Archive for the ‘पुस्तक समीक्षा/परिचय’ Category

सौजन्य – लोकसत्ता

साधना प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘तारांगण’ या सुरेश द्वादशीवार लिखित व्यक्तिचित्र-संग्रहाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी दिलीप माजगावकर  यांनी केलेले भाषण..

————————————————————————
समारंभाचे अध्यक्ष रा. ग. जाधव, ‘तारांगण’ पुस्तकाचे लेखक सुरेश द्वादशीवार, ‘साधना’चे संपादक नरेंद्र दाभोलकर आणि मित्रहो.. सुरुवातीलाच एक गोष्ट मोकळेपणाने सांगतो की, या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी यावं, म्हणून मला डॉ. दाभोलकरांचा फोन आला तेव्हा, इतर काही अडचणींमुळे मी येऊ शकणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी माझ्याकडे विनोद शिरसाठ आले आणि त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या नकाराचा ‘होकार’ करून घेतला. आता मी न येण्यामागचं खरं कारण काय होतं, ते सांगतो. एखादी मुलगी आपल्याला आवडावी, नजरेत भरावी, तिच्याविषयी आपण काही विचार करावा आणि तिचं कोणाशीतरी लग्न व्हावं, इथपर्यंत ठीक आहे. कारण असे अनुभव अनेकांना येतातच. पण त्याच मुलीच्या लग्नाला मंगलाष्टकं म्हणण्यासाठी जाण्याची आपल्यावर वेळ यावी, हा खरोखरच कठीण प्रसंग असतो. या पुस्तकाच्या बाबतीत असंच काहीसं झालं. म्हणजे ‘तारांगण’ ही लेखमाला गेल्या वर्षी ‘साधना’ साप्ताहिकातून क्रमश येत होती तेव्हा मी ती वाचत होतो आणि दोन-चार व्यक्तिचित्रं वाचून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, इथे व्यक्तिचित्रणातला काहीसा वेगळा बाज, काहीसा वेगळा ऐवज आहे आणि हा दागिना आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून मग माझ्या ओळखीच्या मृणाल नानिवडेकर यांच्या माध्यमातून द्वादशीवारांना फोन केला आणि म्हणालो, ‘मला ही लेखमाला आवडतेय. इतर कोणाशी तुमचं बोलणं झालेलं नसेल तर मला हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’कडून करायला आवडेल.’ पण द्वादशीवार म्हणाले, ‘अलीकडेच माझं ‘मन्वंतर’ हे पुस्तक ‘साधना’ने प्रकाशित केलंय. आणि याही पुस्तकात त्यांनी रस दाखवलाय. त्यामुळे साहजिकच हे पुस्तक त्यांच्याकडून येईल.’ तर अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दाभोलकरांनी मला बोलावलं, हे माझ्या नकारामागचं कारण होतं. पण ते काहीही असो, ‘साधना’ने हे पुस्तक चांगलं केलंय. मुलगी खऱ्या अर्थाने सुस्थळी पडली, असं मी मनापासून म्हणतो. आणि द्वादशीवारांना आनंद वाटावा अशी गोष्ट सांगतो की, आजकाल बहुसंख्य प्रकाशकांना प्रकाशनासाठी आलेली हस्तलिखितं परत कशी करावी, ही विवंचना असताना त्यांचं पुस्तक दोन-तीन प्रकाशन संस्थांना प्रकाशित करावंसं वाटणं, ही ‘तारांगण’च्या वाङ्मयीन गुणवत्तेची पावती आहे असं त्यांनी समजावं.

‘तारांगण’ हा १६ व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. (अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, सुरेश भट, बाबा आमटे, राम शेवाळकर, मारोतराव कन्नमवार, प्रमोद महाजन, जन्रेलसिंग िभद्रनवाले, तारकेश्वरी सिन्हा, सविता डेका, राजे विश्वोश्वर राव, चौधरी चरणसिंह, विष्णुदत्त शर्मा, एम. एफ. हुसेन, जनार्दन पांडुरंग) सुंदर व्यक्तिचित्र कसं असतं, तर ती त्या व्यक्तीची लेखकाने वाचकांशी घडवून दिलेली ‘थेट भेट’ असते. त्या भेटीत लेखक उपस्थित असतो, ते केवळ त्या दोघांची ओळख करून देण्यापुरता, किंवा गरज पडली तर ती ओळख पुढे सरकवण्यापुरता! माझ्या कल्पनेप्रमाणे, चांगल्या व्यक्तिचित्रणात लेखक एका मर्यादेपेक्षा जास्त स्वतला वाचकांवर लादत नाही, किंवा त्या व्यक्तीच्या बुरख्याआडून स्वत: वारंवार डोकावूनही बघत नाही. या दोनही निकषांवर द्वादशीवारांची व्यक्तिचित्रं फार सरस उतरली आहेत.

आपल्याला माहीत आहे की, मराठीत व्यक्तिचित्रांची मोठी परंपरा आहे. अगदी चार-सहा नावं सांगायची म्हटली तर श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, विजय तेंडुलकर, ह. मो. मराठे अशी सांगता येतील. अलीकडच्या काळात विनय हर्डीकर, रामदास भटकळ यांनीही चांगली व्यक्तिचित्रं लिहिली आहेत. या सर्व लेखकांनी सातत्याने लेखन करून व्यक्तिचित्रांची ही परंपरा सकस, समृद्ध आणि वाहती ठेवली आहे. या प्रत्येकाचं त्या व्यक्तीकडे बघणं वेगळं आहे. लेखन वेगळं आहे. त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. या पाहण्यात व दृष्टिकोनात कसा फरक पडतो, हे चटकन समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो. माधव आचवल यांच्यावर जवळपास एकाच काळात पु. ल. देशपांडे, सुनीताबाई व विजय तेंडुलकर या तिघांनी लिहिलं आहे. ही तीनही व्यक्तिचित्रं एकाच वेळी व सलग वाचा, म्हणजे मग मला काय म्हणायचंय, ते नेमकेपणाने समजून येईल. ही तीनही व्यक्तिचित्रं उत्तमच आहेत. व्यक्ती एकच आहे, बघणारे तिघे आहेत. तिघेही साहित्यातील मातब्बर आहेत. पण तिघांच्या बघण्यात, दृष्टिकोनात व लिहिण्यात फरक आहे. पु.लं. ना माधव आचवल त्यांच्या अंतर्बाह्य़ गुणदोषांसकट नक्कीच समजलेले असणार. पण तरीही का कोण जाणे, लेखनापुरती पु.लं.नी ‘गुण गाईन आवडी’ अशी भूमिका ठेवलेली असल्याने त्यांच्या लेखनात एक सरळ साधेपणा आणि आज तर काही प्रसंगी भाबडेपणा वाटावा असा भाग वाटतो. तर ‘माधव मला असा दिसला, तो असा होता आणि तो असाच होता,’ असा काहीसा आग्रही व थोडासा उंच स्वर सुनीताबाईंच्या लेखात दिसतो. आणि माधव असा असावा, निदान मला तो असा दिसला, आणि मला दिसला त्यापलीकडे तो बरंच काही होता, पण मला तो समजला नाही, मी जे काही मांडलंय ते तुम्हाला पटतंय का बघा, अशी तेंडुलकरांची भूमिका दिसते. मला व्यक्तिश: तेंडुलकरांची भूमिका आवडते. आणि द्वादशीवारांची भूमिका तेंडुलकरांच्या भूमिकेसारखी आहे, म्हणूनही कदाचित ‘तारांगण’मधील व्यक्तिचित्रे मला अधिक आवडली असतील.

आपल्या भूमिकेबाबत द्वादशीवारांनी प्रस्तावनेतच एक वाक्य असं लिहिलंय की, ‘मला माणूस समजून घ्यायला आवडतो आणि त्यासाठी मी त्याच्या भूमिकेत जाऊन त्या माणसाच्या आनंदाच्या, दुखाच्या, अडचणीच्या, तडजोडीच्या, महत्त्वाकांक्षेच्या ज्या काही जागा असतील, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो..’ माणसं समजून घेण्याची द्वादशीवारांची ही समज फार प्रगल्भ आहे. ते माणसाकडे एकाच खिडकीतून, एकाच कोनातून बघत नाहीत. ते अनेक कोनांतून बघतात. इतकेच नाही तर वाचकालाही ते व्यक्तिचित्र वाचून झाल्यावर त्या व्यक्तीविषयी विचार करण्यासाठी अनेक दिशा मोकळ्या ठेवतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणात त्या व्यक्तीच्या बाह्य़ जीवनाचा तपशील तर वाचकाला मिळतोच, महत्त्वाच्या घडामोडीही मिळतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध द्वादशीवार घेताना दिसतात. आपल्या सगळ्यांनाच दुसऱ्या व्यक्तीविषयी एक प्रकारचं कुतूहल असतं. त्यात ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, बोलते कशी, त्याही पलीकडे ती व्यक्ती एखाद्या प्रसंगात, एखाद्या घटनेच्या वेळी विचार कसा करते, त्यावेळी त्या व्यक्तीचं मानसिक चलनवलन कसं चालतं, हे जाणून घेण्याविषयी अधिक कुतूहल असतं. याच कुतूहलातून द्वादशीवारांसारखा लेखक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते व्यक्तिचित्रण आपल्याला अधिक भावतं, मनावर अधिक परिणाम करून जातं.

चांगलं व्यक्तिचित्रण कसं असतं, याविषयीची या पुस्तकाबाहेरची दोन उदाहरणं सांगतो. नेपोलियनचं चरित्र आपण सर्वानीच त्या- त्या काळात वाचलेलं असतं. नेपोलियन, त्याच्या लढाया, त्याचं सहकाऱ्यांबरोबरचं वागणं याची ढोबळमानाने माहिती आपल्याला असतेच. पण हा नेपोलियन त्याच्या जनरल्सची निवड कशी करायचा, यासंदर्भातील एक मार्मिक आठवण त्याच्या एका चरित्रकाराने सांगितली आहे. तो त्याच्या जनरलची निवड करताना उमेदवाराचा बायोडाटा मागवून घ्यायचा. त्याने केलेल्या लढाया, त्याची घरची परिस्थिती, त्याचं जगणं, वागणं याचा बारकाईने अभ्यास करायचा. पण अंतिम निर्णय घेताना मात्र तो त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारायचा, Tell me, is he lucky? तो नशीबवान आहे का, हे मला सांग; बाकी मला सर्व कळलं. आता ही साधी आठवण नेपोलियनच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन जाते.

दुसरा एक प्रसंग पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या चरित्रातील आहे. इंदिरा गांधींची इंग्रजीत अनेक चरित्रं आहेत. पण पुपुल जयकरांनी लिहिलेलं चरित्र विशेष उजवं समजलं जातं. याची दोन कारणं आहेत. एक तर त्या इंदिरा गांधींच्या निकट होत्या आणि दुसरं म्हणजे त्या जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात असल्याने त्यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाची भक्कम बठक होती. या वैचारिक बठकीतूनच त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघत असत. त्यामुळे ते चरित्र दर्जाच्या दृष्टीने इतर चरित्रांपेक्षा उजवं वाटतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग आहे. संजय गांधींचं विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांच्या शवाशेजारी इंदिराजी उभ्या आहेत. मोठमोठे लोक शोकसमाचाराला येत आहेत. नमस्कार करताहेत. इंदिराजी त्यांच्याशी उपचाराची एक-दोन वाक्ये बोलताहेत आणि मग ते लोक निघून जाताहेत. अटलबिहारी वाजपेयी येतात आणि कसं कोण जाणे, वाजपेयींच्या बोलण्यातून इंदिराजींना असं जाणवलं असावं की, आपल्यावर कोसळलेल्या या प्रसंगामुळे वाजपेयींना आपली कींव येतेय की काय, दया वाटतेय की काय! तेव्हा त्याही प्रसंगात आपली कोणी कींव करावी, दया करावी, हे मानी स्वभावाच्या इंदिरा गांधींना आवडलं नाही. त्यामुळे त्यांना आलेला राग त्यांच्या गॉगलमधल्या डोळ्यांतून जवळच उभ्या असलेल्या पुपुल जयकरांनी बरोबर टिपला. इतकंच नाही, तर आपण किती नॉर्मल आहोत, हे वाजपेयींना कळावं म्हणून इंदिराजींनी वाजपेयींकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या चंद्रशेखर यांच्याशी त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या एका मीटिंगबद्दल जुजबी बोलणं केलं. आता क्षणार्धात घडून गेलेली ही घटना; पण पुपुल जयकर ज्या पद्धतीने बघतात व लिहितात, त्यातून इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वातला संपूर्ण पीळ त्या वाचकांसमोर उभा करतात. ही व्यक्तिचित्रणाची खरी ताकद असते.

