परिणती नोव्हेंबर-डिसेंबर 1962 मध्ये भारत आणि चीनदरम्यान शस्त्रसंघर्षात झाली.

चीन हा स्वभावत-च विस्तारवादी देश आहे. पश्‍चिमेकडे रशियाशी, वायव्येकडे जपान व कोरियाशी, ईशान्येकडे व्हिएतनामशी, त्याचबरोबर जुळ्या भावाचे नाते असलेल्या तैवानशी त्यांचे सीमासंघर्ष झाले आहेत. माओ-त्से-तुंग तिबेटला हाताच्या तळव्याची आणि लडाख, सिक्कीम, नेपाळ, भूतान आणि अरुणाचल प्रदेश यांना तळव्याच्या पाच बोटांची उपमा देत असत आणि त्यांना स्वतंत्र करण्याचे देशवासीयांना आवाहन करत असत. भारतातही सियाचिन आणि अरुणाचल प्रदेशातील चीनच्या दाव्यांबद्दल पराकोटीचा असंतोष आहे. 1960 मध्ये राजकीय दबावामुळे या यक्षप्रश्‍नाची होऊ शकणारी उकल थांबली. भारत व चीनमधील या सीमावादाचे पारदर्शक आणि निष्पक्ष विश्‍लेषण करून दोन्ही देशांच्या भूमिकांचा मागोवा घेणे आवश्‍यक आहे.

सीमावाद – भारत आणि चीनमधील सीमा उत्तरेकडील हिमालयात आग्नेय काश्‍मीर ते तालू खिंड, लडाख, उत्तर प्रदेश, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेशातून मार्गक्रमण करत पार म्यानमार-भारत-चीनमधील तिठ्यात (ट्राय-जंक्‍शन) समाप्त होते. तिची एकूण लांबी 4057 किलोमीटर आहे.

प्रदेशानुसार आणि त्याचबरोबर तंट्याच्या स्वरूपानुसार या सीमेचे तीन विभाग करता येतील- लडाख, उत्तर प्रदेश – तिबेट सीमा आणि अरुणाचल प्रदेश. या तीन भागात चीन एकूण एक लाख पंचवीस हजार चौरस किलोमीटर प्रदेशावर हक्क असल्याचा दावा करतो. त्यातील 33000 चौ.कि.मी. लडाख सीमा प्रदेशात, 2000 चौ.कि.मी. उत्तर प्रदेश, तिबेट सीमेवर आणि 90,000 चौ.कि.मी. अरुणाचल प्रदेश सीमा प्रदेशात आहे. या तिन्ही विभागांची नैसर्गिक रचना, सीमावादाचे स्वरूप, त्यासाठी झालेले संघर्ष, दोन्ही देशांची रणनीती आणि तडजोडीची शक्‍यता हे सर्व घटक लक्षणीयरीत्या भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यातील सीमावादाची चर्चा पश्‍चिम, मध्य आणि पूर्व या तीन विभागांत वेगवेगळी करणे उपयुक्त होईल.

पश्‍चिम विभाग – भारत-अफगाणिस्तान सीमा आणि पामीर पठारांच्या सान्निध्यात असलेल्या या प्रदेशातील भारत-चीनदरम्यान कटुतेचा विषय ठरलेला भाग म्हणजे अक्‍साईचिन. पुरातनकाळामध्ये दोन खंडांच्या टकरीदरम्यान समुद्रतळ वर फेकला गेल्याने निर्माण झालेले हे 17200 फूट उंचीचे एक वाळवंट. इथे ना गवताचे पातेही उगवते, ना विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानवीय वस्तीचा कोणताही अवशेष इथे होता.

ब्रिटिश इंडिया आणि चीनदरम्यान सीमारेषा उत्तरेकडील कुनलुन पर्वतराजीतून जावी की त्याच्या दक्षिणेकडील काराकोरम पर्वतराजीमधून जावी, याबद्दल इंग्रज आणि चीनमध्ये वादावादी होत गेली. चीनच्या सध्याच्या झिंगियांग राज्यात मुस्लिम राजांची सत्ता होती आणि चीनच्या मंचू साम्राज्याशी त्यांचे नेहमीच बखेडे होत असत. 1853 मध्ये याच मुस्लिम सत्ताधीशाने जॉन्सन यांना आमंत्रण दिले असताना अक्‍साईचिनचा शोध लागून तो महाराजा गुलाबसिंगच्या राज्यात अंतर्भूत झाल्याचा उल्लेख वर आलेलाच आहे. 1863 मध्ये मुस्लिम राजांनी चिनी सत्तेला मागे रेटले आणि इंग्रजांशी तह करून भारत आणि त्यांच्यातील सीमा कुनलुन पर्वतराजीतून जात असल्याचे मान्य केले. परंतु 1878 मध्ये मुस्लिम सत्तेचा पराभव करून चिनी परतले आणि 1892 मध्ये त्यांनी काराकोरम पर्वतराजीपर्यंत मजल मारली. ब्रिटिश इंडिया आणि चीनमधील सीमा कोणती असावी याबद्दल ब्रिटिश सरकारमध्ये दोन गट होते- जहाल आणि मवाळ. आक्रमक रणनीती अवलंबून ही सीमा उत्तरेकडील कुनलुन पर्वतराजींमार्गे जावी हा जहाल गटाचा हट्ट, तर सारासार विचार करून काराकोरम पर्वतराजीनुसार सीमा मानावी हे मवाळ गटाचे मत.

1898 मध्ये लॉर्ड एल्गिन भारताचे व्हॉईसरॉय असताना त्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले. ते मवाळ गटाचे असल्याने त्यांनी काराकोरम पर्वतराजीमधून काराकोरम खिंडीपर्यंत आणि नंतर आग्नेयेस वळून लक्‍सतांग या उपपर्वतराजीतून जाऊन जम्मू-काश्‍मीरला मिळणारी सीमा ही ब्रिटिश इंडिया-चीनमधील सीमारेषा असावी हा प्रस्ताव 1899 मध्ये ठेवला. लक्षणीय बाब म्हणजे या प्रस्तावानुसार सध्याचा वादग्रस्त सोडा पठाराचा अक्‍साईचिन हा प्रदेश चीनमध्ये जातो. परंतु चीनने नेहमीसारखी कावेबाज चालढकल केल्याने आणि 1904 मध्ये जहाल गटाचे लॉर्ड कर्झन हे भारताचे व्हॉईसरॉय झाल्याने, त्याबरोबर त्यांच्याइतकेच कट्टर असे जनरल अर्डघ हे सरसेनापती लाभल्याने हा प्रस्ताव भिजतच पडला. 1911 मध्ये मंचू साम्राज्य कोसळल्यावर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनातील या प्रश्‍नाची तीव्रता आणि निकड कमी झाली आणि 1947 पर्यंत सीमारेषा निःसंदिग्धतेने आखल्या गेल्या नाहीत.

1949 मध्ये चीनमध्ये साम्यवादी सत्ता आल्यानंतर 1950 मध्ये त्यांनी तिबेट व्यापले. तिबेट आणि झिंगियांगमध्ये सुळ्यासारखा घुसणारा अक्‍साईचिन हा भाग. या दोन भागांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम तसे 1951 मध्येच चालू झाले. परंतु 1954-55 दरम्यान त्याला जोर आला आणि 1958 पर्यंत तो तयारही झाला. दुर्दैवाने या विराट काराकोरम महामार्ग प्रकल्पाची भारताला पुसटशीच कल्पना होती आणि त्याबद्दल 1958-59 पर्यंत कोणताही विरोध प्रकट करण्यात आला नाही. भारतीय इंटेलिजन्स संस्थांचे हे अक्षम्य अपयश म्हणावे लागेल.

1960 मध्ये या महामार्गाची सुरक्षितता साधण्यासाठी आणि अक्‍साईचिनवरचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चीनने लडाखमध्ये हल्ले चढवले. 1962 च्या भारत-चीन युद्धात तर हा प्रदेश त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्या युद्धात त्यांनी जो प्रदेश बळकावला तो अजूनही त्यांच्या हातात आहे. त्यामधून ते मागे गेले नाहीत. दोन सैन्यातील नियंत्रण रेषा “प्रत्यक्ष ताबारेषा’ (लाइन ऑफ ऍक्‍चुअल कंट्रोल – एलएसी) म्हणून ओळखली जाते. चीन या सर्व प्रदेशावर हक्क सांगतो. काराकोरम महामार्ग हा त्यांच्या दृष्टीने केवळ महत्त्वाचाच नव्हे, तर “जीव की प्राण’ आहे. त्यामुळे भारताबरोबरील कोणत्याही तडजोडीत सियाचिन सोडण्यास ते तयार होणार नाहीत.

मध्य विभाग – उत्तर प्रदेश – तिबेट सीमेवरील मानसरोवर मार्गावरील शिप्की, निलंग, बाराहोती या काही भागांवर चीन हक्क सांगतो. हा वाद बाकी प्रदेशांच्या तुलनेत अत्यंत गौण आहे. विशेषत- मानसरोवराला जाण्यासाठी या भागातील मार्ग चीनने उपलब्ध केला आहे, हे लक्षात घेता या भागातील वादाची उकल होणे शक्‍य आहे.

पूर्व विभाग – पूर्वेकडील प्रदेशात चीनचे प्रामुख्याने दोन दावे आहेत- पहिला सिक्कीमवर आणि दुसरा अरुणाचलावर. सिक्कीमबाबतीत तो अगदीच लेचापेचा आहे. 1890 मधील चीन-ब्रिटन करारानुसार सिक्कीम हा ब्रिटिश इंडियाचा भाग असल्याचे चीनने मान्य केले होते. 1904 मध्ये पुनश्‍च त्याला दुजोरा मिळाला. 1950 मधील भारत-सिक्कीम करारानुसार सिक्कीमला “संरक्षित’ (प्रोटेक्‍टोरेट) स्वरूप मिळाले. 1975 मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सिक्कीमला भारतीय प्रांताचा दर्जा दिला आणि सिक्कीम अधिकृतरीत्या भारतात समाविष्ट करून घेण्यात आले. त्यावर चीनने बरेच आकांडतांडव केले. परंतु दोन्ही बाजूच्या प्रधानमंत्र्यांच्या वेगवेगळ्या भेटींनंतर 2005 मध्ये अखेरीस सिक्कीम चीनच्या नकाशात न दाखवण्याचे चीनने मान्य केले. तरीही त्यात चीन वारंवार शंका काढत राहतो. परंतु ही निव्वळ सौदेबाजी आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही. सिक्कीमबद्दल भारत-चीनमधील वाद मिटल्यासारखाच आहे.

पूर्वेतील प्रमुख वाद अरुणाचलबाबत. पश्‍चिम ब्रह्मपुत्रा खोरे पुरातन भारतीय संस्कृतीचा भाग होता. परंतु गेली 2000 वर्षे त्याच्याशी संबंध तुटला होता. अशोक आणि मौर्य साम्राज्यांचा विस्तार कामरूपपर्यंतच मर्यादित होता. मुघलांनीसुद्धा त्यात फारसे स्वारस्य दाखवले नाही. या भागावर पूर्वेकडून आक्रमण होत राहिले. त्यांचे अवशेष म्हणून कंबोडियाचे खासी, तिबेट आणि ब्रह्मदेशातील नागा, कुकी, मिझो मंगोलियाचे मिर आणि अबोर अशा अनेक आदिवासींनी डोंगराळी भागात आश्रय घेतला. तिबेट आणि आसामला जोडणारे तीन मुख्य व्यापारी मार्ग रिमा आणि तवांगद्वारे. तवांग हे पाचव्या लामाचे पीठ. तिथली झॉंगपेन ही जमात जहाल. तवांग हा पुरातन काळापासून तिबेटचा भाग होता.

16/17 व्या शतकात ब्रह्मदेशातील अहोम हे हिंदू राजे या भागावरील अखेरीचे आक्रमक आणि मालक. ब्रिटिशांनी त्यांना त्यांचे ब्रह्मदेशातील राज्य परत मिळवण्यासाठी मदत दिली. त्याच्या बदल्यात आसाम हिमालय त्यांनी 1826 मध्ये यादाबो तहानुसार ब्रिटिशांना भेटीदाखल दिला. त्याचे ब्रिटिशांनी नॉर्थ ईस्ट फ्रॉंटिअर एजन्सी (नेफा) असे नामकरण केले. आदिवासींच्या जरबेमुळे ब्रिटिश व्यवस्था सखल भागापर्यंतच मर्यादित राहिली.

मंचू राजसत्तेने तिबेट 1720 मध्ये पादाक्रांत केले. परंतु राज्यव्यवस्थेत फारसे लक्ष घातले नाही. 1903-04 मध्ये ब्रिटिशांनी कॅप्टन यंह हसबंड याच्या नेतृत्वाखाली ल्हासापर्यंत मोहीम काढली. आणि सैनिक जथ्याची स्थापना केली. 1906 मध्ये ब्रिटन आणि चीन यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार तिबेटवरील चीनच्या हक्काला इंग्रजांनी संमती दिली. 1911 ला मंजू साम्राज्य कोसळल्यावर सत्तेवर आलेल्या प्रजासत्ताकाने तिबेट चीनचा असल्याची घोषणा केली. त्याला इंग्रजांनी विरोध केला नाही.

