Posts Tagged ‘चिकित्सा’

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – मटा

 

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील एक मध्यवतीर् विषय आहे. पण तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून मिथकाच्या भाषेत व्यक्त झालेला, मानवी इतिहासातील सत्तासंघर्षाचा मूलभूत प्रश्न आहे. पशूपालन अवस्थेतील आर्यांना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. पृथ्वी, आकाश व अंतरिक्ष येथील दृश्य व अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होत. देवांचा राजा इंद. त्याला वश करून घेणे हा हेतू. यज्ञ संस्थेला अफाट महत्त्व असलेल्या अशा काळात सुरासुर संग्रामाची कथा जन्मास आली. इंद व त्याला भारी पडणारा त्याचा शत्रू वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून या कथेची सुरुवात होते. पुढे तिला वेळोवेळी सोयीस्कर वळणे दिली आहेत. असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जात असल्यामुळे कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे व न मानणारे यांतील तो संघर्ष बनतो. तत्कालीन इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते पण ते वैदिक देवतांना मानीत नसत. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलट्या अर्थाने रुढ झाले. पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला मारून इंदाने त्यांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची कथा होय. इति- लो. टिळक. डोंगरांना पंख असल्यामुळे ते एका जागेवर राहत नव्हते; इंदाने त्यांचे पंख तोडले या मिथ्यकथेत उपखंड उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत होती, या भूवैज्ञानिक तथ्याची पुसट जाण व्यक्त होते.

वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र ते आदित्य. त्वष्ट्रा (म्हणजे विश्वकर्मा) त्यापैकी एक. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्माण. त्याच्या वधामुळे इंदाला ब्रह्माहत्येचे पाप लागते. पापक्षालनासाठी त्याला यज्ञ करावे लागतात. याखेरीज कश्यपाला दितीपासून झालेले पुत्र दैत्य, दनूपासून झालेले दानव व अनायूपासून झालेले असुर असेही म्हटले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप. यापेक्षा बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनियस (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सार्मथ्यावर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा डागाळण्याचा सतत प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (ह्वठ्ठष्द्ब१द्बद्यद्ब५द्गस्त्र) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशराज्ञ सूक्त लक्षात घेण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकच सूक्त होय. पुरु, अनु, दुह्यू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्यांच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदासाच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठ्या संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता. पण पंचजनांशी भरतांचे युद्ध जुंपले तेव्हा विश्वामित्राच्या जागी वसिष्ठाची नेमणूक झाली. म्हणून चिडलेल्या विश्वामित्राने भरतांच्या विरुद्ध दहा राजांचा संघ उभारला. तरी भरताचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. म्हणजे संघर्ष बहुसंख्य प्राचीन व अल्पसंख्य अर्वाचीन यातला आहे. दोन्ही आर्यच. पुढे पर्यावरण बदलले, सरस्वती नदी आटली, अवर्षणे सुरू झाली तेव्हा ऋषींच्या अन्नासाठी आपसातही मारामाऱ्या होत. आता पूवेर्कडे स्थलांतर करणे भाग पडले.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू अधिक भावला. पहाडी भागात अवैदिक शिवाला महत्त्व होते. त्यामुळे भटक्या लोकांचा आडदांड इंद कालबाह्य झाला. आता भारतवर्ष एका छत्राखाली आणणे आवश्यक होते. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत व महाभारतात कृष्णप्रधान वैष्णवांनी पश्चिमेकडून पूवेर्पर्यंत भारतखंड एकछत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जसे शिवाला महादेव म्हणून मान्यता देणे वगैरे. इहलोकातील राजकारणाचे परलोकात पडलेले हे प्रतिबिंब. देव-दानव संघर्षाला त्यातून आणखी एक परिमाण प्राप्त होते. धर्मप्रसार जगात सर्वत्र राजाश्रयांच्या आधारे बळाचा वापर करून झालेला आहे. भारतातील हा प्रयोग तडजोडीच्या राजकारणाचा असल्यामुळे वेगळ्या चिवट पण कमकुवत जातकुळीचा आहे.

मग देव म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी, अल्पसंख्य वर्ग, ज्यांची नीती (१ड्डद्यह्वद्ग ह्य४ह्यह्लद्गद्व) इतरांवर लादली जाते. अर्थात स्त्रश्ाद्वद्बठ्ठद्गठ्ठह्ल द्वद्बठ्ठश्ाह्मद्बह्ल४. देवांशी जो जमवून घेऊ शकत नाही तो दैत्य. जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम हा करुणरम्य विषय असून नॉर्स मिथ्यकथांमध्ये तो विशेष रंगविलेला आहे, असे दुर्गाबाई भागवत सांगतात. माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांमुळे संघर्ष निर्माण होतो व त्याचा अंत कुणीतरी चांगला म्हणून विजयी प्रस्थापित होण्यात किंवा प्रस्थापित झाल्यामुळे चांगला ठरण्यात होतो, हेच सूत्र त्यामागे कार्य करताना दिसते.

जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम येतो. दुर्गाबाई भागवत काही उदाहरणे देतात परंतु त्यांनी त्याचा अर्थ फोड करून सांगितलेला नाही. आयर्लंड, स्कॉटलँड येथील कहाण्यांमध्ये ओडिन देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार करतात. कहाण्यांमध्ये सुद्धा ओडिन देवांचा राजा व त्याचा धाकटा भाऊ दुष्ट असतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा देव प्रथम त्या दैत्याचा चलाखीने वापर करतात आणि नंतर घनघोर युद्ध होते, हिम दैत्य मारला जातो व सर्व दैत्य नरकात जातात. वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा संघर्ष निर्माण होतो व त्यात जो विजयी होतो तो देव सुष्ट ठरतो, हाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून विषय वैश्विक आहे.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी त्यांच्या ‘लोकायत’ या गंभीर ग्रंथातील एका प्रकरणात इजिप्तमधील दैवतशास्त्राचा आधार त्यांच्या मुख्य लेखनप्रपंचाच्या मजबूतीसाठी घेतला आहे. दैवते कशी जन्माला येतात आणि समाजाला व देशाला ललामभूत वाटणाऱ्या मानचिन्हांचे मूळ कोणते असते हा या शास्त्राच्या शोधाचा विषय आहे. बहिरी ससाणा किंवा बाज हा पक्षी हे इजिप्तचे मानचिन्ह आहे. (भारताचे असे राष्ट्रीय मानचिन्ह तीन सिंह हे आहे.) ते त्या देशाने कां व कसे स्वीकारले याचा जो शोध तिकडच्या संशोधकांनी इजिप्तचा प्राचीन इतिहास व दैवतशास्त्र यांच्या आधारे घेतला त्याचा उल्लेख या ग्रंथात आला आहे. जगभरच्या सगळया समाजांप्रमाणेच इजिप्तचाही प्राचीन समाज एकेकाळी आदिम जमातींच्या स्वरुपात राहणारा होता. या जमाती स्वतःची ओळख त्यांच्या कुलचिन्हांच्या (टॉटेम) नावाने सांगत आणि जपत. आजही जगातले आदिम समूह अशी कुलचिन्हे लावत व सांगत असतात. नागलोक म्हणून ज्यांचा उल्लेख येतो त्या समूहाचे कुलचिन्ह नाग तर हनुमान ज्या जमातीत जन्माला आला तिचे कुलचिन्ह वानर होते. नागकुलोत्पन्न किंवा वानरकुलोत्पन्न अशी ही ओळख आहे आणि मानववंशशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला ती चांगली ठाऊक आहे. (रामायणातील जांबुवंताचे कुलचिन्ह अस्वल तर मकरध्वजाचे मगर हे होते. या कुलचिन्हांच्या उल्लेखांचा आधार घेत आपले पुराणग्रंथ वाचू लागलो की आदिवासींच्या समुदायांच्या तेजस्वी व पराक्रमी इतिहासाचे एक नवे दालनच खुले होते. या दालनाची दारे ठोठावायला पुढे होणे हा आदिवासींना व साऱ्यांनाच त्यांच्या मूळ स्वरुपापर्यंत पोहचण्याचा खरा व प्रशस्त मार्ग आहे.)