द्वादशीवारांच्या लेखनातही अशा अनेक जागा त्या ताकदीने पकडलेल्या आहेत. त्यादृष्टीने नरहर कुरुंदकर, सुरेश भट, अनंतराव भालेराव, बाबा आमटे यांच्यावरचे लेख वाचण्यासारखे आहेत. या पुस्तकातील बहुतेक व्यक्ती तुमच्या-आमच्या माहितीतील आहेत.  व्यक्तीचित्रण केलेली व्यक्ती जेव्हा वाचकांना अनोळखी असते किंवा पूर्णत: काल्पनिक असते तेव्हा त्याचा एक फायदा असा असतो की, वाचकांच्या मनाचा कॅनव्हास त्या व्यक्तीबाबत पूर्ण कोरा असतो. पण ती व्यक्ती माहितीची असेल किंवा प्रसिद्ध असेल तर वाचकांच्या मनावर त्या व्यक्तीविषयीचं काही ना काही रेखाटन झालेलं असतं. त्यातून ती व्यक्ती कौतुकाची, प्रेमाची, अतीव आदराची असेल, तर त्या व्यक्तीबद्दलचा एखादाही विपरीत सूर वाचकांच्या मनावर ओरखडा उमटवून जाऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीच्या राजकीय विचारांमुळे, सामाजिक पाश्र्वभूमीमुळे, कौटुंबिक परिस्थितीमुळे वाचकांच्या मनात राग असेल तर त्या व्यक्तीविषयी लिहिताना लेखकाची कसोटी असते. या पुस्तकातील बहुसंख्य व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत या कसोटीला द्वादशीवार उत्तम पद्धतीने उतरले आहेत. उदाहरणार्थ, या पुस्तकातील जन्रेलसिंग िभद्रनवाले हे व्यक्तिचित्रण वाचा. िभद्रनवाल्याचा तो २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळातील पंजाबमधील दहशतीचं वातावरण आठवा. त्या वातावरणात घडत गेलेली िभद्रनवाल्याची मतं आणि त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या बोलण्यातला प्रेमळपणा तसाच खुनशीपणा या सर्वाचे तपशील तर द्वादशीवार देतातच; पण मध्येच विचारांचा रूळ झटकन बदलतात आणि लिहून जातात- ‘आतापर्यंत खोमेनीच्या शीख अवताराची जागा एका सामान्य शीख गृहस्थानं घेतल्याचं लक्षात येतं. त्याच्या शस्त्रांची आता वाद्यं झालेली असतात. आईच्या हाताला असलेल्या चवीची आठवण मनात ठेवणारा तो सामान्य मुलगा झालेला असतो. िभद्रनवाल्यांचा हा हळवा क्षण पकडायला एखादा गांधी असता तर..’
द्वादशीवारांच्या व्यक्तिचित्रणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची शैली. कोणीतरी जाणकार समीक्षकाने द्वादशीवारांच्या लेखनशैलीचा अभ्यास करायला हवा. एकच वैशिष्टय़ त्या शैलीचं सांगतो. एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सांगताना ही लेखणी जशी तालेवार भाषा वापरते, तीच लेखणी त्या व्यक्तीचा हळुवारपणा, खेळकरपणा सांगताना त्याच्या चांगल्या खोडय़ाही काढू शकते. त्यांच्या शैलीचं सामथ्र्य दाखवणारं या पुस्तकातील सर्वात चांगलं व्यक्तिचित्र जनार्दन पांडुरंग यांचं आहे (त्यांच्या वडिलांचं). या पुस्तकात हे व्यक्तिचित्र सर्वात शेवटी आहे. हे जाणीवपूर्वक शेवटी टाकलंय काय, हे मला माहीत नाही. पण ते शेवटी टाकलंय, हे फार चांगलं केलं आहे. कारण ते व्यक्तिचित्र वाचल्यावर खरोखरच पुस्तक बंद करून आपण थांबावं असं वाटतं. ‘जनार्दन पांडुरंग’ हे औपचारिक नाव द्वादशीवारांनी घेतलंय, यातून त्यांचे वडिलांबरोबरचे संबंध लक्षात येतात. या व्यक्तिचित्रणातील अनेक जागा सांगता येतील. या व्यक्तिचित्रणाची सुरुवातच त्यांनी किती मनात घुसणारी केली आहे, ते पहा.. ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे..’ या वाक्याने या व्यक्तिचित्रणाची त्यांनी सुरुवात केली आहे. मी तुम्हाला सांगतो, भल्या भल्या लेखकांना हे वाक्य लिहिता येणार नाही. ते पुढे लिहितात, ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला लीलया पेलून धरणारा दांडगा उत्साह आपल्या लहानखुऱ्या देहयष्टीत धारण करणाऱ्या या माणसात वाहून जाण्याचा दोष होता.’ या दोन वाक्यांत पुढे काहीतरी वेगळं वाचायला मिळणार, याच्या खुणा मिळून जातात आणि खरोखरच पुढे हे व्यक्तिचित्रं अनेक वाटा-वळणाने वाहत राहतं आणि शेवटी एका जागी तर अंतर्मुख करून जातं. द्वादशीवार लिहितात, ‘तुरुंगात शिक्षेत सूट मिळाल्यावर जनार्दन पांडुरंग एका मध्यरात्री अचानक घरी आले. येताना त्यांनी तुरुंगात स्वत विणलेल्या जाडजूड सतरंज्या बरोबर आणल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीवर माझं नाव कोरलेलं होतं.’ या व्यक्तिचित्रात द्वादशीवारांचा प्रत्येक शब्द तर आपल्याशी बोलतोच बोलतो, पण त्या वाक्यातील विरामसुद्धा एक प्रकारचा संवाद साधतात, इतकं ते प्रभावी झालं आहे. हे व्यक्तिचित्र वाचताना मनाला खूप उदासी वाटते. कारण जनार्दन पांडुरंगाच्या आयुष्यात अनेक उलटसुलट घटना घडत गेल्या. पण त्या घटना वाचतानाही असं वाटतं की, द्वादशीवार आपल्या वडिलांचं चित्रण करतानाही विनाकारण हळवेपणाचं ओझं आपल्या लेखणीवर ठेवत नाहीत, वा नाटकी वाटावं, खोटं वाटावं, बेगडी वाटावं असा दूरस्थपणाही त्यांची लेखणी धारण करत नाही. त्यांची लेखणी त्यांच्या स्वभावातला हळुवारपणा, समजूतदारपणा फार चांगल्या पद्धतीने टिपत पुढे जाते आणि आपल्याला अंतर्मुख करून टाकणारं काहीतरी त्यातून मिळतं.

या पुस्तकातील कुरुंदकरांचं व्यक्तिचित्र वाचताना माझ्या मनात अशी शंका होती की, यात आता द्वादशीवार वेगळं असं काय लिहिणार आहेत? कारण कुरुंदकरांबद्दल इतकं लिहून, सांगून झालेलं आहे. कुरुंदकर गेल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्यावर एक स्मृतिग्रंथ काढला होता. स्मृतिग्रंथ अथपासून इतिपर्यंत वाचनीय कसा असू शकतो, याचा आदर्श वाटावा असा अडीचशे-तीनशे पानांचा ग्रंथ होता. त्यामुळे यापलीकडे कुरुंदकर या लेखातून काही दिसतील का, असे वाटले होते. पण त्यातही दोन-चार जागा अशा आहेत की, द्वादशीवारांनी माझा अंदाज खोटा ठरवला. विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला उभे राहिल्यावर कुरुंदकर पहिलं वाक्य काय बोलले, तो प्रसंग किंवा कॉलेजमध्ये एक मोठय़ा विदुषी आल्या असताना छायाचित्राच्या निमित्ताने एक विनोदी घटना घडली, त्यावेळचं कुरुंदकरांचं बोलणं आणि वागणं. हे प्रसंग कुरुंदकरांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा व बौद्धिक शार्पनेस दाखवणारे आहेत.

द्वादशीवारांच्या इतर व्यक्तिचित्रणातील अशा अनेक प्रसंगांबद्दल बोलता येईल. पण त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना संयम फार चांगला कळतो. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना असं वाटत राहतं की, द्वादशीवारांना या व्यक्तीची यापलीकडे माहिती आहे, पण ती ते सांगत नाहीत. कोणाविषयी, काय, किती आणि केवढं लिहावं, याचं भान त्यांना पक्कं राहिलेलं आहे. त्यामुळे कोणतंही व्यक्तिचित्र पाल्हाळिक झालेलं नाही आणि आता हे संपावं, असं न वाटता ‘अरे, आता एकच पान राहिलं का?’ असं वाटून व्यक्तिचित्र संपतं. ही त्यांच्या लेखणीची जागरूकता लक्षात घेता त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना मी तो संयम पाळायला हवा, नाहीतर त्यांच्या पुस्तकाने मला काहीच दिलं नाही, असं म्हणावं लागेल.

मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेते महात्मा गांधींना आदर्श मानतात. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले, उखडले गेले तर ‘ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात’, असे जगभर म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा मान मिळतो; याची पोटदुखीच ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, त्यातून त्यांचाच वंशवाद प्रकट होतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही. जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘ग्रेट सोल-महात्मा गांधी अॅण्ड हीज स्ट्रगल विथ इंडिया’ या पुस्तकाने सध्या सर्वत्र (विशेषत: भारतात) वादळ उठवले आहे. महात्मा गांधी यांना समलिगी आणि वंशवादी संबोधणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याचा (नेहमीचा) उपाय भारतात अवलंबला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपित्याविषयी अशी खळबळजनक विधाने करण्याच्या पश्चिमी प्रवृत्तीबद्दल आपल्याला काय वाटते? – अशी पृच्छा करणारे पत्र ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्यास असणारे ज्येष्ठ संपादक गोविद तळवलकर यांना इ-मेलद्वारे पाठवले होते. त्या पृच्छेला गोविदरावांनी पाठवलेले हे उत्तर अशा प्रासंगिक विवादांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कसा असावा; याचा जणू वस्तुपाठच ठरावे.

————————————————————————–

३० मार्च २०११

स.न.वि.वि.,

तुमची त्रोटक इ-मेल मिळाली. जोसेफ ललीव्हेल्ड हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे एक काळ संपादक होते. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात त्याच पत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. दक्षिण आफ्रिकेसंबंधी त्यांनी या अगोदर पुस्तक लिहिले आहे. त्यांचे महात्माजींच्या संबंधीचे पुस्तक मी अजून वाचले नाही. परंतु ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या दैनिकात दर शनिवारी पुस्तक परीक्षणे येतात. परवाच्या शनिवारी या पुस्तकावर पानभर परीक्षण आलेले वाचले. तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’ या दोन दैनिकांतील परीक्षणे वाचली.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर दोन परीक्षणे दोन वेगळ्या दिवशी छापली आहेत. त्यापैकी एक हरी कुंझरू यांचे आहे. ते बहुधा अमेरिकेतच राहत असावेत. कुंझरू हे कादंबरीकार आहेत. त्यांनी तर ललीव्हेल्ड यांचे पुस्तक न्याय्य व विचारपूर्ण असल्याची शिफारस केलेली दिसेल !

आपल्याकडे वृत्तसंस्थेचे वृत्त प्रसारित झालेले दिसते. ‘वॉलस्ट्रीट जर्नल’मध्ये परीक्षण लिहिणारे अॅण्ड्र्यू रॉबर्ट्स हे इतिहासविषयक लिखाण करीत असतात. ते ललीव्हेल्ड यांच्याच मताचे दिसतात.

मराठी वृत्तपत्रांत जो मथळा वाचला तो समलिगी संभोगाबद्दल. त्याचा प्रत्यक्ष उल्लेख परीक्षणात आढळला नाही; पण अप्रत्यक्ष एक उल्लेख आहे तो जर्मन ज्यू गृहस्थ हर्मन कॅलेनबाख याचा. तो स्थापत्यशास्त्रज्ञ व शारीरिक व्यायामाचे धडे देणारा होता. नंतर त्याने गांधींना अकराशे एकर जमीन दिली व तिथेच गांधींनी टॉल्स्टॉय आश्रम स्थापन केला. कॅलेनबाख याचे शरीर अर्थातच कमावलेले होते. तो गांधींना व्यायामाचे धडे देत होता की नाही, हे परीक्षणावरून समजत नाही. पण त्याच्यासारख्या माणसाचे शरीर कमावलेले असणारच. त्याची प्रशंसा गांधींच्या पत्रात आहे.

त्याचा फोटो गांधींच्या झोपण्याच्या खोलीत होता. गांधींनी आपल्या पत्नीला दूर ठेवले होते, असा निष्कर्ष लेखक काढतो; पण खुद्द गांधींच्या पत्राचा वगैरे हवाला देत नाही. तो सर्व परिच्छेद हा लेखकाने अगोदर निष्कर्ष काढून मग दिल्याचा संशय येतो. ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’मध्ये परीक्षण लिहिणाऱ्याने ललीव्हेल्ड हे याच बाबतीत नव्हे तर अनेक वेळा कोणत्या आधारावर विधाने करीत आहेत याची नोंद करण्याचे टाळतात, असे म्हटलेच आहे.

या संबंधात एक-दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. लेखकाने जो मजकूर अवतरणचिन्हांत दिला आहे तो गांधींच्या समग्र वाङ्मयाच्या एखाद्या खंडात असेल. लेखकाच्या पुस्तकात त्या खंडाचा क्रमांक व पान नंबर असू शकेल. तेव्हा हे चरित्र व गांधींचे खंड यांचे वाचन सत्य शोधण्यासाठी करून मगच निष्कर्ष काढणे योग्य होईल.

ग्रंथलेखक हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा संपादक होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा एक विशेष हा की, तो समलिगी संभोगाचा भक्कम पाठिराखा आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेमध्ये या प्रकारच्या संबंधाचा पंथ वाढत असून, अध्यक्षीय निवडणुकीतही हा प्रश्न चर्चेचा व महत्त्वाचा मानला जातो. वस्तुत: इंग्लंड व युरोपमध्ये या प्रकारचे संबंध हे गेल्याच शतकात नव्हे तर त्याही अगोदर प्रचलित होते. तिथे याची चर्चा वा प्रदर्शन होत नाही. अमेरिकेत मात्र या प्रकारच्या संबंधाच्या लोकांनी कामगार संघटना चालवावी तशी संघटना चालवली आहे. ती मोर्चे काढते आणि ‘टाइम्स’ प्रसिद्धी देतो. टिबकटुमध्ये कोणी समलिगी संभोगाचे दोघेजण असले तरी ‘टाइम्स’ त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करील. तेव्हा गांधींच्या काही वाक्यांचा विकृत बुद्धीने उपयोग करून आपल्या आवडत्या पंथाला मोठा आधार मिळत असेल तर हा ‘टाइम्स’वाला ग्रंथलेखक तो देण्यास चटकन तयार होईल यात शंका नाही.

गांधींनी त्यांच्या कामवासनेसंबंधी व कामजीवनासंबंधी बरेच लिहिले आहे. गांधींच्या बरोबर नौखालीतील शांतीयात्रेत फिरणाऱ्या एका गांधीवादी बंगाली गृहस्थांनी ५५ सालात लिहिलेल्या पुस्तकात हे सर्व लिहिले होते. आचार्य अत्रे व मी ५५-५६ मध्ये एकदा अचानक डेक्कन क्विनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या हातात तो ग्रंथ होता आणि अत्र्यांनी त्या ग्रंथात काय आहे ते प्रवासात रंगवून सांगितल्याचे आठवते. पण त्या पुस्तकात समलिगी संभोगाचा विषय असल्याचे अत्र्यांनी सांगितले नाही. हा विषय संपल्यावर स्टिफन झ्वाइग याने लिहिलेल्या बाल्झॅकच्या चरित्राच्या विषयावर आमच्या गप्पा झाल्या आणि त्या काळात आचार्य हे तुकोबांवर कीर्तने करत असल्यामुळे त्यांचे याच विषयावर अतिशय रसाळ विवेचन ऐकले. गांधी कामवासनेसंबंधी स्वत:चीच परीक्षा घेत असत, ते त्यांना कामवासनेतून पूर्णत: मुक्त होण्याची आस होती म्हणून. आपण जर इतरांना ब्रह्यचर्याचा उपदेश करतो, तर आपली वासनासुद्धा संपुष्टात आली आहे की नाही, याचा तपास ते घेत होते.

ग्रंथलेखक हा कमालीचा गांधीद्वेषाने पछाडलेला असावा. तो लिहितो की, हरिजन, मुसलमान व आफ्रिकन यांच्याबद्दल गांधींना तिरस्कार होता. त्याने काही उतारे दिले आहेत. ते तपासल्याशिवाय त्याबद्दल लिहिणे बरोबर नाही. पण लेखक विकृत निष्कर्ष काढण्यात आणि भलतेच तर्क करण्यात तरबेज आहे.

एक उदाहरण आहे ते म्हणजे हरिजनांना राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांच्या निवाड्यात होती; पण गांधींनी त्याच्या निषेधार्थ उपोषण केले. त्यांचे म्हणणे असे होते की, हरिजन हे हिदूच आहेत आणि म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नयेत. या मतदारसंघाची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली होती. पण गांधींचे प्राण उपोषणात धोक्यामध्ये येतात हे पाहून बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघाची मागणी सोडून दिली. पण दलितांना काही न्याय हवा ही त्यांची मागणी होती. म्हणून मग निवडणूक कायद्यात तेव्हा बदल करण्यासाठी एक समिती नेमण्यास गांधी तयार झाले. तीत पंडित मालवीय यांच्यासारखे परंपरावादी होते. त्यांनी असे काही बदल कायद्यात केले की, दलितांना न्याय न मिळता अन्यायच होईल. त्यात सुधारणा न करून गांधींनी चूक केली. पण गांधी दलितविरोधी होते आणि मंदिरप्रवेशालाही त्यांचा विरोध होता हे ग्रंथलेखकाचे विधान निराधार आहे. त्याने गांधींच्या उपोषणाचा विषय ऐतिहासिक संदर्भ वगळून हाताळला आहे.

नौखालीत गांधींची नात मनू तेथील पेटलेल्या वातावरणास घाबरली आणि आपण मरू, असे वाटून घरी परत आली. तेव्हा तू मेली असतीस तरी चालले असते. इतकेच नव्हे तर आपल्याबरोबरचे सर्व मेले असते तरी चालले असते, असे गांधी म्हणाले, त्या अर्थी ते किती भावनाशून्य होते, असे लेखक विचारतो. पण अहिसा आणि नौखालीत पेटलेली आग शमवणे ही गांधींची उद्दिष्टे होती; आणि त्यासाठी मृत्यू आला तरी ते मोठे समाधानाचे आहे, अशी त्यांची ध्येयवादी वृत्ती होती.