1913 मध्ये ब्रिटिशांनी पुढाकार घेऊन चीन, तिबेट आणि भारत यांच्यामधील सीमा निश्‍चित करण्यासाठी ब्रिटनचे भारतीय परराष्ट्र सचिव सर हेन्‍री मॅकमोहन यांच्या अध्यक्षतेखाली सिमल्यात तिन्ही देशांच्या प्रतिनिधींची परिषद आयोजित केली. चीनने प्रथमपासूनच हजर राहण्यात टाळाटाळ केली. शेवटी सिमल्यात पोचल्यावर चीन प्रतिनिधीने पळवाटीचा पवित्रा घेतला. या परिषदेत दोन सीमा आखण्यात आल्या – पहिली, चीन आणि तिबेटमधील आणि दुसरी, तिबेट आणि भारताच्या दरम्यान. बऱ्याच चालढकलीनंतर चीनच्या प्रतिनिधीने चीन व तिबेटमधील सीमा मान्य नसल्याची नोंद करून परिषदेच्या मसुद्यावर सही केली. त्याचा अर्थ तिबेट आणि भारतादरम्यान आखलेल्या सीमारेषेला चीनने संमती दर्शविली होती. या सीमारेषेचे नामकरण “मॅकमोहन लाइन’ असे केले गेले. दुर्दैवाने सर मॅकमोहन 1914 मध्ये स्वदेशी परतले. काही गूढ कारणांमुळे 1935 पर्यंत ही रेषा गुलदस्तात ठेवली गेली. तिबेटने मॅकमोहन सीमारेषेला संमती दिली होती, एवढेच नव्हे तर ती सरळ आणि सुलभ होण्यासाठी तवांग भारतात सामील करण्यासही मान्यता दिली होती.

1949 मध्ये तिबेट व्यापल्यानंतर मॅकमोहन सीमा रेषेला कोणताही जाहीर विरोध न करता एक प्रकारे मूक संमती दिली. 1954 मध्ये बांडुंग परिषदेदरम्यान भारत-चीनदरम्यान पंचशील करार झाला. त्या वेळी तिबेट चीनचा भाग असल्याबद्दल भारताने मान्यता दिली. त्यानंतर नेहरूंनी चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवला जात असल्याचे चाऊ-एन-लाय यांच्या निदर्शनाला आणून दिले. परंतु चाऊंनी काहीच दखल घेतली नाही.

1959 मध्ये तिबेटमधील अत्याचारांना उबगून दलाई लामा तवांगमार्गे भारतात दाखल झाले. त्यांना देशात आश्रय दिला गेला आणि चीनचे माथे भडकले. कुरबुरीचे रूपांतर लवकरच बखेड्यात झाले. सीमावाद सोडवण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न चालू झाले. 1960 मध्ये चाऊ-एन-लाय यांनी मॅकमोहन रेषेला चीनने संमती देण्याच्या बदल्यात भारताने लडाखमधील “प्रत्यक्ष ताबा रेषे’ला मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला – सर्वंकष विचार केला तर ही तडजोड म्हणजे सीमावाद सोडवण्याचा रामबाण उपाय होता. परंतु विरोधी पक्षांच्या दबावाखाली येऊन नेहरूंनी प्रस्ताव फेटाळला. वाद अधिकाधिक पेटत गेला.

1962 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये प्रखर हल्ले चढवले. भारताचा या युद्धात निर्णायक पराभव झाला. परंतु लक्षणीय बाब म्हणजे चीनची सेना मॅकमोहन रेषेच्या पार स्वखुषीने परत गेली. परंतु लडाखमध्ये जिंकलेला प्रदेश मात्र त्यांनी आपल्याकडे ठेवला. यावरून अकसाईचीन प्रदेशासंबंधी चीनची निकड स्पष्ट होते. भारत आणि चीनमधील सीमावादाची परिस्थिती- सिक्कीम वगळता 1962 पासून जैसे थे आहे. सीमा प्रदेशात “ना युद्ध ना शांती’ (नो वॉर नो पीस) ही परिस्थिती कायम आहे.

भारत-चीनमधील सीमावादाचे हे सर्वसमावेशक चित्रण. पुढच्या “सप्तरंग’च्या अंकात 1962 च्या भारत-चीन युद्धाचा आढावा आणि सीमा सुरक्षेच्या सांप्रत परिस्थितीचे विश्‍लेषण करणार आहोत.

डॉ.  यशवंत रायकर, सौजन्य – लोकसत्ता

देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो.

—————————————————————

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील मध्यवर्ती पौराणिक विषय आहे. तसा तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून जगात अन्य समाजातही वेगवेगळ्या रूपात आढळून येतो, पण भारतात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या संघर्षांतील एक अद्भुत घटना म्हणजे समुद्रमंथन. दोन कट्टर शत्रूंच्या सहकार्याचा तो प्रसंग असल्यामुळे नवलाईचा होय. लोकमानसावर आजही असलेला त्याचा प्रभाव पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा myth व legend यांचा अभ्यास आहे. ती ऐतिहासिक सत्ये नव्हेत, पण वास्तवाच्या कणाभोवती जमा झालेल्या कल्पिताच्या जलबिंदूसारखे त्यांचे स्वरूप असते. विशिष्ट समाजाची ती सामुदायिक स्वप्ने असतात. मिथ ही देवादिकांबद्दलची पवित्र प्राचीन कथा तर लीजण्ड म्हणजे दंतकथा प्रामुख्याने माणसासंबंधी असते असे धरून चालू. एरवी हे शब्द विविध अर्थाने येतात त्यांचा विचार येथे नको. हा अभ्यास म्हणजे कल्पितातून वास्तव वेगळे करण्याचा प्रयास होय. यामुळे मिथकांचे विलयन होते व श्रद्धेच्या नैतिक अधिष्ठानाला धक्का पोहोचतो. म्हणून धार्मिकांना ते कधीच रुचत नाही.

येथे भारतीय परंपरेतील देव आणि दैत्य यांचे बदलत गेलेले अर्थ प्रथम समजून घेतले पाहिजेत. पशुपालन अवस्थेतील आर्याना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. दृश्य-अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. देवांचा राजा इंद्र. त्याला वश करून घेण्यासाठी यज्ञ होत असत. यज्ञसंस्थेला अफाट महत्त्व असलेल्या काळात सुरासुर संग्रामाची कल्पना जन्मास आली. इंद्र व त्याला पुरून उरणारा वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून कथेची सुरुवात होते, पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला ठार करून इंद्राने त्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची दिव्यकथा होय, असे लोकमान्य टिळक म्हणतात. पण असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जातात तेव्हा कथेला वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे ते देव व न मानणारे ते असुर यातील तो संघर्ष बनतो. वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र दैत्य, दनूचे दानव व अनायूचे असुर, असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप, पण वैदिक देवतांना मानणारे देव हे सुजन व न मानणारे दैत्य हे दुर्जन असा अर्थ रूढ केला गेला व तोच लोकमानसात घट्ट रुजला. इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते, पण ते वैदिक देवतांना मानीत नव्हते. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलटय़ा अर्थाने रूढ झाले. यात आणखी एक गुंतागुंत आहे. अदितीचे पुत्र जे आदित्य त्यापैकी एक त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्मण. वृत्राचा वध केल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागते. म्हणून त्याला यज्ञ करावे लागतात.

या प्रश्नावर बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनिटास (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सामर्थ्यांवर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा दानव, राक्षस शब्दांनी सतत डागाळण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (uncivilized) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशरज्ञ सुक्त उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकमेव सुक्त होय. पुरु, अनु, द्रुह्य़ू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्याच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदास याच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठय़ा संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता, पण पंचजनांशी भरताचे युद्ध जुंपले तेव्हा भरतांनी विश्वामित्राला काढून त्याच्या जागी वसिष्ठाची नेमणूक केली. त्यामुळे खवळलेल्या विश्वामित्राने भरतांविरुद्ध १० राजांचा संघ उभारला. तरी युद्धात भरतांचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. पुढे शेतीची सुरुवात झाल्यावर भटक्या लोकांचा आडदांड इंद्र कालबाह्य़ झाला. अशा काळात मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू भावला. पहाडी भागांत अवैदिक शिवाला महत्त्व आले. भारतवर्ष एका छत्राखाली आणणे गरजेचे होते. त्यासाठी वैष्णवांनी पुढाकार घेतला. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाभारतात कृष्णप्रधानांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे देव-दैत्य संघर्षांला वैष्णव-शैव असे नवे परिमाण प्राप्त झाले. दोहोंमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या पौराणिक कथा निर्माण होऊ लागल्या.

मग देव आणि दैत्य म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो. दुर्गाबाई भागवतांनी काही उदाहरणे दिली आहेत. आर्यलड, स्कॉटलंड येथील मिथ्यकथांत ओडिन हा देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार मारतात. नॉर्वे येथील कहाण्यांत ओडिन देवांचा राजा व लोक हा त्याचा धाकटा भाऊ दुष्ट आहे. तो शत्रूला मिळतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा ते चलाखीने हिमदैत्याचा वापर करून नंतर झालेल्या युद्धात त्याला मारतात. सर्व दैत्य नरकात जातात, लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या मनात नरकाची भीती घालायची व मग त्यातून वाचण्याचे मार्ग सांगायचे ही सर्वच धर्माची रणनीती असते.

या पाश्र्वपटलावर समुद्रमंथन पाहू. ही कथा अतिप्राचीन वाटली तरी ती स्मृतिपुराणांच्या काळातली निर्मिती आहे. रामायण, महाभारत, भागवत वगैरेत त्याचे उल्लेख असले तरी विष्णुपुराण हा त्यांचा प्रमुख आधार होय. ते इसवी सनाच्या ३, ४ शतकापूर्वीचे नाही. त्यात मेरु पर्वत, दशावतार यांची माहिती असून गुप्त साम्राज्याचाही उल्लेख येतो. महाभारतात इ. स. ४०० पर्यंत ४ शतकात जी भर पडली त्यातच समुद्रमंथन येऊ शकते. भागवत ६ व्या शतकापूर्वीचे नाही. श्रीकृष्णचरित्राचा तो मुख्य आधार. माणसाला वैराग्य कठीण असल्यामुळे पुराणे भक्तिमार्ग आवर्जून शिकवितात. मत्स्य, कूर्म, वराह, वामन ही उत्तरकालीन पुराणे एकेका अवतारांची महती सांगतात. त्यात अतिशयोक्तीचा अतिरेक असतो, पण तो केवळ पुराणाकडूनच होतो असे नाही. तत्कालीन धर्मपंथांची आपसात चाललेली चढाओढ लक्षात घेतली तर सर्व धर्म त्या बाबतीत एकाच माळेचे मणी असतात हे कळून येते. काही उदाहरणे पाहा. भरताच्या नाटय़शास्त्रात कलांची संख्या ६४, जैन वाङ्मयात ७२ तर बौद्धांच्या ललित विस्तारात ९६. जैनांचे र्तीथकर २४, महायानांचे बुद्ध २४ तर भागवतात विष्णूचे अवतार १० वरून २४ वर येतात. लिंगपुराण शंकराचे २८ अवतार सांगून त्यावर कडी करते. आता बौद्ध त्यापुढचे पाऊल टाकतात. लंकावतार सूत्रात बुद्ध ३६, ललित विस्तारात ५४ तर महावस्तूमध्ये १०० च्या वर बुद्ध आहेत. आपल्या हीरोंना तोंडे किती किती असावीत यातही दुसऱ्याला मागे टाकण्याची धडपड दिसते. रावण दशानन तर बौद्धांचा अवलोकितेश्वर ११ तोंडांचा (कन्हेरी येथील शिल्प पाहा.) आणि शाक्तांची सीता कालीचे रूप धारण करून ज्या रावणाचा वध करते तो रावण सहस्रमुखी असतो. तसेच जैन पुराणांनुसार महावीर १२ फूट उंच, पाश्र्वनाथ १६ फूट, तर वृषभनाथ ३००० फूट उंच होते. आपला भूतकाळ जास्तीत जास्त प्राचीन करण्याचीही वृत्ती असते. पहिला मत्स्यावतार कृतयुगाच्या सुरुवातीस झाला. म्हणजे ४३ लक्ष २० हजार वर्षांपूर्वी, तर वृषभनाथाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षाही अधिक आहे. असे होण्याचे कारण मानवी मनाला गूढ, अलौकिक, अघटित, असंभवनीय अशा गोष्टींचे आकर्षण असते. लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो व तो आजही आहे. समुद्रमंथन ही घटना त्याचाच परिपाक होय. ती एक Monumental Fantasy आहे.

