Posts Tagged ‘शिवाजी’

प्रशांत दीक्षित, सौजन्य – लोकसत्ता

 

‘शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’ हा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळेलिखित ग्रंथ परममित्र प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. हजार पानांच्या या ग्रंथात तत्कालीन अनेक नकाशे आणि दुर्मीळ चित्रेही समाविष्ट आहेत. ‘खुतूत ए शिवाजी’ या पर्शियन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही त्यामध्ये आहेत. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्याशी शिवराय आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधात केलेल्या या मनमुक्त गप्पा..

———————————

 

सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जातिवंत इतिहासकार हे फक्त अस्सल कागदपत्रांतूनच बोलतात. तत्कालीन मूळ नकाशे, आकडेवारी यांची साथ घेतात. अभ्यासातील अपुऱ्या जागा वास्तववादी तर्क चालवून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर्क चालविण्यासाठी ते बखरींचा आधारही घेतात, परंतु स्वत: मात्र बखर रचित नाहीत. असे इतिहासकार भूतकाळाचे आकर्षक, भावनोत्कट चित्र रंगवीत नाहीत. मात्र, त्यांच्या अभ्यासातून भूतकाळाबद्दलची माणसाची जाण आपोआपच वाढते. बखरकारांप्रमाणे इतिहासकार भूतकाळ साक्षात् जिवंत करू शकत नसले तरी त्यांच्यामुळे भूतकाळाची आजच्या काळाशी सांगड घालता येते आणि त्यातूनच भविष्याचा वेधही घेता येतो. असे इतिहासकार लोकप्रिय होत नाहीत, परंतु मैफिली गाजविणाऱ्या बखरकारांहून त्यांची कामगिरी खूपच मोलाची असते.

गजाजन मेहेंदळे यांची जातकुळी ही अशा सच्चा इतिहासकारांची आहे. गेली ४० वर्षे या माणसाने एकच ध्यास घेतला.. शिवाजीमहाराज समजून घेण्याचा! या ४० वर्षांत दिवसातील कित्येक तास शिवकाळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यात त्यांनी घालविले. हजारो कागदपत्रे नजरेखालून घातली. ग्रंथालये धुंडाळली. पायपीट केली. व्यक्तिगत उन्नतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून झपाटल्यासारखे ते या शिवकाळाचा शोध घेत राहिले. त्याबद्दलच्या नवनव्या गोष्टी ते उजेडात आणत राहिले. त्यांनी व्यासपीठे गाजविली नाहीत की इतिहासविषयक परिषदांनाही ते उपस्थित राहिले नाहीत. फुटकळ लिखाण करून लोकप्रिय होण्याच्या फंदातही ते पडले नाहीत. मात्र, अखंड मेहनत घेऊन शिवकाळाबद्दलचा मजबूत दस्तावेज त्यांनी दोन खंडांत दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केला. अर्थातच अन्य शिवचरित्रांप्रमाणे तो रसाळ नाही, चटकदार नाही. राजकारण्यांना उपयोगी पडेल असे त्यात काही नाही. मात्र, त्यातील तळटीपा, संदर्भ नुसते चाळले तरी इतिहास संशोधन ही काय चीज असते याची कल्पना येते. महाराजांनी राज्य कसे उभे केले, याचा बारीकसारीक तपशील या दोन खंडांत मिळतो. हा तपशील जरी रूक्ष वाटला तरी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजीमहाराज ही व्यक्ती इतिहासावर खोल ठसा उमटवून जाण्यासारखी कामगिरी कशी करते याची माहिती यातून मिळते. अशावेळी शिवाजीमहाराजांची थोरवी एखाद्या दैवतापेक्षाही मोठी भासते आणि महाराज हा गप्पांचा, मते मिळविण्याचा विषय नसून कार्यक्षमतेने कारभार कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकण्याचा विषय आहे हे कळते.

गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेले महाराजांचे द्विखंडात्मक चरित्र प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली. आता इंग्रजी भाषेत लिहिलेले त्यांनी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध होत आहे. सुमारे हजार पानांच्या या ग्रंथात महाराजांचा काळ व महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल मेहेंदळे यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि महाराजांचे असामान्य व्यक्तित्व समजून घेण्यात दोन-अडीच तास कसे गेले हे कळले नाही.
‘१९७२ सालापासून मी शिवाजीमहाराजांचा अभ्यास करतो आहे..’ मेहेंदळे सांगू लागले.. ‘७२ साली मार्च महिन्यात मी महाराजांविषयी गंभीरपणे वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत असा एकही दिवस उगवलेला नाही, की ज्या दिवशी मी शिवाजीबद्दल अभ्यास केला नाही. असा एकही दिवस नाही. तरीही अजून बराच अभ्यास बाकी आहे असे वाटते..’

‘लष्करी इतिहास’ हा खरा तर मेहेंदळे यांच्या अभ्यासाचा विषय. शाळेत असल्यापासूनच त्यांना लष्करी इतिहासाचे वेड होते. याबाबत कुलकर्णी या आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांचे ते आभार मानतात. त्यांनी लहान वयातच इंग्रजी इतके घटवून घेतले, की इंग्रजी ग्रंथ वाचणे मेहेंदळे यांना कधीच जड गेले नाही. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. लष्करी इतिहास या विषयात एम.ए.ला ते पहिले आले. ‘वर्गात तीसच विद्यार्थी होते. पण ३०० असते तरी मीच पहिला आलो असतो!,’ असे ते आत्मविश्वासाने म्हणतात.

त्यांना पदवी हाती पडत असतानाच बांगलादेशातील युद्ध-घडामोडी सुरू झाल्या होत्या. त्या पाहण्यासाठी युद्धपूर्वकाळात आणि नंतर प्रत्यक्ष युद्धकाळात पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवर मेहेंदळे पोहोचले. पाकिस्तानच्या अंतर्भागातही ते जाऊन आले. मूळ विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याला प्रत्यक्ष पाहणीची जोड यातून या युद्धावर त्यांचे एक पुस्तक तयार झाले. परंतु नियमानुसार परवानगीसाठी ते लष्कराकडे पाठविण्यात आले. तेव्हा लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले. मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला आणि ते पुस्तक निघालेच नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवर एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता. अशा फुटकळ कारणासाठी त्यांनी शिवकाळात डुबी मारली, पण त्यातून अद्यापि ते बाहेर आलेले नाहीत.

‘या विषयाने मला अक्षरश: झपाटून टाकले. इतिहास संशोधक मंडळात मी अनेक कागदपत्रे तपासू लागलो. लष्करी इतिहासाचा मी एम. ए. असलो तरीही  इतिहास संशोधनाची मला माहिती नव्हती. मार्गदर्शन करण्यासाठी कोणी गुरूही नव्हता. दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे असे दिग्गज आजूबाजूला असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण येत असे. मग स्वतच अभ्यास सुरू केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी, फार्सी, उर्दू शिकलो. काही प्रमाणात पोर्तुगीज भाषाही शिकलो. विषयाची आवडच अशी लागली, की कोणतीही भाषा शिकणे जड गेले नाही. शिवाजी समजून घेण्यासाठी स्वाहिली शिकणे आवश्यक आहे असे जर मला वाटले तर मी उद्यापासून स्वाहिली भाषेचाही अभ्यास सुरू करीन..’ अभ्यासाबाबत अशी इच्छाशक्ती केवळ जातिवंत इतिहासकाराकडेच असते.

या अभ्यासातून मेहेंदळेंना महाराज कसे दिसले? महाराजांच्या कोणत्या गुणांनी त्यांना भारून टाकले?

‘महाराजांचे सतत उद्योगी, दीघरेद्योगी व्यक्तिमत्त्व..’ मेहेंदळे सांगू लागतात.. ‘पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वराज निर्माण करावे याची ‘खरी’ इच्छा त्यांच्याकडे होती. इच्छा प्रत्येकालाच असतात. आपण बरेच काही करावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण या इच्छा खोटय़ा असतात. खरी इच्छा बाळगली तर जगात बरेच काही शक्य आहे. स्वराज मिळते का हे जमले तर पाहू, असे शिवाजी म्हणत नव्हता. लहान वयातच त्याच्या मनात ही इच्छा आली आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्ज्वलित होत गेली..’

‘मात्र तेवढय़ानेच भागत नाही. महाराजांमध्ये अनेक गुणांचे सुंदर मिश्रण झाले होते. असा गुणसंयोग सहस्रकात एखाद्याच्याच वाटय़ाला येतो. म्हणूनच शिवाजीच्या जवळपास जाणारा अजून जन्माला आलेला नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. शिवाजीकडे असलेल्या अनेक गुणांपैकी तीन गुण अत्यंत महत्त्वाचे. क्षमता, चारित्र्य आणि संवेदनशीलता. नीतिमत्तेचे, सदाचाराचे सतत वाढत गेलेले प्राबल्य हा महाराजांच्या आयुष्याचा एक विशेष होता. या प्राबल्यामुळे धैर्य, हिंमत या गुणांची ताकद कित्येक पट वाढली. त्यांच्या गुणांचे नैतिक दडपण शत्रूवरही पडलेले दिसते. मग स्वकीय त्यांच्यासाठी जीव देण्यास तयार झाले यात आश्चर्य ते काय! आग्रा येथील महासंकटातून महाराज बाहेर पडले ते या नैतिक गुणांमुळेच. स्वकीय व परकीय अशा दोघांवरही महाराजांनी अधिकार निर्माण केला तो या गुणांमुळेच!’

‘या गुणांना जोड होती ती संवेदनशीलतेची. दुसऱ्याच्या मनात आत्मीयता निर्माण करणे महाराजांना सहज जमत असे. हा माणूस आपली कदर करतो, आपली काळजी घेतो, असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक युद्धात कमीत कमी मनुष्यहानी होईल, याकडे ते लक्ष देत. त्यानुसारच लढाईची आखणी करीत. त्यामुळे सैन्यातही राजांबद्दल विश्वास होता. हा आपल्याला अनाठायी बळी चढवणार नाही, ही खात्री सैन्याला होती. याउलट, मोगलांच्या मोहिमांमध्ये रक्तामासांचा चिखल होई. बेदरकारपणे युद्धात सैन्याला लोटले जाई. महाराजांनी असे कधीही केले नाही.’

दुसऱ्याबद्दल संवेदनशील असल्यामुळे महाराजांचा- आजच्या भाषेत बोलायचे तर ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ बराच मोठा होता. त्यांच्या आयुष्यात वारंवार याची प्रचीती येते. आग्रा येथे औरंगजेबाचे निकटवर्तीयही महाराजांच्या बाजूने बोलताना आढळतात. हे घडण्याचे दुसरे कारण संभवत नाही. खुद्द औरंगजेबही महाराजांबाबत तितकासा दुष्टपणे वागलेला आढळत नाही. पुढे महाराज निसटले व राजगडावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी उत्तरेत औरंगजेबाला सापडले. मुगल हेरखाते प्रमुखाच्या नातेवाईकाकडे ते लपून बसले होते. महाराजांचा ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ यावरून लक्षात येईल. मामुली शिक्षा करून औरंगजेबाने त्यांना सोडून दिले.’

यातून विषय निघाला तो आग्रा येथून झालेल्या महाराजांच्या सुटकेचा! आग्य््रााहून कोणत्या मार्गाने महाराज स्वराज्यात आले, याचा कोणताही ठोस पुरावा वा तपशील उपलब्ध नाही, असे मेहेंदळे सांगतात. तसा तो मिळणे आता शक्यही नाही. मात्र, साधारणपणे २५ ते ३० दिवसांत महाराज इथे आले, याबाबत इतिहासकारांत बऱ्यापैकी एकमत आहे. रोज जवळपास ६० कि. मी. दौड महाराजांनी केली असावी. असे करणे शक्य आहे. याबाबत रशियन सेनानी झुकॉव्ह याचा संदर्भ मेहेंदळे देतात. दुसऱ्या महायुद्धात नाव कमावलेला हा सेनानी पहिल्या महायुद्धात घोडदळात अधिकारी होता. त्याने सतत महिनाभर रोज ८० कि. मी. दौड मारली होती. तीही एका घोडय़ावर! यासाठी असामान्य शरीरशक्ती लागते. महाराजांनी अशीच दौड मारली असावी. कदाचित त्यांनी घोडे बदलले असतील. काही माणसे त्यांनी आग्य््रााहून पुढे पाठविली होती. त्यांनी घोडय़ांची सोय केली असेल. आग्य््रााहून परतल्यावर महाराज खूप आजारी पडले. प्रवासात झालेले अतोनात श्रम याला कारणीभूत असावेत.