प्रत्येकच काळाची एक भाषा असते. ती कालानुरुप बदलतेही. एकेकाळी आपल्याकडे शाळेतल्या हजेरीबुकात मुलांची आडनावे नसायची. त्याऐवजी त्यांची जात लिहिली जायची. अशी जातीने ओळखली जाणारी माणसे एकेकाळी जमातींच्या किंवा त्यांच्या कुलचिन्हांच्या नावाने ओळखली जायची, एवढेच.
इजिप्त हा देश जेव्हा जमातींच्या अवस्थेत जगत होता तेव्हा त्यातही कुलचिन्हांच्या नावाने ओळखले जाणारे समूहगट होते. त्यांच्यात भांडणे होती, हाणामाऱ्या आणि युध्देही होती. अन्न मिळविण्यासाठी होणाऱ्या या जमातयुध्दात ज्या एका जमातीने बाकीच्या बहुसंख्य जमातींचा पराभव करून त्यांना आपल्या हुकूमतीखाली आणले तिचे कुलचिन्ह बहिरी ससाणा हे होते. जेत्यांचे कुलचिन्ह हेच कालांतराने जितांच्या वर्गांचे दैवत बनले. कारण त्या वर्गांनी त्या चिन्हासमोरच शरणागती पत्करून नतमस्तक व्हायचे होते. इजिप्तमध्ये बहिरी ससाण्याला हा मान मिळण्यामागे एवढा सारा इतिहास आहे.

देवीप्रसादांनी या न्यायाने भारतातील देवीदेवतांच्या जन्मांच्या कहाण्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गणपती या दैवताला आपल्याकडे अग्रपूजेचा मान आहे आणि त्याला माणसाचा देह आणि हत्तीचे मस्तक आहे. झालेच तर त्या अगडबंब दैवताला उंदीर हे छोटेसे वाहन परंपरेने दिले आहे. वेदांमध्ये येणाऱ्या गणानाम् त्वाम् गणपतीला मानवी शीर आहे. तर महाभारताचे व्यासांनी सांगितलेले श्लोक लिहून घेणाऱ्या गणपतीला हत्तीचे मस्तक आहे. गणपतीच्या या बदललेल्या रुपाचा शोध मांडताना देवीप्रसादांनी बहिरी ससाण्याच्या इजिप्तमधील इतिहासाचा वापर केला आहे.

हत्ती हे कुलचिन्ह असलेल्या जमातीने आजच्या उत्तर भारतातील व विशेषतः बिहार व बंगालच्या परिसरातील इतर जमातींना आपल्या हुकूमतीखाली आणले. परिणामी हत्ती हे जेत्यांचे जमातीचे कुलचिन्ह जितांसाठी दैवत बनले. आपल्या परंपरेत मूर्तीपूजा होती आणि आपली दैवते मानवी तोंडवळयाची व देहाकृतीचीही होती. जेत्यांच्या कुलचिन्हाला दैवताचा मान द्यायचा तर त्याला मानवी देह द्यावा लागला व त्यातून आजचा आपला गणपती गजानन साकार झाला. पुढच्या काळात प्रगत धर्मात स्थान मिळाले तेव्हा त्याला अग्रपूजेचा मानही मिळाला. मग त्याच्या नावावर सूक्ते आली, स्तोत्रे लिहिली गेली आणि महाभारताच्या निर्मितीचे श्रेय त्याला व्यासांसोबत वाटून घेता आले. तो गणांचा म्हणजे जमातींचा पती (नेता) होताच, पुढे त्याला धर्माचे आद्यदैवत होण्याचाही मान मिळाला. हत्ती हे कुलचिन्ह असणाऱ्या जमातीने सर्वात प्रथम ज्या जमातीला पराभूत केले तिचे कुलचिन्ह उंदीर असावे आणि त्याचमुळे उंदीर हा आपल्या आजच्या गणपतीचे वाहन झाला असावा अशी उपपत्ती देवीप्रसादांनी मांडली आहे.

हा सारा तपशील येथे देण्याचे कारण आपल्याकडे दैवतशास्त्राचा म्हणावा तसा विकास अजून झाला नाही आणि दैवते कशी निर्माण होतात याविषयीचे संशोधन समाजाच्या फारशा परिचयाचेही झाले नाही हे आहे. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्टीसाठी देवीप्रसादांनी दिलेले पुरावेही आपल्या दैवतांच्या जमातोद्भवी स्वरुपावर प्रकाश टाकणारे आहे. तोंडातून लांबवर जीभ काढलेली विक्राळ स्वरुपातली काली ही देवता कधी शंकराला तर कधी गणपतीला पायाखाली तुडवीत असल्याचे दाखविणारी चित्रे आपण पाहिली आहेत. बंगाल व बिहारात तशी शिल्पेही सापडणारी आहेत. देवीप्रसादांच्या मते पराभूत झालेल्या जमातींच्या मनात जेत्यांविषयीचा साचलेला सूडच या चित्रांमधून आणि शिल्पांमधून प्रगट झाला आहे. (दा व्हिन्सी कोड या जगप्रसिध्द कादंबरीतील मोनालिसाच्या चित्राचा लेखकाने लावलेला ऐतिहासिक अर्थ येथे लक्षात यावा.)

देव आणि दैवतांचा हा मानवी इतिहास लक्षात घेतला तर त्यासंबंधीच्या अनेक बऱ्या व चुकीच्या समजुतींची उत्तरे मिळू शकतात. सुग्रीव, हनुमान आणि जांबुवंत रामाला सहाय्य करतात याचा अर्थ रामाच्या बाजूने वानर आणि अस्वल कुळातील सगळया जमाती जातात असा होतो. त्याचबरोबर वानरकुळातील एका गटाचे (सुग्रीव) रावणाच्या कुळाशी असलेले वैर आणि दुसऱ्याचे (वाली) त्याच्याशी असलेले सख्यही स्पष्ट होते. सुग्रीव आणि वालीचे भांडण हे एकाच जमातीतील प्रमुख कुळातले भांडण ठरते. पांडवांनी सर्पसत्र आरंभले याचा अर्थ त्यांनी नागलोकांना हुसकून लावत त्यांच्या ताब्यातील भूभागावर आपली सत्ता कायम केली असा होतो.