देव आणि दैत्य यांची पहिल्यापासून एकच महत्त्वाकांक्षा असते, ती म्हणजे तीनही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. यामुळे सुरासुर संग्राम चालू राहतो. पण त्यात दोन्ही पक्षांपुढे एक अघटित समस्या उभी राहते, जी समुद्रमंथन केल्याशिवाय सुटणारी नसते. हे मंथन दोहोंनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. या महानाटय़ात तिसरा एक घटक असतो तो तपस्वी ऋषींचा. या ऋषींचे स्थान इंद्र, विष्णू व शिव यांच्या खालचे असले तरी त्यांच्या तपसामर्थ्यांला व शापाला देवसुद्धा भिऊन असतात. हे तपस्वी अत्यंत तापट, महत्त्वाकांक्षी व सूडबुद्धीचे असतात. एका पक्षात आपल्याला सर्वोच्च स्थान लाभले नाही तर विरोधी पक्षात जाऊन ते मिळवितात. विश्वामित्राचे उदाहरण मागे येऊन गेलेले आहे. समुद्रमंथनाच्या महानाटय़ात शुक्राचार्य व दुर्वास महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पौराणिक कथांच्या तपशिलात न शिरता आपण समुद्रमंथनाचा घटनाक्रम पाहू. या कथा परस्परविरोधी व विसंगत असतात. येथे मेळ न घालता फक्त मर्म शोधणे आहे.

शुक्राचार्याला देवांचा गुरू व्हायचे असते, पण ती संधी हुकल्यामुळे तो दैत्यांचा गुरू बनतो. दैत्यांचा पराभव होऊ नये म्हणून मृतांना जिवंत करणारा संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी शिवाची कठोर तपस्या करतो. त्याचा तपस्याभंग करण्यासाठी इंद्र कपट रचतो, पण शंकराच्या ते लक्षात येताच स्वत: प्रकट होऊन तो शुक्राचार्याला संजीवनी मंत्र देऊ करतो. त्यामुळे युद्धात मेलेले दैत्य जिवंत होतात. देवांचा पराभव होत राहतो. दुसऱ्या एका कथेनुसार इंद्राच्या हातून दुर्वास ऋषींचा अपमान होतो. त्यामुळे संतापलेला मुनीवर इंद्राचे सर्व सामथ्र्य व वैभव नष्ट होईल असा शाप देतो. यामुळे लज्जित व हताश झालेला इंद्र सर्व देवांना घेऊन विष्णूला शरण जातो.

शांत चित्ताचा प्रॅग्मॅटिक विष्णू देवांच्या कूटनीतीचा मास्टरमाइंड आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची योजना त्याच्याकडे तयार असते. तो युक्ती सुचवितो. त्यानुसार देव शुक्राचार्याला विश्वासात घेऊन म्हणतात, ‘‘तुझ्याकडे संजीवनी मंत्र आहे म्हणून तू दैत्यांना जिवंत करतोस. पण उद्या तूच नसलास तर कोण कुणाला जिवंत करील?’’ शुक्राचार्य बुचकळ्यात पडतो. मग त्यावरचा उपाय सांगतात. अमरत्व देणारे अमृत मिळविणे. पण ते समुद्राच्या पोटात असते. त्यासाठी समुद्रमंथन करायला हवे. जे देव व दैत्य यांनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. शुक्राचार्याला पटते. मग मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून देव व दैत्य समुद्र घुसळायला निघतात. पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. तेव्हा विष्णू कूर्मावतार धारण करून पर्वताला पाठीवर उचलतो. मंथन यशस्वी होते. त्यातून १४ रत्ने बाहेर येतात. या रत्नांची यादी व संख्या वेगवेगळी असली तरी आपल्याकडे लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांत म्हटले जाणारे कडवे प्रमाण मानू. (चौकट पाहा) या रत्नांमधील हलाहल गंभीर समस्या उभी करते. तेव्हा शिव जगाच्या कल्याणासाठी ते आपणहून प्राशन करतो. पण अंगात भिनू देत नाही. यात पार्वती विधायक भूमिका बजावते. त्यामुळे शिव नीलकण्ठ बनतो. हे मिथक अत्यंत उद्बोधक आहे. प्रत्येकाला जीवनातील कटू अनुभवांचे विष प्यावेच लागते. (जीवन ही अमर जहर है तो पीना ही पडेगा।) त्यामुळे मनात त्रासिक कडवटपणा भरतो, जो स्वत:ला व इतरांनासुद्धा सुख लागू देत नाही. पण मोठय़ा मनाची माणसे नीलकण्ठ बनतात.

मंथनातून अखेर देवांचा डॉक्टर धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर येतो तेव्हा तो पळविण्यासाठी देव व दैत्य यांच्यात युद्ध जुंपते. पण विष्णूचा गरुड कलश घेऊन वरच्या वर उडतो. त्यातले चार थेंब प्रयाग, हरिद्वार, उज्जयिनी व नाशिक येथे पडतात. म्हणून ती पवित्र तीर्थक्षेत्रे बनून दर बारा वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो. ही प्रथा आजही चालू आहे. पण दैत्य पुन्हा कुंभावर झडप घालतात. तेव्हा त्यांचे मन विचलित करण्यासाठी विष्णू मोहिनीचे रूप धारण करतो. त्यामुळे कलश देवांना प्राप्त होतो. अमृत पिऊन देव अमर बनतात. त्यातही गुंतागुंत आहे. एक दैत्य राहूचे रूप धारण करून देवांच्यात घुसतो व अमृत पिऊ लागतो. सूर्य व चंद्र यांच्या ते लक्षात येते. ते मोहिनीला सावध करतात. लगेच सुदर्शन चक्र त्या दैत्याचा शिरच्छेद करते. पण थोडे अमृत घशापर्यंत गेल्यामुळे मुंडके (म्हणजे राहू) अमर बनते व धड (म्हणजे केतू) वेगळे पडते. चंद्र सूर्यानी चुगली केल्यामुळे राहू व केतू त्यांना आळीपाळीने ग्रहण लावून कायमचा बदला घेत राहतात.

समुद्रमंथनाच्या कथेत विष्णूचा महिमा, त्याच्या अवतारांचे माहात्म्य, शिवाचा परोपकारी, सरळसोट, निष्कपट स्वभाव, त्याला लाभलेली पत्नीची साथ, तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रांचे पावित्र्य, ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना या सर्वाचे मिश्रण करून, मानवी मनावर राज्य करणारी मॉन्युमेंटल फॅन्टसी उभी करण्यात आली. थायलँड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलायसिया येथील लोकांचे पूर्वज भारतातून आलेले असल्यामुळे या फॅन्टसीच्या माध्यमातून ते त्यांची आठवण जपतात. बँकॉक (थायलँड) येथील सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनाचे भव्यदिव्य शिल्प पाहून प्रवाशांची मने थक्क होतात.

रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता

एकदा कस्तुरबांचे व गांधीजींचे संडास सफाईवरून मतभेद झाले. गांधीजींनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले. पुढे गांधीजी हे स्त्री-पुरुष समानतेचे कट्टर समर्थक बनले. समाजाला त्यांनी समानतेचे धडे दिले. गांधीजींच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांमुळे त्यांचा दृष्टिकोन तसा घडला होता.

समाजातील या दोन प्रमुख घटकांना राजकीय चळवळीत सामील करून घ्यायचे असेल, तर त्यांच्यावरील सामाजिक अन्याय दूर करणे अगत्याचे आहे, हे गांधीजींनी ओळखले होते. त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याची सांगड घालण्याचे महत्त्वाचे काम केले.

स्त्रियांवरील सामाजिक अन्याय दूर करून, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळवून देण्यासाठी आपल्या अनुनयांना सतत मार्गदर्शन केले. स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या लढय़ात भाग घेण्यास त्यांनी प्रेरणा दिली. कार्यकर्त्यांनाही त्या दृष्टीनेच मार्गदर्शन केले. स्त्रिया ही देशाची अर्धी शक्ती आहे व ती निष्प्रभ व सामाजिक व राजकीयदृष्टय़ा निष्क्रिय राहाणे, नव्हे तिला तसे मुद्दाम ठेवणे; हे योग्य नाही असे त्यांना वाटे. स्त्रियांमधील सहनशक्ती, सेवाधर्म व जबाबदाऱ्या, हे गुण कुटुंबाकडून वापरून घेतले जातात, ते कुटुंबाचा तो एक हक्क आहे या गैरसमजापोटी. कुटुंबासाठी स्त्रियांनी झटले पाहिजे, स्वार्थत्याग केला पाहिजे; ही गोष्ट गांधीजींना मान्य असली, तरी पुरुषांनीही याच गोष्टी केल्या पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. स्त्रीवर या गोष्टी करण्याबद्दल जो अतिरेक होतो, तो त्यांना मान्य नव्हता. स्त्री कौटुंबिक जबाबदाऱ्यांखाली इतकी भरडली जाते, की तिला स्वत:बद्दल विचार करायला किंवा स्वत:चा विकास करण्याच्या दृष्टीने थोडा वेळ घराबाहेर जायलाही जमत नाही. इतकेच काय तशी तिला परवानगीही नाही. ही परिस्थती बदलली पाहिजे. स्त्री देशकार्याच्या मध्यम प्रवाहात पुरुषांच्या बरोबरीने आलीच पाहिजे, हे सूत्र त्यांनी आपल्या अनेक भाषणांतून व लेखांतून मांडले आहे. स्त्रिया समाजाच्या सांस्कृतिक कणा (बॅकबोन) आहेत. उदात्तता, सहनशीलता, दुसऱ्याबरोबर सामावून घेणे, एकात्मता व आध्यात्मिक शक्ती, हे सद्गुण त्यांच्यामध्ये आहेत. म्हणूनच त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा आहे. स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होणं, हे त्यांच्या व समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच गांधीजींनी कुटिरोद्योग व सूतकताई याला प्रोत्साहन देणं, त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं महत्त्वाचं मानलं. निरनिराळे विधायक कार्यक्रम आखताना, त्यांनी स्त्रिया व दलित या समाजातील वंचित मानलेल्या घटकांना केंद्रस्थानी मानले ते त्याच करता. या सर्वच उपेक्षित समाजाला शिक्षणापासून समाजाने हेतूत: वंचित ठेवले आहे. त्यांच्यासाठी खास त्यांनी मूलोद्योग शिक्षण पद्धती सुरू केली. गांधी आश्रमातून व त्या धर्तीवर चालणाऱ्या आश्रमातून याच पद्धतीने शिक्षण दिले जाण्याची व्यवस्था केली.

स्त्रियांना पाळाव्या लागणाऱ्या पडदा प्रथेपासून त्या मुक्त झाल्या पाहिजेत, त्यासाठी स्त्री-पुरुष दोघांचीही मानसिकता बदलली पाहिजे, कार्यकर्त्यांनी त्यासाठी झटले पाहिजे. मुसलमान कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून त्याची सुरुवात करावी, असा त्यांचा आग्रह होता. जनाब हसरत मोहानी यांची पत्नी त्यांच्याबरोबरच काँग्रेस कार्यात झटली होती. सुरुवाती सुरुवातीला ती बुरखा घालूनच भाषणे करी. पण लवकरच तिने बुरखा  घालणे बंद केले. बेगम अली, शौकत अली महमद अलींची आई ‘बी अमन’ या सर्व खानदानी मुसलमान स्त्रियांनी स्वत: बुरख्याचा त्याग केला व इतरही मुसलमान स्त्रियांमध्ये बुरखाविरोधी वातावरण निर्माण केले, ते केवळ महात्माजींच्या प्रयत्नामुळेच.

गांधीजी भारतात आल्यावरच त्यांचे लक्ष सामाजिक क्षेत्राकडे- विशेषत: स्त्रियांच्या परिस्थितीकडे- गेले, हे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही. त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांमुळे हे घडत गेले. कस्तुरबांचे व त्यांचे संडास सफाईवरून झालेल्या मतभेदानंतर त्यांनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले.

भारतीय स्त्री ही काय चीज आहे, हे जसे त्यांना कळले तसेच भारतीय नवरा व त्याची मानसिकताही त्यांच्या लक्षात आली; तेही स्वत:च्या वागण्यावरून. स्त्रीचा निर्धार व तिची सहनशक्ती याची पारख झाली. आफ्रिकेतील सत्याग्रहानंतर गांधीजींना अटक झाल्यावर पुढील सत्याग्रहाची सर्व सूत्रे त्यांची स्टेनोटायपिस्ट ‘सोनी’ हिने हातात घेतली होती. सत्याग्रहाचे सत्र पुढे चालूच ठेवले. फोईनेक्स आश्रमातील स्त्रिया व द. आफ्रिकेच्या सत्याग्रहातील स्त्रियांचा सहभाग हा फारच प्रेरणादायक होता. वेलूआम्मा नावाच्या १६ वर्षीय सत्याग्रही मुलीने तुरुंगात उपोषण केले. प्रत्यक्ष गांधीजींनी तिला उपोषण मागे घ्यायला सांगितले. ‘आपण सत्याग्रहींना जी शिकवण दिलीत त्याच्याविरुद्ध सांगूच कसे शकता?’ असा उलटा सवाल तिने गांधीजींना केला.