सेनापती व मुत्सद्दी अशी दोन्ही अंगे महाराजांमध्ये एकवटली होती. मेहेंदळे त्याबाबत भरभरून बोलतात. महाराजांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यापैकी पहिल्या टप्प्यात त्यांनी सामथ्र्य जमा करीत नेले. सामथ्र्य व साहस याच्या जोडीने दुसऱ्या टप्प्यात त्यांनी अनेक संधी साधल्या आणि आपले राज्य विस्तारत नेले. हा खूप दगदगीचा काळ होता. यात काही वेळा त्यांना अपयशही आले. मात्र, याच काळात महाराजांच्या अंगचे गुण अधिकाधिक उंचावत गेलेले आढळतात. त्या बळावर तिसऱ्या टप्प्यात महाराजांनी त्यांना हव्या तशा संधी स्वतच निर्माण केल्या. परिस्थितीला आपल्याला हवे तसे वळण लावले आणि दक्षिणेपर्यंत स्वराज्य वाढवीत नेले. आलेली संधी साधणे हे सेनापतीचे काम, तर संधी निर्माण करणे हे मुत्सद्दय़ाचे काम. आपल्याला हव्या तशा संधी मुत्सद्दी कशा निर्माण करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांची दक्षिणेची मोहीम! महाराजांचे त्यावेळचे डावपेच मेहेंदळे यांच्याकडून ऐकताना मन थक्क होऊन जाते. त्या एका वर्षांत महाराजांनी ४० किल्ले घेतले, तर मोगलांना फक्त दोन किल्ले घेता आले.

विस्मयकारक वाटाव्यात अशा हालचाली करणे आणि सैन्याला गतिक्षम ठेवणे हे सेनापती म्हणून महाराजांचे वैशिष्टय़ होते. ‘शत्रूला ते थक्क करीत..’ मेहेंदळे सांगतात.. ‘याला जोड होती ती गुप्ततेची. ही गुप्तता केवळ हालचालींची नव्हे, तर हेतूंची गुप्तता. शिवाजी काय करीत असावा, ही विवंचना करण्यातच शत्रूचा बराच वेळ जाई. महाराज आपल्या हेतूंचा थांग शत्रूला लागू देत नसत.’

जदुनाथ सरकार यांच्यासारख्या इतिहासकारांनी शिवाजीमहाराजांबद्दल अनेकांचे मत कलुषित करून ठेवले आहे. मराठी कागदपत्रांचा अभ्यास न करता सरकार यांनी बरेच निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे मराठय़ांची ‘लुटारू’ अशी प्रतिमा उत्तर भारतात तयार झाली. याबाबत विचारता मेहेंदळे म्हणाले की, ‘महाराजांनी सुरत लुटली. अन्य काही लुटीही केल्या. मात्र, त्याची खोलवर कारणमीमांसा कोणी केली नाही. त्यामागे आर्थिक कारणे होती. त्यावेळी मुघलांचा वार्षिक महसूल २२ कोटी रुपयांचा होता, तर महाराजांचा जेमतेम एक वा सव्वा कोटीचा होता. मुघलांकडे दोन लाख खडे सैन्य होते. त्या हिशेबाने महाराजांकडे १० हजारांचे सैन्य असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ४० हजार होते. आता या ४० हजार इतक्या सैन्यासाठी पैसा उभा करणे आवश्यकच होते. स्वातंत्र्याकरता मोठय़ा सत्तेविरुद्धात युद्ध करायचे ठरविले तर लहान सत्तेला लूट करावीच लागते. तेव्हा नैतिक प्रश्नांची ऐतिहासिक प्रश्नांशी गल्लत करता कामा नये.’

..मेहेंदळेंशी गप्पांचा हा ओघ सुरूच राहतो. त्यातून अनेक अंगांनी महाराजांचे चरित्र उलगडत जाते. हा ओघ थांबणारा नसतो. शिवाजीमहाराजाचे गुण सांगावे तेवढे थोडेच. मग सर्वाधिक गुणवैशिष्टय़ कोणते, असे विचारले असता मेहेंदळे चटकन् म्हणाले की, ‘आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्टय़ आगळेवेगळे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतची मुद्रा घडविली. ती पुन्हा कधीही बदलावी लागली नाही. त्यामध्ये भर घालावी लागली नाही. फेरफार करावा लागला नाही. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याबद्दलची इतकी स्पष्ट कल्पना अन्य कुणा ऐतिहासिक व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो..’

इतिहासकारांची उदार दृष्टी
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये बसून गजाननराव मेहेंदळे यांचे सर्व संशोधन सुरू असते. सदाशिव पेठेतील या दगडी वास्तुबद्दल मेहेंदळ्यांना खूप आत्मीयता आहे. या वास्तुने थोर इतिहास संशोधक पाहिले. त्यांच्याबद्दल मेहेंदळे अतीव आदराने बोलतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे तर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मेहेंदळेंना त्यांचा सहवास लाभला नाही, परंतु दत्तो वामन पोतदार यांची भाषणे त्यांनी ऐकली. ग. ह. खरे यांचे काम त्यांनी जवळून पाहिले. मोडी लिपीतील तज्ज्ञ माधवराव ओंकार यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘मोडीच्या अभ्यासामुळे देवनागरी वाचायला वेळ मिळत नाही,’ असे सांगणारे ओंकार किंवा ‘आयुष्यातील एकही क्षण मी फुकट घालवला नाही,’ असे ठामपणे सांगणारे खरे यांच्या व्यक्तिमत्त्वांचा मेहेंदळेंवर खूप परिणाम झाला. दत्तो वामन पोतदार यांनी शिवचरित्र लिहिले नाही याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. पण इतिहास संशोधन मंडळ उभे करण्यासाठी पोतदारांनी भरीव काम केले याचा मात्र टीकाकारांना विसर पडतो. या कामाचे अनेक दाखले मेहेंदळे देतात. पण त्यांना सर्वात महत्त्वाचा वाटतो तो पोतदारांचा उदार दृष्टिकोन. यासंबंधातील एक आठवण मेहेंदळेंनी सांगितली.

जदुनाथ सरकारांची मराठय़ांच्या इतिहासाबद्दल स्वल्पदृष्टी होती. त्याबद्दल त्यांचा मराठी इतिहासकारांनी जोरदार प्रतिवादही केला. मात्र, इतिहासकार म्हणून सरकारांबद्दल सर्वाना आदरच होता. गो. स. सरदेसाई हे सरकारांच्या प्रभावाखाली असल्याने त्यांचेही मराठी इतिहास संशोधकांबद्दल फारसे चांगले मत नव्हते. तरीही भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकल्यावर सरदेसाई अस्वस्थ झाले. आपल्याशी मतभेद असूनही ही संस्था आपला सत्कार कसा काय करते, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा दत्तो वामन पोतदार त्यांना म्हणाले, ‘मतभेद असले म्हणून काय झाले? अहो, पैलवानाचा फोटो हा तालमीतच पाहिजे.’
भारत इतिहास संशोधन संस्था ही अभ्यासाची तालीम असून इतिहास संशोधनाचे सरदेसाई हे पैलवान आहेत, असे पोतदार यांनी मोठय़ा मनाने मान्य केले होते.

शिवराज्याचा कारभार
शिवाजीमहाराज कारभार कसा करीत, याचे अनेक तपशील मेहेंदळे सांगतात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ असले तरी त्यांचे काम सल्ला देण्यापुरतेच होते. निर्णय महाराज स्वतच घेत, असे मेहेंदळे यांचे ठाम म्हणणे आहे. हे मंडळ वास्तविक मंत्र्यांचे नसून सचिवांचे होते. आजचे सचिव जसे काम करतात तसे हे अष्टप्रधान मंडळ काम करी. ते महाराजांना माहिती पुरवीत, परंतु निर्णय हा शिवाजीचा स्वतचा असे.
बारीकसारीक तपशिलावर महाराजांची नजर असे. अनेक पत्रांमधून ही गोष्ट लक्षात येते. आपली मर्यादा सोडून काम केलेले महाराजांना खपत नसे. अगदी पाटीलकीच्या व्यवहारातही महाराज लक्ष घालीत. करंजा वाडीच्या पाटलांना महाराजांनी एक सणसणीत पत्र लिहिले होते. पाटलाने मागचा-पुढचा विचार न करता स्वतंत्रपणे निर्णय घेणे महाराजांना पसंत पडले नाही. ‘साहेब माणसाचे माणूस ओळखतो,’ असा इशारा त्यांनी पाटलांना दिला व सांगितल्याप्रमाणेच काम करण्याचा आदेश दिला.

व्यवस्थापनशास्त्राचा विचार करता नेत्याने इतक्या तपशिलात जाणे योग्य नाही. ‘कनिष्टांवर काम सोपवून द्या, त्यात लुडबूड करू नका,’ असे आजचे व्यवस्थापनशास्त्र शिकवते. मेहेंदळे याबाबत दुसरा विचार मांडतात. संस्था उभी राहिली की असे करणे योग्य ठरत असेल; पण पायाभरणीचे काम करणारे सर्वच नेते तपशिलाबाबत फार दक्ष असतात. आपल्या कार्याची वीट न् वीट ते स्वत रचत असतात. त्यामुळे ही लुडबूड ठरत नाही. उलट, उत्तम मार्गदर्शन होते. महाराजांसारख्यांना हे शक्य होते याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी अफाट कार्यशक्ती महाराजांजवळ भरपूर होती. अशी कार्यशक्ती हीसुद्धा थोर नेतृत्वाची खूण असते.

जवळचे आणि लांबचे उद्दिष्ट
स्वराज्यप्राप्तीसारखे दूरचे उद्दिष्ट मनात घट्ट धरून ठेवायचे आणि त्याचवेळी जवळच्या उद्दिष्टांवरील नजरही हलू द्यायची नाही, हे महाराजांना सहज साधत असे. लांबच्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून त्यांची आजची लढाई होत असे. याबाबतची फ्रेंच प्रवाशाने लिहिलेली आठवण मेहेंदळे सांगतात..

कारे नावाचा फ्रेंच प्रवासी मुंबईहून कोकण, हैदराबाद मार्गे दक्षिणेकडे गेला. तो राजापूरला पोहोचला तेव्हा महाराज हैदराबादला होते. राजापुरात त्याची गाठ अण्णाजी दत्तो या महाराजांच्या एका कारभाऱ्याशी पडली. महाराजांच्या या मोहिमेविषयी अण्णाजी दत्तो त्याला म्हणाले की, ‘कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावर चालून येणार याची महाराजांना खात्री आहे. त्याचा मुकाबला करताना हाताशी असावा म्हणून दक्षिणेतील मुलुख आम्ही काबीज करीत आहोत.’
महाराजांनी जिंजीपर्यंत मजल मारली आणि तो किल्ला हस्तगत केला. पुढे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी रामचंद्र अमात्य यांनी याच किल्ल्यात राजाराम महाराजांना नेऊन ठेवले. महाराजांनी काबीज केलेल्या या मुलखामुळेच औरंगजेबाला प्रत्युत्तर देणे पुढच्या काळात मराठय़ांना शक्य झाले.

मुकुंद कुळे , सौजन्य – मटा

प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेला ‘शिवाजी: हिज लाइफ अॅण्ड पिरयड’ हा हजार पानांचा ग्रंथराज डिसेंबर अखेर ‘परममित्र प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने इतिहास पुरुषांविषयीची समाजाची मानसिकता, इतिहासलेखनाची परंपरा, वादग्रस्त दादोजी कोंडदेवप्रकरण… अशा विविध मुद्यांवर मेहेंदळे यांच्याशी साधलेला संवाद.

———————————

मराठी-इंग्रजीत शिवचरित्र लिहिण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केलाय. कुणी ऐतिहासिक दस्तावेजांचा आधार घेऊन शिवचरित्र लिहिलं, कुणी शिवरायांच्या आयुष्यातील घटना घेऊन त्यावर आपल्या कल्पनांचं कलम करुन शिवचरित्र लिहिलं. तर काही शिवचरित्र पूर्णत्वालाच गेली नाहीत. अन तरीही या सर्वच शिवचरित्रांची वाचकांना कायमच उत्सुकता होती आणि आहे. कारण शिवाजी नावाच्या महापुरुषाचं कर्तृत्वच एवढं जबरदस्त आहे की, त्यांचं नाव घेताच अंगावर रोमांच उभे राहतात. शिवाजीराजांबद्दल कुणी काय लिहिलंय, हे वाचण्यासाठी तो अनावर होतो. परंतु कधीकधी हा भावनोदेकच शिवचरित्राच्या आस्वादाच्या आड येतो. शिवराय ही मराठी मनाची-मराठी मातीची अस्मिता असल्यामुळे, जर एखाद्या चरित्रात काही चुकीचा वा गैर निष्कर्ष काढला गेला असेल, तर मग माथी भडकतात. काही वेळा तडकतातही… पण तरीही शिवचरित्रं येतच राहतात आणि येतच राहणार. कारण अवतीभवती चार मुसलमान शाह्या असताना शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या अस्तित्वापर्यंत ते अकलंकितपणे चालवलं.

ज्येष्ठ इतिहास संशोधक-लेखक गजानन भास्कर मेहंेदळे यांचं ‘शिवाजी: हिज लाइफ अॅण्ड पिरयड’ हे पुस्तकही याच ऊमीर्तून लिहिलं गेलंय. मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ कल्पनेचा पिसारा नाहीय. यातल्या प्रत्येक विधानाला दस्तावेजाचा आधार आहे. शिवरायांवर मराठीत अनेक पुस्तकं लिहिली गेली असली, तरी इंग्रजीत त्यांच्यावर किंवा एकूणच मराठ्यांच्या इतिहासावर फार पुस्तकं नाहीत. सगळ्यात आधी ग्रॅण्ट डफने इंग्रजीत मराठ्यांचा इतिहास लिहिला, त्यानंतर प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी शिवकालावर लिहिलं. त्यानंतर शिवरायांवर अनेक छोटी-मोठी पुस्तकं इंग्रजीत लिहिली गेली. परंतु मोठा ग्रंथराज नव्हता. इतिहासकार गजानन मेहंेदळे यांच्याशी संवाद साधताना हा सारा संदर्भ पाठीशी होता…

शिवरायांवर बऱ्याच वर्षांनी इंग्रजीत एवढा मोठा ग्रंथ लिहिला जात आहे, काय आहे या पुस्तकाचं वेगळेपण?