अहिसेवरील उत्कट निष्ठेमुळे गांधींनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटलरला पत्र लिहिले व ‘प्रिय मित्र’ असा त्या पत्राचा मायना होता. हे पत्र गांधींनी व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्याकडे धाडले होते. परंतु लिनलिथगो यांनी ते न धाडता स्वत:कडेच ठेवले. गांधींनी त्या पत्रात हिटलरला गोंजारले होते आणि हिसाचाराचा त्याग करण्यास सांगितले होते. युद्धपूर्व काळात गांधी इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी गेले असता वाटेत रोममध्ये मुसोलिनीची त्यांनी भेट घेतली होती. पण याचा अर्थ त्यांना हिटलर व मुसोलिनी यांचे राजकारण पसंत होते असे नव्हे. कोणालाही असा पुरावा देता येणार नाही.

ललीव्हेल्ड यांनी न्याय्य लिखाण केल्याचे शिफारसपत्र हरी कुंझरू देतात. त्यांनी हिटलरसंबंधात गांधींचे पत्र देऊन न थांबता टॉयनबी या इतिहासकाराचे व खुद्द अमेरिकन लोकप्रतिनिधींचे वर्तन काय होते, हेही सांगायला हवे होते. गांधींनी हिटलरला हिसाचाराचा त्याग करण्याचे आवाहन पत्रात केले होते.

युद्धपूर्व भेटीमुळे टॉयनबी हिटलरवर खूश झाला व तो शांततावादी असल्याचा निर्वाळा त्याने जाहीरपणे दिला. मग युद्ध सुरू झाल्यावर आपल्या वृत्तपत्रीय मुलाखतीस विकृत स्वरूपात प्रसिद्धी मिळाली, अशी तक्रार करून त्याने कांगावखोर-पणा केला. ट्रेव्हर-रोपर हे नाणावलेले इतिहासकार होते. त्यांनी टॉयनबीचा हा दुटप्पीपणा तेव्हा व नंतर जगापुढे मांडला होता.

हिटलर व मुसोलिनी यांनी युरोपपुढेच नव्हे तर जगापुढे मोठे संकट उभे केल्याची जाणीव तेव्हांचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना झालेली होती. परंतु अमेरिकेच्या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सभासद पहिल्या युद्धानंतर केलेल्या तटस्थतेच्या ठरावाचा आग्रह धरूनच होते. हिटलरने ब्रिटनवर हल्ला केला तेव्हा रुझवेल्ट मदत पाठवू पहात होते; पण अमेरिकन काँग्रेसचा विरोध होता. तेव्हा ब्रिटनमध्ये अमेरिकेचे राजदूत होते केनेडी यांचे वडील जोसेफ. त्यांनी कळवले की, ब्रिटन टिकाव धरणार नाही; आपण हिटलरबरोबर व्यापारासंबंधी करार करावा, तो कमालीचा फायदेशीर होईल. रुझवेल्ट यांनी बदसल्ला न ऐकता जोसेफ केनेडींना परत बोलावले.

गांधी व टॉयनबी तसेच केनेडी यांच्या वर्तनांची तुलना करणे ललीव्हेल्ड यांनी टाळले हे न्याय्य मानायचे असेल तर गोष्ट वेगळी.

गांधींना मुसलमान विरोधी ठरवणाऱ्या या लेखकाने गांधींनी कलकत्ता व दिल्लीत मुसलमानांना वाचवण्यासाठी उपोषण केले आणि अखेरीस ते एका हिदू खुन्याच्या गोळीला बळी पडले हे लक्षात घेतले नाही. इतकेच नव्हे तर गांधी वंशवादी असल्याचा अत्यंत बेशरमपणाचा आरोप लेखकाने केला आहे. वस्तुस्थिती उलटी आहे.

अमेरिकेत आफ्रो-अमेरिकनांना दीर्घ काळ गुलाम म्हणून वागवले जात होते. तसेच रोझेन्थॉल व इतर न्यूयॉर्क टाइम्सचे भारतात काम करण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे कमालीची भारतविरोधी वार्तापत्रे धाडत होते. अशा या लोकांना गांधींसारख्या हिदी नेत्याचा जगभर अनेकदा गौरव होतो, मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेतेही गांधींना आदर्श मानतात, हे सहन होत नाही. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले वा उखडले गेले तर ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात असे जगभर म्हटले जाते. अमेरिका ही महासत्ता म्हणून मिरवत असता त्यातल्या वा युरोपांतल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा सार्वत्तिक मान मिळतो याची पोटदुखी ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, यातून त्यांचाच वंशवाद प्रगट होत आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

आपला,

– गोविद तळवलकर

( govindtalwalkar@hotmail.com)

सौजन्य – लोकसत्ता

कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. शरद पाटील हे अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व असून त्यांनी इतिहासाकडे अत्यंत वेगळ्या व चिकित्सक दृष्टीने पाहून अत्यंत विचारप्रवर्तक अशी पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की – गायनॉक्रसी अँड मॉडर्न सोश्ॉलिझम, खंड – ४’ या पुस्तकाचे गेल्या महिन्यात प्रकाशन झाले. हे पुस्तक मौजाई प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. कॉ. शरद पाटील यांच्या या तसेच अन्य ग्रंथांतील संदर्भ देत मधु शेटय़े यांनी प्राचीन भारत, तेथील परंपरा, समाजरचना व मार्क्‍सवादी विचारधारा यासंबंधी विवेचन केले आहे. त्यातील मातृसत्ताक पध्दतीबद्दलची मांडणी थोडक्यात येथे देत आहोत.

भारताचा समाजवादी लोकशाहीचा स्वतंत्र मार्ग असू शकतो का? सोव्हिएत युनियनचे पतन, चीन आणि इतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी भांडवलदारी मार्ग स्वीकारल्यामुळे या समस्येवर जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये विपुल चर्चा झाली आहे आणि होत आहे.

जागतिक साम्राज्यवादी भांडवलशाहीच्या अरिष्टाची चर्चाही होत आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भांडवलशाही व साम्राज्यवादी पर्याय कुंठित झाले आहेत. भारतातील दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे राजकारण कोंडीत सापडून पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतून त्यांची सत्ताही संकटात सापडली आहे. अशा अरिष्टग्रस्त परिस्थितीत भारतातील समाजवादी लोकशाही क्रांतीचा मार्ग काय असावा यांवर ठाम मार्गदर्शक दार्शनिक ऐतिहासिक कामगिरी सत्यशोधक मार्क्‍सवादी कॉ. शरद पाटील यांनी आपल्या ‘दास क्षुद्रांची कामगिरी’पासून ते ‘आदिम साम्यवाद, मातृशासन, स्त्री सत्ता आणि आधुनिक समाजवाद’ याच्या चार खंडांतून तसेच अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, सामंती सेवकत्वाचा प्राचीन इतिहास विकसित करून जे सर्जनशील प्रतिभावंत कार्य केलेले आहे ते भारताच्या आधुनिक समाजवादी पर्यायांमध्ये अभूतपूर्व म्हटले पाहिजे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी या स्वयंप्रज्ञ नेत्याला त्यांच्या स्वतंत्र संशोधनाला मदत तर राहोच पण बहिष्कृत करावे यात प्रस्थापित कम्युनिस्टांचा अध:पातच उघड आहे. नवा माणूस विकसित कसा करावा अशी समस्या आजवर डाव्या आंदोलनातील विचारवंतांच्या विवंचनेचा विषय होता. पण त्यासाठी प्राचीन भारतातील समाजव्यवस्थेच्या मुलगामी संशोधनाचीच ऐतिहासिक नितांत गरज होती. ती भरून काढण्याचा निर्धार करुन कॉ. शरद पाटीलांनी जे संशोधन मांडले आहे त्यासाठी त्यांना दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या बाहेर पडून आदिवासी, ग्रामीण विभागात मार्क्‍सवादी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करावी लागली. त्याचप्रमाणे प्राच्य विद्येची संस्कृत, मागधी, पाली इत्यादी भाषांतून दोन तपाहून खास अभ्यासपूर्वक संशोधन करून त्यांनी ही मांडणी केली आहे.

कार्ल मार्क्‍स ने ‘भांडवल’च्या पहिल्या खंडात क्रयवस्तूंचे विश्लेषण मांडले आहे. मार्क्‍सच्या सहकाऱ्यांनी  ते सोपे करून मांडण्याची सूचना केली. त्यावर मार्क्‍स म्हणतो की, शास्त्राला सोपे करणारा राजमार्ग नाही. कॉ. शरद पाटील म्हणतात की, अकोला जेलमध्ये कॉ. बी. टी. रणदिवे यांना त्या प्रकरणावर माझे टिपण दिले होते (१९६२-६३). पण कॉ. रणदिव्यांकडून त्यावर स्पष्टीकरण आलेच नाही. शरद पाटील हे मार्क्‍सवादी पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडले व मार्क्‍सवादी पक्षाकडून बहिष्कृत झाले. १९७८ साली त्यांनी ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्ष’ आदिवासी भागात स्थापन केला.

मार्क्‍सने ‘भांडवल’ ग्रंथात भांडवलशाही जगातील अंतर्विरोध दाखविले आणि ते इतक्या विकोपाला जातील की भांडवलशाही कोसळेल असे भाकित मांडले. शरद पाटील हे कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्य कचेरीत स्टाफ आर्टिस्ट होते. त्याच सुमाराला राहुल सांकृत्यायन मुंबईत हिंदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करीत असताना (१९४६-४७) राहुलजींनी भारतीय मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात येण्याची विनंती आपल्या भाषणात केली. पण दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांमध्ये आम्ही वाचले की राहुल सांस्कृत्यायन यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोव्हिएत युनियनमध्ये शेतीच्या सामुदायिकीकरणातून संकट निर्माण झाले होते आणि अन्नधान्याची आयात करावी लागली. विज्ञानात जेनेटिक्सची संभावना भांडवलदारी विचार करण्यात आली. आयकॅन पावलोव्ह (१८४९-१९३६) याला सिग्मंड फ्रॉईडपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यात आले. ब्रिटिश मार्क्‍सवादी साहित्यिक व समीक्षक ख्रिस्तोफर कॉडवेल याने फ्रॉईडच्या नेणीवेच्या सिद्धांताचा पुरस्कार केला असताना कॉडवेललाही नाकारण्यात आले कारण त्यामुळे मार्क्‍सवादी व कम्युनिस्टांच्या मार्क्‍सच्या एकप्रवाही ज्ञानशास्त्राला आव्हान मिळत होत. अशा पध्दतींमुळेच  सोव्हिएत युनियन तत्वज्ञानात ठोकळेबाज राहिले आणि मार्क्‍सवादी आणि कम्युनिस्ट हे आजही तीच री ओढत आहेत. अखेरीस पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी संकटग्रस्त डाव्या आघाडीच्या कटू अनुभवातून गेल्यावर (५ जानेवारी २००८ रोजी) वैफल्याने समाजवाद अव्यावहारिक आहे आणि बुद्धदेव भट्टाचार्याना पाठिंबा देताना भांडवलशाहीचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली.

प्राथमिक साम्यवाद, मातृशासन आणि स्त्रीसत्ता हे प्रकरण तर समाजशास्त्रज्ञांसाठी (भारतातील) मोठेच कोडे आहे. शरद पाटील यांनी पाश्चिमात्य बिफ्रॉ, मॉर्गन यांचे संशोधन भारताला कोठे लागू पडते त्याची उदाहरणे तर दिलीच आहेत पण भारतीय संदर्भात आद्य व्याकरणकार संकटायनापासून पाणिनीपर्यंत भाषातील धातूशास्त्रापासून मातृशासन आणि स्त्रीसत्ता ही साऱ्या जगातील सर्वात प्राचीन व्यवस्था भारतातच नव्हे तर जगातील भौगोलिक खंडातून किती प्रभावी होती व तीतूनच स्वातंत्र्य, समता आणि मित्रत्व ही तत्कालिन समाज व्यवस्थेची तत्व यांचे विश्लेषण नव्याने मांडले आहे. उदाहरणार्थ, गण समाज हा स्त्रीसत्तेचाच होता. नंतर ‘कुल’ आणि ‘ज्ञाती’ यांची समिती पुरुषांनी स्थापन केली. भारताप्रमाणेच चीनमध्येही तशीच व्यवस्था मातृशासित ‘मोसुओइस्ट’ होती. महायान बुद्धिझम (इ.स.वि. १०० शतकापुढे) भारतीय बुद्धिझम शिकण्यासाठी तिबेटच्या लामांनी नालंदामध्ये महाविहारातून त्याची मांडणी केली होती. बुद्धिस्ट यात्रेकरू आंध्रमधील श्रीशैल या धर्मस्थानातून यात्रा करीत कारण ते स्त्रीराज्य होते. स्त्रीसत्तात्मक तांत्रिझमचे त्या काळात प्रभावी स्थान होते. त्यांनी चीनला गेल्यावर चीनमधील दिग्नाग विचारपीठाची स्थापना केली आणि नेणीवेच्या संकल्पनेचा बोध आणि शोध सुरू केला.

चीनमधील ‘मोसुओइस्ट’ यांना ते मातृशासित असल्यामुळे सर्वोच्च स्थान आहे. त्यांची लोकसंख्या ३० हजार असून ते युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर राहातात. त्यांची स्वतंत्र भाषा असून तिची लिपी नाही. उत्तर आफ्रिकेत काबाईल  प्रदेशात मातृसत्ताक वस्ती आहे. इटलीमध्ये एट्रस्कॉन वस्तीतही मातृसत्ताक धर्तीवरची लैंगिक समता आहे. पॅसिफिक महासागरातील वनाटीनाईज वस्तीमध्ये मातृसत्ताक पद्घती आहे. केरळमध्ये मल्याळी लोकांत मातृसत्ताक शासन मौर्यकालापर्यंत होते हे शरद पाटलांच्या पूर्वीच्या दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या खंडात विस्तृतरित्या दिले आहे. इंडोनेशियामध्ये पश्चिम सुमात्रा प्रदेशात आजही ‘मिनांगनॉस’ या प्रदेशात मातृसत्ताक समाज आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिमेकडील प्रदेशात प्युब्लोज, होपीज आणि झुनीस या प्रदेशातील भागात मुलांना जन्म देणारी म्हणून स्त्रीदेहाला धार्मिक पावित्र्य मिळते. मनुष्यजन्म आणि शेती उत्पादन ही आदिम समाजात सर्वश्रेष्ठ माया (जादू) समजली जाते. या प्रदेशात स्कसंबंधांमुळे माता स्त्री कुळांना गणांचे स्वरूप देते. गण हे तांत्रिकी श्रुतीचे अपत्य आहे, वैदिकी नव्हे. युरोपात सोआमी जमातीत आजीची सत्ता असते. उत्तर आफ्रिकेत त्वारेगल (पश्चिम सहारा) ही मातृशासित जमात आहे आणि स्त्रियांपुरतीच शिक्षणाची तरतूद मर्यादित आहे. पश्चिम आफ्रिकेत गिनी बिसॉ येथे महिलाच कुटुंबप्रमुख आहे. या प्रदेशातील हौसा भागात १७ राज्यांच्या घराण्यांची सत्ता होती. तसेच टोगोमध्ये व्यापार महिलांच्या हाती आहे. अरबांमध्ये दक्षिण अरबस्तानातील कृषी प्रदेशात अभिजात स्त्रीसत्ता नांदत होती. महंमदी धर्मापूर्वी तेथील स्त्रियांना नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य होते तर येमेन हे स्त्रीसत्ताकच होते. उत्तर अमेरिकेत विवाहित स्त्रियांना मालमत्ता मालकीचा अधिकार होता. आणि वारसाहक्क स्त्रियांमार्फत प्रस्थापित होई. कॅनडामध्ये मोन्टमनेन-नस्कापी  येथे स्त्रियांना समाजात श्रेष्ठ मान होता. उत्तर अमेरिकेत मातृशासित समाजात स्त्रिया आपले प्रतिनिधी पंचायतीत निवडून देत. स्त्रिया कुळप्रमुख समजल्या जात. स्त्रियांच्या कौन्सिलमधील प्रतिनिधींतून युद्धप्रमुख स्त्रीला प्रिय महिला अशी उपाधी होती. प्वेब्लोमध्ये स्त्रियांच्या संतती उत्पादकतेमुळे त्यांना सर्वश्रेष्ठ मानमरातब मिळत होता. झुनी प्रदेशात धर्मात प्रवेश करण्याचा अधिकार महिलांना होता. ते जमिनीला आई मानीत, तिच्यातील धान्याला बालके समजत आणि शिकारीच्या जनावरांना पितृस्थानी मानीत. स्त्रियांना जगातील मध्यवर्ती स्थान असे. नवडो प्रदेशातील संस्कृती मातृसत्ताक आहे. तेथे स्त्री सत्तेवर असून स्वतंत्र आहे.