गांधीजींनी सुरू केलेल्या लढय़ात पहिली हुतात्मा एक षोडशवर्षीय तरुणी झाली. त्याचाही परिणाम गांधीवर झाला. त्याशिवाय त्यांची आई पुतळाबाई व दाई रंभाबेन यांच्या वागणुकीतूनही त्यांना निर्भयता म्हणजे काय असते, हे कळले होते. द. आफ्रिका व चंपारण्यातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्दलच्या अनुभवावरून आपल्या सर्व कार्यक्रमात स्त्रियांच्या सामाजिक परिस्थितीचे भान आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आणले पाहिजे, हे त्यांनी जाणले.

जीवनात एक शिस्तबद्ध भागिदारी घेण्याचा पवित्र संस्कार म्हणून गांधीजी विवाहाकडे पाहात. केवळ शारीरिक संबंधाकरता सामाजिक परवाना म्हणून विवाहाकडे पाहाणे त्यांना चुकीचे वाटे. आदर्श विवाह म्हणजे शारीरिक संबंधातून आध्यात्मिक संबंध प्रस्थापित होणे. आध्यात्मिक विकास, सेवा, सामाजिक न्यायामध्ये मनाची गुंतवणूक व प्रेम या चार गोष्टी विवाहाकरिता अटी असाव्यात. स्त्री ही पुरुषाची दासी नाही. पुरुषांना जर आपली पत्नी सीतेसारखी असावी असे वाटत असेल, तर पुरुषानेही रामाप्रमाणे एकपत्नीव्रत व सदाचार यांचे पालन केले पाहिजे. स्त्रीला आपली बाजू न्यायाची वाटत असेल, तर तिच्याआड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार तिला आहे. विवाह समारंभ साधेपणाने व श्रीमंतीचे प्रदर्शन न करता करावे, अशी विनंती गांधीजींनी समाजाला केली. कारण मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गीय त्यांचेच अनुकरण करतात- अगदी आपली आर्थिक परिस्थिती नसताही. ही परिस्थिती बदलण्यासाठीही गांधीजींनी आपल्या घरापासून सुरुवात केली. आपला धाकटा मुलगा रामदास याचा विवाह रूढ पद्धतीप्रमाणे मुलीच्या घरी न करता साबरमती आश्रमात अगदी साध्या पद्धतीने केले. वराचे स्वागत मुलीच्या घरी ज्या पद्धतीने होते, त्याच पद्धतीने त्यांनी वधूचे स्वागत लग्नघरी केले. साध्या पद्धतीने केलेला हा विवाह त्यावेळी खूप गाजला. अनेक कार्यकर्त्यांची लग्ने पुढे या पद्धतीने झाली. लोक या पद्धतीने केलेल्या विवाहाला ‘गांधीविवाह’ म्हणू लागले. आपल्या मुलाच्या लग्नात गांधीजींनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. वधूवरांपैकी एक कोणीतरी हरिजन असल्याशिवाय ते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजर राहाणार नाहीत. आणि हे तत्त्व त्यांनी आजन्म पाळले. समाजाच्या ऐक्यासाठी सवर्ण व हरिजन यामध्ये विवाह होणे ते आवश्यक मानीत.
समाजातील कुप्रथांचे उच्चाटण करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना चार नियम सांगितले.

१) आपल्या मुलीचे वय १५ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करू नकाच, पण आजूबाजूच्या पालकांनाही अशा विचारापासून परावृत्त करा.
२) १५ वर्षांपेक्षा लहान वयात लग्न होऊन मुलगी विधवा झाली असेल, तर तिच्या बापाने स्वत: पुढाकार घेऊन तिचा पुनर्विवाह लावून द्यावा.
३) लग्नानंतर पहिल्याच वर्षांत तरुण मुलीचा नवरा गेला, तर कुटुंबियांनी तिचा पुनर्विवाह लावून द्यावा.
४) प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील विधवेला सन्मानाने वागवावे व तिला ज्ञानोपासना करण्याची संधी मिळवून द्यावी.

विधूर व विधवा यांना एकच नियम लावला पाहिजे. पुनर्विवाहाच्या बाजूने ते शास्त्रातील दाखलेही देतात. विधुरांनी लहान वयातील कुमारिकांबरोबर लग्न करू नये. करायचेच असले तर आपल्याला शोभेल अशा वयाच्या मुलीशी करावे, असे ते सांगत. स्त्री, पुरुषाच्या शुद्धतेबद्दल आग्रह धरू शकत नाही; पण पुरुष ते धरतो. कुणी दिला व का मिळाला पुरुषांना हा अधिकार?  ज्याप्रमाणे स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला पाहिजे; त्याप्रमाणेच तिला घटस्फोटाचा व संतती नियमनाचाही अधिकार असला पाहिजे, असे ते आग्रहाने प्रतिपादन करीत.

स्त्री-पुरुष समानता, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी, अस्पृश्यांचे प्रश्न हे राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गातील मोठेच अडसर आहेत, देशभर या सामाजिक परिस्थितीच्या विरुद्ध आवाज उठत राहिला, तरच राजकीय स्वातंत्र्य मिळवणे  सुलभ होईल, असे गांधीजी मानत. सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजींनी स्त्रिया, हरिजन, गरीबांसाठी आर्थिक कार्यक्रम दिले; म्हणूनच गांधीजींना ‘समाजपरिवर्तक गांधीजी’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

लहान मुलाने जेवढया उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावी तेवढयाच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्त्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्तांएवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.

कर्तृत्त्व आणि गुणवत्ता या लपणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांची दखल समाज घेतही असतो. मात्र समाजाची नजर त्याबाबत जरा जडच राहत आली आहे. त्यातून अलिकडच्या काळात या नजरेवर जातीधर्मांचे आणि पक्षविचारांचे रंगीबेरंगी चष्मे आले आहेत. त्यामुळे खूपशी गुणवत्ता बेदखल राहण्याचीच शक्यता वाढली आहे. त्यातून समाजाचे नेतृत्त्व करतो म्हणणाऱ्यांच्याही अहंता निबर असतात. आपल्याहून पुढे जाऊ शकणाऱ्यांना अनुल्लेखाने, बेदखलीने मारण्याची, पडद्याआड ठेवण्याची पराकाष्ठा या वर्गाकडून चालते. आपण एखाद्याला मोठे म्हटल्यानेच तो मोठा होतो असा कुरुप आत्मविश्वास काहींच्या ठिकाणी असतो. मग ते तसे म्हणणे शक्यतो टाळत असतात.

नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचेच वर्तमानपत्र विदर्भात चालायचे. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्त्वसंपन्न पत्रकार. असे संपादकीय नमुने महाराष्ट्रभूने काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हा या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्त्वसंपन्न लेखक होता. ‘तुमची आजवर किती पुस्तके प्रकाशीत झाली?’ या माझ्या प्रश्नावर अत्यंत सहजगत्या यदुनाथ म्हणाले, ‘दिडेकशे असावीत.’ त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लीम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अध्ययनसिध्द पुस्तकेही त्यात होती. मात्र या माणसाचा मोठा विशेष, माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्त्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही तो होता.

महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली याची यादी करायची ठरविली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेये ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणाऱ्या यदुनाथांना ती मान्य होणारीही ती नसेल. थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई तीत येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेडयापाडयात ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहानमोठया कार्यकर्त्यांची नावेही तीत येतात. या यादीतल्या साऱ्यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असे काही केले आहे याचे यदुनाथांनाच स्मरण नव्हते.

अध्यात्माच्या सगळया साधनेचे लक्ष्य आपल्यातला ‘मी’ पुसून टाकणे हे आहे आणि अध्यात्माची कोणतीही साधना न करता आपल्यातला मी पुसून टाकणे यदुनाथांना जमले होते. कुणातही मिसळून जाऊन त्यांचे होणे ही सिध्दी त्यांना साधली होती. विचारवंतांसोबतची बैठक असो नाहीतर तरुण शिबिरार्थ्यांचे एखादे चर्चासत्र असो, ते तिथे सर्वांचे आपले असत. चर्चा किंवा वाद करणाऱ्यांची एक नित्य अनुभवाला येणारी गंमत अशी की चर्चा वा वादाचा विषय तीत खूपदा गौण होतो आणि त्यात भाग घेणाऱ्यांची व्यक्तिमत्त्वेच महत्त्वाची होतात. विषयाबाबतची आपली बाजू लढविण्यापेक्षा माणसांचा कल आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावीपण दुसऱ्यावर ठसविण्याकडे असतो. परिणामी चर्चेचा विषय हरवतो आणि व्यक्तिमत्त्वांचीच दंगल उभी होते. यदुनाथांशी वाद करावा असे ठरवून आलेल्या वा त्यांना वादात ओढू पाहणाऱ्या माणसांची याबाबत नेहमीच एक फसगत व्हायची. आपला वैचारिक आग्रह न सोडता यदुनाथ संथपणे बोलत असत. व्यक्तीगत खुमारी घेऊन येणाऱ्यांना मग वाद सुचत नसे. खूपदा येणारा अनुभव असा की वादाला म्हणून आलेला माणूस यदुनाथांचाच विचार वेगळया भाषेत त्यांना पटवून देताना दिसे आणि यदुनाथ तो शांतपणे ऐकून घेत असल्याचे पाहून आपण जिंकल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. अशावेळी आपल्या विचाराच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष ही यदुनाथांची जमेची बाजू असे. काही काळापूर्वी पुण्यातल्या समाजवादी सुधारकांवर टीका करणारा माझा एक लेख प्रकाशीत झाला. त्यात या मंडळीने महाराष्ट्रात एक फुकटची वैचारिक दहशत उभी केली असल्याचे मी म्हटले होते. यदुनाथ त्याच संप्रदायात वावरणारे. त्यांना त्या लेखाचा राग येईलसे वाटले होते. पण यदुनाथ भेटले तेव्हा शांतपणे म्हणाले, ‘जे थोडे असतात त्यांना दहशतीचाच मार्ग अनुसरावा लागतो.’

पू. साने गुरूजी हे सगळया समाजवादी मंडळीचे श्रध्देचे ठिकाण आहे. यदुनाथ तर गुरूजींच्या अतिशय निकट वावरलेले. गुरूजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथसोबत केलेले. ‘इस्लामी संस्कृती’ या आपल्या पुस्तकात त्या संस्कृतीच्या सहिष्णुतेची आणि संपन्नतेची महती गुरूजींनी गायिली आहे. मुस्लीम इतिहासाचा अत्यंत चिकित्सक अभ्यास नरहर कुरूंदकरांनी केलेला. या इतिहासात वा संस्कृतीत सहिष्णुता कशी अभावाने आढळते याविषयीची त्यांची मते स्पष्ट होती. बहुदा या पुस्तकावरून यदुनाथांशी आपला वाद होणार ही अटकळ त्यांनी मनात बांधली होती. त्यांनी विषयाला तोंड फोडले. ‘इस्लामी संस्कृतीचे जे स्वरुप गुरूजी सांगतात ते इतिहास म्हणून खरे नाही’
कुरुंदकरांना शांत करीत यदुनाथ म्हणाले, ‘ते स्वाभाविकच नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणे हा गुरूजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे यापेक्षा गुरूजींना ती कशी जाणवली याचेच चित्र त्या पुस्तकात उमटले असणार.’ आपला सगळा आवेग अनाठायीच होता हे कुरूंदकरांना जाणवले. साने गुरूजींविषयीची केवढीही गाढ श्रध्दा मनात असली तरी त्यांच्या संतमनाचे भाबडेपण आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या मर्यादा यदुनाथांना अगोदरच ज्ञात होत्या. आपल्या श्रध्दास्थानाचे सामर्थ्य आणि दुबळेपण यांची डोळस जाणीव असणारे मन त्यांना लाभले होते. आपल्या मनात ज्यांच्याविषयी श्रध्दा आहे त्या थोरांच्या मर्यादा लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र त्याबाबत त्यांना कठोरही होता आले नाही. त्या मर्यादांच्या मागे असणाऱ्या भावनात्मक अडचणींची चिकित्सा करण्यावरच त्यांचा भर अधिक राहिला. अशा मर्यादांचे समर्थन करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधी केला नाही.