हा भाग येथवर थांबतही नाही. तो धर्मग्रंथांच्या गाभ्यापर्यंत जातो. ऋत ही वेदांमधली देवता. सारे ऋतू, ऊन, वारा, पाऊस यांचा नित्यक्रम, पिकांचे उगवणे, स्त्रियांचे ऋतुमती होणे, मुलांचे जन्म, वृध्दांचे मृत्यू आणि सृष्टीतला एकूणच नियमितपणा यावर या देवतेचे नियंत्रण. जोवर पाऊस वेळेवर पडतो, सृष्टीचा सारा क्रम ठरल्यानुसार चालतो आणि ती माणसांच्या अन्नवस्त्रासारख्या गरजा भागवते तोवर वेदांमधले ऋताचे श्रेष्ठत्व कायम असते. वरुण ही देवताही सृष्टीच्या नियमाचे निर्धारण करणारी म्हणून त्यावेळी श्रेष्ठ असते. मात्र पाऊस अपुरा पडला, पिके कमी झाली, अन्नाचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आणि त्यासाठी लढाया कराव्या लागल्या की वरुणाची जागा एका लढाऊ दैवताकडे, इंद्राकडे जाते. मग इंद्र हा देवांचा राजा व वेदातील सर्वशक्तिमान दैवत होतो. समाज आपल्या गरजांप्रमाणे आपली दैवते घडवीत असतो. पशुपालकांच्या टोळयांची सगळी दैवते पुरुषरुपी तर कृषीप्रधान समाजाची दैवते स्त्रीरुपातील असतात. पशुपालनासाठी लागणारे शरीरबळ पुरुषात असते तर शेतीचा शोधच स्त्रीने लावला असल्यामळे असे होते. आपल्या पूजेतल्या साऱ्या देवदेवता निर्मितीशी संबंध असणाऱ्या. त्यातून गौरीची पूजा, शिवलिंगाचे पूजनही त्यामुळेच. या दैवतांची आजची रुपे बरीच प्रतिकात्मक असली तरी त्यांची आरंभीची रुपे कमालीची उघड आणि स्पष्ट होती. हरप्पा-मोहेंजोदारोच्या मूर्तीतील स्त्रीदेवतेच्या जननस्थानातून बाहेर पडणारे पिकांचे कोंभही याच प्रकारातून येणारे. कामाख्य मंदिरात उघडपणे होणारी योनीपूजाही याच स्वरुपाची. मानवी गरज आणि त्यासाठी निर्मितीच्या साधनांची उपासना यातून केवळ दैवतांचीच रुपे घडत नाहीत. ओंकार हेही समागमाचेच प्रतिक असते आणि ते आद्य म्हणून पूजले जाते.

सांख्यांच्या तत्त्वज्ञानात स्त्री कर्तृत्त्वशाली आणि कृतीप्रवण तर पुरुष नाकर्ता असतो. मातृसत्ताक कुटूंबात (मानववंशशास्त्रज्ञांच्या आताच्या मतानुसार मातृवंशाधिष्ठित कुटूंबात) स्त्री स्वामिनी असणारी आणि घर व कुटूंबाचे सर्वाधिकार वापरणारी असते. या कुटूंबात पुरुष घराबाहेर असतो. तो अधूनमधून भेटणारा असतो. अशा समाजाच्या ज्या अवस्थेत मुलांच्या जन्मातला पुरुषाचा सहभाग कोणाला कळला नसतो त्या अवस्थेचे पुढे चालत आलेले हे सांख्यरुप असते. प्रत्येकच भारतीय दैवताची आणि तत्वविचाराची सांगड अशी जडप्रकृतीत चालणाऱ्या व्यवहाराशी घालून दाखविता येते व तशी ती देवीप्रसादांनी घालून दाखविली आहे.

बौध्द आणि जैनांच्या विचारांचा उगमही समाजाच्या तत्कालीन अवस्थांशी आणि त्या अवस्थांत माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी घालून दाखविता येणारा आहे. गरजा आणि मागण्या पूर्ण न होण्याच्या अवस्थेत इच्छा जिंका, तृष्णा संपवा किंवा सारे दुःखमयच असल्याचे सांगणारी, संन्यास वा निर्वाणाकडे वळण्याची शिकवण देणारी तत्त्वज्ञाने कां जन्माला येतात याची उत्तरे फारशा चिंतनात न शिरताही हाती येणारी आहेत. राजा बिंबिसार आणि राजपुत्र अजातशत्रू हे दोघेही गौतमाचे शिष्य होते. त्याचे शिष्यत्व पत्करूनही त्यांची सत्तेची तृष्णा तशीच राहिली होती. बिंबिसार वृध्द होऊनही आपल्यासाठी गादी सोडत नाही म्हणून अजातशत्रूने त्याला कैदेत टाकले व मारलेही. पुढे अजातशत्रूचा मुलगा विदुदभा याने अजातशत्रूला कैदेत टाकून स्वतः गादी बळकावली. विदुदभा हा क्रूरकर्मा होता. एका संतापाच्या भरात त्याने कपिलवस्तुतील (प्रत्यक्ष बुध्दाच्या गणराज्यातील) साऱ्या स्त्रीपुरुषांसह आबालवृध्दांची कत्तल केली. हा सारा संहार प्रत्यक्ष पाहावा लागलेल्या त्या परमकारुणिकाच्या संदेशात दुःख आणि तृष्णा यांच्यावर मिळवावयाच्या विजयाखेरीज दुसरे काय असू शकेल?