‘ ग्रॅण्ट डफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास एकप्रकारे चुकीचा होता. त्याला मराठी येतच नव्हतं. त्याने इंग्रजी दस्तावेजाच्या मदतीने आणि साहजिकच ब्रिटिशांना सोयीचा असा मराठ्यांचा इतिहास लिहिला. जदुनाथ सरकारांनी केलेलं लेखन महत्त्वाचं आहे. परंतु त्यांनी शिवाजीराजांच्या संदर्भात केलेलं काही लेखन विपर्यास करणारं आहे. जदुनाथांना फासीर् येत असल्यामुळे त्यांनी मुख्यत: इंग्रजी आणि फासीर् साधनांचा आधार घेतला. मात्र त्यांना मोडी बिलकूल येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही साधनं अभ्यासलीच नाहीत. सेतुमाधवराव पगडी यांनीही इंग्रजीत शिवचरित्र लिहिलं आहे. परंतु ते छोटेखानी आहे. शिवकाल आणि शिवराय याविषयी जबाबदारीने भाष्य करणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता, ती उणीव माझ्या या पुस्तकाने भरुन निघेल, असं वाटतं. मूळात मला स्वत:ला इंग्रजी, फासीर्, मोडी या भाषा उत्तम अवगत असल्यामुळे या सर्व भाषांतील दस्तावेजांचा मला वापर करता आला. शिवाजीमहाराज आणि त्यांच्या काळाविषयी लिहिण्यासाठी ज्या-ज्या शिवकालीन अस्सल साधनांचा वापर करायला हवा, तो मी केलेला आहे. आजवरच्या लेखनातून जे मुद्दे फार उपस्थित झालेले नव्हते, ते मी या पुस्तकात घेतलेले आहेत. उदाहरणार्थ- शिवरायांनी मोगलांशी भांडण काढलं. पण आदिलशाही संपूर्णपणे नष्ट झालेली नसताना त्यांनी मोगलांना अंगावर का घेतलं? मी संरक्षणशास्त्राचा विद्याथीर् असल्यामुळे युद्धासबंंधीची आजवर दुर्लक्षित राहिलेली माहिती मी पुुस्तकात आणली आहे. एकावेळी दोन आघाड्यांवर लढू नये, हा युद्धतंत्राचा पहिला धडा. परंतु शिवाजीराजांनी हिकमतीने एकावेळी अनेकांशी युध्द मांडलं. त्यामागची त्यांची नीती काय होती, हे पुस्तकात आहे. हे केवळ शिवचरित्र नाही, तर शिवाजीमहाराज आणि त्यांचा काळ, त्या काळातील सामाजिक-धामिर्क गोष्टी यांविषयीचं ते भाष्य आहे.

शिवाजी महाराजांचं किंवा कुणाही ऐतिहासिक व्यक्तीचं एकचएक अंतिम वा अधिकृत चरित्र लिहिलं जाऊ शकतं?

शिवाजीमहाराजांचंच नाही, तर कुठल्याही ऐतिहासिक-पौराणिक महापुुरुषाचं अंतिम आणि अधिकृत चरित्र लिहिलं जाऊ शकत नाही. कारण इतिहासात अंतिम सत्य असत नाही. व्यक्ती होऊन गेली, हे सत्य असतं. पण तिच्यासंबंधीचे इतिहासकालीन पुरावे-कागदपत्रं सापडत राहतात आणि कालचं सत्य आज असत्य ठरतं, ठरू शकतं. तेव्हा जोपर्यंत नवीन पुरावा सापडत नाही तोपर्यंत आधीचं खरं, असंच इतिहासाच्या संदर्भात मानून वाटचाल करावी लागते. दुदैर्वाने आपल्याकडे तसं होत नाही. आणि एखाद्याला देवत्व दिलं की कोणीही त्याच्याविषयी तटस्थपणे चर्चा करायला, लिहायला, बोलायला मागत नाही. लगेच आपल्या भावना दुखावल्या जातात.

याचा अर्थ आपण भावनिकदृष्ट्या नाजुक, कमकुवत आहेत, असा घ्यायचा का?

मराठी माणूसच नाही, तर एकूणच भारतीय समाज अतिसंवेदनशील आहे. तो कुठल्याही गोष्टींनी दुखावू शकतो. ही भावव्याकुळता दिडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून आलेली आहे. पारतंत्र्यात माणसाला आपला भूतकाळ प्रत्यक्षात कसाही असला, तरी चांगलाच वाटतो. त्यात रमण्याचा तो प्रयत्न करतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी ५० वर्षंच झालेली असल्याने आपला समाज अजूनही पूर्वदिव्यात रमतोय. अजून किमान शंभरेक वर्षं तरी ही स्थिती कायम राहील. त्यानंतर पूर्वदिव्याकडेही तो तटस्थपणे पाहील. आज नपोलियनविषयी काहीही उलटसुलट लिहून आलं, तरी फ्रेंच माणूस टोकाची प्रतिक्रिया देत नाही. कारण त्यांच्यात तेवढा तटस्थपणा आलेला आहे. किंवा एकूणच जगभरात आपल्याला दिसून येईल की, तिथे कुठल्याही व्यक्तीच्या वा वास्तूविषयीच्या नव्या संशोधनाला नाही म्हटलं जात नाही. आपल्याकडे ज्ञानदेवांच्या समाधीबद्दल किंवा शिवाजीमहाराजांबद्दल काही संशोधन करायचं म्हटलंं, तरी लगेच भावना दुखवतात. कुठलीही व्यक्ती काळाच्या कितीही पुढे असली, तरी तिला काळाच्या म्हणून काही मर्यादा असतातच. या मर्यादांना तुम्ही त्यांच्या उणिवा मानणार का? मग एखाद्या व्यक्तीवषयी-वास्तूविषयी संशोधनातून काही नवी माहिती उघड होणार असेल, तर त्याला नाही का म्हणावं?

दादोजी कांेडदेव हेच शिवरायांचे गुरू होते, असंच आजवर शालेय इतिहासात शिकवलं गेलंय. परिणामी आज तेच समाजाच्या मनात घट्ट बसलंय. अशावेळी इतिहासकारांनी कोणती भूमिका घ्यायला हवी?

इतिहासकारांनी पुुराव्यांच्या आधारे सत्य काय ते समाजाला सांगितलं पाहिजे. शिवकालाविषयीचे जे अस्सल पुरावे आहेत, त्यात कुठेही दादोजी कांेडदेव हे शिवाजीमहाराजांचे गुरू होते, असं म्हटलेलं नाही. तसा उल्लेखही कुठे सापडत नाही. हे मी तीस वर्षांपूवीर्च लिहूून ठेवलेलं आहे. परंतु त्याचबरोबर माझं असंही म्हणणं आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयीची शिफारस करणारी शिवाजीमहाराजांची स्वत:ची चार पत्रं उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली होती, ती त्यांनी सुविहीतपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीवषयी आज एवढा गहजब का? त्यांचा पुतळा उखडून काढण्याचं कारण काय? शिवाजीराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे आजही शाबूत आहेत ना, मग दादोजींनाच नाकारण्याचं कारण काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजीमहाराजांचे दादोजीच नव्हे, तर कुणीच गुरू नव्हता. तसेही उल्लेख उपलब्ध कागदपत्रांत सापडत नाहीत.

आपला समाज गतकाळाविषयी अतिसंवेदनशील असण्यामागचं कारण काय?

भारतीय समाज अजून प्रगल्भ झालेला नाहीय. कुठल्याही प्रश्नाकडे तटस्थपणे पाहण्याची त्याची दृष्टी अजून तयार झालेली नाही. परिणामी त्याला एकतर काही कळत तरी नाही. किंवा अर्धवट माहीतीच्या बळावर उतावीळपणे प्रतिक्रिया देऊन तरी तो मोकळा होतो. यात नको त्या प्रश्नांचं राजकारण करणारी मंडळीही असतातच. ती स्वत: किती इतिहासाचं वाचन करतात? त्यांनी किती साधनं वाचलीत? त्यांना मोडी, फासीर् येतं का?

महाराष्ट्रात जशी इतिहासलेखनाची मोठी परंपरा आहे, तशी भारतात अन्यत्र आहे?

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच इतिहासलेखन आणि अभ्यासाला सुरुवात झाली. तशी भारतात इतरत्र फार कुठे झालेली दिसत नाही. कोलकाता-राजस्थान या ठिकाणी तसे प्रयत्न झाले. अनेक ठिकाणी तर तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच इतिहास लिहिलेला आढळतो. परंतु महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विविध संस्था आणि व्यक्तींनी इतिहाससंशोधनाचं आणि लेखनाचं कार्य मोठ्या प्रमाणावर केलं, तसं अन्यत्र क्वचितच आढळतं. महाराष्ट्रात न्या. महादेव गोविंद रानड्यांपासून कीतीर्कर, का.ना.साने, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वि.का. राजवाडे, पाररसनीस, गोव्यातील पिसुलेर्कर , बी.जी. परांजपे अशी अनेक नावं घेता येतील. आतापर्यंत हे काम अव्याहतपणे सुरू आहे. तसंच संस्थांचंही. पुण्यातल्या भारतीय इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या माध्यमातूनच आजवर मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक संशोधन आणि प्रकाशन झालेलं आहे. या संस्थेएवढं शिवकालीन साहित्य कुणीच प्रकाशित केलेलं नाही. या तिने प्रकाशित केलेल्या शिवकालीन कागदपत्रांचा आधार घेतल्याशिवाय शिवचरित्र व त्या काळासंबंधी काहीच भरीव लिहिता येणार नाही. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली इतिहासलेखनाची-संशोधनाची ही परंपरा आजही सुरू आहे. म्हणूनच मी म्हणतो की, ही परंपरा खंडित होईल असं वागू नका. त्यात भर घाला.

अनिल अवचट, सौजन्य – अनुभव दिवाळी २०१०

छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं दैवत. चतुर, मुत्सद्दी, दूरदर्शी, पराक्रमी, आघाडीवर राहून लढणारा जाणता राजा! दुसर्‍या धर्माचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो हे दाखवणारा लोकहितदक्ष राजा! आज त्यांचे अभिमानी पुष्कळ आहेत, पण लोक खर्‍या शिवाजी महाराजांना कधी ओळखतील? एक ललित चिंतन.

————————————————————————————

मध्यंतरी दिल्लीला एका अभ्यासकाला भेटण्याचा योग आला. त्याच्या संशोधनाचा विषय वेगळाच होता. पण त्याने जाता जाता एक छोटा अभ्यास म्हणून शिवाजीवरही निबंध लिहिला होता. त्यात अलेक्झांडर आणि नेपोलियनशी त्याने तुलना केली होती. शिवाजीच्या बर्‍याच जमेच्या बाजू आणि काही मर्यादा दाखवल्या होत्या. त्याने मांडलेल्या मतावर त्याने मला मत विचारले. मी विचारात पडलो. म्हणालो, ‘‘मला नाही बुवा यात काही सांगता येत. कारण शिवाजी हा इतका माझा आहे, की त्याविषयी मला क्रिटिकली, टीकाकाराच्या दृष्टीतून काही विचारच करता येणार नाही.’’ माझ्या या म्हणण्याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. पण खरंच आहे ना ते. माझी सगळी लहानपणाची घडण शिवाजीबरोबरच नाही का झाली? जेव्हा वाचता येऊ लागलं तेव्हा ब. मो. पुरंदर्‍यांची वेगवेगळ्या गडांची नावं असलेली पुस्तकं अधाशासारखी रंगून रंगून वाचली होती. त्याच्या धैर्याचा, शौर्याचा, सगळ्याचा आपल्यावर केवढा खोलवर परिणाम झाला, ते विसरणं शक्य आहे का?