यदुनाथांचा आणि आनंदवनाचा स्नेह अतिशय पुराना होता. बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर म्हणत. त्यांच्या सगळया योजना, प्रकल्पात यदुनाथ आरंभापासून अखेरपर्यंत बरोबरीने भाग घेत. पण तिथेही आपले अस्तित्त्व पुसून टाकत ते सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेने वावरत. आनंदवनाच्या एका मित्र मेळाव्याच्यावेळी प्राचार्य राम शेवाळकर आणि मी रात्रीचे गप्पा मारीत एका खोलीत बसलो होतो. बाजूलाच एक पाहुणे तोंडावर पांघरूण घेऊन गाढ झोपी गेलेले दिसत होते. मी जरा चेष्टेच्या सुरात शेवाळकरांना म्हणालो, ‘नानासाहेब, तो स्वप्नांचा सहोदर येऊन दाखल झाला बरं का.’
त्यावर त्या बाजूला झोपी गेलेल्या पाहुण्याने तोंडावरचे पांघरूण दूर करीत म्हटले, ‘हो, आणि तो जागाही आहे बरं कां.’ आणि उडालेल्या हशांत तेथले सगळे दिलखुलासपणे सामील झाले.

बाबा आमटयांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि इम्फाल ते द्वारका अशा काढलेल्या भारत जोडो यात्रेत यदुनाथ तिच्या आखणीपासून सांगतेपर्यंत अग्रभागी होते. मात्र बाबांनी सरदार सरोवर प्रकरणात घेतलेली भूमिका त्यांना अमान्य होती. त्या भूमिकेला यदुनाथांनी जाहीरपणे विरोध करणे त्या दोघांच्याही जवळ असणाऱ्या कोणालाही आवडणारे नव्हते. या प्रकरणात धरणविरोधकांची केवळ एकच बाजू लोकांपुढे ठेवली जात आहे हे जाणवताच यदुनाथांनी सरोवर व्हावे असे गुजराती लोकांना कां वाटते हे सांगणारी एक प्रदीर्घ मुलाखतच मला दिली आणि तीत धरणविरोधकांचे सगळे युक्तीवाद उखडून टाकले. पण त्यांचा हा विरोध धरणाबाबतच्या भूमिकेएवढाच मर्यादित राहिला. पुढे एका कविश्रेष्ठाने जेव्हा बाबा आमटयांनी सरदार सरोवराचा पिच्छा सोडून गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला जाहीररित्या दिला तेव्हा त्याला उत्तर देताना यदुनाथांनी लिहिले, ‘सगळी कामे एकटया बाबांनीच कां करावी?. त्यातली काही तुम्हीही कां करू नयेत?’ वैचारिक भूमिकांबाबतचा हा संयम सांभाळणे अनेकांना अवघड होते. त्यासाठी आयुष्यभराच्या व्रतस्थतेचा रियाज लागतो. यदुनाथांनी आपल्या जन्मभराच्या भटकंतीत तो सांभाळला होता. नाहीतर माणसांना नशेसारख्याच भूमिकाही चढत असतात. यदुनाथांना लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला दिसले नाही. आक्रमक होणे ही त्यांची प्रकृती नव्हती. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती आणि त्या प्रसन्न ठामपणाचा संबंध विचारांशी होता, अहंतेशी नव्हता.

गाडीत भेटावे आणि एखाद्याशी ओळख व्हावी , पुढे तिचे ममत्वात रुपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे यदुनाथ नकळत आयुष्यात येत आणि कायम मुक्कामाला राहत. त्या राहण्यात पाहूणपणाचा उपचार नसे. घरच्या माणसाचे आपलेपण असे. ‘तू खूप दिवसांत काही लिहिलं नाहीस’ असा मला तगादा करतानाच, ते माझ्या पत्नीला म्हणत,’काय करतो आताशा हा रिकाम्या वेळात? जरा त्याच्याकडून लिहून घे.’ नेमाने पत्र पाठवीत. मी उत्तराचा कंटाळा केला तरी त्यांची पत्रे येतच राहत. त्यातून सोबतीचा, पाठिंब्याचा दिलासा मिळत राही.

यदुनाथ थत्त्यांचे व्यक्तिमत्त्व गर्दीत हरवणारे होते. खादीच्या जाडयाभरडया कपडयातील हा साधा माणूस आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही करीत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कोणते तेजोवलय वा दिप्तीमान आभा नव्हती. आणीबाणीच्या परिक्षापर्वात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने जो एकाकी लढा दिला त्यामुळे त्यांच्याभोवती काही काळ असे वलय उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आणीबाणीच्या दमन चक्रापुढे अनेक गर्जणाऱ्या तोफा थंड पडल्या. स्वातंत्र्य, समतेच्या नावाने एरव्ही भीमदेवी थाटात बोलणारे व लिहिणारे आणीबाणीचे आणि त्या काळातील दमनाचे स्तुतीपाठक बनलेले महाराष्ट्राने पाहिले. विरोधक म्हणविणाऱ्यांनी तडजोडीच्या शहाण्या जागा शोधल्या आणि भल्याभल्यांनी शरणागतीची पांढरी निशाणे हलविली. या काळात तुरूंगाबाहेरच्या मुक्या निषेधाला वाचा देण्याचे काम साऱ्या मराठी मुलूखात ज्या थोडया माणसांनी केले त्यात यदुनाथ थत्ते साऱ्यांत पुढे होते.

हे करायला त्यांना कोणी सांगितले नाही. ते करणे हा त्यांचा प्रकृतीधर्म होता. आयुष्यभर जी ध्येये प्राणपणाने जपली त्यांच्यावरच्या संकटाचेवेळी उभारावयाचा संघर्षही प्राणपणानेच लढवावा लागतो. त्यासाठी व्यक्तीजीवनच नव्हे तर प्रसंगी संस्थांचे जीवनही धोक्यात घालावे लागते. ज्या संस्था ध्येयांसाठी जन्माला येतात त्या आपल्या मूळ प्रेरणांपायी खर्ची पडल्या तरी चालतील. मूळ ध्येयवाद वाऱ्यावर सोडून संस्था सांभाळणाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची टिमकी मिरवायची असते, पराक्रमावर हक्क सांगायचा नसतो. ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकावर त्याकाळात बंदी यायची. सरकार जमानत म्हणून मोठी रक्कम मागायचे. स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे ही रक्कम दर हप्त्याला यदुनाथांच्या स्वाधीन करीत. साधना बंद पडले तेव्हा ‘जनता’ सुरू झाले आणि जनतेवर बंदी आली तेव्हा आणखी नवे नाव घेऊन ते पत्र पुन्हा प्रकाशीत झाले. यदुनाथांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जो लढा आणीबाणीत दिला त्याचा गौरव करताना पु.ल. म्हणाले, ‘संपादक म्हणून जे दिव्य लोकमान्यांनी केले तेच नंतरच्या काळात यदुनाथने पत्करले.’

यदुनाथांनी नंतरच्या अल्पावधीत हे वलय मिटवून टाकले आणि सामान्य कार्यकर्त्यांत व आपल्यात येऊ पाहणारे अंतर प्रयत्नपूर्वक नाहिसे केले. असामान्यांच्या मोठेपणाचे आकर्षण त्यांनाही होतेच. असामान्य व्यक्तीविषयीचा श्रध्दाभावही त्यांच्या मनात होता. मात्र अनेक मोठया माणसांना एक विशेष असा की त्यांचे मोठेपण इतरांना ओझ्यासारखे सतत वहावे लागत असते. त्यातल्या अनेकांना हे असे दुसऱ्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवणे मानवतही असते. आपल्या मोठेपणाचे ओझे कोणालाही जाणवायला नको असेल तर ते अगोदर स्वतःच्या अंगावरून उतरून ठेवावे लागते. ते तसे उतरवून ठेवण्याची असामान्य कलाच यदुनाथांना अवगत होती. उपचाराचे अंतर एकदा संपले की यदुनाथ दूरचे राहत नसत आणि मग त्यांचे मोठेपणही उरत नसे. ते प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलत आणि तसेच वागत. मग यदुनाथ सगळयांचे मित्र होत. साधना नावाच्या भारदस्त पत्राचा इतिहास घडविणारा संपादक, आंतरभारतीचा महत्त्वाचा आधार, महाराष्ट्रापासून मणीपूरपर्यंत पसरलेल्या शेकडो युवक चळवळींचा मार्गदर्शक प्रणेता आणि शेकडो पुस्तकांचा लेखक इ…इ.. सगळे विस्मृतीत जाई. फक्त यदुनाथच तेवढे मागे उरत.

यदुनाथ जेवढे साधे दिसत तेवढयाच साधेपणी ते बोलत अन् लिहीतही. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला अलंकारांचा सोडा, साध्या तेल-पावडरीचाही सोस नव्हता. तरीही त्यांचे बोलणे प्रभावी होते. त्यांचा सहजसाधा शब्द थेट काळजापर्यंत जायचा. हा माणूस हातचे राखून बोलत वा लिहीत नव्हता. साधे पत्र लिहावे तेवढया साधेपणी आणि पुस्तकाचा मजकूर ते लिहीत अन् तेवढयाच सहजपणे तो हातावेगळा करीत. पण साधेपणाच दुर्मिळ होत असलेल्या या काळात त्यांच्या या अलंकारशून्य सहजतेत निखळ माणुसकीचा साक्षात्कार व्हायचा आणि श्रोते त्यांच्या व्याख्यानात तल्लीन व्हायचे. त्यांनी सांगितलेले सारे ऐकायचे अन् त्यांनी गायला सांगितले तर ते गायचेदेखील. प्राथमिक शिक्षकांच्या एका राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्धाटन त्यांनी केले. अधिवेशनाच्या मंडपात पंधरा हजारांवर शिक्षक जमले होते. व्यासपीठावर मंत्री, अधिकारी, विचारवंत, समाजसेवक अशी गर्दी. यदुनाथांनी व्याख्यानाच्या मध्येच एक कोरस म्हणायला सुरूवात केली आणि सगळया अधिवेशनाला आपल्या मागून ते म्हणायला सांगितले. मला क्षणभर भीती वाटली. यदुनाथांचा आवाज गायकाचा नव्हता. त्याला गोडव्याचा फारसा स्पर्शही नव्हता. आपल्या सहजसाध्या आवाजात श्लोक म्हणावा तसे त्यांनी कोरस म्हटले आणि तिथल्या प्रत्येकाने ते त्यांच्या मागून म्हणत सारा मंडप दणाणून टाकला. एका शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलांना उद्देशून ते म्हणाले, ‘भारत हा माझा देश आहे असं रोज म्हणता ना? मग तो असा दरिद्री, अर्धपोटी आणि बेकार कां, हे आपण स्वतःला विचारणार की नाही? सगळे भारतीय माझे बांधव म्हणता तर मग हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा उच्चवर्णीय असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही?…’ ती सगळी चिमुकली प्रजा यदुनाथांच्या प्रश्नांनी अंतर्मुख आणि हतबल होऊन गेली. या कमावलेल्या, जोपासलेल्या विनम्र साधेपणामागे साधूगिरीचा सोस नव्हता. साऱ्यांना जवळचे वाटावे हाही हव्यास नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली एक व्यापक बैठक होती. मानवी जीवनाचे अत्युच्च विकसन म्हणजे विचारांचे शासन होय अशी यदुनाथांची धारणा होती. जेव्हा दंडशासनाची जागा विचारांचे शासन घेईल तेव्हा मानवी संस्कृती ही विकासाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहचलेली असेल. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची चिंता वाहणाऱ्यांना हे आवाहन सतत डोळयासमोर ठेवावे लागेल. शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे.
यदुनाथांची श्रध्दा अशी की शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिध्द व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुध्दा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचे भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दाचे भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे किडाकिटुकदेखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर हे हृदयपरिवर्तनाचे आवाहन आहे. हृदय परिवर्तनासाठी त्याला भावेल अशाच शब्दात विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळया आतषबाजीतून येणारे दीप्तीमान झोत आणि शब्दांच्या समईतून प्रगटणारा मंद प्रकाश या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी, मंगलमय.

रुसो म्हणाला, तुमच्या एकाही शब्दाशी मी सहमत नसलो तरी तुमचे म्हणणे मांडण्याचा तुमचा अधिकार कायम रहावा म्हणून मी लढायला मागेपुढे पाहणार नाही. ही भूमिका वैज्ञानिक आहे आणि कोणताही वैज्ञानिक आपल्याला अंतिम सत्य गवसले असल्याचा दावा करीत नाही. आजची कल्पना हे उद्याचे सत्य ठरू शकते आणि आजचे सत्य हा सत्यशोधनाच्या मार्गावरील फक्त एक टप्पाच ठरू शकतो. सापेक्ष सत्याच्या आधारे प्रयोग करीत राहणे आणि प्रयोगांती नवे सत्य समोर आले तर त्याचा उमदेपणाने स्वीकार करणे ही वैज्ञानिक भूमिका आहे.