अलेक्झांडरचे साम्राज्य लयाला गेले आणि साऱ्या मध्य आशियातील समाजांचे ज्ञान व वैभवही संपुष्टात आले. रोमच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दूर होता. त्या अंधाऱ्या व उपेक्षित काळात आक्रमणकारी वा विजिगिषु विचार जन्माला येणे शक्य नव्हते. येशूचा सेवाधर्म या संदर्भात तपासून पाहण्याजोगा आहे.
कृतज्ञता बुध्दी हा मानवी स्वभावाचा एक चांगला व नित्याचा विशेष आहे. ज्यांनी समाजासाठी मोठी कामे केली त्यांना दैवत मानू लागणे ही त्याची वृत्तीही त्यातूनच येते. पाणिनी म्हणाला, ‘समाजासाठी मोठी कामे करणारी माणसेच कालांतराने त्या समाजाची दैवते होतात. असे एक उदाहरण नर-नारायणाचे (अर्जुन आणि कृष्ण) आहे.’ महाभारताचा चिंतामणराव वैद्यांनी निश्चित केलेला सनपूर्व 2300 वर्षे हा काळ मान्य केला तर पाणिनी त्यानंतर 1500 वर्षांनी येतो. तोवर कृष्णार्जुन या कर्तृत्वशाली नेत्यांना ईश्वराचे स्वरुप येऊ लागले होते असा व्याकरणकाराच्या या वचनाचा अर्थ आहे. दैवते कशी जन्माला येतात आणि विचारसरणींच्या मागे कोणते वास्तव उभे असते हे असे ध्यानात घेतले की धर्मांच्या उभारणीचे आणि त्यामागच्या ईश्वरी किंवा करुणेच्या वा सेवेच्या प्रेरणांचे स्पष्ट आकलनही होऊ शकते. पाश्चात्य अभ्यासकांनी धर्मसंस्थापकांच्या मानसिक आंदोलनांची जी अतिशय सूक्ष्म उकल करून दाखविली आहे, ती करण्याचे धाडस आपल्याकडे अजून व्हायचे राहिले आहे हेही येथेच नमूद करण्याजोगे. जडवादी दृष्टीकोनातून ईश्वर, धर्म किंवा विचारसरणी यांची लावता येणारी ही उपपत्ती शंभर टक्के खरीच मानावी असे कुणी म्हणणार नाही. मात्र ती या साऱ्या व्यवहाराच्या मूळ स्वरुपावर लक्षात घ्यावा एवढा प्रकाश टाकण्याएवढी प्रभावी नक्कीच आहे. दा व्हिन्सी कोडने प्रकाशात आणलेली रहस्ये किंवा इस्लामच्या निर्मितीमागे उभ्या असलेल्या ईश्वरी प्रेरणांचे मानसिक रुपही असेच आणि त्याविषयीचे आजवर न समजलेले गूढ उकलून दाखविणारे आहे.

(अनेक वाचकांना हा त्यांचा मानसिक छळ वाटणारा अध्ययन प्रकार आहे. मात्र सत्य हे नेहमीच फार सुंदर आणि गोड वगैरे नसते हे मनात आणले की हा छळ काहीसा सुसह्य होणाराही आहे. हा छळ टाळण्याचा एक सोपा मार्गही उपलब्ध आहे. या साऱ्या अध्ययन-विवेचनाची दखल न घेता त्याकडे पाठ फिरविता येते. आपल्यातील अनेकजण तो अनुसरतातही. पाश्चात्य जगाने याआधी असे केले आहे. त्या जगाने स्पिनोझाला वाळीत टाकले आणि कांटला पुन्हा न लिहिण्याची तंबी दिली. गॅलिलिओ आणि कोपर्निकस यांचा त्याआधीचा इतिहास सर्वज्ञात आहे.

आशियायी देशातील जनतेला असले ‘पाखंड’ जन्माला येऊ शकते हेच अजून मान्य व्हायचे आहे. भारतातल्या कितीजणांना देवीप्रसादांची दखल घ्यावीशी वाटली हाही येथे विचार करण्याजोगा प्रश्न आहे. ते तत्वज्ञानाचे अतिशय आदरणीय अभ्यासक होते. राज्यसभेचे सदस्य आणि राजस्थानचे राज्यपालही होते. त्यांचा हा ग्रंथही 1950 च्या दशकात प्रकाशीत झाला. मात्र मराठवाडयातील काही विचारवंतांचा अपवाद वगळला तर त्याची दखल घ्यावी असे कोणाला वाटले नाही. विचार करणाऱ्यांचा जो वर्ग अजूनही अन्यत्र राहिला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवणे हा आपल्या सुरक्षिततेचा मार्ग असल्याचे ठरवून टाकले.)

धर्म, धर्मपुरुष आणि धर्मग्रंथ यांचे अर्थ व गरज काळानुरुप कसे बदलतात याचे आपल्या परिचयाचे उदाहरण भगवत्गीतेचे आहे. गीतेचा देशाला ठाऊक झालेला पहिला गंभीर अर्थ आठव्या शतकातील आद्य शंकराचार्यांचा आहे व तो संन्यासपर आहे. (शंकराचार्यांचा या क्षेत्रातील अधिकार आणि दरारा एवढा की गीतेतील श्लोकांची संख्याही त्यांच्या गीताभाष्यानुसारच निश्चित करण्यात आली आहे) पुढे तेराव्या शतकात झालेल्या ज्ञानेश्वरांनी हाच अर्थ चिद्विलासपर लावला. विसाव्या शतकाच्या आरंभी तो कर्मपर असल्याचे मत लोकमान्यांनी त्यांच्या गीतारहस्यात मांडले. गांधीजींनी गीता हा अहिंसेची शिकवण देणारा ग्रंथ असल्याचा अभिप्राय, त्या ग्रंथावरच्या त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनानंतर नोंदविला. दरम्यान रामानुज, मध्व, निंबार्क या विशिष्टाद्वैती, द्वैती आणि द्वैताद्वैती आचार्यांनीही त्यांच्या गीताभाष्यांत याच ग्रंथातून त्यांच्या चिंतनाला अनुकूल असणारे अर्थ काढून दाखविले. सारांश, भगवत्गीतेचे मार्गदर्शन व चिंतन या देशात शंकराचार्यांच्या पश्चात बाराशे वर्षे सुरू राहिले आणि यापुढेही ते थांबणारे नाही. त्यामुळे हा ग्रंथ प्रत्येक शतकाला आणि काळाला मार्गदर्शक ठरणारा आहे असाच त्याचा लौकिक कायम झाला.

चिकित्सक अभ्यास करू पाहणाऱ्याला या संदर्भात पडणारा प्रश्न, गीतेच्या एवढया सगळया अर्थांपैकी खरा व नेमका अर्थ कोणता मानायचा, हा आहे. (ज्ञानेश्वरीवर अधिकारवाणीने बोलणाऱ्या एका मराठी महाराजांना प्रस्तुत लेखकाने हा प्रश्न विचारला तेव्हा ‘माझा गीतेचा अभ्यास अजून व्हायचा आहे’ असे उत्तर देऊन ते थांबले होते.) या पेचातून एका विश्वसनीय मार्गाने बाहेर पडता येते. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर काय किंवा टिळक आणि गांधी काय, ही सगळी लोकोत्तर विद्वत्ता आणि प्रज्ञा घेऊन जन्माला आलेली माणसे आहेत. त्यांचा समाजजीवनावरील प्रभाव आणि त्याविषयीची त्यांची जबाबदारी मोठी आहे. ही माणसे भगवत्गीतेवर गाईड लिहायला कशाला बसतील? सहाव्या शतकापासून समाजात आणि धर्मात होत असलेली नैतिक पडझड आणि वाढीला लागलेला अनाचार थांबवायचा तर शंकराचार्यांना संन्यासवृत्ती आणि कर्मत्याग यांचाच उपदेश समाजाला करणे भाग होते. ज्ञानेश्वरांसमोरचे आव्हान देशावर चालून आलेल्या मोगली आपत्तीपासून आपली प्राचीन संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्याचे आणि समाजमनात तोवर रुजलेल्या चांगल्या श्रध्दा कायम करण्याचे होते. त्यासाठी संन्यासाच्या मागे येणे आणि चिद्विलासाचा विचार मांडणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. हे जीवन नुसतेच निःसार नाही. ते चैतन्याने भरले आहे ही त्यांची शिकवण त्यातून येते. लोकमान्यांसमोरचे आव्हान स्वातंत्र्यप्राप्तीचे आणि त्यासाठी समाजमनात कार्यप्रवणता उभी करण्याचे आहे. ही माणसे गीतेचे अर्थ लिहायला बसली नव्हती. समाजाला जे सांगायचे ते सांगत असताना आपल्या उपदेशामागे गीतेतल्या ईश्वरी वचनांचे बळ उभे आहे हे त्यांना समाजमनावर ठसवायचे होते. शंकराचार्यांचे आणि ज्ञानेश्वरांचे वय लक्षात घेतले तर ती त्यांची गरज होती हे कळते. लोकमान्यांची लोकप्रियता मोठी असली तरी त्यांनाही आपल्या शब्दामागे ईश्वरी वचन उभे करावेसे वाटणे ही त्या काळाचीही गरज होती… अनेकांना हा फार ओढून ताणून आणलेल्या स्पष्टीकरणाचा भाग वाटेल. मात्र अशावेळी त्यांना कोणाचा अर्थ बरोबर आणि कोणाचा चुकीचा वा अपुरा हे सांगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. अखेर शंकराचार्य, ज्ञानदेव, टिळक किंवा गांधी हे त्यांच्या काळाचेही पुत्र असतात हे येथे विसरता येणारे नसते.