संदीप वासलेकर, सौजन्य – लोकसत्ता

भारताने भविष्याला सामोरे जाण्यासाठी कोणती दिशा निवडायची? आपल्याला नक्की काय व कसे साध्य करायचे आहे? कोणता देश वा कोणती पद्धती आदर्श मानता येईल? हे व अशा प्रकारचे प्रश्न आजच नव्हे, तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचारले जात आहेत. आजही काहींना वाटते, की भारताने महासत्ता व्हावे. काहींच्या मते तर आपण २०२० साली महासत्ता होऊनसुद्धा! पण महासत्ता होऊन तरी काय करायचे? महासत्ता होण्यासाठी अक्राळविक्राळ लष्करी सामथ्र्य, अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे आणि आक्रमकता असावी लागते. मग भले कोटय़वधी लोक भुकेकंगाल, मागासलेले आणि उजाड झालेले का असेनात! काहींना वाटते आपण बलाढय़ ‘हिंदू राष्ट्र’ व्हायला हवे तर काहींना वाटते भारताने समाजवादाचे स्वप्न साकार करावे. अशा अनेक कल्पना.. संदीप वासलेकर, अशी कोणतीच दिशा सांगत नाहीत, कारण ते ‘एका दिशेच्या शोधात’ आहेत. याच नावाचे त्यांचे पुस्तक लवकरच ‘राजहंस प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. वासलेकरांचा अभ्यासाचा आणि जगप्रवासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषयही तोच आहे, जवळजवळ सर्व जग एकदा नव्हे तर अनेकदा जवळून पाहिलेल्या वासलेकरांचा ध्यास आहे तो भारतच एक आदर्श देश व्हावा हा! पण तो ‘आदर्श’ व्हायचा तर जगातील अनेक देशातील आदर्श पद्धती, तसे चारित्र्य, तसा व्यवहार, तसा समाज निर्माण करावा लागेल. आज जगातील कोणताच देश सर्वार्थाने आदर्श नाही, पण अनेक देशांमधल्या काही बाबी अनुकरण कराव्या अशा आहेत. त्या एका शोधयात्रेतून वाचकांसमोर ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ठरवायचे आहे, दिशा कोणती? वासलेकर ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ (एसएफजी) या ‘थिंक टँक’चे संस्थापक आहेत आणि जगातील अनेक सरकारांचे सल्लागारही आहेत. त्यांच्या मते भारताकडे अनेक अंगभूत गुण व सुप्त सामथ्र्य आहे; साधनसामग्री व बौद्धिक उंची आहे आणि तरीही आपण गरीब आहोत, अविकसित आहोत, तसेच उपेक्षितही आहोत! गेल्या काही दशकात आपण अर्थकारण आणि हाय-टेक, लोकशाही आणि आधुनिकता यात बरेच काही साध्य करूनही मंजिल अब भी दूर है! तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या ‘दिशेच्या शोधा’तील एका प्रकरणातील काही भाग..

अमेरिकेत वा अन्य देशांत स्थायिक होण्यासाठी फिरणारी, स्वत:च्या देशाबद्दल नाऊमेद व उदासीन असणारी, गरिबीने लाचार होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी, पैशाने श्रीमंत व सत्तेने महान असलेली पण अपरिपक्व अशी मंडळी ज्या समाजात आहेत, तोच समाज मागासलेला राहतो. आपणाला प्रगत व्हायचे आहे, की मागासलेले राहायचे आहे, हे त्या त्या समाजातील लोकांनी स्वत:च ठरविले पाहिजे. (कॅनडात माझा एक मित्र आहे. त्याचे नाव जीम बाल्सीली. सुप्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ ही फोन व दळणवळण सेवा जीमने निर्माण केली. ती अल्प काळात लोकप्रिय झाल्यामुळे चाळीशीतले जीम बाल्सीली अब्जाधीश झाले आहेत. जीम यांनी अब्जाधीश होऊनही आपले छोटेसे वॉटर्लू गाव सोडलेले नाही. त्यांना न्यूयॉर्क अथवा टोरँटोमध्ये स्थलांतर करणे सहज जमले असते; पण त्यांनी वॉटर्लू या छोटय़ा गावी राहूनच आपला पसारा वाढविला, गावाची भरभराट केली. तिथल्या विद्यापीठांना खूप मोठी देणगी देऊन तरुण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांवर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्याशिवाय ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी एक नवीन केंद्र स्थापन केले. या दोन संस्थांमध्ये जगभरातील पंडितांना बोलाविले व छोटय़ा वॉटर्लू गावात राहून अभ्यास, लिखाण  संशोधन करण्यासाठी खूप मोठे पगार दिले.

जीमचे हे कार्य पाहून त्यांच्या भागीदाराने पदार्थविज्ञानावर मूलभूत संशोधन करणारी संस्था वॉटर्लू गावात स्थापन केली. तिथे जगातून अग्रगण्य शास्त्रज्ञांना बोलाविले. जीमला व त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मुलांचा विवाह शतकातील सर्वात मोठा सोहोळा करण्याची महत्त्वाकांक्षा नसून त्यांना आपले छोटेसे गाव जगातील एक प्रमुख संशोधन केंद्र बनावे, अशी इच्छा आहे आणि त्यासाठी ते पैसा खर्च करीत आहेत.

इस्राएलमध्ये स्टेफ वर्थहाइमर हे सर्वात प्रमुख उद्योगपती आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के उत्पन्न ते त्यांच्या उद्योगात निर्माण करतात. जगप्रसिद्ध वॉरेन बफे त्यांचे अलीकडे भागीदार झाले आहेत. स्टेफना राजधानी तेल अवीव किंवा युरोप-अमेरिकेत धंदा करता आला असता; परंतु त्यांनी इस्राएलच्या मागासलेल्या उत्तर भागात उद्योगनिर्मिती केली आहे. हा विभाग लेबेनॉनच्या सीमेवर आहे. युद्ध झाल्यास स्टेफच्या उद्योगांना धोका आहे; परंतु त्यांचे राष्ट्रप्रेम व मागासलेल्या भागातील युवकांना संधी देण्याची तळमळ एवढी मोठी आहे, की स्टेफना क्षेपणास्त्रांची पर्वा नाही. त्यांच्या कंपनीत रोबोट ऊर्फ यंत्रमानव बराचसा कारभार पाहतात. त्याशिवाय त्यांनी टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण केले आहे. तिथे होतकरू तरुण उद्योजकांना जागा व सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. इतकेच काय  विरंगुळा मिळावा म्हणून आर्ट गॅलरी व संग्रहालयेदेखील केली आहेत.

याशिवाय त्या औद्योगिक केंद्रात स्टेफनी औद्योगिक शाळा उघडल्या आहेत. तेथे १४ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना उद्योगनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय संशोधन केंद्रात सुमारे १८०० इंजिनीअर काम करतात. मी ज्या वेळेस टेफेन औद्योगिक केंद्राला भेट दिली, तेव्हा स्टेफ स्वत: चार तास माझ्याबरोबर प्रत्येक विभागात आले होते; पण कोणत्याही कामगाराने काम सोडून त्यांच्याकडे पाहिले देखील नाही, की कोणत्याही शिपायाने मोठय़ा साहेबांना सलामही ठोकला नाही..

ऑस्ट्रेलियाचे उद्योगपती स्टीव्ह किलेलिया यांनी एक अतिशय यशस्वी सॉफ्टवेअर कंपनी उभारली आहे ते अब्जाधीश झाले. मग त्यांना समजलं, की एक अब्ज काय व दहा अब्ज काय, सर्व सारखेच. म्हणूनच स्वत: स्टीव्ह आपली बरीचशी संपत्ती आफ्रिकेत उपासमारीने बळी जाणाऱ्या गरीब लोकांना जीवदान मिळावे, यासाठी खर्च करतात. शेतीसुधार, पाणीपुरवठा, आरोग्य योजना या प्रकल्पांमध्ये ते मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यांनी काही कोटी डॉलर्स ‘जागतिक शांतता’ या विषयात संशोधन करण्यात खर्च केले आहेत. त्यांची मुले साध्या नोकऱ्या करतात आणि त्याही त्यांच्या कंपन्यांमध्ये नव्हे, तर शाळेत व इतर संस्थांमध्ये.

जॉर्ज सोरोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांनी आपली सारी संपत्ती जगात सर्वत्र व्यक्तीस्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी खर्च केली आहे. त्याशिवाय जागतिक शांततेचे काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’ या संस्थेची उभारणी करण्यासाठीही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर अर्थसाहाय्य केले आहे. या ग्रुपमध्ये १५० संशोधक काम करतात. जगातील ज्या भागात हिंसा असेल, त्या भागाचे ते अवलोकन करतात व दरवर्षी सुमारे शंभर अहवाल प्रसिद्ध करतात.

व्हर्जिन अटलांटिक या विमानसेवेचे संस्थापक व व्हर्जिन म्युझिक या उद्योग समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी ‘दि एल्डर्स’ म्हणजे ज्येष्ठ मंडळी अशी एक संस्था निर्माण केली आहे. त्याची स्फूर्ती त्यांना नेल्सन मंडेलांकडून मिळाली. या संस्थेत दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पारितोषिक विजेते बिशप डेस्मंड टुटू, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर, भारतातील ‘सेवा’ या संघटनेच्या संस्थापिका इला भट, युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान, आर्यलडच्या माजी राष्ट्राध्यक्षा मेरी रॉबीनसन्स आदी प्रभृती मंडळी आहेत. जागतिक समस्या सोडविण्यासाठी वृद्ध व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यामागची भूमिका आहे. रिचर्ड ब्रॅन्सन स्वत:च्या व मित्रांच्या खर्चाने या ज्येष्ठ मंडळींच्या बैठका घेतात व प्रसारमाध्यमांद्वारा त्याचा आवाज जगभर पोहोचवितात.
स्टिव्ह किलेलिया यांनी ‘जागतिक शांतता निदेर्शाकाची स्थापना केली. ते दरवर्षी लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ वृत्तपत्राला भरघोस देणगी देतात. त्या पैशाने जगातील सर्व देशांचा अभ्यास केला जातो व प्रत्येक देशात शांतता किती आहे, याचे अनेक निकष लावून चाचणी केली जाते. दरवर्षी मे महिन्यात एक अहवाल प्रसिद्ध होतो व त्यात जगातील सर्व देशांचे शांततेनुसार क्रमांक जाहीर होतात.

सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स व वॉरेन बफे यांनी आपली सारी संपत्ती सामाजिक कार्यासाठी वाहिली आहे, हे सर्वाना माहिती आहे. रिचर्ड ब्रॅन्सन, स्टिव्ह कलेलिया, जॉर्ज सोरोस, जीम बाल्सीली हे उद्योगपती जागतिक शांततेसाठी गुंतवणूक करतात. त्यात त्यांचा स्वत:चा, समाजाचा देशाचा अथवा त्यांच्या उद्योग समूहाचा काहीही फायदा नसतो. जागतिक पातळीवर विचार करण्यासाठी व्यापक इच्छाशक्ती व वैचारिक उंची असते. हे लोक केवळ पैसा गोळा करण्यामागे, नट-नटय़ांच्या मेजवान्या आणि क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात वेळ व संपत्ती वाया घालवत नाहीत, तसेच बाकीचे उद्योगपती चमकतात म्हणून स्वत:ही प्रसिद्धीमागे धावत नाहीत तर सारे विश्व हे एक शांततामय व्हावे म्हणून मनस्वीपणे प्रयत्न करतात. त्यामुळे प्रसिद्धी त्यांच्यामागे धावत जाते. या कार्यासाठी फारसा खर्च लागत नाही, तर एक जागतिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जे उद्योगपती फक्त डोळे मिटून भौतिक यशामागे धावत सुटतात. त्यांना हे जमणार नाही.

हान्स एकदाल हे भारतावर प्रेम करणारे उद्योगपती एका बहुराष्ट्रीय कंपनीचे अध्यक्ष होते. सुमारे ७० देशांत त्यांचा कारभार होता. एकदा माझ्याबरोबर कॉफी पित असताना, फोनवर बोलता बोलता न्यूझीलंडमधील एक कंपनी त्यांनी विकत घेतली. ते एका साध्या घरात राहतात. कधी ‘पेज थ्री’वर येण्याची ते धडपड करीत नाहीत. त्यांची पत्नी सर्वसाधारण महिलांप्रमाणे नोकरी करते. मुलाने अनेक प्रयत्न करून, वडिलांचा कुठलाही वशिला न लावता कशीबशी नोकरी मिळवली. मी त्यांना त्यांच्या साध्या राहणीविषयी विचारले, तर त्यांनी मला टॉलस्टॉयची लिहिलेली एक कथा ऐकवली.

ती अशी, ‘‘एक शेतकरी होता. त्याला कोणीतरी सांगितले, की बाजूच्या गावात जमीन खूप सुपीक आहे. तिथे जमीन घेतली तर तुला खूप कमाई होईल. शेतकऱ्याने तसे केले. काही दिवसांनी त्याला दुसऱ्या काही गावांची माहिती मिळाली. तिथेही त्याने जमीन घेतली. तो अजून श्रीमंत झाला. असे करता करता तो एका गावात आला. तिथला पाटील त्याला म्हणाला, सूर्यास्तापर्यंत या गावाला तू पूर्ण फेरी मारलीस तर तुला सर्व जमीन फुकटात मिळेल; पण फेरी पूर्ण केली पाहिजे. शेतकरी जोरात धावला. त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सूर्य क्षितिजावर अस्तास जात असताना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनींचा मालक झाला; पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन् तो धापा टाकत कोसळला व मृत्युमुखी पडला. ग्रामस्थांनी त्याला ६ बाय २ फुटाचा खड्डा खणून पुरले. त्या वेळी पाटील म्हणाले, खरे तर त्याला फक्त एवढय़ाच जमिनीची गरज होती..’’