यदुनाथ विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि विज्ञाननिष्ठा हे त्यांचे जीवनव्रत होते. ज्ञान हा अनंतकाळापर्यंत वाहणारा सनातन प्रवाह आहे. तो कोणत्याही ग्रंथापाशी थांबत नाही व गुरू केवढाही मोठा असला तरी तो ज्ञानाचा पूर्णविराम ठरत नाही ही विज्ञाननिष्ठ मनाची भूमिका आहे. म्हणूनच ‘जगातील सगळी ग्रंथालये जाळून टाका. कारण सगळे ज्ञान कुराणात आले आहे’ ही मागणी या मनाला जशी मान्य होणार नाही तसे ‘सगळे ज्ञान वेदात आले असल्याने त्यावरच्या निष्ठाच तेवढया अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या आहेत’ ही श्रध्दाही त्याला भावणारी नाही. व्यास आणि बुध्द हे ज्ञानाचे पूर्णविराम नाहीत आणि मार्क्स आणि गांधीजवळही ज्ञानाचा प्रवाह थांबणारा नाही. आपल्या श्रध्दास्थानांना ज्ञानाचे अंतिम निकष मानून थांबणारे लोक ज्ञान वाढवीत नाहीत. आपापल्या श्रध्दास्थानांचे ते फक्त देव्हारे माजवीत असतात. त्यात ज्ञानोपासनेपेक्षा महंतगिरीच बलवत्तर असते. कोणताही विज्ञाननिष्ठ माणूस अशा महंतगिरीचा उपासक असणार नाही. गुलाल उधळला काय आणि नीळ उधळली काय अखेर दोन्हीतल्या अंधश्रध्देचे कूळ एकच असणार.

यदुनाथ थत्त्यांची विज्ञानोपासना अशी खणखणीत बुध्दीवादाच्या अधिष्ठानावर उभी होती. आठव्या शतकातल्या क्युरेश जमातीतले काही प्रश्न निकालात काढण्यासाठी सलिवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर काही सुधारणा सुचवितात. तो काळ धर्माच्या भाषेत बोलणारा असल्यामुळे आपला विचार तो धर्माच्या परिभाषेत सांगतो आणि हाडामासाच्या माणसाचे म्हणणे कुणी ऐकत नाही म्हणून हा विचार अल्लाने आपल्या दूतांकरवी माझ्यापर्यंत पोहचविला असे म्हणतो व त्यातून इस्लामचा जन्म होतो. सन पूर्व सहाव्या शतकातल्या वैदिक धर्मातील हिंसाचाराला विरोध करण्यासाठी त्या हिंसेमागच्या प्रेरणांनाच सिध्दार्थ आव्हान देतो. हे आव्हान तेव्हाच्या धर्माच्या परिभाषेत येते. ते बुध्दमुखातून येते आणि नव्या धर्माचे प्रवर्तन सुरू होते.

तत्कालीन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा तत्कालीन भाषेतून झालेला प्रयत्न हे सर्व धर्मांचे जन्मकारण आहे आणि तसेच ते समजून घेतले पाहिजे. विसाव्या शतकाचे निकष जसे पैगंबराच्या किंवा बुध्दाच्या काळाला लावता येत नाहीत तसे कुराण व स्मृतींच्या कायद्याच्या आधारे विसाव्या शतकातले प्रश्नही सोडविता येणार नाहीत. हा विज्ञाननिष्ठ बुध्दीवादातून साकारणारा सेक्युरॅलिझम आहे. यदुनाथ अशा सेक्युलर विचाराचे कृतीशील कार्यकर्ते होते. एक गाव एक पाणवठा ही बाबा आढावांची चळवळ असेल किंवा मुस्लीम सुधारणावादाचा हमीद दलवाईचा भव्य प्रयत्न असेल, यदुनाथ अशा कामांचे दायित्व स्वतःहून शिरावर घेत आणि आपले काम म्हणून त्यासाठी झिजत. मात्र करडया बुध्दीवादाने वा चिकित्सक सेक्युलॅरिझमने यदुनाथांना रुक्ष किंवा कोरडे बनविले नाही. जीवनातील ऋजुता आणि गोडवा यांच्याशी आपले नाते त्यांनी तेवढयाच हळूवारपणे जपले. म्हणून लहान मुलांसाठी त्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेत पुस्तके लिहिणे त्यांना जमले. साहित्य संमेलनांमधून उद्याच्या या वाचकांचा म्हणजे बाल वाचकांचा विचार होत नाही याचा त्यांना राग यायचा आणि तरुण मुलामुलींच्या मनाची जपणूकही त्यांना साधायची.

बुध्दीवादाने त्यांना अश्रध्द बनविले नाही उलट त्यांच्या जीवनातील सगळया श्रध्दा बुध्दीवादाने डोळस केल्या. व्यक्तीपूजेचे स्तोम न माजविणारे ममत्व त्यांना साधले आणि त्या ममत्वाला आपल्या चिकित्सा बुध्दीवर मात करू न देणारा आत्मसंयमही त्यांना जमला. मराठी बुध्दीवादाला अलिकडच्या काही दशकात अहंतेचा विकार जडला आहे. इथला प्रत्येक बुध्दीवादी हा एक स्वतंत्र तिरसिंगराव आहे आणि इतरांकडे पुरेशा तुच्छतेने पाहणारा तुच्छतावादीही आहे. आपला बुध्दीवाद सतत गर्जून सांगणाऱ्या अनेकांची एक आणखीही गंमत असते. त्यांच्या बुध्दीवादात त्यांच्या स्वतःच्या बुध्दीखेरीज इतरांच्या बुध्दीला मान नसतो. अशी तापदायक माणसे आपल्या बुध्दीच्या बेटांवर एकेकटीच आरामात राहतात आणि इतर कोणी आपल्याजवळ येणार नाही अशी स्वतःच व्यवस्थाही करतात. यदुनाथांचा बुध्दीवाद असा स्वयंकेद्री नव्हता. मुळात त्यांचा प्रयासच स्वतःचे असे केंद्र मोडीत काढण्याचा होता. म्हणून त्यांचा बुध्दवाद खुपणारा नव्हता, तो माणसे जोडणारा होता. यदुनाथांच्या पायात अखंड घुमणारे एक चक्रीवादळ होते. ते त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून सतत घुमवीत होते. माणसे, प्रेरणा, संस्था आणि स्वप्ने दाखवीत होते. या देशाच्या भविष्याचे अंकुर जपत, फुलवत आणि वाढवत यदुनाथ देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत अखंडपणे फिरत. त्यासाठी त्यांना बोलवावे लागत नसे. त्या अंकुरांचा सुवास थेट त्यांच्यापर्यंत निमंत्रणासारखा पोहचत असे.

कोणत्याही आदरणीय शब्दाच्या वाटयाला अवमूल्यनाखेरीज काही येऊ नये असा हा दुर्दैवी काळ आहे. या काळात मूल्यनिष्ठा हा खरेतर जाणकारांच्या कुचाळीचा आणि उपहासाचा विषय. अशावेळी मूल्यांवरची ज्याची निष्ठा प्रामाणिक असेल त्याला दरक्षणी आपल्या सच्चाईची किंमत चुकवावी लागते आणि चुकवता आली नाही तर तिच्या कर्जाचे ओझे आयुष्यभर अंगावर वागवावे लागते. यदुनाथ थत्ते हा माणूस हे मोल चुकवीत होता आणि ते चुकविल्यानंतर त्याचा भार अभिमानाने ओढतही होता. अशा माणसाला कसलीही जाहिरात न करता अपरिग्रहाचे व्रत घ्यावे लागते आणि त्याची उपासनाही आयुष्यभर करावी लागते. यदुनाथांना आयुष्याच्या उत्तरार्धात घर मिळाले तेही पत्रकारांसाठी कॉलनी झाली त्यात. त्यातले श्रीमंतीचे एकमेव लक्षण त्यांच्याजवळच्या ग्रंथांच्या संग्रहाचे.

फिरत जगणे ही यदुनाथांची साधना. या साधनेचेच त्यांना वेड राहिले. त्यापुढे साध्याचा मोहदेखील त्यांना कधी थांबवू शकला नाही. ते ज्यांना श्रध्दास्थानी मानत त्या गांधींनीही म्हटले, साधनांची काळजी करणेच तेवढे आपल्या हाती असते. माणसे जोडत हिंडणाऱ्या यदुनाथांची माणसे हीच मिळकत आणि श्रीमंती होती. त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची माहिती ज्यांना आहे त्यांनाच तिचे मोल कळणारे आहे. मतभेद मान्य, पण मतभेद करणाऱ्या माणसाचा दुरावा अमान्य असा हा ध्यास आहे. एखादे माणूस तुटले आणि दूर गेले की त्यातून येणारे रितेपण अशा माणसांना सतत छळत असते. शिवाय ही गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादितही नसते. आपण आपल्या मानलेल्या माणसांनी एकमेकांपासून दूर झालेलेही त्यांना चालत नसते.

यदुनाथांना जीवनाची चांगली बाजूच तेवढी पाहता आली. माणसांचे विकार माणूस म्हणून क्षम्य असल्याचे मत त्यांनी अभ्यासपूर्वक बनवले होते. म्हणून महात्म्यांनाही क्षुद्र होताना पाहून त्यांना त्याचा धक्का बसत नसे. ‘अरे, शेवटी मोठा झाला तरी तो माणूसच’ असा त्यांचा अभिप्राय असे आणि ‘त्याचे विकार त्याच्यापाशी, तुला आणि मला त्याची चांगली बाजूच महत्त्वाची वाटली पाहिजे’ हा वर उपदेश. जीवनाकडे पाहण्याचा विधायक वगैरे म्हणतात तो हाच दृष्टीकोन असावा. गांधी ज्याला सत्याग्रहाची साधना म्हणायचे तीही हीच असावी. त्यांच्यासोबत पंजाबच्या दहशतग्रस्त ग्रामीण भागातून फिरत असतानाची गोष्ट. अमृतसरजवळच्या तरणतारण या शिखांच्या पवित्र क्षेत्री त्यांचा मुक्काम होता. तेथे मी त्यांना भेटलो आणि मग फतेहाबाद, अमृतसर, वाघा, बियास, फिरोजपूर, होशियारपूर अशी आमची फिरस्ती सुरू झाली. प्रत्येक गावात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराधांच्या कुटूंबात आम्ही जात होतो. त्यांचे सांत्वन करणे आमच्या ताकदीबाहेरचे होते. पण त्यांना मिळणारी सरकारी मदत वेळच्यावेळी आणि पुरेशी मिळते की नाही, त्यातल्या अडचणी कोणत्या याची माहिती आम्ही घेत होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगत होतो.

मला हा तात्पुरत्या मलमपट्टीचा आणि आमच्याच मानसिक समाधानाचा उपक्रम वाटत होता. त्यातून कोणताही मूळ प्रश्न निकाली निघत नाही असे वाटत होते. एकदा मी हे यदुनाथांना सांगितले तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ‘जे प्रश्न सरकारांना सोडवता येत नाहीत ते आपल्या हाती निकालात निघावे ही आकांक्षा बाळगणे हेच मुळात चुकीचे.’

मी म्हणालो, ‘मग आपल्या पायपिटीला अर्थ कोणता?’ यदुनाथ म्हणाले, ‘यातून आपण काही शिकलो की नाही? जे शिकलो ती उपलब्धी. आपल्या प्रयत्नांनी इतरांची जाण किती वाढते याहूनही आपली जाणीव विस्तारते की नाही हे पाहणे महत्त्वाचे.’

गांधी म्हणाले, सत्याग्रह कोणाही विरुध्द नसतो, कशाही विरुध्द नसतो आणि काही मिळवायचे म्हणूनही नसतो. तो आत्मसामर्थ्य वाढविण्याचा मार्ग आहे. यदुनाथजींची आयुष्यभराची पायपीट ही गांधीजींचा असा सत्याग्रही होण्याची होती.

याच दौऱ्यात एकदा मी त्यांना चेष्टेने विचारले, ‘पंजाबच्या भूमीवर शहिद-बिहीद होण्याचे तर तुमच्या मनात नाही?’ त्यावर प्रसन्न हंसत ते म्हणाले, ‘खुळा की काय, अरे आपल्यावर गोळी झाडायला अतिरेक्यांना वेडबिड लागलं कां? आपली गोळी कोणावरही वाया दवडू नये एवढं त्यांना चांगलं समजतं.’
यदुनाथ फिरत राहिले. तरुणांना भेटत अन् बोलत राहिले. मित्र जमवण्याचे व्यसन त्यांनी अखेरपर्यंत जोपासले. कोणतीही ठोकळेबाज विचारसरणी न सांगता ते स्वतंत्र विचारांचे मार्ग सांगत राहिले. माझ्या स्वभावापायी यदुनाथांसारखी माणसे नुसतीच जोडणे मला जमले नाही. पण मला अंतरलेली माणसे पुन्हा माझ्याजवळ आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल मी पाहिली आहे. आपल्या विस्तारालेल्या परिवारातली माणसे नेहमी भेटावीत, त्यांचे परस्पर सौहार्द कायम असावे आणि आपण जसे एखाद्याला प्रोत्साहनाने फुलवतो तसे त्यांनीही करावे ही त्यांची इच्छा असे.