अलीकडे त्याचे अभिमानी लोक जागोजाग दिसतात. त्यातला मी नाही. ते ‘शिवाजी महाराज’ म्हणावे असा आग्रह धरतात. काही तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणतात. मला शिवाजी म्हणायला आवडतं, आणि तेही ‘तो शिवाजी’ असं. कृष्णाला आपण श्रीकृष्णमहाराज म्हणतो का? संतांनी विठ्ठलाला विठ्ठलेश्वर नाही केलं. ते तर त्याला ‘विठ्ठला’, ‘विठोबा’ अशी एकेरी हाक मारतात. कोणी संत, ‘विठूराया’ म्हणते, तर कोणी आपुलकीने ‘विठ्या’ही. संत ज्ञानेश्वर महाराज हे कानाला बरे वाटते, की आपल्या ग्यानबा-तुकाराममधला ग्यानबा किंवा ज्ञानोबामाउली-तुकाराममधला ज्ञानोबा? अलीकडे जन्मलेल्या, म्हणजे डॉ. आंबेडकर, म. फुले, गांधीजी यांना ते तसेच प्रिय असूनही आपण अशी जवळीक दाखवत नाही. असं का असं विचाराल, तर माहीत नाही.
नावावरून आठवलं. व्ही. टी. स्टेशनचं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ केलं गेलं. मला याचं तेव्हा आश्‍चर्य वाटलं होतं. त्यापेक्षा साधं-सोपं ‘शिवाजी’ टर्मिनस नाव दिलं असतं तर? लोकांच्या तोंडी शिवाजीचं नाव आलं असतं. त्यावरून कदाचित एखादवेळेस कुणाला त्याच्या कर्तृत्वाची आठवणही आली असती. आता ते झालंय केवळ ‘सी. एस.टी.’! तेच विमानतळाविषयीही झालंय. नावं देताना अशी विशेषणं लावली की मूळ उद्देश बाजूला पडतो, हे नावं देणार्‍यांच्या कसं लक्षात आलं नाही?

लहानपणी शिवाजी माझ्या स्वप्नातही यायचा. आमच्याकडे दीनानाथ दलालांनी काढलेलं शिवाजीचं चित्र ङ्ग्रेम करून लावलेलं होतं. ते धारदार नाक, त्या डौलदार मिशा, ती टोकदार दाढी…पण मला एक उणीव नेहमीच जाणवली ती म्हणजे त्याचं समोरून काढलेलं एकही चित्र मी पाहिलं नव्हतं. त्या काळात मी पाटीवर सारखे शिवाजीचेच चित्र काढायचो. तसेच नाक, मिशी, दाढी…कपाळावर शिवाचे आडवे तीन पदरी गंध…डोक्यावर मागे वळ्यावळ्यांनी बनलेला शिरेटोप काढायचो. तसाच मागे जाणारा तुरा, खाली लोंबणारा मोत्यांचा झुपका…मी मोती न् मोती मन लावून काढायचो. आमच्या घरासमोर एक देऊळ होते. ते माझे विश्वच जसे. तिथल्या दारांवर खडूने शिवाजी काढायचो. तुळयांवर खडूने अशी ऐतिहासिक काव्यांची वाक्ये लिहून ठेवायचो. एक आठवतंय, ‘मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.’ आणि हो, मी पोवाडेही म्हणायचो. डोक्याला एखादे फडके फेट्यासारखे बांधून. सगळंच इतकं शिवाजीमय, की एक थोडासा गोलाकार खड्डा असलेल्या दगडाला आम्ही शिवाजीच्या घोड्याचा उठलेला पाय म्हणूनच दाखवायचो.
अलीकडे एका राजकीय पोस्टरवर शिवाजीचे डोळे वटारलेले चित्र पाहिले. मनात म्हणालो, ‘नाही, नाही. असा तो उग्रट नव्हता रे भाऊ. तो शांत, संयमी, माणुसकीचा जिव्हाळा असलेला माणूस होता. प्रसंगी तो रागावतही असेल, पण ते प्रसंगीच. लोकांना त्याच्या जवळ जावेसे वाटायचे. मनातले बोलावेसे वाटायचे. मनात आलेला नवा डावपेच सांगावा, असे वाटून तो निर्भयपणे शिवबादादाला सांगता यायचा. निदान माझा शिवाजी तरी तसा होता. अलीकडे काहीजणांनी त्याला मुस्लिमविरोधी भावनांचंही प्रतीक केलंय. शिवाजीदादा, सांग रे या लोकांना, की तू नव्हतास तसा. किती देवळांबरोबर मशिदींना तू अनुदानं दिलीस. किती मुस्लिम सैनिक, सरदार तुझ्या सैन्यात होते. आणि ते केवढे तुझे जिवाभावाचे होते. अंगरक्षक, हेर, किती किती सांगावं….

तर ते जाऊ द्या. आपला शिवाजी आपण सांभाळू यात. पुरंदर्‍यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा मोठा ग्रंथ आला. नंतर रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ आलं. त्यातलं उजवं-डावं कसं सांगणार? कुठलंही पान उघडावं आणि वाचत बसावं आणि शिवाजीचं बोट धरून लहान होऊन जावं. तसा शिवाजी लहानशा जहागिरीचा जहागीरदार. वडील मोठे सरदार असले, तरी ते कुठे तरी लांब, धावपळीत. तरी या पोरानं स्वराज्याचा डाव मांडला. सवंगडी जमवले, सगळ्या पोरांनी स्वराज्याची शपथ काय घेतली, सगळंच अजब. (ज्ञानेश्वरांच्या बाबतीत हेच आश्‍चर्य वाटतं. एवढ्या वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरास हे कुठून आलं शहाणपण? तसंच शिवाजीविषयीही वाटतं.) हे राज्य आपलं नाही, हे त्याला कसं कळलं असेल? त्याला त्याची जहागीर हेच राज्य का नाही वाटलं? हे त्याचं स्वप्न उपजतच होतं की काय? मग लक्ष जातं जिजाऊ, जिजाबाई, जिजामाता यांच्याकडे. काय म्हणावं तिला? शिवबाची आई, ती आपली आज्जीच नाही का? तर त्या आज्जीनं कसं घडवलं असेल त्याला? शहाजीराजानं ही फार जोखमीची जबाबदारी सोपवली. आपल्या आज्जीने किती शांतपणे, मागे राहून निभावली! आजीचा चेहराच येत नाही डोळ्यांसमोर. सीरियलमध्ये दाखवतात तशी सुंदर, तरुण…हे मन स्वीकारतच नाही. ती असणार मध्यमवयातली. तिचा चेहरा सुंदर नसणार, पण त्यावर शहाणपणाचे तेज असणार. त्यात कणखरपणा असेल. पण सदासर्वकाळ कणखरपणा कसा असेल? शिवाजी स्वारीवर गेल्यावर त्याची काळजी करत बसणार्‍या आपल्या आज्जीचा चेहरा कसा असेल? आणि आग्र्‍याला लाडक्या नातवासह शिवाजी गेला तेव्हा हृदयाचं पाणी पाणी झालं असेल…तेव्हा तर वार्धक्याने चेहरा सुरकुतलेला असणार. राज्याभिषेकासाठी आजीनं जसा जीव धरून ठेवला होता! तो झाला आणि संपलंही ते कृतार्थ जीवन, केवळ पंधरा दिवसांत. काय या मायलेकरांचं नातं असेल नाही? घरचा कारभार बघणं, सुनांना आपलंसं करणं, मुलाच्या अपरोक्ष राज्यकारभार सांभाळणं, बापाचा सहवास मिळत नाही म्हणून रुसलेल्या नातवाला माया लावणं…बाप रे किती गुंतागुंतीचं जीवन होतं आपल्या या आज्जीचं!

शिवाजीचा जन्म झाला तो शिवनेरी गड आमच्या ओतूरजवळच. अनेकदा तिथं सहली गेल्या होत्या. सिंहगडही पुण्याच्या परिसरातला. त्यामुळे तिथंही बर्‍याचदा जाणं-येणं. पण इतरांना अशा ठिकाणी गेल्यावर जशा वेगळ्याच संवेदना होतात तशा मला झाल्या नाहीत. काही पडके, दोन-चार दरवाजे… हे पाहून काय वाटणार? मला या किल्ल्यांची ही दुर्दशा करणार्‍या ब्रिटिशांचा संताप येतो. आश्‍चर्यही वाटतं. इतकं जुनं जपणारे लोक ते. त्यांना म्हणे परत या गडांच्या आधाराने बंड होईल अशी भीती होती, म्हणून त्यांनी ते उद्ध्वस्त केले! अरे, ब्रिटिशांनो, ङ्गार तर तटबंदी काही ठिकाणी पाडायची होतीत. पण आतल्या सगळ्या इमारती, घोड्यांच्या पागा, तलाव, रस्ते, बाजार…यांनी काय केलं होतं तुमचं वाकडं? मी कधी स्वप्न पाहतो, हे सगळे किल्ले, त्यातल्या इमारती अगदी जशाच्या तशा आहेत. त्यांची छपरे तशीच आहेत त्या भिंतींवरची चित्रेही तशीच. अगदी तक्के, गालिचे, झुंबरंही तशीच. किल्ले पूर्वी जसे होते, तसे राहिले असते तर तिथे शाळेच्या सहली आल्या असत्या. शिवबादादा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला असता. तर मला कदाचित तिथं शिवबादादा भेटला असता, आज्जी भेटली असती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो असतो आणि म्हणालो असतो, ‘आज्जी, मला आपल्या शिवबादादाच्या लहानपणच्या गोष्टी सांग ना!’

सगळ्या पराक्रमातली अफजलखानाच्या वधाची हकीगत मला ङ्गार आवडते. किती वेळा वाचली असेल, पण तरी कंटाळा म्हणून येत नाही. ते ‘थ्रिल’ आजही सोडून गेलं नाही. तो खान विजापूरहून निघाला- मंदिरं फोडत, वगैरे. तो डिवचत होता शिवबाला. पण संयम बघा याचा. त्याला तो प्रतिकार करायला, वीरश्री गाजवायला बाहेर पडला नाही. नको ते साहस त्याने केलं नाही. इतका हाहाकार कानावर येऊनही शिवाजी शांत कसा राहिला? आणि ते घाबरल्याचे नाटक? खूप वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेत आचार्य अत्र्यांचे भाषण होते. अध्यक्षस्थानी दत्तो वामन पोतदार. अत्र्यांनी त्या दिवशी अफजलखानाच्या वधाचे जसे आख्यानच लावले. खानाला कसा खेचून आणला वगैरे…शेवटी त्यांनी सांगितले, ‘शिवाजीने वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला, हे खरे नाही. त्याने कट्यार लपवून नेली होती. त्या कट्यारीने पोट फाडले’…वगैरे. दत्तो वामन अध्यक्षीय भाषणात मिश्किलपणे म्हणाले, ‘‘त्याने वाघनखं चालवली की कट्यार हे मला सांगता येणार नाही. कारण ते पाहायला मी तिथं नव्हतो!’’ हास्यकल्लोळ थांबल्यावर म्हणाले, ‘‘खानाला मूर्ख समजू नका. त्याला तो प्रदेश चांगला माहीत होता. किती तरी वर्षं तो वाई प्रांताचा सुभेदार होता!’’ (आणि नंतर सदाशिव आठवल्यांनी सांगितलं, की आपण कदाचित परत येणार नाही म्हणून खानानं आपल्या सर्व बेगमांचा वध केला. त्यांच्या कबरी आजही तिथं आहेत.)

या वाक्याने माझे विश्वच जसे हलले. मग मी वाचलेली ती पुस्तके, त्या कथा? थोडं अधिक समजून घ्यायची जबाबदारी आली आता. मग खान शिवबाच्या हातात कसा सापडला? हे माझं कुतूहल शमवलं पाचगणीच्या दीक्षित सरांनी. डॉ. नलिनी गित्यांबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ब्रिटिशकाळापासून आजवर अनेकांना तो परिसर हिंडवून आणलाय. ते म्हणाले, ‘‘शिवाजीचे डावपेच अभ्यासावर आधारलेले होते. खान येणार, कळल्यापासूनच त्याचा अभ्यास शिवाजीने सुरू केला. मागे कुठे खानाने असाच वेढा घातला होता. आतल्या राजाला त्याने वाटाघाटीसाठी बोलावले. त्याला अभय दिले, शब्द दिला. म्हणून तो राजा गडाबाहेर भेटायला आला. आणि त्याला खानाने मारून टाकले. असे आणखी एका ठिकाणीही त्याने केले होते. हे कळल्यावर शिवाजीने डावपेच आखले. ज्या ‘मोडस ऑपरेंडी’ची खानाला सवय होती, जी नेहमीची, हात बसलेली युक्ती होती, ती टाळण्याऐवजी शिवाजीने ती मुद्दाम वापरली. मनुष्यस्वभावाचा कसा अचूक अंदाज होता त्याला! वा:! वा:! दादा, यू आर ग्रेट!’’

लहानपणी एक प्रसंग वाचायला ङ्गार आवडायचे. रायबागन आणि कातरलबखानाला कोकणात जाणार्‍या खिंडीत गाठल्याचा प्रसंग. त्या रायबागनचा तोराच उतरवला शिवाजीने. शाहिस्तेखानाच्या छावणीत, पुणे शहरात काही निवडक स्वारांसह शिवाजीने जाणे, हे केवढे धाडस! कोणता राजा असे करू शकेल हो? पण शाहिस्तेखानाला असा काही मानसिक झटका बसला की पूछो मत. औरंगजेबाचा तो मामा. म्हणजे धक्का थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असणार. शाहिस्तेखान चंबूगबाळं उचलून चालताच झाला दिल्लीला.