पूर्वी भारतातही श्रीमंत उद्योगपती सामाजिक कार्यासाठी संपत्तीचा उपयोग करीत. टाटा समूहाने मुंबईत कॅन्सर, पदार्थविज्ञान व समाजशास्त्र या तीन विषयांत संशोधन करणाऱ्या संस्था स्थापन केल्या. त्याशिवाय इतरही अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली. बिर्ला समूहाने पिलानी येथील अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, मुंबईतील क्रीडा केंद्र व अनेक इस्पितळे आणि मंदिरे यांना मदत केली; पण हा सर्व भूतकाळ झाला. अलीकडे बजाज उद्योग समूहाने सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. ते मुंबई

विद्यापीठात नवीन विभाग उघडण्यासाठी भरघोस मदत करतात; पण अजिबात प्रसिद्धी मिळवत नाहीत. संगणक व्यवसायातील ‘विप्रो’ व ‘इन्फोसिस’ या दोन व्यवसायांनी शैक्षणिक संस्थांना हातभार लावला आहे; पण हे झाले अपवादात्मक. गेल्या २५-३० वर्षांत मानवी समस्यांवर संशोधन करणारी एकही संस्था खासगी मदतीने उभी राहिली नाही. याउलट मेजवान्या, क्रिकेटचे सामने, फॅशन शो व जिथे स्वत:ची जाहिरात करता येईल, अशा गोष्टींसाठी मुबलक पैसा उपलब्ध होत आहे.

या साऱ्यांचे चिंतन केल्यानंतर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळत बसण्यापेक्षा डोळे उघडे करून विचार करण्याचीच जास्त गरज आहे. हा खेळ थांबण्यासाठी आपल्याला स्वत:पासून सुरुवात करावी लागेल. आपले विचार, सवयी बदलाव्या लागतील. खासगी आयुष्यात गाडी, बंगला यांच्यासारखा दिखाऊपणा तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडली पाहिजे.

पैसा हा एक अद्भुत प्रकार आहे. आपण त्याच्यामागे धावलो तर पैसा आपल्यापुढे काही अंतर ठेवून धावतो. सत्तेचेही तसेच आहे, आपण सत्तेमागे धावलो तर सत्ता फक्त दुरून दिसते. आपल्या हाती येत नाही. यासाठी आपल्याला सामाजिक हितासाठी पोषक असलेल्या अनेक उदाहरणांचेही अनुकरण करावे लागते.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

सवंग सुख ही संस्कृती अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद – उपनिषदांपासून फुले – आगरकरांपर्यंत, सॉक्रेटीस – प्लेटोपासून चॉम्स्की – डेरिडापर्यंत पूर्व – पश्र्िचमेतील प्रमुख विचारवंतांचा आणि  त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध घेणारे हे पुस्तक

एखादे पुस्तक लिहिणे हेही कधीकधी धाडस असते. अगदी हिमालयाचे शिखर चढून जाण्याइतके वा अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात घुसून, कुणाच्याही मदतीशिवाय तेथील वनस्पती व प्राणीसृष्टीचा अभ्यास करण्याइतके. प्रा.डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर हे असेच धाडसी शोधयात्री आहेत.

त्यांनी ‘आपले विचारविश्व’ या पुस्तकात जागतिक तत्त्वज्ञानाच्या अथांग चिंतनाचा शोध घेतला आहे. वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतर अशा विषयाचा असा अभ्यास व लेखन करणे आणि तेही वाचकाला थेट जाऊन त्या शोधयात्रेत सामील करून घेणे सोपे नाही. वेदांपासून आईनस्टाईनपर्यंत, अ‍ॅरिस्टॉटलपासून फ्रॉईडपर्यंत, बसवेश्वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि रामदास-तुकारामांपासून कांट, हेगेल, स्पेन्सपर्यंतची वैचारिक परिक्रमा करणे हे गंगा नदीच्या काठावरून त्या अवघ्या भूप्रदेशाची परिक्रमा करण्यासारखे आहे. ती परिक्रमा करताना त्यांना भगवान श्रीकृष्ण भेटतात आणि महात्मा गांधीही. योगी श्रीअरविंद आणि कार्ल मार्क्‍सही. गुरु नानक आणि लोकमान्य टिळकही. या पुस्तकासाठी केलेल्या शोधयात्रेत त्यांना भेटलेले असे युगप्रवर्तक लोक पाहिले की, गेल्या सुमारे साडेतीन-चार हजार वर्षांंत माणसाचे विचारविश्व किती समृद्ध होत गेले आहे याचा अंदाज येतो. पण फक्त ‘अंदाज’च, कारण यातील प्रत्येक प्रकरण हा स्वतंत्र ग्रंथाचा (नव्हे, अनेक ग्रंथांचा!) विषय आहे. तरीही या विचारविश्वाचा फेरफटका आपल्याला शिरवाडकरांनी असा घडविला आहे की, आपण तत्त्वज्ञानाकडे अधिक कुतूहल व चिकित्सेने पाहू. तत्त्वज्ञान हा काही ‘फॅशनेबल’ विषय नव्हे. साहित्याच्या कथा-कादंबरी कक्षेतही तो मोडत नाही. एके काळी राजकारणाचा संबंध तत्त्वज्ञानाशी होता. त्यामुळे सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते थेट बट्र्राड रसेल वा अल्बर्ट काम्यू वा मायकेल ऊर्फ मिशेल फुकोपर्यंत बऱ्याच तत्त्वज्ञांनी राजकारणाचीही चर्चा ‘फिलॉसॉफिकल’ अंगाने केली. आता राजकारण हे मुख्यत: व्यवहारवाद, उपयुक्ततावाद आणि सत्ताकारण व अर्थकारण या चौकटीबाहेर जाताना दिसत नाही. खरे म्हणजे अर्थकारणही तत्त्वज्ञानाच्या वास्तूतच जन्माला आले. अ‍ॅडॅम स्मिथ असो वा कार्ल मार्क्‍स- ते अगदी अमर्त्य सेन हे सर्व जण तसे ‘फिलॉसॉफर्स’. पण आता अर्थकारण हेसुद्धा सर्वार्थाने ‘मुक्त’ झाले आहे. नीतीशास्त्र व धर्मशास्त्रे सुद्धा तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झाली, पण पुढे त्यातून मूलभूत चिकित्सेपेक्षा परंपरावाद आणि धार्मिक ताकद हेच उग्रपणे पुढे आले. मानसशास्त्रानेही तत्त्वज्ञानाची संगत सोडली आणि ते स्वभावशास्त्र व मेंदू/संवेदन यंत्रणा शास्त्र (न्युरॉलॉजी) या दिशेने गेले.

भारतीय विचार : परिवर्तनाला नकार

पहिल्या सहस्रकातील भारतीय विचार बव्हंशी अध्यात्मवादी असल्याचे दिसते. लोकायत, बौद्धवाद, मनुस्मृती, कौटिल्यविचार इत्यादींमध्ये दैनंदिन जीवन डोकावले आहे; पण भारतीय विचाराचा मध्यप्रवाह अध्यात्ममग्नच राहिला. भौतिक प्रगतीच्या अभावाचे ते कारण की परिणाम हा प्रश्न कठीण आहे; पण नव्या सहस्रकाची दोन ठळक वैशिष्टय़े सांगता येतील. एक तर, आध्यात्मिक दृष्टिकोनाने नव्या कालखंडात भक्तिमार्गावर वाटचाल सुरू केली. त्यामुळे व्यावहारिक जीवनात कोठलाच फरक पडला नाही. अध्यात्म आणि व्यवहार यातील विसंगती, किंबहुना विरोध भक्ती आणि संसार या द्वंद्वात चालू राहिला. त्यामुळे संसाराला विचाराची शक्ती प्रगत करू शकली नाही आणि विचाराला व्यवहारवास्तवाचे दर्शन झाले नाही. त्याचप्रमाणे विचाराच्या सामाजिक एकीकरणाचे सामथ्र्यही कुणा द्रष्टय़ाच्या लक्षात आले नाही.

तत्त्वज्ञानाची वसाहत
माणसाने ताजमहाल बांधले, पिरॅमिड उभे केले, मोठमोठी धरणे तयार केली आणि अशा कितीतरी असंख्य आश्चर्यकारक गोष्टी निर्माण केल्या; पण या सर्वाच्या एकत्रित आश्चर्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक असे त्याचे कार्य म्हणजे त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसविल्या, ज्या आपापल्या प्रकाशाने मानवी मनाला सदैव आकर्षित करीत असतात. या विचारवसाहतीत सर्वात महत्त्वाची वसाहत आहे तत्त्वज्ञानाची. मूलगामी अशा विविध विचारांची उभारणी हा तत्त्वज्ञानाचा विषय. त्यामुळे विचारविश्वात त्याला अग्रेसरत्व मिळणे अपरिहार्य आहे.

युरोप-अमेरिकेत अजूनही तत्त्वज्ञान ‘जिवंत’ आहे, पण मुख्यत: इंटेलेक्च्युअल/अ‍ॅकॅडमिक वर्तुळांमध्ये ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’, ‘न्यू लेफ्ट रिव्ह्यू’ ही व अशी नियतकालिके मूलभूत तत्त्वचिंतनाचे विषय हिरीरीने मांडतात, त्यावर वाद-चर्चाही होतात. भारतात अलिकडेच सुरू झालेले ‘द लिटल् मॅगेझिन’ काही प्रमाणात कला, तत्त्वज्ञान, साहित्य अशा संदर्भात मांडणी करते. महाराष्ट्रात ‘परामर्श’, ‘नवभारत’, ‘नवे विश्व’ असे काही नियतकालिकीय उपक्रम आहेत, पण त्यांना न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सचे विस्तीर्ण क्षितिज प्राप्त झालेले नाही. साहजिकच आपल्याकडील बहुतेक साहित्यिक चर्चा, राजकीय वाद, समाजशास्त्रीय टीका-टिपणी इत्यादी तत्त्वज्ञानविरहित असते. कधी कधी तात्त्विकतेचा, नैतिक मुद्दय़ांचा वा समाजशास्त्रीय प्रबोधनाचा आविर्भाव असतो, पण फारच वरवरचा. गांधीजी, पंडित नेहरू, कॉम्रेड डांगे असे काही मोजके शिलेदार सोडले, तर गेल्या काही वर्षांंत तत्त्वज्ञान क्षेत्र वाळवंटसदृश आहे.
त्यामुळे देशातील/महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाची चर्चा मुख्यत: भगवद्गीता (महाभारत), ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा व इतर संतसाहित्य यांच्या पलीकडे समकालीन झालेली नाही. आपल्याकडील सर्व तत्त्वज्ञानाच्या चर्चा या संतसाहित्याच्या, अध्यात्माच्या व धर्मवाङ्मयाच्या संदर्भात होतात. आजचे, आधुनिकतेचे, विज्ञान वा गणिताचे, समाजशास्त्राचे संदर्भ घेऊन तत्त्वज्ञानाची चर्चा होत नाही.

अरबांमधले श्रेष्ठ तत्त्वज्ञ
अल्-किंडी, अल्-फराबी आणि इब्न-सिना (पाश्चात्त्य नाव, Avicenna) हे तिघे अरबांमधले श्रेष्ठ तत्त्वज्ञ. अल्-किंडी (इ. स. ८००-८७०) हा अरबांचा पहिला  तत्त्वज्ञ. त्याने इतर विचारवंतांप्रमाणेच, ग्रीक तत्त्वज्ञान, विशेषत: अ‍ॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान, प्रसृत केले. तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र यातील फरक स्पष्ट करून त्याने विचारस्वातंत्र्यावर भर दिला. ‘तुम्हाला माहीत आहे ते मला माहीत आहे, पण मला माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही.’ असे बोलून त्याने तत्त्वज्ञानाच्या वतीने एका धर्मशास्त्राला सुनावले. अल्-फराबीने आपल्या ‘इहसा-अल्-उलम’मध्ये ज्ञानाची वर्गवारी करून ते संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यातील प्रमुख वर्ग आहेत भाषिकशास्त्रे, तर्कशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र आणि दृकशास्त्र (Optics), पदार्थविज्ञान, अध्यात्म, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र. इब्न सिन्नानेही (Avicenna  इ. स. ९८०-१०३७) प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल आणि कुराण यांचा संयोग साधण्याचा प्रयत्न केला.

अर्थातच, विज्ञान- तत्त्वज्ञान यातील संबंध अधिकाधिक घनिष्ट होत असताना दिसत असूनही आपल्याकडील बहुतेक विज्ञान लेखन हे ‘निखळ’ वैज्ञानिक ठेवण्याकडेच बहुतेक विज्ञान लेखकांचा कल असतो. तत्त्वज्ञानाची अशी उपेक्षा ही सामाजिक- सांस्कृतिक स्थितीशीलतेचे लक्षण आहे. अशा स्थितीशीलतेमुळे ऱ्हास होण्याची शक्यता असते, कारण ‘स्थिती’ फार काळ ‘स्थिर’ राहत नाही.
आपल्याकडे अध्यात्म, साक्षात्कार, अनुभूती या संकल्पनांविषयीसुद्धा अनेक भ्रम वा गूढ आहे. भारत हा एक आध्यात्मिक देश आहे, असे आपणच जगाला सांगितले आहे.

या आत्मसंतुष्ट करणाऱ्या गैरसमजामुळेच आपल्याकडे मूलभूत तत्त्वचिंतन, वैज्ञानिक संशोधन आणि  सखोल समाजशास्त्रीय/मानसशास्त्रीय विचार विकसित होताना दिसत नाही. वस्तुत: ‘विचारविश्व’ हे सर्वव्यापी मानायला हवे. सोयीसाठी भारतीय, युरोपियन, चिनी, अरब इ. तत्त्वज्ञान परंपरा मानणे वेगळे आणि दुराभिमानापोटी ‘भारतीय तत्त्वज्ञान जगात सर्वश्रेष्ठ आहे’ असे म्हणणे वेगळे. असा दुराभिमान भारतातच आहे असे नाही, तर युरोपात, चीनमध्ये वा अरब-मुस्लिम देशांमध्येही आहे. त्यातूनच ‘जिहादी’ प्रवृत्ती, अतिरेकी धर्मवाद, उग्र परंपरावाद निर्माण होतात. असा प्रक्षोभक अभिमान फक्त ‘इस्लामी’च असतो असे अजिबात नाही. कडव्या ज्यूंचा ‘झायोनिझम’ तेवढाच हिंसक आणि आक्रमक आहे. ‘हिंदुत्व’ ही स्वत:ला ‘सहिष्णू’ म्हणत म्हणत किती असहिष्णू होते हे आपल्या देशातील ‘खाप’ पंचायती, दलितांवरील अत्याचार आणि अतिरेकी भाषावाद यातून दिसले आहे. शिवाय ‘लढाऊ’ हिंदुत्ववाद म्हणजेच पराकोटीचा मुस्लिमद्वेषही आपल्या तथाकथित सहिष्णुतेत बसतो.

पाश्चिमात्य संस्कृतीतही उग्र व असहिष्णू कॅथलिक व प्रोटेस्टंट ख्रिश्चन संघटना आहेत, पण एकूण तत्त्वविचारात धर्मशास्त्रे-पुराणे आणि तत्त्वज्ञान हे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. ही प्रक्रिया अर्वाचीन अर्थाने रेनेसाँपासून म्हणजे सुमारे पाच-सहाशे वर्षांंपूर्वीपासून सुरू झाली. आजही पाश्चिमात्य देशांत जे तत्त्वसंशोधन व तत्त्वचिंतन होते. त्यातूनच आधुनिक विज्ञानही प्रगत होत आहे. विज्ञान-तत्त्वज्ञान हे एकमेकांत सर्जनशील चिंतनातून मिसळून गेल्यामुळेच ‘जीवन म्हणजे काय?’, ‘कॉन्शियसनेस म्हणजे काय?’, ‘ज्ञान म्हणजे काय?’, ‘विश्व म्हणजे काय?’, ‘जीवसृष्टी म्हणजे काय?’ आणि ‘काळ-टाइम म्हणजे काय’, असे प्रश्न एकदम विज्ञान- तत्त्वज्ञानात शोधले जात आहेत. ‘अंतिम सत्य’ आणि ‘संपूर्ण सत्य’ कधीही माणसाला प्राप्त होणार नाही, हे माहीत असूनही हा शोध अथकपणे सुरू आहे.