एखाद्या लहानशा स्टेशनावर अंधाऱ्या रात्री गाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती रॉकेलचा उंच दिवा घेऊन एक कामगार गाडीच्या चाकांवर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हाती तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. यदुनाथ थत्त्यांची आठवण झाली की मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकांत तेल ओतणारा तो माणूस आठवतो. सगळया भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी असते आणि अशी माणसे आपल्याजवळची असणे हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. केव्हाही येणारा असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवणारा, त्यात प्रकाशकणांची पेरणी करणारा आणि आला तसाच नकळत निघून जाणारा असतो.

ज्ञानेश्वर मुळे, उच्चायुक्त, भारतीय दुतावास मालदिव , सौजन्य – मटा

प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे. ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे..

———————————————————

काही दिवसांपूवीर् भारतातून पर्यटन व्यवसायातील काही मंडळी, भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात मालदीवला यावेत यासाठी काय करता येईल; याचा अभ्यास करण्यासाठी आली होती. त्यातील एक गृहस्थ बोलता बोलता म्हणाले, ‘आमच्यातही आता खूप बदल झाले आहेत. पूवीर् क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विजय झाला की, आमच्यातले काही जण फटाके उडवत असत. आता मात्र सगळे शिक्षण घेताहेत, अनेक जणांनी माहिती तंत्रज्ञानात नोकरी मिळवलीय. हीच आमची माती आहे आणि आमचे भविष्य इथेच आहे याची आता सर्वांना खात्री आहे.’ त्याने ती माहिती मला का सांगितली याचा मला अजूनही बोध होत नाहीये. कुणाच्याही देशभक्तीविषयी शंका घ्यावी असे वातावरण असताना फक्त त्या गृहस्थानेच ते स्पष्टीकरण का दिले असावे?

मालदीवमध्ये ताज उद्योगसमूहाच्या एका रिसॉर्टच्या व्यवस्थापकांच्या दोनेक वर्षांच्या मुलीशी मी बोलायचा प्रयत्न करत होतो. तुला काय काय आवडते या प्रश्नांची तिची उत्तरं अशी होती, ‘शाळा, टीचर, माले शहर, आईवडील, पाच वर्षाचा भाऊ… दिवेही भाषा, स्पीड बोट.’ मी विचारले, ‘हाऊ अबाउट इंडिया?’

‘ आय डोंट नो इंडिया.’… ही भारतीय मुलगी अशीच भारताबाहेर राहिली तर तिच्या देशप्रेमाचे नेमके स्वरूप काय असेल? भविष्यात तिचे मालदीववरचे प्रेम दृढ होईल, भारतावरचे कमी होईल की वाढेल की तिसऱ्याच देशात (अमेरिका, जपान किंवा अन्य कोणताही) जिथं तिची नोकरी असेल, प्रियकर असेल तो देश तिला अधिक जवळचा वाटेल? मग तिच्या देशभक्तीचे नेमके स्वरूप काय असेल?

काही दिवसांपूवीर् भारत आणि मालदीव यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांमध्ये दोस्तीचा सामना झाला. मी मनातल्या मनात स्वत:ला हा प्रश्न विचारला, ‘कोणत्या संघाचा विजय झाला पाहिजे?’ नि:संदिग्ध उत्तर आले नाही, ‘जो संघ चांगला खेळेल त्याचा विजय व्हायला हवा की भारताचाच विजय कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे?’ मी या सामन्याला प्रमुख पाहुणा होतो. मी भारताच्या वतीने जल्लोष करत होतो पण, जेव्हा जेव्हा विरोधी संघ चांगला खेळ दाखवत होता तेव्हा टाळ्या वाजवून त्यांनाही दाद देत होतो. माझ्या शेजारी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद बसलेले होते. भारताचा खेळाडू जेव्हा चांगला खेळत होता तेव्हा तेही मनापासून टाळ्या वाजवत होते. सुदैवाने सामना बरोबरीचा झाला. पण खेळ खेळ म्हणून पाह्यचा की राष्ट्राभिमानाची खूण म्हणून?

त्याचे उत्तर सामन्याच्या आधी दोन तासांपूवीर् मला आलेल्या एका फोनमध्ये असावे. तो फोन इब्राहीम वाहीद यांचा. ते मालदीवच्या निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत पण, माझी त्यांची मैत्री ते लेखक आणि विचारवंत असल्याने अधिक दृढ झाली. फोनवरती ते म्हणाले, ‘मी तुमची माफी मागण्यासाठी फोन करतोय. आजच्या भारत, मालदीव सामन्याची टीव्हीवर जोरदार जाहिरात होतेय. इंग्रजीत ‘फ्रेंडली मॅच’ असा शब्द वापरताहेत. मात्र स्थानिक दिवेही भाषेत ‘भारताविरुद्ध…’ असा शब्द वापरताहेत. मी टीव्ही स्टेशनला फोन करून खडसावले आणि दिवेही भाषेतही ‘फ्रेंडली मॅच’ला समानाथीर् शब्द वापरावेत अशी सूचना केली. त्यांनी ती मान्य केलीच पण, या आधीच्या त्यांच्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’ त्यांच्या त्या स्पष्टीकरणानं मी थोडा गोंधळलो. ‘चुकीच्या’ शब्द प्रयोगामुळे होणारा दोन देशांमधला गैरसमज टळावा हा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यांचे मी आभार मानले. पण भारतीय टीव्हीवर अशा सामन्यांच्या वेळेस ‘महायुद्ध, रणसंग्राम, घमासान…’ असे शब्द मी सर्रास पाहतो आणि मला त्यात फारसे आश्चर्य वाटले नाही, याचे कारण काय असावे? इब्राहीम वाहीद यांची देशभक्ती अपुरी की माझी? की यातून घ्यायचा संदेश काही वेगळाच आहे. सर्व राष्ट्रांवर प्रेम, मानवतेवर प्रेम, पृथ्वीवर प्रेम हाच तर नवा ‘राष्ट्रधर्म’ नव्हे?

काही मूलभूत प्रश्न मला सतत छळतात? आजच्या काळात देशभक्तीचे नेमके परिमाण कोणते? आजच्या परस्परावलंबी जगात निखळ देशभक्ती असा प्रकार असू शकतो का? युद्धाच्या काळात देशाच्या बाजूने उभे राहाणे ही राष्ट्रभक्ती, मग तिचे शांतीच्या काळातले निकष कोणते? अख्खे आयुष्य दुसऱ्या देशात काढलेल्या भारतीयांची राष्ट्रभक्ती मोजण्याची मोजपट्टी कोणती? देशात राहून जनतेची फसवणूक करून अप्रामाणिक जीवन जगणाऱ्यांना आपण ‘राष्ट्रदोही’ का समजत नाही? देशात राहून विदेशी कंपन्यांची नोकरी करत आपल्याच देशातील भ्रष्टाचार, अस्वच्छता व विषमता यांच्यावर ताशेरे मारत बसणारे भारतीय, त्यांचे देशप्रेम नेमके कोणते? आपण कमावलेल्या अमाप संपत्तीचा एक मोठा भाग भारतासह वेगवेगळ्या गरीब देशातील आरोग्य सेवेसाठी देणाऱ्या बिल गेट्सचे अमेरिका प्रेम गढूळ तर होत नाही ना? मुळात देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम या संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत का?

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हाची व आजची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा राष्ट्र ही संकल्पना बळकट होती. आपले व परके यांच्यातले अंतर स्पष्ट होते. आपले बहुसंख्य लोक शेती किंवा तत्सम उद्योग करत होते. त्यांचे जीवन ‘स्थानिक’ होते. त्यात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय असे फारसे नव्हते. शेतकऱ्यांचे जसे जमिनीवर प्रेम, त्याच प्रेमाचा विस्तार राष्ट्र, राष्ट्रभूमी, देशप्रेम यांच्यात प्रतिबिंबित होत असे. ‘बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते’ हे शब्द ऐकूनच रक्त पेटायचे. आता काळ पूर्ण बदलला आहे. स्थळ, काळ, अंतर, वेग यांचे अर्थ बदललेत. चीन आमचा विदेश व्यापारातील सगळ्यात मोठा भागीदार आहे. पाकिस्तान प्रकरण थोडे वेगळे असले तरी आपले नाते एकायामी नाही. परवा कुणीतरी किस्सा सांगितला की, विवाहसमारंभाला गेलेली एक पाकिस्तानी मुलगी आईला विचारत होती, ‘मम्मी, अभी फेरे नही हुए है वो कब होंगे?’ हिंदी चित्रपट आणि मालिकांचा तो प्रभाव आहे. एक मोठा भूभाग आणि सार्वभौमत्व (स्वत:चे निर्णय देशहितार्थ स्वत: घेण्याचे अधिकार) हे कोणत्याही राष्ट्राला लागू पडणारे दोन निकष. पण सरहद्द या पारंपरिक कल्पनेला तडा गेला आहे आणि सार्वभौमत्वाच्या कल्पनेतल्या मर्यादाही अधिकाधिक स्पष्ट होत चालल्या. शिवाय लष्करी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे समोरासमोर तलवारी, बंदुका किंवा तोफगोळे यांच्यावर अवलंबून असलेली पारंपरिक युद्धेही जवळजवळ संपत आलेली आहेत. सध्या एकाही जवानाचा बळी न देता अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वर्षाव लिबियावर होतो आहे, ही गोष्ट लक्षणीय आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स यांच्या युगात सीमेवरच्या सैनिकांची भूमिका पूवीर्सारखी राहिली नाही. नोव्हेंबर २०१०मध्ये युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी ”राष्ट्र’ संकल्पना इतिहासजमा झाली असून, राष्ट्रे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात हे ‘मृगजळ’ आणि ‘धादांत खोटे’ आहे’, असे विधान केले. हे वाक्य युरोपियन युनियनच्या संदर्भातले असले तरी प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहे.

या बदलत्या वस्तुस्थितीला जबाबदार घटक कोणते? पहिली गोष्ट, वस्तू आणि सेवा आता मुक्तपणे आयात व निर्यात केल्या जाताहेत. भारतातील माहिती उद्योग अमेरिकेतील बेकारीला जबाबदार ठरतो. दुसरी गोष्ट, प्रवास सुकर व वेगवान झाला आहे. माणसं जगभर भटकू लागलीत अभूतपूर्व संख्येने. युरोप अमेरिकेत मुलं असलेल्या एकाकी मराठी आईबापांना पुण्यासारख्या ठिकाणी स्वत:च्या संघटनेची गरज वाटते. तिसरी गोष्ट, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा धुमधडाका सगळ्या भिंतींचा धुव्वा उडवतोय. आभासी विश्वातल्या फेसबुकच्या सदस्यांची संख्या ३० कोटींवर आहे. जगातले तिसरे विशाल ‘राष्ट्र’ खरे तर ‘फेसबुक’ आहे. तंत्रज्ञानाचे विशेषत: माहितीचे ‘लोकशाहीकरण’ ही स्थानिक नसून जागतिक क्रांतीची नांदी आहे. चौथी गोष्ट, फक्त वस्तू आणि सेवाच नव्हे तर संकल्पनांचा प्रवास सुकर आणि सरहद्दींना कालबाह्य ठरवतो आहे. यू ट्यूब असो वा ट्विटर, ईमेल असो वा स्काइप पारंपरिक राष्ट्र संकल्पनेला छेदून जाणाऱ्या आणि अख्ख्या मानवतेला जोडणाऱ्या नवीन साधनांचा अभूतपूर्व जल्लोष सगळीकडे सुरू आहे. शेवटी पाचवा आणि महत्त्वाचा परिवर्तन बिंदू आहे मानवतेसमोरचे धोके. तापमान बदल, आतंकवाद, गरिबी, विषमता आणि रोगराई या मानवतेसमोरच्या धोक्यांनी जगभरच्या राष्ट्रांना राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना वगैरे आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र आणले आहे.

अशा या गोंधळाच्या वातावरणात माणसाने आपली देशभक्ती जिवंत ठेवायची कशी आणि का? दोन मार्ग संभवतात. पहिला ‘थिंक ग्लोबल अॅक्ट लोकल’ हा मार्ग. आपणा सगळ्यांचे मानवतेशी लाखो प्रकारे नातेसंबंध आहेत, हे लक्षात घेऊन स्वत:च्या वैयक्तिक, सामाजिक व बौद्धिक विश्वात बदल घडवून तसे वागायचे. दुसरा मार्ग, सर्वार्थाने विश्व नागरिक बनायचे. या क्षणी राष्ट्र या संकल्पनेवर अनेक बाजूंनी अतिक्रमण होत असले तरी अजून राष्ट्राला ठोस पर्याय उपलब्ध नाही. अशा पार्श्वभूमीवर प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे.

भारताचे राष्ट्र म्हणून काही महत्त्वाचे हितसंबंध आहेत. त्यात राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्रभूमीचे संरक्षण, आथिर्क व सामाजिक स्थैर्य वगैरे महत्त्वाच्या गोष्टी येतात. पण या सांभाळण्यासाठीसुद्धा जगभरच्या अनेक राष्ट्रांशी तह, करार व मैत्रीसंबंध असणे गरजेचे आहे. भारताचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या रवींदनाथ टागोरांच्याच दुसऱ्या एका कृतीला बांगलादेशने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. राष्ट्रीय अस्मिता कशी असू शकते किंवा कशी बदलते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच जी राष्ट्रे दूरदशीर् आहेत त्यांनी जगभर स्वत:च्या हितसंबंधांचे जाळे विणून टाकले आहे. भारतही याबाबतीत आघाडीवर आहे.