तो राजा असला तरी इतर राजांसारखा नव्हता. सैन्याला हुकूम देऊन स्वत: मागे सुरक्षित राहणारे राजे अनेक होते. पण हा आघाडीवर राहणारा राजा होता. सर्वांत धोका पहिल्या ङ्गळीला. तिथेच हा, अगदी पुढे. त्याच्या या गुणांवरच त्याचे सहकारी, सैनिक फिदा असले पाहिजेत. स्वत:पेक्षा कसल्या तरी मोठ्या उद्देशासाठी हे चाललंय, त्या ‘कसल्या तरी’ उद्देशासाठी स्वत:चा जीवसुद्धा द्यावा? हा उद्देश फक्त शिवाजीची जहागीर वाढवायचा उद्योग नाहीये, हे सर्वांना शिवाजीच्या या ‘धडक’ कृतींमधून कळत असावं. अशी जिवाला जीव देणारी माणसं किती मिळवली असतील त्यानं? इतिहास फक्त काही निवडकांची आठवण ठेवतो. पण इथे तेही इतके भरभरून आहेत की बस्स! ओतूरच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटकातला प्रवेश केला होता, (किंवा त्यावरची एकांकिका असेल). त्यात कोंढाणा घ्यायचा त्याच वेळी तानाजीच्या पुतण्याचं रायबाचं लग्न येत होतं. आमच्या वर्गातला पोरगा तानाजी झाला होता. त्याचं वाक्य आठवतंय, ‘‘आधी लगीन कोंढाण्याचं, मंग रायबाचं!’ तो हे वाक्य इतकं जोरात ठासून म्हणायचा की अंगावर शहारे यायचे. आणि कोंढाणा घेतलाच त्यानं. पण रायबाच्या लग्नाला ‘काही अपरिहार्य’ कारणाने हजर राहू शकला नाही. काय जिव्हारी लागलं असेल शिवाजीला! सुख निर्भेळ मिळूच नये का? नेत्रदीपक यशात काही जिवाभावाचे सहकारी, सवंगडी गमावणे, हा काय योग आहे हो? कसं पचवत असेल तो असं दु:ख?
काय वातावरण निर्माण केलं असेल शिवबानं! सर्वसामान्य माणसं जिवाला जपतात आणि शूर प्राणांची आहुती देतात, असं नेहमीच ऐकलेलं. पण जेव्हा सर्वसामान्य माणसंच उठतात अशी आहुती द्यायला तेव्हा? काय म्हणायचं त्याला? बाजीप्रभूचं बलिदान तर कोरलं गेलंय इतिहासात, आपल्या मनात. मला आणखी कुणाची आठवण होते. शत्रूला फसवून बुचकळ्यात टाकण्यासाठी शिवाजीसारख्या दिसणार्‍या काही शिपायांना पालखीत बसवून त्या वेढ्यात पाठवल्या गेल्या. ते पकडले गेले. पुढे काय होणार ते या शिपायांना ठाऊकच होतं. तरीही ते शिवाजीसारखे सजून पालखीत बसले? का बरं? तसंच ‘आग्र्‍याहून सुटका’च्या बाबत. शिवाजीच्या जागी कोण तो पडून राहिला? कोणी आते-मामे भाऊ? छे हो. तो आपल्या स्वराज्यातला कोणी साधा शिलेदार. काय अभिनय वठवला असेल त्यानं! रंगभूमीवर कुठल्या नटाने असा मृत्यूच्या छायेत अभिनय केला असेल?

मला त्या आपल्या संभाजीबाळाचंही नवल वाटतं. आग्र्‍यात ते पोर घाबरलं नाही. पळून जाताना हूं की चूं केलं नाही. उरलेला प्रवास वडलांविना, अनोळखी भागात, रानावनातून कसा केला असेल त्यानं? संभाजीला समजून घेण्यात आम्ही सगळे कमीच पडलो. शिवबाने आपल्या राज्याभिषेकाबरोबर त्याचा युवराज्याभिषेक करूनही त्या सगळ्या अमात्य मंडळींनी गृहकलह सुरू करावा? परवा तर वाचलं, की सोयराबाईला त्यानं भिंतीत चिणून मारलं, याला काही पुरावा नाही. त्यानंतर दीड वर्षाने विष खाऊन किंवा विषप्रयोग होऊन ती गेली. ज्या अमात्यांना देहान्त सजा दिली त्यांच्याच मुलांना त्याने परत मंत्रिमंडळात घेतले. याहून त्याच्या शहाणपणाचा, समतोल बुद्धीचा काय पुरावा पाहिजे? घरावर रुसून (त्यात कार्यमग्न शिवाजी किंवा सावत्र आई यांचा सहभाग असणे शक्य आहे.) दिलेरखानाला मिळाला, त्याच्यावरचा मोठा डाग. पण पुढे त्याने खानाच्या ङ्गौजेचं गाव लुटणं पाहिलं, एका स्त्रीस खानाने मुसलमान करून जनानखान्यात ठेवली, ते पाहिल्यावर तो स्वत: होऊन परत घरी निघून आला. चूक झाली. चुका कोण करत नाही? पण चूक सुधारली ना त्यानं? वडलांनंतर जेमतेम सात-आठ वर्षंच मिळाली, पण तो त्यात सतत लढायाच करत राहिला. पोर्तुगीज, मोगल या सगळ्या आघाड्यांवर. खाली थेट कर्नाटकात जिंजीपर्यंत. तर तिकडे मराठवाड्यात. अशा नुसत्या लढायांत वेळ गेला. तो व्यसनाधीन आणि लंपट असता तर हे जमलं असतं? तो संस्कृतमधला इतका जाणकार, की त्याने संस्कृतात काव्यग्रंथ लिहिलाय. उन्मत्त वतनदारांना जरब बसवणारी त्याची आज्ञापत्रं पाहिली की थेट शिवबादादाचीच आठवण यावी. आणि मरण? मरणातच तो असे जगला की अंगावर शहारेच येतात. ते नुसते युद्धातले मरण नव्हे. ते विटंबना करून दिलेले मरण…काय त्याची ती धिंड…छे छे वाचवत नाही तो भाग. त्याच्या गुणांमध्ये, व्यक्तिमत्त्वात, निष्ठेमध्ये जरा कमतरता असती, तर तो अशा वेळी पिचला असता आणि शरण गेला असता औरंगजेबाला. पण त्या मरणात तो असे जगला की सर्व मराठी शिपायांच्या डोक्यावर जसा स्वार झाला. आणि तिथून सुरू झाले एक विलक्षण, निर्नायकी युद्ध. या पर्वाला सलाम, नमस्कार, हॅट्‌स ऑफ…कितीही शब्द वापरा, पण नाहीच कशाची सर त्याला. ते युद्ध या निनावी शिपायांचं. प्रोत्साहन द्यायला, डावपेच आखायला, पाठ थोपटायला तिथं शिवाजी-संभाजी नव्हते. राजाराम दूरस्थ. कोणी श्रेयासाठी हे करत नव्हते की इनाम, वतनासाठी. शांत, अविरत, निश्‍चयी लढाई. आपण असू तेच रणांगण. आपण एकटे असलो तरी तीच ङ्गौज. शत्रूचं बळ किती का असेना! अखेर औरंगजेबाला दिल्ली सोडून इकडे यावे लागले. तरी त्याला हे थैमान आवरेना. शेवटी इथंच त्याचा मृत्यू झाला. एक संताजी, धनाजी सोडले तर त्या विलक्षण वीरांची नावंही माहीत नाहीत आपल्याला. या अनामिक वीरांचं एखादं चांगलं स्मारक का असू नये? संभाजीच्या मृत्यूनंतरच्या या लढ्याची चांगली आठवण का असू नये? व्हिएतनाम युद्धात मरण पावलेल्यांचं वॉशिंग्टनमध्ये एक स्मारक आहे. तिथे कुठलाही पुतळा नाही. तिथं आहे लांबलचक ग्रॅनाइटने मढवलेली एक भिंत. त्यावर कोरली आहेत त्या सैनिकांची नावं. त्यांचे नातेवाईक, मित्र येऊन त्यापुढे ङ्गुले ठेवतात. हृदय गलबललंच आपलं, भाऊ. पण आपल्याकडे स्मारक म्हटलं, की ते एकसुरी पुतळे आठवतात, तलवार उपसलेले. मला एक प्रश्‍न नेहमी पडतो, की शिवाजी आम्हाला फक्त एवढाच का दिसतो? खरं पाहता इतक्या बहुपदरी माणसाची किती हृद्यतेने आठवण ठेवता येईल! पण आपणा सगळ्यांना आपला हा शिवाजी किती बहुपदरी होता, तो किती वेगवेगळ्या प्रकारे मोठा होता, हे का नाही समजू शकत? आमच्याच माणसाचे मोठेपण आम्हीच समजू नये?

तो नुसता गनिमी काव्याने लढू शकत होता असे नाही. साल्हेरच्या लढाईचा वृत्तान्त (डॉ. श्रीनिवास सामंत यांच्या पुस्तकात) वाचला. तर बाप रे! ती सपाटीवरची, समोरासमोरची लढाई! शिवाजीने ङ्गौजेचे वेगवेगळे भाग करून अशी काय जिंकलीय की बस्स! कोणी म्हणू शकणार नाही, तो ङ्गक्त सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत लढू शकत होता, असे. जो लढणारा आहे, आपण कशासाठी लढतोय याचे ज्याला अचूक भान आहे, शत्रूच्या कमतरतांचा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि स्वबळाची वास्तव कल्पना आहे…असा तो शिवाजी.

थंड डोक्याने वेगळ्याच कल्पना शोधणारा शिवाजी. सतत ‘प्रो-ऍक्टिव्ह’. शत्रूंच्या डावपेचांमागे तो फरफटत गेला नाही. शत्रूला कल्पना यायच्या आत त्याच्यावर झडप घालून शत्रूच्या मर्मावर हल्ला करायचा. असा तो शिवाजी!

शिवाजीच्या बाजू तरी किती! प्रत्येक बाबतीत त्यानं कसं लक्ष घातलं? इंग्रज, पोर्तुगिजांचं आरमारी बळ पाहून त्याने स्वत:चं आरमार बनवायचं ठरवलं. हीच एक क्रांतिकारक कल्पना. त्या वेळच्या समाजात समुद्रपर्यटन निषिद्ध होतं. बंदी होती धर्माची. ती शिवबाने सहज ओलांडली. तेही त्या जमान्यात. पण त्याने इंग्रज पोर्तुगिजांच्या गलबतांची नक्कल नाही केली. त्यांची जहाजे मोठी, खाली ‘व्ही’च्या आकाराची, निमुळती होत गेलेली. लांबच्या प्रवासाला ती उपयुक्त. पण शिवबादादाने इथला विचार केला. त्याची गरज काय हे ओळखून सपाट तळाच्या छोट्या होड्या बांधल्या. त्या छोट्या होड्या मोठ्या गलबतांवर हल्ले करून नाहीशा होत. एका पोर्तुगीज पत्रात असे म्हटले आहे, की ‘‘हा सीवा कुठून येतो आणि हल्ले करून कुठे गडप होतो ते कळतही नाही.’ शिवाजीने जमिनीवरच्या लढाईत जो गनिमी कावा वापरला, तोच आरमारी युद्धातही. म्हणून गुरू, किती शिकायचंय आपल्याला शिवबादादाकडून! आता आता आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत नुसत्या कॉप्या करतो त्या अमेरिकेच्या. आपलं असं काय आहे की जे आपल्याला अनुरूप आहे? एवढंच काय, त्यांच्या माणसं न लागणार्‍या कारखानदारीचीही आपण नक्कल करतो, इथं लाखो माणसं बेकार बसली असली तरी. काय म्हणावे या अनुकरणाला?

तर नुसत्या अनुरूप बोटी बांधल्या नाहीत, तर समुद्री किल्ले बांधले, सुधारले. उदय संखे यांच्या लेखात शिवबाराजाला दुर्ग-बांधणीची किती नवी दृष्टी होती, हे कळतं. विजयदुर्गच्या आसपास शत्रूच्या बोटी येत आणि फुटत, याचे कारण त्यांना कळले नव्हते. नंतर कळले. त्यांच्या कागदपत्रांत आपल्या कमांडर गुपचूप यांना एक कागद सापडला. शत्रूच्या बोटी विजयदुर्गच्या आसपास फुटत कारण पाण्यातच शिवबाने भिंत बांधली होती. ती वरून कुणाला दिसत नसे, पण गलबते त्यावर फुटत असत. ती भिंत बंदरापासून १५० ते २०० मीटर अंतरावर होती. आणि किती लांब? तर साडेचार किलोमीटर! संरक्षणाची किती साधी पण किती परिणामकारक युक्ती! किल्ल्यांभोवतीचे समुद्रातले खडक तो तसेच ठेवायचा. त्या ‘व्ही’ आकाराच्या बोटी त्या उथळ पाण्यात, खडकाळ भागात येऊ शकत नसत, पण सपाट तळाच्या छोट्या बोटी सरासरा जायच्या. त्यानं या बांधकामात शिसं आणि चुना वापरला. चुना करण्यात शिवबाचे लोक इतके पुढे गेलेले, की पाण्याने किल्ल्याच्या तटांचे दगड झिजले, पण चुना कायम. बोला!

