Posts Tagged ‘मराठा’

भालचंद नेमाडे , सौजन्य – म टा २६ एप्रिल २००३
( महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणातून साभार)

मलिक अंबर हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर त्याने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली. मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची , रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे ?

… माझ्या एका पुढच्या कादंबरीत- मराठी स्वराज्य सुरू झाले , शहाजी , शिवाजी , संभाजी ,पेशवे आणि नंतर ते संपलं , यांच्यावर एक प्रकरण आहे. हे प्रकरण मी कसं लिहिलं , हे थोडक्यात सांगतो. मी औरंगाबादला एक घर भाड्याने घेतलं. त्यावेळी त्या घरासमोर उंच बुरुजासारखा एक काही तरी भाग होता. सगळ्यांनी सांगितलं की , तो पाडून त्या जागी बसायला ओटा वगैरे बांधा. तुम्हाला जे हवं ते करून घेत चला , असं मालकांनी सांगितलंच होतं. मी मग बराच खर्च वगैरे करून , त्यात डायनामाइट लावला , पण तो बुरूज काही ढासळत नव्हता. लोक म्हणाले , अरे ,ही ‘ नहरे-अंबरी ‘ मलिक अंबराच्या काळापासूनची पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे. ती कधी फुटत नाही.

मी अहमदनगरला असताना दोन महिने एका घोड्याच्या पागेत राहत होतो. ती पागा आजच्या अतिशय आलिशान माणसाच्या घरापेक्षाही सुंदर होती. सुंदर प्रतीचे घोडेच तिथे राहात असतील. सदाशिव अमरापूरकर हे एकदा मला भेटले. ते या मलिक अंबरची इतिहासप्रसिद्ध कबर असलेल्या मूळ अंबरापूर गावचे. इथे विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ फुका जे म्हणतो की , ष्ठश्ाष्ह्वद्वद्गठ्ठह्लह्य आणि रूश्ाठ्ठह्वद्वद्गठ्ठह्लह्य यांच्यातून इतिहास घडतो. तसं हा आपलाच इतिहास मी मॉन्युमेन्ट्समधून स्वत: जुळवत गेलो आणि हळूहळू असं लक्षात आलं की , तो रयतवारी पद्धतीचा शोध लावून अजरामर झालेला मलिक अंबर कोण होता ? मूळचा इथियोपियामधला हा आफ्रिकी मुलगा आठ वर्षांचा असताना गुलाम म्हणून बगदादला विकला गेला. तिथून तो अहमदनगरला गुलाम म्हणून विकला. या हबशी शिपायानं फक्त दहा शिपायांबरोबर स्वत:चं सैन्य उभारलं. शहाजी वगैरे इथले लढवय्ये तयार केले. गनिमी कावा शोधला. अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा तो राज्यकर्ता होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात त्यानं रयतवारी पद्धत लावून जमिनीची मोजणी केली.

प्रत्येक खेड्यात पाटील आणि कुलकर्णी ही दोन वतनं एकमेकांवर वचक ठेवण्यासाठी निर्माण केली. आपल्या समाजाचं त्याला अतिशय खोल ज्ञान असलं पाहिजे की , पाटील आणि कुलकणीर् प्रत्येक गावात असलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय गाव चालणार नाही. मार्क्सचं जसं एक डायलेक्टिक्स होतं , तसं हे मलिक अंबरचं मराठी डायलेक्टिक्स महाराष्ट्राच्या गाभ्यापर्यंत पोहोचतं.

अशा पद्धतीचा हा थोर पुरुष. याच्याबद्दल काही वाचलं पाहिजे म्हणून मग मी सोळाव्या शतकातले कागदपत्र वाचले , तेव्हा असं लक्षात आलं की , हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य अशा मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर मलिक अंबरने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली , हे कऱ्हाडच्या जगदाळे प्रकरणावरून सुप्रसिद्ध आहे. त्यानं मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची आणि रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे ?

परवा अहमदनगरला गेलो , मला असं वाटलं , इथे मलिक अंबरचा मोठा पुतळा असला पाहिजे. इथिओपियातल्या या हबशी माणसानं एवढे कष्ट केले , एवढी कृतघ्न आपण मराठी माणसं आहोत की काय ?

मराठा शक्ती मलिक अंबरने स्थापन केली. याबाबतीत माझं दुमत नाही आणि हे मी वारंवार वाचून पाहिलं आहे ; कारण तुम्हाला माहिती आहे , खंडागळेचा हत्ती लखूजी जाधवच्या गोटात शिरला , त्यानं खूप लोक तुडवले , मारामाऱ्या झाल्या , लखूजीचा मुलगा मेला ; तिकडे त्यामुळे शहाजी आणि लखूजी चिडले. भोसले संभाजी त्यात मारला गेला. नंतर पुन्हा संघर्ष इतका वाढला की , बुरहान निजामशहाही हताश झाला आणि हे मराठे आपसात का भांडतात , असं मोठ्या प्रमाणावर त्यावेळी चिंतन केल्यानं मलिक अंबरनी ही शक्ती जमा केली आणि आज आपण ज्याला स्वतंत्र मराठा साम्राज्य म्हणतो , त्याची बीजं आपल्याला या अशा परदेशी माणसात दिसतात. म्हणजे एका दृष्टीने मलिक अंबर त्या काळचा एन.आय.आर.च म्हटला पाहिजे.

आज लोक आंतरराष्ट्रीय सहकार्याचं बोलतात. इथिओपियाचा माणूस एकदा इकडे आला आणि नगरला त्यानं मलिक अंबरचं स्मारक पाहिलं , तर आपल्या देशाचं केवढं मोठेपण त्याला जाणवेल?