विचार आणि तत्वज्ञान यांनी इतिहास घडतो काय? व्हॉल्टेअर म्हणाला, जगावर पुस्तके राज्य करतात. पण प्रत्यक्षात राज्य पुस्तकांचे असते की ती हाती असणाऱ्यांचे? रशियाचे राज्य दास कॅपिटल या ग्रंथाचे होते की लेनिन आणि स्टॅलीन या जोडगोळीचे? वेद राज्य करतात की त्यातल्या मंत्रांनी अभिषिक्त झालेले राजे? राज्य येशूचे असते की कॉन्स्टँटिनोपलचे आणि पोपचे? इस्लामची राजवट ही तरी शरियतची असते की खलिफांची आणि बादशहांची? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे कधीतरी इतिहासाला द्यावी लागतील आणि वर्तमानाला ती मिळवावी लागतील. ग्रंथांच्या नावाने त्यावर ताबा मिळवणारी माणसेच राज्य करीत असतील तर ती ग्रंथांच्या मूळ प्रयोजनापासून भरकटतच जातात. कारण सत्तेचे प्रयोजन ग्रंथ किंवा ग्रंथांनी प्रतिपादन केलेली मूल्ये हे नसते. सत्तेचे प्रयोजन सत्ता हेच असते. असलेल्या सत्तेचा वापर करून सत्तेत वाढ करायची आणि वाढीव सत्तेचा वापर आणखी मोठी सत्ता मिळवण्यासाठी करायचा. सत्तेला वाढावेच लागते. तिला थांबता वा स्थिर होता येत नाही. तिचे वाढणे थांबले की शेजारच्या सत्ता बळावतात. सत्तेभोवतीची माणसेच तिला आव्हान द्यायला मग उभी होतात. मग सत्ता आणि सत्ताधारी आपल्या सत्तावाढीसाठी ज्या मार्गांचा वापर करतात त्यातला सैन्य आणि शस्त्रवाढीचा मार्ग सर्वज्ञात आहे. त्यासाठी लागणारे अर्थबळ वाढविणे हाही त्याचा एक उपाय आहे. त्याशिवाय जनतेवर स्वामीभक्तीचा संस्कार करण्यासाठी ग्रंथांचा आणि धर्मग्रंथांचाही वापर करता येणारा आहे. सत्तेच्या राजकारणात मंदीर, मशिद आणि पुतळे वापरता येतात तसे ग्रंथ आणि त्यातली शिकवणही वापरता येते. जडवादाचे अध्ययन करताना या साऱ्या वास्तवाचे भान अभ्यासकाला राखावे लागते.

दुर्गा भागवत, सौजन्य – मटा

भरभराट इच्छिणा-या कोणत्याही समाजाला परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात , तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या पंरपरा जेव्हा घट्ट , खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात , तेव्हा मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात… अशी मांडणी केली विदुषी दुर्गा भागवत यांनी. २ एप्रिल १९८९ ला महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीत हा लेख छापून आला होता.
…………………………….

गेले काही दिवस महाराष्ट्रभर महात्मा फुल्यांच्या संदर्भात मोठे वादंग माजल्याचे आपण पाहताहोत. हे वादंग त्यांच्या हिंदूधर्माबद्दलच्या विवेचनासंबंधी आहे आणि त्यातून प्रकरण हातघाईवर आल्याचे दिसते आहे , अशा वेळी या देशाची एक जबाबदार नागरिक , थोडीबहुत शिकलेली ,थोडासा नावलौकिक असलेली आणि विशेष म्हणजे समाजशास्त्राची अभ्यासक म्हणून चार समजुतीचे व जबाबदारीचे शब्द सांगावे यासाठी मी आज वा लेखाचा प्रपंच करते आहे.

फुल्यांसारखी माणसे हवीत की नकोत ? फुल्यांसारख्या व्यक्तीच्या बाबतीत पहिला महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की , समाजाला अशा व्यक्तीची गरज असते की नसते ? किंवा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत असतो ? फुल्यांसाख्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा , मृत्यूला शतकापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला असतानासुद्धा तुम्ही – आम्ही कुठली भूमिका घ्यायची हे ठरविण्याची वेळ येते ती का ?

पण फुल्यांसारख्या व्यक्ती म्हणजे कुठल्या प्रकारच्या व्यक्ती बरे ? तर त्या व्यक्ती म्हणजे सामाजिक बंडखोरी करू पाहणा-या व्यक्ती. विचार आणि कृती या दोन्ही अंगांनी समाज सुधारायचा प्रयत्न करू पाहणा-या व्यक्ती. थोडक्यात , ज्यांना आपण ‘रेव्होल्युशनरी क्रिटिक ’ (क्रांतिकारक टीकाकार) म्हणतो अशा व्यक्ती. अशा व्यक्ती स्वभावतःच आदर्शवादी असतात आणि आदर्शवादी असल्याने त्यांना समाजाची अपेक्षित आदर्श स्थिती या दोहोंतली तफावर चटकन् जाणवते. जाणवते एवढेच नव्हे ,तर अंतर्यामी खोलवर खुपते ; आणि ही तफावत दूर करण्यासाठी ही माणसं कंबर कसतात. प्रस्थापित समाजावरचा त्यांचा हल्ला दोन वेगवेगळ्या बाजूंनी असतो.  एक वैचारिक टीकेच्या स्वरुपात आणि दुसरा प्रत्यक्ष कार्याच्या स्वरुपात. तात्विक उपपत्ती मांडून एकीकडे प्रचलित समाजाचे दोष दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि दुसरीकडे त्याचवेळी हे दोष दुरुस्त करण्यासाठी हे लोक त्यांच्या परीने निरनिराळ्या प्रकारचे इलाजही सुचवीत असतात.