खांदेरीची लढाई हे तर अप्रतिमच नाट्य. हे बेट मुंबईच्या तोंडावर असल्याने त्याने इंग्रजांना चाप बसणार होता. ते ताब्यात घेऊन शिवबाच्या लोकांनी बांधकाम सुरू केले. ते इंग्रजांनी उधळून लावले. पण आपला शिवबादादा किती संयमी! सहा वर्षे थांबला. ‘ठंडा करके खाओ’ ही म्हण त्याच्यात मुरलेली होती. परत काम सुरू. मधल्या काळात बेटावर तोङ्गा चढवलेल्या. इंग्रजांनी नाकेबंदी केली. ते तोङ्गांच्या मार्‍यामुळे जवळ जाऊ शकत नव्हते. तरी बिघडलेल्या हवेचा, वादळाचा ङ्गायदा घेऊन वेढा तोडून मराठे आत जात आणि रसद पुरवत. इंग्रज काहीच करू शकत नसत. मग शिवबाने आवई उठवली (त्याही तंत्रात तो वाकबगार), की ‘पनवेलहून मराठा सैन्य मुंबईवर चाल करून येतंय.’ मग घाबरून इंग्रजांनी मराठ्यांकडे तहाची बोलणी केली, आणि त्यात शिवबाने खांदेरी बेट मिळवलेच.

या लढाईत किती विशेष गोष्टी आहेत बघा. खांदेरी बेटाची अचूक निवड, संयम, छोट्या होड्यांची करामत. त्यातला गनिमी कावा. आवई उठवून शत्रूला संभ्रमात टाकणे. आणि तहात हवे ते मिळवणे. एरवी भारतीय परंपरेत युद्धात जिंकतात पण तहात हरतात. इथे आपला शिवबादादा जिंकलेला नसूनही तहात त्याने मिळवले. क्या बात है दादा!

इतर ठिकाणी शिवबाचे पुतळे उभारण्यापेक्षा, अशा एका खांदेरीवर त्याचं योग्य स्मारक का होऊ नये? तिथं त्याच्या होड्या, पडाव, गलबतांचं प्रदर्शन का भरवू नये? खांदेरीच्या लढाईचं आत्ता शूटींग करून संध्याकाळी त्याचा दृकश्राव्य कार्यक्रम का करू नये?

मी मच्छीमार समाजाची पाहणी करताना अलिबागला गेलो होतो आणि यांत्रिक होडीत बसून जवळच्या एका बेटाला फेरी मारून आलो होतो. आता नकाशात पाहतो तेच ते बेट तर नसेल ना? माहीत असतं तर उतरून मोकळेपणाने श्वास भरून घेतला असता. तेव्हा हे सगळं वाचलेलं असतं तर.

लहानपणी शिवबावरची गोष्टीरूप पुस्तके वाचली होती. नंतर प्रत्यक्ष इतिहासावरची वाचू लागलो. त्यातून माझा शिवबादादा मलाच मस्त उलगडत गेला. त्याची काही आज्ञापत्रे वाचली. ती तर ‘अहाहा’च आहेत. त्यात त्याचं शहाणपण आहे, बारीकसारीक पाहण्याची बुद्धी आहे. एका आज्ञापत्रात तो म्हणतो, ‘गडावर तुम्ही शेकोट्या पेटवता, त्या नीट विझवा. एखाद्या ठिणगीने हा हा कार होईल. तेलाच्या पणत्या विझवून मग झोपा. उंदीर तेलाची जळती वात घेऊन जातील, आणि ती जळती वात गवताच्या गंजीपाशी नेऊन टाकली की गडावरच्या गवताच्या गंजी जळून खाक होतील…’ बघा हा बारकावा. छोट्या गोष्टीतून मोठा उत्पात होऊ शकतो. एक बेजबाबदार दुर्लक्ष सर्वांच्या हिताला केवढे मारक ठरू शकते!

अनवधानाने असं गवत जळालं तर करणार काय? अन्नसाठा? सगळ्याच गोष्टी खालून वर आणायच्या. पण शिवाजीच तो, ज्यानं गडांचा इतका नेमका उपयोग करून घेतला हे त्याचं मुलखावेगळं ‘लॅटरल थिंकिंग!’

आणखी एक आपल्या शिवाजीदादाचं आज्ञापत्र मला ङ्गार आवडतं. आंबे, फणस अशी लाकडं आरमारासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी आवश्यक. ‘परंतु त्यास हात लावू न द्यावा,’ अशी शिवाजीची आज्ञा होती. का बुवा? आताचं सरकार तर आर्थिक विकासासाठी हव्या त्या जमिनी, गावं ताब्यात घेतं, आणि आपला दादा, ‘रयतेच्या मालकीच्या अगदी उपयुक्त असलेल्या झाडांना’ही हात लावायला मनाई करतो? रस्ते मोठे करताना हजारो झाडांची कत्तल करणारं आताचं सरकार कुठं नि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं सैनिकांना बजावणारा शिवबादादा कुठं! तो नुसती आज्ञा देत नाही, तर त्याचं कारणही सांगतो ‘काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात, असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडलीयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?’ प्रजेला होणार्‍या अशा दु:खांची काळजी करणारा तो राजा होता. त्या काळचे कुठले आदिलशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी काळजी करत असतील? पुढे तो त्याचेही कारण देतो : ‘येकास दु:ख देऊन जे कार्य करील म्हणेल ते (कार्य) करणारासहित स्वल्पकाळे बुडोन नाहीसे होते. धन्याचे पदरी प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते.’ हे चिंतन त्या काळामधले. बरे, मग स्वराज्याची आरमाराची गरज भागवावी कशी, तर शिवाजीचे म्हणणे असे की, ‘एखादे झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तर धन्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याचा संतोष करून तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’ बोला आता. शिवबादादा आत्ता असता तर त्याने धरणग्रस्तांचे हाल होऊच दिले नसते. परकीय कंपन्यांना त्याच्या काळातही कसे दूर आणि धाकात ठेवले असते! आज तो असता तर सेझ कायदा होऊच दिला नसता. पण काय करता? नुसता राज्यकर्त्यांना दोष कसा द्यायचा? आमच्यातच शिवबा पुरेसा मुरलेला नाही. हा दोष आपलाच.

शिवबादादाच्या आज्ञापत्रात तो आज्ञा करताना समजावूनही सांगतो. ‘तुम्ही निष्काळजीपणा केलात तर वैरण पेटल्याने नष्ट होईल. मग चार्‍याअभावी घोडे मेले तर तो दोष तुमच्यावर लागेल. तुम्ही त्यासाठी रयतेचे धान्य लुटू लागाल. मग रयत म्हणेल, त्या मोगलांमध्ये आणि यांच्यात ङ्गरक काय? आणि लोकांचा आधार तुटला तर राज्यच कोसळेल…’ असे बरेच. एका पत्रात तर ‘कुणा शत्रूचे सैन्य या मार्गाने येत आहे. गाव उठवा आणि लोकांना घाटात सुरक्षित ठिकाणी लपवा,’ असे लिहिले आहे. मला आठवतेय, नेपोलियनने रशियात धडक मारली होती, तेव्हा गावकर्‍यांनी पलायन केले होते. जाताना आपापली गावे पेटवून दिली. त्यामुळे पुढे हिवाळ्यात तो तिथे सापडला, आणि गावंच अस्तित्वात नसल्याने त्याला माघारी ङ्गिरावं लागलं होतं. त्या गावकर्‍यांचं वागणं शिवबादादाच्या त्या माणसे हलवण्याच्या युक्तीशी किती मिळतं जुळतं आहे. त्यात परत घरं पेटवून देणं ही भानगड नाही. शत्रू पुढे गेला की परत गाव जसंच्या तसं.

तर त्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सेतुमाधवराव पगडींनी लिहिलेलं छोटं आणि छान शिवचरित्र आहे. अलीकडे गजाजन मेहंदळ्यांचे दोन ग्रंथही छान आहेत. शिवाय सामंतांचे ते फक्त लढायांवरचे पुस्तक. ते तर अप्रतिमच. अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खर्‍यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांचा इतिहास’चे दोन खंड तर ग्रेटच!

पण सगळ्यात ज्यांनी डोळे उघडले ते त्र्यं. शं. शेजवलकरांच्या पुस्तकांनी. त्यांच्या लेखसंग्रहात ‘रियासत’कार सरदेसाईंच्या ‘नानासाहेब पेशवे’ या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. त्या लेखाने मला हादरवलेच. पुढे मी त्यांचे बरेच लिखाण, ग्रंथही वाचले. पण जमलेला लेख हाच. त्यांच्या आयुष्याच्या सर्व आकलनाचे गाळीव रूप त्यात आले आहे. पेशव्यांच्या उणिवा, कमतरता सांगताना त्याने समोर शिवाजी आरशासारखा धरला आहे. त्यामुळे पेशवे बाजूलाच राहिलेत. सरदेसाईंचं मोठेपण हे, की त्यांच्या आतल्या पुस्तकाला ही प्रस्तावना सर्वस्वी प्रतिकूल असूनही त्यांनी ती छापलीय. शिवाजीने दिल्ली सत्तेला आव्हान देऊन नवे स्वतंत्र राज्य स्थापन केले, तर पहिल्या पेशव्यांनी दिल्लीला जाऊन अधिकाराची वस्त्रे आणली. थोडक्यात, मांडलिकत्व पत्करले. शिवाजीने आपल्या अर्थव्यवहारासाठी स्वतंत्र चलन निर्माण केले, नाणी पाडली. ‘मुद्रा भद्राय राजते’- आठवतंय ना? ते नुसतं नाणं नाही. एका भूमिपुत्रानं आक्रमक सत्तेला दिलेलं ते आव्हानच आहे. या उलट पेशव्यांनी ती नाणी रद्द करून दिल्लीश्वरांचे चलन स्वीकारले. शिवाजीने मराठी राजभाषा बनवली. त्यासाठी राज्यव्यवहारकोष लिहून घेतले. पण पेशव्यांनी ते परत ङ्गारसीवर आणले. आपल्याला आता पेशव्यांविषयी काही म्हणायचे नाही. पण हे खरे, की पेशव्यांनी शिवाजीला एक ‘कॉन्ट्रास्ट’ पुरवला आहे. थोरले बाजीराव आणि थोरले माधवराव हे चमकून गेले आणि त्यांनी त्यांच्यात भिनलेले शिवाजीचे स्फुल्लिंग दाखवले. पण ते तितकेच. शेजवलकरांनी लिहिलेला ‘पानिपत’ हा तर युद्धशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ. आपला मुख्य शत्रू अब्दाली आहे, तर पेशव्यांनी उत्तरेकडे जाताना इतर सर्व छोट्या सत्तांशी तह करत जावे ना… तर त्याऐवजी त्यांना दुखवतच हे पुढे गेले. यमुनेला पूर येण्याआधी अब्दालीला गाठायचे होते, तरी पेशवे ठिकठिकाणी तीर्थक्षेत्री होमहवन करत राहिले. इतक्या लांबचा पल्ला, तरी सर्व कुटुंबकबिला घेऊन सगळे निघाले. आणि व्हायचे तेच झाले. किती मोती गळाले आणि किती खुर्दा सांडला, याचे हिशोब करणे नशिबी आले.

शिवाजी किती वेगळा होता! त्याच्या हल्ल्यात किती आश्‍चर्याचे धक्के असायचे. शत्रूच्या विचारांच्या तो किती पुढे होता! शेजवलकर लिहितात, ‘अब्दाली हा अङ्गगाणिस्तानातला शिवाजीच. थोड्या पण चपळ फौजेनिशी हल्ले करून पळून जाणारा,’ म्हणजे बघा. काळचक्र कसे उलटे झाले! शिवाजीने सुस्त व प्रचंड मोगल ङ्गौजेस हल्ले करून जेरीस आणले. आता शिवाजीच्या जागी अब्दाली आणि मोगलांच्या जागी पेशवे, म्हणजे आपणच. काय हा योग म्हणायचा?

शेजवलकरांचं अखेरचं कार्य होतं शिवचरित्र लिहिण्याचं. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, साधनं जमवली. पण शेवटी तब्येत साथ देईना. त्यांचे एक विद्यार्थी मला सांगत होते, की ते म्हणायचे, ‘थोडा काळ मिळाला तर हे काम पुरे होईल.’ त्या आजाराशी झगडत त्यांनी शेकडो पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली, प्रत्येक प्रकरणाचा आराखडा लिहिला आणि प्राण ठेवला. नंतर मराठा मंदिर संस्थेने त्यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. काय प्रस्तावना आहे ती! जसा एक प्रबंधच. शिवाजीच्या वेळची भारतातली परिस्थिती, जगातली परिस्थिती, इथली सामाजिक स्थिती, इथला तोपर्यंतचा इतिहास, इथले ङ्गसलेले प्रयोग…काय नाही त्यात? हे जेव्हा वाचले तेव्हा वाटले, आयुष्य दुसर्‍याला द्यायची सोय असती तर मी शेजवलकरांना माझी दहा निरोगी वर्षे देऊन त्यांचे ऋण थोडे तरी ङ्गेडले असते. एवढ्या समग्रपणे पाहणारा इतिहासकार मला दुसरा अजून सापडला नाही.