बुद्ध विचार : निर्वाण हेच मोक्ष
जैन विचार आणि जैन धर्म भारतात निर्माण झाला तरी तो भारतापुरताच मर्यादित राहिला. बौद्ध विचार आणि बौद्ध धर्मही भारताबाहेर- नेपाळ, श्रीलंका, चीन, जपान, म्यानमार, तिबेट आणि इतर आशियन देशांत पसरला. मात्र ज्या भागात तो जन्मला तेथे तो राहिला नाही. बौद्ध धर्माचा संस्थापक सिद्धार्थ (इ. स. पू. ५६३-४८३) ऐषआरामात वाढलेला राजपुत्र. भोवतालचे दैन्य आणि दु:ख पाहून त्याला उपरती झाली आणि माणसाच्या अशा दु:खापासून मुक्ती मिळविण्याच्या मार्गाचा शोध लावण्याचा त्याने ध्यास घेतला. त्यासाठी राजसंन्यास घेऊन त्याने तपश्चर्याही केली. शेवटी माणसाच्या दु:खाचे मूळ त्याच्या इच्छा, अभिलाषा, आसक्ती यांमध्ये आहे, तेव्हा त्यांचा (म्हणजेच मीपणाचा) त्याग करून (मोक्षवत) निर्वाण पदाला माणूस पोहोचू शकला तरच त्याची मुक्तता होऊ शकेल, अशा निष्कर्षांला तो येऊन पोहोचला.

या ‘ज्ञान-शोधयात्रे’चे सर्वार्थाने चित्तवेधक आणि उत्कंठावर्धक निवेदन करणारे पुस्तक म्हणजे डॉ. के.रं. शिरवाडकर यांचे ‘राजहंस प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘आपले विचारविश्व’. या नावातील ‘आपले’ हा शब्दही महत्त्वाचा आहे. हा ‘आपले’ शब्द म्हणजे ‘भारतीय’ वा ‘हिंदू’ या अर्थाने नाही. ‘आपले’ म्हणजे अवघ्या माणसांचे विचारविश्व कसे घडत गेले, त्यातूनच ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या. सौंदर्यशास्त्रापासून नीतीशास्त्रापर्यंत आणि राजकारणापासून विज्ञानापर्यंतच्या संकल्पना कशा सिव्हिलायझेशनच्या संदर्भात विकसित व उत्क्रांत होत गेल्या. याचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. (‘ग्रंथ’हा शब्द मुद्दामच वापरलेला नाही. कारण ‘ग्रंथ’ हा विद्वानांसाठी आणि ‘ग्रंथालयासाठी’ असतो आणि ‘पुस्तक’ हे कुणीही वाचण्यासाठी असते असे उगाचच काहींना वाटते.) शिरवाडकरांचे हे पुस्तक अगदी अनभिज्ञ वाचकालाही खिळवून ठेवू शकेल इतके वाचनीय व सुलभ झाले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे या ‘विचारविश्वा’चे स्थूल भौगोलिक व सांस्कृतिक विभाग शिरवाडकरांनी केले आहेत, पण त्याचा हेतू एखादी विशिष्ट विचारतत्त्व परंपरा दुसऱ्या परंपरेपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे हे दाखविण्यासाठी नव्हे, तर आपल्या ऐतिहासिक व पारंपरिक गृहितकांचा आधार घेतला तर समजायला अधिक सोपे जाईल म्हणून. ‘तत्त्वज्ञान’ हा विषय कठीण, गंभीर, बोजड आणि कंटाळवाणा (बोअरिंग) आहे, असा जो समज आहे. तो पूर्णपणे दूर करण्याचे सामथ्र्य या पुस्तकात आहे. ‘प्राचीन’ म्हणजे प्रगल्भ आणि आधुनिक म्हणजे उथळ असाही एक तत्त्वज्ञानाबद्दलचा समज आहे. भारत (वा चीन, अरब) यांचा तत्त्वज्ञानाचा इतिहास प्राचीन आहे आणि म्हणून ते चिंतन अधिक श्रेष्ठ व मूलभूत आहे, असा एक ‘गर्व’ भारतात आहे. तो दूर व्हायलाही या पुस्तकाने मदत होईल. भारतातील प्राचीन तत्त्वचिंतन किती विलक्षण, मूलभूत व सखोल होते, हे दाखवितानाच युरोपातील तत्त्वचिंतन कसे उत्क्रांत होत गेले आणि भारत प्राचीनत्वाच्या सापळ्यात कसा अडकत गेला, हेही पुस्तक वाचताना उलगडत जाते.
वस्तुत: जैनांचे महावीर वर्धमान, बौद्धांचा सिद्धार्थ ऊर्फ गौतम बुद्ध, चिन्यांचा कन्फ्यूशियस आणि ग्रीकांचा सॉक्रेटिस वा प्लेटो यांच्यातील ऐतिहासिक अंतर फार नाही.

वेद : ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’
भारतीय जीवनाच्या विराट वृक्षाची पाळेमुळे वेदोपनिषदांच्या जमीन-पाण्यात पोसली गेली आहेत. वेदवाङ्मय हा भारतीय विचाराचा मूळ स्रोत. वेदांविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचा दावा कुणालाही करता येणार नाही; पण त्यासंबंधी झालेल्या संशोधनातून जे समजते, त्यावरून वेदांच्या निर्मितीचा काळ इ. पू. १२००-१५०० असावा.  पश्चिम आशियातून भारताकडे आलेल्या आर्याच्या टोळ्यांनी लिहिलेले वाङ्मय काही भागांत तिकडेच लिहिलेले असावे. त्यामुळे भूमध्ये समुद्रालगतच्या प्रदेशांपासून तर भारतीय प्रदेशांपर्यंतच्या मानवगणांची आणि प्रदेशांची नावे वेदातील नावांशी जुळतात. वेदांचा काही भाग (ऋग्वेद आणि यजुर्वेद) पंजाबच्या भूमीवर लिहिला गेला असावा. संस्कृतमधल्या ‘विद्’ (जाणणे) या धातूपासून या वाङ्मयाला ‘वेद’ म्हणजे ज्ञान हे नाव मिळाले. ‘ईप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य उपाय जो ग्रंथ दाखवून देतो तो वेद,’ असे सायणाचार्यानी म्हटले आहे. परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणूनही वेदांचे वर्णन करण्यात येते. मनूच्या मते वेद सर्व धर्माचे मूळ आहे. (‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’) वेद चार आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद;  आणि ते वेगवेगळ्या काळात लिहिले गेले आहेत. वेदांचे संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असे चार भाग पडतात. वेद मंत्रांतून किंवा ब्राह्मणांतून लिहिले गेले आहेत. मंत्र पद्यात आणि ब्राह्मणे गद्यात आहेत. प्रत्येक वेदात दोन्ही प्रकारचे आविष्कार असले, तरी प्रमाण वेगळे आहेत. ऋग्वेद मुख्यत: मंत्रांतून म्हणजे पद्यातून, तर यजुर्वेद गद्यातून आहे. मंत्रांचा संग्रह ‘संहिता’ या संज्ञेने ओळखला जातो.

महावीर वर्धमान (इसवी सन पूर्व ५४०-४६८)
गौतम बुद्ध (इसपू ५६३-४८३)
कन्फ्यूशियस (इसपू ५५१-४७९)
सॉक्रेटिस (इसपू ४६९-३९९)
प्लेटो (इसपू ४२७-३४७)
म्हणजे हे सर्व तत्त्वज्ञ साधारणपणे अडीच हजार वर्षांंपूर्वीचे आहेत. त्यांनी केलेले तत्त्वचिंतन आजही संदर्भ व व्यवहारयुक्त वाटते. यावरूनच त्यांच्या विचारातील कमालीची प्रगल्भता आणि काही प्रमाणात कालातीतता लक्षात येईल. मग कुणी म्हणेल की तत्त्वज्ञानाचा ‘विकास’ व अधिक ‘संशोधन’ करायची काय गरज?

सामान्यता संपादन
कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी मराठवाडय़ातून शक्यतो शोध-निबंधासह सहभागी होत असे. अशा परिषदांमधील चर्चासत्रांमध्ये एक चमत्कारिक गोष्ट माझ्या लक्षात येई. एक तर महाराष्ट्रीय प्राध्यापकांची उपस्थिती कमी. जे उपस्थित असत ते केविलवाणे होऊन बसत. ज्येष्ठ प्राध्यापक उद्घाटन कार्यक्रमाला नटूनथटून बसत आणि नंतर जवळपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अदृश्य होत. चर्चासत्रे, त्यांच्या दृष्टीने, मूर्खाचा बाजार असे. वस्तुत: चर्चासत्रांत शोधनिबंध सादर करणे, स्वत:च्या आणि इतरांच्या निबंधांवर वाद घालणे, ज्ञान देणे आणि घेणे यात एक विशेष आनंद होता आणि हे प्राध्यापक त्याला मुकत होते. अशा परिषदांमधून, चर्चासत्रांतून, विद्यापीठे आणि महाविद्यालये यातील मराठी बुद्धिजीवींचे काही दोष लक्षात आले ते म्हणजे बेट प्रवृत्ती (Insularity, स्वत:ला अलग ठेवण्याची सवय), त्यामुळे येणारा आत्मविश्वासाचा अभाव, अनुभवांच्या विविधतेला दिलेल्या नकारामुळे येणारा मानसिक मागासलेपणा, न्यूनगंडातून आत्मतुष्टीसाठी निर्माण झालेला इतरेजनांबद्दलचा तुच्छता भाव आणि इतर भाषांमध्ये; पण विशेषकरून इंग्रजीमधील दुर्बलता. त्यामुळे मराठी माणूस अथवा त्याचे म्हणणे क्वचितच लक्षवेधी ठरे. कित्येक वेळा मराठी वृद्धिंगत आपला कमकुवतपणा इतरांबद्दलच्या तुच्छता वृत्तीने झाकण्याचा प्रयत्न करतात. जणू हे टिळक, राजवाडे, केतकर, शेजवलकर यांच्या बैठकीतले, त्यांचे वारसदार!

महाराष्ट्रात टिळक, राजवाडे यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांची परंपरा नाहीशी का झाली हे एक कोडेच आहे. आज या परंपरेला शोभणारे आणि परिस्थितीला अनुरूप असे प्रगल्भ विचार देणाऱ्यांची किती नावे घेता येतील? हा प्रश्न सविस्तर संशोधनाचा आहे. (त्यात अनेक कारण समाविष्ट असू शकतील.) पण एक कारण सहज जाणवते. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, विशेषकरून महाविद्यालये आणि विद्यापीठे यांना आपली जबाबदारी पेलता आली नाही. १९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्चशिक्षण क्षेत्रात पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्चशिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे ‘सामान्यता संपादन’ (Achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचा आदर्श बनला!

या वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या भागात ‘पश्चिमेचा विचारविकास’ आणि तिसऱ्या भागात ‘वास्तवाचे वेध’ यात सापडू शकेल. त्याचप्रमाणे पाचव्या भागात ‘विज्ञान आणि धर्म’ आणि अखेरच्या ‘सफर संपवताना’ या प्रकरणात वाचकाला मिळते. पुस्तक वाचता वाचताच आपण अंतर्मुख होत राहतो आणि वाचून संपल्यावर परत परत मागील प्रकरणांकडे वळत राहतो. माझा अनुभव तर असा आहे की, दुसऱ्यांदा (कुठूनही वाचायला सुरुवात करूनही) वाचताना आकलनाचा आनंद पाचपट होतो. ज्या थोर तत्त्वज्ञांची फक्त नावेच कानावरून गेलेली होती ती माणसे डोळ्यांसमोर त्यांच्या कालसंदर्भासहित उभी राहू लागतात आणि आपल्याला पडणाऱ्या चिरंतन प्रश्नांची उकल करण्याचा  त्यांनी कसा प्रयत्न केला, हे लक्षात आल्यावर आपले विचारविश्व इतके संकुचित का राहिले, याची खंतही वाटू लागते.

आपल्याकडील अनेक सुशिक्षितांनाही अरब व इस्लाम वा (मुस्लिम) हे समानार्थी शब्द वाटतात. प्रत्यक्षात इस्लामच्या अगोदरही अरब संस्कृती उदयाला आली होती. शिवाय अरबांमध्येही ख्रिश्चन अरब, ज्यू अरब आणि धर्मविरहित पाखंडी अरब आहेतच. पण तो काळ बाजूला ठेवू या. आपल्याकडील दुसरा गैरसमज म्हणजे इस्लामचे तत्त्वज्ञानच प्रतिगामी, परंपरावादी/सनातनी व उग्रवादी आहे.

सफर संपवताना
विचारविश्वातील (बहुधा कष्टदायक) सफर संपवताना एक गोष्ट लक्षात येते, की गेल्या काही हजार वर्षांतील माणसाचे विचार एखाद्या अथांग, अमर्याद सागरासारखे पसरले आहेत. एका पुस्तकाच्या ओंजळीने त्या सागरातले कितीसे पाणी आपण साठवू शकणार? शेवटी या सागराचे समग्र, सम्यक दर्शन प्रत्येकाने आपापल्या अध्ययनाची नाव सागरात लोटून घ्यावे हे श्रेयस्कर. त्यातील थरार (Thrill) हा तात्काळ आणि निश्चित लाभ. मात्र विचारांच्या इतिहासात शिरताना एक पथ्य पाळणे आवश्यक आणि लाभदायकही असते. या प्रयासात आग्रह, दुराग्रह बाजूला ठेवूनच संचार करणे उचित. दुराग्रहांच्या धुक्यातून विचारसृष्टीचे स्पष्ट, समग्र ज्ञान मिळणे शक्य नाही आणि हे लक्षात न घेतल्यास हाती लागते ते अज्ञान. ज्ञान म्हणून दुराग्रही अज्ञानाचे वितरण हा वैचारिकच नव्हे, तर नैतिक भ्रष्टाचार समजला पाहिजे. हे मान्य, की विचारक्षेत्रात संपूर्ण वस्तुनिष्ठता एक भ्रम असतो; पण हेही खरे, की परिपक्व मन दुराग्रहानेच सुरुवात करणार नाही. शेवट आग्रहात व्हावा, पण प्रारंभ दुराग्रहाने होऊ नये.

माणसाचा पृथ्वीवरील इतिहास लक्षावधी वर्षांचा आहे. निसर्गाने सर्व प्राणिमात्रांना बुद्धीचे वरदान दिले, पण त्यात माणूसच एवढा वरचढ कसा ठरला? लक्षावधी वर्षांपूर्वी माणसाच्या (ज्या वेळी तो चिंपाझी अधिक आणि माणूस कमी होता) इतिहासात क्रांतिकारक उत्क्रांती घडली. माणूस या काळात मागील दोन पायांवर उभा राहून चालू लागला. या उभ्या माणसा  (Homo-Erectus) चे ‘हात’ (म्हणजे पुढील दोन पाय) मोकळे झाले. हातांनी तो कुशलतेची कामे करू लागला. (उदा. दगडाची हत्यारे बनविणे). बुद्धी (विचार) आणि हाताचे कौशल्य (कृती) यांच्या अन्योन्य सहकार्यातून त्याच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली. त्यातूनच तो पशू अवस्थेतून मानवी अवस्थेत आला. निसर्गावर प्रभुत्व प्रस्थापित करणाऱ्या त्याच्या बौद्धिक क्षमतेच्या प्रभावांचा प्रारंभ असा झाला. इतर प्राणी मात्र निसर्गाने दिलेल्या चौकटीतच राहिले- आजपर्यंत.