जगभर पसरलेले भारतीय वंशाचे आणि अनिवासी भारतीय यांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे. शिवाय मॉरिशस आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो इथे भारतवंशी पंतप्रधान आहेत. या वातावरणात फक्त ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे.

प्रा. नरहर कुरुंदकर , सौजन्य – लोकसत्ता
(ध्वनिमुद्रण, लेखन, संपादन, पुनर्लेखन- राम देशपांडे, कोल्हापूर)

लोकमान्य टिळक ही भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील असामान्य विभूती मानली पाहिजे. विसाव्या शतकात भगवद्गीतेचे जे भाष्यकार झाले त्यात लोकमान्य हे सर्वात महत्त्वाचे आणि थोर भाष्यकार होत, असे मत डॉ. राधाकृष्णन यांनीच दिले असल्यामुळे सर्वसंमत मत मानायला हरकत नाही. माझे व्यक्तिगत मत तर असे आहे की, गेल्या हजार-बाराशे वर्षांत गीतेचे जे अलौकिक भाष्यकार होऊन गेले त्यात ज्ञानमार्गाचे नेते म्हणून शंकराचार्य, भक्तिमार्गाचे नेते म्हणून ज्ञानेश्वर आणि कर्ममार्गाचे नेते म्हणून लोकमान्य टिळक हे तीन भाष्यकार सर्वात महत्त्वाचे मानले पाहिजेत. भगवद्गीतेत ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही सूत्रांचे प्रतिपादन आहे. गीतेच्या कोणत्याही भाष्यकाराने या तीन प्रवाहांचा अर्थ अन्य लावलेला नाही. शंकाराचार्याना कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व मान्यच असते; पण त्यांच्या मते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. टिळकांचीसुद्धा पद्धती हीच आहे. आपण लोकमान्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आहे, असे म्हणतो. स्थूलपणे ते खरेही आहे. पण टिळकांचे नेमके म्हणणे मात्र वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. त्यांच्या मते भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. लोकमान्यांचे हे ‘गीताभाष्य’ त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशित झाले आहे.

लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला स्थूलमानाने सांगायचे तर त्यांच्या पंचविशीपासून आरंभ होतो. या सार्वजनिक जीवनाची पंचविशी पूर्ण होतात न होतात तोच त्यांना मंडालेच्या तुरुंगात दीर्घकाळ राहण्याचा योग आला. जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू! या कर्मयोगाचे स्वरूप आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोणते तरी कर्म करीत राहा, कारण माणसाने कर्म केले पाहिजे, इतका एकेरी ढोबळ विचार लोकमान्यांनी कधी मान्य केला नसता. लाकूडफोडय़ा, मजूर जन्मभर कर्म करीतच असतो.

आपल्यासारख्या गरीब देशात कोटय़वधी माणसांचे जीवन जन्मभर कोणते तरी काम करीतच जाणारे असते. ‘बाबा रे, आळशी बसून राहू नकोस, कोणते तरी काम कर’ हा उपदेश निराळा आणि कर्मयोग निराळा. तो स्वत: कर्मयोगी आहे. माणूस जेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वत:च्या हितासाठी, लाभासाठी कर्म करतो तो कर्मयोग नव्हे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हित या परिघाबाहेर जाऊन समूहाच्या कल्याणात स्वत:च्या स्वार्थाचा लोप जेव्हा करतो, त्या वेळी कर्म ही साधना आणि उपासना होते. कर्मयोगात स्वार्थाचा लोप हा गृहीत आहे म्हणून तर काबाडकष्ट असा शब्दप्रयोग न करता ‘कर्मयोग’ म्हणायचे. हे कर्म अज्ञानाने करून चालणार नाही. समाजाची गरज काय, राष्ट्राची गरज काय? भोवतालची परिस्थिती कोणती, त्या परिस्थितीत शक्य काय, अशक्य काय इ. विचार केलाच पाहिजे. म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे.

फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करायचे असेल तर मग कर्म बरोबर की चूक हे ठरविण्याची कसोटीच शिल्लक राहणार नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे असते. हा आक्षेप घेणारी मंडळी एक मुद्दा विसरूनच जातात. लोकमान्य कर्माला फळ नसते असे म्हणत नाहीत. कर्माला फळ असते हेच त्यांचे म्हणणे आहे. जर कर्माला फळच नसते तर मग कर्म कोणतेही केले तरी बिघडले नसते. कर्माला फळ असते म्हणूनच कर्म ज्ञानमूलक असायला हवे. हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र असणे अगर स्वतंत्र नसणे दोन्ही बाबी सारख्याच, असे जर टिळकांचे मत असते तर त्यांना कुणी लोकमान्य म्हटलेच नसते. टिळकांना भारत स्वतंत्र हवा होता. ते स्वातंत्र्यात जन्मले असते तर ते म्हणाले असते, ‘स्वतंत्र भारत बलवान आणि स्वावलंबी झाला.’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सारे काम चालणार आहे. आपण ज्या मार्गाने जात आहोत तो लोकजागृतीचा व लोकसंघटनेचा आहे हे त्यांना कळतच होतं.

स्वातंत्र्याविषयी जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे, लोक संघटित करणे, त्यांना निर्भय बनवणे व इंग्रजी राज्याविरुद्ध संघर्ष करण्यास शिकवणे या मार्गाने आपण स्वातंत्र्यापर्यंत जाऊ, हा विश्वास टिळकांना होताच आणि हे त्यांचे प्रतिपादन काळाने खरे ठरविले आहे. टिळकांना दोषी ठरवून जेव्हा सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्या वेळी टिळक केवळ एवढेच म्हणाले नाहीत, ‘याहून एक श्रेष्ठ न्यायालय आहे तिथं मी निर्दोष ठरेन’, तर त्याखेरीज ते असेही म्हणाले, ‘मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे काढली. गीतारहस्य लिहिले; पण ते सुटून आले तेव्हा दृश्य कोणते होते? दिसत असेल ते कार्य संपलेले आहे, मातीमोल झालेले आहे. लोकांची प्रतिकारक्षमता मावळलेली आहे. टिळकांनी हे वातावरण पाहिले आणि म्हटले ‘पुनश्च हरिओम’! पुन्हा एकदा पहिलेपणापासून आरंभ. ही कधीही निराश न होणारी अशीच श्रद्धा, हीच भक्ती आहे. ही भक्तीच फळाची आशा सोडून कर्म करण्यास शिकवते. जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हा आधार असतो.

टिळकांचे जीवन हे या तत्त्वज्ञानाचे उदाहरण असते, तर स्वातंत्र्याच्या युगात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मोह डोळ्यासमोर दिसत असताना आपण निष्काम कर्मयोग विसरलो, तर स्वार्थाच्या या सार्वजनिक जीवनात दुसरे काही दिसणारच नाही. मग कर्मयोगही कुठे उरणार नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांसारख्या कर्मयोग्याचे जीवन व चिंतन पिढय़ान् पिढय़ा राष्ट्राला पोषक देणारे ठरते असे म्हणायचे.

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – मटा

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील एक मध्यवतीर् विषय आहे. पण तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून मिथकाच्या भाषेत व्यक्त झालेला, मानवी इतिहासातील सत्तासंघर्षाचा मूलभूत प्रश्न आहे. पशूपालन अवस्थेतील आर्यांना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. पृथ्वी, आकाश व अंतरिक्ष येथील दृश्य व अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होत. देवांचा राजा इंद. त्याला वश करून घेणे हा हेतू. यज्ञ संस्थेला अफाट महत्त्व असलेल्या अशा काळात सुरासुर संग्रामाची कथा जन्मास आली. इंद व त्याला भारी पडणारा त्याचा शत्रू वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून या कथेची सुरुवात होते. पुढे तिला वेळोवेळी सोयीस्कर वळणे दिली आहेत. असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जात असल्यामुळे कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे व न मानणारे यांतील तो संघर्ष बनतो. तत्कालीन इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते पण ते वैदिक देवतांना मानीत नसत. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलट्या अर्थाने रुढ झाले. पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला मारून इंदाने त्यांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची कथा होय. इति- लो. टिळक. डोंगरांना पंख असल्यामुळे ते एका जागेवर राहत नव्हते; इंदाने त्यांचे पंख तोडले या मिथ्यकथेत उपखंड उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत होती, या भूवैज्ञानिक तथ्याची पुसट जाण व्यक्त होते.

वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र ते आदित्य. त्वष्ट्रा (म्हणजे विश्वकर्मा) त्यापैकी एक. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्माण. त्याच्या वधामुळे इंदाला ब्रह्माहत्येचे पाप लागते. पापक्षालनासाठी त्याला यज्ञ करावे लागतात. याखेरीज कश्यपाला दितीपासून झालेले पुत्र दैत्य, दनूपासून झालेले दानव व अनायूपासून झालेले असुर असेही म्हटले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप. यापेक्षा बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनियस (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सार्मथ्यावर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा डागाळण्याचा सतत प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (ह्वठ्ठष्द्ब१द्बद्यद्ब५द्गस्त्र) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशराज्ञ सूक्त लक्षात घेण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकच सूक्त होय. पुरु, अनु, दुह्यू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्यांच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदासाच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठ्या संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता. पण पंचजनांशी भरतांचे युद्ध जुंपले तेव्हा विश्वामित्राच्या जागी वसिष्ठाची नेमणूक झाली. म्हणून चिडलेल्या विश्वामित्राने भरतांच्या विरुद्ध दहा राजांचा संघ उभारला. तरी भरताचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. म्हणजे संघर्ष बहुसंख्य प्राचीन व अल्पसंख्य अर्वाचीन यातला आहे. दोन्ही आर्यच. पुढे पर्यावरण बदलले, सरस्वती नदी आटली, अवर्षणे सुरू झाली तेव्हा ऋषींच्या अन्नासाठी आपसातही मारामाऱ्या होत. आता पूवेर्कडे स्थलांतर करणे भाग पडले.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू अधिक भावला. पहाडी भागात अवैदिक शिवाला महत्त्व होते. त्यामुळे भटक्या लोकांचा आडदांड इंद कालबाह्य झाला. आता भारतवर्ष एका छत्राखाली आणणे आवश्यक होते. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत व महाभारतात कृष्णप्रधान वैष्णवांनी पश्चिमेकडून पूवेर्पर्यंत भारतखंड एकछत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जसे शिवाला महादेव म्हणून मान्यता देणे वगैरे. इहलोकातील राजकारणाचे परलोकात पडलेले हे प्रतिबिंब. देव-दानव संघर्षाला त्यातून आणखी एक परिमाण प्राप्त होते. धर्मप्रसार जगात सर्वत्र राजाश्रयांच्या आधारे बळाचा वापर करून झालेला आहे. भारतातील हा प्रयोग तडजोडीच्या राजकारणाचा असल्यामुळे वेगळ्या चिवट पण कमकुवत जातकुळीचा आहे.

मग देव म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी, अल्पसंख्य वर्ग, ज्यांची नीती (१ड्डद्यह्वद्ग ह्य४ह्यह्लद्गद्व) इतरांवर लादली जाते. अर्थात स्त्रश्ाद्वद्बठ्ठद्गठ्ठह्ल द्वद्बठ्ठश्ाह्मद्बह्ल४. देवांशी जो जमवून घेऊ शकत नाही तो दैत्य. जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम हा करुणरम्य विषय असून नॉर्स मिथ्यकथांमध्ये तो विशेष रंगविलेला आहे, असे दुर्गाबाई भागवत सांगतात. माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांमुळे संघर्ष निर्माण होतो व त्याचा अंत कुणीतरी चांगला म्हणून विजयी प्रस्थापित होण्यात किंवा प्रस्थापित झाल्यामुळे चांगला ठरण्यात होतो, हेच सूत्र त्यामागे कार्य करताना दिसते.

जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम येतो. दुर्गाबाई भागवत काही उदाहरणे देतात परंतु त्यांनी त्याचा अर्थ फोड करून सांगितलेला नाही. आयर्लंड, स्कॉटलँड येथील कहाण्यांमध्ये ओडिन देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार करतात. कहाण्यांमध्ये सुद्धा ओडिन देवांचा राजा व त्याचा धाकटा भाऊ दुष्ट असतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा देव प्रथम त्या दैत्याचा चलाखीने वापर करतात आणि नंतर घनघोर युद्ध होते, हिम दैत्य मारला जातो व सर्व दैत्य नरकात जातात. वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा संघर्ष निर्माण होतो व त्यात जो विजयी होतो तो देव सुष्ट ठरतो, हाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून विषय वैश्विक आहे.