शिवाजीने आधीच्या वतनदारांना बाजूला सारून ही सर्वसामान्यांतली ङ्गौज जमा केली. अगदी अठरापगड जातींची. कसलीही प्रतिष्ठा नसलेली, पण जिवाला जीव देणारी. त्या अस्थिर जमान्यात लढाया होत्याच; पण तरीही शिवाजीने शेतकर्‍यांना स्थैर्य दिले, प्रोत्साहन दिले. अकबराला जसा राजा तोरडमल किंवा आणखी कुणाला मलिक अंबर मिळाला, तसा शिवाजीला कुणी चांगला प्रतिभावान सहायक मिळायला हवा होता. मग त्याने महसुलाची योग्य पद्धत बसवून त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण केला असता. पण शिवाजीचे सगळे आयुष्य धावपळीचे. एकूण फक्त जेमतेम पन्नास वर्षे. त्यात एका संकटाशी दोन हात करावे तो दुसरे संकट उभे, ही परिस्थिती. पण त्याही परिस्थितीत त्याने व्यवस्था बसवली, लोकांना स्थैर्य दिले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आजच्या काळातही त्याच्या पायाशी बसून धडे घ्यावेत असा त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन. दुसर्‍या धर्मांचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो, हे त्या वेळच्या मुस्लिम सत्तांना त्याने दाखवून दिले. मोगलांच्या प्रभावळीत अकबर असा होता. अकबराविषयी जेवढे वाचतो तेवढा तो आवडत जातो. वडील हुमायून अगदी विपन्नावस्थेत. अकबरानेही जवळपास शून्यातून सुरुवात करून साम्राज्य उभारले. त्या वेळच्या प्रस्थ असलेल्या मुस्लिम सरदारांपेक्षा त्याने राजपुतांना जवळ केले. काही राजपूत स्त्रियांशी लग्न केले, पण त्यांचा धर्म बदलला नाही. त्यांच्या महालात देऊळ बांधून देवपूजा करण्यास मुभा होती. एवढंच काय, पुढचा वारसही त्यांच्याच पोटचा. त्याने मुल्ला-मौलवींचं प्रस्थ कमी करून मोकळं वातावरण तयार केलं. अगदी बरेचसे गुण शिवाजीसारखेच. कधी वाटतं, अकबर आणि शिवाजी एकाच काळात असते तर? किती ङ्गायदा झाला असता आपल्या सगळ्यांचाच! अकबरानंतर अकबराने तयार केलेले वातावरण विरून गेले आणि त्याबरोबर उलट्या वृत्तीचा औरंगजेब निर्माण झाला. आणि शिवाजीची ही प्रेरणा दुसर्‍या बाजीरावापर्यंत पूर्ण लयाला गेली. हे महापुरुष एकत्र आले असते तर न पुसता येणारी संमिश्र संस्कृती उदयाला येऊन टिकलीही असती. त्या काळात लोकांमध्ये ती होतीच. सूङ्गी संत, भक्ती संप्रदायातले आपले संत यांत विरोध तर नव्हताच, पण एकमेकांकडे आदानप्रदान होते. एकमेकांबरोबर इष्ट परिणाम होत होते. काही संत, त्यांचे गुरू यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही नावांनी ओळखले जायचे. काही मुस्लिम संत तर अगदी भागवत संप्रदायी होते. ते वातावरण मीही माझ्या लहानपणी अनुभवलंय. आमच्या लहानपणी मुस्लिमांचे डोले नाचत यायचे. माझी आई हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी राहायची. डोले जवळ आले की घरापुढे रस्ताभर पाणी शिंपायची, त्यांच्या स्वागताला. असे प्रत्येक घराच्या दारात स्वागत. गणेशोत्सवाची सजावट मुस्लिमांकडे, हे मी अनेक ठिकाणी पाहिलंय. अनेक गवय्ये खानसाहेब देवीचे भक्त होते. त्यांनी देवाच्या वर्णनाच्या चीजा बांधल्यात. गेल्या पिढीतले बरेच हिंदू गवई सांगतात, खानसाहेबांनी मला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून विद्या दिली…अशी अनेक उदाहरणे.

मग कुठं लयाला गेलं सगळं हे ? आधी देशाचे दोन तुकडे झाले. जो मिळाला त्यात ही अशांतता, एकमेकांविषयी संशय, दंगली, बॉंम्बस्ङ्गोट…वगैरे. आणि तरीही आम्ही वारसा सांगतो शिवाजीचा आणि त्याच्याकडून शिकत नाही काही, याला काय म्हणावे?

कधी कधी वाटते, लोक खर्‍या शिवाजीला ओळखतील! शिवाजीला लढाया कराव्या लागल्या. सन्मानाने राहण्यासाठी, आपली जागा तयार करण्यासाठी. ती जागा आधीच उपलब्ध असती, तर त्याने छान, एकोप्याने नांदणारे सुखी राज्य निर्माण केले असते. मग करू या का सुरुवात? आपल्या राजकारण्यांनी, धुरीणांनी जरा शिवाजीकडून शिकावे ना थोडे. एक भव्य स्वप्न उराशी घेऊन उतरावे या गरिबीविरुद्धच्या लढ्यात. अन्नावाचून, औषधावाचून कुणी मरताच कामा नये, अशी करूयात का आपण प्रतिज्ञा? हा नुसता महाराष्ट्र नाही आहे, हे शिवाजीचे स्वप्न आहे. गुंडगिरी, झुंडशाहीला फाटा देऊन आपण होऊयात सर्वसामान्यांचे, निसर्गाचे रक्षक?

तसंच मला, आपल्या अगदी जवळच्या, म्हणजे कर्नाटकमधल्या विजयनगरच्या कृष्णदेवरायाची आठवण होते. कसला पराक्रमी होता तो! शिवाजीने जसं शून्यातून स्वराज्य उभं केलं, तसं त्याचं नव्हतं. त्याच्याआधी दीडेकशे वर्षं ते साम्राज्य चालूच होतं, पण ते मोडकळीला आलेलं होतं. विजापूर, गुलबर्गा इथल्या मुस्लिम सत्तांनी लचके तोडणं, अंतर्गत कलह, हे सगळं चालू होतंच. त्याची (त्याला ‘राया’ म्हणायचे. ते मला ङ्गार आवडलं.) कारकीर्द ती केवढीशी…फक्त वीस वर्षांची. तो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी गेलाच. पण त्या वीस वर्षांत कसले पराक्रम केलेत! खरंच वाटत नाही. त्या आदिल, कुतुब वगैरे सगळ्या शाह्यांना त्याने सपाटून मार दिला. एकदा नव्हे, तर अनेकदा. शिवाय त्या काळात राज्य समृद्ध, सुसंस्कृत केले. संगीत, काव्य, शिल्प यांना प्रोत्साहन दिले, वगैरे वगैरे…आपल्या शिवबाच्या आधी शंभरेक वर्षं आधी हे घडले.

कधी वाटतं, या काळाच्या प्रवाहात खोडरबराने काही खाडाखोड करावी, किंवा इकडून तिकडे बाण काढून घटनांचा क्रम बदलावा आणि रायाला जरा पुढे ओढावं. म्हणजे तिकडून रायाने आणि इकडून शिवबाने त्या आक्रमक मुस्लिम सत्तांना असा काही मार दिला असता की पळता भुई… त्यातनं रायानं शिवबाला जरा शांत वेळ मिळू दिला असता. त्याच्या राज्यातलं संगीत ऐकवलं असतं, शिल्पं दाखवली असती…

आणि हो, तोही शिवबासारखाच. रायाही सर्व धर्मांचा आदर करणारा. सगळ्या देवस्थानांना अनुदाने देणारा. मुस्लिम आपल्याला समजावेत म्हणून आपल्या राज्यात मुस्लिम वसाहतच वसवली त्यानं. अंगरक्षकही मुस्लिम. कित्येक सरदारही.

इतिहास हा कुणाच्या इच्छेचा प्रश्‍न नसतो, हे माहीत आहे मला, पण सदिच्छेने मनाचे खेळ खेळायला बंदी आहे का? राया, शिवबा, अकबर यांच्यात समान धागा दिसला म्हणून हे स्वप्न पाहिले.

मला तर शिवाजी आणि गांधीजी दोघेही जवळचे वाटतात. एक युद्धवीर आणि दुसरे अहिंसावीर. वरकरणी विरोध वाटेल, पण भव्य स्वप्न तेच, तसेच. त्यासाठी झोकून देणे, जिवाची पर्वा न करता, तसेच. ध्येयासाठी निडरपणे जागी उभे ठाकणे, तसेच अगदी.

शिवाजीच्या काळातल्या लढायांचे आजच्या जीवनात स्थान नाही, पण गांधीजींचा मार्ग मात्र आजही अनुसरता येईल. मग असे करूयात का, शिवबाचे स्वप्न आणि गांधीजींचा मार्ग? पण त्यात हवी त्या दोघांची सर्वसामान्यांविषयीची कळकळ, त्यात हवी आयुष्यभराची अखंड तपश्चर्या, त्याला हवी पुढचे पाहणारी दृष्टी. वा…वा…मी स्वप्नच पाहू लागलो रे शिवबादादा…हसतोस काय मिशीत?…तूच नाही का शिकवलंस मला स्वप्नं पाहायला?

डॉ. सदानंद मोरे, सौजन्य – साप्ताहिक सकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासंबंधीची चर्चा आधुनिक महाराष्ट्रात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली, असे म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या कार्याचा अन्वयार्थ लावण्याचे काम यापूर्वी कोणी केलेच नव्हते, असे नाही. आज्ञापत्राच्या कर्त्याने शिवाजीराजांनी नूतन सृष्टी निर्मिली असे म्हटले होते. त्याचे हे छोटेसे वाक्‍य केवढे अर्थगर्भ आहे!

परंतु, आधुनिक काळात आपला युरोपातील ज्ञानविज्ञानाशी संबंध आला व आपण त्यांच्याकडून घेतलेल्या नव्या “कॅटेगरिज’मधून विचार करू लागलो. आपल्याच जुन्या इतिहासाचा अन्वयार्थ नव्या संकल्पनांच्या साहाय्याने करू लागले. लोकहितवादींनी नेमके हेच केले. त्यांनी पूर्वजांवरील टीकेचा अतिरेक केला असे नेहमी म्हटले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे, पण मुळात ते परंपरेकडे अगदी वेगळ्या नजरेतून पाहात असल्यामुळे त्यांना ती परंपरा तशी दिसू लागली. ही वेगळी नजर त्यांना इंग्रजी शिक्षणातून मिळाली होती.

लोकहितवादींनी बंड आणि क्रांती यांच्यामध्ये भेद केला. शिवाजी महाराजांनी केलेले कृत्य हे साधे बंड नसून, क्रांती म्हणजे रिव्होल्यूशन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्रचलित राज्यव्यवस्थेला उलथून टाकून दुसरी राज्यव्यवस्था स्थापन करते, ही बाब बंड आणि क्रांती या दोन्ही घटनांमध्ये समान असते; परंतु बंड म्हणजे फक्त सत्तांतर. या सत्तांतरामुळे नव्याने अस्तित्वात आलेली राज्यव्यवस्था अगोदरच्या राज्यव्यवस्थेहून मूल्यदृष्ट्य वरच्या पायरीची असेलच असे नाही. क्रांतीमुळे होणारे सत्तांतर मूल्याधिष्ठित असते व त्यामुळेच त्यातून निर्माण झालेली राज्यव्यवस्था ही अगोदरच्या राज्यव्यवस्थेपेक्षा उच्चतम असल्याचा दावा करता येतो. औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही बुडवली व त्यामुळे ते राज्य दिल्लीच्या मोगल पातशाहीचा हिस्सा बनले; परंतु आदिलशाहीपेक्षा मोगल पातशाही ही उच्च कोटीची होती, असे कोणी म्हणत नाही. ते केवळ राज्यांतर होते, क्रांती नव्हती. शिवाजीराजांनी घडवून आणलेल्या सत्तांतराला क्रांती म्हणताना लोकहितवादींच्या डोळ्यांसमोर अर्थातच अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांत्या होत्या. अमेरिकन क्रांतीमुळे अमेरिकन संस्थाने इंग्लंडच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त झाली व तेथे लोकशाही नावाच्या मूल्यव्यवस्थेला मानणारे नवे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. फ्रेंच राज्यक्रांतीने फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आणून तेथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीवर आधारलेली राज्यव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध शतपत्रांमधील 1848 मध्ये छापलेल्या 25 क्रमांकाच्या या पत्रात लोकहितवादींनी “मूल्य’ हा जाडा शब्द वापरला नाही. ते या संदर्भात राज्यसुधारणा हा शब्द वापरतात; परंतु मूलभूत राज्यसुधारणा मूल्यानुसारच असतात. त्यामुळे तो शब्द आपण निर्धोकपणे वापरू शकतो.

लिबर्टी म्हणजे “स्वातंत्र्य’ हा अमेरिकन क्रांतीचा परवलीचा शब्द होता. जगप्रसिद्ध लिबर्टीचा पुतळा हे त्याचे प्रतीक होय. फ्रेंच क्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन शब्द परवलीचे केले. हीच ती तीन मूल्य होत. ही मूल्ये आपण बौद्ध धर्मापासून घेतली असे डॉ. आंबेडकर म्हणत. आता शिवराज्याला क्रांती म्हणायचे असेल तर अशी काही मूल्ये त्यामागे होती काय याचा धांडोळा घेतला पाहिजे.