शिरवाडकरांनी ‘पूर्वेची प्रज्ञा’ या पहिल्या भागात भारतीय विचारातील वेद, जैन व बौद्धवाद याचबरोबर ‘इस्लामचे योगदान’ही सांगितले आहे. सुमारे दीड हजार वर्षांंपूर्वी झालेल्या इस्लामच्या उदयानंतर त्या धर्मातील विचारवंतांनी कसे ‘वैचारिक जागतिकीकरण’ अंगीकारले हे पुस्तकात आहे. अरबांचा इस्लाम काळातील पहिला तत्त्वज्ञ अल्किंडी हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रसारक होता आणि इस्लामला ‘कोंडून’ ठेवणाऱ्यांच्या विरोधात त्या काळी कसे वैचारिक-तात्त्विक प्रयत्न झाले, हेही शिरवाडकर सांगतात. पण पुढे इस्लामी उदारमतवादाला काही प्रमाणात ग्रहण लागत गेले आणि इस्लामी समाजाला स्थितीशीलता येऊ लागली. तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची उपेक्षा केल्यावर काय होते याचा तो पुरावा आहे. (पण या पुस्तकात एकूण अरब सिव्हिलायझेशन व फिलॉसॉफीबद्दल अधिक यायला हवे होते. असो.)

अतुल देऊळगावकर, सौजन्य – लोकसत्ता

सर्व काळातील विद्वानांना मुळांचा शोध घेण्यासाठी किंवा वर्तमानाचा अन्वय लावण्यासाठी इतिहासात खोल उडी मारण्याची ऊर्मी होत असते. अलेक्स हॅले यांची ‘द रूट्स’ ही अभिजात कादंबरी अमेरिकेमधील कृष्णवर्णीयांच्या यातनांचा मागोवा घेत आफ्रिकेपर्यंत जाते. सतराव्या शतकापासून आधी युरोप व नंतर अमेरिकेने आशिया व आफ्रिकेला वसाहती बनविल्या. आफ्रिकेमधील कोटय़वधी कृष्णवर्णीयांवर गुलामगिरी लादली. १५३६ ते १८४८ अशी तब्बल ३१२ वर्षे आफ्रिकेतून गुलामांची विक्री होत असे. ‘‘वसाहती केलेल्या देशांमधील संपत्ती आणि कृष्णवर्णीयांचे श्रम या पायावर युरोप व अमेरिकेने औद्योगिक क्रांती केली. आशियाई व आफ्रिकी देशांच्या दारिद्रय़ाचे हेच कारण आहे. ’’ १९६८ साली नोबेल विजेते अर्थवेत्ते गुन्नार मिर्दाल यांनी ‘एशियन ड्रामा- एन्क्वायरी इन टू पॉव्हर्टी ऑफ नेशन्स’ या त्रिखंडीय ग्रंथातून वसाहतवादाचे अर्थकारण मांडले. आजही जागतिक अर्थ- राजकारणच नव्हे तर पर्यावरणवादी विचारांवरसुद्धा मिर्दाल यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ‘‘श्वेतवर्णीयांनी साहित्यामधून, आशियाई व आफ्रिकी देश हे रानटी, असंस्कृत, आळशी व नालायक असल्याचे दाखले देण्याचा प्रघात घातला. आपण गुलाम असणे हेच योग्य असे ठसविण्याकरिता कृष्णवर्णीयांमध्ये जबरदस्त न्यूनगंड व अपराधगंड निर्माण करणे आवश्यक होते. हे कार्य श्वेतवर्णीय साहित्यामधील प्रतिमांनी केले.’’ असा ‘ओरिएंटॅलिझम’चा सिद्धांत एडवर्ड सैद यांनी १९७४ मध्ये मांडला. या विचारांचा साहित्यिक उद्रेक म्हणजे गेली ३४ वर्षे वाचकांना खेचून घेणारी ‘द रूट्स’! श्वेतवर्णीयांनी केलेले क्रूर अत्याचार आणि त्यांनी लादलेल्या अनैतिहासिक व अनैतिक प्रतिमांमुळे कृष्णवर्णीयांच्या खच्चीकरणाचा समाचार हॅले यांनी घेतला. तसेच आफ्रिकन संस्कृतीचा समृद्ध इतिहास आणि अस्सल प्रतिमा सादर केल्या.

भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील टिकवून धरण्याजोगे आणि जाळून टाकण्याजोगे काय आहे, याची चिकित्सा अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन करीत आहेत. भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? दारिद्रय़ व विषमतेच्या पर्यावरणातील अशांतपर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून तुकडे पडतील? अशा अनेकविध कूट समस्यांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? ‘द ऑग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’, ‘आयडेंटिटी अ‍ॅण्ड व्हायोलन्स’ आणि ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ या ग्रंथांतून सेन यांनी भारतीय संस्कृतीसंबंधीचे प्रदीर्घ चिंतन आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. सलमान रश्दी यांना कादंबऱ्यांमधून इस्लामी संस्कृतीचा चिकित्सक वेध घ्यावासा वाटतो. अशा जागतिक कॅनव्हासवर मराठी वाचक राजमान्य राजश्री भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’बद्दल दांडगी आशा बाळगून होते. वलयांकित नेमाडे आणि त्यांचे ३० वर्षांपासूनचे संशोधन सर्वच काही त्या कादंबरीला गूढ करण्यास पूरक होते.

सिंधू संस्कृतीचा संशोधक खंडेराव यांची मोहेनजोदडो ते मोरगाव (खानदेशातील) भ्रमणगाथा असा विस्तीर्ण अवकाश ‘हिंदू’ने घेतला आहे. ६०३ पानांतील ६ प्रकरणांमधून व्यक्त झालेला आशय दोन-चार परिच्छेदांत सांगणे अशक्य आहे. अफगाणिस्तानमधील शरयू नदीपासून राजस्थानच्या सरस्वती नदीपर्यंत सप्तसिंधू, भूप्रदेशाचा नकाशा जगासमोर आणल्यामुळे सर्वचर्चित झालेला खंडेराव याच्या नजरेतून लोकजीवनाविषयीची प्रदीर्घ मांडणी समोर येते.

मोहेनजोदडोमधील उत्खनन पाहत असताना त्याला पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंध संस्कृतीमधील खेडे आणि त्याचे मोरगाव यात साम्य आढळते. त्यातून गावाची आठवण तीव्रतेने होते. गावातील आत्या आठवते. फाळणीपूर्वी ही आत्या पेशावरमधील महानुभव पंथाच्या आश्रमात गेलेली होती. उत्खनन आणि आत्याचा शोध हे दोन हेतू घेऊन खंडेराव पाकिस्तानात पोहोचला आहे. खूप प्रयत्न करूनदेखील आत्याचा ठावठिकाणा लागत नाही. त्याच सुमाराला त्याचे वडील विठ्ठलरावांची प्रकृती खालावल्याचा निरोप आल्यामुळे खंडेराव मोरगावकडे निघतो. या प्रवासातील लहानपणापासून आतापर्यंतच्या सर्व आठवणींचा पट कादंबरीमधून येतो.

मुलामध्ये जीव अडकलेले विठ्ठलराव खंडेराव परत आल्यावर त्याच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतात. प्रचंड जमीनजुमल्याचा वारस खंडेराव रीतिरिवाजानुसार सर्व उत्तरक्रिया करतो. खंडेरावला उदंड व संपन्न आयुष्य लाभावे ही परमेश्वराकडे आळवणी करणारा गोंधळ चालू होतो. इथे कादंबरीचा शेवट होतो.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील मोरगाव व खानदेशमधील ग्रामसंस्कृतीविषयी खंडेराव याची मते विस्ताराने येत जातात. एकत्र कुटुंबपद्धतीमधील नाती व ताणतणाव, आनंद व दु:ख, आपुलकी व तेढ दिसत जाते. अलुतेदार-बलुतेदार यांनी चालवलेला गाव उलगडत जातो. गावगाडय़ामधील करुण कहाण्या समजतात. काळाच्या ओघात गावातील वातावरणातील बदल खंडेराव सांगतो. त्याच्या कथनातून ‘संशोधक वृत्ती’ जाणवत नाही. वेळोवेळी तो केवळ शेरेबाजी करत जातो.

कादंबरी वाचल्यावर हाताला काही लागत नाही. जुनी शब्दकळा, भाषेचे पोत व लोकगीतांचे वैभव लक्षात येते. पण त्यातून लेखकाला नेमके काय सांगायचे आहे, हेच समजत नाही. ‘‘दोन ताना चांगल्या घेतल्या म्हणजे गायन चांगलं होत नाही. गाण्यातून विचार व्यक्त झाला तर ते खरं गायन!’’ असं पं. कुमार गंधर्व म्हणत.

भारतीय संस्कृतीला नेमाडे हे ‘हिंदू’ संस्कृती असं संबोधतात. (या गोंधळाबद्दल विस्ताराने लिहिता येऊ शकते.) तथापि या संस्कृतीची बलस्थाने व कमकुवत दुवे कोणते, हे स्पष्ट होत नाही. अमर्त्य सेन यांना संपूर्ण भारतीयांनी शतकानुशतके जपलेली वादसंवाद परंपरा महत्त्वाची वाटते. ‘‘विणकर कबीर, चांभार रवीदास, सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी तर मीराबाई, मुक्ताबाई, दयाबाई, अंदलबाई, सहजोबाई या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रुजल्यामुळे समाजातील सर्व थरांतून काव्याचा आविष्कार शक्य झाला. इसवी सन १००० सालापर्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान आणि गणिताचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता; परंतु कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक असह्य झाल्यामुळे बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्या काळात खंडणमंडण, वाद-संवादामुळे मतांतर व त्यातून धर्मातरे झाली आहेत. सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ तसेच मुस्लीम सुफी पंथांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता’’ असे विश्लेषण सेन यांनी केले आहे. पुरातत्त्व संशोधक असूनही खंडेराव यांच्या बोलण्याला अशी खोली येत नाही.

कृषी संस्कृतीच्या काही उजळ बाजू असल्या तरीही ती सरंजामशाहीला पोषकच होती. लोकशाही व आधुनिकीकरणामुळे आपली सत्ता धोक्यात येईल या भीतीने सरंजामदार घाबरले होते. सर्वाना समान प्रतिष्ठा हे आधुनिक मूल्य स्वीकारण्यास जमीनदार तयार नव्हते. अशा मध्ययुगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ ओढणाऱ्या अनेक पिढय़ा रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि पं. नेहरू यांनी घडविल्या. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर, गांधी व नेहरू यांनी साधली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिकतेला वेगळे परिमाण  दिले. ‘नव्या वाऱ्याचा स्पर्श होऊ न देणारे खेडे हे साचलेले डबके आहे’ असे त्यांना वाटत होते. समान संधी ही शहरात मिळू शकेल हा विश्वास त्यातून स्पष्ट दिसत होता.

नेमाडे यांचा खंडेराव हा आधुनिकतेचा कडवा विरोधक आहे. त्याची कारणे मात्र कादंबरीत सापडत नाहीत. ‘कोसला’पासून ‘झूल’पर्यंतच्या प्रवासात नेमाडे यांचे प्रतिनिधी आधुनिकतेला नाकारत आले आहेत. या प्रवाहांचे मूळ अस्तित्ववादी आणि उत्तर आधुनिक (पोस्ट मॉडर्निझम) विचारांमध्ये सापडते. ‘‘माणसाच्या असण्याला, इच्छेला काही अर्थ आहे काय, सभोवतालच्या सत्तेपुढे व्यक्ती क्षुद्र आहे. माणूस ही एक व्यर्थ यातना आहे. आपल्या इच्छेविना आपण जन्माला येतो आणि मरतो. मृत्यू ही एकमेव निवड आपण करू शकतो. जगण्यातील अर्थ शोधणे ही अर्थशून्य धडपड आहे’’ असे निर्थकतेचे तत्त्वज्ञान आकर्षक व आक्रमकरीत्या मांडले जात होते. कुटुंब, शासन व सर्व प्रकारच्या सत्ता नाकारणारे नेमाडे यांच्या चार नायकांची नाळ अस्तित्ववादाशी जोडलेली आहे.

१९६० ते ७०च्या दशकात जगभर आधुनिक विचारांना नाकारणारा उत्तर आधुनिक विचार रुजू लागला. ‘‘आपल्या अस्तित्वाचा आपणच अर्थ शोधावा. कोणतीही संकल्पना एकसंध नसून तुकडय़ांनी (फ्रॅग्मेंट्स) बनलेली असते. यापुढे महासिद्धांतांचा (मेटॅ थिएरी-समाजवाद, मार्क्‍सवाद, उत्क्रांतिवाद) काळ गेला. महाकथनांची (ग्रँड नॅरेटिव्ह-रामायण, महाभारत) अपेक्षा धरू नका. सर्व प्रकारच्या संरचना (स्ट्रक्चर) या अनैसर्गिक असल्यामुळे त्या संपवायला हव्यात.’’ असा तो जाहीरनामा होता. नेमाडे यांच्या पाचही कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखा या उत्तर आधुनिकवादाचा पुरस्कार करतात. त्यामुळेच त्यांना आधुनिकतेचे वावडे असते. ‘कुठलाही आदर्शवाद स्वीकारणे, म्हणजे स्वत:ला बंदिस्त करून घेणे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, त्यामुळे व्यक्तीचा विचार घेणे म्हणजे विभूतिपूजा करीत स्वत:ला गहाण टाकणे. माझ्यावर कुठल्याही सत्तेचे नियंत्रण नको. मला वाटतं तसं मी वागणार,’ या सूत्राला मराठी साहित्यात बौद्धिक प्रतिष्ठा देण्याचे कार्य तेंडुलकर, नेमाडे व आळेकर यांनी केले.

कालांतराने १९८०च्या दशकात नेमाडे यांनी देशीवादाची (नेटिव्हिझम) मांडणी केली. १९९०च्या दशकात जागतिकीकरणामुळे देशी संस्कृती धोक्यात येत असल्याची भीती त्यांना वाटू लागली. ‘दोन भिन्न संस्कृती एकमेकांच्या संपर्कात आल्यावर सांस्कृतिक बदल सुरू होतात. सशक्त संस्कृतीसमोर संपून जाण्याचे भय अशक्त संस्कृतीला होऊ लागते. त्यातून स्थानिकांची स्वदेशीवादाची चळवळ उभी राहते.’ असे प्रमेय मानववंशशास्त्रज्ञ राल्फ लिंटन यांनी मांडले होते. एडवर्ड सैद यांचा ‘ओरिएंटॅलिझम’ आणि लिंटन यांच्या विचारांचे स्वैर रूपांतर करून नेमाडे यांनी देशीवादाचे अजब रसायन तयार केले. वास्तविक दोन भिन्न संस्कृती संपर्कात आल्यावर तीन शक्यता संभवतात. शरणागती पत्करून प्रगत संस्कृतीमध्ये सामील होते, कधी प्रगत दोन्हींचा संगम होऊन नवी संस्कृती तयार होऊ शकते. तर केव्हा दुसऱ्या संस्कृतीला नाकारण्यासाठी अनेक आघाडय़ांवर संघर्ष करते. ‘बाहेरचे आल्यामुळे आपण संपून जाऊ’ हा भयगंड (झेनोफोबिया) घेऊन असंख्य स्थानिकांनी चळवळी केल्या आहेत. त्यातूनच परकीय, स्थलांतर करणाऱ्यांना नकार येतो. शिवसेना व मनसे या त्याच्या महाराष्ट्री आवृत्त्या आहेत. (धोक्याची आरोळी ठोकल्याने नेतृत्वदेखील आपसुक चालून येते हा एक हमखास फायदा आहे.)