आता समाजामध्ये सामाजिक क्रांती घडून यावी यासाठी समाजावर टीका करणारे समाजसुधारक हवेत की नकोत? या प्रश्नाचे उत्तर कुणीही जबाबदार माणूस ’हवेत’ असेच देईल, असे मला वाटते. समाजाला स्थैर्य हवे असते आणि तसेच परिवर्त्न सुद्धा हवे असते. समाज नुसता एका जागी  स्थिर राहिला तर त्याचे डबके होईल. म्हणून भरभराट इच्छिणा-या या कोणत्याही समाजाचा परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात. तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या परंपरा जेव्हा घट्ट, खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात, तेव्हा त्या मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात. समाजाची प्रगती पाहिली तर ती जुन्यातले सारेच काही टाकून देत नाही, ती काही नवे आत्मसात करीतच फक्त होऊ शकते.

रूढीवर टीका

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखी सामाजिक अन्याय व दु:खे यांच्यावर बोट ठेवणारी नि त्यासाठी समाजाला धारेवर धरणारी माणसे हवीत, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचवेळी ही माणसे प्रचलित धर्मसंस्थेवर, धार्मिक समजुतींवर, आचार धर्मावर कठोर प्रहार करणार आहेत, हेही मान्य करावे लागते. धर्मावरची त्यांची टीका अपरिहार्य असते. कारण धार्मिक समजुतींच्या बैठकीवरच सगळ्या जुन्या समाजांचा बराचसा कारभार चाललेला असतो. रिच्युअल्स ऊर्फ विधिजाल आणि देवादिकांबद्दलची मिथ्थके यांच्या मदतीनेच धर्म हे माणसांचे आपसाआपसांतले व्यवहार नियंत्रिक करीत असतात. काही प्रमाणात प्रजेला दिल्या गेलेल्या प्रत्यक्ष आदेशाच्या रुपात, तर ब-याच प्रमाणात प्रेरक स्वरुपाच्या सूचनांच्या स्वरुपात हे सर्व घडत असते.

विधिकल्प व मिथ्थके

जेव्हा कधी अगदी पूर्वकाळी या कथा वगैरे रचल्या जातात, तेव्हा त्यांचा उद्देश त्या घटितात (सिच्युएशन) किंवा मानवी प्रसंगामध्ये मानवाला कसे वागायचे हे शिकवावे हा असला, तरी कालांतराने त्या रुढींचे व कथांचे कठीणसे घट्ट साचे बनतात नि ते जनतेची हालचाल, चलनवलन वगैरे मर्यादितही करुन टाकतात.  हे कसे घडले हे दाखविण्यासाठी अशा कथांचे एक उदाहरणच देते. हे उदाहरण साध्या लोककथेचे आहे. मूळ किंवा आदिम प्राक-कथनातला धर्मवाचक आशय जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा त्या प्राक-कथांचे रुपांतर लोककथांमध्ये होत असते. नवरा-बायकोच्या जोडीत नव-याने पुरुषाची कामे करावीत नि बायकोने बाई माणसाची करावीत, हा धडा किंवा पाठ देणा-या कथा या सर्व जगभर प्रचलित आहेत.  एका कथेत बायको शेतात जाऊन पुरुषाचे काम करु पाहते, तर नवरा घरात राहून रांधणे – वाढणे, धुणी – भांडी, मुले सांभाळणे हे बायकोचे काम करतो, तेव्हा त्यातून अनेक गमती-जमती आणि घोटाळे कसे होतात, त्याचे वर्णन येते. या कथेतील गमती – जमतीचा किंवा विनोदाचा भाग बाजूला सारला, तरी पुरुषांनी पुरुषांची नि बायकांनी बायकांची कामे केली, तरच संसार व्यवस्थित चालू शकतो, हा ’जैसे थे’ चा पुरस्कार करणार किंवा गतानुगतिकाचा गर्भित संदेश प्रतीत होतोच.

हीच गोष्ट थोड्या फरकाने अनेक प्रकारच्या धर्मसंलग्न मिथ्थकांच्या बाबतीत घडत असते आणि जैसे थे ऊर्फ गतानुगतिक परिस्थिती रुढी सांभाळून ठेवण्यासाठी समाजातले हितसंबंध गट त्या मिथ्थकांचा उपयोग करतात. समाजाच्या विकासाबरोबर असे हितसंबंध गट त्या समाजामध्ये उत्पन्न होणे हे देखील अपरिहार्य आहे. असो.

तर सांगायचा मुद्दा हा की, जो कुणी समाज सुधारण्याचा प्रयत्न करायचा म्हणून समाजातल्या दोषांवर टीका करु पाहतो त्याला धर्मावर टीका केल्यावाचून, धर्माची समीक्षा केल्यावाचून गत्यंतर नसते. कारण समाजातल्या हितसंबंधी गटांच्या हितसंबंधांवर आघात केल्यावाचून त्याला पुढे जाताच येत नाही.

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखे आवश्यक आहेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या धार्मिक समजुतींवर आघात करतात, हेही आपल्याला नुसते गृहित धरुन चालत नाही तर कबूल करावे लागते.

सुधारकांचा दुसरा प्रश्न
फुल्यांसारख्या समाजसुधारकांबद्दल दुसरा प्रश्न उत्पन्न होतो . समाजाच्या एकूण कल्याणासाठी फुल्यांसारखे लोक आवश्यक आहेत , ही गोष्ट खरी , पण म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानायचा काय ? माझ्या मते मानायचा नाही . फुल्यांसारखी माणसे समाजाला पुढे नेतात – ही गोष्ट खरी असली तरी ती शेवटी माणसेच आहेत . फार तर थोर माणसे म्हणा . पण शेवटी माणसेच . स्थल – काल – परिस्थिती यांनी बद्ध अशी माणसे . त्यामुळे त्यांचे शब्द , त्यांचे निष्कर्ष , त्यांची अनुमाने ही अंतिम सत्ये होऊच शकत नाहीत . त्यांचे शब्द , त्यांची वचने म्हणजे त्यांच्या वैयक्तिक भूमिका असतात आणि त्यांच्यावर त्यांनी स्वीकारलेल्या बौद्धिक दृष्टिकोनाचा ( परस्पेक्टिव्ह ) फार मोठा प्रभाव असतो . शिवाय तुमच्याआमच्या प्रत्येकाच्या विचाराला ज्या स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात , त्याही काही प्रमाणात तरी त्यांच्याही विचाराला असतात . तेव्हा फुल्यांसारख्या अगदी मोठ्या व्यक्तींच्या वक्तव्याचाही पुनर्विचार होणे आवश्यक ठरते . थोर व्यक्तींबद्दल आदर जरूर असावा . परंतु सत्याची कदर त्याच्याहीपेक्षा अधिक केली जावी , एवढंच . माणसाच्या शब्दांना परमेश्वराच्या शब्दाचा मान देण्याची गरज नाही . मुळात आमच्या संस्कृतीत परमेश्वर नैतिक वा अन्य प्रकारच्या आज्ञा देतो आहे , असा प्रकारच नाही .
समाजसुधारकांच्या धर्म आणि धर्मसंलग्न मिथ्थकावरच्या टीकांचा फेरविचार करणे आणखी एका कारणासाठी आवश्यक ठरते . समीक्षेसाठी विशेष अभ्यास आणि विशेष सहानुभूती या दोन्हींची नितांत गरज असते . अनेकदा हा विशेष अभ्यास समीक्षा करणारापाशी नसतो आणि मग तो समोरच्या धार्मिक साहित्यातून चुकीचे अर्थ काढतो . हे अर्थ चुकीचे असल्याने तज्ज्ञांनी ते केव्हा ना केव्हा दुरुस्त करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या विषयातील माहिती कच्ची असल्याने खुद्द फुल्यांनीच कशी चुकीची भाष्ये केली आहेत याचे एक उदाहरण येथे देत आहेत.

ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी

ब्रम्हदेव स्वत : च्या मुलीशी (उषेशी किंवा सरस्वतीशी ) रममाण होते यावर फुलेंनी बरेच भाष्य केले आहे. परंतु ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी या संबंधांबद्दल ज्या आदिम कथा आहेत त्या पहिल्या (आदिम) जोडप्याचे एकमेकांबरोबरचे नाते कोणते आणि कसे असावे याचा जो प्रश्न जगभराच्या सगळ्या संस्कृतींना पडला होता , त्याचा अपरिहार्य परिणाम होता. पहिल्याने कोण होते , पुरूष की स्त्री ? पुरूष असेल तर मागाहून येणारी स्त्री त्याची बहीण (अगर मुलगी) होते. स्त्री असेल तर मागाहून येणारा पुरूष तिचा मुलगा होतो. स्त्री-पुरूष दोन्ही एकदम असतील तर ती भावंडे असतील किंवा ज्यू आणि ख्रिस्ती परंपरेप्रमाणे पुरूषाच्या बरगडीपासून पहिली स्त्री उत्पन्न केली गेली असेल , तर ती स्त्री त्या पुरुषाची बहिण बनते. (ख्रिस्ती धर्मातील आदमचे पाप हे व्याभिचाराचे पाप होय.) फुल्यांपाशी हा धर्म आणि पुराणकथांचा किंवा प्राक-कथांचा तुलनात्मक अभ्यास नसल्याने त्यांनी जर या बाबतीत चुकीची विधाने केली असतील तर नंतरच्या लोकांना ती चूक आहेत हे सांगणे हे क्रमप्राप्त ठरते.

अश्वमेधाचा घोडा

हवे असल्यास धर्मसंलग्न मिथ्यांचे आणखी एक उदाहरण घेऊ. वाजसनेयी संहितेत अश्वमेध यज्ञाच्या वेळी होता आणि राजाची मुख्य महिषी यांच्या संवादाचे अनेकदा भांडवल केले जाते. हे संवाद अश्लील आहेत (अर्थात , आजच्या आमच्या दृष्टीने अश्लील. त्या काळातल्या लोकांच्या तर्फे नव्हेत.) .यात शंका नाही. परंतु शीर तुटलेल्या घोड्याच्या बाजूला राणी झोपते वगैरे सगळा जो पुजाविधी आहे त्याचे त्या काळाच्या दृष्टीने बरेच मोठे कार्य आहे. असाच विधी आयर्लंडमध्ये केला जात असे. मूळ स्वरूपात ही एक इंडो – युरोपियन मिथ्यकथा आहे. भारतीय , आयरिश , ग्रीक , रोमन , रशियन , वेल्श या सगळ्या लोकांमध्ये या ना त्या स्वरूपात ही मिथ्यकथा आढळते. अश्वमेधातला घोडा हे सूर्यदेवाचे प्रतिक आहे आणि म्हणूनच राजाचा ‘ अल्टर इगो ’ म्हणजे दुसरा आत्मा आहे. घोड्याचे डोके तोडणे म्हणजे घोड्याला खच्ची करणे. राणी घोड्याचे किंवा सूर्यदेवाचे पुरूषत्व त्याच्यापासून हिरावून घेते आणि आपल्या पतीला म्हणजेच राजाला बहाल करते. राजा हा परत विष्णूचा अवतार आहे. पृथ्वी ही त्याची पत्नी आहे. सूर्यापासून बीज घेऊन राजा पृथ्वीला सुफलित करतो असा एकुण मतितार्थ आहे. त्याकाळी अश्वमेध यज्ञ करणे हे राजाचे एक कर्तव्य होते. लोक त्याला तसे करायला भाग पाडीत असत.

आता वरीलसारखी विशेष माहिती ही फुल्यांना आणि त्यांच्यासारख्या इतरांना असणे दुरास्पात आहे. अशा वेळी त्यांनी यासंबंधी जी चुकीची विधाने केली आहेत , ती दुरूस्त करणेच योग्य ठरते.

खुद्द महात्मा फुल्यांना अशा प्रकारची आपल्या चुकीची दुरूस्ती भाग होती. कारण ‘ शेतक-यांचा आसूड ’ या आपल्या पुस्तकाच्या उपोदघातात ते लिहितात की ‘ या ग्रंथात जे काही मी माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे शोध लिहिले आहेत , त्यात आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानात जी जी व्यंगे दिसून येतील त्यांविषयी मला क्षमा करून… गुणलेषांचा स्वीकार करावा… आणि जर करिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ तर त्यास काही (ग्रंथकार वगैरे) सुचविणे असेल… आम्हास कळवावे…दुस-या आवृत्तीचे वेळी त्याचा योग्य विचार करू ’ (कीर-मालशे संपादित , पृ.३)