फ्रेंच क्रांतीतील मूल्यांचा उद्‌घोष या क्रांतीचे अग्रदूत असलेल्या रुसो, व्हॉलतेर अशा विचारवंतांनी केला होता. तसे कोणी विचारवंत शिवक्रांतीच्या मागे पार्श्‍वभूमी म्हणून उभे होते काय, या प्रश्‍नाचे होकारार्थी उत्तर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी दिले आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांचा उद्‌घोष अनुक्रमे रामदास, एकनाथ आणि तुकाराम या संतांनी केलेला आढळतो.

शेजवलकरांचे हे मत फार महत्त्वाचे आहे. आधुनिक युरोपाच्या इतिहासाची सरणी मध्ययुगीन महाराष्ट्राला लावणे हे कदाचित कोणाला विपरीत वाटेल; परंतु मूल्यविचारसुद्धा परिस्थितीच्या संदर्भात सापेक्षतेने आणि साक्षेपाने करायचा असतो, हे विसरता कामा नये. येथील परिस्थितीत स्वातंत्र्य याचा अर्थ एकदम वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाने सरकार निवडण्याचा अधिकार, असा घेता येणार नाही हे उघड आहे.

शेजवलकरांनी शिवशाहीची जी तात्त्विक भूमिका सूत्ररूपाने सांगितले. तो न्या. म. गो. रानडेकृत मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाच्या मीमांसेचा म्हटले तर सारांश आहे, म्हटले तर विश्‍लेषण आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाची मीमांसा करताना संतांच्या कार्यामुळे शिवाजी महाराजांना अनुकूल वातावरण लाभले असल्याचे निदर्शनास आणले. राजारामशास्त्री भागवंतांचेही असेच मत होते. याच संदर्भात भागवत धर्म असा शब्दप्रयोग केला गेला. रानडे भागवतांचा भागवत धर्म पुरेसा समावेशक असल्यामुळे त्यात समर्थ रामदासांनी निर्देशलेल्या महाराष्ट्र धर्माचाही समावेश होत होता. वारकरी संतमालिकेतील ज्ञानेश्‍वर आणि नामदेव शिवकालापासून बऱ्याच अंतरावर असल्याने आणि एकनाथ नुकतेच होऊन गेलेले व तुकाराम अंशतः व रामदास पूर्णपणे समकालीन असल्यामुळे शेजवलकरांनी एकनाथ, तुकाराम व रामदास यांना शिवरायांच्या वैचारिक मशागतीचे श्रेय दिले. अशाप्रकारे लोकहितवादींनी चालना दिलेली मांडणी शेजवलकरांच्या हातून पूर्ण झाली.

शेजवलकरांनी लोकहितवादींच्या मर्मदृष्टीला अगदी मनापासून दाद दिलेली आहे. 28 मे 1848 या दिवशीच्या “प्रभाकरा’त आणलेल्या लोकहितवादींच्या उपरोक्त पत्राचा संदर्भ देऊन शेजवलकर लिहितात, “”इंग्लंडच्या इतिहासाचे दूध पिऊन पुष्ट झालेला हा पुण्याचा तरुण सरदार या प्रकाराकडे इतक्‍या शांतपणे पाहू शकला, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट वाटते. मार्क्‍सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे वर्ष म्हणून या सालाकडे लाल डोळे करून पाहणाऱ्या साम्यवाद्यांनी यावरून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.”

शेजवलकरांनी फ्रेंच राज्यक्रांतीतील तीन मूल्यांचा उल्लेख “मानवेतिहासाची प्रस्थानत्रयी’ असा करतात.

शेजवलकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या तीन मूल्यांच्या परस्परसंबंधांचा आणि त्यांच्यातील प्राधान्यक्रमाचीही चर्चा करतात. या बाबतीतील त्यांचा अंतिम सिद्धान्त असा आहे, की “”पूर्ण, चिरंजीव, निःसंदिग्ध व प्रभावी स्वातंत्र्य अपेक्षित असले तर मात्र, समता व बंधुता या गोष्टी तितक्‍याच पूर्ण, शाश्‍वत व निःसंदिग्ध असाव्या लागतील.”

एके काळी पूर्ण स्वातंत्र्य उपभोगणारा आपला देश पारतंत्र्यात का गेला, याचे शेजवलकरांनी दिलेले उत्तर असे आहे, की “”अंतर्बाह्य समता व बंधुता यांच्या अभावामुळे आपण स्वातंत्र्यास वाचवले.”

आपण स्वातंत्र्य का गमावले या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले म्हणजे आपण गमावलेले स्वातंत्र्य परत संपादन कसे केले, याचे उत्तर सहज मिळण्यासारखे आहे. गेलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मराठ्यांची एकी होणे गरजेचे होते. शेजवलकर सांगतात, की “”समतेच्या व बंधुतेच्या तत्त्वामुळे एकी शक्‍य झाली. तसेच समता व बंधुता ही क्रांतीची मूलतत्त्वे निर्माण झाल्यामुळे शिवकालीन समाज स्वातंत्र्य मिळवू शकला.”

लोकहितवादी सूचित शिवक्रांतीच्या स्वरूपाचे विवरण करताना शेजवलकर एक साधारण सिद्धान्त बांधतात, तो असा “”सामाजिक क्रांती होऊन प्रथम समता व बंधुता निर्माण झाल्यावाचून या देशाला स्वातंत्र्यलाभ नाही, हाच इतिहासाचा संदेश आहे.”

शेजवलकरांना हे असे सिद्धान्त करावे लागले याचे तत्कालीन कारण म्हणजे तेव्हा 1941 साली (महाराष्ट्रासह) भारत देश ब्रिटिश अमलाखाली होता. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि हिंदुमहासभा यांच्यात तीव्र स्पर्धा होती. सावरकरांसारख्या एखादा दुसरा अपवाद सोडला तर हिंदुमहासभेचे बहुतेक लोक जातिभेद निर्मूलनादी सामाजिक सुधारणांना विरोध करीत होते. इतिहासाचार्य राजवाड्यांची विचारसरणी त्यांना शिरोधार्य असे. राजवाडे समतेच्या तत्त्वज्ञानाचे पूर्ण विरोधक. त्यांच्या मते राज्य मिळणे वा गमावणे या गोष्टींचा सामाजिक समता वगैरे गोष्टींशी काही संबंध नसतो. ज्याच्या तलवारीची लांबी जास्त किंवा ज्याच्या तोफाबंदुका अधिक पल्लेदार, तो जिंकतो.

राजवाडे यांनी लावलेल्या मराठ्यांच्या इतिहासाला अनुसरून राजकारण करणारे तेव्हाचे लोक असे म्हणत, की शिवकालात जातिव्यवस्था, स्त्रियांवरील बंधने, बालविवाहाची प्रथा इ. समतेच्या विरुद्ध प्रथा असूनही ज्या अर्थी स्वराज्य मिळाले, त्या अर्थी समता आणि स्वातंत्र्य यांचा काही अन्योन्यसंबंध नाही. सबब सामाजिक गुंत्यांच्या सोडवणुकीत शक्तीचा अपव्यय करून स्वातंत्र्य लांबणीवर टाकणे उचित ठरणार नाही.

आधी सामाजिक, की राजकीय या विषयावर लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर यांच्यात झालेला वाद सर्वश्रुत आहे. आगरकर राजकीय स्वातंत्र्यासाठी सामाजिक सुधारणा स्थगित ठेवण्याच्या विरुद्ध होते, पण टिळक सामाजिक सुधारणा नकोतच असे म्हणत नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुधारणा आपल्या आपण व आपल्या पद्धीने करू, असा त्यांचा आशावाद होता; परंतु लोकमान्यांची परंपरा सांगणारी, स्वराज्य पक्ष, प्रतिसहकार पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष आणि हिंदुमहासभा अशा क्रमाने गांधीजींना विरोध करणाऱ्या या मंडळींना सामाजिक समतेचे जणू वावडेच होते. शेजवलकरांचे लेखन हे मुख्यतः या मंडळींचा प्रतिवाद करण्यासाठी झालेले आहे.

भरीत भर म्हणजे ही मंडळी शिवाजी आणि मराठ्यांचा इतिहास यांचे नेहमी उदात्तीकरण करायची. हिंदुराष्ट्रवादाचे समर्थन करण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा. साहजिकपणे उपरोक्त मूल्यत्रयीतील स्वातंत्र्याचेच महत्त्व अधोरेखित होऊन उर्वरित पायाभूत मूल्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेजवलकरांनी उल्लेखलेल्या तीन संतांपैकी दोघांना दूर सारून एकट्या रामदासांनाच सर्व श्रेय देणारा इतिहास त्यांनी रचला.

या सगळ्या परंपरेचा प्रतिवाद शेजवलकरांनी क्रांतीच्या मूलतत्त्वांचा महाराष्ट्रेतिहासातील अनुक्रम या लेखातून केलेला आहे. शिवकार्याची क्रांती असा यथार्थ व यथोचित गौरव करणाऱ्या लोकहितवादींना अशा क्रांतीतील सामाजिक आशयाचीही कल्पना होती, म्हणून तर त्यांनी आयुष्यभर ज्ञातिबांधवांचे शिव्याशाप झेलत समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. या तत्त्वाचे महत्त्व पटल्यामुळेच रानडे आणि भागवत यांनी संतांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तत्त्वांच्या या प्रस्थानत्रयीतील स्वातंत्र्याला बाजूला काढण्याच्या राजवाड्यांच्या राजकारणातील डावपेचांचा एक भाग भागवत धर्मापासून महाराष्ट्र धर्म बाजूला काढणे हा होता. “”मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा” असे रामदास म्हणाले. ते नेमके केव्हा असा आडव्यात जाणारा प्रश्‍न न विचारता सुद्धा असे म्हणता येते. मराठ्यांनी एक झाल्याशिवाय महाराष्ट्र धर्म वाढणे शक्‍य नव्हते आणि मराठा तितुका मेळवण्याची कामगिरी भागवत धर्माच्या संतपरंपरेने समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे बजावल्यामुळेच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची म्हणजे स्वराज्याची बोलणी शक्‍य झाली.

ज्याला आपण आधुनिकीकरण म्हटले, त्याच्यासाठीसुद्धा उपरोक्त तत्त्वे आवश्‍यक असतात, असे शेजवलकरांच्या लेखनातून निष्पन्न होते. “”शिवाजीने महाराष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली होती, तिच्यामागे आधुनिकीकरणाचे तत्त्वज्ञान होते. त्याने पश्‍चिम किनाऱ्यावरील दरवाजे उघडून पाश्‍चात्त्य सुधारणेच्या काळात इकडे आणण्याची तजवीज चालविली होती. परक्‍यांच्या व्यापाराला तर उत्तेजन द्यावयाचे, पण त्याबरोबर आरमार वाढवून त्यांचे —– करावयाचे, असा दुहेरी बेत शिवाजीने आखलेल्या अमात्यांच्या ———-वरून’ वरून स्पष्ट होतो.”

शेजवलकरांचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा शिवराजांचे मोठेपण एका वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करतो. “”सध्या सर्व इतिहासविवेचक अशी समजूत करून बसले आहेत, की हिंदुस्थानच्या स्थितीत अठराव्या शतकात काही सुधारणा शक्‍यच नव्हती. म्हणजे, पर्यायाने कोणा ना कोणा पाश्‍चात्त्य राष्ट्राचे प्रभुत्व मागेपुढे हिंदुस्थानावर होणे अपरिहार्य होते! ही विचारसरणी आम्हास मुळीच मान्य नाही. सतराव्या शतकापर्यंत अशी अंतर्गत सुधारणा मुसलमान राज्यकर्त्यांकडून अपेक्षित होती. कारण मक्का-मदिना, कायरो-इस्तंबूतपर्यंत त्याची “आमद्रफ्ती’ पूर्वीच चालू होती, पण सुधारणेपेक्षा संस्कृतीचा अनाधुनिक मूर्खपणाचा मार्ग औरंगजेबाने पत्करल्यामुळे ती नष्ट झाली. म्हणून शिवाजीला हिंदूंचे पुढारीपण स्वीकारून या सुधारणेचा पुरस्कार करणे भाग पडले! धर्मप्रकरणी शिवाजींचे वर्तन तत्कालीन युरोपच्या शंभर वर्षे पुढे होते.”

शेजवलकरांचे निरीक्षण यथार्थच आहे, पण शिवाजीमहाराज धर्माच्या बाबतीत युरोपच्या असे शंभर वर्षे पुढे जाऊ शकले, याचे कारणच मुळी हा धर्मविचार महाराष्ट्रात त्यांच्या अगोदर तीनशे वर्षे सातत्याने चालूच होता, हे आहे.

ग्रॅंट डफ काहीही म्हणो, मराठ्यांचे स्वराज्य हे केवळ आकस्मित योगायोग नव्हता, ती शिवक्रांती होती. तो वणवा नसून, समतेची अरणी आणि बंधुभावाचा मंथा या उपकरणांनी केलेले स्वातंत्र्याग्नीचे मंथन होते.

जयसिंगराव पवार , सकाळ, २० जुन, २००९

खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच “बालभारती’तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा “शिवरायांचे गुरू’ म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे “शिक्षक’ म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.” (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील “समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय’ साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.” (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये “शिवाजीची साक्षरता’ या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून “आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.