असंख्य आक्रमणे सहन करताना टाकाऊ असलेले टाकून नव्याचा स्वीकार केल्यामुळेच भारतीय संस्कृती (हिंदू नव्हे) आजवर टिकून राहिली आहे. विज्ञानामुळे शेती व गावे, उत्पादन व सेवा यांचे स्वरूप बदलत गेले. शहरीकरणामुळे मानवी नाते व संबंधांमध्ये बदल झाला. आधुनिक व शहरी हे उफराटेच असतात, असा नेमाडे यांच्या प्रतिनिधींचा ग्रह दिसतो. ‘गावातील रहिवासी हे अधिक नीतिमान व उदात्त असतात. हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट होणार नाहीत. कारण हिंदू लोक सगळी अडगळ तळघरात जपून ठेवतात,’ असे भाकीत ‘हिंदू’मधील खंडेराव करतो. त्याला युरोपी आधुनिकतेचा तिटकारा आहे. ‘‘युरोपी संवेदनवर्चस्वामुळे आलेली रोगट स्वच्छता-साबण, पावडरी छानछोकी? एका बादलीत सगळे घाण कपडे खंगाळून मग दुसऱ्या एका स्वच्छ बादलीत ते धुऊन काढणं-साबणाची गरज काय?’’ असा सवाल खंडेराव विचारतो. त्यानंतर तो राख, शिकेकाई यांची महती सांगतो. यातून वाचकांनी काय अर्थ काढायचा? आधुनिकतेने बहाल केलेल्या सर्व वस्तू व उपकरणे (ट्रॅक्टर, टीव्ही, मोबाइल) या बाह्यांगांचा सहज स्वीकार करायचा, परंतु आधुनिक विचाराचे अंतरंग नाकारायचे ही दांभिकता कित्येक सुधारणांच्या आड येत आहे. गेल्या शतकात सतीबंदी, बालविवाह, स्त्रीशिक्षण, राखीव जागा यांना सक्त विरोध करणारी तर आता, कुटुंबनियोजन, मुलीचा जन्म, आंतरजातीय विवाह यांना नाकारण्यामागे हीच मानसिकता आहे. ‘‘सीमेंट-काँक्रीटचं घर पाहिजे, परंतु संडास आत नको. बाहेर जाणे  हे देशीपणाचे वाटते.’’ असा बाणा घेतल्यामुळेच साठ टक्के भारत उघडय़ावर बसतो. त्यामुळे सर्व जलस्रोतांची नासाडी होऊन रोगराई पसरत आहे. ही मानसिकता असेपर्यंत देशाला व महाराष्ट्राला स्वच्छ पाणीपुरवठा अशक्य आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘ग्रामीण व देशी ते सारे काही श्रेष्ठ’ हे सुलभीकरण, ‘पूरब और पश्चिम’ दाखवणाऱ्या मनोजकुमारी धाटणीचे होते. नेमाडे फक्त तात्पर्य सांगून मोकळे होतात. विस्ताराने भाष्य करण्याची रीत त्यांना मान्य नसावी. आधुनिकीकरणानंतर जगभरात शेतीचे युग जाऊन यंत्रयुग व त्यानंतर संगणक युग आले. विज्ञानामुळे असंख्य सोयीसुविधा सर्व लोकांपर्यंत गेल्या. याबद्दल खंडेराव चकार शब्द काढत नाही.

नेमाडे यांचा निवेदक खंडेराव यांना व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवाद ही पाश्चात्त्य थोतांड वाटतात. युरोपी व स्त्रीवादीचा (त्याच्या शब्दात स्त्रीवादिणी) पदोपदी धिक्कार करतो. परंतु त्यामागील कारण समजत नाही. वानगीदाखल एक परिच्छेद पाहू. ‘‘साधू तेल्याच्या दोन बायकांबद्दल मारकिस द सादू या हेिडगखाली ग्रामीण अर्थव्यवस्थेत दोन लग्नाच्या बायका कशा फायदेशीर असतात आणि सबंध समाजाची लैंगिक नीतिमत्ता निरोगी ठेवतात याच्या नोंदी प्रिझनर्स ऑफ झेंडी या भागात सगळा लभान्यांचा इतिहास, मोरगाव विमेन : मोर दॅन विमेन, डायरीच्या या भागातील मंडीची (संशोधिका) निरीक्षणं तर आधुनिकतावाद्यांना, स्त्रीवाद्यांना आणि फ्रॉइड संप्रदायाला अडचणीची ठरली आहेत. पाश्चात्त्य, विचारवंत समजतात तशी स्त्री ही वैश्विक कोटी आहे काय? स्त्री ही संकल्पना समाजशास्त्रीय की जीवशास्त्रीय? तिसऱ्या जगातील हिंदू स्त्रियांची बाजू कोण्या युरोपी स्त्रीवाद्यांनी समजून घेतली आहे का? भांडवलशाही, वसाहतवाद, राष्ट्रीयता यांद्वारे स्त्रियांचं जास्तीत जास्त शोषण युरोपी समाजांनीच केलं आहे. त्याविरुद्ध या युरोपी स्त्रीवादिणी कधी उभ्या राहिल्या का?’’

नेमाडे यांना स्त्रीवादी चळवळीचे योगदान पूर्णपणे नाकारायचे आहे काय? जगभरच्या पुरुषांनी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली. आधी धर्म व पुढे भांडवलशाहीने स्त्रीला वस्तू करून टाकल्याचे प्रखर वास्तव युरोपातील महिला विचारवंतांनी आणले. सिमॉन द बोव्हा, केट मिलेट यांनी ‘आपला युरोप कित्ती छान’ अशी उथळ भूमिका घेतली नाही. हिंदू स्त्रियांचा कैवार घेणारे नेमाडेप्रणीत भाष्यकार, ‘दोन बायका समाजाची लैंगिक नीतिमत्ता निरोगी ठेवतात,’ असे कसे म्हणू शकतात. वर्ग, वर्ण व लिंग यांच्यावरून होणारा भेदाभेद नष्ट करणाऱ्या विसाव्या शतकातील चळवळींमुळे अवघ्या मानवतेला उन्नत केले. या चळवळींचा उगम भारतातून (देशी) नाही म्हणून त्यांना नाकारणार?

नेमाडे यांच्या खंडेराव यांनी नावडत्या स्त्रियांकरिता वापरलेली भाषा पाहा. ‘स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनीच चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती. एकच फाडफाड बोलणारी प्रतिस्पर्धीण होती. होस्टेलमधली बेलाबाला नावाची आगाऊ स्त्रीवादी उघडय़ा छातीची चंट मुलगी.’ स्वप्नाळू व भाबडय़ा परिवर्तनवादी विद्यार्थ्यांविषयी उल्लेख कधी ‘समाजवादी संघटनांमधल्या लग्नावर आलेल्या इंटरकाष्टा प्रेमविवाही पोरापोरींना तर ही तुरुंगात जाण्याची सुवर्णसंधी’ असा येतो. तर कधी ‘अडकले झवाडे युवकयुवती क्रांतिकारक मंडपात’, असा येतो. ही भाषा कोणती संस्कृती व सहिष्णुता दाखवतात? स्त्रियांच्या छाती व पाठीच्या वर्णनातून काय साधतात? विशीच्या वयात इतरेजनाविषयीची तुच्छता व शरीर आकर्षण समजून घेता येते. चाळिशीनंतर उदारता येत जाते. मतभेद असूनही व्यक्त करण्यात प्रगल्भता येते. अशा खुणा खंडेरावमध्ये सापडत नाहीत.

कादंबरीमधील भाषा ही त्या पात्रांची आहे, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. परंतु शब्दांची, विशेषत: विशेषणांची निवड ही लेखकाचीच असते. लेखकाची सभ्यता ही ‘निवडक’ असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. साने गुरुजींच्या साहित्याला, नेमाडे श्रेष्ठ मानतात. असे असेल तर साने गुरुजींच्या उदार अंत:करणाचा नेमाडे यांना स्पर्श झाल्याचा पुरावा सापडत नाही. एकीकडे साने गुरुजी, तुकाराम व वारकरी परंपरा तर दुसरीकडे बेबंद व्यक्तिवाद या दोन टोकांमध्ये, त्यांचा लंबक दुसरीकडेच जाऊन अडकला आहे.

आविर्भाव पुरातत्त्व संशोधनाचा असला तरी त्यात शोधवृत्तीचा पुरता अभाव आहे. मलिक अंबर याने महाराष्ट्र धर्माची स्थापना केली. राम हा मुंडा जमातीचा होता, या विधानांना आधार देण्याचे कष्ट नेमाडे यांनी घेतले नाहीत. इतिहासाच्या आकलनाचे हे गोंधळ आहेत.

तात्त्विक बैठक, आदर्शवाद व व्यापक राजकीय विचार या सर्वाचे वावडे असेल तर लैंगिकतेवर लक्ष अधिकाधिक केंद्रित होते, अनावश्यक विस्तार आणि अघळपघळ गप्पा सुरू होतात. पुन्हा एकदा होस्टेल, कॉलेज, विद्यापीठ व तिथले राजकारण सांगावेसे वाटते. आव तोच आणि भाव तसाच! सामाजिक परिघ मोठा नाही, सांगण्यासाठी विशाल आणि व्यापक विचार नाही. त्यामुळे आत्मकेंद्री वर्णनांचा पूर लोटतो. शब्दवैचित्र्य, शब्द चमत्कृती व तिरकस शैली हीच हत्यारे बनतात. त्यातून कधी कधी गंमत वाटू शकते. हेच अस्त्र वारंवार वापरणाऱ्याकडे आयुधांचा साठा कमी असतो. सदैव तिरकस बोलण्यात आपली बुद्धी पणाला लावणाऱ्यांना इतर कुठलेही बौद्धिक आव्हान दिसत नाही. नेमाडे यांची पात्रे त्याच वाटेने जातात.

नकार आणि केवळ नकारात धोका असतो. नकाराच्या कृष्णविवराकडील प्रवासाचा अंतिम टप्पा मृत्यूच्या पोकळीकडे घेऊन जातो. याची प्रचीतीदेखील येत गेली. नकारघंटा वाजविणारे काही काळ चमकून नाहीसे झाले. त्यांच्या अभिव्यक्तीला पूर्णविराम मिळाला. काहींनी आत्महत्येचा मार्ग निवडला. नकारवादी मंडळींनी लक्षात ठेवला तो आल्बेर कामूचा ‘आऊटसायडर’ (१९४२)! अनेक पिढय़ांना त्यानं पछाडून टाकलं. त्याचा नायक मेर्सो जगभरच्या तरुण पिढीचा नायक झाला. ‘आऊटसायडर’ वाचणं हा प्रौढ होण्याचा एक मार्ग होता असं म्हटलं जायचं. जगाला नाकारणारा मेर्सो तत्त्वज्ञानातील अतिशय मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. मूल्यं हरविलेल्या, दांभिक जगात जगायचं कसं या यक्ष प्रश्नातून त्याचा कोंडमारा होतो. आयुष्याच्या निर्थकतेची भयाण जाणीव आल्बेर कामूनं करून दिली होती. त्याच कामू यांनी ‘‘जगणे आणि विसंगतीविरुद्ध बंड करून उठणे हेच जीवनाचे सार्थक आहे. जो नकार आणि स्वीकार दोन्ही करू शकतो, तोच खरा बंडखोर!’’ असंदेखील कामूनी म्हटलं आहे. (दि रिबेल- १९५१) ‘‘मी अस्तित्ववादी नाही, सर्व नाकारत कुठलीही भूमिका न घेण्यात शहाणपण नाही’’ अशी त्यांची वाटचाल होती.

१९९१ नंतरच्या ‘आदर्शवादाचा अंत’ झालेला काळ संबोधले जाते. आता लंबक दुसऱ्या टोकाला गेला. मी, मी आणि केवळ मीच! ‘मी माझ्या भौतिक परिस्थितीमध्ये बदल घडविणार..’ हा अग्रक्रम झाला. फक्त स्वत:कडेच लक्ष पुरविताना आजूबाजूला अजिबात न पाहण्याचा वसा सर्वत्र पसरला गेला. संपत्तीची निर्मिती वाढत चालली त्याचसोबत भुकेले व अर्धपोट वाढू लागले. जगाचे पर्यावरण नासून गेले. उत्तर आधुनिक मानसिकतेमधून आलेली जीवनशैली संपूर्ण जगासाठी घातक आहे. त्या मार्गाने पुढे गेल्यास पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा अंत अटळ आहे. अशा कडेलोटाला आपण आलो आहोत, असं वैज्ञानिक बजावत आहेत. ‘आदर्शवादाचा अंत’, ‘इतिहासाचा शेवट’ अशा कितीही घोषणा झाल्या तरी जग बदलण्याचा मुद्दा हा सदासर्वकाळ कळीचा असतो आणि असणार आहे. बदलाची प्रक्रिया गतिमान व व्यापक करण्याची जबाबदारी राजकारण व समाजकारणावर आहे आणि हे बदल टिपणारे साहित्यच टिकत असते. १९६० नंतरच्या मराठी साहित्याने विचारविश्वाला विशालता येऊ दिली नाही. त्यामुळे जीवनदृष्टी देण्याचा प्रश्नच नव्हता.

नोबेल सन्मानित जर्मन साहित्यिक गुंथर ग्रास यांच्या ‘द टिन ड्रम’ (१९५९) कादंबरीचा निवेदक ऑस्कर मॅझरेथची शारीरिक वाढ खुंटलेली आहे. ‘‘छोटय़ा अपघाताने तिसऱ्या वर्षांपासून माझी वाढ थांबली असं सगळे समजतात, ते सपशेल चूक आहे. मी माझी वाढ थांबविण्याचा निर्णय घेतला. सगळं जग मला लहान मानत होतं. माझी मानसिक वाढ व्यवस्थित असल्यामुळे मला सर्व काही कळत होतं.’’ ऑस्कर त्याच्या आत्मनिवेदनात सांगतो. मराठी साहित्यामधील बहुतेक नायकांचं नातं थेट त्या ऑस्करशी आहे. फरक एवढाच आपल्या नायकांचं शारीरिक वय वाढत गेलं तरी त्यांची मानसिक वाढ कुंठित झाली आहे. विशीवर त्यांचं अपार प्रेम असल्यामुळे विशी न ओलांडण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. कॉलेजजीवनामधील स्मरणरंजनात आयुष्य घालविणारे अनेकजण असतात.

त्याने तरुणपणी भर समुद्रात लघवी केली
आणि उरलेलं आयुष्य
समुद्राची उंची किती वाढली
हे मोजण्यात घालवली

असा, या गतरंजनाचा मर्मभेद विंदांनी केला आहे. नेमाडे, आळेकरांचे नायक या गर्तेत अडकून राहिले. त्यांचं विश्व त्यांच्याभोवतीच फिरतं. बाहेरच्या बदलत्या अर्थ-राजकारणाचा अदमास लावण्याची त्यांची कुवत नाही.

एकविसाव्या शतकातील प्रश्नांचे स्वरूपच जागतिक आहे. पर्यावरण, अर्थ-राजकारणामुळे सर्व राष्ट्रांना एकत्र येणे भाग आहे. भूक व दारिद्रय़ाचा प्रश्नदेखील स्थानिक उरत नाही. त्या समस्येमधून निर्माण होणारे अतिरेकी जगाला वेठीला धरतात. या जटिल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उदार व सहिष्णू विचार तारू शकतील, असं अनेक क्षेत्रांमधील विद्वान सांगत आहेत. हे वैश्विक भान यावयाचे असेल तर मराठी साहित्याला आत्ममग्नता सोडावी लागेल; परंतु त्याआधी तुच्छता व बेपर्वाईचा वसा देत, निष्क्रिय व उदासीन करणाऱ्या नकाराला गाडून टाकावं लागणार आहे. कृती करण्यास उद्युक्त करणारे विचार दिले नाहीत तर पुढच्या पिढय़ा माफ करणार नाहीत.