धार्मिक मिथ्यकथा वगैरेंच्या बाबतीत फुले हे विशेष तज्ज्ञ नव्हते. त्यामुळे त्या विषयाचे विश्लेषण करताना त्रुटी राहण्याची , चुका होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच विचारांची फेरतपासणी आवश्यक ठरते. त्याप्रमाणेच दुस-याही एका कारणासाठी ती आवश्यक होते. फुले सामाजिक टीकाकार होते , तसेच ते कर्ते समाजसुधारकही होते. सामाजिक टीकाकाराच्या भूमिकेतून त्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीची चिकित्सा केली होती आणि त्या दु : खद स्थितीला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींची चर्चा करून ही स्थिती दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या परिने काही इलाजही सुचविले होते. फुल्यांनी सुचविलेल्या या इलाजांचे पुढे काय झाले , त्यांनी व्यक्त केलेली उद्दिष्टे पुढील काळात प्रत्यक्षात आणली गेली काय इत्यादी विचारसुद्धा फुल्यांच्या बाबतीत आवश्यक ठरतो. कारण या प्रकारच्या अभ्यासातूनच फुल्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीते केलेले विवेचन आणि त्या स्थितीमागील कारणाचे निदान चूक होते की अचूक होते हे आपण पाहू शकणार असतो. येथे फुल्यांच्या सर्वच उद्दिष्टांचा विचार अभिप्रेत नाही. फक्त काही काही निवडक उद्दिष्टे आपण विचारात घेऊ शकतो. ‘ शेतक-याचा आसूड ’ पृ. ८ वर फुले म्हणतात की , ‘ माझ्या मते एकंदर सर्व सरकारी खात्यात शेतक-यांपैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणाने कामगार घातल्यास ते आपल्या जात बांधवास इतर कामगारांसारखे नाडणार नाही. फुल्यांच्या मते सरकारी खात्यात ब्राम्हण कामगार असल्याने ते शेतक-यांना फार नाडत होते. फुल्यांच्या या निरिक्षणाची आज अवस्था काय आहे. आज सरकारात बहुजन समाजातील लोकांची बहुसंख्या आहे. तथापि , गोरगरिबांना नाडण्याचे त्यांनी थांबविले आहे काय ? सरकारात ब्राम्हण कामगाराचे वर्चस्व आणि ब्राम्हणांनी त्यांना नाडण्याचा काहीही कार्यकारण संबंध नाही. मुळात जातीने वरिष्ठ व कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी करणेच चूक असते. सत्तेने वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी त्या मानाने अधिक बरोबर ठरू शकते. कामगारांचे हितकर्ते खुद्द मार्क्स व एंगल्स यांच्याही तत्वज्ञानाच्या बाबतीत शेवटी जगभर हाच अनुभव आलेला आहे. मार्क्सची अपेक्षा होती की कामगार शतकानुशतके विशिष्ट वर्गाकडून नाडला गेलेला आहे , जेव्हा त्याच्या हाती सत्ता येईल किंवा तो वरचढ ठरेल तेव्हा तो सतत कामगार वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या योजना आखील. परंतु तसे कुठेही घडले नाही. उलट असे दिसून आले की , कामगार फक्त आपल्याला आर्थिक व इतर फायदे जास्तीत जास्त कसे मिळतील त्याच्याकडे लक्ष पुरवतो.

साधी आपल्याकडच्या कामगारांचीच गोष्ट घ्या. आपल्याकडचा कामगार ज्या क्षेत्रात- उदा. कापड-गिरण्या वा तेलधंदा इ.- तो असतो तिथले फायदे फक्त त्याला मिळावेत म्हणून धडपडत आहे. किंबहुना त्या त्या क्षेत्रात जर का नोकरीच्या जागा उत्पन्न झाल्या तर त्याही आपल्याच पुत्रपौत्रांना मिळाव्यात म्हणून व्यवस्थापनावर सर्व प्रकारचे दडपण आणतानाही दिसतो. या वस्तुस्थितावरून आपण फार तर एवढेच म्हणू शकतो की , माणसे त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग स्वत : चा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी करतात. मग ती माणसे ब्राम्हण असोत वा ब्राम्हणेत्तर. त्यांच्या जातीचा , वर्गाचा वा धर्माचा परिणाम वस्तुस्थितीवर होत नाही. कामगारांच्या जातीचे लोक सरकारी कचेरीत आले की , ते आपल्या जातीला नाडणार नाहीत , हा फुल्यांचा अंदाज अशा प्रकारे चुकला आहे.

स्त्रियांचा प्रश्न

त्यांचा दुसरा अंदाज असा की , स्त्रियांना शिक्षण मिळाले की त्या स्वतंत्र होतील हा होय. आज स्त्रिया पूर्वीच्या मानाने ब-यापैकी शिकताहेत व शिकल्या आहेत. पण त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार पूर्वीच्या मानाने वाढले आहेत. म्हणजे येथेही फुल्यांचे विश्लेषण न निदान कुठेतरी चुकले होते.

शिक्षण : तिसरा अंदाज

त्यांचा तिसरा अंदाज शिक्षणाने प्रजा शहाणी व समजूतदार होईल. आज शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. पण प्रजा शहाणी झाल्याचे दिसत नाही. असो. तर सांगायची गोष्ट ही की , मार्क्स , एंगल्स , फुल्यांसारख्याचीही सामाजिक विश्लेषणात गफलत होऊ शकते आणि ती समजावून घेणे आपल्या हिताचे असते. किंबहुना ही मंडळी जर हयात असती तर त्यांनी स्वत : च्या विचारातल्या गफलती कबूल केल्या आहेत. इतके ते सत्यनिष्ठ होते.

पुनर्विचार आवश्यक

आणखीसुद्धा एका कारणासाठी फुल्यांसारख्यांच्या प्रतिपादनांचा पुनर्विचार करणे आज आवश्यक आहे. आमची लोकशाही ही गर्दीने (ऊर्फ झुंडीने) घडवायची लोकशाही आहे. गर्दी ठरवील त्याच्या हाती राज्यकारभाराच्या नाड्या जातात. अशा वेळी जो कुणी या गर्दीला आपल्या बाजूला वळविण्यात यशस्वी होतो तो सत्तास्थान पटकावतो. गर्दी नेहमी घोषणांना वश होत असते. आकर्षक , नेत्रदीपक घोषणांना वश होत असते ; आणि लोकप्रिय थोरांची नावे ही आजकाल घोषणांगत वापरली जाताहेत , नव्हे , या मोठ्या नावांचा एक प्रकारे बाजारच मांडला जातो आहे. कुणी घोषणा देतो ‘ श्री प्रभूरामचंद्र की जय ’ . लगेच लाखोंच्या संख्येने लोक त्या घोषणा देणा-याच्या मागे जातात. दुसरा कुणी म्हणतो. ‘ श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ किंवा ‘ महात्मा फुले की जय ’ लोक तिथेही गर्दी करतात. तथापि , एखाद्या नावाची घोषणा म्हणजे त्याचे ते नाव असते , त्याचे ते तत्वज्ञान नसते. घोषणा देणारे स्वत : च्या स्वार्थासाठी ती मोठी नावे वापरीत असतात. त्यांचा बाजार भरीत असतात. अशा वेळी घोषणेसाठी ज्यांची नावे घेतली जातात , त्यांनी मुळात काय सांगितले आहे , त्यात काय तथ्य आहे इ. सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.

फुले महात्माच

वरील विवेचनावरून कुणी असा ग्रह करून घेऊ नये की , मी महात्मा फुल्यांना कमी लेखते आहे ; किंवा कुणी असेही समजू नये की , मी जुन्या जमान्याचा , जुन्या वैचारिक मूल्यांचा व समाजपद्धतीचा पुरस्कार करते आहे. तसे अजिबात नाही. महात्मा फुले हे खरोखरच महात्मा होते. कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्या स्थितीचे विश्लेषण करणारे , ‘ द कंडिशन ऑफ द वर्किंग क्लास इन इंग्लंड ’ हे पुस्तक एंगल्सने सन १८४४ मध्ये लिहिले. महात्मा फुल्यांनी येथल्या शेतक-याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान ‘ शेतक-याचा आसूड ’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतक-यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये , यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी , अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. आणि इतरही अनेक परोपकाराची नि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘ शेतक-याचा आसूड ’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.